Skip to main content

माझे बँकानुभव

लेखक आशु जोग
Published on मंगळवार, 11/04/2017
माझी बँक माझे अनुभव

आज बँक ही गोष्ट खरं तर या देशात सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी बनलेली आहे. अगदी करोडपती पासून रोडपतीपर्यंत प्रत्येकाचे बँकेत खाते असतेच. बँकेतले व्यवहार टाळण्याकडे कल असणारा आणि रोखीचा आग्रह धरणाराही पूर्णपणे बँक व्यवस्थेपासून अलिप्त राहू शकत नाही. उलट आमचे कोणत्याही बँकेत खाते नाही असे म्हणणार्‍या मनुष्याचा सत्कार करावा इतकी ती विशेष बाब आहे. असो. तर ही झाली प्रस्तावना. मुख्य विषय तो नाही. प्रत्येक जण एक सामान्य ग्राहक म्हणून बॅकेचे निरनिराळे अनुभव घेत असतो. बँक १ - आमच्या एका राष्ट्रीयीकृत असलेल्या बँकेने ग्राहकांना एसएमएस सुविधा दिली. खात्यात काही व्यवहार झाला की त्याचा एसएमएस आपल्या मोबाईलवर येतो. त्या पुढचे पाऊल म्हणजे आपल्या नंबरवरून बँकेने दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल दिला की आपल्या खात्याची शिल्लक व मिनी स्टेटमेंट एसएमएस च्या स्वरुपात पाहता येते. उत्तम सुविधा. कुठलेही नेट कनेक्शन नको. अगदी साध्या सुध्या मोबाईलवरही आपल्या खात्याची माहिती आपल्याला कळते. पण या बँकेत आमची दोन खाती होती. एका नंबरला एकच खाते जोडले जात होते. दुसर्‍या खात्यासाठी काय करावे लागेल. असे विचारले असता बँकेने भन्नाट उत्तर दिले. दुसर्‍या खात्यासाठी दुसरा मोबाईल नंबर रजिस्टर करा. म्हणजे नालेसाठी घोडा. दोन्ही खात्यांची माहीती एकाच नंबरवर मिळवण्यासाठी काय करावे लागेल याबाबत बँक कर्मचारी अनभिज्ञ होते. एके दिवशी या बँकेत गेलो तर बँक २/३ कापली जात होती. धक्का बसला. म्हणून विचारले की तुमच्या बँकेची एवढी मोठी जागा. कर्मचार्‍यांना आत बसायला आणि ग्राहकांना रांगा लावायला सुद्धा काही अडचण येत नाही. लॉकरपासून सगळ्या सुविधा उत्तम रितीने तुम्ही दिलेल्या आहेत. मोठी जागा हे तुमचे वैभव आहे. मग ही दुर्बुद्धी का सुचली. तर म्हणाले, वरून निर्णय झालाय. आम्ही आता एटीएम ची सुविधा देणार आहोत त्यामुळे पैसे काढणार्‍यांची गर्दी बँकेत नसेल. नेटबँकींगही देणार आहोत त्यामुळे ग्राहकाला बँकेमधे यायची फारशी गरजच उरणार नाही. आम्ही स्मार्ट बँकींगकडे जात आहोत. त्यामुळे छोट्या जागेतही आमचे भागेल. उरलेली जागा विकून आम्ही पैसे कमावणार. पूर्वीची एवढी मोठी जागा जाऊन हे कर्मचारी आता १/३ जागेत बसतात. ग्राहकाला आत शिरताना अंग चोरून जावे लागते. ग्राहकांची गर्दी अजिबात कमी झाली नाही. अतिशय कोंदट आणि दाटीवाटीच्या जागेत गेल्याने कर्मचार्‍यांची मनःशांती हरवली. पूर्वी हसतमुखाने स्वागत करणारे कर्मचारी आता ग्राहकांशी वाद घालतात. हातात असलेली जागा कापून दुसर्‍याला विकण्याचा निर्णय ज्याने घेतला त्या अधिकार्‍याने या व्यवहारात नेमके काय कमावले याचे संशोधन झाले पाहीजे. बरं एटीएम येणार म्हणून या बँकेने सगळ्यांना आग्रह करून एटीएम कार्डस घ्यायला लावली. “तुम्ही नुसतं घ्यायचंय, वापरले नाही तरी चालेल. लाइफटाइम फ्री आहे” अशी मधाळ भाषा वापरण्यात आली. कुठलेही डेबिट कार्ड तयार करायला, एटीएम मशीन निर्माण करायला, ते मेंटेन करायला, पेमेंट गेटवेला काही खर्च येतो. यातली एकही गोष्ट बँकेची स्वतःची नाही. बँक कुठल्या आधारावर फुकटचा वायदा करत होती कुणास ठाऊक. आत्तापर्यंत एटीएम कार्डचा आग्रह धरणारी बँक आता सक्ती करू लागली. ज्यांनी कार्ड घेतले नाही त्यांना पासबुक छापून देणेही बंद केले. नाक दाबले की तोंड उघडते असा विचार असावा. वास्तविक बँकेमधे ग्राहक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी येतो. चेक, विथड्रॉल स्लीप, नेट बँकींग, कार्ड हे खात्यातून पैसे बाहेर काढण्याचे मार्ग आहेत. हे मार्ग जेवढे कमी तेवढे खाते सुरक्षित. त्यामुळे कार्ड हा काही जणांसाठी प्लस पॉइंट तर काही जणांसाठी तो मायनस पॉइंट होता. ज्या खात्याला कार्ड जोडलेले नाही तिथेच जास्तीत जास्त पैसे ठेवण्याकडेही लोकांचा कल असतो. त्यात सुरक्षितता असते. ज्या खात्याला कार्ड जोडलेले आहे तिथे अगदी कमी रक्कम ठेवावी असाही विचार असतो. आणि वस्तुस्थितीही तशीच होती. अशा कुठल्याही सुविधा नसतानासुद्धा या बँकेत अनेक कंपन्यांनी, फर्मनी, व्यापार्‍यांनी आपले खाते उघडलेले होते. ग्राहकांची कमतरता नव्हतीच. कार्ड, नेट बँकींग ही कुणाचीच मागणी नव्हती. पण तरीही आपल्या एटीएमला ग्राहक मिळावा म्हणून बँकेने कार्ड घेण्याचा आग्रह सुरुच ठेवला. म्हणून शेवटी त्याच्या कॉलसेंटरला फोन लावला. त्यांनी सांगितले. ग्राहकाने कार्ड घ्यावे ही अपेक्षा आहे पण तशी सक्ती नाही. यावर बँक कर्मचार्‍यांचे उत्तरही लक्षात ठेवण्यासारखे होते. आम्हाला एटीएम कार्डसाठी टारगेट देतात आणि ग्राहकाला मात्र अशी उत्तरे देतात. पुढे नोटाबंदीच्या काळात तर एटीएम ही नुसतीच शोभेची वस्तू बनली. ग्राहकांची गर्दी वाढतच राहीली. बॅक कापण्याचे कोणत्याही प्रकारे फायदे दिसेनात.. बँक २ - महान बँकेची तर गोष्टच वेगळी. तिथे प्रत्येक खिडकीवर भली मोठी रांग. खिडकीपाशी पोचल्यावर सांगतात. तुम्हाला पाहीजे असलेली खिडकी ही नाही. खूपदा ग्राहकावर वस्सकन ओरडण्याचा अनुभव येतो. ग्राहक खर्‍या अर्थाने येथे कष्ट मर होतो. या बँकेत खरंच कुणी सौजन्याने बोलत असेल तर तो बंदूकधारी सिक्यूरिटी. तो सांगतो, कुठल्या रांगेत उभे रहायचे आणि कोणता फॉर्म भरायचा ते. महान बँकेत स्वतः कर्मचारी कितीही गोंधळ घालोत. त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत. पैसे भरले तरी त्याची नोंद पासबुकात होत नाही. एखाद्यावेळी गेलेल्या माणसाचे, तो मनुष्य गेल्यावर काही वर्षांनी नवीन खाते उघडले जाते आणि बँक नवे पासबुक आपल्या हातात ठेवते. तो धक्काही पचवावा लागतो. पण अशा महान कृत्यांमुळेच ही बँक महान बँक असे आपले नाव सार्थ करते. शेवटी नेहमीचा गोंधळ नको आणि पैशाची असुरक्षितता नको म्हणून तक्रार करायला जावे तर हे लोक प्रचंड टोलवाटोलवी करतात. चुकीची जबाबदारी कुणीच घेत नाही. वेळप्रसंगी कस्टमरसमोर एकमेकांशी कचाकचा भांडतात. "साहेब यापुढे मला काम सांगत जाऊ नका, मी घरी निघून जाईन" असेही साहेबाला सुनावतात. बँकेतल्या कर्मचार्‍याला काम सांगणे हा यांच्या लेखी गुन्हा असावा. यामुळे महान बँकेचे दोन खातेदार जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा तूझी ब्रांच जास्त नाठाळ की माझी अशी चर्चा त्यांच्यामधे रंगते आणि आपलीच ब्रांच अधिक नाठाळ आहे यावर दोघेही ठाम असतात. कोर्टाची पायरी चढू नये तसे आता महान बँकेची पायरी चढू नये असे म्हटले जाते. एखाद्या बँकेच्या एखाद्या ब्रांचची वर्षानुवर्षे एकच तक्रार असते. प्रिंटर नादुरुस्त, पासबुक प्रिंटींग बंद. प्रिंटर नादुरुस्त असला तरी स्टेटमेंट प्रिंट करून मिळेल असे हे लोक सांगतात. कधी मधी चुकून पासबुक प्रिंट झालेच तर एका पानावर एकच ओळ प्रिंट होते. असे करत करत अनेक पाने वाया घालवली जातात. कधी कधी प्रिंटरच्या शाईने पासबुकाचे पूर्ण पान काळे करून मिळते. काहीच दिसत नाही. जरा बरे प्रिंट होते तेव्हा फाँट इतका मोठा असतो की शंभर रुपयेही लाखाएवढे भासावेत. बँक ३ - स्वतःचा तोरा न मिरवणार्‍या काही सहकारी बँका मात्र उत्तम सर्विस देतात. पासबुक काळे न करता आणि पाने वाया न घालवता प्रिंट करून देतात. बँक ४ - काही बँका फारच तोर्‍यात असतात. कस्टमर सर्वात दुर्लक्षिण्याजोगी गोष्ट. आपण त्यांच्याकडे फिक्सड डिपॉझिट ठेवण्याकरता गेलो की ते सांगतात. आमच्याकडे खाते असेल तरच आम्ही FD स्वीकारू. अर्थात रीझर्व बँकेने हा नियम केलेला नाही. पण ब्रांच स्वतःच्या अधिकारात असे निर्णय घेते. बॅकवाले सांगतात. तुमच्या FDचे व्याज जमा करण्यासाठी इथे खाते लागेल. FD जर क्यूम्यूलेटिव्ह असेल तर अधून मधून तिचे व्याज भरण्याचा प्रश्नच येत नाही. मुदत संपल्यावर सव्याज मिळणारी रक्कम पेमेंट ऑर्डर(चेक)ने ग्राहकाला देता येते त्यामुळे FD साठी बचत खाते काढणे म्हणजे नालेसाठी घोडा. दुसरी गोष्ट क्यूम्यूलेटिव्ह FD कडे मधे मधे पहावे लागत नाही पण बचत खात्यात मात्र दर सहा महिन्यांनी व्यवहार करावे लागतात. पण लक्षात कोण घेतो. बँक ५ - काही बँका मात्र अशा प्रकारे बचत खाते नसतानाही FD स्वीकारतात. FD पूर्वी KYC घेतात. पण आज FD केल्यावर अगदी दुसर्‍या दिवशीही एखाद्या व्यवहारासाठी बँकेत गेलो तर पुन्हा नव्याने KYC ची मागणी करतात. माणूस एकच तर त्याचे दोन दोन KYC घेण्याने काय साध्य होते हे अनाकलनीय आहे. कुणीही माणूस जेव्हा प्रथमच बँकेत प्रवेशतो. तेव्हा त्याला बँकेने KYC कागदपत्रे मागावीत. त्याला आपला ग्राहक बनवावे. एक कस्टमर आयडी द्यावा. त्यानंतर हवा तो व्यवहार तो बँकेत करेल. बचत खाते, चालू खाते उघडेल. ठेव ठेवेल नाही तर लोन काढेल. कस्टमर आयडी एकच राहील. त्यामुळे KYC पण एकच राहील. हे बँकेच्या सॉफ्टवेयरला समजते आणि त्यांच्या डेटाबेसलाही मान्य असते पण बँकेतल्या ५०+ वयाच्या कर्मचार्‍यांना मात्र हे समजत नाही. बँक ६ - आणखी एक बँक आहे. अतिशय स्मार्ट बँक. जिने इतरांच्या खूप आधी एटीएम कार्ड आणि नेट बँकींग सुविधा द्यायला सुरुवात केली. एकूणच तिथले वातावरण एकदम कॉर्पोरेट. काही तक्रार करायला ब्रांचमधे जावे तर मशीनवर एक टोकन वगैरे दिले जाते. मग आपला नंबर आला की त्या त्या काऊंटरवर जायचे. बर्‍याचदा ब्रांचमधे जावेच लागत नाही. कारण सगळी कामे नेटवरून होवू शकतात. पण एक गोष्ट खटकते. ही बँक पासबुक देत नाही. तिचा पेपरलेसचा आग्रह. ती दर तीन महीन्यांनी स्टेटमेंट पाठवते. म्हणजे पेपर आलाच आणि ते पाठवण्यासाठी पोस्टेजचा खर्चही आला. त्यांना पासबुकची विचारणा केली असता ते म्हणतात. तर मग आम्ही तुम्हाला स्टेटमेंट देणे बंद करू आणि पासबुक म्हणून सगळी स्टेटमेंट एकत्र स्टेपल करून देऊ. वास्तविक स्टेटमेंटचे चिठोरे सांभाळण्यापेक्षा पासबुक सांभाळणे कितीतरी सोपे. एरवी स्मार्टपणा दाखवणारी ही चकाचक बँक पासबुकबाबतीत स्मार्टपणा का दाखवत नाही अनाकलनीय आहे. पूर्वीच्या काळी डेबिट कार्ड ही एक सुविधा होती आजही असते पण त्यात एक अडचण होती. एटीएम मधून पैसे काढताना पिन विचारला जात असे पण इतर खरेदी करताना कार्ड स्वाईप केल्यावर पिन विचारलाच जात नसे. केवळ यूजर फ्रेंडलीनेस नव्हे तर आपल्या पैशाची सुरक्षितता ही सुद्धा महत्त्वाची आहे हे बँका का लक्षात घेत नसत. त्यामुळे त्याकाळी आपले कार्ड चोरीला गेले तर आपल्या अनुपस्थितीतही व्यवहार करता येणे शक्य असे. एक घटना. वाकडला सॉफ्टवेयर कंपनीमधला एक कर्मचारी मुंबईला जाण्यासाठी उभा होता. एका प्रायवेट गाडीने त्याला लिफ्ट दिली. वाटेत त्याच्याकडून कार्ड हिसकावून घेण्यात आले. त्याचा खून करण्यात आला. नंतर त्याच्या कार्डवरून पावणे तीन लाखाचे व्यवहार करण्यात आले. पिन नंबर आवश्यक असता तर पिनसाठी तरी त्याला जिवंत ठेवले असते. यावर बँकांचे उत्तर ठरलेले असते. असे काही व्यवहार तुमच्या कार्डवरून झाले तर तुम्ही एका तासाच्या आत आम्हाला कळवा. आम्ही त्याची काळजी घेऊ. पण पैसे परत मिळाले तरी जीवाला मुकलेला खातेदार परत कसा येइल आणि मरण पावलेला खातेदार तक्रारीसाठी फोन कसा करेल. म्हणून असे व्यवहार खातेदाराच्या जिवंतपणीच होवू नयेत यासाठी दक्षता घेतली जावी. अर्थात हे आमचे म्हणणे त्या काळात आम्ही अनेक बँकांकडे मांडले. आज हे व्यवहार पिन प्रोटेक्टेड झाले आहेत असे दिसते. यापुढे पोस्ट ऑफीसकडेही बँकींगचे व्यवहार देणार आहेत. त्यावेळी तर काय काय अनुभव घ्यावे लागतील हे सांगणे कल्पनेच्या पलिकडचे आहे. अर्थात हे सगळे असले तरी काही गोष्टी विसरून चालणार नाहीत. कामाच्या दिवशी बँकेच्या वेळेत बँकेमधे जाणे शक्य नसते. अशा वेळी तिथला कर्मचारी सांगतो. बँक ४ ला बंद होते पण आम्ही अर्धे शटर ओढून ७ वाजेपर्यंत आतमधे काम करत असतो. तुम्ही ७ वाजता या. तुमचे काम होवून जाईल. किंवा आर्थिक वर्षाचा शेवट आलेला असताना एखादी बँक आवर्जून फोन करते आणि सांगते की तुम्ही पीपीएफ मधे भरलेला चेक क्लीयर व्हायला ३ दिवस लागतील कारण मधे सुट्टी आली आहे. चेकऐवजी येऊन कॅश भरलीत तर या आर्थिक वर्षात त्याची नोंद होइल आणि तुम्हालाच त्याचा फायदा होइल. त्यावेळी हे लोक कुणी परके नसून आपला जिव्हाळ्याने विचार करणारे आपले नातेवाईक आहेत अशी भावना मनात आल्याशिवाय रहात नाही. तर असे हे माझे बँकानुभव. आपलेही काही अनुभव असतील तर अवश्य शेयर करा. - ashutoshjog@yahoo.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 26262
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by आशु जोग

