इस्रायल आणि मोसाद. भाग १
(मध्यपुर्वेतले इस्रायलचे स्थान आणि उपग्रहातून दिसणारा इस्रायल)
हा संक्षिप्त इतिहास आहे जन्मापासून सतत संघर्षरत असलेल्या एका चिमुकल्या देशाचा. १४०० वर्षांचा प्रसवकाळ आणि दुसऱ्या महायुद्धातल्या नरसंहाराच्या/ वंशविच्छेदाच्या कळा सोसून जन्माला आलेल्या आणि जन्मत:च आजूबाजूला त्याच्या नरडीला नख लावायला टपून बसलेल्या अरबी लांडग्यांच्या छाताडावर पाय देऊन गेली सतत ६9 वर्ष ताठ मानेने जगणाऱ्या मानव समूहाचा, त्यांच्या विजीगिषु वृत्तीचा, बलिदानाचा, शौर्याचा आणि त्यांच्या ‘मोसाद‘ नावाच्या शक्तिशाली आणि सुप्रसिद्ध/कुप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेचा.
विसावे शतक हे अनेक अर्थाने अभूत पूर्व असे होते.मानवी संस्कृतीच्या-सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ ह्याआधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल.पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने तर जगाची घडीच बदलून गेली. (दुसरे महायुद्ध खरेतर पहिल्याचेच extension होते म्हणतात). ह्या दुसऱ्या महायुद्धामुळेच जगभर विखुरलेल्या यहुदी लोकांना १४००-१५०० वर्षांच्या संघर्षमय वणवणीनन्तर आणि अनन्वित अत्याचार, उपेक्षा आणि अवहेलना सोसल्यानंतर स्वत:चा देश मिळाला त्याचीच हि कहाणी!
( संदर्भ: १.Mossad: The Greatest Missions of the Israeli Secret Service- Michael Bar-Zohar, Nissim Mishal
२. Gideon's Spies: The Secret History of the Mossad (Updated) by Gordon Thomas
३. Israel's Secret Wars: A History of Israel's Intelligence Services by Ian Black, Benny Morris
४. Mossad: The Untold Stories of Israel's Most Effective Secret Service by Mike Livingston
आणि यु- ट्यूब वरील अनेक documentaries)
इस्रायल
प्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी
इस्रायल ह्या देशाच्या पुन:स्थापनेच्या आधी पासून,म्हणजे खूप आधीपासून ‘इस्रायल’ हा शब्द, हि संकल्पना आणि त्याचे पुरस्कर्ते/ पाईक म्हणजे ‘ज्यू’ (यहुदी) हे सर्व जगाला माहिती आहेत.अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांना निग्रो म्हणणे जसे गैर आहे( ते तर हि शिवीच मानतात ) तसेच काहीसे ज्यू ह्या शब्दाचे आहे, म्हणून आपण इथून पुढे त्यांचा उल्लेख यहुदी असाच करणे श्रेयस्कर. दुसऱ्या महायुद्धानंतर जरी ते सर्व जगभर चर्चेत आले असले आणि त्यांच्या प्रश्नांची जाणिव युरोप बाहेरच्या जगाला प्रकर्षाने झाली असली तरी हे यहुदी लोक आणि त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती चांगलीच म्हणजे जवळपास ४०००-४५०० वर्षे जुनी आहे. त्यांचा धर्म एकेश्वरवादी धर्मात सगळ्यात जुना. बायबल च्या जुन्या कराराप्रमाणे- बुक ऑफ जेनेसिस मधील उल्लेखाप्रमाणे यहुदी लोकांचा इतिहास त्यांचा मूळ पुरुष अब्राहम पासून सुरु होतो. तेव्हा अरबस्तानातल्या ‘उर’ नावाच्या वाळवंटी प्रदेशात अनेक भटक्या टोळ्या राहत होत्या त्यातल्याच एका टोळीचा मुखिया म्हणजे अब्राहम.
अब्राहम आणि त्याचा कुटुंब कबिला
हा अब्राहम, नोवाच्या (जलप्रलयातून मानव आणि प्राणी वाचवणारा-त्यांचा मनु) १०व्या पिढीतला वंशज... ईश्वराने त्याला ह्या सर्व भटक्या टोळ्यांना एकत्र करून ‘केनान’ ह्या समृद्ध प्रांतात जाऊन राहण्याचा आदेश दिला.त्याप्रमाणे अब्राहमने येतील तवढे टोळीवाले लोक आणि स्वत:चा कुटुंब कबिला घेतला आणि केनान इथे राहायला आला. अब्राहमच्या दोन बायका- सारा आणि हागार, त्यापासून त्याला २ मुले झाली. इस्माईल आणि इसाक. हा इसाक तोच ज्याला मारायचा / बळी द्यायचा आदेश ईश्वराने त्याला दिला होता अब्राहमची परीक्षा पाहण्यासाठी. ह्या इसाक्चा मुलगा जेकब. जेकबला त्याच्या चार बायकांपासून(लेह, झील्पा, बिल्हाह आणि रेचेल) एकूण १२ मुलं झाली. त्यांची नावे अशी
रुबेन, सिमोन, लेवी, जूडाह, झेबुलीन, दिना, गाड, अशार, दान, नाफ्ताली, जोसेफ, बेन्जामिन.
ह्यांच्या बापाला म्हणजे जेकबला प्रत्यक्ष ईश्वराने इस्रायल हे नाव दिले होते त्यामुळे तो सर्व यहुदीचा राष्ट्रपिता ठरतो तर त्याचे हे १२ पुत्र आणि त्यांच्यापासून उत्पन्न झालेली प्रजा म्हणजेच आजचे यहुदी. आपले जसे गोत्र असते तसे ह्या १२ जणांच्या नावाने यहुदी लोकांची १२ घराणी/ गोत्र किंवा टोळ्या आहेत. पण सगळे अब्राहमचे आणि जेकबचेच वंशज असल्याने सगळे यहुदी हे स्वत:ला इस्रायली मानतात. (एक लक्षात ठेवायचे कि हा खरोखर इतिहास नसून दंतकथा/ पुराणकथा असू शकतात. त्यात सत्याचा अंश फार थोडा किंवा अजिबात नसू हि शकतो पण सश्रद्ध यहुदी मात्र हाच खरा इतिहास आहे असे मानतो...)
तर हे यहुदी लोक केनान प्रांतात इ.सं. पूर्व २० व्या शतकात आले ते इ.सं. पूर्व १५-१६ शतकापर्यंत तेथेच सुखेनैव पशुपालन, शेती आणि व्यापार करत राहिले. पण केनन प्रांतात फार मोठा दुष्काळ पडल्याने त्यांना नाईलाजाने नाईलच्या खोऱ्यातल्या गोशान ह्या प्रांती येऊन वस्ती करावी लागली.त्याकाळी हा प्रांत इजिप्तच्या फारो राजांच्या अमलाखाली येत होता. त्याने ह्या यहुदी लोकांना राहायची, व्यापार उदीम करायची परवानगी दिली. आपल्यातल्या एकी आणि उद्यमी स्वभावाने यहुदी लवकरच संपन्न जमात बनले पण त्यामुळेच मत्सरग्रस्त होऊन इजिप्तच्या राजे लोकांनी त्यांना गुलाम बनवले व त्यांना मोठी मोठी मंदिर आणि थडगी(पिरामिड्स) बनवायच्या कामाला गुलाम म्हणून जुंपल. असे हाल ज्यू लोकांनी थोडे थोडके नाही तर ४०० वर्ष काढले. आपल्या लोकांचे हे हाल न बघवून ईश्वराने त्यांच्यातून एक मोझेस नावाचा माणूस निवडला आणि त्याने, ईश्वराने दिलेल्या आदेशाप्रमाणे बंड करून सर्व यहुदीना इजिप्त मधून बाहेर काढलं आणि त्यांना घेऊन तो बराच मोठा आणि खडतर प्रवास करत लाल समुद्राकाठच्या सायनाई प्रांती आला. इथेच त्याला सायनाई च्या पर्वतावर ईश्वराचा पुढचा अदेश तसेच १० आज्ञा(१० commandments) मिळाल्या. आणि मग तो सर्व यहुदीना घेऊन तो परत मजल दरमजल करत केनान प्रांती आला. हि सगळी गोष्ट फार रंजक आहे आणि ह्यावर खूप चांगले चित्रपट हि बनले आहेत (10 commandments, Prince of Egypt, Gods and kings वगैरे)जिज्ञासूंनी ते जरूर पाहावेत.
मोझेस
बाळ मोझेस , आपल्याकडच्या कर्णाच्या जन्माच्या कथेशी त्याच्या जन्म कथेचे भरपूर साम्य आहे.
असो तर अशा प्रकारे यहुदी परत त्यांच्या अब्राहमने वसवलेल्या भूमीत पोहोचले पण मध्ये अनेक शतकांचा काळ गेला होता आणि हा केंनान प्रांत आता परत अनेक रानटी बर्बर टोळ्यांच्या हाती गेला होता. सततच्या संघर्षाने थकल्या भागल्या मोझेस ने आपल्या कार्याची धुरा जोशुआ ह्या आपल्या शिष्यवर सोपवली व स्वत: निजधामाला गेला. अनेक वर्षे संघर्ष, प्रवास, संकटांचा समान कराव्या लागल्याने यहुदी लोक जरी भटकेपणाला वैतागले असले तरी त्यांना एकीचे महत्व चांगलेच कळून चुकले होते. आता त्यांना अधिक प्रवास करायचा नव्हता. जोशुआच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वत:च्या पूण्यभूसाठी लढा देऊन केनानचा बराचसा भाग परत मिळवला.हाच तो आजचा इस्रायल मध्ये असलेला प्रांत.अशा प्रकारे ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ देत यहुदी लोकांनी कायमच ह्या भूमीवर आपला हक्क सांगितला आहे. त्यानंतरची जवळपास २०० वर्ष शांततेची सुख समृद्धीची, शेती, व्यापार, उद्योग, कला ह्यांच्या भरभराटीची होती.पण त्याच बरोबर आलेल्या स्थैर्य आणि संपन्नतेमुळे यहुद्यामधली एकी कमी कमी होऊन त्यांच्यात गट तट पडू लागले. त्यांच्या समाजरचनेत एक प्रकारचा विस्कळीतपणा आला. अशात एजीयन समुद्रातल्या क्रीट ह्या बेटावरून काही लोक केनन मध्ये आले. हे लोक लढाऊ वृत्तीचे होते आणि त्यांनी आताशा बऱ्याच विस्कळीत आणि भोंगळ झालेल्या यहुदी लोकाच्या भूमीवर कब्जा मिळवला. अर्थात यहुदी लोकांनी प्रतिकार केला पण त्यांच्यात ती पूर्वीची धार एकी आता राहिली नसल्याने त्यांच्या केनान प्रांता मधील काही भूभाग गेला तो गेलाच. हाच तो आजचा गाझाचा प्रांत आणि हे लोक म्हणजे फिलीस्तिनी लोक.म्हणूनच त्या प्रांताला नंतरच्या काळात प्यालेस्टाईन म्हणून ओळखले जाऊ लागाले.शांततेचा, भरभराटीचा काळ संपून परत एकदा संघर्ष, युद्ध, वाताहत ज्यूंच्या नशिबी आले. त्यांचा आणि ह्या फिलीस्तिनी लोकांच्या संघर्षातच किंग साउल, डेव्हिड( डेव्हिड आणि गोलीअथ ह्या गोष्टी मधला) किंग सोलोमन असे अनेक महान राजे, नेते यहुदी लोकाना लाभले. पण यहुदी लोकाचा काळ विपरीत होता हेच खरं, त्यांचा आणि फिलीस्तिनी लोकांचा संघर्ष अजून चालूच होता पण मध्येच असिरीयन राजवटीने त्यांच्या प्रांतावर हल्ला करून ज्यू आणि फिलीस्तिनी दोघांना हि गुलाम करून टाकले. इ.स. पूर्व ७४० ते ७२२ मध्ये आपली केनान ही प्राणप्रिय पुण्यभूमी पारतन्त्र्यात गेलेली यहुदी लोकांना पहावी लागली. आणि ह्यावेळी ती त्यांना परत मिळवण्यासाठी थोडी थोडकी नाही तर तब्बल २७०० वर्षे संघर्ष करावा लागणार होता. असिरीयनानंतर, बाबिलोनियन,पर्शिअन, रोमन, बायाझंटाइन अशा राजवटींच्या ताब्यात केंनन प्रांत जात राहिला आणि यहुदी लोक त्या त्या सत्तेचे मंडलिक म्हणूण तिथे तग धरून होते. त्यांनी स्वत:चा धर्म, स्वत:चे वेगळेपण, स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ह्य १००० वर्षात सोडले नाही हे विशेष पण इ.सं. ६००-७०० मध्ये काळ अधिक विपरीत होणार होता. इ.सं. ६५०-७०० मध्ये हा सगळा प्रांत अरबी मुस्लीम सत्तेच्या हाती गेला आणि त्यांनी तिथल्या प्रजेचे सक्तीने धर्मांतर सुरु केले. त्यातच हे सगळे फिलीस्तिनी मुसलमान झाले, आता मात्र यहुदी लोकांना तेथे राहणे शक्यच नव्हते, ते आपापले चंबू गबाळे घेऊन वाट फुटेल तिकडे पळाले. त्यांनी युरोपातल्या इंग्लंड, फ्रांस जर्मनी पोलंड रशिया नॉर्वे अशा निरनिराळ्या देशात आश्रय घेतला. मुख्यत्वे करून ह्या देशात त्यांनी आश्रय घेतल्यामुळे तिथे ते जास्त प्रमाणात सापडतात पण तसे पाहू जाता यहुदी लोक सर्व जगभर पसरले. आज साधारण १५० देशांमध्ये विस्थापित यहुदी वस्ती करून असलेले सापडतात. ह्यात भारत हि येतो. भारतामध्येही केरळच्या किनाऱ्यावर ते ह्याच सुमारास आले.भारतामध्ये आजही हे यहुदी अत्यंत थोड्यासंख्येने असले तरी आपले स्वतंत्र अतित्व टिकवून आहेत. विशेष म्हणजे असमानता, जातीप्रथा, शोषण, धार्मिक द्वेष ह्यांनी बजबजलेल्या भारताने ह्या यहुदी लोकांना कधीही त्रास दिला नाही, त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक रितीरिवाजात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केली नाही.अर्थात यहुदी लोकांनीही इथे राहताना कधी इथल्या लोकांशी प्रतारणा केली नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या चांगुलपणाचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न केला नाही.कोकणातही हे यहुदी लोक आले आणि वसले त्यांना आपण शनवार तेली म्हणून ओळखतो. भारतीय यहुदी स्वत:ला बेने इस्रायली म्हणतात. बेने म्हणजे पुत्र – इस्रायलचे पुत्र. रुबी मायर्स(पडद्यावरचे नाव सुलोचना), नादिरा, डेव्हिड चेउलकर( बूट पोलिश, अभिमान सारख्या अनेक चित्रपटात काम केलेला चरित्र अभिनेता फक्त डेव्हिड म्हणून प्रसिद्ध) , ले. ज. जेकब, डेव्हिड ससून,इस्टर विक्टोरिया (पहिली मिस इंडिया), रणजीत चोधरी( बातो बातो में मधला टीना मुनीम(nancy) चा वायोलिनवादक भाऊ), अनिश कपूर (प्रसिद्ध शिल्पकार)असे अनेक भारतीय यहुदी प्रसिद्ध आहेत. हि यादी खूप मोठी आहे. फक्त वानगी दाखल हि सर्वपरिचित काही नावं.(संदर्भ ‘उत्तम-मध्यम’ ले. श्री. बा. जोशी)
असेच दुसरे धार्मिक निर्वासित ज्यांना भारताने उदार आश्रय दिला ते म्हणजे पारशी लोक.आज तर जगातल्या एकूण शिल्लक पराश्यांपैकी ९०% पारशी भारतात राहतात. भारताच्या उद्योग, कला, राजकारण, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.असो...
इथे थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचे म्हणजे १९४८ साली जेव्हा इस्रायल ह्या देशाची निर्मिती झाली किंवा यहुदी लोकांनी ती केली तेव्हा जगभरातून सर्व यहुदी लोकांना तिथे येऊन राहण्याचे आवाहन केले गेले आणि इतर जगाप्रमाणे भारतातूनही बहुस्न्ख्येने यहुदी लोक तिकडे गेले पण शेकडो वर्ष, पिढ्यान पिढ्या भारतात राहिलेले हे यहुदी लोकच फक्त असे होते जे भारताच्या, आपल्या मायभूमीच्या आठवणीने व्याकूळ होत असत. इतर देशातून आलेल्या यहुदी लोकांना त्या त्या देशातून तुच्छतेचीच वागणूक मिळालेली असल्याने त्यांचे तसे नव्हते. एवढेच नाहीतर भारतातून गेलेल्या ह्या यहुदी लोकांना सुरुवातीला भेदभावाला सामोरे जावे लागले त्यांना हीन लेखले गेले. ते गोरे नसल्यामुळे, श्रेष्ठतर अशा युरोपातून (मार खाऊन, अपमानाचे जिणे सोडून का होईना) आलेले नसल्यामुळे त्यांना इतर युरोपीय यहुदी लोकांपेक्षा दुय्यम हीन लेखले गेले त्यामुळे ते अधिकच व्याकूळ होत. अशी हीन वागणूक त्यांना भारतात कधीच मिळाली नव्हती आणि इस्रायलमध्येतर त्यांच्या हक्काच्या भूमीत त्यांना आमंत्रण देऊन बोलावून असे अपमानास्पद वर्तन केले जात होते. अर्थात पुढे परिस्थिती निवळली. १९६२-६४ दरम्यान भारतीय यहुद्यांनी इस्रायल मध्ये स्वत:च्या हक्कांसाठी आंदोलन हि केले होते. रूपेण रेमण्ड हे असेच एक भारतातून इस्रायल ला गेलेले यहुदी. ते म्हणतात कि “इतर यहुदी ज्या देशातून आलेले होते तेथे त्यांना फार अपमानास्पद वागणूक मिळालेली असल्याने त्यांना त्या त्या देशांचे स्मरणही करणे आवडत नसे पण भारतीय यहुदी मात्र आपल्या भारताच्या आठवणीने व्याकूळ होत असत, इस्रायल हि आमची पितृभूमी असेल आता कर्मभूमीही बनेल पण आमची मातृभूमी हि कायम भारतच असेल.”( संदर्भ “अल्पसंख्यांक वाद – मुजफ्फर हुसेन, अनुवाद- डॉ. रवी पागनीस )
आधुनिक जगात सभ्यतेचा आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या इंग्लंड जर्मनी फ्रांस आदी राष्ट्रांमध्ये यहुदी लोकांना कायम छळाला, द्वेषाला, अवहेलनेला सामोरे जावे लागले आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी छळ केला म्हणजे फक्त हिटलर आणि नाझी-जर्मनच यहुदी लोकांचा द्वेष करायचे असे नाही, अगदी शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ वेनिस मधला शायलॉक हा टिपिकल यहुदी म्हणजे त्या काळातील समाजच्या धारणेप्रमाणे दुष्ट, क्रूर, कावेबाज, पाताळयन्त्री असा दाखवला आहे. अर्थात ह्याला काही अंशी यहुदीही जबाबदार आहेत. ते जिथे जातील तिथे आपले स्वतंत्र अस्तित्व, धार्मिक आणि सामजिक वेगळे पण जपत, तिथल्या स्थानिक रूढी, परंपरा, धर्म ह्यांच्याशी संपर्क ठेवत नसत. सगळे यहुदी एकत्र, वेगळे, शहराजवळ, गावकुसाबाहेर वस्ती करून राहत- त्यालाच घेटो म्हणतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रथा परंपरा पाळणे सोपे जात असले तरी ते समाजापासून मुख्य प्रवाहापासून फटकूनच असत. त्यातून मध्ययुगात युरोपात सगळी कडे ख्रिस्ती धर्माचा बोलबाला होता. येशू ख्रिस्त हा जन्माने यहुदीच पण त्याने स्थापन केलेल्या ख्रिस्ती धर्माबद्दल आणि येशू बद्दल कधीही कोणतीही सहानुभूती किंवा आदरभाव यहुदी लोकांनी कधी दाखवला नाही. येशूला सुळावर एका याहुद्याच्या द्रोहामुळेच जावे लागले ह्याचा राग हि तत्कालीन ख्रिस्ती लोकांच्या मनात होताच.त्यामुळे बहुसंख्य यहुदी जे युरोपातून राहत होते ते कायम अवहेलना,निंदा, द्वेष, क्रौर्य ह्यांचे बळी ठरले आहेत.
खरेतर यहुदी ख्रिस्ती आणि इस्लाम हे तिन्ही अब्राहामिक धर्म म्हणजे ईश्वराचे द्वैतत्व, त्याचे प्रेषित, देवदूत, सैतान,सर्व मानव आदम आणि इवची अपत्ये इ. संकल्पना मानणारे ह्यात यहुदी हा वयाने सगळ्यात वडील पण संख्येने सगळ्यात लहान तर इस्लाम वयाने सगळ्यात तरुण, पण ह्या तीन भावंडात कधी हि सख्य नांदले नाही. युरोपचा अख्खा इतिहास तर ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मातल्या झगड्याने रक्तरंजित झालेला आहे....असो तो वेगळा इतिहास आहे.
ई. सं. १५१६ मध्ये केनान हा प्रांत ओटोमान साम्राज्याच्या हाती गेला. ओटोमान सम्राट/ सुलतान सलीम पहिला ह्याने मामलुक राजवटीचा खात्मा करून हा भाग आपल्या साम्राज्याला जोडला.१५२० मध्ये तो मेल्यावर त्याचा तरणाताठा आणि तडफदार मुलगा गादीवर आला. हाच तो प्रसिद्ध कि कुप्रसिद्ध सुलतान सुलेमान. हा कडवा मुस्लीम! आणि त्याची राज्यकारभारावरची पकडही चांगलीच मजबूत होती. १५६६ मध्ये सुलेमान मरण पावला. त्यानंतर आलेले सुलतान सलीम दुसरा(राजवट १५६६-७२), त्याचा मुलगा सुलतान मुराद (राजवट १५७२-७४), आणि त्याचा मुलगा सुलतान महमद तिसरा(राजवट १५७४-९५) हे तितके कडवे तसेच कार्यक्षम नव्हते. शिवाय ते बरेचसे उदारमतवादी होते त्यामुळे त्यांच्या राजवटीत अन्य धर्मियान्वरचे अन्याय-अत्याचारही कमी होऊ लागले, तसे हळू हळू यहुदी परत आपल्या प्राणप्रिय केनान च्या पुण्यभूमीत येऊन राहू लागले. १६व्य शतकापासूनच हि तुर्की ओट्टोमान सत्ता दुबळी होत चालली होती इंग्लंड फ्रांस प्रशिया आदी युरोपीय सत्ता केव्हापासून तिच्या नाकाभोवती सूत धरून बसल्या होत्या कि कधी हि शेवटचा आचका देते आणि तिच्या भूभागाचे आपण लचके तोडतो, पण हि तुर्की राजसत्ता तशी बरीच चिवट निघाली. ती अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत तग धरून होती आणि त्याबरोबर आजची अरब राष्ट्र (पूर्वी हे सगळे रानटी, रासवट आणि टोळ्यात विभागले गेलेले होते.) आणि इस्रायलच्या सर्व भूभागावर नियंत्रण कायम ठेवून होती.त्यामुळे पहिल्या महायुद्धात सपशेल हार खाई पर्यंत आणि नंतर केमाल पाशा आतातुर्क ह्याने खलिफापद आणि तुर्की साम्राज्य खालसा करून वेगळा आणि आकाराने बराच छोटा तुर्कस्तान निर्माण करेपर्यंत, इथे राहणाऱ्या यहुद्यांना कसलेही भवितव्य नव्हते.
१९व्य शतकाच्या सुरुवातीपासून युरोपात ओद्योगिक क्रांतीमुळे, विज्ञान, तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे वातावरण हळूहळू निवळू लागले होते.यहुदी हि त्यांच्या बंदिस्त घेटोतून बाहेर पडून नवे शिक्षण, व्यापार, उद्योग, संशोधन ह्यात नशीब अजमाऊ लागले होते अशात रशियाचा झार अलेक्झांडर हा यहुद्यांच्या बाबतीत भलताच उदार निघाला आणि त्याने यहुद्यांना व्यापार उद्योग, वित्त पुरवठा, संशोधन आणि महत्वाचे म्हणजे शिक्षण क्षेत्राची द्वारे खुली केली ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. यहुदी आपल्यातल्या एकी आणि निरलसपणे काम करत राहण्याच्या हातोटीमुळे सधन, संपन्न आणि प्रसिद्ध बनले.मान्यवर संशोधक, विचारवंत, लेखक, कलावंतांची एक पिढीच त्यातून निर्माण झाली. मागे इजिप्शियन राजे जसे मत्सरग्रस्त झाले तसेच युरोप रशियातले इतर गैरयहुदी लोक आता परत यहुद्यान्चा मत्सर करू लागले. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी.ह्यातून निर्माण झालेल्या यहुदी विरोधी लाटेला Anti-semitism असे नाव आहे.अर्नेस्ट रेनार हा फ्रेंच विचारवंत- मानववंश शास्त्रज्ञ ह्या विचारधारेचा उद्गाता. पण त्याने आपल्या विचारधारेला Anti-semitism हे नाव दिले नव्हते.मोरीत्झ स्ताईनश्नायडर ह्या जर्मन यहुदी विचारवंताने रेनारचा विरोध करताना Anti-semitismहा शब्द प्रथम वापरला आणि तो अगदी ह्या विचारधारेला फिट्ट बसला.तिथून पुढे रेनारच्या विचारधारेला Anti-semitism हेच नाव पडले.(नोवाचे तीन पुत्र शेम, हाम आणि जाफेत, त्यांच्या पासून सेमिटिक, हेमेटिक आणि जाफेटिक असे तीन गट पडले, जे हिब्रू अरबी,आर्मेनियन अशा भाषा बोलत. हळू हळू हेमेटिक आणि जाफेटिक हि नावं मागे पडली आणि फक्त सेमेटिक नाव उरले. हे सेमिटिक लोक आर्यकुलीन लाटिन, जर्मन आदी भाषा बोलणाऱ्या आर्यवंशीयापेक्षा हीन आणि म्हणून गुलाम होण्याच्या लायकीचे असे समजले जाई.