मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

पिलीयन रायडर · · काथ्याकूट
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.

वाचने 119441 वाचनखूण प्रतिक्रिया 340

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 14:17
३-४ जरश्या गाई नीट सांभाळल्या तर CA च्या पगाराला पण ऐकणार नाही पण इथे कोणी येत नाही राहायला. --- जर हे सत्य असेल तर अशी एखादी व्यक्ती दाखवा. मला आवडेल त्या व्यक्तीला भेटून हे कसे साध्य केली ते समजून घ्यायला.

In reply to by अभिजीत अवलिया

विशुमित Sat, 02/25/2017 - 15:25
तुम्ही ३-४ गाईचा हिशोब शब्दशः घेतलेला दिसतोय म्हणून हा प्रश्न केला असावा असा अंदाज आहे तरी सुद्धा सरळ साधा हिशोब मांडूयात.. व्यक्ती कशाला दाखवायला लागतोय.. दूध : 4 गाई X ३५ लिटर X रु.२५ दर X ३० दिवस = रु. १,०५,००० प्रति महिना खर्च : रु. ३०,००० प्रति महिना घरच खाद्य गृहीत जरी धरला तरी रु. ७५,००० शिल्लक राहतील. आहे का नवीन CA एवढा पगार. तरी शेण आणि वासरे धरली नाहीत. दूध संघवाले बोनस पण जाहीर करतात. एकूणच काय आहे १५० लिटर दूध रोज घातलं ना खर्च जाऊन ६०-७० हजार आरामशीर कमवू शकतो. पण दूध धंदा नीट केला पाहिजे.

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 15:48
माझ्या माहितीप्रमाणे आणी आमच्या कुटुंबातील गाई म्हशी सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवाप्रमाणे जर्सी गाय भारतातील वातावरणात ३५ लिटर दूध दर दिवशी देत नाहीत. त्या जास्तीत जास्त १५ लिटर दूध देतात. तसेच एक गाय वर्षातील १० महिने (सरासरी) दूध देते. ४(गाई) * १५(दर दिवशीचे दूध) * २५(दुधाचा दर) * ३०(महिन्यातील दिवस) * १०(महिने) = ४५००००/वार्षिक म्हणजे मासिक उत्पन्न ३७५००. खर्च : रु. ३०,००० प्रति महिना ----------------------------------- उत्पन्न ७५००/महिना हे एक गाय १५ लिटर दूध देईल असे समजून केलेली आकडेमोड. लसीकरण व इतर गोष्टींचा खर्च धरलेला नाही.

In reply to by अभिजीत अवलिया

विशुमित Sat, 02/25/2017 - 16:01
तुम्ही ३-४ गाईंचा शब्दशः अर्थ घेणार हे मी गृहीतच धरलं होतं. हवे तर 'वर्षभर ३-४ दुभत्या गाई' असा घ्या. तरी आमच्या गावात ५० लिटर देणाऱ्या ३ टाईम दूध काढावे लागणाऱ्या गाई आहेत. १५ लिटरच्या गाई सहसा आम्ही ठेवत नाही. खर्चा मध्ये मी स्वतःच्या शेतातला चाऱ्याचे पैसे धरले नाहीत. लसीकरणाला कसा काय खर्च येतो. माझं म्हणणं हेच आहे की जर १५० लिटर रोज दूध गेले तर खर्च जाऊन ६०-७० हजार मिळतीलच. आता दुधाचे भाव पण वाढवले आहेत मायबाप सरकार ने मागच्या महिन्यापासून.

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 16:33
माझे मामा (पश्चिम महाराष्ट्रात) शेती करून गाई म्हशी सांभाळतात. त्यांनी जर्सी गाई सांभाळून बघितल्या होत्या. कितीही पौष्टिक खायला घातले तरी ऍव्हरेज १० लिटरच्या वर दूध मिळत न्हवते. वर ह्या गाई वातावरणात थोडा जरी बदल झाला की आजारी पडत होत्या. कंटाळून त्यांनी विकून टाकल्या. म्हणूनच मी विचारले होते की जो कुणी एवढे उत्पन्न मिळवत असेल अशा व्यक्तीला भेटायला आवडेल. १५० लिटर दूध दर दिवशी जायचे असेल तर एक तर खूप जास्त दूध देणाऱ्या गाई हव्यात किंवा किमान १५-२० गाई सांभाळाव्या लागतील. आणी एवढ्या गाई सांभाळायच्या म्हणजे एकट्याचे काम न्हवे. किमान एक तरी गडी ठेवावा लागेल त्यांची निगा राखायला. परत त्या गड्याचा खर्च (पगार वगैरे) वेगळा आलाच.

