Skip to main content

लागण व्हॅलेंटाईनची!

लेखक रेवती यांनी रविवार, 15/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षीच्या व्हॅलेंटाईनला पाच वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. सहाजिकच चेहेर्‍यावर हसू पसरलं. चतुरंग हसण्याचं कारण न विचारते तरच नवल. तर त्याचं असं झालं २००४ सालची गोष्ट. आमच्या धाकट्या बंधूराजांच्या लग्नानिमित्त मी मुलाला घेऊन पुण्याला गेले होते. रंगरावांना कामातून (नेहेमीप्रमाणेच) सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते अमेरिकेतच होते. आता माझं माहेर हे लग्नघर झालेलं त्यामुळे सहाजिकच गडबड, धावपळ चालू होती. नवर्‍यामुलाला प्रथेप्रमाणे कमितकमी रजा मिळाली होती! मानाची मोठी करवली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय माझ्याकडेच सोपवले होते. आमचे दोन वर्षांचे चिरंजीव कोणताही निर्णय तडीस जाऊ देत नव्हते ही गोष्ट वेगळी. उदा. बस्ता खरेदी अर्धी झाल्यावर दुकानातच उड्या मारताना चिरंजीव जमिनीवर जोरात आपटले, दात ओठात घुसले, रक्ताची धार, डोक्याला टेंगूळ आणि बस्ता अर्धवट सोडून आमची वरात रिक्षातून घराकडे! अशा सगळ्या लढाईतून पुढे जात आम्ही सगळे १७ फेब्रु.च्या लग्नासाठी सज्ज होत होतो. होता होता ग्रहमखाचा दिवस येऊन ठेपला. स्थळ: पुणे, तारीख १४ फेब्रु २००४, वेळ सकाळी ९.३० - व्हॅलेंटाईन डे! नवर्‍या मुलाच्या रजेचा पहिला दिवस त्यामुळे भल्यापहाटे दौर्‍यावरुन येऊन तो घरी हजर झाला होता. घरात ग्रहमखाची गडबड सुरु होती. गुरुजी यायच्या आधी सगळी तयारी वेळेत व्हायला हवी म्हणून माझी लगबग सुरु होती, एवढ्यात चिरंजिवांनी नैवेद्यासाठी ठेवलेले गूळ-खोबरे मटकावले! सकाळपासूनच नातेवाईक जमू लागले होते. समोरच रहाणार्‍या काका-काकूंनी त्यांचे घर हे प्रेमाने वापरायला दिलेले होते आणि लग्नघराचे जणू एक्स्टेंशनच असल्याप्रमाणे आम्ही ते मनमुराद वापरत होतो! जिन्यात पावले वाजली. गुरुजी आले असे समजून बाहेरच्या खोलीत गडबड झाली. पूजेत फारसा इंटरेस्ट नसलेली पुरुष मंडळी समोरच्या घरी जाऊन बसली. मुलांना त्यांचे खेळ आवरुन आतल्या खोल्यात पिटाळलं. दार उघडं असूनही बेल वाजली. मी आणि बाबा बाहेरच्याच खोलीत होतो. कोणी मुलगा आलाय असे बघून बाबा सामोरे गेले. माझ्या नावाची विचारणा होऊन भला मोठा लाल गुलाबाच्या फुलांचा गुच्छ व ग्रीटिंग कार्ड बाबांकडे सोपवून "अमेरिकेहून पाठवलंय" एवढे सांगून, सही घेऊन तो निघून गेला. आम्ही आश्चर्यचकित......! (मंडळी, इथे क्रमशः टाकायचा खूप मोह होतोय! ;) ) मी पुढे होऊन बाबांच्या हातातून ग्रीटिंग कार्ड घेतलं. त्यात एक प्रेमसंदेश होता आणि अक्षर रंगरावांचं नव्हतं! आता आली का पंचाईत. तेवढ्यात फोन वाजला आणि रंगरावांनीच रंगेलपणे "गुच्छ पोचला का?" असे विचारले आणि मग सगळा उलगडा