- हा मुख्यत्वे जर्मनीत प्रचलीत असलेला विचार होता. पण तो हळू हळू इतर राष्ट्र जी पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होती तेथे पसरला आणि रोमच्या पतनाला {अशास्त्रीय आणि अनैतिहासिकदृष्ट्या} ह्या सेमेटिक लोकांना जबाबदार धरले जाऊ लागले.)हि साधारण १८६० च्या सुमाराची गोष्ट. अशात १८८१ साली झार अलेक्झांडर ची हत्या झाली आणि त्यानंतर आलेला झार निकोलस ह्याने परत यहुदी विरोधी भावनेला खतपाणी घातले.तेथे यहुद्यांच्या वंश संहाराचे सत्रच सुरु झाले. हा वंश संहार ‘पोग्रोम’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. ह्याचा परिणाम अपरिहार्य होता. आजचा इस्रायल जो तेव्हा पालेस्ताईन म्हणून ओळखला जात होता तेथे साधारण २५००० यहुदी राहत होते तेथे युरोप आणि रशियातून निर्वासित यहुद्यान्चा ओघ वाहू लागला. ह्या निर्वासित यहुद्यांच्या लाटेला “आलीया' असे संबोधन आहे. आलीया म्हणजे झायोनिस्ट यहुद्यांच्या स्थलांतराची लाट. १८८५ ते १९१४ ह्या काळात अशा अनेक लाटा आल्या आणि ३० वर्षांच्या छोट्या कालावधीत त्यांची लोकसंख्या वाढून ती जवळपास १ लाख झाली ह्याचा दबाव तिथल्या मुस्लीम रहिवाशान्वर पडत होता. पण फक्त तेवढीच बाब त्यांच्याकरता चिंतेची नव्हती. हे निर्वासित यहुदी पूर्वी प्रमाणे गरीब, दिन दुबळे नव्हते. ते बहुसंख्येने झायोनिस्ट होते. आधुनिक इस्रायलच्या स्थापनेत ह्या झायोनिझम चा वाटा सिंहाचा आहे. तेव्हा जरा ह्या झायोनिझमची आपण माहिती घेणे अगदीच अप्रस्तुत असणार नाही.
झायोनिझम :
शतकानुशतकाच्या परवडीपासून आणि मत्सर छळ ह्यातून सुटका हवी असेल तर जगभरातल्या सर्व यहुद्यांनी एकत्र येऊन स्वत:चे स्वतंत्र राष्ट्र उभे करणे ह्याला पर्याय नाही. हा झायोनिस्ट विचारधारेचा पाया आहे. हि विचारधारा चूक कि बरोबर ह्याचा विचार आपण आता करीत बसण्यात अर्थ नाही. एकतर १९व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्र संकल्पना युरोपात बऱ्यापैकी दृढमूल झाली होती आणि जवळपास सगळीच युरोपीय राष्ट्र नवराष्ट्रवादाच्या नशेने झिंगून गेलेली होती. ह्यातून यहुद्यान्मधून नव्याने तयार झालेले विचारवंत बुद्धिवादी सुटणे शक्य नव्हते. आणि शिवाय इस्रायल ह्या आपल्या पौराणिक ऐतिहासिक पुण्याभूची त्यांची शतकानुशतकी जुनी आस होतीच. त्यालाच ह्या नवराष्ट्रवादाची चुरचुरीत फोडणी दिली आणि झायोनिझमचे खमंग रसायन तयार झाले. ते सर्व यहुद्यांमध्ये जोमाने लोकप्रिय झाले. जगभरात पसरलेल्या, अनेक शतकांपासून एकमेकांच्या संपर्कात नसलेल्या, भाषा, पोशाख, चालीरीती, खाणेपिणे ह्यात प्रचंड अंतर पडलेल्या सर्व याहुद्यांना एकत्र आणायला ह्या झायोनिझामची मोठी दिलखेचक मांडणी केली गेली. हि संकल्पना १८६२ पासून हळू हळू उत्क्रान्त होत गेली. मोझेस हेस, लिओ पिन्स्कर, थीओदोर हर्झल अशा अनेक विचारवंतांनी वेळोवेळी ह्यात सुधारणा करून ती आपापल्या परीने यहुदी समाजात प्रसिद्ध केली. हब्बत झीओन ह्या संस्थेने ती उचलून धरल्याने ती झायोनिस्ट चळवळ म्हणून प्रसिद्ध झाली. Anti-semitism चे पश्चिम युरोपातले प्राबल्य आणि त्यापायी आल्फ्रेड द्रेफूस ह्या फ्रेंच लष्करी अधिकार्यावर झालेला अन्याय ह्या मुळे यहुद्यांमध्ये झायोनिस्त चळवळ लोकप्रिय होणे अपरिहार्य होते. (संदर्भ - The Man on Devil's Island: Alfred Dreyfus and the Affair that Divided France ले. Ruth Harris) यहुद्यांवर ते केवळ यहुदी आहेत म्हणून कसा धडधडीत अन्याय होत असे ह्याची हि केस म्हणजे ज्वलंत उदाहरण होती. पण जागा अन औचित्या अभावी त्या संबंधी विस्ताराने लिहित नाही जिज्ञासूंनी वर उल्लेख केलेले पुस्तक वाचावे. ते किंडल वर उपलब्ध आहे.
