Skip to main content

तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 19/01/2018 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला.. तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय? माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे, मी एक उदाहरण देतो... डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते. काही लोक ही अंधश्रद्धा आहे म्हणून त्यांची हेटाळणी करत होते.. त्यातील काही श्रद्धावान लोकांनी त्या हायपोथीसिस वरून काही प्रयोग केले, आणि अनुभव घेतला, त्यावरून त्यांना ही खात्री झाली की हा हायपोथॅसिस खरा आहे, त्यानंतर निर्माण झाला तो विश्वास.. आईनस्टाईन बोललोय म्हणजे खरेच असणार ही श्रद्धा, आणि प्रयोगाअंती बसलेला तो विश्वास.. अध्यात्मात पण साधारण असेच आहे.. तुम्ही अगोदर श्रद्धा ठेवता, मग प्रयोग करून, प्रयत्न करून अनुभव घेता, आणि मग तुम्ही हळूहळू विश्वास आणि निष्ठा या पायऱ्या चढत जाता. दुर्दैवाने हा अत्यंत वैयक्तिक विषय असल्यामुळे त्याच्या प्रत्ययाची हमी देणे शक्य आहे पण आणि नाही पण, त्यामुळे हा सगळा वाद होतो. व्यावहारिक जीवनात पण तसेच, पण सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते, जेव्हा बेसिक चिकित्सा पण केली जात नाही तेव्हा ती होते अंधश्रद्धा .. उदाहरणार्थ - माझ्याकडे एक माणूस येतो, तू मला 10लाख दे, मीएक वर्षात 20 लाख करून देतो असे सांगतो आणि मी विश्वास ठेवतो, याला म्हणावे अंधश्रद्धा. अध्यात्मातील अंधश्रद्धामबद्दल बरेच बोलले गेले आहे, त्यामुळे परत बोलत नाही तुम्हाला काय वाटते?

वाचने 56988
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

आमची ती श्रद्धा आणी तुमची ती अंधश्रद्धा. सारासार विचार करुन एखादा दाखवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा, ज्यात निरखुन पारखुन घेतलेले असते आणी समजा त्याबद्दल काही वेगळे माहित पडले तर बदलाची तयारी असते ती श्रद्धा. याच्या नेमके उलट म्हणजेच अंधश्रद्धा.

शिंपल. आपला तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रध्दा.

आपण फार मोठा शास्त्रीय दृष्टीकोन ठेऊन असतो असा दावा असणार्‍या अनेकांना मी एक प्रश्न विचारला होता. त्यापैकी कोणीही त्याचे उत्तर देऊ शकलेले नाही. त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. ठिक आहे. पण एक गोष्ट समजत नाही. राईट बंधूंनी विमानाचे उड्डाण केले १९०३ साली. पण आधुनिक विमानशास्त्र ज्यावर आधारीत आहे ती संकल्पना बाऊंडरी लेअर आणि ड्रॅग-लिफ्ट ची मांडणी लुडविग प्रॅन्डलने केली १९०४ मध्ये. सामान्यतः हवेपेक्षा जड असलेली वस्तू उडू शकत नाही पण पंखांचा आकार एरोफॉईल ठेवला आणि विमान वेगाने जमिनीवरून नेले तर पंखांच्या विशिष्ट आकारामुळे पंखाच्या वर हवेचा दाब कमी होतो आणि पंखाच्या खाली जास्त होतो आणि त्यातूनच लिफ्ट मिळते आणि हवेपेक्षा जड असले तरी विमान जमिनीवरून उचलले जाते. ही सगळी शास्त्रीय बैठक उपलब्ध झाली १९०४ मध्ये-- राईट बंधूंचे विमानाचे उड्डाण झाल्यानंतर. तेव्हा १९०३ मध्ये राईट बंधू जी गोष्ट समोर दिसत नाही किंवा (त्यावेळी उपलब्ध असलेल्या) शास्त्रीय तत्वांनुसार सिध्द करता येत नाही अशा गोष्टीवर विश्वास ठेवत होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? तीच गोष्ट एडिसनची. त्याला इलेक्ट्रिक बल्ब बनवायच्या प्रयत्नात हजारेक वेळा अपयश आले असे वाचले आहे. तरीही समोर दिसत नसलेला इलेक्ट्रिक बल्ब प्रत्यक्षात उतरू शकेल अशी पक्की खात्री असल्याशिवाय एडिसन हजार वेळा अपयश येऊनही परत एक हजार एकाव्यांदा प्रयत्न करायला गेला असेल असे वाटत नाही. म्हणजे एडिसननेही समोर न दिसणार्‍या आणि त्यावेळी सिध्द न करता येण्याजोग्या गोष्टीवर विश्वास ठेवलाच की नाही? मग राईट बंधू आणि एडिसनलाही अंधश्रध्दाळू का म्हणू नये? समोर दिसणार्‍या आणि सिध्द करता येण्याजोग्याच गोष्टीवर विश्वास ठेवणारी माणसे कधीही काहीही भव्यदिव्य करूच शकणार नाहीत. १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टरने सगळ्यात पहिल्यांदा १ मैल अंतर ४ मिनिटांच्या आत पळून दाखवले. त्यापूर्वी माणसाला असे करता येणे अशक्यच आहे असे मानले जात होते. पण रॉजर बॅनिस्टरने ते करून दाखवले. राईट बंधूंच्या विमान उड्डाणाच्या काही दिवस आधी न्यू यॉर्क टाईम्समध्ये 'हवेपेक्षा जड वस्तू उडू शकेल असे वाटणे हा मूर्खपणा आहे' अशा स्वरूपाचे लिहिले गेले होते असे शिव खेरांच्या पुस्तकात वाचले आहे. काय अशक्य आहे हे म्हटले जात होते त्याकडे राईट बंधू, रॉजर बॅनिस्टर यांनी दुर्लक्ष केले. त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 'अमुक एक गोष्ट अशक्य आहे' असे म्हणणे चुकीचे आहे असेही नाही. फक्त जे लोक काहीतरी भव्यदिव्य करतात ते या अशक्य मानल्या जाण्यालाच फाट्यावर मारतात. यावर मला वाटते: Circle of rationality is often enlarged by irrational people. १९०३ मध्ये राईट बंधू, १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टर हे त्यावेळी माहित असलेल्या बैठकीनुसार सुरवातीला irrational गणले गेले. पण शेवटी त्यांनीच तसे करणे शक्य आहे हे दाखवून देऊन Circle of rationality वाढविले. एकूणच जे समोर दिसते आणि जे सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवणे म्हणजे अगदी sure-shot road to mediocrity. या मुद्द्याला स्वतःला फार मोठे विज्ञाननिष्ठ समजणार्‍या कोणीही अजूनपर्यंत उत्तर दिलेले नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

Circle of rationality is often enlarged by irrational people
खूप आवडलं हे वाक्य. बाकी गोष्टींशी सहमत आहेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

मग राईट बंधू आणि एडिसनलाही अंधश्रध्दाळू का म्हणू नये? कारण यनावालानी त्यांना तसे सर्टीफिकेट दिले नव्हते म्हणून. :-)

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमचे हे श्रद्धा वि. अंधश्रद्धा वगैरे चालूद्या पण कृपया राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक वगैरेंना मधे आणू नका. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. तसे असते तर उंच मनोर्‍यावरून हाताला पंख लावून उड्या मारलेल्या लोकांमधे कुठेतरी त्यांचे नाव असते. उलट ते स्वतः त्यांच्या डिजाईन्सचे मोठे क्रिटीक्स होते. त्यांनी त्यांच्या आधी केलेल्या अनेक प्रयोग आणि थेअरीजचा सुयोग्य वापर करत मॉडेल्स बनवले (पडताळणीसाठी विंड टनेल सुद्धा वापरले). इतके केल्यावरही आधी अनेक वेगवेगळी डिजाईन्स बनवून ग्लायडर्सवर चाचण्या घेतल्या, इतक्या की प्रत्यक्ष विमानाच्या चाचणीची वेळ आली तेव्हा ते ग्लायडर उडवण्याचा सर्वाधीक अनुभव असलेले पायलटस होते. बरं ग्लायडर्स का? कारण त्याआधी ग्लायडर्सचे काही प्रयोग यशस्वी झाले होते आणि टनेलमधे तपासलेली डिजाईन थेट तपासण्यापेक्षा आधी ग्लायडर मोड मधे तपासणे सोयीचे होते. थोडक्यात काय? तर राईट बंधूंनी प्रयोग करेपर्यंत वैज्ञानिक लोक हवेपेक्षा जड असलेली वस्तू उडू शकत नाहीच वगैरे म्हणत नव्हते, पण सिद्धता मांडल्याशिवाय एखादी गोष्ट मान्य करायची नाही असा होरा असल्याने ते छातीठोकपणे हो सुद्धा म्हणत नव्हते इतकंच. तीच गोष्ट एडीसनची, एडीसनच्या पहील्या पेटंटचे नावच "Improvement In Electric Lights" होते. इलेक्ट्रीसीटी वापरून प्रकाश निर्माण करता येऊ शकतो ही थेअरी मांडली गेली होती, काही प्रयोग देखील झाले होते (कार्बन ते प्लॅटीनमपर्यंत पदार्थ वापरले गेले होते) पण ते लोकोपयोगी प्रॉडक्ट बनण्यायोग्य नव्हते. एडीसनने मेहनत घेऊन १२०० तास चालू शकणारा बल्ब (खरेतर फिलामेंट) विकसीत केला त्याबद्दल श्रेय दिले जाते. अर्थात हाच तो बल्ब असे म्हणून लोकांनी त्या एकाच फिलामेंटवर श्रद्धा न ठेवता त्याहून उत्तम डिजाईन्स कशी बनवता येतील त्याकडे लक्ष दिले म्हणुन पुढे टंगस्टन, क्वार्ट्ज, हॅलोजन आणि आता सीएफएल, एलईडी वगैरे प्रवास सुरू आहे. >>>त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. माझ्या दृष्टीने हे चुकिचे आहे. कारण वैज्ञानिकाला एखादी गोष्ट दिसली तर तो त्याची सिद्धता शोधण्याचा प्रयत्न करेल किंवा एखाद्या गोष्टीला सैद्धांतीक पद्धतीने सिद्ध करून दाखवण्यात आले, ते खोडणे शक्य नाही हे कळाले, किमान करोलरी उपलब्ध असण्याची शक्यता दिसली कि ती गोष्ट दिसायलाच हवी असा हट्ट करणार नाही. त्यापलीकडचे सगळे तो त्याच्यापुरते अज्ञात आहे असे समजेल. (अज्ञात म्हणजे माहिती नसणे या अर्थाने नव्हे, अनकन्क्लुजीव्ह म्हणा हवे तर) माझ्या मते अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची पुरेशी कारणीमीमांसा आणि योग्य सिद्धता देता येत नसताना ती गोष्ट अमुक असावी/नसावी असा विचार न करता ती गोष्ट अमुक आहेच/नाहीच असा दावा करणे.

In reply to by थॉर माणूस

तुमचे हे श्रद्धा वि. अंधश्रद्धा वगैरे चालूद्या पण कृपया राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक वगैरेंना मधे आणू नका. ..... १०० टक्के पटले उगीच वैद्यानिक उदाहरणे देऊन विषय भलतीकडे जातो. राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक यांनी शास्त्रीय प्रयोग केले त्याची गृहीतके मांडली आणी त्याप्रमाणे आपल्या प्रयोगावर विश्वास ठेवला. यात श्रद्धा वि. अंधश्रद्धा काहीपण नव्हते.

In reply to by थॉर माणूस

थोडीशी गल्लत होतेय, विमानाच्या बाबतीत तुम्ही जे वर्णन केले आहे या प्रयोगाच्या पायऱ्या आहेत.. मूळ ही वैज्ञानिक धारणा की हवेपेक्षा अधिक जड वस्तू हवेत उडू शकत नाही, त्याला काही थिअरी पण होती. पण ती खोटी आहे असे राईट बंधू काही कारणाने मानत होते.. म्हणून त्यांनी प्रयत्न केले. याला समांतर उदाहरण आता देता येईल का माहीत नाही.. कदाचित मेंदू प्रत्यारोपण होऊ शकेल

In reply to by आनन्दा

>>>पण ती खोटी आहे असे राईट बंधू काही कारणाने मानत होते नाही, हवेपेक्षा जड वस्तू हवेत उडू (की तरंगू? मराठीकरण नीट जमंत नाहीये शब्दाचं) शकत नाही ही प्रूव्हन थिअरी आहे. राईट बंधू किंवा त्यांच्याही आधी ज्यांनी ग्लायडर्स बनवले ते सर्व लोक या थिअरीला खोटे म्हणत नव्हते तर नवी थिअरी मांडत होते की पुरेशा मदतीने हवेपेक्षा जड वस्तू हवेत उडू शकते. अर्थात हा त्यांचा हायपोथेसिस होता (मारवाजींचा प्रतिसाद हे छान सांगतो) आणि तो सिद्ध करण्यासाठी ते धडपडत होते.

In reply to by थॉर माणूस

त्या हायपोथीसिसवर त्यांची श्रद्धा होती असे म्हटले तर? गॅरी भाऊ आणि मी एव्हढेच सांगतोय की प्रचलित समजुती झुगारून स्वतःच्या अनुभव/हायपोथीसिस वर श्रद्धा ठेवून काम करणार्यांनीच विज्ञानाचा परीघ विस्ताराला आहे.. असे होते हे प्रथम सिद्ध झाले, का होते हे मागाहून आले..

In reply to by थॉर माणूस

राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती.
राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच नाही अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच वा उडणारच नाही अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती. ------------- हे तिन्ही सत्य, शेवटी काहीही असो कसलीच श्रद्धा नव्हती? ========================= प्रतिसाद तुमच्या विधानाच्या अनुषंगानं असला तरी जनरल आहे. तुम्हालाच असं नाही.

In reply to by थॉर माणूस

राईट बंधूंची त्यांचे पहीले डिजाईन उडणारच अशी काही श्रद्धा वगैरे नव्हती.
मग काय होतं? ज्ञान, माहीती, विश्वास, खात्री, आशा? अगोदर काही भूतकालीन दाखला नसल्यामुळे, कशाच्या बळावर/आधारावर? -------------- यांच्यापैकी काहीच नसताना ते प्रयोग करत होते का? आपण सगळे सर्व गोष्टि अशाच करतो का?

In reply to by थॉर माणूस

गॅरी
१९०३ मध्ये राईट बंधू, १९५४ मध्ये रॉजर बॅनिस्टर हे त्यावेळी माहित असलेल्या बैठकीनुसार सुरवातीला irrational गणले गेले. पण शेवटी त्यांनीच तसे करणे शक्य आहे हे दाखवून देऊन Circle of rationality वाढविले.
थॉर
माझ्या दृष्टीने हे चुकिचे आहे. कारण वैज्ञानिकाला एखादी गोष्ट दिसली तर तो त्याची सिद्धता शोधण्याचा प्रयत्न करेल किंवा एखाद्या गोष्टीला सैद्धांतीक पद्धतीने सिद्ध करून दाखवण्यात आले, ते खोडणे शक्य नाही हे कळाले, किमान करोलरी उपलब्ध असण्याची शक्यता दिसली कि ती गोष्ट दिसायलाच हवी असा हट्ट करणार नाही. त्यापलीकडचे सगळे तो त्याच्यापुरते अज्ञात आहे असे समजेल. (अज्ञात म्हणजे माहिती नसणे या अर्थाने नव्हे, अनकन्क्लुजीव्ह म्हणा हवे तर)
================ आपण सगळे शून्य वापरतो. बाकी सगळ्या पूर्ण संख्यांनी भागणे शक्य आहे नि शून्यने भागणे अशक्यच नव्हे तर अव्याख्यित आहे. आपणच काय सगळेच शास्त्रज्ञ हे करतात. भागाकाराला फक्त शून्यचा अपवाद असायचं कारणच नाही. आणि खरं तर ज्या आकड्याने वा संकल्पनेने भागाकार हि संकल्पना अर्थहिन ठरते तोच आकडा वा संकल्पना वापरत गणीत पुढे दामटत ठेवायचे किति मोठे सर्कल ऑफ इरॅशनॅलिटी.

In reply to by थॉर माणूस

प्रतिसाद पटला... उत्तम उत्तर दिलेत.
तुमचे हे श्रद्धा वि. अंधश्रद्धा वगैरे चालूद्या पण कृपया राईट बंधू, एडीसन किंवा इतर वैज्ञानिक वगैरेंना मधे आणू नका.
+11

In reply to by थॉर माणूस

अंधश्रद्धा = एखाद्या गोष्टीची पुरेशी कारणीमीमांसा आणि योग्य सिद्धता देता येत नसताना ती गोष्ट अमुक असावी/नसावी असा विचार न करता ती गोष्ट अमुक आहेच/नाहीच असा दावा करणे. हायला, यनावाला आसंच करत आसतात ना न्हेमी ! काय भारी चप्राक लगावली तेन्ला तुमी, भाऊसायेब ! ;) =))

In reply to by गॅरी ट्रुमन

>>> त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. >>> मुळात तुम्ही हे जे विधान करताय तेच बरोबर नाही. शास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे काय यासाठी कृपया पुढील व्हिडिओ बघावा. शास्त्रीय दृष्टीकोनात एखादी गोष्ट सिध्द करता आली तरीही ती थियरी अंतिम सत्य मानली जात नाही. Is the theory right? No, it is simply not proved wrong. थोडक्यात काय तर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि ताप कमी होण्यासाठी पेनिसिलीन देतो असे तो म्हणाला तर ती झाली श्रध्दा आणि कुणी म्हणाला की एका बोटात पाचूची अंगठी घातलीस की तुझा ताप बरा होईल, तर ती झाली अंधश्रध्दा. आता यात फरक काय? तर फरक इतकाच की दुसर्‍या कुठल्याही डॉक्टरने तुम्हाला पेनिसिलीन दिले तरी ताप कमी होतो किंवा डॉक्टरने दुसर्‍या कुणाला पेनिसिलीन दिले तर त्याचा पण ताप कमी होतो आणि हे आपल्याला वारंवार प्रयोग करून consistently सिद्ध करता येते. हे स्वतः तपासून बघितले नाही तरी याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता म्हणून ती झाली श्रध्दा. याउलट अंगठी घालून तुमचा ताप कमी होईलच याची काही खात्री नाही, अंगठी घालून दुसर्‍या कुणाचा तापही कमी होईल याची पण काही खात्री नाही आणि हे आपल्याला वारंवार प्रयोग करूनपण consistently सिद्ध करता येणार नाही, म्हणून ही झाली अंधश्रद्धा.

In reply to by उपाशी बोका

मलासुद्धा 'त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रद्धा' या गृहीतकातच त्रुटी जाणवली. आवडले.

In reply to by राही

मलासुद्धा 'त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रद्धा' या गृहीतकातच त्रुटी जाणवली.
मिपावरील एक आघाडीचे विज्ञाननिष्ठ यनावालांनी या प्रतिसादात श्रध्दा कशाला म्हणावे याची एक पाच कलमी यादी दिली आहे.आणि डोळस श्रध्दा असे काही नसतेच आणि सगळ्या श्रध्दा या अंधश्रध्दाच असतात नाही का? म्हणजे हीच पाचकलमी यादी अंधश्रध्देलाही लागू पडेल. वर काही अती विज्ञानवादी लोकांचे मत दिले आहे: "जी गोष्ट दिसते किंवा सिध्द करता येते तीच सत्य मानायची. बाकी सगळ्या अंधश्रध्दा". या मताचाच यनावालांनी एका अर्थी विस्तार केला आहे. म्हणजे "त्यांच्या मते....आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा" या गृहितकातच त्रुटी असेल तर ती त्रुटी यनावालांच्या पाचकलमी यादीतही नाही का? तरीही माझ्यासारख्यांनी जे मत मांडले आहे त्याच्याशी असहमती आणि यनावालासारख्यांनी जे मत मांडले आहे त्याच्याशी इन जनरल सहमती..आहे की नाही मज्जा?

In reply to by उपाशी बोका

त्यांच्या मते जी गोष्ट समोर दिसते किंवा सिध्द करता येते त्यावरच विश्वास ठेवायचा आणि असे करणे म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोन आणि बाकी सगळ्या अंधश्रध्दा. >>> मुळात तुम्ही हे जे विधान करताय तेच बरोबर नाही.
नक्की काय लिहिले आहे ते वाचले आहेत का? मी कोणतेच विधान करत नाहीये. स्वतःला फार मोठा शास्त्रीय दृष्टीकोन आहे असे म्हणणार्‍यांचे मत काय आहे हे लिहिले आहे. I am accountable for what I said, not for what others interpreted.
शास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे काय यासाठी कृपया पुढील व्हिडिओ बघावा.
व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद. पण असले व्हिडिओ बघण्यापेक्षा माझ्या आवडीचे अनेक विषय आहेत त्यातले व्हिडिओ बघण्यात मला अधिक रस आहे.
फरक इतकाच की दुसर्‍या कुठल्याही डॉक्टरने तुम्हाला पेनिसिलीन दिले तरी ताप कमी होतो किंवा डॉक्टरने दुसर्‍या कुणाला पेनिसिलीन दिले तर त्याचा पण ताप कमी होतो आणि हे आपल्याला वारंवार प्रयोग करून consistently सिद्ध करता येते. हे स्वतः तपासून बघितले नाही तरी याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता म्हणून ती झाली श्रध्दा.
नक्की? पेनिसिलीन देऊन सगळ्यांचा ताप कमी होतो (किंवा अन्य कुठल्या रोगावरचे दुसरे कुठले औषध देऊन तो रोग) याची खात्री आहे तुम्हाला? मनाची उभारी, काही झाले तरी मी या आजारातून बाहेर पडणारच वगैरे वाटणे या गोष्टींचा काहीच वाटा नसतो आजारी माणूस बरा होण्यात? एकूणच अती विज्ञानवादी लोक हा दुसरा अ‍ॅस्पेक्ट पूर्णपणे दुर्लक्षित करतात. नुसत्या अंगठीमुळे (पक्षी मनाच्या उभारीमुळे--- ती कोणत्याही कारणाने येत असू दे-- अगदी अंगठी घालून आली तरी) माणूस बरा होतो असे कोणी म्हणायला लागले तर ते चुकीचेच आहे. पण मनाच्या उभारीला कोणतेही स्थान न देणे हे पण तितकेच चुकीचे आहे. अती विज्ञानवादी लोक याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. अती विज्ञानवादी लोकांशी फार पटत नाही त्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे. अशा अती विज्ञानवादी लोकांचा 'इतर लोक कसे मूर्ख' असा हेटाळणीचा सूर असतो तो पण जाम डोक्यात जातो. बाकी चालू द्या.

In reply to by उपाशी बोका

शास्त्रीय दृष्टीकोनात एखादी गोष्ट सिध्द करता आली तरीही ती थियरी अंतिम सत्य मानली जात नाही.
सत्याचे इंटेरिम नि फायनल असे दोन प्रकारे कधीपासून झाले म्हणे? दिलेल्या संदर्भात, दिलेल्या गृहितकांखाली दिलेल्या हायपोथेसिस बद्दल कायतरी एकच सत्य असेल ना? आज माझं नाव अरुण आहे, उद्या बदलेल, इ इ पण "आज माझं अरुण आहे हे एक तात्पुरतं सत्य आहे." २० जानेवारीला सव्वासात माझं नाव काय होतं ही भूमिका तुम्ही कधिही बदलू शकता, वर ती तुम्ही कधीच फायनल म्हणणार नाही, आताच्या ज्ञानाप्रमाणे नाव तरूण! संदर्भ तोच, गृहितके तीच, बाब तीच आणि वेगवेगळ्या वेळी तुम्ही म्हणाल ती सत्ये (पुढे बदलेपर्यंत अंतिम) मानायची? काय डिक्टेटर्शीप आहे का? ================== जे त्याच्या अंतिम स्वरुपात मांडलेलं नसतं ते सत्य नसतंच म्हणून विज्ञानाचा नि सत्याचा काहीही संबंध नाही.

आदिमानवाने टोळी बनवितांना हाच आधार धरला होता की, आपण एकमेकांना मदत करु आणि त्यात आपला फायदा होईल. त्यात काहीही सिध्द करण्यासारखे अथवा विश्वास ठेवण्यासारखे नव्हते. मानवाने स्वतःत केलेला हा बदल आज त्याला या पृथ्वीवरील सर्वोत्तम प्राण्यात बदलवुन गेलाय. ईतर कोणत्याही प्राण्याला हे करणे शक्य झाले नाही. याला आशा, विश्वास, श्रध्दा काय नाव देणार? सत्य आणि असत्य यामध्ये बरेच काही असते. आपल्याला आज ज्या भावना स्पर्श करतात त्यांचा अनुभव करुन आपण ना सत्यात जगु शकत आणि ना असत्यात. हे मिथ्या जगच सत्य मानावे ही मायाच नाही का?

सायंटीफीक थिंकींग चा शास्त्रीय दृष्ट्या एखादा शोध समस्या हाताळण्याचा हा मार्ग एकदमच बेसीक असला तरी तो पुन्हा चर्चेत आणणे अगत्याचे वाटते. दुसर म्हणजे श्रद्धा विचाराची सायकल शास्त्रीय विचाराच्या सायकल शेजारी ठेवणे ही फार उपयोगाचे ठरेल असे वाटते. तुर्तास ही दोन चित्रे शास्त्रीय विचाराची सायकल कशी चालते हे समजण्यास उपयुक्त असावीत. a 1 आता या शास्त्रीय रीती मध्ये हायपोथेसीस टेस्ट करणे हायपोथेसीस रीजेक्ट करणे हायपोथेसीस क्रीटीसीजम साठी ओपन ठेवणे जुन्या हायपोथेसीस ना नव्याने आव्हान देणे हे सर्व शास्त्रीय रीती चा मुलभुत भाग आहे याच्या तुलनेत जेव्हा अ-शास्त्रीय श्रद्धेय मंडळी आदेश देतात तथ्ये मांडतात त्यांची एक सायकल नीट बनवुन मांडणे गरजेचे आहे असे वाटते. म्हणजे वरील प्रत्येक स्टेप ला उलट करणे ते करण्याचा तुर्तास कंटाळा ( बाकी त्या हायपोथेसीस ना कोणी श्रद्धा समजत असेल तर ............... असो

In reply to by मारवा

थोडासा वेगळा विचार करायचा झाला तर आपल्या हे लक्षात येईल की पूर्वीच्या काळी जो काही मतामतांचा प्रसार वगैरे झाला तो याच कारणामुळे झाला.. फक्त एकच फरक आहे, की या मार्गाने गेल्यावर येणारे अनुभव अन्य कोणाला दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यावर टीका होते, पण तेव्हढा भाग सोडला तर अध्यात्ममताचा ज्याला हल्ली सरसकटपणे अंधश्रद्धा म्हटले जाते, त्याचा ही प्रसार वादचर्चा, प्रयोग (वैयक्तिक) या मार्गानेच झाला आहे. विवेकानंद हे त्याचे सांप्रतकालीन उदाहरण मानण्यास हरकत नसावी.

In reply to by मारवा

https://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/sci… ========== यनावालासारख्या विज्ञानखोरांनी विज्ञानाच्या नावानं अपप्रचार करण्यापूर्वि या मेथडच्या मर्यादा जाणाव्यात. देव मानणारे लोक निर्बुद्ध असतात, त्यांचे मेंदू काम करत नाहीत इ इ विज्ञानही म्हणत नाही. या पेजवर काय लिहिलं आहे पहा.
Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity.
ही या फ्रेमवर्कची मर्यादा आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या अधिकृत फ्रेमवर्क दाखवलेला प्रांजळपणा (आणि सत्यनिष्ठा) स्वतःस वैज्ञानिक दृष्टीकोणाचे म्हणवणारांनी देखील दाखवावा. इथे या फ्रेमवर्कचं विस्त्रूत वर्णन आहे. गरजूंनी ते वाचून घ्यावं.

In reply to by arunjoshi123

>>>शास्त्रज्ञांनी त्यांच्या अधिकृत फ्रेमवर्क दाखवलेला प्रांजळपणा (आणि सत्यनिष्ठा) nailed it मुळात अनेक लोकांना असे वाटते की अश्रद्ध/नास्तिक म्हणजे विज्ञानवादी असणारच. पण तसे नाही, जर एखादी व्यक्ती स्वतःला वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली म्हणवत असेल पण अनप्रूव्हन गोष्टींवर बोलताना आहे'च'/नाही'च' वर अडून बसला तर माझ्या दृष्टीने तरी त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. आस्तिक वि. नास्तिक वाद देखील देव आहे'च' विरूद्ध नाही'च' मधे अडकत असल्याने ते या दृष्टीकोनाची दोन टोके ठरतात (रादर ते एकाच टोकावर आहेत फक्त विरूद्ध दिशांना तोंड करून :) ). या उलट वैज्ञानिक हे या रेषेच्या मध्याजवळ असतात, त्यांचा प्रवास हा दिलेल्या सिद्धांतांच्या सिद्धतेवर ठरतो. म्हणूनच उद्या कुणी देवाचे अस्तित्व सप्रमाण सिद्ध केले तर ते मान्य करणे वैज्ञानिकांना जड जाणार नाही (नास्तिकांना जाईल), तर देव नाही हे सिद्ध झाले तर ते देखील मान्य करणे तितकेच सोपे असेल.

माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. याला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे. आपण त्याला मनाच्या धारणा म्हणु यात. पण ती टिकून असण्याचे कारण त्याची माणसाच्या सर्वायवल साठी असलेली उपयुक्तता. केवळ अगतिकता संस्कार अज्ञान ही कारणे अंनिसत आम्ही द्यायचो पण मला ती पुरेशी वाटत नाहीत. त्याचे जैविक कारण देखील आहे.मेंदुच्या मनात या पुस्तकात लेखक सुबोध जावडेकर अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!" दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्रद्धा अंध असते हे वादासाठी मान्य केले तरी काही प्रश्न शिल्लक राहतात.. उदा.. एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो असे मान्य करण्यापूर्वी हे पैसे नेमके कुठून येतात, पाऊस पाडणारा छापतो, टाकसळीतून येणार की कोणाच्या तिजोरीतून येणार, आणि येणार तर त्याला कळणार नाही का, त्याला कळले तर तो परत नेणार नाही का? असे प्रश्न तरी किमान विचारणे आवश्यक आहे.. यातले काहीच विचारले नसेल तर ती अंध झाली, या प्रश्नांची समाधानकारक उत्तर घेऊन ठेवली तर मग ती श्रद्धा म्हणता येईल, असे माझे मत.. रच्याकने मला एक प्रश्न दीर्घकाळ पडला आहे.. समजा साताऱ्याहून कोल्हापूरला जायला तुम्ही बस स्टॉप वर उभे आहात, खूप काळ झाला पण गाडीच येत नाहीये, अखेरीस तुम्ही महालक्ष्मीला नवस बोलत की मला आता गाडी मिळाली तर मी तुझ्या दर्शनाला येईन. 5 मिनिटात तुम्हाला पुणे कोल्हापूर गाडी मिळते.. आता मला सांगा ही गाडी तुम्हाला नवसाने मिळाली की नाही?

In reply to by आनन्दा

एखाद्याने पैशाचा पाऊस पडतो असे मान्य करण्यापूर्वी
विज्ञानाच्याच म्हणण्याप्रमाणे पृथ्वीवर सोन्याचा, हिर्‍यांचा आणि अत्यंत किचकट अशा सजीवांचा पाऊस पडला आहे तर पैसे झाड कि पत्ती?

In reply to by पिलीयन रायडर

पण त्याच्यामुळं भविष्यात पडण्याची शक्यता शून्य होत नाही. =============== आपल्याच विश्वात पैशाच्या पावसापेक्षा गुगोल पटींनी असंभव अशा गुगोलप्लेक्स घटना होत असतात. आणि अशी अनंत विश्वे आहेत. कदाचित आरबीआयच्या नोटांचे आणि नाण्यांचे पाउस आत्ताच कुठे चालू असतील.

In reply to by आनन्दा

आता मला सांगा ही गाडी तुम्हाला नवसाने मिळाली की नाही?
शास्त्रज्ञ आणि सामान्य लोक यांना एकसमान वागणूक मिळायला हवी. व्हायरसपेक्षा ट्रीलियनपट किचकट बॅक्टेरिया बिनानवसाचे अगोदर बनू शकतात तर बस नवसाने का येऊ शकत नाही?

In reply to by arunjoshi123

मी नवस बोलून 5 मिनिटेच झालीत, आणि बस पुण्याहून निघून 2 तास. अश्या परिस्थितीत ते बस त्या वेळेला तिथे येणे हा माझ्या नवसाचा परिणाम मानावा का?

In reply to by आनन्दा

तुम्ही कशालाही नवसाचा परिणाम माना. तुमचं असं मानणं अन्य लोकांच्या अन्य मानण्यांपेक्षा दर्जात्मक दृष्ट्या फार काही खालचं नसेल. ================ नवस म्हणजे तुमच्या मनातला विचार. विचार मेंदूत उत्पन्न होतात. ते विद्युतप्रवाहाच्या रुपात आहेत. असं मानलं तर मेंदूच्या बाहेर जे सारे विद्युतप्रवाह वाहतात ते देखील कोण्या एका प्रकारचे विचारच झाले. ते विचार कोण करतंय हे सोडा. आणि विद्युअतप्रभारित पार्टिकल्सची जगात उमदा रेलचेल आहे. तेव्हा झालं असेल काहीतरी.

In reply to by आनन्दा

पण कित्येकदा आत्यंतिक श्रद्धेने साद घालूनही काम होत नाही, तेव्हा काय म्हणावे? श्रद्धा कमी पडली की मुळात ती एक बोलाफुलाला गाठ होती? यावरून मला काही वर्षांपूर्वी काही ठिकाणी पसरलेला एक समज आठवतो. त्या दोन चार वर्षांच्या काळात शिरडीच्या रस्त्यावर बरेच जीवघेणे अपघात झाले. त्यातले बहुतेक अपघात नवस फेडायला निघालेल्यांच्या वाहनांना झाले. म्हणजे कुणी नवी गाडी घेतली तर शिरडीला गाडीचा पहिला प्रवास होऊ दे, म्हणून निघाले होते, कोणी लग्न ठरले म्हणून अथवा लग्न झाल्यावर जोडप्याने निघाले होते, कुणाला 'नवसासायासाने' मूल झाले होते त्याला साईंच्या चरणांवर घालायचे होते तर वाटेतच अपघात झाला आणि ते शिरडीला पोचू शकले नाहीत. तेव्हा असे म्हटले गेले की या लोकांची पापेच जबरदस्त होती. साईं तरी कितीवेळा आणि किती जणांना वाचवणार? पापाचा पैसा असाच ताप देतो वगैरे. (ही सांगोवांगीची गोष्ट नाही.) याला काय म्हणावे?

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे.
माझ्यामते विज्ञान हे मूळातच अंधविज्ञान असते. पुढचं स्पष्तीकरण तेच मानलं तरी चालेल. पण फॅशनची इतकी चलती आहे कि अंधविज्ञान हा शब्द कॉइनच झालेला नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझ्या मते श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. याला व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे. श्रद्धा ही श्रद्धा असते. श्रद्धेला अंध म्हणणे किंवा डोळस म्हणणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. एकाची डोळस श्रद्धा ही दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. मी आधी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रद्धापूर्वक नामस्मरण करणे हे दुसर्‍या एखाद्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे श्रद्धेला अंध किंवा डोळस अशी परिमाणे लागू होत नाहीत. लेखक सुबोध जावडेकर अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!" लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी नक्की काय झाले हे कोणालाच या क्षणी माहिती नाही. त्यामुळे काहीजण आपल्या स्वभावानुसार व कलानुसार कल्पनाशक्ती लढवून आपल्याला हवे तसे एक काल्पनिक चित्र उभे करतात.

In reply to by श्रीगुरुजी

लाखो-कोट्यावधी वर्षांपूर्वी डायनासोर होते तेव्हा माणुस होता का? की देवला डायनासोर -डायनासोर खेळुन कंटाळा आला मग त्याने माणसे बनवली.

गंभीर विचार करायचा झाल्यास, हे एक न संपणारं वर्तूळ आहे. अंधश्रद्धा हा शब्दच खरंतर चूक आहे. श्रद्धा ही मुळातच अंध असते, त्या शब्दाच्या अर्थात हे अंतर्भूत आहे. ती डोळस तेव्हा होते, जेव्हा ती सिद्ध होते. जे ती श्रद्धा बरोबर होती हे सिद्ध करतात, त्यांच्या बोलण्यावर/अभ्यासावर/लिहिण्यावर किंवा त्यांच्या बद्दल कुणी दुसर्‍यानं लिहिलेल्या/सांगीतलेल्या गोष्टींवर, आपण विश्वास ठेवतो. [आणि त्यांनी ती खरोखरच सिद्ध केल्याची श्रद्धा ठेवतो.] जसं - . पाण्याचा रेणू असतो हे कुणीतरी प्रयोग करून सिद्ध केलं. . त्या थिअरीवर आपला विश्वास [आणि त्यांनी खरोखरच हे केलं असेल ही श्रद्धा.] . पुढेमागे कुणाला त्यात काही पटलं नाही, तर त्या व्यक्तीला स्वतःला ते प्रयोग करावे लागतील आणि बरोबर्/चूक सिद्ध करावं लागेल. . मग लोक त्याच्यावरसुद्धा विश्वास ठेवतील [आणि त्यानं ते खरोखरच सिद्ध केलं होते अशी श्रद्धा ठेवतील.] . यानंतर परत तेच वर्तूळ पुढे सुरू राहणार. . . खरंतर सरळ आहे समजून घ्यायला. पण मग एवढी आदळाआपट का होते? कारण - - ज्याला पटत नाही त्यानं प्रयोग करून स्वतः ती श्रद्धा बरोबर/चूक सिद्ध करण्याचा मार्ग निवडला नाही. - फक्त टिका करत राहण्यानं ती श्रद्धा बरोबर/चूक हे कसं सिद्ध होणार? - जो सांगतो त्याचा अधिकार सिद्ध झाल्याशिवाय कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार? जसं - एखाद्या व्यक्तीला विषमज्वर आहे हे मी म्हटलं तर वेगळं होईल आणि एखाद्या डॉक्टरनं म्हटलं तर वेगळं होईल. - आता हा अधिकार प्रत्येक क्षेत्रामधे वेगवेगळ्या पद्धतीनं प्राप्त होणार, त्यासाठी वेगवेगळा अभ्यास लागणार. सगळ्यांना एकच प्रमाण लावून चालणं योग्य नाही. - त्या प्रमाणावर सिद्ध झालेल्या माणसाच्या सांगण्यावर/मांडण्यावर, लोक तो अधिकारी म्हणून विश्वास ठेवतील [आणि त्यानं ते खरोखरंच सिद्ध केलेलं आहे ही श्रद्धा ठेवतील.] राघव

यनांच्या धागा लेख चर्चेच्या वेळी श्रद्धा हि संकल्पना हाताळताना 'निष्ठा' शब्दा बद्दलही असाच स्वतंत्र धागा काढून उहापोह करणे गरजेचे असावे (तुर्तास तरी वेळे अभावी असा धागा काढणे शक्य होणार नाही पण नंतर विचार नक्कीच आहे) . श्रद्धे बद्दल विचार विमर्श करताना श्रद्धेचे प्रयोजन हा ही मुद्दा असवा असे वाटते, तिसरे नरेटीव्हज (कथा सुत्रे आणि मिथकां ) च्या प्रभावाकडे दुर्लक्ष होत रहाते. एक उदाहरण द्यायचे झाले तर कोकिळा व्रताची मिपा कर थट्टा करु शकले कारण ततसंबंधी कथासूत्र /मिथकाचा नरेटीव्हचा मनावर प्रभाव नसणे. पण प्रभाव असेल तर भावना दुखावल्याची तक्रार झाली असती. बाकी माझे त्या धाग्यावरील लेखन अपडेटे मांडावे लागेल पण तुर्तास अधीचे सोईसाठी
तांत्रिक दृष्ट्या विश्वास आणि श्रद्धा यात अंशतः फरक आहे, सहसा विश्वास ही श्रद्धेची पहिली पायरी असावी, एखाद्या गोष्टीवर / व्यक्तीवर मी विश्वास ठेवतो म्हणजे श्रद्धे पर्यंत पोहोचलो आहे असे निश्चित सांगता येत नाही. श्रद्धेच्या पायरीला पोहोचलो नसेन तर परिस्थितीनुरुप विश्वास बदलू शकतात, श्रद्धा परिस्थितीनुरूप बदलणे अशक्य नाही पण अवघड असते. विश्वास शब्दाचे श्रद्धेत परिवर्तन होणासाठी निष्ष्ठा, कर्तव्य , भक्तीभाव या तीन पैकी एखादा तरी अ‍ॅट्रीब्यूट कमी अधीक प्रमाणात जरूर असावी. कर्तव्य भाव निष्ठा अथवा श्रद्धा न बदलताही बदलता येऊ शकत असावा. पण मला वाटते निष्ठा सुद्धा परिस्थिती आणि स्वभावानुरुप बदलू शकतात, पण निष्ठा बदलल्या शिवाय श्रद्धा बदलणे कठीण असावे

In reply to by माहितगार

अलिकडे संजय सोनवणींनी त्यांच्या या ब्लॉगपोस्ट मधून आणि https://youtu.be/YGplNFWnKeQ आणि https://youtu.be/3VhVbzT4 या दोन युट्यूब मधून कोरेगाव भीमा असो वा वढू बुद्रुक देव धर्माचा प्रत्यक्ष संबध नसताना ही मिथके आणि श्रद्धा कशा आकारास येतत आणि मिथकांचे श्रद्धेत परिवर्तन होऊन होणार्‍य गोंधळावरचे भाष्य उल्लेखनीय असावे.

माझ्यामते सर्व आधुनिक विज्ञान हे शतप्रतिशत अज्ञान आहे. ते केवळ फॅशनमधे आहे म्हणून त्याच्या नावानं दंडेलगिरि चालू आहे. आधुनिक विज्ञानाचे थेरम (वा थेरं) मांडण्यापूर्वीही मनुष्य नाविन्य जीवनात आणतच होता. आज त्या नाविन्याच्या जोडीला जोडलेला स्पष्टीकरणाचा पसारा भीक नको पण कुत्रे आवर या प्रकारचा झाला आहे. ===================== प्रत्येक पिढिला आपल्या काळात लागलेले शोध फार रोमँटिक वाटतात. भारी वाटतात. पण वास्तवात ते सर्व अन्य शोधांइतकेच फालतू असतात. अजून ५० हजार वर्षांनी कोणाला मोबाईलचा शोध महान कि तोफेचा विचारलं तर तो दोहोंत असा काय फरक आहे असं म्हणेल. आज तुम्हाला आरश्याचा शोध महान कि कपड्याचा असं विचारलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? त्यांच्याही शोधात काही शतकांचा फरक असेलच ना? ================== आधुनिक विज्ञान नावाचे तात्विक थोतांड चालू होण्यापूर्वीचा काळ आणि आधुनिक विज्ञानाचा काळ यांच्यात एक मूलभूत फरक आहे. अगोदरच्या पेड न गिनता गुटली खायचं काम चाले. आताच्या काळात शोध कमी आणि स्पष्टिकरणे जास्त हा प्रकार चालू आहे. ================= एक म्हणजे आपण एकेक वैज्ञानिक सत्य घेऊन त्याची चिकित्सा केली तर त्याचं अतंतः अस्वीकार्य भिकारडेपण लक्षात येतं. किंबहुना असं स्टँडालोन वैज्ञानिक सत्य नावाचा प्रकार नसावा. एका सत्याच्या उत्खननात सगळं विश्व खोदावं लागतं इतकं सगळं लिंक्डप आहे. दुसरं तसल्या फंदात न पडता वैज्ञानिक सत्यांची फ्रेमवर्क कशी आहे याला देखील प्रचंड सामाजिक दबावापोटी लोक प्रश्नांकित करत नाहीत. उदा. वैज्ञानिक सत्याचं स्वरुप अंतिम नसणे. जी पोझिशन अंतिम नाही तिला सत्य म्हणायची घाई कशाला? तुम्ही सत्य शोधा ना, सत्याची व्याख्या सोयीप्रमाणे का बदलता? पण हे दोन्ही ओके आहे. सर्वात घाणेरडा प्रकार तिसरा आहे. तो म्हणजे विज्ञानाचा रेफरन्स मानवी आयुष्याला देणे, वैज्ञानिक तत्त्वज्ञान नावाचे तत्त्वज्ञान अपनावून जीवनात काहीच्या काही अर्थ काढणे. स्वतःच्या नि स्वेतराच्या अस्तित्वाचा नि एकूणतेचा जो अर्थ आपण वैज्ञानिक फ्रेमवर्कमधून काढतोय ही प्रक्रियाच चूक आहे. यासाठी माणसानं विज्ञानात किमान आपली व्याख्या काय आहे हे समजून घ्यावं. ======================= निसर्गतः आपण असे बनलो आहोत कि आपण कसे वागावे हे ठरवायला कोणतेही फ्रेमवर्क विकसित करायची आवश्यकता नाही. आणि करायचे असेल तर आपण विज्ञानाचा विकास होण्यासाठी भरीव कार्य केलं पाहिजे. जगात हे कार्य एक तर बंद आहे वा भरकटलेलं आहे.