झाला! ई-सकाळच्या "व्हॅलेंटाईनचा प्रेमसंदेश आणि गुच्छ पाठवा" ह्या योजनेचा रंगरावांनी घेतलेला हा लाभ होता. सोवळे नेसून उभे असलेल्या बाबांच्या चेहेर्‍यावर जावयाचे कौतूक ओसंडून वाहत होते. मी सुद्धा आश्चर्याने थक्क!! (मी तिथे नसल्यानेच एवढा विचार रंगराव करु शकले होते ह्याची खात्री पटली! ;) ). ही बातमी एका क्षणात पक्वान्नांच्या दरवळाप्रमाणे घरात पसरली. स्वयंपाकघरातून "अग्गोबाई, काय तरी हौस बाई!", होक्का? मज्जा आहे बुवा!", "एकेक नवलंच म्हणायचं!" अशा उद्गारांची बरसात झाली. दुसरीकडे सोवळं नेसून तयार बसलेल्या नवरदेवाच्या डोक्यात चक्रं फिरु लागली. त्याचे विचार चेहेर्‍यावर स्पष्ट दिसले. बाबांनी ताबडतोब "आता तू बाहेर जायचं नाहीस!" असं त्याला खडसावलं. एव्हाना पुष्पगुच्छाची बातमी समोरच्या घरात पोचली होती. त्यांच्या सुनेला हे कळताच "बघा, लोकं अमेरिकेहून गुच्छ पाठवतात नाहीतर तुम्ही....!" पडलेल्या चेहेर्‍याने समोरच्या काकांचा मुलगा निमूट बाजारात निघून गेला. ह्या सगळ्या गोंधळात गुरुजी आले कधी, पूजा सुरु झाली कधी काही समजले नाही. त्यात बंधुराजांचे लक्षच नव्हते. झटपट पूजा उरकून 'सकाळ मार्फत' औरंगाबादला आपल्या भावी बायकोस गुच्छ पाठवायला बंधुराज रवाना झाले! स्थळ: औरंगाबाद, तारीख १४ फेब्रु २००४, वेळ संध्याकाळी ७.०० - एका बंगल्याची बेल वाजते. "देशपांडे आपणच का?" "हो." "पुण्याहून व्हॅलेंटाईनचा बुके आहे!" कुरियरवाला मुलगा. ग्रीटींगकार्डावरचे नाव बघून हे देशपांडे आपण नसून शेजारचे असतील असे सांगून त्याला तिकडे पिटाळले. एव्हाना पुष्पगुच्छाला मरगळ यायला सुरुवात झाली होती. शेजारच्या देशपांड्यांकडे उपवर मुलीला पुण्याहून गुच्छ वगैरे आलेला बघून हलकल्लोळ उडाला. काही वेळाने हेही देशपांडे ते नव्हेतच. ते कदाचित समोरचे असतील असा विचार करून कुरियरवाला तिकडे गेला. नुकतीच ग्रहमख, जेवणावळी, पाहुणे यांची गडबड संपल्यामुळे थोडंसं निवांत असलेलं आणि दारावर नारळाचं, सोनेरी पानांचं तोरण असलेलं घर त्याला लगेच सापडलं. "अरे वा, भलतंच प्रेम दिसतंय!" "मज्जा आहे बुवा एका मुलीची." असे चिडवाचिडवीचे उद्गार आमच्या भावी वहिनीसाठी निघू लागले. दुसरीकडे तिचा भाऊ आणि वहिनी ह्यांच्यात झालेला "प्रेमळ संवाद" असा, "बघा! पुण्याहून लग्न व्हायच्या आधीच गुच्छ येताहेत! आणि इकडे लग्न होऊन सात सात वर्ष झाली तरी एक प्रेमाचा शब्द नाही....!" तर मंडळी रंगरावांनी अमेरिकेहून पुण्याला गुच्छ काय पाठवला आणि पुण्यात आणि औरंगाबादेत अनेक घरात त्या गुच्छाने "प्रेमळ संवादांची" बरसात घडवली. आमच्याकडे अजूनही दर व्हॅलेंटाईन डेला ह्या प्रसंगाची आठवण होऊन हास्याचे फवारे उडतात. रेवती
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7633
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

