Skip to main content

इंधन, खरे काय?

लेखक भंकस बाबा यांनी मंगळवार, 03/09/2019 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा . तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे. सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते. गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही. जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?

वाचने 75771
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

ईंधन दरवेळी नवीन आणुन खर्च खरेच कमी होतो का? म्हणजे पेट्रोल पेक्षा डिझेल स्वस्त पण गाडी एक दोन लाखाने महाग. सी.एन.जी त्याहुन स्वस्त पण ईन्शुरन्स आणि ईंजिन महाग. आता ईलेक्ट्रिक गाड्या येणार पण त्यांच्या बॅटरी एफिशियन्सी, बॅटरी गेल्यानंतरचा कचरा (जशी ई-वेस्ट) या सगळ्याचे काय? दुरच्या प्रवासात सर्वत्र चार्जिंग मिळणार का? ईथेनॉलवरच्या गाड्या कधी येणार? ईथेनॉल पुरेसे तयार होणार का आणि कोण तयार करणार? वितरणाची व्यवस्था काय? त्याऐवजी ईंधन कोणतेही असो , शक्य असेल तेव्हा कार पुलिंग करणे, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरणे, जवळच्या कामासाठी पायी चालत जाणे हे सोपे उपाय वाटत नाहित का?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

इंधन दरवेळी नविन आणल्याने खर्चात कुठेही बचत होत नाही. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बॅटरीचा कचरा रिसायकल करण्याची योग्य सोय असेल अशी अपेक्षा करता येईल. पण त्याची शाश्वती नाही. इथेनॉलवर चालणार्‍या नविन गाड्या आणण्यापेक्षा आहेत त्या गाड्यांमध्ये काही बदल करुन इथेनॉल / बायोफ्युएल वापरता येईल का याची चाचपणी करता येऊ शकेल. चांगली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था फक्त शहरांपुरतीच मर्यादित आहे.

हल्लीच एक बातमी वाचली होती कि टीवीएस मोटर्सने फक्त इथेनॉलवर चालणारी दुचाकी बाजारात उतरवली आहे. आता इथे गरज क़ाय आहे? तर इथेनॉलवर चालणारी रिक्शा जऱ या कंपन्यानी उतरवली तर पेट्रोल , डिझेलपेक्षा भरपूर स्वस्त असलेले इथेनॉल रिक्शाचालकाची नफ्याची पातळी उंचावेल. तुलनेने कमी प्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरण पूरक असेल. पण असा प्रयत्न होताना दिसत नाही. या रिक्शा जर इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखान्याना सब्सिडी बेसिसवर पुरवल्यास यांच्या वापराला चालना मिळेल. ज्या स्क्रैप पॉलिसिचा बोलबाला सरकार करत आहे ती जुन्या रिक्शाच्या बदल्यात नवीन इथेनॉलवर चालणारी रिक्शा असे समीकरण आणल्यास पुढे भविष्यात खनिज तेलावरिल अवलंबित्व कमी होईल

खूप मोठी भांडवली गुंतवणूक पेट्रोल आणि cng मध्ये झालेली आहे . रिलायन्स सारखे उद्योग समूह त्यात सहभागी आहे . आणि सरकारनी नी त्यांना नफ्याची हमी दिली असणार . त्या मुळे इथिनोल वर गाडी चालणे स्वस्त आणि सहज शक्य झाले तरी पेट्रोल आणि cng हद्ध पार होणार नाही नजीकच्या काळात . नंतर होवू शकते

एकदा एक विडिओ डॉक्यु दाखवलेली टिवी चानेलवर - कोणत्यातरी गावाचे धरणामुळे पुनर्वसन करून घरं बांधून दिलेली. संडासाच्या सेप्टीक ट्यान्कास ग्यासप्लान्ट लावलेला. मिथेन तयार होतो तो टाकीत साठवून सर्वांना किचनमध्ये दिलेला. पण पुढे काही अशाप्रकारे कुठे बांधलेलं दिसलं नाही. हा मिथेन जळल्यावर एक अणू कार्बन, चार अणू हाईड्रोजनचे जळून कार्बनडाईआक्साईड आणि वाफ तयार होते. याच मिथेनवर एंजिन चालवायला हवे. लोकसंख्या वाढलीच आहे, मिथेनही भरपूर मिळेल ना?

In reply to by कंजूस

कंकाका, त्याला पू बसेस म्हणतात. ब्रिस्टाॅलला अशी बस २०१५ पासून चालू आहे. डिझेलपेक्षा ३०% कमी कर्बवायू तयार होतो. https://carbiketech.com/oh-sht-pee-poo-bus-karo ही गार्डिअनची बातमी https://www.theguardian.com/uk-news/2015/mar/15/uk-first-poo-bio-bus-br… ही बातमी मी त्यावेळेसच वाचली होती. ३२००० घरांतून त्यासाठी गॅस गोळा करण्याची व्यवस्था उभारण्यात आली होती. घरटी कमी माणसे व दोन घरांतील अंतर लक्षात घेता (भारताशी तुलना करता) ही वस्ती फारच विरळ म्हणली पाहिजे असे नमूद करून, भारतासारख्या दाट लोकवस्तीतून हे प्लॅंट उभारणे आणखी सोपे व कमी खर्चिक असेल असेही त्यात म्हटले होते. विशेषत: झोपटपट्टीत असे प्लॅंट बसवणे हे अनेक दृष्टिने फायदेशीर व स्वच्छतेच्या दृष्टिने अत्युतम ठरेल व ही सर्व व्यवस्था पैसेही मिळवून देईल. त्यामुळे याकडे धंदा म्हणूनही पाहता येऊन ही व्यवस्था कार्यक्षम राहू शकेल. मिथेन गॅसवर टाटा कंपनीने बस तयार केली आहे व अनेक संशोधने केलेली आहेत. https://www.tatamotors.com/press/tata-motors-develops-countrys-first-bi… ही आणखी एक बातमी. पण या कंपनीबाबत उलट सुलट बातम्यापण आल्या होत्या. https://www.hindustantimes.com/kolkata/at-re-1-for-17km-cheapest-bus-in… प्लॅस्टिकपासून परत तेल बनवण्याचे संशोधनही असेच होते. कचरा गोळा करणाऱ्या लाखो लोकांना काम मिळाले असते. ती सर्व माणसे दारिद्र्यरेषेवर कायमची आली असती. उद्योगांना फर्नेस आॅईल व शुध्द कोक मिळाले असते. मुख्य म्हणजे भारतातले यच्चयावत प्लॅस्टिक लोकांनी गोळा केले असते कारण यांत भंगार प्लॅस्टिकचा परताव खूप होता. सर्वात महत्वाचे म्हणजे भंगार प्लॅस्टिकची वर्गवारी करणे किंवा ते स्वच्छ करणे याची आवश्यकता नसल्याने या गरीब लोकांच्या आरोग्याला धोका नव्हता. जिवाङूंपासून ही प्रक्रिया होत असल्याने अत्यंत सुरक्षीत व कोणत्याही प्रकारची जाळपोळ न करता हे सर्व होणार होते. भारतात अनोखी कामे करणारी खूप आहेत. फक्त त्यांना काम करू दिले पाहिजे. असो. _/\_