अजिबात नाही. आम्ही आतापर्यंतच्या आमच्या बँकांच्या सेवेवर संतुष्ट आहोत. ज्या काही छोट्यामोठ्या समस्या आल्या त्या बँकेच्या स्थानिक किंवा मध्यवर्ती प्रशासनाशी बोलून सोडवल्या आहेत. सगळ्या मोठ्या बँकांच्या संस्थळांवर हल्ली ऑनलाईन "कस्टमर केअर सेवा" आहे. तेथे तक्रार केल्यास... (अ) ताबडतोप पोच (ऑटो रिसिट) मिळते, (आ) ४८ तासात समस्या निर्वाण होते किंवा (इ) तसे न झाल्यास स्वतःहून बँकेकडून दिलिगिरीचा संदेश येऊन अधिक मुदत मागितली जाते; (ई) कस्टमर केअरच्या वरिष्ठ अधिकार्‍यातर्फे स्थानिक (शाखेच्या) प्रशासनावर जोर आणून, आपल्याला परत आठवण न करावी लागता समस्या सोडवली जाते... असा स्वानुभव आहे. मुळात... १. नीट चौकशी करून चांगली बँक निवडा २. त्या बँकेत असलेल्या अनेक प्रकारातील तुम्हाला योग्य प्रकारचे खाते उघडा ३. समस्या स्थानिक स्तरावर योग्य वेळेत न सुटल्यास "ऑनलाईन कस्टमर केअर" ही सेवा वापरा ४. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करा. 'मानवी सेवा' किंवा 'छापील कागद' यांचा जितका कमी आग्रह ठेवाल, तितके जास्त सुखी व्हाल ! शुभेच्छांसह !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतत रांगेने अश्या अनेक दिव्य बँकांची निवड करण्याच्या तुमच्या कसबाचे कौतूक वाटत आहे :)
चुकून कसबच्या ऐवजी कसाब वाचले की हो :(

तुमचे अनुभव हे सर्व जुन्या पद्धतींतून नवीन डिजिटल जाण्याय्रा बँकिंगचे आहेत. त्यामुळे बँकेचा व्यवहार,त्यांचे कर्मचारी आणि ग्राहक या तिघांनाही अद्ययावत होण्यातले त्रास होते. आता नवग्राहकच म्हणतात पैसे/चार्ज घेतला तरी चालेल परंतू परस्पर व्यवहार करता येतील अशी बँक हवी. त्यामधील एक मोठा ग्राहक गट हा सतत देशात/जगात फिरणारा /राहणारा आहे. त्याला भरपूर सोयी हव्या आहेत. जुने पासबुकवाले आणि त्यातूनही ज्येष्ट नागरिक ग्राहक तीस टक्के आहेत त्यांना हा बदल पचवायला जड जाते.

शेवटची नोंद -पिपिएफचे डिपॅाझिट- कॅशमध्ये केले तर टॅक्स रिबेटला क्लेम करता येत नाही. आता चेकही बंद केलेत. NFTS करावे लागते.

In reply to by कंजूस

नाही कंजुस काका तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे , खर तर हल्ली PPF साठी बँकेत जायची गरजही नाही ऑनलाइन पैसे टाकता येतात , नंतर कधीतरी एण्ट्री करून घ्यायची पासबुकवर

In reply to by माझीही शॅम्पेन

ट्याक्स रिबेट देणाय्रा सर्व गुंतवणुकीला चेकने भरणा नियम आहे पण तो आता आइटीवाले गांभिय्राने घेत नाहित हे मान्य. मेडिक्लेम प्रिमिअमही चेकनेच असतो. कॅश नाही. ओनलाइन,एनेफटी ओके.

In reply to by कंजूस

हे चुकीचे आहे. मी गेली ११ वर्षे कॅश ने पेमेंट भरतोय पण हे कुठेही पाहण्यात आले नाही. आणि कुठल्या कायद्यात सुद्धा वाचले नाही. जर असे असेल तर कृपया तो सेकशन सांगण्यात यावा.

In reply to by हेमंत८२

मीही कॅशच भरलेत गेले ३ वर्ष ppf मधे सरकारी कर्मचारी असून. असा कायदा नव्हता हो. Ppf मधे पैसे भरल्याशी कारण. आम्हाला ती पासबुक entry ची किंवा ppf ची बॅॆक स्लीप ची copy हापिसात दिल काम भागतय

In reply to by कंजूस

आता रूल्स बदललेले दिसताहेत
तुम्ही कोणताही मुद्दा प्लीज अभ्यास करून मांडा. उगाच चुकी माहिती पसरवू नका.

In reply to by हेमंत८२

हेमंतराव.. मी टॅक्स या विषयातील जाणकार नाही परंतु (१) आपण ज्या गुंतवणुकीवर करसवलत घेतो ती गुंतवणुक आपल्या करपात्र उत्पन्नातुन केली असली पाहिजे असा आयकर खात्याचा आग्रह दिसतो. (२) त्यातही PPF वा विम्याच्या हप्ता भरल्यानंतर स्वतः धारक वा धारकाचा जीवनसाथी (Spouse) वा अपत्य असे एकापेक्षा जास्त लाभार्थी असु शकतात. याकरिता अशा सवलतींचा गैरवापर होवु नये म्हणुन आयकर अधिकारी असा भरलेला हप्ता नक्की कोणी भरला आहे याची विचारणा करतो आणि अशा वेळी तो कोणी भरला ??हे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर येते जे कॅश व्यवहारात कठीण होते. म्हणुन अशी करसवलतीशी संबंधित गुंतवणुक रोखीने करणे scrutiny सारख्या प्रकरणांत अडचणीचे ठरते

In reply to by प्रसाद भागवत

साहेब राव बोलू नका. १) पूर्णपणे सहमत... आणि ते कायद्याला धरून आहे. २) ते कसे दाखवावे आणि कसे सिद्ध करायचे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या scrutiny वेळा सिद्ध कसे करायचे हे जाणकाराला न सांगणे योग्येच..

नव्या डिजिटल बँकेचे अनुभव एच डी एफ सी बँकेत माझे पगाराचे खाते १९९७ पासून आहे. म्हणजे ९० % कर्मचारी वर्गाच्या पेक्षा जास्त काळ मी या बँकेत व्यवहार करीत आहे. २००९ साली मी जेंव्हा माझा व्यवसाय चालू केला तेंव्हा मी बँक्टे जाऊन विचारले कि माझा पगार आता बंद होणार आहे तेंव्हा खात्यात काही बदल करावा लागेल का? यावर तेथील व्यवस्थापकाने सांगितले कि जोवर तुमच्या खात्यात कमीत कमी रक्कम आहे तो वर काही गरज नाही. या खात्याशी संलग्न अशी चार लाखाची मुदत ठेव मी ठेवलेली आहे. कोणत्याही तातडीच्या क्षणी पैसे मिळाले पाहिजेत यासाठी. एक महिन्यापूर्वी मी तेथे पैसे भरण्यासाठी गेलो असताना तेथील कर्मचाऱ्याने मला उद्दाम पणे सांगितले कि तुमच्या खात्यात व्यवहार खूप जास्त आहेत तर त्यासाठी तुम्हाला चालू खाते ( करंट अकाउंट) उघडणे आवश्यक आहे. मी या सद्गृहस्थाला सांगितले कि माझ्या खात्यात मी हे महिन्यात फक्त तिसऱ्यांदा पैसे भरत आहे. रोखीचे चार व्यवहार फुकट आहेत आणि त्याहून जास्त व्यवहार केले तर तुम्ही मला त्याचा आकार लावू शकता पण मला चालू खाते काढावे लागेल हे सांगणे चूक आहे. माझ्या मागच्या आर्थिक वर्षात (११ महिन्यात) मी केवळ २१ रोखीचे व्यवहार( पैसे भरणे) केले आहेत. निश्चलनीकरणामुळे मला बहुसंख्य रुग्णांनी धनादेश दिले ते सर्व मी खात्यात भरले आहेत हे रोखीचे व्यवहार नाहीत आणि त्यावर कोणताही निर्बंध नाही. हे महाशय शहाणपणा करीत होते म्हणून मी त्यांच्या व्यवस्थापिके कडे तक्रार केली तर त्या अजूनच दीड शहाण्या निघाल्या. त्यांनी सांगितले तुम्ही एवढे रोख पैसे कसे भरता. मी त्यांना म्हणालोय मला रुग्ण देतात ते पैसे मी बँकेत भरतो आणि यावर कोणताही निर्बंध नाही. पैसे बँकेत भरले याचा अर्थ हा व्यवहार काळ्या पैशाचा नाही. यावर या दीड शहाण्या व्यवस्थापिका म्हणाल्या कि तुम्ही इतके व्यवहार करू शकत नाही. मी परत समजावले कि मी व्यवहार कितीही करू शकतो चार पेक्षा अधिक व्यवहार रोखीचे केले तर तुम्ही माँ त्याचच आकार लावू शकता. यावर त्या म्हणाल्या हे पैसे कुठून आणता हे तपासण्याचा अधिकार आम्हाला आहे. मी त्यांना म्हणालो असा अधिकार तुम्हाला कोणत्या कायद्याने दिला आहे ते लिखित स्वरूपात द्या. ते देण्याची त्यांची तयारी नाही परंतु शहाणपणा चालूच होता. मी सांगितले माझ्या स्लिपवर माझा आयकर PAN लिहिलेला आहे. ( बँकेने मला खास ग्राहक म्हणून नाव खाते क्रमांक आणि PAN छापलेले स्लिप बुक दिलेले आहे). तुम्हाला संशय येत असेल तर तुम्ही खुशाल आयकर खात्याला कळवू शकता परंतु मी हे पैसे कुठून आणतो याचा तपास करण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्याही कायद्याने दिलेला नाही. मी चालू खाते मुळीच उघडणार नाही. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते मला लिहून द्या. आपल्या अशा वर्तनाबद्दल मी आपल्या विरुद्ध वर तक्रार करीत आहे. त्यावर त्यांचे उत्तर जे करायचे ते करा. मी याबद्दल बँकेचे उपाध्यक्ष श्री पुष्पेंद्र सिंह यांच्या कडे तक्रार केली. त्यांनी याची चौकशी केली आणि मी, श्री पुष्पेंद्र सिंह आणि त्या व्यवस्थापिका यांचा कॉन्फरन्स कॉल झाला तेथेही या दीड शहाण्या बाईंनी तेच म्हणणे चालू ठेवले. यावर मी श्री पुष्पेंद्र सिंह याना स्पष्ट शब्दात बजावले आहे कि या बाई आपल्या व्यवस्थापक पदावर राहण्याच्या लायकीच्या नाहीत. श्री पुष्पेंद्र सिंह हे मला "जाऊ द्या", सोडून द्या इ रीतीने आग्रह करीत होते. परंतु मी त्यांना जर या व्यवस्थापिका आपले म्हणणे बदलणार नसतील तर मला हे प्रकरण धसास लावणार आहे असे सांगितले आहे. काही काळ गेल्यावर मी ओम्बुड्समन कडे जाण्याच्या विचारात आहे. या बद्दलची प्रक्रिया काय आहे हे कोणी समजावून सांगेल का?

In reply to by सुबोध खरे

काही काळ गेल्यावर मी ओम्बुड्समन कडे जाण्याच्या विचारात आहे. या बद्दलची प्रक्रिया काय आहे हे कोणी समजावून सांगेल का?
प्रत्येक बँकेचे अंतर्गत ओम्बुड्समन असतात. त्यांच्याकडे तक्रार करता येते आणि त्यातून निवारण न झाल्यास रिझर्व्ह बँकेच्या ओम्बुड्समनकडे तक्रार करणे ही पुढची पायरी. माझ्या माहितीप्रमाणे अंतर्गत ओम्बुड्समनकडे तक्रार करण्यापूर्वी बँकेच्या शाखेत तक्रार केली आणि त्याचा निवाडा झाला नाही हे दाखवून द्यावे लागते. याविषयीचा माझा अनुभव लिहितो. मी माझे होमलोन घेतले त्याबरोबरच येणारा विमाही घेतला होता. विमा घेतला म्हणजे विम्यासाठी पैसे भरले होते. म्हणजे कर्ज चालू असताना जर कर्ज घेणारा परलोकवासी झाला तर विमा कंपनी उरलेले कर्ज फेडते अशा स्वरूपाचा हा विमा असतो. तो विमा मी घेतला होता. कर्ज घेताना प्रॉपर्टीचा विमा घ्यावा लागतो आणि त्याची कागदपत्रे माझ्या घरी आली. पण माझ्या विम्याची कागदपत्रे मात्र आली नाहीत. तेव्हा बँकेत जाऊन विचारले तेव्हा थोडीशी टोलवाटोलवीच त्यांनी केली. तरी ४-५ वेळा जाऊन त्यांच्या डोक्यावर बसल्यावर समजले की विम्याचे नुसते पैसेच घेतले गेले होते पण प्रत्यक्ष विमा दिलाच नव्हता. हा विमा कोटक किंवा टाटा या थर्ड पार्टीकडून दिला जाणार होता. माझे पैसे ताबडतोब परत द्यायची मागणी मी केली. रक्कम थोडी नव्हती. दोन ई.एम.आय इतकी रक्कम होती ती. एका पांढर्‍या कागदावर अर्ज लिहून दिला आणि "अर्ज मिळाला" हा शिक्का मारून त्या पांढर्‍या कागदाची एक कॉपी घेतली होती. १५ दिवस काहीच झाले नाही. त्यानंतर त्या बँकेच्या शाखेला २-३ ई-मेल केले. त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबईतील विभागीय कार्यालयाला ई-मेल पाठवला. त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग कलकत्त्याला बँकेच्या ओम्बुड्समनकडे तक्रार केली. त्यावेळी बँकेच्या शाखेची "अर्ज मिळाला" ही पोचपावती आणि पाठवलेल्या सर्व ई-मेलचे प्रिंटआऊट जोडले होते. मग चक्रे हलली आणि १५ दिवसात माझे पैसे "तितकी रक्कम सेव्हिंग्ज खात्यात ठेवली असती तर मिळाले असते तितक्या व्याजासह" परत मिळाली. या प्रकारात तसे नुकसानच झाले कारण तितके पैसे माझ्याकडे तेव्हा असते तर मी थोडे कर्ज जास्त फेडले असते किंवा मार्केटमध्ये लावून अधिक परतावा घेतला असता. पण झालेले नुकसान अक्कलखाती गेले असे समजून पुढे काही केले नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ओम्बुड्समनकडे जाण्यापूर्वी शाखा आणि विभागीय पातळीवर तक्रार केली, तक्रार निवारणीसाठी पुरेसा वेळ दिला पण काहीही झाले नाही हे दाखवून द्यावे हे उत्तम.

In reply to by गॅरी ट्रुमन

मी माझे होमलोन घेतले त्याबरोबरच येणारा विमाही घेतला होता. विमा घेतला म्हणजे विम्यासाठी पैसे भरले होते.
माझा अनुभव आणखीन भयानक होता पण थोडक्यात सुटलो , SBI चे मॅक्स गेन वर लोन ट्रान्स्फर केल होत , तर SBI ने त त्यांचा पर्सनल इन्सुरन्स विकायासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आणायला सुरूवात केली जो पर्यंत इन्सुरन्स घेणार नाही तो पर्यंत प्रोसेस पूर्ण करायला कर्मचारयांनी काकू करायला सुरूवात केली शेवटी सर्व पेशन्स संपले वैतागून आवाज चढवला , आतून मॅनेजर आले , केबिन मध्ये घेऊन गेले तिथे तेच सुरू केल , त्यांना म्हणालो तुमची RBI कडे कॉम्प्लेट करून मला तुम्ही हे लेखी द्या , मग ते नरमले आणि प्रोसेस पूर्ण करायचे आदेश दिले , थोडा थोडका नव्हे दीड लाखाचा वन टाइम हप्ता असलेला इन्सुरन्स विकत होते , थोडक्यात वाचलो

In reply to by माझीही शॅम्पेन

हा अनुभव मलाही SBI Max Gain मध्ये लोन ट्रान्सफर करताना आला होता. मी त्यांना निक्षून सांगितले की "तुमचे काम लोन पास करणे आहे. पॉलिसी विकत घेण्याची जबरदस्ती तुम्ही करु शकत नाही", पण बँक कर्मचारी मान्य करत नव्हते. शेवटी मॅनेजरकडे तक्रार केल्यावर वाद मिटला. कहर म्हणजे जेव्हा लोनविषयी चौकशी करतो तेव्हा, कागदपत्रे सबमिट करताना ही बाब सांगितली जात नाही. लोन जेव्हा disburse होते, त्यावेळी विम्याच्या हप्त्याची रक्कम जोडूनच disburse करतात आणि त्यावेळी अनेक कागदपत्रे भरताना विम्याचा फॉर्म भरायला लावतात. घाईगडबडीत एखाद्याच्या लक्षात आले नाही तर हा भुर्दंड पडणारच!

In reply to by परिंदा

घाईगडबडीत एखाद्याच्या लक्षात आले नाही तर हा भुर्दंड पडणारच!
+ १०० अगदी बरोबर ..... अनुभव अगदी एक सारखा नुसता संताप झाला होता

In reply to by सुबोध खरे

cgmcsd@rbi.org.in हा आरबीआयच्या ओम्बुड्समनचा मेल आयडी. https://www.rbi.org.in/commonman/English/scripts/againstbank.aspx इथे आणखी माहिती मिळेल. (त्या बाईंचे म्हणणे तुमच्याकडे लेखी असल्याशिवाय तुम्ही ओम्बुड्समनकडे जाऊन फार फायदा होणार नाही.) ओम्बुड्समनद्वारे एकाला धडा शिकवल्याची ही माझी झैरात - जागो ग्राहक जागो....

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, तुम्ही याचा सोक्षमोक्ष लावाच. बॅन्क कर्मचार्‍यांना असला आगावूपणा करायचा अजिबात अधिकार नाहीच. काही गोष्टी आहेत तेवढं बघा. तुमचं सॅलरी अकाउंट आहे, पर्सनल सेविंग अकाउंट नाही. त्यात सॅलरी ऐवजी रोख भरणा होत आहे. तेव्हा हे व्यवहार संशयास्पद या नावाखाली तपासले जाऊ शकतात, अर्थात असा अधिकार आयकरविभागालाच आहे. बाकी कोणालाच नाही. आपण कोठून किती कसे कमावतो वगैरे विचारण्याचा अधिकार अधिकृत संस्था सोडल्यास इतर कोणालाच नाही. तसेच, हा सगळा प्रकार एचडीएफसी च्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या भिंतीवर जाऊन लिहा. तसेच ग्राहकतक्रारच्या संस्थळावर ही संपूर्ण माहिती द्या. बहुतेक सर्व हालचाल होण्याची शक्यता तिथूनच होईल. शेवटी बॅन्क अकाउंट बंद करण्याची धमकी द्या. सर्वात शेवटी ओम्बुड्समन कडे तक्रार करा.

In reply to by संदीप डांगे

मचं सॅलरी अकाउंट आहे, पर्सनल सेविंग अकाउंट नाही. त्यात सॅलरी ऐवजी रोख भरणा होत आहे. तेव्हा हे व्यवहार संशयास्पद या नावाखाली तपासले जाऊ शकतात, अर्थात असा अधिकार आयकरविभागालाच आहे.>>>> नवीन पोलिसी नुसार प्रत्येक बँकेला त्याच्या खातेदाराची कॅच बरोबर त्याचे प्रोफाईल सुद्धा चेक करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार जर काही संशयास्पद वाढले तर बँक तुम्हाला एक नोटीस पाठवून तुमचे खाते सुद्धा बंद करू शकते. उदा. बचत खात्यात व्यावसायीक ट्रांसकशन, हे सर्वे मॉडिफिकेशन डेमॉनिटिसशन नंतर आले आहेत.

In reply to by हेमंत८२

हे माहित नव्हते. पण असे अधिकार बॅन्केला असतील तर सदर केसमध्ये संबंधित अधिकार्‍यांनी डॉक्टरसाहेबांना तसे लेखी कळवणे आवश्यक आहे. ग्राहकाचा अपमान करण्याचा, अरेरावीचा मात्र त्यांना अजिबात अधिकार नाही.

In reply to by संदीप डांगे

ग्राहकाशी अरेरावी केली हे फक्त बँकेतच असे नाही कोणत्याही धंद्यात चुकीचे आहे. त्याबद्दल त्यानी माफी मागणे हे गरजेचे आहे. तुम्ही जर complaint केली तर जरूर त्यांचा माफीचा फोन येईल वरुन बॅंकचे अपोलोजि लेटर सुद्धा येईल. बरोबर आहे लेखी कळवणे पण जर माणूस समोर आला असेल तर हि गोष्ट त्याला समजावून सांगून खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. कंदाची डॉक ना भेटलेल्या बाईना हे जमले नसेल. आणि आपण हे सुद्धा बघतो कि बँकांकडून खूप काही पत्रे येत असतात काही प्रमोशनल असतात काही स्टेटमेंट असते. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी वाचतो असे सुद्धा नाही.