मस्तच किस्सा आहे हा! :-) वाचायला मजा आलीच पण प्रत्यक्षात काय धमाल आली असेल. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मस्तच लिहिलयंस गं रेवती! मजा आली वाचायला! :)

हाहा ....रंगूनी रंगात सार्‍या , रंगास्वामी मोकळा ;-) धमाल किस्सा आहे.

In reply to by मुक्तसुनीत

रंगीला रे

In reply to by मुक्तसुनीत

मुक्तरावांची कमेंट अगदी एक लंबर ... १०० % सहमत ..! बाकी किस्सा वाचुन मजा आली, बाकीच्यांनी असेच काही किस्से असतील तर कॄपया लिहावे ही विनंती. आमच्या सारख्या होतकरु तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे. ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

प्रयत्नांती परमेश्वर! काल गोळा झालेले सँडल्सचे जोड असे वाया थोडीच जातील..... - (अनुभवी) टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

वरील कमेंट अतिच पर्सनल व लेखाच्या दॄष्टीने "अवांतर" असल्याने मी उत्तर देऊ इच्छित नाही. तसेच आम्ही कसल्याही प्रश्नाचे कुणालाही उत्तर देण्यास बांधील नाही आहोत हे ही आहेच .. ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

छान मजेदार किस्सा आहे गं रेवतीताई... :) आणि सगळेच त्यात रंगुन गेले.. ---वल्लरी

रेवती.......... आज तुझ्यामुळे पुन्हा एकदा मी ........... जुन्या आठवणींचा विविधरंगी पिसारा अलवारपणे उलगडला :X ........... तुझा किस्सा वाचुन मला माझे जुने दिवस आठवले........... "अनामिका"

सही किस्सा आहे! >>शेजारच्या देशपांड्यांकडे उपवर मुलीला पुण्याहून गुच्छ वगैरे आलेला बघून हलकल्लोळ उडाला. हा हा हा! बिचारे देशपांडे ;)

मस्त किस्सा ग रेवती, धम्माल आली वाचुन. :)

रंगरावांप्रमाणे तुम्ही ही मस्तच लिहीता! सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला. मस्त! आता अशाच नेहमी लिहीत्या राहा!

In reply to by सहज

हेच बोल्तो --अवलिया

प्रमोदसाहेबंसारखेच बोल्तो.. रेवतीकाकू, माझ्या आठवणीप्रमाणे पाकृ वग़ळता मिपावर हा आपला पहिलाच लेख आहे.. सबब, अजूनही भरपूर लिहा. अगदी स्वान्तसुखाय आणि निवांत.. आपला, (चतुरंगाचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

रेवतीकाकू, माझ्या आठवणीप्रमाणे पाकृ वग़ळता मिपावर हा आपला पहिलाच लेख आहे.. सबब, अजूनही भरपूर लिहा. अगदी स्वान्तसुखाय आणि निवांत.. तात्याशी सहमत आहे.................... ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.

मस्त किस्सा. मजा आली वाचताना.

मस्त मजा आली. मीनल.

मजा आली !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

क्या बात है ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

खुपच मस्त किस्सा ! मज्जा आलि !!!!!!!!!! मागाचे दिवस आथवले!!!!!! :X

रेवतीताई, एकदम मजेदारच किस्सा आहे. मजा आली वाचताना. आणि तिकडे सगळ्यांच्या चेहेर्‍यावर काय भाव असतील हे वाचताना कळत होते.. :) मस्त. --शाल्मली.

वाचकांचे व प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक आभार! यापुढेही लिहिण्याचा प्रयत्न करीन(थोडी भीड चेपलीये आता). रेवती

मस्तच किस्सा ! :)

रंगासेठ एकदम 'रंगित' आहेत हो... मज्जा आहे बुवा!!! ;) बाकी लिखाण झक्कास. रेवतीदेवींचा विजय असो!!!! बिपिन कार्यकर्ते

छान आहे लिखाण. खरच असाच हा व्हॅलेन्टाईन डे भारतात आला.

आमचा रंगाशेठ रंगीला :) अहो, असा प्रेमळ नवरा मिळायला नशीब लागतं नशीब! (हे असं माझी बायको म्हणेल बहुतेक :P ) रेवतीकाकू एकदम मस्त किस्सा सांगितलात. मजा आली बॉ! बाकी, औ.बादला निरनिराळ्या देशपांड्यांकडे काय स्सॉल्लीड गोंधळ उडाला असेल ना? :) आणि हो, तुम्हाला छान गप्पा मारायला आवडतात म्हणे, अहो मग इतके दिवस गप्प का होता? आख्खं 'जनातलं मनातलं', 'काथ्याकुट' कविता करत असाल तर तेही आंगण सगळं तुमचंच आहे की! येऊ द्या अजुनही असेच धमाल किस्से :) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मजा आली वाचताना...आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या ते वेगळच :-) -स्मिता

रेवती ताई मस्त किस्सा आहे! आमच्या सारख्या वय वर्ष २१ आणि अजुनही 'एकटे' असलेल्यांना मार्गदर्शनाचे चार शब्द सांगयला सांगा की श्री चतुरंग यांना! (अनअनुभवी) इंट्या.

In reply to by इंटरनेटस्नेही

>> वर्ष २१ आणि अजुनही 'एकटे' मला वाटते की २१ वर्ष होऊन ही एकटे आहेत म्हणल्यावर प्रभुसर चांगले मार्गदर्शन करतील. ;)

किस्सा सही! एक जण पीराला चादर चढवायला गेला की बाकीच्यांना चढवायची घाई होते ते आठवले...

पण रेवती आम्ही प्रतिसाद याच्यावर द्यायचेत की ट्यार्पीवाला नवीन धागा येणारे?