In reply to by अभिजीत अवलिया

विशुमित Sat, 02/25/2017 - 17:02
वर मी लिहलंय ५० लिटर एवढे दूध देणाऱ्या गाई ही आहेत, स्वतः माझ्या गावात आहेत. "दूध धंदा "नीट" केला तर" हे पण नमूद केले आहे त्यामुळे आजारी पडणे, वगैरे सगळे गृहीत धरूनच मी वक्तव्य केले आहे. मी व्य नि करतो तुम्हाला, पुण्यामध्ये राहत असाल तर आमच्या गावाला घेऊन जातो तुम्हाला. १५० लिटर दूध जायचं असेल तर लागातार दूध देणारी ४ गाई लागतीलच. त्याच बरोबर बॅकअप साठी ३ एक गाई गाभण लागतात. आता तर दुध काढायचं मशीन आणि कुट्टी मशीन कडबा कुटण्यासाठी वापरतात. 'बारली'च एक टेम्पो भरून आणला की २-३ आठवडे जातो. नवरा बायको सकाळी ६ वाजता कामाला लागली तर १० वाजे पर्यंत मोकळे. पाणी-पाजण्याची सोय तर गव्हानीतच होते. संध्याकाळी ४ ला परत कामाला लागलं तर ८ पर्यंत जेवून खाऊन भजनाला जायला मोकळे. त्यामुळे नवरा-बायको सुद्धा ७-८ गाई सांभाळू शकतात. पण कष्ट मात्र आहे बरका. (आता मोठा प्रश्न शहरातील आणि गावातील आजकालची पोरं-पोरी शेणात हात घालतील का?)

In reply to by विशुमित

विशुमित Sat, 02/25/2017 - 17:05
माझ्या डोळ्या देखत माझ्या मित्राने फक्त दूध धंद्यातून ३५ लाखाचा नेत्रदीपक बंगला बांधला आहे.

In reply to by विशुमित

अभ्या.. Sat, 02/25/2017 - 17:17
सहमत, दूध धंदा जब्बरदस्त पैका देतो. फक्त टिच्चून करायला पायजे. लाज सोडली पाहीजे. माझ्या घरासमोर एक गवळी आहे. १५ कीमी लांब असलेल्या गावी म्हशी आणि गायी आहेत. पहाटे पहाटे छोट्या हत्तीतून कॅन्ड येतेत. तो स्वतः डेरीला वगैरे घालून येतो दूध. बायको अ‍ॅक्टीव्हावर फिरत कॉलनीला छोटे कॅन देत पोराला ईंग्लिश मिडीयमला पण सोडून येते. एकुलते एकच पोरगे आहे पण सुट्टीच्या दिवशी छोट्या सायकलवरुन तोही कॅन देतो घरोघरी. दुपारी बारीक केलेली पेंड वगैरेची घमेली रिकाम्या कॅन्डासहीत छोट्या हत्तीतून परत जातात. नोकरी न करता अगदी सुखवस्तू लाईफ चाललेले असते.

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 19:55
व्य.नि.केलाय तुम्हाला. लवकरच भेटू. (आता मोठा प्रश्न शहरातील आणि गावातील आजकालची पोरं-पोरी शेणात हात घालतील का?)--- मी तर नक्कीच. लहानपणी घातलेला देखील आहे. प्रामाणिकपणे कोणतेही काम करायला मला तरी कसलीच लाज वाटत नाही. अवांतर - अमेरिकेहून सुरु झालेला हा धागा आता जर्सी गाईंवर येऊन पोचला आहे. अजून किती twist बाकी आहेत ह्या धाग्याचे कोण जाणे.

In reply to by विशुमित

सतिश गावडे Sat, 02/25/2017 - 16:01
एक गाय दिवसाला ३५ लिटर देते हे वाचून मला धक्का बसला आहे. मी स्वतः देशी गायीचे दूध काढले आहे. ते एका वेळेला एक लिटरपेक्षाही कमी असायचे. तुमच्या उदाहरणातील गाय जर्सी असली तरी दिवसाला पस्तीस लिटर दुध हे मला अतिशयोक्त वाटते. कदाचित खरे असेलही. :)

In reply to by विशुमित

सुबोध खरे Sat, 02/25/2017 - 19:41
दुधाचा धंदा करणे म्हणजे बारा महिने बत्तीस काळ तुम्हाला जखडून ठेवतो. दूध ज्यांना विकत देता त्यांना एकही दिवस खाडा करून चालत नाही. दुधाच्या दर्जात जरा हि वर खाली झाले तरी कटकटी फार आहेत. तुमच्याकडे अतिशय निष्ठावंत असे गडी असतील तरच हे शक्य आहे अन्यथा घरच्या लग्नाला चार दिवस "दांडी मारतो" म्हटले तर चालत नाही. शनिवार संध्याकाळी "बसुया" म्हणता येत नाही. रविवार पहाट ?सकाळ "लोकांच्या दारात" जाते. उन्हाळ्यात फार लवकर दूध खराब होते. एक ना अनेक कटकटी आहेत. गायीची किंवा म्हशींची उस्तवार फार करावी लागते. शेणाची विल्हेवाट लावावी लागते. चारा पाण्याची सोय ठेवावी लागते. एकंदर घी देखा लेकिन बडगा नही देखा अशी अवस्था होते. माझ्या सख्ख्या मावसभावाचा अनुभव लिहीत आहे. कटकटीला कंटाळून त्याने हा धंदा बंद केला आणि मोटारी भाड्याने देण्याचा धंदा चालविला.

In reply to by सुबोध खरे

विशुमित Mon, 02/27/2017 - 11:51
दूध धंदा जखडून ठेवतो हे १००% सत्य आहे. तुम्ही सुट्टी घेऊ शकत नाही. गड्यावर हा धंदा चालत नाही. संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य आणि राबले तरच यात चांगले यश आहे. पण जर चाऱ्याचे योग्य नियोजन केले तर शाररिक कष्टाचे काम आता खूप कमी झाले आहे. शनिवार संध्याकाळी "बसुया" म्हणता येत नाही.>>> -- असं काही नाही कधीपण 'बसता' येऊ शकते इनफॅक्ट 'लावूनच' काम करू शकतो. सकाळ "लोकांच्या दारात" जाते>>> -- डेरीवाले घरी येतात दूध न्यायला. उन्हाळ्यात फार लवकर दूध खराब होते.>>> -- डेरीवाले २ टाईम येतात उन्हाळ्यात. एक ना अनेक कटकटी आहेत.>> -- सगळ्याच क्षेत्रात असतात. गायीची किंवा म्हशींची उस्तवार फार करावी लागते.>> -- हो ते तर आहेच. बॉस, क्लायंट, कस्टमर, पेशेंट यांची पण खूप उस्तवार करावी लागतेच की. शेणाची विल्हेवाट लावावी लागते>> -- योग्य नियोजन केलेला गोठा असेल तर जास्त कष्ट नाही त्यात. शेण खताला खूप मागणी असते. चारा पाण्याची सोय ठेवावी लागते.>>> -- माझ्या नुसार तर आता चाऱ्यासाठीच जास्त शाररिक कष्ट लागतात. तो पण जर जवळच असेल तर अति उत्तम नाहीतर आठवड्याची साठवण करू शकतो. एकंदर घी देखा लेकिन बडगा नही देखा अशी अवस्था होते>> -- सगळ्याच क्षेत्रात आहे ही अवस्था.

In reply to by विशुमित

विशुमित Mon, 02/27/2017 - 10:32
५० लिटर देणाऱ्या गाई महाराष्ट्रात सापडत नाहीत. आपल्याकडे मॅक्सिमम ३५ लिटर देणाऱ्या गाई आहेत. त्यांची देखरेख पण खूप जातील आहे. ५० लिटरचा आकडा मी एवढा का रेटला याच कारण मध्यंतरी माझी एका मित्राबरोबर न्युजलॅंड च्या गाई बद्दल चर्चा चालू होती आणि तोच आकडा डोक्यात फिट बसला होता. काल पुन्हा चौकशी केल्यावर आपण मिपावर चुकीचे लिहले आहे याची सल सतावत होती. कृपया ३-४ गाईचा स्टॅन्ड मी माघारी घेत आहे. पण १५० लिटर रोज गेले तर नक्कीच ६०-७० हजार नफा महिना कमावू शकतो.

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Mon, 02/27/2017 - 10:42
काही हरकत नाही. आपल्याकडून काही चुकीची माहिती दिली गेली तर ती मान्य करण्याचे धारिष्ट्य बरेच लोक दाखवत नाहीत. तुम्ही ती दाखवलात हे मला आवडले.

