Skip to main content

विचार

सामुदायिक हुषारी

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 15/10/2011 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
१९०७ मधली, ब्रिटनमधील एका लहानशा गावात घडलेली ही एक गोष्ट आहे. त्या गावात एक जत्रा भरली होती. पंचक्रोशीतले शेतकरी, व्यापारी, पशुपक्षी पालन करणारे अशांनी तिथे आपले स्टॉल थाटले होते. लोक भटकत होते, खातपीत होते आणि खरेदी विक्री चालू होती. एका स्टॉलवर मांस विकणारा एक शेतकरी होता. गर्दी जमवायला त्याने एक शक्कल लढवली. एक चांगला धष्टपुष्ट बैल स्टॉलवर बांधला. त्याचे वजन अचूक ओळखणार्‍याला अमके एक पौंड बक्षीस लावले. त्याने चिठ्ठ्या बनवल्या होत्या. त्यावर आपले नाव आणि आपले उत्तर लिहून द्यायचे. संध्याकाळी जत्रा संपायच्या वेळेस बक्षीस जाहीर होणार होते. अर्थातच त्याची शक्कल कामी आली.

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.

सीमोल्लंघन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 07/10/2011 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा! रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं. पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.

क्यू एन एच, डिसिजन पॉईंट्स वगैरे..

लेखक गवि यांनी सोमवार, 03/10/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है..वगैरे सुरु असतं तेव्हा विमान टॅक्सीवेवरुन रनवेच्या दिशेने झपाझप सरकत असतं. "तुम्ही रनवेवर पोहोचा, रनवेच्या सुरुवातीला नाक वळवून उडण्याच्या तयारीत उभे रहा आणि आम्हाला सांगा", असा क्लिअरन्स आधी टॉवरकडून मिळतो. आपण तसं रनवेवर जाऊन टोकाला उभं रहायचं आणि नाक रनवे मध्यरेषेशी जुळवून मग रेडिओत तोंड घालून सांगायचं की "मुंबई, व्हिक्टर किलो अल्फा, रेडी फॉर टेकऑफ.." मग ते म्हणतात "व्हिक्टर किलो अल्फा, क्लिअर्ड फॉर टेक ऑफ.

संध्या छाया

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 01/10/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९७५ - आम्ही माझ्या एका ज्येष्ठ आप्तांकडे आग्र्याला गेलो होतो, त्यांचे नाव डॉ.कुंटे. पूर्वी राजाकी मंडी या भागात त्यांचा दवाखाना होता आणि त्याच भागात ते रहात असत. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होतीच, शिवाय समाजकार्य आणि देशसेवा यातही त्यांचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे त्या भागातील आबालवृध्द त्यांना ओळखत होते. पुढे त्यांचा मुलगा राजा डॉक्टर बनला आणि हळूहळू त्याचा जम बसत गेला. त्यांच्या दवाखान्याखेरीज इतर काही नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स वगैरेंमध्ये तो जात असे. राजाकीमंडीमधील जुने घर सोडून ते कुटुंब आग्रा शहराच्या बाहेर दयालबाग रोडवरील नव्या बंगल्यात रहायला आले.