In reply to by हेमंत८२

नवीन पोलिसी नुसार प्रत्येक बँकेला त्याच्या खातेदाराची कॅच बरोबर त्याचे प्रोफाईल सुद्धा चेक करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार जर काही संशयास्पद वाढले तर बँक तुम्हाला एक नोटीस पाठवून तुमचे खाते सुद्धा बंद करू शकते. याला काही पुरावा आहे कि केवळ बँक कर्मचारी म्हणतात म्हणून. असे पत्रक असेल तर ते मला(आणि सर्वानाच) पाहायला आवडेल. मी त्या व्यवस्थापिका बाईंना "मी भरत असलेल्या पैशाचा स्रोत तपासण्याचा आम्हाला अधिकार आहे असे लिहून द्या" असे स्पष्ट आव्हान उपाध्यक्षांसमोर दिले असताना हि त्यांनी तसे लिहून देण्यास नकार दिला. मी स्वतःच्या खात्यात मूळ शाखेत (home ब्रँच) मध्ये पैसे भरत असेन तर त्याचा स्रोत तपासण्याचे कोणतेही असे अधिकार बँकेला नाहीत असे त्या उपाध्यक्षांनी मान्य केले. उद्या माझ्या वडिलांनी मला ५०,०००/- रुपये दिले तर ते कुठून आणले हे मी बॅंकेला का म्हणून सांगायचे? हा वैयक्तिक अधिकारावर घाला आहे. मी दुसऱ्याच्या खात्यात किंवा दुसऱ्या शहरात पैसे भरत असेन तर गोष्ट वेगळी आहे. सबळ कारण नसेल तर कोणतीही पूर्वसूचना न देता वाटेल तसे खाते बंद करण्याचा बँकेला कोणताही अधिकार नाही, बँक अधिकाऱ्यांची मनमानी म्हणून वाटेल ते नियमात बसेल असे नाही.

In reply to by मोदक

एकदा बँकेचे सभासद्/खातेदार झालात की हक्काने बोलता येते पण काय एखादी बँक खाते उघडायलाच नकार देऊ शकते? तसे लिहून न देता? आवशयक कागदपत्रांची पूर्तता करुनसुध्दा.

In reply to by अभ्या..

बचत खात्यांसाठी 'जनधन' पूर्वी असे प्रकार होत होते. पण जनधन मुळे कुणालाही खाते काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने किमान शिल्लक वगैरे गोष्टींचे अडथळे दूर झाले. त्यामुळे आता कोणी असे नकार देऊ शकत नाही. (जनधन पूर्वी अशी एखादी स्कीम असल्यास कल्पना नाही) करंट किंवा CC असेल तर ते आपली पत आणि मॅनेजरच मूड यावर अवलंबून असते. समजा एखाद्याने खुन्नस देऊन अकाऊंट उघडलेच तर मॅनेजर लोकं हमखास त्रास देतात. रोजच्या व्यवहारात अनेक ठिकाणी नियम वाकवणे दोघांची गरज असते. आपल्याला वाकवायला मॅनेजर लोकं नियम वाकवणे बंद करतात आणि आपण धंदा बघणार की बँकांमध्ये खेटे घालणार..? बाकी काहीही लिहुन न देता खाते उघडण्यास नकार देत असेल तर एकदा खुर्चीचा माज उतरवा. मॅनेजर आपोआप जमिनीवर येईल.

In reply to by सुबोध खरे

बँक कर्मचारी म्हणून नाही.. पण RBI चे एक मास्टर circular आहे DBOD.AML.BC.No.24/14.01.001/2013-१४ यामध्ये याच उल्लेख Customer Acceptance पोलिसी मध्ये आहे. आणि कोण कस्टमर एकसेप्ट करायचे हा सर्वस्वी RBI ने बँकांवर निर्णय सोपवला आहे. काही highlight तुमच्या माहिती साठी दिले आहेत.. Not to open an account or close an existing account where the bank is unable to apply appropriate customer due diligence measures, i.e., bank is unable to verify the identity and /or obtain documents required as per the risk categorisation due to non cooperation of the customer or non reliability of the data/information furnished to the bank. It is, however, necessary to have suitable built in safeguards to avoid harassment of the customer. For example, decision by a bank to close an account should be taken at a reasonably high level after giving due notice to the customer explaining the reasons for such a decision. Banks should prepare a profile for each new customer based on risk categorisation. The customer profile may contain information relating to customer’s identity, social/financial status, nature of business activity, information about his clients’ business and their location etc. The nature and extent of due diligence will depend on the risk perceived by the bank. However, while preparing customer profile banks should take care to seek only such information from the customer, which is relevant to the risk category and is not intrusive. The customer profile is a confidential document and details contained therein should not be divulged for cross selling or any other purposes.

In reply to by हेमंत८२

close an existing account where the bank is unable to apply appropriate customer due diligence measures, i.e., bank is unable to verify the identity and /or obtain documents required as per the risk categorisation due to non cooperation of the customer or non reliability of the data/information furnished to the bank या कुठल्याही वर्गात मला त्यांना बसवता येणार नाही. सगळे के वाय सी नॉर्म्स पूर्ण असून मी जर अगदी प्रत्येक १० रुपयाच्या व्यवहाराला सुद्धा PAN देतो आहे तर माझ्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्याचा कोणताही हक्क कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्याला पोचत नाही हेच मला म्हणायचे आहे/ होते.

In reply to by सुबोध खरे

PAN देणे म्हणजे सगळे नाही. PAN / फॉर्म ६० Is mandatory only for cash deposit over and above 50000. Bank is responsible for due diligence here come the transaction nature. And you need to justify the transaction that’s ok for any bank, no query need to be asked in this case. They should not ask you origin of money, only bank need to verify the Genuineness of the transaction and the customer profile. They might be wrong in this case but they should ask you the details as above not the origin. And if they feel mismatch they can file a STR ( suspicions transaction Report )

In reply to by सुबोध खरे

मी म्हंटले ना ती बाई मूर्ख आहे. HDFC किंव्हा ICICI अगदी काही नॅशनॅलिज्ड बँक मध्ये सुद्धा असे लोक भेटतील जे फक्त पोपटपंची करतात. नियम कुठे आहेत आणि काय आहेत हे माहित नसतात फक्त बोलायचे म्हणून बोलतात. या बॅंकयेत जास्त करून TPP प्रॉडक्ट सेल करण्यावर भर दिला जातो त्यामुळे ते विचारलेलं पत्करून सांगू शकतील पण RBI काय म्हणते हे नाही सांगू शकणार. त्यामुळेच RBI आणि बँकिंग ओंबड्समन चे अश्या बँकेत visit वाढल्या आहेत.

In reply to by सुबोध खरे

प्रथम तुम्ही लोकल जिथे तुम्हाला प्रॉब्लेम झाला तेथे सविस्तर अर्ज करून या बद्दल तुमची तक्रार दाखल करू शकता. जर त्यांचेकडून १५ दिवसात काही उत्तर आले नाही तर किंवा आलेल्या उत्तरातून तुमचे समाधान झाले नसल्यास तुम्ही हायर ऑथॉरिटी कडे तक्रार दाखल करू शकता. ज्याची माही बँकिंग ombudman या टॅग खाली प्रत्येक बँकांच्या वेबसाईट वर किंवा त्यांच्या नोटीस बोर्ड वर असते.

In reply to by सुबोध खरे

"hdfc bank customer care" या बेवपेजवरचा "Grievance Redressal" हा पर्याय वापरा. माझ्याही अनुभवाप्रमाणे एच डी एफ सीच्या स्थानिक प्रशासनाला 'बेसिक रिटेल बँकिंग' सोडून इतर काही फारसे माहीत नसते; त्यांचा कल गिर्‍हाईकावर सर्व जबाबदारी टाकून आपण मोकळे होण्याचा असतो आणि ते करताना उद्धटपणे वागणे हे सुद्धा खूप जणांकडून ऐकले आहे. मात्र, त्या बँकेच्या "Grievance Redressal" बद्दल माझा अनुभव चांगला आहे. ब्रँचने दोन महिने खाल्ल्यावर, मी भारतात नसतानाही Grievance Redressal वर केलेल्या तक्रारीने एका आठवड्यात समस्येचे निवारण झाले. मुख्य म्हणजे या प्रकारात सर्व व्यवहार "डॉक्युमेंटेड" असल्याने व वरून दट्ट्या आल्याने ब्रँचमधल्या लोकांची वागणूकही ताबडतोप सुधारते !

In reply to by सुबोध खरे

एच डी एफ सी बँकेत माझ्या कंपनीचे २० लोकांचे पगाराचे खाते होते पण कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या उर्मट वागणुकीमुळे सर्व खाती बंद करून बँकेला ब्लॅक लिस्ट करून टाकले आहे. अतिशय वाईट अनुभव आहे या बँकेचा.

In reply to by सुबोध खरे

सध्या HDFC बॅक सॅलरी अकाउंटसना PIN Change चेही चर्जेस लावते असे वाचले. याशिवाय Personal Banker वा अशाच काहीश्या नावाने पुरविलेल्या सेवेकरिताही ते दर सहामाही एक रक्कम खर्ची टाकतात असेही आढळुन आले आहे. याच विषयाला अनुसरुन श्री,किरिट सोमैया यांनी परवा संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे. बाकी बॅंकानी विम्याच्या पॉलिसीज विकणे याबाबतच्या कथा न संपणार्या आहेत.....त्याविषयी न बोलणेच बरे

In reply to by प्रसाद भागवत

सध्या HDFC बॅक सॅलरी अकाउंटसना PIN Change चेही चर्जेस लावते असे वाचले.
हो?? मी पिन चेंज केलेला नाही इतक्यात पण असंही असु शकतं हे माहिती नव्हतं. गेल्या काही महिन्यात अति नियम बदलले आहेत.. आणि सगळं मला जाचकच वाटतंय.. म्हणजे ऑनलाइन व्हवहार व्हावेत हे ठिक पण प्रत्येक गोष्टीला चार्जेस का लावत आहेत?