In reply to by अभिजीत अवलिया

सुबोध खरे गुरुवार, 03/02/2017 - 12:04
आपल्याकडून काही चुकीची माहिती दिली गेली तर ती मान्य करण्याचे धारिष्ट्य बरेच लोक दाखवत नाहीत तुम्ही ती दाखवलात + १०००० बाकी दुधाचा धंदा वातानुकूलित खोलीत बसून गरम गरम कॉफी पीत करता येत नाही हीच खरी गोम आहे. मुलं शिकली कि त्यांना पांढरी कापडं घालून गावगन्ना फिरायचा नाद लागतो आणि ती शेतीच्या कामाला नालायक होतात इति व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडी १९४८

In reply to by सुबोध खरे

विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 12:54
श्रम प्रतिष्ठा नाही ना आपल्या देशात. व्यं मां णी १९४८ साली लिहून ठेवलेले वाचून मौज वाटली.

विशुमित Sat, 02/25/2017 - 17:24
धाग्याचे त्रिशतक झाल्या बद्दल परदेशातून भारतात परतणाऱ्याना विमानतळावर कांद्याची १ जुडी, ५ लिटर दुधाची किटली आणि किलोभर हिरवा वाटाणा देऊन जाहीर सत्कार करण्यात येईल....!!

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे Sat, 02/25/2017 - 21:32
भारतातच राहायच्ये ह्या हट्टाने पिराताई परत आल्या, दहा म्हशी घेतल्यात..पिराताई चुलीवर भाकरी थापतायत, मिस्टर पिरा गाईचे दूध काढतात्यात असे दॄष्य दिसले एकदम.. काय म्हणता तुम्ही...? विषयावरच तर बोलणं सुरु आहे... भारतात आले तर काय ऑप्शन्स आहेत त्यात जर्सी गायी किती दूध देतात हे पण नको का डिस्कस व्हायला.. म्हणजे कसं चारीबाजुंनी सर्वमाहिती घेऊन असलेलं बरं...! हां आता थोडं अ‍ॅडव्हान्स बघितलं तर बायोगॅसवर भाकरी, आणी ऑटोमेटेड सिस्टीमने म्हशींचे दूध निघतंय असं करु शकतात... बाकी काहीच विषयाबाहेर नाही... ऑटोमेटेड सिस्टीमचे रेटही सांगून ठेवतो.. हिशोबाला बरं राहील्ल.... =)) =))

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे Sat, 02/25/2017 - 21:41
बायोगॅस अतिशय बंडल प्रकार आहे. प्रचंड शेण लागतं आणि त्यामानाने उर्जा खुपच कमी. आमच्या घरी होता. सरकारी सबसिडीही मिळाली होती बहुतेक तेव्हा. काही उपयोग नाही हे लक्षात आल्यावर आम्ही उखडून काढला तो. पिरातै, तुम्ही भारतात आल्यावर सौर चुल घ्या. त्यावरही सरकारी सबसिडी मिळते.

In reply to by पिलीयन रायडर

जर्सी गाई किती दुध देतात???!! जर्सी गाई त्यांच्यावर अध्यात्माचा प्रयोग "केल्यास" किंवा "न केल्यास" किती किती दुध देतात???!! असा हा प्रश्न हवा. तरच प्रकल्पाबद्दल निर्णय घेण्यासाठी बंद काँप्युटरमध्ये टाकायला पुरेसे प्रोस आणि कॉन्स मिळतील. ;) :)

संदीप डांगे Sat, 02/25/2017 - 23:53
पिराताईचा धागा म्हणजे 'एकशेदोन अंश चार मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचे उसगाव केंद्र आहे' झालंय... आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा: १. सुंदर माझे घर २. अमेरिकेत गेलेल्या भारतीयांचे प्रश्न ३. भारत विरुद्ध अमेरिका एक तुलनात्मक अभ्यास ४. शैक्षणिक कार्यक्रम: रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज. ४. राज्यपुरस्कार प्राप्त नभोनाटिका : इकडचे आणि तिकडचे, सादरकर्ते 'दोन्हीकडचे' ५. पौगंडावस्थेतल्या मुलांच्या विविध समस्या. ६. प्रदूषण व वाहतूक याविषयावर आलेली वाचकांची पत्रे ७. संगित मान-अपमान नाटकाचा एक भाग ८. श्रोत्यांच्या फरमाईशी गाण्यांचा फोन-इन-कार्यक्रम: सखी ९. विशेष कार्यक्रमः माझे (तेच) अध्यात्म १०. किसानवाणी कार्यक्रमांतर्गत जर्सी गायीचे संगोपन अणि दुग्धव्यवस्थापन ह्यावर डॉ. विशुमित यांची मुलाखत. ११. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पारंपारिक इंधन साधने व अपारंपारिक इंधन साधने याचा तुलनात्मक अभ्यास. १२. बायोगॅस व सौर चूल यांचे फायदे तोटे: सादरकर्ते डॉ. सतीश गावडे. १३. सदाबहार गीतांचा कार्यक्रम: आपली आवड.