एखादी श्रद्धा वा अंधश्रद्धा ठेवणं हे कोणत्याही ज्ञानाच्या, विज्ञानाच्या वा तत्त्वज्ञानाच्या नियमांनुसार चूक वा गैर नाही. आपण मानत असलेले सर्वच ज्ञान, सत्ये, नियम, मूल्ये, वा तत्सम काही सर्वच आर्बिट्ररी स्वरुपाचं आहे. अगदीच खोडून काढता येत नाही असा आधार कशालाच नाही. दुर्दैवानं याला ज्ञानाची कोणतीच शाखा अपवाद नाही. ============== मूळात ज्ञानासोबतचा लोचा हा आहे कि खूप सारी गृहितकं केल्याशिवाय काँक्रिट चर्चा प्रारंभ करता येत नाही. मग या गृहितकांचा सेट काय असावा यावर विभिन्न मते असलेले गट उद्भवतात. या लोकांचं कधीही एकमत होणं असंभव आहे. ================= उदा. काही लोक म्हणतात कि त्यांना देव नाही हे माहित आहे, ज्ञान आहे, सिद्ध आहे, इ इ इ. देव या शब्दाचा तोच अर्थ अभिप्रेत असलेले अन्य काही लोक असतात ज्यांना देव आहे असे माहित असते. काही लोकांना देव आहे कि नाही हे माहीत नसते पण देव नाही हे पटत नसते. आता काही लोकांना देव आहे हे माहित आहे नि काही लोकांना नाही हे माहित हे कसं काय असं नाही म्हणणारांना विचारलं तर ते म्हणतात कि देव नाही हे कळावयास आवश्यक तितकी बुद्धीमत्ता आहे म्हणणारांकडे नाही. आपण हे सत्य मानून चालू. पण याचा अर्थ असा होतो कि सत्य उघड असले तरी न कळण्याइतके निर्बुद्ध लोक जगात असतात. थोड्क्यात लोक निर्बुद्ध असू शकतात. पण जर लोक निर्बुद्ध असू शकतात हेच सत्य असेल ते देव नाही म्हणणार्‍या लोकांना देखील लागू आहे. शेवटी ते देखील लोक आहेत. आपण सुबुद्ध आहोत नि आपल्या विरोधी ज्ञान असणारे निर्बुद्ध आहेत हे अंतिम सत्य कसं मानता येईल? अगदी त्याच्या एक्झॅक्टली उलटं अंतिम सत्य असू शकतं. ------ ही विचार करायची पद्धत एका लॉजिकल पॅराडॉक्स कडे नेते. म्हणून संपूर्ण, सुसंगत, समाधानकारक पद्धत वापरून विचार करावा.

एपि फनी श्रद्धा, ऑर्थोडॉक्स पुतीन ताज्या बातमी वरील ताजा लेख, लेख किंवा चर्चा विभागात तांत्रिक कारणाने पोस्ट होऊ न शकल्याने राजकारण विभागात पोस्ट करावा लागला म्हणून माहिती साठी येथे दुवा दिला आहे. चर्चेत दखल घेण्या जोगा वाटेल अशी आशा आहे.

मानवी मूर्खता, भावूकता, तर्कहिनता, निर्बुद्धता, विचारहिनता, विसंगतता, अर्धवटता, विवेकहिनता, असंबद्धता, इ इ (एका विशिष्ट मर्यादांच्या आत) आपल्या मानवतेचं सौंदर्य आहे. उगाच सर्वांना तर्क, ज्ञान, विवेक इ इ ची दमदमाटी करून एकाच दावणीला बांधू नये. आधुनिक जगात पद्धतशीरपणे सर्व लोकांच्या सर्व विचारांचे स्टँडर्डायझेशन करायचे कारस्थान चालू आहे. या सर्व तत्त्वज्ञानांच्या इतक्या मर्यादा असताना नि यांनी युक्त जग कसे असेल याचा पुरता अभ्यास नसताना या विचारांच्या लाटाच्या लाटा समाजावर सोडल्या जात आहेत. ==================== मनुष्याला वर्तन कसं असावं याचा नैसर्गिक ईंस्टींक्ट असावा, नसेल तर बोध घ्यायला समाज आहे, ते नसेल तर धर्माकर्माची फ्रेमवर्क आहे, ते नसेल तर आधुनिकतावाद्यांचे पण उद्दिष्ट कल्याण हेच आहे त्यांना फॉलो करावे. शेवटी आपल्या आजूबाजूच्या श्रद्धाळू, सेंटीमेंटल, अबसर्ड, इरॅशनल, इल्लॉजिकल, इ इ प्रकारच्या लोकांना आणि सर्व प्रकारे विरुद्ध प्रकारच्या लोकांना एकसमान प्रेम करावे, आदर द्यावा. त्यांची ही प्रतिमा (लायकी) एका रिजनेबल पातळीच्या पुढे अनादरास वा क्रौयास कारणीभूत ठरू नये. अशी माझी श्रद्धा आहे असं मी मानतो. ही श्रद्धाच असू शकते कारण याची कोणतीही सिद्धता माझ्याकडे नाही.

श्रद्धेची व्याख्या : जे विधान, जे तत्त्व, जो निसर्गनियम, जी संकल्पना, जी गोष्ट : १) पंच ज्ञानेंद्रियांतील एकाही इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. अथवा २) जिच्या कथित गुणधर्मांचा कोणताही प्रत्यय येत नाही, अथवा ३) जी वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येत नाही, अथवा ४) जी खरी असण्याची शक्यता अनुभवाने, कॉमनसेन्सने, किंवा तर्कसंगत युक्तिवादाने दाखविता येत नाही, अथवा ५) जिचे सत्यत्व मानवाच्या अधिकृत ज्ञानसंग्रहातील तत्त्वांच्या आधारे सिद्ध करता येत नाही, थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही. ते तत्त्व, ती संकल्पना, ती गोष्ट पूर्वग्रहामुळे/शब्दप्रामाण्यामुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय.

In reply to by यनावाला

राईट बंधू, एडिसन यांचे उदाहरण दिल्यावर इथेच काहींच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. इथे त्यांना आणू नका वगैरे म्हटले गेले. अनेकांना तो प्रतिसाद अत्यंत सडेतोड वगैरे वाटला. पण आता मिपावरील सर्वात मोठे विज्ञाननिष्ठ यनावालांनी ही पाच कलमी यादी दिली आहे त्यातल्या किती गोष्टी एडिसनला बल्ब पेटविण्यापूर्वी लागू होतात ते बघू.
१) पंच ज्ञानेंद्रियांतील एकाही इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभवता येत नाही.
बल्ब पेटलेला दिसला नव्हता की ज्ञानेंद्रियांपैकी एकाही इंद्रियाने त्याचा अनुभव घेता येत नव्हता. पहिले कलम लागू होते.
अथवा २) जिच्या कथित गुणधर्मांचा कोणताही प्रत्यय येत नाही,
किमान एडिसनच्या उदाहरणात हे कलम पहिल्या कलमाशीच निगडीत. मुद्दलात बल्ब पेटलेलाच नव्हता तर पेटलेल्या बल्बच्या गुणधर्मांचा प्रश्नच उभा राहत नाही.
अथवा ३) जी वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येत नाही,
बल्ब पेटण्यापूर्वी ती गोष्ट सिध्द करता आली नव्हती. त्यामुळे तिसरे कलमही लागू होते. नंतर प्रयोगाने सिध्द करता आली हे पोस्ट फॅक्टो जस्टिफिकेशन झाले.
अथवा ४) जी खरी असण्याची शक्यता अनुभवाने, कॉमनसेन्सने, किंवा तर्कसंगत युक्तिवादाने दाखविता येत नाही,
अशी कुठली गोष्ट न जाळता पेटून प्रकाश पडायचा अनुभव आलेला नव्हता. कॉमनसेन्स किंवा तर्कसंगत युक्तीवाद या बर्‍याच गुळगुळीत टर्म आहेत. सगळे लोक (विशेषतः अती विज्ञाननिष्ठ लोक) आपल्याला कॉमनसेन्स आहे आणि आपण तर्कसंगत युक्तीवाद करू शकतो असे म्हणतात आणि नेमक्या त्याच गोष्टीचा इतरांमध्ये अभाव आहे असे म्हणतात. तरीही त्यावेळी उपलब्ध असलेल्या कॉमनसेन्स किंवा तर्कसंगत युक्तीवादातून बल्बमधून असा प्रकाश पडू शकेल हे दाखविता येत होते का? त्यामुळे चौथे कलमही लागू होते.
अथवा ५) जिचे सत्यत्व मानवाच्या अधिकृत ज्ञानसंग्रहातील तत्त्वांच्या आधारे सिद्ध करता येत नाही,
That's the point my lord. त्यावेळी उपलब्ध असलेल्या शास्त्रीय ज्ञानाच्या बैठकीतून राईट बंधूंचे विमान किंवा बल्ब सिध्द करता येत नव्हते. त्यामुळे पाचवे कलमही लागू होते. म्हणजे यातून अनुमान असे निघते: एडिसन श्रध्दाळू होता. आणखी काही गोष्टी एकमेकांच्या बाजूला ठेवल्या तर काय आढळेल?मुळात श्रध्दा ही अंधश्रध्दाच असते असे नेहमी म्हटले जाते. इथेही ते म्हटले गेलेच आहे. म्हणजे श्रध्देसंदर्भात ही पाचकलमी यादी दिली आहे ती अंधश्रध्देसंदर्भातही लागू होईलच. जर एडिसन श्रध्दाळू असेल तर त्याच न्यायाने अंधश्रध्दाळूही झाला नाही का? म्हणजे सुरवातीला अंधश्रध्दाळू (किंवा irrational किंवा अन्य काहीही म्हणा) असलेल्या लोकांनी आपल्या कल्पनेतील गोष्ट प्रत्यक्षात आणू शकतो हा ध्यास घेऊन काही प्रयोग केले आणि त्यातूनच नंतर circle of rationality वाढले. आणि हे अती विज्ञाननिष्ठ लोक या सगळ्या गोष्टींकडे सोयीस्करपणे डोळेझाक करून बेमालूमपणे त्याला विज्ञानाचाच भाग बनवले. असो. बाकी चालू द्या.

