संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील...
त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं.