Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिलीयन रायडर on Wed, 02/15/2017 - 21:46
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
  • Log in or register to post comments
  • 118093 views

प्रतिक्रिया

Submitted by रेवती on गुरुवार, 02/23/2017 - 18:41

Permalink

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी

एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते. धन्यवाद डॉक्टरसाहेब!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 02/23/2017 - 18:52

In reply to एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी by रेवती

Permalink

आयुष्याच्या शेवटी आपल्याला

आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते. +१००
  • Log in or register to post comments

Submitted by उपाशी बोका on गुरुवार, 02/23/2017 - 22:02

Permalink

माझा अनुभव

तुम्ही काय करावे, काय करू नये, हे मी तरी सांगू शकत नाही. पण माझा अनुभव सांगतो. लांबलचक प्रतिसादाबद्दल क्षमस्व. मुळात "भारतीय" म्हणजे काय, याच्याबद्दलच माझ्या मनात संभ्रम आहे. केवळ भारतात जन्मलो, म्हणून मी भारतीय असे मलातरी वाटते. भारतात वाढलो, तिथल्या गोष्टींची मला सवय आहे, तिथे (जवळजवळ फुकटात) शिक्षण झाले त्याबद्दल आदर आहे, तिथले जेवण मला आवडते वगैरे वगैरे. पण खरं सांगायचं तर मी इतर कुठेही जन्मलो असतो (अमेरिका असो वा पनामा), तर माझ्या जन्मभूमीबद्दल आणि कर्मभूमीबद्दल मला असेच वाटले असते, याबद्दल मलातरी शंका नाही. मी बरेच वर्षे हॉस्टेलवर राहिलो (आई-वडील आणि नातेवाईकांपासून दूर), कामानिमित्त बरेच वर्षे फिरतीचा प्रवास असे, त्यामुळे "आपल्या" लोकांबद्दल फारशी ओढ नाही. जे सोबत आहेत, तेच मित्र आणी तेच नातेवाईक अशी वृत्ती झाली. कदाचित त्यामुळेच भारत हा "सोईस्कर देश" इतपतच प्रेम वाटते, पण पराकोटीचा अभिमान वगैरे काही वाटत नाही. तसेच, अमेरिकेलाच काही सोनं लागलं आहे, असे पण वाटत नाही. उद्या गरज पडली किंवा आवडले तर स्कँडेनेवियन देशात राहायची तयारी आहे आणि साउथ अमेरिकेत एखाद्या भारताहून गरीब देशाची पण तयारी आहे. आहे त्या परिस्थितीत समाधान मानायची तयारी असली आणि नावडत्या परिस्थितीतून मार्ग काढायची तयारी असली की त्रास होत नाही. मी या मताचा आहे. शिक्षण झाल्यावर मी भारतात नोकरी केली. सरकारने माझ्यावर इतका पैसा खर्च केला, सगळेच जर परदेशात गेले तर कसं काय होणार वगैरे विचार तेव्हा मनात होते. रग्गड पैसे मिळत होते, भारताबाहेर जायची गरजच न्हवती. हळूहळू मतपरिवर्तन होऊ लागले. कामानिमित्त चपराशापासून ते आय.ए.एस.पर्यंत सगळ्यांना पैसे चारून झाले. एकसे एक दिव्य अश्या बॉसबरोबर काम करून झाले, खिशात पैसे असूनही रेल्वेची तिकिटे मिळत नाहीत म्हणून "जुगाड" केले, "चलता है" म्हणणार्‍या सप्लायर्सचे लाड पुरवून घेतले. ( मी भारतातल्या इंफ्रास्ट्रक्चरबद्दल काही म्हणत नाहीये. भारतात राहाणार्‍यांनी धूळ आणि गर्दीबद्दल कितीही नावे ठेवली तरी इतरांनी जराही काही म्हणले की आवडत नाही, असा अनुभव आहे आणि त्यामुळे मी बोलतही नाही.) मग मनात विचार आला, की आज मी तरुण आहे, लग्न झालेलं नाही, पण हे असं किती दिवस चालणार? आपल्याला आयुष्यभर हे जमणार आहे का? आवडणार आहे का? मग मी भारताबाहेर पडण्याचा विचार केला. अमेरिकाच पाहिजे असं काही नाही, आधी ऑस्ट्रेलियाला प्रयत्न केला. सिंगापूर, मिडल ईस्ट, कॅनडा यांची पण तयारी होती. नोकरी इतक्या भरभक्कम पगाराची होती की दुसरे कुणी ऑफरच द्यायचे नाही.पण शेवटी बॉसला कंटाळून ३५% कमी पगारावर दुसरीकडे गेलो आणि मग तिथून परदेशात. माझे काही मित्र अमेरिकेतून परत भारतात परत गेले आहेत. एकाने ६ वर्षात भरपूर पैसे कमवले आणि तो पुण्यात ४२ व्या वर्षी रिटायर झाला. अजून एक जण असाच पैसे कमवून आता मुंबईत नोकरी करतो, पण स्वतःच्या नियमानुसार. सकाळी ११ ते ८ अशी वेळ आहे, तर नेमक्या त्याच वेळात काम करतो. शनिवार-रविवार फक्त फॅमिलीसाठी. सांगायचे काय तर पुरेसे पैसे असले तर स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते, मग ते भारतात असो किंवा अमेरिकेत किंवा अजून कुठे. माझ्या मुलीने सांगितले की तिला अ‍ॅकेडमीमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली पण तिला जायचे नाही, कारण तिथे फक्त अभ्यास आहे, तिचे आवडते पेंटिंग हा विषय नाही. मी म्हणालो, जायचे नसेल तर जाऊ नको. आम्ही घरी मराठी टीव्ही बघतो, भारतीय जेवण बनवतो, पण का? तर ते सहज जमते आणि सवय आहे म्हणून. "भारतीयत्व" जपण्यासाठी इथे कित्येक आई-वडील बळंबळं मुलांना टेंपलमध्ये नेतात, भारतीय कपडे घालायला लावतात, भारतीय जेवणच खायचे ही सक्ती करतात. अरे कशाला? मराठी शिकण्याऐवजी स्पॅनिश किंवा चायनीज (मँडॅरिन) शिकवा ना त्यांना. समरमध्ये अट्टाहासाने भारतातच जायचे त्यापेक्षा दुसर्‍या कुठल्या देशात सर्वांनी जा, असे माझे मत आहे. मुलांसाठी पुरेसे पैसे कमवले की त्यांना त्यांच्या मनासारखे शिकवता पण येईल, बरेच भारतीय-वंशाचे पालक, त्यांच्या मुलांना डॉक्टरच बनले पाहिजेस असे सांगतात, तसे तरी करावे लागणार नाही. शेवटी काय, प्रत्येक जण त्याच्या नशीबाने जगतो, योग्य दिशा दाखवणे इतकेच आपण करू शकतो. थोडक्यात काय? फ्लेक्सिबल राहा. जिथे संधी मिळेल तिथे जा. आणि एकदा निर्णय घेतला की त्याबद्दल दु:ख करू नका कारण "त्या परिस्थितीत" तुम्ही "त्या वेळी योग्य" असा निर्णय घेतलेला असतो. कमी पैशाने त्रास जरूर होतो, पण उत्पन्न $७५,००० असले की आयुष्यातला आनंद फारसा वाढत नाही. मॅस्लोच्या पिरॅमिडप्रमाणे, एकदा बेसिक गरजा भागल्या की मग तुम्ही तुमचा जीवनातला आनंद (Self-actualization) कुठे शोधायचा ते ठरवा. तेच खरे समाधानी जीवन.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 02/23/2017 - 23:36