In reply to by गॅरी ट्रुमन

वीज वापरून प्रकाश निर्माण करता येतो हा काही श्रद्धेचा प्रकार म्हणता येणार नाही. धन आणि ऋण तारांचा स्पर्श झाला असता ठिणगी आणि उष्णता निर्माण होते हि बाब एडिसनच्या काळात देखील माहिती होती. एडिसनला १००० व्या प्रयत्नानंतर बल्ब निर्माण करता आला याचा अर्थ त्याने ठरविलेल्या आयष्यमान आणि इतर निकषांना पूर्ण करणारा बल्ब तितक्या प्रयत्नानंतर निर्माण झाला असा त्याचा अर्थ आहे.

In reply to by सर टोबी

उगाचच बाजी मारण्याचा प्रयत्न दिसतोय
ओक्के. जरा http://www.cracked.com/article_18822_5-famous-scientists-dismissed-as-m… हे पण वाचा. अशा अनेक लिंका आहेत. त्यातील पहिली लिंक ही सापडली म्हणून दिली. अनेक शास्त्रज्ञांना वेड्यात काढले गेले होते पण तरीही आपल्या कल्पनेतील गोष्ट आपण प्रत्यक्षात आणू शकतो यावर ते अडून बसले आणि त्यांनी ते करून दाखवले. जे अशाप्रकारे वेड्यात काढल्या जाण्याला घाबरले असतील त्यांची नावेही आज आपल्याला माहित नाहीत. पण एकेकाळी वेड्यात काढल्या गेलेल्या अशाच irrational लोकांनी circle of rationality वाढविले.

In reply to by गॅरी ट्रुमन

>>>एडिसन यांचे उदाहरण दिल्यावर इथेच काहींच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. एडिसन माझ्या नात्यात वगैरे नाही, असता तरी काही मिरच्या वगैरे झोंबल्या नसत्या त्यामुळे काळजी नसावी. :) वैज्ञानिक इथे आणू नका म्हणालो कारण मग विषय श्रद्धा वि. अंधश्रद्धा वरून भरकटेल आणि उगाच तुमच्या आमच्या सर्वांच्या अर्धवट ज्ञानातून फक्त विज्ञानावर कलगी तुरे होतील (तेच झालेले दिसतेय इथे २-३ दिवसात :) ). तुमचा उरलेला प्रतिसाद सांगतोय की तुम्ही माझ्या प्रतिसादावरून फक्त मिरच्याच घेऊन पुढे गेलात, एडिसन विषयीचा परीच्छेद वाचलाच नाहीत. कारण तुम्ही दिलेली पाचही कारणे त्या परीच्छेदात आधीच कव्हर झालेली आहेत. तरीही: >>>त्यावेळी उपलब्ध असलेल्या शास्त्रीय ज्ञानाच्या बैठकीतून राईट बंधूंचे विमान किंवा बल्ब सिध्द करता येत नव्हते. हेच तर मी पण म्हणतोय, त्यांनी जे हायपोथेसिस मांडले ते सिद्ध करण्यासाठीच त्यांनी इतका आटापिटा केला हो. मी म्हणतोय ते बरोबरच आहे असा त्यांचा हट्ट असता तर सिद्धतेसाठी पुरेसे पुरावे आणि प्रयोग करण्यात हयात कशाला घालवत बसले असते.

In reply to by यनावाला

यना कृत तथा कथित व्याख्या मुलतः टिका आणि टिका ज्यात निष्कर्ष आधीच ठरवले आणि टिकेचे मुद्दे तेवढे शोधले सकारात्मक मुद्द्यांवर पाणी सोडले त्या मांडणीस ना परीपूर्णतेचा प्रयास होत ना समतोल येत ना व्याख्येच्या दर्जास प्राप्त होत. एकांगी पुर्वग्रहीत टिकेस व्याख्येचा दर्जा मिळू शकत नाही

एकाची श्रद्धा ही दुसर्‍याची अंधश्रद्धा असू शकते. त्यामुळे या दोन गोष्टींची व्याख्या व्यक्तीसापेक्ष आहे. नामस्मरणाने आपली आध्यात्मिक उन्नती होईल या श्रद्धेने नामस्मरण करणारा सश्रद्ध माणूस दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्ध असू शकतो. या जगात श्रद्धाळू नसलेली एकही व्यक्ती झाली नाही आणि होणार नाही. प्रत्येकाची श्रद्धास्थाने वेगळी असू शकतात. काहींची श्रद्धास्थाने परमेश्वर स्वरूपात असतात तर काही जण 'मटा'सारख्या व्यावसायिक वृत्तपत्रावर श्रद्धा ठेवतात ('मटा'त बातमी छापून आली म्हणजे ती खरी असलीच पाहिजे ही श्रद्धा बाळगून काही जण जगतात). जगातील प्रत्येक व्यक्ती कशावर तरी श्रद्धा ठेवूनच जगत असते. किंबहुना जगातील सर्व व्यक्ती १०० टक्के प्रसंगात श्रद्धाळूच असतात. मग ते लागू असतील किंवा दाभोळकर असतील किंवा अजून कोणी. अनेक गोष्टींची सत्यता पडताळून न पाहता त्या सत्य आहेत या गॄहितकावर ते जगतात. आपण ज्यांना मातापिता समजतो तेच आपले जैविक जन्मदाते आहेत ही सुद्धा श्रद्धाच आहे. आपण ज्यांना आपली मुले समजतो त्यांचे जैविक मातापिता आपणच आहोत या समजुतीवर मुलांचे पालनपोषण करणे हीसुद्धा श्रद्धाच आहे. मात्र यातील काही व्यक्ती गोंधळलेल्या असत्यात. जगाला विज्ञानमार्गाने जगण्याचा उपदेश करताना आपण स्वतः जीवनातील सर्व प्रसंगात विद्यानमार्गाचा वापर करून जगत नाही, किंबहुना इतर सर्व जण जितके श्रद्धाळू/अवैज्ञानिक मार्गाने जगतात तितक्याच श्रद्धापूर्वक/अवैज्ञानिक मार्गाने आपणही जगतो हे त्यांना समजतच नाही. त्यातूनच "देवाला रिटायर करा", "विज्ञानाची कास धरा", "श्रद्धेचा त्याग करा", "श्रद्धा ठेवणे अज्ञानाचे लक्षण आहे", "श्रद्धा ठेवणारे बिनडोक आहेत" असे न मागता दिलेले अहंकारी सल्ले द्यायला सुरूवात होतो. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण" अशी या तथाकथित विज्ञानवाद्यांची केविलवाणी अवस्था असते. लोकांना ज्या गोष्टी करू नका असे आपण सांगतो आणि त्याद्वारे लोकांची निर्भत्सना करतो, त्या सर्व गोष्टी आपण त्याच तीव्रतेने करतो हे त्यांना समजतच नाही. जगात ४ प्रकारची माणसे असतात. १) आपण ज्ञानी आहोत याचे यांना ज्ञान असते. २) आपण अज्ञानी आहोत याचे यांना ज्ञान असते. ३) आपण ज्ञानी आहोत याचे यांना अज्ञान असते. ४) आपण अज्ञानी आहोते याचे यांना अज्ञान असते. श्रद्धावंतावर अहंकारी कोरडे ओढून त्यांची निर्भत्सना करणारे क्रमांक (४) प्रकारचे असतात.

