नाव बोंबलेवाडी असलं, तरी तिथं फारसं काही घडत नसे. विहिरीवरच्या भांडणांखेरीज बाकी शांतताच. म्हणायला गाव आधुनिक होतं, पण ते फक्त सरपंच हणमंतराव वाघमोडेंच्या लेखीच. जी काय आधुनिकता म्हणून होती, ती फक्त हणमंतरावांच्या घरीच. आता ती तिथं असायलाच हवी होती. हणमंतरावांच्या गेल्या तीन-चार पिढ्या राजकारणात होत्या. पणजोबा-आजोबा यांनी तर इंग्रजांच्या काळातही राजकारण गाजवलेले. हणमंतरावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तर त्यांचे आजोबाच नेहरूंऐवजी पहिले पंतप्रधान व्हायचे खरे. पण "नव्या रक्ताला' वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त गरम न होऊ देता ते पद सोडलं.