येथे चर्चा करणाऱ्या बहुसंख्य लोकांची पार्श्वभूमी "शास्त्र" नसावी असे वाटते. कारण बहुसंख्य लोकांनी आपली मते अर्धवट ज्ञानातून व्यक्त केली आहेत. कोणालाही दूषणे न देता काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो १) जास्तीत जास्त ८५ % इथेनॉल इंजिन मध्ये वापरता येईल कारण १००% इथेनॉल वर इंजिन "चालू" होणार नाही. परंतु भारताची सद्य स्थिती अशी आहे कि भारताकडे पेट्रोल मध्ये १० % मिश्रण करण्याएवढेही इथेनॉल उपलब्ध नाही.त्या शिवाय तेवढे इथेनॉल उपलब्ध करण्यासाठी ऊसाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर वाढवणे आवश्यक आहे यासाठी प्रचंड प्रमाणावर पाण्याची नासाडी होईल. हे आपल्या देशाला परवडणारे नाही. शिवाय जत्रौफा मधून बायोडिझेल निर्मिती हा व्यवहार आतबट्ट्याचा आहे असे सिद्ध झालेले आहे. जिज्ञासूंनी खालील दुवा पहावा https://www.livemint.com/Industry/RfNU5ZFXDRTrfUkl9lNMaL/Why-ethanol-bl… २) इथेनॉल ची ऊर्जा पेट्रोलच्या पेक्षा ३०% ने कमी आहे. इथेनॉल आणि शुद्ध पेट्रोल याने होणारे प्रदूषण तेवढेच असते. पेट्रोलच्या इंजिनातून येणार धूर हा एकतर पेट्रोल पूर्ण न जळल्याने येतो किंवा पेट्रोल मध्ये भेसळ असेल किंवा इंजिनच्या पिस्टन रिंग नीट काम करत नसतील तर वंगण इंजिनमध्ये जाळून धूर होतो. ३) टर्बो चार्जिंग या प्रक्रियेत इंजिनच्या हवा आत घेण्याच्या नळकांड्याच्या पुढे एक वेगाने फिरणारा पंखा( हा इंजिन बरोबरच फिरतो) लावला जातो ज्यामुळे आत येणारी हवा दाबून जास्त घनतेची केली जाते. या दबावामुळे हवा गरम होते आणि त्याची घनता कमी होते म्हणून टर्बो चार्जरच्या पंख्यानंतर हवा थंड करण्यासाठी एक इंटर कुलर वापरला जातो. हवा थंड केली कि तिची घनता वाढते. यामुळे इंजिनातील इंधन जवळ जवळ पूर्णपणे जळते. ( डिझेल इंजिनातील धूर हा त्यातील अशुद्ध तत्वे जळल्यामुळे होते याची पुढची पायरी म्हणजे CRDI (COMMON RAIL DIRECTI NJECTION) इंजिन यात इंधन आणि हवा १६०० बार इतक्या प्रचंड दाबाखाली इंजिनात सोडले जातात. अर्थात त्यात टर्बो चार्जिंग आणि इंटर कुलिंग असतेच ज्यामुळे इंधनाचे संपूर्ण ज्वलन होते. या दोन तंत्रज्ञानामुळे डिझेल इंजिने बरीच जास्त कार्यक्षम झाली असून त्यातुन मिळ्णारे सरासरी किमी बरेच जास्त मिळतात शिवाय त्यातून होणारे प्रदूषण खूप कमी झालेले आहे. हे तंत्रज्ञान १९२३ पासून उपलब्ध आहे. अर्थात तेंव्हा हि इंजिने बोजड असल्याने ती विमान किंवा जहाजात वापरली जात होती. जसा जसा आकार कमी होत गेला तसे हे तंत्रज्ञान मोटारीत पण आले. असेच तंत्रज्ञान पेट्रोल इंजिन मध्ये सुपरचार्जींग द्वारे केले जाते. ४) इंधनांची ऊर्जा क्षमता- एक लिटर इथेनॉल ची २३.५ मेगॅज्यूल आहे तर दबावाखालील नैसर्गिक वायू (CNG) २१.८, पेट्रोलची ३३. ५ आणि डिझेल ची ४५ मेगॅज्यूल आहे. ज्या इंधनाची घनता जास्त तितकी त्यातून मिळणारी ऊर्जा जास्त असते म्हणूनच रॉकेट किंवा क्षेपणास्त्रात घन इंधन वापरले जाते.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद , प्रतिसाद टाकल्याबद्दल थोडेसे इथेनॉलबद्दल, काही दिवसापूर्वीच टीवीएस कंपनीने फक्त इथेनॉलवर चालणारी दुचाकी बाजारात आणली. वाजतगाजत तिचे उदघाटन केले. ही बातमी तुमच्या कानावर आली नाही बहुतेक? दूसरी गोष्ट म्हणजे इथेनॉल फक्त उसापासून तयार होते, हे तर घोर अज्ञान. इथेनॉल ज्वारी, बाजरीपासून देखील होते. अगदी शुद्ध अल्कोहोल देखील एक इंधनच असते फक्त ते महाग असते. ब्राजील व अर्जेटीना या देशात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, मी पन्नास टक्केचा दावा बघितला आहे. आपल्याकडे उस हा राजकारण्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एक वेळ अशी होती कि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शुगर लॉबी ठरवायची. आता आपल्याकडे साखरेमध्ये राजकारण आहे म्हणून आयात साखरेला परवानगी मिळत नाही, नेमके हेच काऱण इथेनॉल निर्मितीला मारक आहे. ब्राजील व अर्जेटीनामधे उसाचे पिक वारेमाप येते याचे कारण हे देश विषुववृत्तावर आहेत, जिथे वर्षभर पाऊस पडतो. आपल्याकडे मात्र साखर कारखानेदार जगावा म्हणून पाण्याचा वारेमाप उपसा करून उस वाढवला जातो. तेल लॉबी तर याहुन मोठी आहे.

In reply to by भंकस बाबा

ठीक आहे, ज्वरी पासुन तयार होते, पण विशेषतः शेतीपासुनच ना? उसापासुन तयार होते हे फेमस आहे कारण उसासाठी इथेनोल हे बाय-प्रॉदक्ट आहे. इथेनॉल हवे म्हणून आपण ज्वारी लावू काय?

In reply to by आनन्दा

नक्कीच , आपण इथेनॉलसाठी ज्वारी लावू शकतो, उसाला लागणारा कालावधी, पाण्याचा उपसा बघता तीन महिन्यात येणारे ज्वारीचे पिक फ़ायदेशीर असू शकते. पण गाभ्यात म्हटल्याप्रमाणे इथे एक मोठी लॉबी कार्यरत असू शकते हे सर्व प्रत्यक्षात येण्यास अडवण्यासाठी!

In reply to by भंकस बाबा

तसा विषय नाही तो. उसापासुन साखर तयार झाल्यावर जे शिल्लक राहते त्यापासून इथेनॉल तयार होते.. नुसत्या इथेनॉल साठी जर ऊस करायचा झाला तर ते तितके किफायतशीर राहणार नाही. त्याचप्रकारे ज्वारी वगैरे देखील केवळ इथेनॉलसाठी जावणे परवडणार नाही... तरीही तुम्हाला रस असेल तर जरा त्यामागचे अर्थकारण कागदावर मांडुन बघा. किफायतशीर आहे असे वाटले तर आम्हाला पण सांगा. उदा - एका हेक्टरमध्ये ५ टन ज्वारी, त्यापासुन १टन इथेनॉल, त्याचा दर ५०रु लिटर, म्हणजे ५००००रु वगैरे. बघुया फायद्याचे आहे का ते.

In reply to by आनन्दा

कृषिजागरण डॉट कॉम नावाच्या साइटवर ज्वारीपासून इथेनॉल बनवण्याचे फायदे दाखवले आहेत, त्यात त्यांनी इथेनॉलसाठी धाटे पिळल्यावर उरणारा चोथा पशुखाद्य म्हणुन वापरता येईल असे म्हटले आहे

In reply to by आनन्दा

सडक्या ज्वारीपासून (जी फेकूनच द्यायची होती) दारूनिर्मितीचे दोन कारखाने घाट्यात येऊन बंद पडल्याचे आठवतंय. शेवटी सरकारने ७२ कोटी नुकसीन भरपाई दिली. मला तपशीलात रस नाही.;) मला तरी वाटते, शेतीतून बायप्राॅडक्ट म्हणूनच हा उद्योग किफायतशीर ठरेल.

In reply to by शाम भागवत

दिली तर सगळ्या टाकावु माला पासुन ते अल्कोहोल बनवुन देतील. ते ही स्वस्तात.