In reply to by पिलीयन रायडर

जर तुम्ही physical पिन साठी request केली तर हे चार्जेस आहेत....ऑनलाईन साठी कोणतीही बँक चार्जेस लावत नाही. ता. क.:- मी या बॅंकयेत नोकरी करत नाही...

नोटबंदीच्या काळात बँकेत कॅश भरायला आलेल्या खूप लोकांना, विशेषतः वरिष्ठ नागरिकांना बँकवाल्यांनी नाही नाही त्या पॉलिस्या, युलिपं गळ्यात मारली आहेत.

बँकांचे काहीकाही नियम बुचकळ्यात टाकणारे असतात. मी एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून होमलोन घेतले आहे. मी कर्जासाठी अर्ज केला होता त्याचवेळी सेव्हिंग अकाऊंटही उघडला होता. हे घडले मी पूर्वी भाड्याच्या घरात असताना त्यामुळे मी तिथला वास्तव्याचा पुरावा दिला होता.त्यानंतर घर विकत घेतल्यानंतर नियमाप्रमाणे मुळातले सेल डिड बँकेकडे जमा केले होते.मला वाटले होते की याच बँकेने मला कर्ज दिले आहे आणि मुळातले ओरिजिनल सेल डिड बँकेकडे जमा केले आहे त्यामुळे सेव्हिंग्ज अकाऊंटवरील पत्ता बदलायला आणखी काही कागदपत्रे द्यायची गरज लागणार नाही. पण कुठचे काय. सेव्हिंग्ज अकाऊंटवरचा पत्ता बदलायला त्याच सेल डिडची एक कॉपी बँकेला द्यायला लागली होती. आणि ती कॉपी आणि एका पांढर्‍या कागदावर अर्ज लिहून दिल्यानंतर त्या मनुष्याने माझ्यासमोरच कॉम्प्युटरवर पत्ता बदलला. ते सेल डिड उघडून बघायचीही तसदी त्याने घेतली नाही. म्हणजे सेल डिडच्या नावाखाली दुसरेच काही दिले असते तरी त्याला ते कळले असते आणि तरीही तसाच पत्ता त्याने बदलला असता का ही पण शंकाच आली. दुसरे म्हणजे इतर सर्व बँका ऑनलाईन बँकिंगद्वारे चेकबुक ऑर्डर करायची सुविधा देतात आणि ते चेकबुक कुरिअरद्वारे घरपोच येते. पण या बँकेत मात्र तशी सोय उपलब्ध नाही. बँकेच्या शाखेत जाऊन लिखित अर्ज करायचा आणि मग ८-१५ दिवसांनी आपले नाव लिहिलेले चेकबुक त्या बँकेच्या शाखेत येणार आणि आपण ते तिथे घ्यायला जायचे!! अन्यथा पूर्वीच्या काळी आपले नाव नसलेले एक लांबलचक चेकबुक मिळायचे आणि त्यावर आपला खाते क्रमांक स्टँपने लिहिलेला असायचा तसे चेकबुक बँकेत ताबडतोब मिळेल असे सांगण्यात आले. एकतर हल्ली एन.ई.एफ.टी चाच वापर होत असल्यामुळे चेकबुक वापरायची वेळ फार येतच नाही.त्यामुळे ते चेकबुक घेण्यात फार काही स्वारस्य दाखवले नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

हा हा हा.. सेम सेम. मला ज्या कागदपत्रांवर कर्ज दिले त्याच कागदपत्रांच्या आधारे पत्ता बदलायला नकार दिला. (इन्सफिशियंट डॉक्युमेंट्स असा शेरा दिला.) मी बर्रं म्हणालो, बाहेर पडलो आणि दुसर्‍या शाखेत तीच कागदपत्रे दिली व पत्ता बदलून घेतला. :D चेकबुकची पण सेम कथा. युनायटेड वेस्टर्न मधून आयडीबीआय मध्ये आलेली कांही खोडं पै पै वाचवायचा प्रयत्न करतात. मला चेकबूक घरच्या पत्त्यावर हवे असताना यांचे म्हणणे बँकेतून घेऊन जावा. (घर आणि होम ब्रँच अंतर ३०० किमी फक्त.) बँकेला कुरीयरचा खर्च येतो म्हणून कुरकुर.... मग ते चेकबुक पोस्टाने पाठवतो, रजिस्टर करतो वगैरे सांगू लागले, मी इतकेच म्हणालो की "तुमचा माणूस ३०० किमी प्रवास करून घरी आणून देऊदे.. मी एक पैसा बेअर करणार नाही" मग ते गप बसले.

ही बँक पासबुक देत नाही. तिचा पेपरलेसचा आग्रह. ती दर तीन महीन्यांनी स्टेटमेंट पाठवते. म्हणजे पेपर आलाच आणि ते पाठवण्यासाठी पोस्टेजचा खर्चही आला. त्यांना पासबुकची विचारणा केली असता ते म्हणतात. तर मग आम्ही तुम्हाला स्टेटमेंट देणे बंद करू आणि पासबुक म्हणून सगळी स्टेटमेंट एकत्र स्टेपल करून देऊ. वास्तविक स्टेटमेंटचे चिठोरे सांभाळण्यापेक्षा पासबुक सांभाळणे कितीतरी सोपे. एरवी स्मार्टपणा दाखवणारी ही चकाचक बँक पासबुकबाबतीत स्मार्टपणा का दाखवत नाही अनाकलनीय आहे.
या बॅंकेकडे बहुतेक ई-स्टेटमेंटची सुविधा असेल. ती असल्यास तुम्ही कागदी स्टेटमेंट बंद करून मासिक स्टेटमेंट ईमेलने पाठवावे असे बॅंकेला सांगू शकता.

In reply to by सतिश गावडे

+१०० ही सोय नेटबँकिंगने २-३ मिनिटात होते... तिथले खालील पर्यायही फार उपयोगी आहेत : १. महिन्याचे स्टेटमेंट ईमेलने मिळणे २. खात्यातील रकमेचा प्रत्येक बदल एसएमएस ने कळवणे (योग्य खाते निवड केल्यास ही सेवा चकट्फू असते) ३. हवे त्या कालखंडाचे अकाउंट स्टेटमेंट स्वतःचे स्वतःला काढता येते... ही सेवा आर्थिक बाबींसाठी, पत्याचा पुरावा म्हणून, आयकर विवरणासाठी (संपूर्ण आर्थिक वर्षाचे स्टेटमेंट), इत्यादी अनेक कारणांसाठी २४ X७ वापरता येते. मी गेल्या पंधरा वर्षांत एकही पासबूक वापरलेले नाही... त्याने काहीही अडत नाही ! आपला मोबाईल/लॅपटॉप कित्ती कित्ती गुणी आहे हे सांगत फिरणार्‍यांना आणि त्यावर व्हीडीओ डाऊनलोड, चॅट, इ करणार्‍या लोकांना नेटबँकिंग 'बाये हाथका खेल' आहे.

In reply to by सतिश गावडे

सतिश जी, माझी बँक मला मेलवर इ स्टेटमेंट पाठवते. तसेच प्रत्येक ट्रांजेक्षनचा एसएमएस आणि मेल सुद्धा येतात. तसेच मागची ट्रांजेक्षनसुद्धा पाहता येतात. त्याची काळजी नाही. त्या सुविधा मी गेली कित्येक वर्षे वापरतो आहे. आजकाल काँप्युटरमुळे आतले बदलले असेल. बाह्य गोष्टी (Input, Output) बदलण्याचे कारण नाही. अनेक बँकाची सॉफ्टवेयर्स आज पासबुक प्रिंटींगला सपोर्ट करतात. दरवेळी मागची ट्रांजेक्शन पाहण्यासाठी कंप्यूटर चालू करावा लागत नाही. वीजही वाचते. बाकी सर्व बँका या सुविधा देतात. पण ICICI मात्र देऊ शकत नाही.

In reply to by आशु जोग

ICICI च्या त्या शाखेचा प्रोब्लेम असु शकेल. माझ्या लेकीचे अन बायको चे अशी २ खाती आहेत ICICI मध्ये अन पासबुक मिळालेले आहे.

In reply to by कुंदन

ICICI बद्दल इतरांचे अनुभव काय आहेत माहीत नाही. पण उत्तम सेवा. कित्येक वर्षे वापरत आहे. बँकेत कधी जावेच लागत नाही. सर्व कामे वेबसाइटवरून होतात. कधी बँकेत गेले तरी सर्व कामे अत्यंत कार्यक्षमतेने केली जातात. CITI आणि HDFC चे ग्राहक मात्र अनेकदा कुरकुर करताना आढळतात.

In reply to by सतिश गावडे

आम्च्या आय्डीबाय ब्यांकेचे मोब्ल्यात एम-पासबुक आहे. त्यात जमाखर्च सांभाळणे/लिहिणे यासाठी सोय आहे. तसेच कोणते ट्रँजॅक्शन नक्की कसले आहे (उदा. जोशींना मेडिक्लेम इन्शूरन्स रिन्युवलसाठी दिलेला चेक) असे टॅग लावायचीही सोय आहे. चांगली सोय आहे. नेटबँकिंंगने सोय आहेच, पण सिक्युरिटीचीही काळजी असतेच.