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. Sun, 02/26/2017 - 20:01
माझा स्प्पेशल "लव्हगुरु" प्रोग्राम राह्यला त्यात. कोई भी उलझन हो आपके दिलमें, खुलके बोलिये, दिलसे बोलीये, लव्हगुरु है ना आपके साथ.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव गुरुवार, 03/30/2017 - 10:09
अर्धवटरावांनी आध्यात्माचा 'अ' देखील उच्चारलेला नाहि. 'माझं तेच अध्यात्म' हे दुसर्‍या एका आयडीचं लक्षण आहे. डांगे साहेबांना अरांचे प्रतिसादात्मक चार शब्द अपेक्षीत आहेत फार तर.

फेदरवेट साहेब गुरुवार, 03/02/2017 - 15:35
पिरा ताई, तुमचे मूळ म्हणणे एकदा कंसाईज प्रकारे चार ओळीत मांडाल का पलीज, ते मीडिया काय युद्ध काय दूध काय अन काम काय टोटल लागेना. एकदा सांगितलेत तर चार शब्द बोलता येईल, तुमची परवानगी असता.

In reply to by फेदरवेट साहेब

पिलीयन रायडर गुरुवार, 03/02/2017 - 17:54
आता राहु दे. तुम्हाला असंच काही बोलायचं असेल इन जनरल परदेशी राहण्याबाबत तर बोला. तसं तुम्ही इमु पालनाबद्दल लिहीलंत तरी मी काय बोलणारे म्हणा.

नगरीनिरंजन Sun, 03/05/2017 - 18:33
अमेरिकन शिक्षणपद्धतीचे लेखात कौतुक केले आहे; पण प्रत्यक्षात अमेरिकन लोकांना इराकी, इराणी, सौदी अरेबियन, तुर्की, पाकिस्तानी व भारतीय लोकांमधला फरक कळत नाही. शीख व मुस्लिम लोकांमधला फरक कळत नाही. अगदी सैन्यात काम केलेल्या व परदेशात जाऊन आलेल्यांनाही कळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण आता ऊर्जा व स्रोतटंचाईच्या काळात प्रवेश केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांतली जीवनपद्धती फार ऊर्जाखाऊ आहे. ती फारकाळ टिकणारी नाही. जर नवीन काही क्रांतिकारक शोध लवकर लागले नाहीत तर जगात सर्वत्र मध्ययुगासारखी प्रचंड विषमता निर्माण होणार आहे. आत्ताच "परक्या" लोकांवर होणारे हल्ले त्याचीच लक्षणे आहेत. नवीन शोध लागले तरी अमेरिकेतच ते शोध लागतील असे काही नाही आणि निव्वळ अमेरिकेत राहिले म्हणून मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे असेही नाही. त्यामुळे मुलांचे कारण न देता स्वतःला तिथल्या जीवनशैलीचे आकर्षण आहे म्हणून आम्ही राहणार असे म्हटलेले उत्तम. कर्मधर्मसंयोगाने हरितऊर्जेत खूप प्रगती होऊन तिथली जीवनशैली टिकली तर उत्तमच अन्यथा भविष्यात काय होईल ते मुलं त्यांचं ते बघून घेतील.

एमी Mon, 03/06/2017 - 11:00
लॉल :D मजा आली. === 'सध्या मी नवर्याच्या जीवावर इथे आलेय हे सत्यच आहे. आणि अगदी मनसोक्त ऐशही करतेय. असं आयुष्य मिळायलाही नशिब लागतं.' आणि 'पाऊस पडला माझ्यामुळं.' हे सगळ्यात भारी.

चित्रगुप्त Sun, 01/08/2023 - 03:03
"धागा उपसोन वर काढी, तो येक मूर्ख"... असे काही दासबोधात समर्थांनी म्हटलेले नाही, तस्मात उपसला आहे. सध्या चालू असलेल्या 'भारताच्या तुलनेत' वाचणार्‍या नव्या-जुन्या मिपाकरांसाठी.