In reply to by आनन्दा

ज्वारी पासून इथेनॉल तयार करतात त्यात ज्वारीच्या दाण्यांचा वापर होत नाही तर ज्वारीच्या ताटातील( खोड) रसाचा उपयोग केला जातो आणि या पिकासाठी पाणी उसापेक्षा बरेच कमी लागते. ज्वारीच्या ताटातून रस हा शेताच्या जवळच काढावा लागतो अन्यथा ते वाळून जाण्याचा धोका असतो. हा रस काढण्यासाठीची यंत्रे अजून सहज पणे उपलब्ध झालेली नाहीत. शिवाय या तंत्रज्ञानाला अजून सर्व मान्यता मिळालेली नाही. याची ़कारणे राजकीय आहेत कि आर्थिक आहेत हे मला माहित नाही. परंतु हा एक समर्थ पर्याय उपलब्ध होऊ शकतो असे सकृतदर्शनी वाटते. https://www.business-standard.com/article/markets/ethanol-fuels-sorghum…

In reply to by सुबोध खरे

या पिकापासुन ज्वारी मिळवायची असेल तर पिक कालावधी वाढेल. परिणामी धाटे सुकून मूळ उद्देश्य बाजूला राहिल. मी काही काळ शेती केली होती , चाऱ्यासाठी लावणारी ज्वारी व अन्नासाठी होणारी ज्वारित फरक असतो. उसाच्या एका पिक कालावधीत ज्वारीची तीन पीके मिळतात , शिवाय पाणी कमी लागते. तुमचे मुद्दे खोडत आहे म्हणून राग मानू नका, तुमच्यासारख्या व दुसऱ्या अनेक जाणकार मिपाकराचा प्रतिसाद या धाग्यासाठी आवश्यक आहे.

In reply to by भंकस बाबा

मी कुठे पिकापासून ज्वारी मिळेल म्हणतोय. उलट तुम्ही मी मांडलेल्या मुद्द्याला दुजोराच देत आहात किंवा मी तुमचा मूळ मुद्दाच समर्थन केलाय आणि त्यासाठी लागणार संदर्भ सुद्धा दिलाय. (नक्कीच , आपण इथेनॉलसाठी ज्वारी लावू शकतो, उसाला लागणारा कालावधी, पाण्याचा उपसा बघता तीन महिन्यात येणारे ज्वारीचे पिक फ़ायदेशीर असू शकते. पण गाभ्यात म्हटल्याप्रमाणे इथे एक मोठी लॉबी कार्यरत असू शकते हे सर्व प्रत्यक्षात येण्यास अडवण्यासाठी) हा आपला श्री आनंदा याना दिलेला प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

अहो डॉ. खिरे, तुम्ही डॉक्टर आहात कि इंजिनिअर? एकदम टेक्निकल प्रतिसाद दिला कि. फारच छान !

पाण्याचे रासायनिक सूत्र h2o हे आहे म्हणजे हायद्रोजन चे 2 अनु आणि ऑक्सीजंन चा एक अणू मिळून शुद्ध पाणी तयार होते . पण असे शुद्ध पाणी असतं का त्या मध्ये बऱ्याच घटकांचे मिश्रण झालेलं असतं . पेट्रोल चे एक ठराविक रासायनिक सूत्र नाही मग शुद्ध पेट्रोल कशाला म्हणतात ? इंजिन मध्ये कधीच १००% इंधनाचे ज्वलन होवू शकणार नाही आणि धूर विरहित ऊर्जा मिळणार नाही असे मला वाटत . शास्त्रीय ज्ञान मला बिलकुल नाही पण ही शंका आहे तुम्ही मत मांडावे .

In reply to by Rajesh188

कोणतीही शक्ति रूपांतरित होताना १००% रूपांतरीत होऊ शकत नाही. त्या उर्जेचा काही भाग रूपांतर प्रक्रियेला वापरला जातो असं कुठेतरी वाचलं होतं. त्यामुळे तेलाचे रूपांतर १००% गतीज उर्जेत होणे शक्य नसावे.

In reply to by शाम भागवत

भाऊ १००टक्के वपरले जाणे म्हणजे १००% ज्वलन. म्हणजे, जेव्हा कार्बन जळतो, तेव्हा डाय ऑक्साईड तयार होतो. आणि उष्णता सोडली जाते. मोनॉक्साईड तयार होताना उष्णता सोडली जात नसणार. ज्वलन म्हणजे १००% कार्बन चे डायओक्साईड मध्ये रुपांतर. त्याचे पुढे काय होते ते वेगळ्या घटकांवर अवलंबून असते. बाकी impurities चे सोडुन द्या.

उस,ज्वारी,जेट्रोपा यांच्यापेक्षा पूमेथड आणणे ही गरज आहे. त्याची (मिथेनची)क्षमता कमी असली तरीही उपयुक्तता महत्त्वाची. फक्त एक धोका म्हणजे आपल्याकडे संयत्रांची छेडछाड होते ती टाळली पाहिजे. फटाके वगैरेनी स्फोट होऊ शकतो टाकीचा. शिवाय एक मोठा नकारात्मक मुद्दा आहे. - संडासात डिसेन्फेक्टंटस वापरले तर मैला कुजवणारे चांगले उपयुक्त ब्याक्टेरिआ मरतात, कुजणे थांबते, मिथेन होत नाही. संयत्र बंद पडते. असिड, फिनोल,हार्पिकवगैरेचा धंदा बंद होईल.

जो सौदीमधील एक मोठी कंपनी सौदी अरमाको हिच्या तेलसाठयावर झाला हा पण एक मोठा बनाव वाटत आहे. सीरियातील इराण समर्थक बंडखोरानी हा हल्ला केला असे मीडिया कोकलून सांगत आहे. अगदी त्या बंडखोरानी त्याची जबाबदारी पण घेतली. काहीतरी मुरते आहे खास! ड्रोन टेक्नोलॉजी ही अमेरिका ,इजरायल या देशांची मक्तेदारी मानली जाते. हे देश या भागात नजर ठेवून आहेत. अशा वेळेला एक ड्रोन चारशे किलोमीटरचे अंतर तोडून विनासायास येतो व अचुकपणे वार करतो हे पटत नाही , कारण अशा हल्ल्यासाठी सैटेलाइटची मदत लागेल. इंधनयुद्ध , लालच व धर्मवेड याची कुठे सांगड लागत आहेसे वाटते.

जो सौदीमधील एक मोठी कंपनी सौदी अरमाको हिच्या तेलसाठयावर झाला हा पण एक मोठा बनाव वाटत आहे. सीरियातील इराण समर्थक बंडखोरानी हा हल्ला केला असे मीडिया कोकलून सांगत आहे. अगदी त्या बंडखोरानी त्याची जबाबदारी पण घेतली. काहीतरी मुरते आहे खास! ड्रोन टेक्नोलॉजी ही अमेरिका ,इजरायल या देशांची मक्तेदारी मानली जाते. हे देश या भागात नजर ठेवून आहेत. अशा वेळेला एक ड्रोन चारशे किलोमीटरचे अंतर तोडून विनासायास येतो व अचुकपणे वार करतो हे पटत नाही , कारण अशा हल्ल्यासाठी सैटेलाइटची मदत लागेल. इंधनयुद्ध , लालच व धर्मवेड याची कुठे सांगड लागत आहेसे वाटते.