बँकांच्या ब्रँचमध्ये कामे करणार्‍यांना टारगेट दिली जातात. आणि या टारगेट्समध्ये सेव्हिंग्ज अकाऊंट्स, एफ्.डी याबरोबरच क्रॉस-सेलचीही टारगेट असतात. म्हणजे किती युलिप विकायची वगैरे वगैरे. ही टारगेट पूर्ण करायला बँकेतले लोक ज्या पध्दतीने गळ्यात पडतात त्याला काही तोडच नाही. माझ्या आईला अशी अनेक युलिप आय.सी.आय.सी.आय च्या लोकांनी अशी विकली आहेत. समोरच्या माणसाचा आपण काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास बसेल अशी माणसे हेरून त्यांच्या गळ्यात वाटेल ते मारण्यात या लोकांचा अगदी हातखंडा असतो. जर अशी गोष्ट नक्की काय आहे, त्यात कोणते चार्जेस आहेत इत्यादी कळत नसेल तर असले काहीतरी विकत घ्यायच्या भानगडीत पडू नकोस हे माझ्या आईला मी निक्षून सांगितले आणि बँकवाल्यांचे फोन आल्यास त्यांना काहीही विकत घ्यायचे कबूल न करता मला फोन करायला सांग असे सांगितले. मला त्या बँकवाल्यांचे फोन कधी आले नाहीत. पण सतत "तुमचा मुलगा कधी येणार आहे" अशी भूणभूण मात्र आईच्या डोक्याला त्या बँकवाल्यांनी लागली. एकदा मी घरी जाणार होतो ते त्या बँकवाल्यांना कळले. बस सकाळी साडेसहा-पावणेसातच्या सुमारास तिथे पोहोचते. पण लेट होऊन त्या दिवशी घरी पोहोचायला साडेआठ झाले. घरी पोहोचल्यावर चहा-बिस्किटे घेऊन होत आहेत तोवर बँकेची मंडळी घरी हजरही झाली-- नवे इन्व्हेस्टमेन्ट प्रॉडक्ट विकायला!! मागच्या वर्षी एकदा काही कारणाने पैसे हवे होते तेव्हा बरेच शेअर विकले. पैसे बँकेत २-३ दिवसात जमा झाले. तो एस.एम.एस आला सकाळी अकराच्या सुमारास. दुपारी तीनच्या सुमारास त्या बँकेच्या 'रिलेशनशीप मॅनेजरचा' फोन आला. वास्तविक ते बँकेचे खाते मी केवळ डी-मॅट अकाऊंटशी संलग्न ठेवले आहे आणि इतर कोणतेही व्यवहार मी त्यावरून करत नाही. तेव्हा तिथला रिलेशनशीप मॅनेजर असायचे काही कारणही नव्हते. मी यांची दुनिया जवळून बघितलेली असल्यामुळे त्याने फोन नक्की का केला हे पण लगेच कळले. तो तथाकथित रिलेशनशीप मॅनेजर दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये मला भेटायलाही आला-- नवे इन्व्हेस्टमेन्ट प्रॉडक्ट विकायला!! याच डिमॅट अकाऊंटवरून एक गोष्ट आठवली. मी तो अकाऊंट चालू केला त्यावेळी पॅन कार्ड आणि इतर डॉक्युमेन्टची कॉपी घ्यायला एक मनुष्य ऑफिसात आला होता. मी त्याला सगळे कागद दिले. त्यानंतर संध्याकाळी दुसर्‍या एकाचा फोन मला आला--- "अहो तुम्ही माझे क्लाएंट आहात. तुम्ही त्याला कागदपत्रे कशी दिलीत" असा जाब विचारत. त्याने मला परत कागदपत्रे द्यायला सांगितली. त्याचा फोन संपतोय ना संपतोय तोच तिसर्‍या एकाचा परत असाच जाब विचारायला फोन आला. या फोनच्या वेळी मात्र मी सांगितले की मी कागदपत्रे राजेश नावाच्या व्यक्तीला आधीच दिली आहेत. जर मी तुमचा क्लाएंट असेन तर तुम्ही त्या राजेशकडून ती कागदपत्रे परस्पर घ्या मी परत काही नवी कागदपत्रे देणार नाही. बहुदा हा प्रकार त्यांच्या मॅनेजरला कळला असावा. त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्याने सांगितले की या लोकांना सगळ्यांना अमुक इतके डी-मॅट अकाऊंट उघडायचे ही टारगेट दिलेली असतात. त्यामुळे अनेक जण "तुम्ही माझेच क्लाएंट" असे म्हणत पुढे येतात. अशी मजा असते टारगेट्सची!!

In reply to by गॅरी ट्रुमन

डॉक्युमेन्टची कॉपी घ्यायला एक मनुष्य ऑफिसात आला होता
तुमच्या या वाक्यावरून मला रामदास यांच्या 'पिसि .जेसि .आणि आउट' या कथेची आठवण झाली. आपण कागदपत्रे अशा माणसांजवळ देतो परंतु त्याची त्यावरील माहिती गुप्त राहील याची खात्री काय? हि अशी माणसे त्याच्यावरती वेगळा लेखच होईल बहुतेक.

In reply to by अमित खोजे

हो हा धोका असतोच पण त्याला अजून तरी रामबाण उपाय सापडलेला नाही. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली तरी त्याचा असा दुरूपयोग होऊच शकतो. आधार कार्डाबरोबर सगळे काही संलग्न करून अंगठ्याचे ठसे मॅप करून सगळी कुंडली परस्पर घ्यायची व्यवस्था झाली तरी त्या डेटाबेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत आहेच :(

ATM व नेट बँकिंग वर टीका अनाठायी वाटली .. गेल्या दहा वर्षात मी फक्त दोनदा बँकेत गेलो आहे. एकदा मोबाईल नंबर बदलण्यासाठी आणि एकदा जुन्या नोटा भरण्यासाठी . सर्व व्यवहार ATM व नेट बँकिंग वर सुरळीत चालु आहेत . तेंव्हा बँकांनी ह्या सुविधा देण्यात गैर काहीच नाही

एका ब्यांकेत बचत खाते काढले तर लॉकर मिळेल असे बायकोला त्या ब्यांकेत सांगितले. प्रत्यक्षात मी जेव्हा आवश्यक कागदपत्रे घेऊन गेलो तेव्हा "वर्षाला पन्नास हजार असे दहा वर्षे भरायचे" पॉलिसी घेतली तरच लॉकर मिळेल असा नवाच मुद्दा पुढे केला त्यांनी. मी नाही म्हणताच त्यांनी बार्गेनिंग सुरु केले. पॉलिसीचा वार्षिक हप्ता कमी करत त्यांनी २५ हजारावर आणला. तरीही मी नकार देताच त्यांनीही लॉकर मिळणार नाही असे सांगितले. बचत खात्यावर सहा टक्के व्याज असल्याने आणि ब्यांकेची शाखा घरापासून चालत दहा मिनिटांवर असल्याने मी तिथे बचत खाते मात्र उघडले.

वरील सर्व अनुभव आतापर्यंतच्या ब्यांक-जीवनात आलेले आहेत. महान ब्यांकेचा दिव्य अनुभव तर रोजच येत असतो. गरज नसलेले माजोरी लोक ! का आमच्या एम्प्लॉयरला महान ब्यांकेत सॅलरी अकौंटस काढायची दुर्बुद्धी झाली महादेव जाणे !

In reply to by सस्नेह

दुसर्‍या बॅन्केत खाते काढून ह्या महान बॅन्केतला सर्व पगार चेकने दुसर्‍या बॅन्केत परस्पर ट्रान्सफर होईल ना? म्हणजे महान बॅन्केचे तोंड बघायला नको.

यापुढे पोस्ट ऑफीसकडेही बँकींगचे व्यवहार देणार आहेत. त्यावेळी तर काय काय अनुभव घ्यावे लागतील हे सांगणे कल्पनेच्या पलिकडचे आहे.
नुकताचं अनुभव घेतला. चिंचवड स्टेशनच्या पोस्ट ऑफिसमधे काही एन.एस.सी. कॅश आउट करायच्या होत्या तर चेकने पैसे देणं बंद केलयं असं उत्तर मिळालं. इथेचं खातं उघडावं लागेल असं उत्तर मिळालं. पोस्टमास्टरकडे वडिल गेले तेव्हाही उडवाउडवीची उत्तरं मिळाली. वडिलांनी चेकने पैसे देत नाही असं लेखी मागीतलं तर तो पोस्टमास्टर वडलांच्या अंगावर धावुन आला आणि धमकावलं. युनियन च्या जीवावर माजलेत भोसडीचे. नंतर मी जाउन शिव्या देउन आलो. उपयोग शुन्यं. रखडवायचं ते बरोबर रखडवलं त्यानी. सरकारी कर्मचारी मरत असेल तर त्याला पाणीही पाजु नये, तडफडुन मरु द्यावं ह्या निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. ह्यापुढे कानाला खडा. पोस्टाशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करणार नाही. नॅशनल ग्रिव्हन्स फोरमवर तक्रार केलेली आहे. पाहु काय होतं ते. त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्पं बसणार नाही एवढं खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि हो. चेकने पैसे देणार नाही हा नियम नाही. ह्या सरकारी जावयांना वर्षाची टारगेट्स असणारेत अमुक एक अकाउंट्स उघडायलाचं हवीत म्हणुन.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हो असंच असावं.. कारण माझ्या आईने नुकतेच मागच्या २ महिन्यात चेकने पैसे काढले आहेत तिथुन.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या ओळखीचे एक काका पोस्टात होते. चिंचवड, चिंचवड स्टेशन आणि हिंजवडी ह्या ठिकाणी काम केलंय त्यांनी. हिंजवडीला म्हणे इतकं काम होतं की त्यांचा मुलगा जाऊन मदत करायचा. शेवटचं वर्ष होतं आणि काहीतरी कारणानी युनियनची भीती. कसंबसं शेवटचं वर्ष काढलं. चिंचवडचं पोस्ट अतिभिकार आहे. प्रचंड स्लो... आई तर काही काम असेल तर एक आक्खा दिवसच काढुन जाते. ते काम न होण्याची शक्यताच जास्त असते इतकं करुन..

अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या नियमानुसार बँकांना खातेदारांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि गैर व्यवहार उघडकीस आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना अथवा बँकेला दंड अथवा शिक्षा होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी चालू खाते उघडावे हा त्या कर्मचाऱ्यांचा आग्रह अगदी कायद्याला धरून आहे. एव्हडेच काय, आज काल तर पगारी कर्मचाऱ्यांना देखील रेईम्बुरसेमेन्ट साठी चालू खाते उघडावे लागते.