In reply to by श्रीगुरुजी

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. दाभोळकरांचा खून झाल्यानंतर अशाच एका अती विज्ञाननिष्ठ व्यक्तीशी बोलता बोलता 'अंधश्रध्दा निर्मूलन' म्हणजे नक्की कशाचे निर्मूलन अपेक्षित आहे हा प्रश्न विचारला होता. कारण एकाची श्रध्दा ही दुसर्‍याची अंधश्रध्दा असू शकते. त्यावर उत्तर मिळाले होते: "दाभोळकरांनी या क्षेत्रात कित्येक वर्षे काम केले होते त्यामुळे अंधश्रध्दा निर्मूलन म्हणजे नक्की कशाचे निर्मूलन अपेक्षित आहे याची व्याख्या त्यांनी केली नसेल हे संभवनीय नाही". असेच लोक इतरांना अंधश्रध्द, बिनडोक इत्यादी ठरविण्यात सगळ्यात पुढे असतात. पण आपणही 'दाभोळकर चुकीचे कसे असतील' ही एका प्रकारे श्रध्दाच कुठलीही शहानिशा न करता ठेवत आहोत हे त्यांच्या गावीही नसते. असलेच लोक मोठे विज्ञाननिष्ठ म्हणून वावरतात आणि शास्त्रीय दृष्टीकोनावर लेक्चर झोडत फिरतात. अशाच लोकांना उद्देशून 'आमचा तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रध्दा' असे म्हटले आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य? या ठिकाणी अंनिस व दाभोळकर ही चर्चा मायबोलीवर झालेली आहे. तो धागा मी मिपावर टाकला नव्हता.

समजा एक धर्मग्रंथ असे म्हणतो उदा. बायबल की पृथ्वी स्थिर आहे व तिच्या सभोवताली इतर ग्रह फिरतात. पृथ्वी फिरतच नाही. आता हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारची विधाने आहेत. अशा प्रकारच्या श्रद्धा आहेत. तर जसे वैज्ञानिक हायपोथिसीस हे टेस्ट करता येते प्रयोग करता येतो ( ते मुळात प्रयोग करण्यासाठीच असते) त्याला जसा सिध्द्दता करण्याचा प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य असते तसेच ते पुर्णपणे प्रयोगांती चुकीचे सिद्ध झाल्यास नाकारण्याचे ही स्वातंत्र्य असते. जर प्रयोगांती सिद्ध झाले तर त्याचे शास्त्रीय निष्कर्ष व्यवस्थितरीत्या मांडले जातात. या नंतर हे निष्कर्ष पुन्हा सर्वांना क्रिटीकली एक्झामिन करण्यासाठी ओपन असतात. जर त्यात पुन्हा कोणी नवा अ‍ॅन्गल दाखवला वा त्याला चुकीचे सिद्ध केले तर त्याचेही स्वागतच असते. वरील सर्व वैज्ञानिक रीतीने तपासण्याची नाकारण्याची जी मुभा आहे सतत सत्याचा शोध घेत जाण्याची व संकल्पना थेअरी उत्क्रांत करत जाण्याची ती धार्मिक म्हटल्या जात असलेल्या ग्रंथांतील विधाना /अनुमानां / सत्य जे ते म्हणतात त्या सदर्भात असते का ?

In reply to by मारवा

वरील सर्व वैज्ञानिक रीतीने तपासण्याची नाकारण्याची जी मुभा आहे सतत सत्याचा शोध घेत जाण्याची व संकल्पना थेअरी उत्क्रांत करत जाण्याची ती धार्मिक म्हटल्या जात असलेल्या ग्रंथांतील विधाना /अनुमानां / सत्य जे ते म्हणतात त्या सदर्भात असते का ?
असते ना. ---------------- वेदांचा फाफटपसारा (ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे, इ इ) कशामुळे झाला? द्वैतवाद, अद्वैतवाद, इ इ परस्परविरोधी थेर्‍या कशामुळे झाल्या? =====================================================
उदा. बायबल की पृथ्वी स्थिर आहे व तिच्या सभोवताली इतर ग्रह फिरतात. पृथ्वी फिरतच नाही. आता हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारची विधाने आहेत.
बायबल मधे जे काय लिहिलं आहे ते खरंही असू शकतं. नक्की काय कशाभोवती फिरतं याचा अंतिम निर्वाळा विज्ञानानं अजून दिलेला नाही. जिजस जिवंत असता तर त्यानं क्रिटिकली एक्झामिन करायला मना केलं असतं कशावरून? आज काही लोक फ्लॅट अर्थ या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. त्यांचे क्लेम वैज्ञानिक कम्यूनिटीत कोणि क्रिटीकली एक्झामिन करत नाही.

In reply to by मारवा

त्याला जसा सिध्द्दता करण्याचा प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य असते तसेच ते पुर्णपणे प्रयोगांती चुकीचे सिद्ध झाल्यास नाकारण्याचे ही स्वातंत्र्य असते.
हे सगळे वैज्ञानिक अपप्रचार आहेत आणि असं काहीही नाही. मागच्या वर्षी गुरुत्वलाट शोधली म्हणून जाहीर केलं गेलं. हा तद्दन खोटारडेपणा होता. दोन आरश्यांतील विस्थापनांतील फरक अन्य कोणत्या गोष्टीने स्पष्ट करता येतच नाही तेव्हा ती गुरुत्विय लाटच असावी असं काहितरी भंकस म्हटलं गेलं. हा विस्थापनातला फरक १०^-२१ मी इतका कमी होता. इतका सुक्ष्म फरक करोडो कारणांनी होउ शकतो पण तो फक्त गुरुत्वीय लाटेनं झालाय असं मानलं गेलं. --------- आता जर कोणी या गुरुत्वीय लाटा नाकारण्याच्या (जे योग्य आहे कारण थेट त्यांना मोजण्याचं यंत्र मानवाकडे नाही) स्वातंत्र्यासोबत मूर्ख ठरवलं जाण्याचं स्वातंत्र्य आजही मुफ्त मिळतं. https://www.youtube.com/watch?v=iphcyNWFD10&t=6s

In reply to by मारवा

वरील सर्व वैज्ञानिक रीतीने तपासण्याची नाकारण्याची जी मुभा आहे सतत सत्याचा शोध घेत जाण्याची व संकल्पना थेअरी उत्क्रांत करत जाण्याची ती धार्मिक म्हटल्या जात असलेल्या ग्रंथांतील विधाना /अनुमानां / सत्य जे ते म्हणतात त्या सदर्भात असते का ? धार्मिक ग्रंथ आध्यात्मिक उन्नतीसाठी असतात आणि असायला हवे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो याबाबत भाष्य करण्याची धार्मिक ग्रथांना गरजच नाही कारण यापैकी नक्की काय होते हे समजल्याने किंवा त्याचे अज्ञान असल्याने आध्यात्मिक प्रगतीवर परीणाम होत नाही. भारतातील धार्मिक ग्रंथ कुराणप्रमाणे चिकित्सातील नाहीत. त्यातील सिद्धांतावर चर्चा करता येते, त्यावर आक्षेप घेता येतात, त्याची चिकित्सा करता येते व ते नाकारताही येतात. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन खात्री करा असेच धर्मग्रंथात सांगितले आहे. कोणतीही एखादी विशिष्ट उपासनापद्धती स्वीकारण्याची सक्ती या धर्मग्रंथातून नाही. स्वतः आपल्याला आवडेल त्या मार्गाने जाऊन, अनुभव घेऊन स्वउन्नती करा असे भारतीय धर्मग्रंथ सांगतात.

अशा प्रकारे शोध घेतात का ? परीक्षण करतात का ? त्याचे क्रिटीकल एक्झामिनेशन करण्याचे धाडस करतात का ? मुळात धार्मिक सत्ये जी मांडली जातात ती कोणत्या मार्गाने जाऊन सिध्द केलेली असतात ? म्हणजे एक श्रद्धावान ख्रिश्चन जर असे १०० % मानत असेल की पृथ्वी स्थिर आहे कारण असे त्याच्या धर्मग्रंथाने मांडलेले सत्य आहे. या सत्याला आव्हान करण्याचा प्रश्नच नाही या सत्याला प्रयोग करुन पडताळुन पाहण्याची गरजच नाही नव्हे असे करणे म्हणजेच मुळात मोठे पाप आहे अशी शंका मनात घेणे हेच आपले अ‍ॅज अ ख्रिश्चन मोठे अध:पतन आहे. जे इतर कोणी या सत्याला पडताळुन पाहत आहेत, प्रयोग करत आहेत , व याच्या उलट सत्य सिद्ध करत आहेत ते घोर पापी आहेत व असत्याचा प्रचार करत आहेत. त्यांचा नायनाट करणे आवश्यक आहे. तर हे चुक ठरत नाही काय ? बरे हे प्रत्यक्षात घडलेले आहेच. अनेक शेकडो वर्षे अजुनही बहुधा असतील काही अनेक श्रद्धावंत याला सत्य मानतच आलेले आहेत

In reply to by मारवा

म्हणजे एक श्रद्धावान ख्रिश्चन जर असे १०० % मानत असेल की पृथ्वी स्थिर आहे कारण असे त्याच्या धर्मग्रंथाने मांडलेले सत्य आहे. या सत्याला आव्हान करण्याचा प्रश्नच नाही
?????????????? १. पृथ्वी स्थिर आहे का नाही इ इ शोध लावणारे सारे पाश्चात्य शास्त्रज्ञ अत्यंत धार्मिक होते. २. यांच्यापैकी जवळजवळ सर्वच थेट चर्चचे मेंबर होते. ३. यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास चर्चनेच स्पाँसर केला होता. ====================================== कृपया व्यवहार्य जगात या!!!