डॉ. खरे सोडले तर बऱ्याच जणांनी अर्धवट आणि ऐकीव माहिती दिली आहे असे दिसते. इंधन कमी पिणे हे त्या इंधनावर अवलंबून नसून त्या इंधनातून आपण जास्तीत जास्त ज्वलन शक्तीला यांत्रिकी शक्ती मध्ये कसे रूपांतर करू शकतो यावर अवलंबून आहे.तंत्रज्ञान हे हळूहळू उत्क्रांत होत जाते,आणि एक वेळ अशी येते कि त्याहून पुढे जाणे हे खर्चिक आणि उपलब्ध जागेचा विचार करता अशक्य असते. डिझेल आणि पेट्रोल ची हि वेळ आली आहे. उदा. CRDI इंजिन हे पारंपरिक डिझेल इंजिनपेक्षा खूपच कार्यक्षम (Efficient) आहे. याचे कारण तंत्रज्ञानमध्ये झालेली उत्क्रांती Turbocharger विषयी हास्यास्पद म्हणावी अशी माहिती बऱ्याच जणांनी दिली आहे. Turbocharger हा इंधनाची बचत करण्यासाठी नसून इंजिनची ताकद वाढवण्यासाठी वापरतात. उदा. १००० CC चे इंजिन हे १३०० CC इंजिन एवढी अश्वशक्ती चे काम करू शकेल. उलट turbocharger मुळे इंधन थोडे जास्तच जळते. आता खरे काय या प्रश्नाकडे वळूया. खरे हेच आहे कि आता पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये संशोधन करून त्याची कार्यक्षमता वाढवण्यासारखे काही उरलेले नाहीये. शिवाय वातावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम आहेत ते वेगळेच. (र.च्या.क.ने. गेल्या काही वर्षात वनक्षेत्र हे ७% ने वाढले आहे तरी प्रदूषण हे वाढता वाढता वाढे असेच चालू आहे याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेल चा अमर्याद वापर.) इलेकट्रीक गाड्यांविषयी पण थोडे बोलू. जरी इलेक्ट्रिक गाड्या या प्रदूषण करत नसल्या तरी त्या ज्या विजेवर चालणार आहेत ती वीज कशी बनवली हे महत्वाचे आहे. वीज जर कोळसा जाळून चंद्रपूरला बनवली तर पुण्यात होणारे प्रदूषण कमी होईल, पण चंद्रपूरला प्रदूषण दुप्पट-तिप्पट वाढेल कारण विजेची मागणी वाढली असेल. थोडक्यात पवनचक्की आणि सौरऊर्जा वापरून बनवलेली वीज आणि त्या विजेवर चालणाऱ्या गाड्या या खऱ्या अर्थाने पृथ्वीसाठी उपकारक असतील. बाकी मोटारसायकलने १०० कि.मी. प्रति लिटर मायलेज देणे हे अशक्य कोटी मध्ये मोडते. मी कुठेसुद्धा कोणाला सुद्धा भेटायला तयार आहे जो मला हे सिद्ध करून दाखवेल माझ्या डोळ्यासमोर. उतारावरती clutch दाबून ४-५ कि.मी. गाडी चालवून त्याला १०० कि.मी. च्या त्रैराशिक समीकरणामध्ये बसवून दाखवणे याला थोतांड असे म्हणतात शेवटी खरे हेच आहे कि येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्यावर चालणाऱ्या गाड्या याच फक्त आपल्या वसुंधरेला वाचवू शकतात

In reply to by गतीशील

इंटरनेटवर असंख्य लेख उपलब्ध आहेत टर्बोचार्जरवर. जे ईंधन न जळता बाहेर पडते त्याला परत ज्वलनासाठी वळवून पॉवर व इंधनाची बचत असे कार्य लिहिले आहे तिथे . बरे विषय ज्या मुद्द्यावर होता तो सोडून तुम्ही बाकी सर्व लिहिले आहे जे येथील बहुतेक लोंकानी मांडले आहे . परत एकदा लिहितो की जे नवीन संशोधन येत आहे ते पुरेसे नाही आहे. यामधे अनेक देशांचे हितसंबध गुंतलेले आहेत. आणि आपल्याकडे राजकारणाचे देखील

In reply to by भंकस बाबा

भंकसजी बाबाजी, इंटरनेटवर असंख्य लेख जरी उपलब्ध असले तरी त्यात काय लिहिलं आहे हे कळणे महत्वाचे आहे. खालील मी २ इमेज टाकल्या आहेत, वाचून काय लिहिलंय हे समजतंय का बघा. Turbo 1 माझं ज्ञान हे इंटरनेटवर बसून आले नसून मी स्वतः एका वाहन उद्योग कंपनी मध्ये काम करतो आणि turbocharger वगैरे गोष्टी रोज बघतो, वापरतो. काही turbocharger आहेत जे ताकद आणि मायलेज असे वाढवणारे आहेत, पण ते खूपच महाग आणि सध्या गाड्या, ट्रक याना न परवडणारे आहेत. तुम्ही BMW, Mercedes असल्या कंपन्या काही संशोधन करत असलेले लेख वाचून सरसकट सगळे turbo तसेच असतात असा समज करून घेऊ नका. बरे विषय ज्या मुद्द्यावर होता तो सोडून तुम्ही बाकी सर्व लिहिले आहे जे येथील बहुतेक लोंकानी मांडले आहे: माझा कोणता मुद्दा आहे जो विषयाला सोडून होता हे सांगितले तर बरे होईल. आपण मूळ धाग्यात लिहिलेल्या सर्व मुद्द्यांना मी स्पर्श केला आहे शिवाय अजून काही नवीन माहिती पण टाकली आहे असं मला वाटलं. जर माझी माहिती भरकटलेली असेल तर माफ करा.

In reply to by गतीशील

माझ्या अल्पमतीप्रमाणे टर्बो चार्जर मध्ये आत येणारी हवा निमुळत्या होत जाणाऱ्या नळकांड्यात(VENTURI) हवा पंख्याने दाबाने ढकलली जाते. यामुळे इंजिनच्या ज्वलन कक्षात इंधनाचे अधिक चांगल्या तर्हेने ज्वलन होते आणि न जळलेल्या इंधनाचे प्रमाण बरेच कमी होते. यामुळे उपलब्ध इंधनाचा संपूर्णपणे वापर होतो. एकाच आकाराच्या इंजिनात ( उदा २ लिटर) टर्बो चार्ज असलेले इंजिन साध्या इंजिनापेक्षा जास्त कार्यक्षमतेने काम करते( जास्त सरासरी मिळेल) परंतु हे तत्व इतके साधे नाही. कारण सुरुवातीच्या त्वरणात( ACCELRATION) दोन्हीत तितकेच इंधन जळेल. परंतु एकाच वेगाने (उदा. ताशी ४० किमी) सपाट रस्त्यावर ब्रेक न मारता गाडी चालवली तर टर्बो चार्ज्ड इंजिनात इंधन कमी जळेल. टर्बो चार्जिंग चा जास्त फायदा हा लहान आकाराच्या इंजिनातुन जास्त शक्ती मिळवता येते हा आहे. इंधन कार्यक्षमता थोडीशी वाढते हि वस्तुस्थिती. पूर्वी डायरेक्ट इंजेक्शन (डिझेलचे) ची इंजिने असत ज्यात डिझेल थेट ज्वलन कक्षात पाठवले जात असे ज्याने इंधन कार्यक्षमता चांगली मिळत असे पण त्या इंजिनांचा आवाज आणि थरथरणे(VIBRATIONS) खूप जास्त असते. उदा टाटा स्पेशिओ (टाटा सुमो ची धाकटी बहीण). महिंद्राच्या जीप MM ५४० इ. यामुळे यात सुधारणा म्हणून IDI इन्डायरेक्ट इंजिने आली. ज्यात हा आवाज आणि थरथरणे(VIBRATIONS) बरंच कमी झालं. याचा पुढचा अवतार म्हणजे CRDI ज्यात डायरेक्ट इंजेक्शन असले तरी डिझेल अतिशय सूक्ष्म अशा कणात (ATOMIZE) विभागून १६०० बार प्रेशरला इंजेक्ट केले जाते यामुळे इंजिनाचा आवाज कमी झाला तसेच त्यांची कार्यक्षमता बरीच वाढली. उदा टाटा स्पेशिओ चे इंजिन २६०० मिली चे असूनही त्याची शक्ती फक्त ६० बी एच पी आहे MM ५४० या महिंद्राच्या जिपचे इंजिन २१०० सीसी असून त्यात ६२ बी एच पी शक्ती निर्माण होते. या दोन्ही गाड्या १६-१७ ची सरासरी (आदर्श स्थिती मध्ये) देत असत जी त्या काळात खूप चांगली समजली जात असे याउलट स्विफ्ट किंवा इंडिका व्हिस्टा चे CRDI इंजिन फक्त १२४८ मिली चे इंजिन ७४ बी एच पी शक्ती निर्माण करते आणि एवढे असून २४-२५ किमि एक लिटर डिझेल मध्ये (आदर्श स्थिती मध्ये) जाते. हेच १२४८ सीसी इंजिन मांझा किंवा फियाट लिनिया वेगळ्या ट्युनिंगमुळे मध्ये ९० बी एच पी शक्ती निर्माण करते.

In reply to by गतीशील

मला अपेक्षित होते , ह्या क्षेत्रात तितकेसे संशोधन झाले नाही. किंवा जे झाले ते लोंकासमोर येत नाही. या सर्वाच्या पाठीमागे क़ाय आहे हे खोदने, पण चर्चा ईंधन बचत या मुद्द्यावर अडून राहिली. अगदी उदाहरण द्यायचे म्हटले तर कंप्यूटरचा शोध 50च्या दशकातला, मात्र त्याने अल्पावधित पुष्कळ मोठी मजल मारली. गाड्या तर अस्तित्वात येऊन शंभर वर्षाचा काळ लोटला. त्यासुधा आधी इंजिन अस्तित्वात होते. मी होंडा दुचाकीचे 88च्या मॉडलचे उदाहरण दिले. ज्याच्याकडे ह्या मोडलची ओरिजनल दुचाकी , जिच्या इंजिनवर होंडा अशी नोंद आहे( हिरो होंडा नव्हे) अजुन कार्यरत आहे त्याला तुम्ही विचारु शकता. आता हा योगायोग म्हणावा की कारस्थान , किहोंडा कंपनी व पाण्यावर चालणारी गाड़ी यांचे उगमस्थान जपान असावे, आणि त्या गोष्टीला उणीपुरी 30 वर्षे निघुन गेली तरी काहीच दृष्टिपथात नसणे! तुम्हाला जरा डिवचून प्रतिसाद दिला याबद्दल माफी! पण यामुळे तुम्ही थोड़ी खोदाखोद केली हे पण सत्य! टर्बोबाबत , याचा उद्देश्य जे ईंधन ज्वलन होत नाही त्याला परत ज्वलनासाठी ढकलून जास्त पॉवर व माइलेज मिळवने हाच होता. मला नक्की आठवत नाही पण 80च्या एका मर्सिडीज गाडीत मी ही सिस्टीम बघितली होती

In reply to by भंकस बाबा

Turbocharger विषयी खुलासा करणे महत्वाचे आहे. बहुतेक लोकांची अशी समजूत आहे कि न जळालेले इंधन turbo द्वारे पुन्हा जाळण्यासाठी वापरता येते. ते तसे नाहीये. जेव्हा इंजिन मध्ये ज्वलन होऊन धूर (exhaust ) बाहेर ढकलला जातो तो धूर turbo च्या पात्यांना (turbines ) फिरवतो. turbo च्या एका दांडक्यावरती दोन वेगवेगळी पाती असतात. जेंव्हा एका बाजूच्या पात्याला बाहेर जाणारा धूर फिरवतो तेव्हा दुसऱ्या बाजूचे पाते आत येणाऱ्या हवेला (fresh air sucking through breather) कॉम्प्रेस करते. जेणेकरून ज्वलनासाठी जास्तीत जास्त हवा आणि त्याचबरोबर जास्ती oxygen, जो ज्वलनाला मदत करतो, असे दोन्ही मिळून आत जावे. म्हणजे turbo नसताना समजा २ युनिट हवा आत खेचली जात असेल तर turbo असताना २.५ किंवा ३ युनिट हवा आत जाते. त्याच्यामुळे आत जे ज्वलन म्हणजेच एक छोटा स्फोट होत असतो तो थोडा मोठा स्फोट होतो आणि गाडीला जास्ती ताकद मिळते. Turbocharger हा गाडी सुरु केली कि लगेच सुरु होत नाही. काही ठराविक RPM (परिवलन वेग) नंतर चालू होतो. (उदा. १२०० ते १४०० RPM ). डॉ. खरे यांनी वर सांगितल्याप्रमाणे काही ठराविक स्पीड ला ठराविक तऱ्हेने गाडी चालवली तर अतिशय नगण्य अशी इंधन बचत होते. पण मूळ उद्देश turbo चा हाच आहे कि छोट्या इंजिन मधून मोठ्या इंजिन एवढी ताकद बाहेर काढणे. तुम्ही जे १९८० साली Mercedes च्या गाडी मध्ये बघितलं आहे ते आता जवळपास सगळ्या डिझेल गाड्या आणि काही पेट्रोल गाड्यांमध्ये गेले ५-७ वर्षे झाली सर्रास वापरले जातात, आता त्यात नावीन्य काहीही राहिलेले नाहीये. होंडा असे लिहिलेल्या इंजिन बद्दल तुम्ही जे सांगितले आहे त्याच्यावर माझे उत्तर असे आहि कि आता होंडा हि स्वतः एक वेगळी कंपनी आहे. जर तेव्हा होंडाला हे जमलं होत तर आता सुद्धा जमायला काहीच अडचण नसावी. मी पुन्हा एकदा सांगतो, १०० कि.मी.प्रति लिटर सरासरी हि अशक्य गोष्ट आहे. पाण्यावर चालणाऱ्या गाड्या बनवणे अवघड काहीच नाहीये. फक्त किंमत आणि त्या गाडयांना लागणारी जागा हा खूप मोठा प्रश्न आहे. टाटा ने हायड्रोजन वर चालणारी बस बनवली सुद्धा आहे ज्याची किंमत जवळपास ३ करोड रुपये आहे. मला सांगा कोण घेईल हि बस? प्रत्येक गोष्टी मध्ये काहीतरी मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे असे conspiracy theory च्या मानसकितेमधून आता लोकांनी बाहेर पडले पाहिजे. मी आधी लिहिल्या प्रमाणे e -vehicles ला भविष्यात पर्याय नाही. आणि सुदैवाने सर्व कंपन्या त्या दृष्टीने पावले उचलत आहेत. कालचीच बातमी आहे, Mercedes benz बनवणारा Daimler ग्रुप आता डिझेल इंजिनच्या संशोधनामध्ये कोणतीसुद्धा गुंतवणूक करणार नाहीये. टाटा मोटर्स ने Ziptron हा त्यांचा e-vehicle चा प्लॅटफॉर्म कालच सादर केला. त्यामुळे आता डिझेल, पेट्रोल, पाणी, इथेनॉल याविषयी सर्वानी आवरता हात घेतलेला आहे.अल्कोहोल, व्हिस्की, रम हे सगळं फक्त बसल्यावर उपयोगी येणार आहे, गाडी चालवायला नाही.

In reply to by गतीशील

रेवा या भारतातल्या सर्वप्रथम इलेक्ट्रिक कार बनवण्यार्या कंपनीने 1995 साली आपली कार बाजारात आणली. त्यानन्तर त्यांना ना आपल्या कारमधे काही बदल करावेसे वाटले वा नवीन मॉडल आणावे असे वाटले. महिंद्राने मला नक्की आठवत नाही पण 2003 साली बिजली या नावाने दहा आसानी इलेक्ट्रिक रिक्शा दाखवली , मी दाखवली हा शब्द वापरला कारण ही रिक्शा भारतीय रस्त्यावर फक्त प्रायोगिकरित्याच धावली. 2003 साली चर्चगेट रेल्वे स्टेशन ते विधानभवन अशी फुकट राइड या कंपनीने दिली होती. जवळजवळ महिन्याभरासाठी ही सेवा जनतेला उपलब्ध करून दिली होती. आता कुठे आहे ती बिजली? ड्रोन तंत्रज्ञान हे अगदी अलिकडील! आता फिल्म इंडस्ट्रीत, स्पोर्ट इवेंट, इवेंट मैनेजमेंट, वन्यप्राणी चित्रीकरण, डिलीवरी या कामासाठी ड्रोन वापरले जातात. इतक्या जलदगतिने हे तंत्रज्ञान विकसित झाले कि ते वापरणे हा पोरखेळ झाले आहे. आता तर त्याला सरकारी लायसेंस मिळवून कोणीही वापरु शकते पण जेव्हा परवानगी नव्हती तेव्हा पण लोक वापरत होते. या सगळ्या गोष्टी क़ाय सूचवतात? तरीही तुम्ही बोलत आहात की अशी कोणतीही चाल बड्या तेलउत्पादक देशानी खेळली नसेल! गाडीमधील जे ईंधन न जळता बाहेर पडते तेच जर कोणी शंभर टक्के वापरायचे तंत्रज्ञान विकसित केले तर आज लोक यूरेकायूरेका करून वाहवाह करतील, पण इतक्या वर्षात हे विज्ञानाला जमू नये?