In reply to by सर टोबी

जर त्या महिला अधिकारी कौतुकास पात्र आहेत तर त्यांचे म्हणणे लेखी का देत नसाव्यात..? आणि त्यांचे वरिष्ठ माफी का मागत असावेत..?

In reply to by मोदक

लेखी द्यावे किंवा देऊ नये ही जनसंपर्क किंवा कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या विभागाची मक्तेदारी असते.

In reply to by सर टोबी

बँकेच्या रोजच्या कामकाजातील एखाद्या कागदपत्रावर सही करण्याचे अधिकार त्या त्या प्रतिनिधीला आणि शाखेच्या प्रमुखाला असतात. इथे डॉक्टर खरेंची बाजू बरोबर आहेत आणि त्या महिला अधिकारी बरोबर असतील तर त्यांनी आपले म्हणणे लेखी द्यावे ही अपेक्षाही चुकीची नाहीये.

In reply to by मोदक

अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या नियमानुसार बँकांना खातेदारांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि गैर व्यवहार उघडकीस आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना अथवा बँकेला दंड अथवा शिक्षा होऊ शकते.>>>> या case मध्ये जर बँक निष्काळजी दाखवत असेल तर... पण मी आपल्या प्रश्नाचे उत्तर अगोदरच दिले आहे. पगारी कर्मचाऱ्याचे reimbursement खाते काढावे अशी कोणतेही बँक सांगत नाही. ती त्या कंपनीची जमा खर्च (नोकराला दिलेला पगार व भत्ते ज्यात मोबाईल बिल, ट्रॅव्हल etc ) दाखवण्याची पद्धत असते. जर बॅंकयेत कोणीही खातेदार किंवा भागीदार ( shareholder ) जर काही स्वतःच्या खात्या संबंधी काही लेखी विचारात असेल तर त्याला पोच देणे गरजेचे आहे. फक्त माहिती कायदा सोडून कारण तो या व्यवसायाला लागू नाही.

In reply to by हेमंत८२

मुद्दा क्रमांक ३ - जर बॅंकयेत कोणीही खातेदार किंवा भागीदार ( shareholder ) जर काही स्वतःच्या खात्या संबंधी काही लेखी विचारात असेल तर त्याला पोच देणे गरजेचे आहे. - सहमत. याच सोबत, जर बँक प्रतिनिधी खात्यासंदर्भातच एखादा नियम / तरतूद सांगत असेल तर ते लेखी मागण्याचा खातेदारास हक्क आहे, आणि तशी तरतूद असेल तर कर्मचार्‍याने ते लेखी देण्यास काहीच हरकत नाही. मुद्दा १ व २ बद्दल पास - कारण तो मी मांडलेला नाही फक्त माहिती कायदा सोडून कारण तो या व्यवसायाला लागू नाही - यावर अवांतर होईल म्हणून पास.

In reply to by हेमंत८२

कोणत्या प्रसंगानुरूप पोच द्यावी हे पूर्व निश्चित असते. त्याव्यतिरिक्त जे काही लेखी द्यावे अशी अपेक्षा असते तो कायदे विभागाचा प्रांत असतो.

In reply to by हेमंत८२

हा इनकम टॅक्सचा नियम आहे, बँकेचा नाही. वेबवर त्या संबंधीची माहिती मिळाली नाही. विदा आहे का या प्रश्नेचे उत्तर नाही हे आत्ताच सांगतो.

कोणत्या धाग्यात विचारावे हे कळेना म्हणुन इथे विचारते.. बँकेत आधार कार्ड जोडा म्हणुन बातम्या येत आहेत. नाही तर खाते बंद होईल म्हणे. आता आज एक वाचलं की ते फक्त २०१४ नंतरच्या खात्यांना आहे. तर नक्की काय नियम आहे कुणी सांगेल का? आणि जे भारतात नाही त्यांनी काय करायचे?

In reply to by पिलीयन रायडर

१) एंबसीला मेल पाठवून विचार, ते कागदपत्रे पाठवतील का म्हणून. २) बँकेची अमेरिकेत शाखा आहे का..? असल्यास तेथे सबमीट कर. ३) सरळ बँकेच्या कस्टमर केअरला मेल पाठवून परिस्थिती सांग - आणि काय करू ते विचार. मेल वर संभाषण कर - लेखी पुरावा राहतो.

In reply to by पिलीयन रायडर

सेंट्र बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या प्रत्रकाप्रमाणे एनआरआयना आयकर विवरण भरताना आधार कार्ड असणे आवश्यक नाही असे कळते... http://nricafe.com/aadhaar-card-not-needed-for-nris-says-india-govt/ तरीही प्रत्येकाने आपल्या सीएकडे चौकशी करून खात्री करून घेणे केव्हाही चांगले.

लोन घेतलं की तेवढ्या रकमेचा लाइफ इन्शुरन्स काढून तो मार्गेज केला की ओझं राहात नाही. तो विमा कोणत्याही कंपनीचा चालतो.

आता सर्व भारतात एकच कस्टमर आइडी आणणार. कुठेही गुंतवणूक केली की तो द्यावा लागेल. सर्व प्रकारच्या बँका ,पतपेढ्या ,कंपनी डिपॅाझिट्स यासाठी आवश्यक. पॅन कार्ड नंबर बहुतेक फेल गेला. आधार संलग्न असावा. पुर्वी आधार फक्त एकाच बँक अकाउंटशी सबसिडिसाठी केलेला.

आपला भारत देशच एक बॅकांचे भंगार यार्ड आहे. कुणीही हाका अशी जनता असल्याने सर्व खाजगी व सरकारी बॅंकाना माज आलेला आहे. सर्व खाजगी व सरकारी बॅंकाना एक समाईक अशी कार्यपद्धती आपल्या देशात नाही. काही किमान समाईक नियमावली नसल्याने एका ठिकाणी एक तर दुसर्‍या ठिकाणी दुसरेच असा अनुभव आहे. कारकून लेव्हल व ऑफिसर लेव्हलला सरकारी बॅका तर भिकार आहेतच पण मॅनेजर खोटारडे असल्याचे माझे अनुभव आहेत. तक्रार करू गेल्यास वरचे डी जी एम व मॅनेजर यांची मिलीभगत असल्याचे चित्र आहे. आता तर समाजवादाला भारत देशात तिलांजली मिळाल्याने याचा चार्ज त्याचा चार्ज असे सत्र सुरू झाले आहे. मी एका खाजगी कंपनीत कामाला होतो त्यातेथील १९९५ चे कामाचे नियमन आज २०१७ मधे देखील सरकारी बॅकात दिसत नाही. एफ डी आर वाला ग्राहक हा एक भिकारी माणूस असून क्लिअरिंग हे बॅकेचे सर्वात पवित्र व महत्वाचे काम आहे असे सर्व बॅकांचे धोरण दिसते.

बँकेने सूचना केली की करंट अकाउंट उघडा तर उघडायचे आणि आणखी एक सेविंग्ज अकाउंट उघडायचे. अथवा सरळ अकाउंटच बंद करायचे॥ आपण चिकटून कशाकरता राहायचे?

बँक: 'महा'न बँक शाखा: कर्वे रस्ता, पुणे ४. ह्या शाखेत माझे आणि बाबांचे संयुक्त आहे. एकदा धनादेश पुस्तिकेची मागणी करायला ह्या शाखेत गेलो असता अचानक ह्यांना आठवण झाली कि ह्या खात्याचे केवायसी बरेच दिवसात झाले नाहीये, मला सगळी कागदपत्रे मागण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर पुन्हा तीच माहिती माझ्याकडून विचारून घेणार आली. (का ते माहीत नाही). त्यानंतरच धनादेश पुस्तिकेची मागणी नोंदवली गेली. नवी धनादेश पुस्तिका आल्यावर मी हादरलोच. पहिले नाव वडिलांचे, दुसरे नाव माझे आणि पुन्हा एकदा वडिलांचे नाव. संयुक्त खात्यावर केवळ दोनच नावे असताना धनादेश पुस्तिकेवर ३ नावे त्यातही एकाचे नाव २ वेळा. ह्याबाबत पुन्हा शाखेत जाऊन विचारले असता, एकदाच सही केली तरी चालेल दोनदा नाव आहे म्हणून दोनदा नका करू असे सांगितले. अहो, एकाच माणसाचे दोनदा नाव लिहिलंयत, हे सांगितल्यावर, 'बरं ते नाव कमी करतो' असं सांगून त्या हुशार माणसाने माझेच नाव खात्यावरून कमी केले. खात्यावर नाव पुन्हा जोडण्यासाठी फॉर्म भरा, केवायसी करा, मूळ खातेदाराच्या सह्या आणा वैगेरे वैगेरे.

पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच शाखा. माझ्या खात्यातून अचानक ११३ रु. कापून घेतले. पासबुकवर लिहून मिळालं कि खात्यावर किमान शिल्लक नसल्याने हे पैसे घेणार आलेले आहेत. माझ्या खात्यावर किमान शिल्लक नियमापेक्षा जास्त रक्कम असताना देखील हे असं का विचारल्यावर तिथल्या हुशार माणसाने उत्तर दिले कि, 'हे पैसे तुमच्या डेबिट कार्डची वार्षिक फी आहे.' आहो मग डेबिट कार्ड फी म्हणून लिहा ना, असे सांगितल्यावर, 'ती सर्वरची चूक आहे. आम्ही काही करू शकत नाही.' मग मी विचारलं कि, शाळा सोडल्याच्या दाखल्याची स्टेशनरी संपली म्हणून मृत्यू दाखल्यावर नाव लिहून दिल चालेल का?

In reply to by अनिकेत वैद्य

शाळा सोडल्याच्या दाखल्याची स्टेशनरी संपली म्हणून मृत्यू दाखल्यावर नाव लिहून दिल चालेल का?
फुटलो हसुन =))!!!