In reply to माझा अनुभव by उपाशी बोका

Permalink

+१००

+१००
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Fri, 02/24/2017 - 00:26

In reply to माझा अनुभव by उपाशी बोका

Permalink

+१०००

मस्त प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Fri, 02/24/2017 - 01:34

In reply to +१००० by ट्रेड मार्क

Permalink

+१००० धन्यवाद !!!!

उपाशी बोका, समर्पक आणि एक्का काका यांच्या प्रतिसादामुळे आमच्या जहाज कुठल्या दिशेकडे न्यायचे यालाच खूप मदत होत आहे. पिरातैला धागा काढल्याबद्दल पुन्हा धन्यवाद !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Fri, 02/24/2017 - 14:15

In reply to माझा अनुभव by उपाशी बोका

Permalink

हा प्रतिसाद पूर्णतः पटला! तो

हा प्रतिसाद पूर्णतः पटला! तो वरती आरक्षणाचा नाही पटला.. पण तो वेगळा मुद्दा आहे... "सांगायचे काय तर पुरेसे पैसे असले तर स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते, मग ते भारतात असो किंवा अमेरिकेत किंवा अजून कुठे" हेच मी माझ्या एका प्रतिसादात म्हणत होतो कि उत्तम आर्थिक स्थैर्य असेल तर काहीही करण्याचे स्वातंत्र्य राहाते. मग मुलांनाही त्यांचे कलागुण जोपासण्याची संधी मिळू शकते. आपल्याला आयुष्यात उत्तम पैसे-नाव वगैरे कमवायचे असतील आणि तशी संधी कुठे (म्हणजे जगात कुठेही) मिळत असेल तर तेथे जाण्याचा निर्णय घेणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आहे! मला वाटत नाही त्यात इथे किंवा तिथे राहणाऱ्या कोणाला काहीच अडचण असावी. साधी सोप्पी गोष्ट आहे पण त्यात भारतीयत्व, संस्कृती अशा जड जड गोष्टी आल्या कि गोंधळ होतो. तसा सामान्य माणसाचा होणे हे हि साहजिकच आहे. पण मग काही लोक उगाच अमेरिकेत कसे "सगळंच" भारी आहे आणि भारतात कशी बोंबाबोंब आहे इतकेच लिहणार असतील तर त्याला उत्तर देखील तसेच येणार. ट्रेंड मार्क भाऊ परत परत लिहीत आहेत कि बाहेरच्या देशात राहणार्यांना भारतात राहणारे लोक का हिणवत आहेत? भाऊ, फक्त तुमच्याच प्रतिसादाला तश्या प्रतिक्रिया आल्यात! बाकी बरीच चांगली चर्चा देखील झालीये... मग असे का झाले हा विचार जरा तुम्हीच करून बघा... बाकी, भारत आणि भारतीय म्हणजे नक्की काय हे प्रश्न कॅप्टनच्या धाग्यावर मी काही वर्षांपूर्वी विचारले होते त्या धाग्याची लिंक देतो खाली. दुवा आज ती 'श्रीनिवास कुचिभोतला' च्या हत्येची बातमी वाचली आणि वाईट वाटले. हे क्वचित होणारे हल्ले असतील पण सगळ्यांनी काळजी घ्या...
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Fri, 02/24/2017 - 03:17

Permalink

स्थलांतर

आपल्या सोयीनुसार स्थलांतर करण्यात काय चूक आहे? खरं तर प्रत्येक माणूस स्थलांतर करतच असतो, काही जण गावातून शहरात राहायला येतात तर काही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर ज्यांना शक्य असेल ते दुसऱ्या देशात राहतात. पण दुसऱ्या देशात राहणाऱ्यांना का हिणवलं जातं काय माहित. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायच्या आधी, गेल्यावर तुलना तर सगळेच जण करतात. एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ राहण्याचा निर्णय घेण्याआधी आपण आपल्या नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी, तिथे रहात असलेल्या ओळखीच्या लोकांशी चर्चा करतो. हेच पिराताई करत आहेत आणि त्यांना प्रतिसाद देताना दोन ठिकाणांची तुलना होणे अपरिहार्य आहे. त्यात एक ठिकाण १००% वाईट आणि दुसरं १००% चांगलं असं कोणाचंच म्हणणं नाहीये कारण तसं असूच शकत नाही. भारत काही बाबतीत ग्रेट आहे पण काही बाबतीत मागास आहेच त्याचप्रमाणे अमेरिका पण काही बाबतीत मागास आहेच. उगाच एखाद्या ठराविक गोष्टीला एक प्रतिसाद दिला म्हणजे तेच १००% सगळीकडे लागू होत नाही. वर कोणीतरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल विचारलंय, तर न्यू यॉर्क सारख्या शहरात वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. पण बाकीच्या मध्यम शहरांत व कमी लोकवस्तीच्या ठिकाणी बोंब आहे. त्याविषयी चर्चा असेल तर ही गोष्ट पण निघेलच. पण मग रस्ते व महामार्ग, ट्रॅफिक सेन्स, प्रदूषण यांची पण तुलना होईल. आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये. आम्ही इतर देशांत राहून फार काही ग्रेट काम करतोय किंवा आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ असे म्हणत नाही किंवा तशी आमची समजूतही नाही. आम्ही ज्या देशात राहतो तिथले प्रॉब्लेम्स पण आम्ही बोलतोच. माझा मेडिकल इन्शुरन्सच्या अनुभवाचा हा धागा वाचा. इथली ही व्यवस्था कशी गंडलेली आहे हे सांगितलं आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं आणि जिथे सुधारणेची गरज आहे तिथे काय सुधारणा हवीये हे सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग तो कुठलाही देश असो!
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 02/24/2017 - 09:40