In reply to by भंकस बाबा

रेवा हि कंपनी चेतन मैनी यांनी सुरु केली होती आणि नंतर तिला महिंद्राने विकत घेतली. महिंद्राने रेवा नवीन स्वरूपात सादर केली e2O या नावाने. बिजली नावाने जी रिक्षा दाखवली ती आता सुप्रो (e -Supro ) या नावाने चालू आहे. ड्रोन तंत्रज्ञान हे खूप विकसित झाले आहे असे तुमचे म्हणणे असेल तर आपले वाचन वाढवा असाच सल्ला देईन. आज उपलब्ध असलेले सहज घेता येण्याजोगे ड्रोन हे जास्तीत जास्त २० मिनिटे काम करू शकते. जास्ती कालावधी साठी लागणारी ड्रोन हि लाखो रुपये किमतीची आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचं मूळ प्रश्न हा आहे कि त्यांनी एका चार्जिंग मध्ये जास्तीत जास्त अंतर कसे कापता येईल. आत्ता महिंद्राची e -Verito & टाटांची e -Tigor या दोन्ही गाड्या व्यावसायिकदृष्ट्या (for commercial use only) वापरासाठी उपलब्ध आहेत. दोघांची एका चार्जिंग मधली range १२०-१३० किमी आहे. आणि चार्जिंगला लागणार वेळ ६ ते ८ तास आहे. दोन्ही गाड्यांची किंमत १२ ते १३ लाख आहे. मी तरी घेणार नाही अजून या गाड्या कारण त्या व्यावहारिक नाहीयेत. टेस्ला (Tesla) ४०० ते ५०० कमी चालू शकते एकदा चार्जिंग केल्यावर, पण तिची भारतातील किंमत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ती मला घ्यायची कितीही इच्छा असेल तरी घेऊ शकणार नाही. तुमचा शेवटचा मुद्दा हा तुम्ही तंत्र जगतापासून खूप दूर आहेत हे दर्शवत आहे. आज पर्यंत माणसाला १००% कार्यक्षमता असलेले कोणतेही यंत्र बनवता आलेले नाहीये. आपल्या माहितीत किंवा आपण बनवले असले तर कृपया त्यावर प्रकाश टाकावा, अखिल मानवजात आपली आभारी असेल. एका इंधनावर चालणाऱ्या गाडीमध्ये साधारण ५००० ते ७००० हलणारे भाग असतात (moving parts). यात घर्षण, ज्वलन, हवेचा प्रतिरोध, दर्जा अश्या असंख्य गोष्टींवर त्या गाडीची कार्यक्षमता अवलंबून असते. आणि या सर्वाना नियंत्रित करणारा एका महत्वाचा घटक म्हणजे किंमत!! गाडी बनवताना किंमत आणि कार्यक्षमता याचा ताळमेळ साधूनच बनवावी लागते. अति कार्यक्षम गाडी बनवत बसलो तर त्याची किंमत अव्वाच्या सव्वा होऊन बसेल जिला कोणीच घेणार नाही. इलेक्ट्रिक गाड्यांचे, विशेषतः बॅटरीवर आता खूप संशोधन होत आहे, आणि यातूनच आपल्या conspiracy theory ला उत्तर मिळेल.

In reply to by गतीशील

रेवा ही गाडी तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेली दिसत नाही , शिवाय महिन्द्राची ई वेरिटो देखील! रेवा अंत्यत छोटी कार होती , रिक्षाच्या जवळपास जाणारी तर वेरिटो मारूतिसारखी दिसनारी! आता येऊया टेस्ला या अमेरिकन कंपनिकडे ! एका बातमीपत्रात वाचलेले स्मरते की मर्सिडीज बेंज ही कार जर्मनित बनवताना जेवढा लेबर द्यावा लागतो त्यापेक्षा थोड्या अधिक किमतीत भारतात ती बनून तयार होते. तेव्हा भारतात मर्सिडीज टाटाबरोबर गाड़ी बनवत होती. मग टेस्ला सारखे उत्तम टेक्नोलॉजी असणारे भारतात का येत नाही ? त्यांना पण गाडी स्वस्तात बनवून मिळेल ना? उत्तर असे आहे की ते येणार! पण अमेरिकेचे व इतर देशांचे हित बघुनच. सध्या तरी पेट्रोलचा व खनिज तेलाचा खप कमी होणे यांना परवडनारे नाही , जेव्हा अमेरिकेने नवीन टेक्नोलॉजी शोधून काढली आहे तेल शोधण्याची! गमतीची गोष्ट म्हणजे आपण इलेट्रिक कारकडे जात असताना सरकार दुसरीकडे जुन्या गाड्यासाठी स्क्रैप पॉलिसी आणत आहे, जऱ तीनचार वर्षात आपण इलेक्ट्रिक कारकडे वळणार असलो तर पुढच्या वर्षी ही पॉलिसी आणायची गरज काय? तीन वर्षात तर गाड्या इलेक्ट्रिक होणारच आहेत ना? इतकी वर्षे थांबलो मग अजुन दोनतीन वर्षे!

In reply to by भंकस बाबा

भंकस दादा, माझी विनंती आहे कि मी काय लिहिलंय ते नीट वाचा आणि मग त्याला काहीतरी प्रतिसाद द्या . रेवा या गाडीला महिंद्राने e2O या नावाने पुन्हा आणली होती असं लिहिलं आहे मी. e -verito आणि रेवा चा काहीही संबंध नाहीये. आणि तुमच्या म्हणण्यानुसार e-verito हि मारुती सारखी म्हणजे कशी? मारुती हि एक कंपनी आहे कारचे मॉडेल नाही. e -verito हि compact sedan या प्रकारात मोडते (४ मी) आणि रेवा हि hatchback या प्रकारात मोडते. थोडे नीट वाचायचा प्रयत्न करा आणि मग तुमचे मत मांडा आणि तुमचा मुद्दा काय आहे ते पण एकदा नीट सांगा. कधी म्हणता १००% इंधन वापरू का शकत नाही, कधी म्हणता टेस्ला भारतात का येत नाही. एखाद्या गाडीचा कारखाना टाकायचा म्हणजे प्रचंड मोठी गुंतवणूक असते. आणि त्याची business case तेवढी मजबूत असावी लागते. भारतात अजून e -vehicle ला लागणाऱ्या चार्जिंगच्या पायाभूत सुविधा नाहीयेत. आणि ती गाडी ही अत्यंत महागड्या प्रकारात आहे, जी अजून अमेरिकन लोकांना सुद्धा महाग वाटते ती भारतात मोठ्या प्रमाणावर विकणे शक्य नाही, म्हणून टेस्ला भारतात येत नाही. तुम्हाला माहिती नसेल,Mercedes जेवढ्या गाड्या एका वर्षात विकते, तेवढी मारुती सुझुकी हि कंपनी ३ दिवसात विकते. त्यामुळे व्यवसायासाठी लागणारे आकडे नवीन कारखाना टाकायला पुरेसे नाहीयेत. स्क्रॅप ची जी policy येणार आहे तिचे एकमेव कारण म्हणजे पर्यावरण हे आहे. १५ वर्षांपूर्वी भारतात BS -I मानक होते, आता BS -VI येणार आहेत एप्रिल २०२० पासून. मग जुन्या गाड्या ज्या प्रचंड प्रदूषण करतील त्याच्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढेल म्हणू त्या स्क्रॅप करायच्या आहेत. जगात सगळीकडे हे चालू आहे. असो. एकदा डोक्यात conspiracy theory पक्की झाली कि कितीही समजावलं तरी समजून घेणार नाहीत. चंद्रावर माणसाने पाऊल ठेवलंच नाही असं मानणारे या जगात कमी नाहीयेत. त्यामुळे हा माझा या विषयावर शेवटचा प्रतिसाद. काही मनाला लागेल असे बोललो असेल तर माफी असावी.

In reply to by गतीशील

टेस्ला भारतात का येत नाही? भारतात १ कोटी रुपयाच्या गाडीची उत्पादन १५ लाख होईल का? शक्य नाही. अगदी ओढून ताणून कमीत कमी ३५ लाख. ३५ लाख रुपयाची गाडी घेणारे लोक एका शहरात किती असतील? या सर्व लोकांना तेथे शोरूम पासून सर्व सुविधा देणे आणि सर्वात महत्त्वाचे कार चार्ज करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मूलभूत सुविधा जोवर उपलब्ध होत नाहीत तोवर कोणताही उद्योजक असा आत्मघाती प्रयोग करणार नाही. बाकी आजमितीस बॅटरीची क्षमता हा एक फार मोठा मुद्दा इलेक्ट्रिक कार बद्दल आहे. शिशाच्या बॅटरीचे वजन अफाट असते. त्यामुळे लहानशा गाडीतील शिशाची बॅटरी ३५० किलो इतकी जड आहे. ती केवळ पुढे किंवा मागे ठेवता येत नाही तर त्याचे वजन सर्व विभागात विखरून ठेवावे लागते त्याशिवाय लेड ऍसिड बॅटरीत सल्फ्युरिक आम्लाच्या वाफा निघतात त्यापासून माणसे बसतात ती केबिन वेगळी काढण्यासाठी अतिरिक्त कष्ट आणि साधने वापरावी लागतात. बाकी लिथियम आयन किंवा लिथियम पॉलीमर साठी लागणाऱ्या लिथियम पैकी ५० % च्या वर लिथियम सध्या तरी चीन कडे आहे.त्या शिवाय त्यात लागणाऱ्या कोबाल्टवर सुद्धा चीनने आपली पोलादी पकड मजबूत केलेली आहे. आपण तंत्रज्ञान तयार करायचे आणि चीनने त्याची चोरी करायची या भीतीने बऱ्याच कंपन्यांनी आपले संशीधन पुढे नेले नाही किंवा गुप्त ठेवले असावे. लिथियमचे उत्खनन /उत्पादन आता इतर देशात चालू झाल्यामुळे या बॅटरीच्या तंत्रज्ञानामध्ये संशोधनास चालना मिळाली आहे. https://thediplomat.com/2019/02/china-rushes-to-dominate-global-supply-… गेल्या २ दशकात बॅटरीच्या तंत्रज्ञानात जितकी प्रगती झाली आहे तितकी अगोदर कधीही झालेली नव्हती. अगोदर च्या बॅटरी मध्ये निकेल मेटल हायड्राईड बॅटऱ्या किंवा निकेल कॅडमियम बॅटऱ्या होत्या ( आपण ज्या छोट्या रिचार्जेबल बॅटऱ्या वापरात असू त्या) पण वजन आणि आकारमान विरुद्ध त्यात साठवली जाणारी ऊर्जा यांचे प्रमाण व्यस्त होते. याशिवाय या बॅटऱ्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक होत्या https://en.wikipedia.org/wiki/Nickel%E2%80%93metal_hydride_battery https://en.wikipedia.org/wiki/Nickel%E2%80%93cadmium_battery त्या मानाने लिथीयमच्या बॅटऱ्या स्वस्त, जास्त ऊर्जा घनता असणाऱ्या आणि पर्यावरणासाठी तेवढ्या घातक नाहीत. हे बॅटरी तंत्रज्ञान जेवढे लवकर प्रगत होईल तेवढ्या इलेक्ट्रिक कार लवकर रस्त्यावर येतील.

In reply to by सुबोध खरे

धागा पुनर्जीवित करण्याचे कारण की हल्लीच बातमी वाचली की टेस्ला भारतात येत आहे. पण त्या बातमीवर धागा जिवंत करण्याची इच्छा झाली नाही. बातमी अशी लागली की बॅटरीसाठी लागणारे लिथियम आता भारत अर्जेंटिनाकडून आणणार आहे जे प्रथम आपण चीनवर अवलंबून होतो. अमेरिकेचे आणि लॅटिन अमेरिकेचे संबंध तितकेसे चांगले नाही. पण भारताचे आहेत ह्याचा फायदा टेस्लाने घेतला नाही तर नवल! शिवाय टेस्लाचा रोख युरोपीय मार्केटकडे असावा असा माझा अंदाज आहे. तुम्हालाच विनंती करतो की थोडे अजून खोदकाम करून माहिती पुरवा

काल यूट्यूबवर एक व्हिडीओ पहिला, ज्यात पेट्रोल ऐवजी वैद्यकीय अल्कोहल टाकून एकाने दुचाकी दामटली. हा ऑपशन कसा वाटतो यावर कोणी प्रकाश टाकेल कांय ?

In reply to by जॉनविक्क

फार पूर्वी मी एक प्रयोग बघितला होता , येझदी बाइकला केरोसीनवर चालवत असलेला बाबाजी मी बघितला होता. गाडी स्टार्ट करताना पेट्रोलवर करून नंतर केरोसिन चालू करायचे. तशी पेट्रोल टैंकला जोडनी करून घेतली होती त्याने! गाडी सातआठ महीने चालली , नंतर बाबाजी ढगात गेल्यावर घरच्यानी ज्याला विकलि त्याने कंटाळून भंगारात काढली. बाकी बावा दर रविवारी खोलून बसायचा गाडी! गाडीचा एकएक स्क्रू माहित होता त्याला! आम्ही गमतीने म्हणायचो त्यात थोडे डास मारायचे ओषधि टाक , म्हणजे महापालिकेला कळवायला नको डास झालेत म्हणून! जाम धुर सोडायची त्याची गाडी

In reply to by जॉनविक्क

फार पूर्वी मी एक प्रयोग बघितला होता , येझदी बाइकला केरोसीनवर चालवत असलेला बाबाजी मी बघितला होता. गाडी स्टार्ट करताना पेट्रोलवर करून नंतर केरोसिन चालू करायचे. तशी पेट्रोल टैंकला जोडनी करून घेतली होती त्याने! गाडी सातआठ महीने चालली , नंतर बाबाजी ढगात गेल्यावर घरच्यानी ज्याला विकलि त्याने कंटाळून भंगारात काढली. बाकी बावा दर रविवारी खोलून बसायचा गाडी! गाडीचा एकएक स्क्रू माहित होता त्याला! आम्ही गमतीने म्हणायचो त्यात थोडे डास मारायचे ओषधि टाक , म्हणजे महापालिकेला कळवायला नको डास झालेत म्हणून! जाम धुर सोडायची त्याची गाडी

In reply to by जॉनविक्क

अल्कोहोल मुळे रबर व प्लॅस्टिकच्या भागांची गास्केट इ गोष्टींची वाट लागते आणि इतर इंजिनच्या भागांना गंज लवकर लागतो.

माझ्या पल्सर गाडीत या अल्कोहोल युक्त पेट्रोलचे पाणी आणि पेट्रोल वेगळे होते. पाणी जड असल्याने रिझर्व्ह लागला की गाडी बंद पडते. वारंवार टाकी कोरडी करावी. पाणी टाकीत जावू नये म्हणून कितीही खबरदारी घेतली तरी हे होतंच.

गाडीचा खप कसा वाढेल हे लक्षात ठेवून वाहन उत्पादक कंपन्या एंजीन वापरतात त्यामुळे संशोधनाचा उपयोग पुढे पोहोचत नाही.

एकानं पल्सर गाडीचं इंजिन लावून पस्तीस किमी मायलेज देणारी कार बनवली तिची लिंक दिली होती पण दिसत नाही. कृपया संपादक मंडळ हा प्रतिसाद उडवा.

पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे. त्यात वाढ करणे आता शक्य होणार नाही .दुसरे इंधन शोधून त्या वर संशोधन करणे गरजेचे आहे

In reply to by Rajesh188

पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे हे गृहीतक चूक आहे. कारण घर्षणरहित अवस्थेत तुम्ही एखादी गोष्ट ढकलली कि अव्याहतपणे पुढे जात राहील. जसे अवकाशातील यान पुढे जातच राहते. म्हणजेच आपण जर दुचाकी लोखंडी रुळावर आणि लोखंडी चाकांवर चालवली तर ती २००-२५० किमी सुद्धा सरासरी देऊ शकेल. सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक, वंगण ( किंवा त्याची कमतरता) इ मुळे बरीच ऊर्जा घर्षणाद्वारे फुकट जाते. शिवाय जर इंजिनात जळणारे इंधन जितके जास्त कार्यक्षमतेने जाळता येईल तितकि जास्त सरासरी तुम्हाला मिळवता येईल. सध्या पेट्रोल ची इंजिने २० ते २५ % कार्यक्षमतेने काम करतात. बाकी सर्व ऊर्जा हि उष्णतेच्या स्वरूपात फुकट जाते. हे २० टक्क्याचे प्रमाण नुसते ३० % केले तरी ६०-७० सरासरी देणारी बाईक १०० च्या वर जाईल. आपण केवळ एकाच पिस्टन इंजिनचा विचार करतो आहोत. वँकेल इंजिन हा एक असा वेगळा विचार होता. तो फार यशस्वी झाला नाही तरी आता हैड्रोजन सेल किंवा इलेक्ट्रिक कार मध्ये रेंज एक्सटेंडर म्हणून परत त्याचा विचार होतोय. https://en.wikipedia.org/wiki/Wankel_engine जिज्ञासूंनी वाचून पाहावे

In reply to by Rajesh188

पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे. हे मला मान्य आहे. त्यामुळेच भारतीय लोक कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त उत्पन्न जमा करण्याचे प्रयत्न करतात. उदा. ७ आसनी गाडीत १४ जण कोंबणे, ३५०४ प्रवासी नेण्याची क्षमता असणार्‍या लोकल ट्रेन मधे त्याच्या दुप्पट प्रवासी वाहून नेणे, मुंबई च्या एकून क्षेत्र फळात जेव्हढी लोकसंख्येची घनता राहू शकते त्यापेक्षा कैकपटीने अधिक नागरीक राहणे ही सगळी क्षमता वाढविण्याचीच उदाहरणे आहेत.