In reply to स्थलांतर by ट्रेड मार्क

Permalink

उगाच तणतण

कोणीही कोणाला हिणवत नाहीये. असेलच तर तुम्हीच हिणवताय भारतीय माध्यमं अमुक तमुक, भारतातली हपिसं अशी तशी वगैरे करून. स्थलांतर चूक आहे अस्सं कोणीही म्हणत नाहीये. तुम्हालाच का असं वाटतय की लोक तुमच्यावर टीका करतायत?
आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये.
वैयक्तिक प्रश्नावर जाहीर धागा काढला आहे. मत येणारच लोकांची. उगाच का तणतण करायची?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/24/2017 - 09:56

In reply to उगाच तणतण by अनुप ढेरे

Permalink

=))

=)) हा हा. - अऩुपरावांचा फ्यॅन
आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये.
तुम्हाला पटवून द्यायची गरज नाहीये हे दहावेळा का पटवून देताय ब्वॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 02/24/2017 - 15:42

In reply to स्थलांतर by ट्रेड मार्क

Permalink

ती नवीन बांगड्या घेतलेल्या

ती नवीन बांगड्या घेतलेल्या स्त्रीची कहाणी आठवली... तिच्या नव्या बांगड्यांकडे लक्ष जात नाही कोणाचे तर अपरोक्षपणे खुणावून खुणावून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या सोयीनुसार स्थलांतर करण्यात काय चूक आहे? खरं तर प्रत्येक माणूस स्थलांतर करतच असतो, काही जण गावातून शहरात राहायला येतात तर काही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर ज्यांना शक्य असेल ते दुसऱ्या देशात राहतात. >> बरोबरच आहे.. काहीच चुकीचे नाही ह्यात.. मी स्वतः अकोला सोडून मुंबईला आलो, आणि माझ्या दहावीच्या वर्गातले ६० पैकी चाळीस मुलं अकोल्यात परतलेलीच नाहीत, परतणारही नाहीत. पण ह्यापैकी माझ्यासकट कोणाच्याही मनात अकोल्यात आम्हाला संधीच नाही, ते कसे मागासलेलं आहे, (मुंबै-पुण्याच्या तुलनेत) बेशिस्त, आळशी लोक आहेत असे विचार आलेले नाहीत. खूप प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच आहे, जिथे संधी उत्तम मिळाल्या तिकडे गेले, सिम्पल!. इकडे संधीच नाहीत, आणि शंभर समस्या आहेत म्हणून करवादत दुसरीकडे गेले नाहीत... अ‍ॅप्रोचमध्ये फरक आहे. बघा, विचार करुन.
पण दुसऱ्या देशात राहणाऱ्यांना का हिणवलं जातं काय माहित. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायच्या आधी, गेल्यावर तुलना तर सगळेच जण करतात.
>> करावी की तुलना, नाही कोण म्हणतंय.. आणि दुसर्‍या देशात राहणार्‍यांना कोणीही हिणवत नाहीये, गैरसमज नको. दुसर्‍या देशात जाऊन भारताबद्दल करवादनार्‍यांना उत्तर दिले जात आहे. एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ राहण्याचा निर्णय घेण्याआधी आपण आपल्या नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी, तिथे रहात असलेल्या ओळखीच्या लोकांशी चर्चा करतो. हेच पिराताई करत आहेत आणि त्यांना प्रतिसाद देताना दोन ठिकाणांची तुलना होणे अपरिहार्य आहे. >> ती त्यांची वैयक्तिक समस्या आहे, तशीच इतर कोणालाही जाणवत असेल ह्या दॄष्टीने धागा काढला आहे व त्यावर त्याच्याशी संबंधीत योग्य प्रतिसादही आले आहेत. त्यात एक ठिकाण १००% वाईट आणि दुसरं १००% चांगलं असं कोणाचंच म्हणणं नाहीये कारण तसं असूच शकत नाही. भारत काही बाबतीत ग्रेट आहे पण काही बाबतीत मागास आहेच त्याचप्रमाणे अमेरिका पण काही बाबतीत मागास आहेच. उगाच एखाद्या ठराविक गोष्टीला एक प्रतिसाद दिला म्हणजे तेच १००% सगळीकडे लागू होत नाही. >> एखादं ठिकाण हे वैयक्तिक बाबतीत वाईट की चांगलं असं असतं. दोष ठिकाणांत नाही तर त्याकडे बघणार्‍याच्या मनोवृत्तीत असतो. वैयक्तिक समस्यांवर तेवढ्याच परिघातून चर्चा करत असतांना समग्र भारत वा समग्र अमेरिका मध्ये आणायची काहीच गरज नसते. पिराताइंचा प्रश्न हा भारत विरुद्ध अमेरिका आहे हे मला व्यक्तिश: वाटत नाहीये. ज्यांना वाटतोय त्यांनीच भा.वि.अ. अशा भूमिकेतून उत्तरे दिली आहेत. वर कोणीतरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल विचारलंय, तर न्यू यॉर्क सारख्या शहरात वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. पण बाकीच्या मध्यम शहरांत व कमी लोकवस्तीच्या ठिकाणी बोंब आहे. त्याविषयी चर्चा असेल तर ही गोष्ट पण निघेलच. पण मग रस्ते व महामार्ग, ट्रॅफिक सेन्स, प्रदूषण यांची पण तुलना होईल. >> मग होऊ देत की तुलना. तुलना करतांना तटस्थ भाव असेल तर पटते, झुकलेली भावना असेल तर ती तुलना नव्हे तर भलामण होते... भलामणही मान्य पण भारताबद्दल तुच्छ भाव ठेवणे पटत नाही. जसे वर 'बडगा दिसतो' वरुन 'आमच्यावर आरोप झाले' असे म्हटले आहे तसेच आता आमच्या भारतवासी लोकांवर तुच्छपणे केलेली विधाने आम्ही ऐकून तर घेणार नाहीच. स्पष्टच बोलतो. आम्ही बाहेरच्या देशात का राहतोय हे दुसऱ्या कोणाला पटवून द्यायची आम्हाला काही गरज नाहीये. आम्ही इतर देशांत राहून फार काही ग्रेट काम करतोय किंवा आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ असे म्हणत नाही किंवा तशी आमची समजूतही नाही. >> हेच ते नविन बांगड्या नाचवून दाखवणे... नोबडी केअर्स बंधो! रिअली नोबडी केअर्स. तुम्ही इथे राहता का तिथे राहता.. जिथे राह्याचे तिथे राहा.. तुमच्या स्वतःशिवाय इतर कुणालाही काही फरक पडत नाही. पण जेव्हा अशा समस्या चर्चेला घ्याला तेव्हा भारताबद्दल बोलतांना तारतम्य असलेलं बरं असतं. स्वतःच समजून घ्यायचं की आपण बाहेरच्या देशात राहतो तर देशी लोक आपल्यावर जळतात, मग त्या जळकुट्यांना उच्चनैतिक भाषेत आपली भूमिका सांगायची.. रिअली नोबडी केअर्स. इथे भरत जाधवच्या मुलाखतीतले एक वाक्य आठवले, तसे ते माझ्या नेहमीच आठवणीत असते, आपल्या विचारांवर चेक राहायला. भरत चाळीतून, तशा परिस्थितीतून वर आला, नामवंत झाला. तेव्हा त्याचे चाळीतले काही मित्र त्याला टाळायला लागले. त्याचे कारण त्याला समजले ते असे की ते मित्र असे समजत होते, की आता हा भरत मोठा, श्रीमंत, नामवंत झाला आता आपल्यासारख्या भणंगांना का भाव देइल, का मित्र मानेल, कसा काय पुर्वीसारखा वागेल. त्यावर भरतचे म्हणणे असे की त्यांची स्वतःची जशी मनोवृत्ती होती, तसाच ते विचार करत होते, भरत त्या जुन्या मित्रांबद्दल काय विचार करतो हे त्यांनी भरतला विचारलेच नाही. "ते भरत सारखे मोठे झाले असते तर त्यांनी सामान्य मित्रांसोबत जसे वागले असते तेच भरत करतोय" असं त्यांनी त्यांचे वाटून घेतलं. स्वतःच्या सुप्तविरोधी मनोवृत्तीला समोरच्या विरोधकावर लादून तो तसाच विचार करतो वागतो असे मानणे चुकीचेच. आम्ही ज्या देशात राहतो तिथले प्रॉब्लेम्स पण आम्ही बोलतोच. माझा मेडिकल इन्शुरन्सच्या अनुभवाचा हा धागा वाचा. इथली ही व्यवस्था कशी गंडलेली आहे हे सांगितलं आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं आणि जिथे सुधारणेची गरज आहे तिथे काय सुधारणा हवीये हे सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग तो कुठलाही देश असो! >> बोलता तर बरं आहे की! त्या धाग्यावर कुणीतरी येऊन "इतके प्रॉब्लेम आहेत तरी काय त्या अमेरिकेला राहता, त्यापेक्षा बघा आमचा भारतच बरा!" अशा अर्थाचे काही बोललंय काय, तसं नसेल तर "अ‍ॅप्रोच" काय अस्तो हे लक्षात येईल. "जिथे सुधारणेची गरज आहे तिथे आम्ही बोलतो तर काय वाईट" हा अनडिफिटेबल डिफेन्सीव स्टान्स आहे. सुधारणेचा चान्स आहे तिथे आम्ही बोलतो हे त्याच समस्यांना कंटाळून इथून जाणार्‍यांनी बोलणे विसंगत आहे. सुधारणेचा चान्स आहे तर तुम्ही त्यात काय भूमिका बजावता आहात हा प्रश्न येणारच. इथल्या बेशिस्त ट्रॅफिकमधे मी जर शिस्तीत गपगुमान गाडी चालवत असेल तरी मला आज अधिकार आहे की मी सुधारणा करत आहे म्हणण्याचा.. तो अधिकार बेशिस्त वाहतुकीला कंटाळून कायमचे परदेशी स्थाइक होणार्‍याला नाही. हे स्पष्ट असलेले बरे. अमेरिकेने त्यांची देशांतर्गत वाहतूक कशी ठेवावी याबद्दल इथल्या भारतीयांना बोलायचा अधिकार नाही तसेच तिथल्यांनाही इथे बोलायचा अधिकार नाही प्राप्त होत. बाकी, टेराबायटी म्हणून हिणवलेल्या माझ्या प्रतिसादाला आलेल्या तुमच्या प्रतिसादाला जरा वेळाने उत्तर देतो.. तिथेही आपण असेच "आ बैल मुझे मार" करुन ठेवले आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by लीना कनाटा on Fri, 02/24/2017 - 05:29

Permalink

मिपा आणि मुपि, काही फरक नाही. हमेरिकेवर धागा आला कि कल्ला झालाच.

मिपा काय आणि मुपि काय, काही फरक नाही. हमेरिकेवर धागा आला कि कल्ला झालाच. बा म्हाराजा रवळनाथा आम्ही मिपाकर गाऱ्हाण घालतो. ज्यांची इच्छा असलं त्यांना हमेरिकेला जावक मिळू दे रे. जी काय त्यांची मनोकामना आसा ती पूर्ण कर. ह्या लेकरांचा कल्याण कर. मलाबी हमेरिकेला जाऊन दे... तुका अशा १०० धाग्यांचा निवद देईन रं बा.... ता ध्यानात ठिव रे म्हाराजा ...
  • Log in or register to post comments

Submitted by वेशीवरचा म्हसोबा on Fri, 02/24/2017 - 10:36

Permalink

हा लेख सल्ला मागण्यासाठी

हा लेख सल्ला मागण्यासाठी लिहीण्यासाठी लिहीला असेल असे वाटत नाही. "मी २ वर्ष अमेरिकेत राहत आहे हे सांगणे" इतकेच या लेखाचा सुप्त उद्देश असावा असे वाटते. लेखातील वर्णनावरुन लेखिका आपल्या नवर्‍यासोबत डीपेंडंट व्हिजावर अमेरीकेला गेली असावी असावी असा कयास आहे. तसं असेल तर ग्रीन कार्ड बहोत दूर हैं. हे आपलं उगाचच स्वतःभोवती आरती ओवाळणं वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 02/24/2017 - 10:54

In reply to हा लेख सल्ला मागण्यासाठी by वेशीवरचा म्हसोबा

Permalink

तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल

तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल चालु आहे आणि अजुन माझा डिपेंडंट व्हिजा निघत नाही म्हणजे काय... जीव भांड्यात पडला हो! डिपेंडंट व्हिजा, तो ही गेल्या २४ तासात अ‍ॅक्टीव्ह झालेल्या आयडीने काढणे.. सगळं कसं अगदी पद्धतीने चालु आहे. और आंदो!! माझा अप्रतिम टाईमपास होतोय ह्या धाग्याने. - (डिपेडंट व्हिजावासी, नवर्‍याच्या जीवावर आयतं गिळणारी, हिरवा माज असलेली आणि टोटली कामधाम नसलेली) पिरा!
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 02/24/2017 - 11:04

In reply to तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल by पिलीयन रायडर

Permalink

तुम्ही

तुम्ही काहि प्रतिसाद इन्गोर केले तर होणारा त्रास कमी होईल असा आपुलकीचा सल्ला ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 02/24/2017 - 11:14

In reply to तुम्ही by धर्मराजमुटके

Permalink

नाही हो!! त्रास बिस अजिबात

नाही हो!! त्रास बिस अजिबात नाही!! माझा प्रश्न केव्हाच मागे पडलाय. हा धागा त्याबद्दल उरलेलाच नाही आणि मलाही त्याबद्दल ठेवायचा नव्हताच. मिपावर खुप आहेत माझ्या सारखे, ह्या मनस्थितीत अडकलेले. ज्याला दिशा दाखवतील असे लोकही इथेच आहेत. आणि ती चर्चा चालुच आहे. मला तिच्याशी मतलब. मी मतं मांडणारी मिपाकर आहे, पिंका टाकत फिरणारी नाही. बाकी हे डिपेंडंट व्हिजा वगैरे म्हणाल तर खरंच आहे की ते! सध्या मी नवर्‍याच्या जीवावर इथे आलेय हे सत्यच आहे. आणि अगदी मनसोक्त ऐशही करतेय. असं आयुष्य मिळायलाही नशिब लागतं!! त्यामुळे लोकांची का जळते हे ही समजु शकते मी. =)) तुमच्या मनापासून दिलेल्या सल्ल्यासाठी आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 02/24/2017 - 11:19

In reply to नाही हो!! त्रास बिस अजिबात by पिलीयन रायडर

Permalink

माझा प्रश्न केव्हाच मागे पडलाय.

ते ही खरेच म्हणा ! द मोअर यु गेट पर्सनल, द मोअर यु गेट युनिव्हर्सल. :) :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 02/24/2017 - 11:14

In reply to तुम्ही by धर्मराजमुटके

Permalink

त्रास ? कसला? कुणाला? ;)

त्रास ? कसला? कुणाला? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वेशीवरचा म्हसोबा on Fri, 02/24/2017 - 11:35

In reply to त्रास ? कसला? कुणाला? ;) by अभ्या..

Permalink

बरोबर...

एनी पब्लिक शीट्टी इज गुड पब्लिक शीट्टी. ये दिल मांगे मोर आणि लांडोर. म्हणून तर त्या म्हणत आहेत "और आंदो!!".
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Fri, 02/24/2017 - 23:32

In reply to बरोबर... by वेशीवरचा म्हसोबा

Permalink

अगं बाई, पलिकडच्या वेशीवरचे

अगं बाई, पलिकडच्या वेशीवरचे म्हसोबा का तुम्ही? ईष्टाईल ओळखीची आहे आमच्या ;) काय म्हणताय? कसं चाललंय?
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 02/24/2017 - 11:09

In reply to तरीच म्हणलं २५० कडे वाटचाल by पिलीयन रायडर

Permalink

<<<<तो ही गेल्या २४ तासात अ

<<<<तो ही गेल्या २४ तासात अ‍ॅक्टीव्ह झालेल्या आयडीने काढणे>>> -- मिपावर हा प्रकार काय आहे? जुन्या आयडींची मत्तेदारी आहे का? मला तरी हा उद्धटपणा वाटतो. इथे सर्व मिपा सभासद सन्मानीय आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 02/24/2017 - 11:14

In reply to <<<<तो ही गेल्या २४ तासात अ by विशुमित

Permalink

बरं! =))

बरं! =))
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 02/24/2017 - 11:01

Permalink

वर कोणीतरी

वर कोणीतरी आरक्षण ह्या एकाच कारणासाठी भारत देश सोडून परदेशात वास्तव्य केले पाहिजे असे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. आरक्षण का दिले आहे याच्यावर जालावर भरपूर चर्चा झालेली आहे. मत तपासण्याची इच्छा असलेल्याने त्या जरुर वाचाव्यात. मात्र अमेरीकेत जाणवणारा एक मोठा धोका इथे कोणत्याही प्रतिसादात आला नाही व तो म्हणजे वंशवादी हल्ले. कालच एका भारतीयाची कँसस शहरात गोळ्या घालून हत्या झाली. असे प्रसंग अमेरीका आणि कॅनडा येथे अधूनमधून घडत असतात. अर्थात त्यात चुक कोणाची यावर पाहिजे तितक्या चर्चा होऊ शकतात. मात्र गोर्‍या लोकांना कोण आशियायी, कोण पाकीस्तानी कोण भारतीय, कोण शिख कोण मुसलमान असे भेद ओळखता येत नाही हे वारंवार स्पष्ट झाले आहे. गोरी चमडी ग्रेट हा विचार फक्त आपल्याच नव्हे तर बहुसंख्य गोर्‍यांच्या मनातही अजून टिकून आहे आणि कितीही उच्च प्रकारचे शिक्षण घेतले तरी त्यात बदल होईलच असे नाही. मात्र ही उदाहरणे संख्येने थोडीसीच असली तरी बहुसंख्य जनता मनमिळाऊ देखील आहे हे ही नाकारता येत नाही. मात्र वाईट प्रसंग आपल्यावरच गुदरला तर टक्केवारीच्या गणितामुळे आपल्या मनाचे समाधान होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे ! अर्थात असे वाईट प्रसंग भारतात तुमच्या वाट्याला येणार नाही याचीही खात्री नाही देता येत आजकाल ! दुसरा मुद्दा असा की बहुतांश परकीय देशाचे नागरीक अमेरीकेत गेले की घेट्टोमधेच राहतात त्यामुळे ते स्थानिक संस्कृतीशी किती प्रमाणात मिसळून असतात हे ही तपासणे गरजेचे आहे. अर्थात जीवाची सुरक्षितता हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे त्यात काही गैर आहे असे अजिबात नाही पण मग संस्कृती संस्कृती असे किती दिवस ओरडत फिरायचे ते आपापल्या मनाला विचारणे गरजेचे आहे. सबब कोठेही रहा, सुरक्षित रहा आणि माणसे जोडून रहा. सिर सलामत तो पगडी पचास हा प्रतिसाद कोणाला हतोत्साहित करण्यासाठी नाही. (तेव्हढी माझी लायकी देखील नाही म्हणा !) तसेच मी कधीही परदेशी राहिलेलो नाही त्यामुळे माझी माहिती केवळ ऐकीव आहे मात्र त्या माहितीचे शवविच्छेदन मी माझ्या मगदुराप्रमाणे करीत आहे याची कृपया नोंद घ्यावी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 02/24/2017 - 11:25

In reply to वर कोणीतरी by धर्मराजमुटके

Permalink

सर...

अगदी हेच लिहण्यासाठी घेणार होतो... आताच वंशवादाची बातमी वाचली आणि मन खरंच हादरलं. http://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-shot-dead-at-a-bar-in-kansas-in-us-1418205/ मी मागे कुटुंबासहित गावाकडून हडपसर (पुणे) येथे राहायला आलो होतो. जेमतेम ३-४ दिवसच झाले असतील येऊन, गाडी पार्किंग वरून तेथील स्थानिक मुलाशी माझी अगदी तुरळक शाब्दिक बाचाबाची झाली. त्यात चूक त्याचीच होती पण म्हणतो कसा इथे राहायचं असेल तर गपगुमान राहायचं नाहीतर चालतं व्हायचं इथल्या एरिया तुन. हे ऐकून मी हबकलोच. (हे जर तो माझ्या गावात म्हणाला असता तर आमची भावकी काठ्या कुराडी घेऊनच धावल्या असत्या) मी पुढच्या आठवड्यात तिथलं वास्तव्य बदललं. सर सलामत तर पगडी पचास.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 02/24/2017 - 11:50

In reply to सर... by विशुमित

Permalink

"अपनी गली मे कुत्ता शेर" हे

"अपनी गली मे कुत्ता शेर" हे खरे असले तरी एक फरक असा आहे की "आमचा देश सोडुन जा" हे म्हणु शकेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 02/24/2017 - 12:43

In reply to सर... by विशुमित

Permalink

दोन घटनांची तुलना होऊ शकत

दोन घटनांची तुलना होऊ शकत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 02/24/2017 - 12:47

In reply to दोन घटनांची तुलना होऊ शकत by संदीप डांगे

Permalink

जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे

जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे असते तर झाली असती का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 02/24/2017 - 12:56

In reply to जर विशूमित महाराष्ट्राबाहेरचे by सतिश गावडे

Permalink

तरीही नाही...

तरीही नाही... वंशभेदावर आधारित भांडणे आणि जागा-हक्कांवरुन होणारी भांडणे यात मूलभूत फरक आहे. अमेरिकन गोर्‍याने भारतीय मुलाला गोळी घालणे, मारहाण करणे ही ती घटना आहे. माझ्या देशातून चालता हो असे कोण्या अमेरिकननाने कोणा युरोपियनास म्हटले आहे काय हे शोधावे लागेल... तसे काही घडलेले असेल तर माझे विचार बदलून घेइन... "बाहेरचे येऊन आमचे हक्क खातात" असे जेव्हा अमेरिकन बोलतात तेव्हा त्यात काळे किती असतात आणि 'बाहेरचे' ह्या त्यांच्या संज्ञेत युरोपियन्/ऑस्ट्रेलियन्/गोरे असतात काय ह्या दोन प्रश्नांचे उत्तर मला मिळाले तर हवे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 02/24/2017 - 13:35

In reply to तरीही नाही... by संदीप डांगे

Permalink

मुद्दा समजला. अशा घटनांमागे

मुद्दा समजला. अशा घटनांमागे वंशश्रेष्ठत्वाचाही मुद्दा असू शकतो हे नव्याने कळले. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 02/24/2017 - 13:44

In reply to मुद्दा समजला. अशा घटनांमागे by सतिश गावडे

Permalink

नवाच मुद्दा !

क्रमांक १७५७ !
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 02/24/2017 - 14:47

In reply to नवाच मुद्दा ! by संजय क्षीरसागर

Permalink

होय. हा नविनच मुद्दा आहे.

होय. हा नविनच मुद्दा आहे. पटकन आता एखादं छानसं गुलाबी रंगातील वाक्य असलेला परिच्छेद लिहून हा मुद्दा कसा चुकीचा आहे ते लिहा पाहू.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 02/24/2017 - 15:03

In reply to होय. हा नविनच मुद्दा आहे. by सतिश गावडे

Permalink

तुमच्या ही लक्षात येऊ नये म्हणजे कमाले !

हा मुद्दा कसा चुकीचा आहे ? मुद्दा बरोबरचे. पण असले १९५७ मुद्दे इथल्या सदस्यांनी मांडलेत त्यामुळेच तर गोंधळ वाढतोयं. आणि इतक्या गोंधळात निर्णय कसा घ्यावा हे मी सांगतोयं !
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Fri, 02/24/2017 - 15:09

In reply to तुमच्या ही लक्षात येऊ नये म्हणजे कमाले ! by संजय क्षीरसागर

Permalink

एक प्रश्न!

एक प्रश्न! सदस्यांनी जर १९५७ मुद्दे मांडले असतील तर "मुद्दा क्र. १७५७" हा नवीन कसा काय असू शकतो?? ;) कुछ तो गडबड है!!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 02/24/2017 - 15:23

In reply to एक प्रश्न! by शब्दबम्बाळ

Permalink

आधीच १७५६ झाले होते

आता हा वांशिकहत्येचा १९५७ !
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 02/24/2017 - 14:57

In reply to तरीही नाही... by संदीप डांगे

Permalink

........गोरे असतात काय

........गोरे असतात काय
खुप चांगला प्रश्न आहे. वंशभेदा वरचा प्रश्न आला की एक हमखास उत्तर ऐकायला येते "आम्हाला तर असा अनुभव कधीच आला नाही , उलट........". तुमच्या अगदी जवळचा माणूस असेल तरच खर्‍या गोष्टी समजु शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 02/24/2017 - 15:10

In reply to तरीही नाही... by संदीप डांगे

Permalink

डांगे जी..

<<<वंशभेदावर आधारित भांडणे आणि जागा-हक्कांवरुन होणारी भांडणे यात मूलभूत फरक आहे.>>> -- सहमत आहे. माझे उदाहरण "माझ्या देशातून चालते व्हा" फक्त यासाठीच होता.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 02/24/2017 - 23:43

In reply to डांगे जी.. by विशुमित

Permalink

तुमचे उदाहरण, हे "माझ्या

तुमचे उदाहरण, हे "माझ्या देशातून चालते व्हा" ह्या साठी धरता येणार नाही. ते "माझ्या देशात आहेस ते माझ्या हुकूमाप्रमाणे, आश्रित म्हणून गप ऐकायचं" ह्या प्रकारात येतं.. इथे आधीच तिथे राहत अस्लेली व्यक्ती प्रस्तुत जागेला आपले वर्चस्व असलेली जागा समजत असते, त्या क्षेत्रात नवीन येणार्‍यांनी आपल्या "आधीपासून राहत असल्याने येणार्‍या कथित श्रेष्ठते"समोर मान तुकवली पाहिजे, आपली सत्ता मान्य केली पाहिजे अशी आदीम प्रेरणा असते. त्यामुळेच इथे राहायचं असेल तर नीट राहायचं, (नाहीतर माझ्याशी गाठ आहे, मी इथला सत्ताधारी आहे, तुला त्रास होईल अशा अर्थाने, -तुला हुस्कून लावील- अशा अर्थाने नाही) असे म्हटले जाते. त्याची इच्छा जरी असेल तरी तो तुम्हाला हुस्कवून लावू शकत नाही हे त्याला पक्के माहित आहे, काही झालं तरी मला ह्या नवीन माणसासोबत राहायचेच आहे हे त्याने स्विकारलेले असते. फक्त राहतांना माझ्या आधीच्या जीवनशैलीत याच्यामुळे येणारा बदल त्याला सहन होत नाही, तेवढा तो दूर करु इच्छितो.. हा फरक जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर अशी दादागीरी, वर्चस्व दाखवणार्‍यांसोबत दिलखुलास मैत्री करावी.... त्याला उगाच येताजाता मान द्यावा, हाय हॅलो करावे, कसे काय अनौपचारिक बोलावे, मैत्री वाढवावी... महिनाभरात तो तुमची दुसर्‍या मित्राला आपला "जिगरी दोस्त" म्हणून ओळख करुन देईल... पण हेच वंशभेद मानणार्‍या शेजार्‍यासोबत घडेल काय याबद्दल अंदाज करावा... माझ्या देशातून चालते व्हा म्हणजे आम्हाला तुमची गरज नाही, तुम्ही इथे राहावे अशी आमची इच्छा नाही, तुम्ही आश्रित बनून येता आणि आमच्या डोक्यावर बसता हे आम्हाला पटत नाही, तुमच्यामुळे आमची आयुष्य वाईट झाली आहेत, त्यास्तव तुम्ही इथून नष्ट होणेच श्रेयस्कर... माझ्या देशातुन चालते व्हा म्हणतो तेव्हा खरेतर माझ्या देशातून नष्ट व्हा असे मला म्हणायचे असते... मला तुमच्या भल्याचा कोणताच विचार नकोय.. मी फक्त माझाच विचार करणार कारण हा देश माझ्यासारख्या लोकांसाठी आहे, तुमच्यासारख्या (काळ्या, मिडल-इस्टर्न, आशियाई, आफ्रिकी, भिकमंग्या देशातून आलेल्या, आमच्यासारखे न दिसणार्‍या) लोकांसाठी नाहीये... आम्हाला अशा लोकांसोबत राहायची सवय नाही, इच्छा तर अजिबात नाही. मजबूरीत करुन घेणारही नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sat, 02/25/2017 - 14:10

In reply to तुमचे उदाहरण, हे "माझ्या by संदीप डांगे

Permalink

शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या

शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या देशातून चालते व्हा" याचा अर्थ व्यवस्थीत उलगडुन दाखवला आहे. पण जो काही अर्थ काढला आहे तो अतिशय अपमानास्पद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 02/25/2017 - 14:17

In reply to शेवट्च्या परिच्छेदात "माझ्या by मराठी_माणूस

Permalink

नाही समजले? माझे काही चुकले

नाही समजले? माझे काही चुकले का?
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Fri, 02/24/2017 - 13:48

In reply to सर... by विशुमित

Permalink

काय राव

असलं सर सलामत वैग्रे प्रतिसाद अपेक्षित नव्हते :::)))जहाँ रहो बिनधास्त रहो
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 02/24/2017 - 14:57

In reply to काय राव by वरुण मोहिते

Permalink

सर सलामत...

हा प्रतिसाद मला उद्देशून असेल तर मी त्यामध्ये "मी कुटुंबासहित" असा उल्लेख केला आहे, त्यामुळे असा रिस्पॉन्स दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Fri, 02/24/2017 - 14:08

Permalink

बरीच चर्चा झाली

मुळात वैयक्तिक प्रश्नावर धागा असला कि अनेक वेगवेगळे प्रतिसाद येणार . त्यामुळे असा प्रतिसाद दिलाच कसा, असं कोण बोलंच कसं ,एखादा बोला तर आताच आलेला आयडी आहे ,हे सगळं बोलणं व्यर्थ आहे .कारण धागा आपण काढत असतो. आणि स्पष्टीकरण कशाला शिक्षण विचारलं त्यावर बोली कि लोकं. बाकी मुद्दे गैरलागू . त्यामुळे हवा कशी छान नाही, धूळ आहे वैग्रे,तर अत्यंत गैरलागू . काही फरक नसतो प्रत्येक माणसाला आपला देश आवडतो हे अंतिम सत्य आहे जगात कुठलाही माणूस असो . त्यासाठी फार काही सुविचार वैग्रे वाचण्याची गरज नाही . आज त्याच पगारावर समान वेतन असताना आपण भूतान ला गेला असतात का ? तिथेही हवा स्वच्छ आहे ,शांत देश आहे ,लाच द्यावी नाही लागत .त्यामुळे मनी मॅटर्स. साधा अप्रोच . सगळं ओके. कशाला विचार करायचा इतका .
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Fri, 02/24/2017 - 23:17

In reply to बरीच चर्चा झाली by वरुण मोहिते

Permalink

योग्य प्रतिसाद...