एका काळी वातानुकूलन यंत्रात रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर होते ती जागा आता सर्व रोटरी कॉम्प्रेसरने घेतली आहे. उद्या अशी स्थिती wankel इंजिन करू शकेल? इंजिनियर लोक उत्तर देऊ शकतील

डॉ. खरे साहेब, वेंकेल इंजिन, जे वेंकेल या त्याच्या शोधकर्त्याच्या नावावर आहे त्यालाच इंजिनीरिंग भाषेत रोटरी इंजिन म्हणतात . वरकरणी जरी हे इंजिन खूप मोठा चमत्कार (breakthrough) वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे नाहीये. त्याचे काही ठळक तोटे आहेत १. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे ते इंधन खूप खाते. रेसिप्रोकेटिंग इंजिन आणि रोटरी इंजिन सारख्याच आकाराचे असतील तर रोटरी इंजिनची सरासरी रेसिप्रोकेटिंग च्या निम्मी असेल!! २. दुसरे म्हणजे, त्याच्यात असलेल्या मूळ त्रुटींमुळे (Design flaws), खूप सारे इंधन न जळताच बाहेर पडते. सारख्या आकाराच्या रेसिप्रोकेटिंग इंजिन आणि रोटरी इंजिनमध्ये, रोटरी इंजिन हे जवळपास दुप्पट प्रदूषण करते ३. या इंजिन मधून जास्ती ताकद (torque) मिळत नाही. जर जास्ती ताकद पाहिजे असेल तर इंजिन मोठे बनवावे लागेल, ते जास्ती जागा खाणार मग ते गाडी मध्ये बसवताना त्रास होणार हे सर्व ओघानेच आले ४. वंगण (lubricating oil ) प्रचंड प्रमाणात खर्च होते (रेसिप्रोकेटिंग इंजिनच्या तुलनेत) ५. जेव्हा गाडीचा वेग हा कमी असतो तेव्हा हे इंजिन नियंत्रित करणे कठीण असते. अशक्य असते असं नाहीये, पण कठीण असते हे इंजिन वापरणारी माझ्या माहितीत एकच गाडी आहे. Mazda RX-7 त्या गाडीच्या exhaust pipe मधून अक्षरशः आग निघत असते. (कारण अर्धवट जळालेले इंधन!!) गाड्यांचे जे वेडे लोक आहे (ते petrolheads असे म्हणतात स्वतःला- त्यात मी सुद्धा आहे) त्यांना हे इंजिन प्रचंड आवडते. याचे कारण म्हणजे त्या इंजिन चा सुंदर आवाज. थोडक्यात हे इंजिन व्यावहारिक नाहीये आणि प्रदूषणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

In reply to by गतीशील

मी हे इंजिन हायड्रोजन वर चालवण्याच्या दृष्टीनं लिहिलंय. ज्यात प्रदूषण नगण्य आहे. बाकी आपण लिहिलंय ते तोटे मी दिलेल्या विकीच्या दुव्यात खाली लिहिलेले आहेतच.

सर्व प्रकारचे घर्षण,हवेचा विरोध,टायर आणि रस्त्या मधील घर्षण,खराब रस्ते हे गृहीत धरूनच विचार करावा लागेल . गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायची आहे प्रयोग शाळेत नाही

सर्व प्रकारचे घर्षण,हवेचा विरोध,टायर आणि रस्त्या मधील घर्षण,खराब रस्ते हे गृहीत धरूनच विचार करावा लागेल . गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायची आहे प्रयोग शाळेत नाही

स्वयंपाकाचे वापरलेले तेल वापरून ईंधन बनवायचा प्रयोग सरकार करते आहे. ह्या तेलावर गाड्या धावतील असा दावा केला गेला आहे . वास्तविक परदेशात हा ट्रेंड फार जूना आहे. तिथे हे प्रयोग झाले आहेत पण ते व्यावसायिकदृष्ट्या नाही , हा प्रयोग जनतेला बरोबर घेऊन संपन्न होणार आहे

तुम्हाला उद्देशुन हा प्रतिसाद टाकत आहे. पुण्याच्या सिम्बोयसिस या संस्थेमधे एका युवकाने जवळजवळ 250 किमी प्रतिलीटर धावणारी स्कूटर बनवली आहे. पण ही स्कूटर पारंपारिक इंजिन वापरून नाही तर त्याबरोबर बैटरी वापरून चालवली जाते. या शोधाच्या पेटंटसाठी पण अर्ज गेला आहे. टाटा पुढच्या वर्षी एका चार्जमधे 300 किमी धावणारी चारचाकी गाडी बाजारात उतरवत आहे, जिची किंमत 12 ते 15 लाख आहे. ही गाडी 60 मिनिटात 80% चार्ज होईल. सांगण्याचा मुद्दा असा की आता तेल कंपन्याचे तेल निघणार आहे. जऱ टाटाच्या गाडीच्या संलग्न गाड्या निघाल्यास उद्या ज्या लॉबिने संशोधन दड़पले होते तीच लॉबी असे संशोधन बाजारात उतरवण्यास पुढे येईल कारण 100चा एवरेज देणारी पेट्रोल गाड़ी तुलनेने 300 चा एवरेज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार पेक्षा स्वस्त असेल

तुम्हाला उद्देशुन हा प्रतिसाद टाकत आहे. पुण्याच्या सिम्बोयसिस या संस्थेमधे एका युवकाने जवळजवळ 250 किमी प्रतिलीटर धावणारी स्कूटर बनवली आहे. पण ही स्कूटर पारंपारिक इंजिन वापरून नाही तर त्याबरोबर बैटरी वापरून चालवली जाते. या शोधाच्या पेटंटसाठी पण अर्ज गेला आहे. टाटा पुढच्या वर्षी एका चार्जमधे 300 किमी धावणारी चारचाकी गाडी बाजारात उतरवत आहे, जिची किंमत 12 ते 15 लाख आहे. ही गाडी 60 मिनिटात 80% चार्ज होईल. सांगण्याचा मुद्दा असा की आता तेल कंपन्याचे तेल निघणार आहे. जऱ टाटाच्या गाडीच्या संलग्न गाड्या निघाल्यास उद्या ज्या लॉबिने संशोधन दड़पले होते तीच लॉबी असे संशोधन बाजारात उतरवण्यास पुढे येईल कारण 100चा एवरेज देणारी पेट्रोल गाड़ी तुलनेने 300 चा एवरेज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार पेक्षा स्वस्त असेल

पाणि, हवा व धातु (aluminium & graphene) चा उपयोग करुन वाहन चालवण्यावर एक स्टार्टअप कंपनी संशोधन करत आहे. ह्यामध्ये बॅटरी चार्ज करण्याची आवश्यकता नाही तर पाणि व मेटल प्लेट बदलावी लागणार आहे व बॅकप १००० किमी असणार आहे. पण बॅटरी साइज खुप मोठी आहे. अर्थात अजुन संशोधन चालु आहे. बघु पुढे काय होत. https://www.youtube.com/watch?v=1DZY7xXaHxI