भूतान असेल तर मग हे सगळं कसं काय म्हणता येणार ...
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Sat, 02/25/2017 - 12:54

In reply to योग्य प्रतिसाद... by अभिदेश

Permalink

तशी शुद्ध हवा तर आमच्या

तशी शुद्ध हवा तर आमच्या वाडीमध्ये पण आहे. पण इथे कोणी येत नाही राहायला. शाळापण अगदी हवेशीर, मुलाला जसे शिकायचे आहे तसे शिकून देणारी, पण इथे कोणी येत नाही राहायला. ३-४ जराश्या गाई नीट सांभाळल्या तर CA च्या पगाराला पण ऐकणार नाही पण इथे कोणी येत नाही राहायला. सण सूद तर चालूच असतात वर्षभर पण इथे कोणी येत नाही राहायला. ७-८ खोल्या भले मोठं अंगण पण इथे कोणी येत नाही राहायला. पेरणी करणे, लागवड करणे, खुरपणी करणे आणि पाणी देणे एवढे कामे केली की निवांतच वेळ छंद का काय जोपासण्यासाठी पण इथे कोणी येत नाही राहायला. (आता म्हणू नका आमच्याकडे शेती नाही म्हणून, अहो कोट कोट देऊन फ्लॅट घेण्या पेक्षा ४-५ एकर शेती घेऊन बघा लय मज्जाय शेतीत)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 02/25/2017 - 13:05

In reply to तशी शुद्ध हवा तर आमच्या by विशुमित

Permalink

खरे आहे हो! नाशकातल्या

खरे आहे हो! नाशकातल्या आयटीमध्ये अनेक संधी आहेत, पगारही आहेत मग लोक का येत नाहीत इथे? तर हैदराबाद-बेन्गलोर-पुण्या-मुंबईसारखे ग्लॅमर नै म्हणून... मोठ्या कंपन्या येत नाहीत कारण मोठ्या पदावर नोकरी करणारं पब्लिक येणार नाही म्हणून... छोट्या पदावरचे पब्लिक येत नाही कारण मोठ्या कंपन्याच नाहीत म्हणून... असं सगळं त्रांगडं आहे... काय की खरं बोललं तर राग येतो लोकांना, पण सत्य तर हेच आहे. ग्लॅमर नाही म्हणून.. गावाकडे जायचं नसतं. ग्लॅमर आहे तिथे धूळ, प्रदूषण, ट्रॅफिकची कारणं.. बाकी पैसा कमवायचा तर हजार मार्ग आहेत. हुशार लोकांना संधींची कमतरता कुठेच नसते. पण एकूण बहुसंख्य भारतीयांचे जे सायकॉलॉजिकल कन्डिशनिंग झाले आहेत ते बघता ही चाकोरी सोडणे परदेशी जाण्यापेक्षा जास्त कठिण आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 03/02/2017 - 13:11

In reply to खरे आहे हो! नाशकातल्या by संदीप डांगे

Permalink

काहीच्या काहीच. जर मला नाशकात

काहीच्या काहीच. जर मला नाशकात नोकरी मिळाली असती तर मी पुण्याऐवजी नाशिकमधे घर घेतले असते. जिथे संधी मिळते तिथे लोक जातात. खूप लोक आले की मग ग्लॅमर वगैरे येते. पण एकूण बहुसंख्य भारतीयांचे जे सायकॉलॉजिकल कन्डिशनिंग झाले आहेत ते बघता ही चाकोरी सोडणे परदेशी जाण्यापेक्षा जास्त कठिण आहे... हे काय असच जनरलायझेशन का ?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 02/25/2017 - 13:11

In reply to तशी शुद्ध हवा तर आमच्या by विशुमित

Permalink

हे खरं आहे का?

गावाकडील जीवन फक्त नाटक-सिनेमात गोग्गोड दिसतं, बाकि तिथे जीव हैराण व्हायचे चान्सेस जास्त असच सांगतात आमचे परिचीत. तुम्ही म्हणता तसं खरच असेल तर हा मार्ग नक्कीच एक्स्प्लोर करायला लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Sat, 02/25/2017 - 15:46

In reply to हे खरं आहे का? by अर्धवटराव

Permalink

तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे

तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे अनुभव कशाला घेताय स्वतः घेऊन बघा मज्जा येईल. जे तुम्हाला पाहिजे ना ते सगळे मिळू शकते गावाकडे. पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या गाईचे दूध, स्वतः उगवलेली सेंद्रिय भाजी- पाला, रानमेवा, स्वच्छता, मनोरंजन, सणवार, जीवा-भावाची माणसे, छंद जोपासायला आणि कुटुंबासाठी वेळ, भरपूर जागा, मस्त पोहायला विहिरी, गप्पा टप्पा, राजकारण, समाजकारण, वाचन, मद्यशाला आणि जोडीला स्मार्ट फोन्स आहेतच की. पण तरी ही इथे कोणी येत नाही राहायला. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना देखील आपण त्या बाहेरच्या देशात शोधतो. (मला नेहमी आमटे कुटुंबाचा कुतुहूल वाटतं जंगलात राहून जागतिक कीर्तीची माणसे घडली)
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 03/02/2017 - 13:12

In reply to तेच म्हणतोय मी दुसऱ्यांचे by विशुमित

Permalink

पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या

पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या गाईचे दूध, स्वतः उगवलेली सेंद्रिय भाजी- पाला, रानमेवा, स्वच्छता, मनोरंजन, सणवार, जीवा-भावाची माणसे, छंद जोपासायला आणि कुटुंबासाठी वेळ, भरपूर जागा, मस्त पोहायला विहिरी, गप्पा टप्पा, राजकारण, समाजकारण, वाचन, मद्यशाला आणि जोडीला स्मार्ट फोन्स आहेतच की. हॅ हॅ हॅ. हे सगळे शहरात पण मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/02/2017 - 14:50

In reply to पैसा, शुद्ध हवा, सकस घरच्या by अप्पा जोगळेकर

Permalink

मी कुठे म्हणालो शहरात हे मिळत

मी कुठे म्हणालो शहरात हे मिळत नाही ते ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com