असो तर अखेरीस १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपले आणि ओट्टोमान साम्राज्य एकदाचे पंचत्वात विलीन पावले. ४०० वर्षानंतर पालेस्टाईनाचा भाग प्रथमच इंग्रजांच्या अंमलाखाली आला आणि यहुद्यांच्या आशा पल्लवित झाल्या. तत्कालीन परराष्ट्रमंत्री आर्थर बाल्फोर ह्यांच्यापुढे झायोनिस्ट यहुद्यांनी आपली स्वतंत्र इस्रायलची मागणी ठेवली. इतर युरोपीय राष्ट्राप्रमाणेच इंग्रजानाही हि यहुद्यांची ब्याद देशातून जाईल तर बरे असेच वाटत होते पण त्यासाठी ते अरबांना दुखवायला तयार नव्हते. अजून तेल सापडले नसले तरी सुवेझ कालव्यामुळे इंग्रजांना व्यापार उदीम निर्धोक राहावा तसेच पूर्वेकडच्या आपल्या वसाहतोंशी संपर्क करणे सुलभ व्हावे म्हणून ह्या भागात शांतता हवी होती म्हणून त्यांनी यहुद्यांना २ पर्याय दिले. एक तर आफ्रिकेतला युगांडाचा काही भाग घ्या किंवा सायनाई हा इजिप्तच्या अखत्यारीतला पश्चिमेचा वाळवंटी भाग घ्या.( हे दोन्ही भूभाग काही इंग्रजांच्या बापाच्या मालकीचे नव्हते पण हे कावेबाज युरोपियन लोक असेच. मुंबई ह्यांच्या बापाची नव्हती पण पोर्तुगीजांनी ती इंग्रजांना आंदण दिली...असो) झायोनिस्ट चळवळीची सगळी वाटचाल त्यांच्या पुण्यभू इस्रायलच्या पायावर उभी असल्याने त्यांनी हे दोन्ही पर्याय नाकारले. झायोनिस्ट चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्लंड मध्ये देखिल यहुदी लोक संघटीत होऊ लागले होते, त्यांच्यात नवजागृती येऊ लागली होती हे इंग्लंडला परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांना काहीतरी करणे भाग होते.त्यांनी प्यालेस्ताईनच्या भूभागाची फाळणी करण्याचा प्रस्ताव मांडला तो त्यांच्या संसदेत मंजूर ही करून घेतला( जसा काही हा त्यांचाच भूभाग.)त्यांच्या ह्या कृत्यामुळे अरब जगतात संतापाची लाट उसळली.तर याहुद्यांमध्ये आनंदाची.आता गम्मत बघा, झायोनिस्तानी भावनेला आवाहन करून यहुदी जनमानसात स्थान मिळवलं, त्यांना गैर याहुद्यांकडून झालेल्या विरोधाने ते स्थान अजूनच पक्क झाल पण जेव्हा प्रत्यक्षात यहुदी आपल्या पुराणातल्या पुण्याभूमिकडे जाऊ लागले तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला.हि काही सुजलाम सुफलाम धरती नव्हती ती होती मरुभूमी- वाळवंट. तिथे आयुष्य सोप नव्हत, त्यामुळे तिथून काही लोक अमेरिकेत जाऊ लागले.त्यामुळे अमेरिकेतही त्यांची संख्या लक्षणीय रित्या वाढली. अमेरिकेची द्वारं तेव्हा जगाला नुकतीच उघडली होती, अमेरिका महासत्ता बनण्याच्या वाटेवर होता.१८८१ मध्ये जेव्हा पहिली आलीया सुरु झाली तेव्हा पलेस्ताइन मध्ये याहुद्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ४% होते ते झपाट्याने वाढून १९३९ साली जेव्हा दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा ते ३०% झालेले होते ह्यावरून किती झपाट्याने यहुदी तेथे आले ते आपण समजू शकतो अर्थात ह्यामुळे अरबी राष्ट्रात संताप धुमसू लागला होता पण इंग्रज तेथे पक्के पाय रोवून असल्याने अरबांना फार काही करता येत नव्हते. ह्याच सुमारास तेथे तेल मिळू लागल्याने अर्थात साऱ्या विकसित जगाचेच लक्ष तिकडे गेलं. यहुदी भरपूर संख्येने असले तरी निर्वासित होते.आणि दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर तर ह्या प्रदेशाला तेलामुळे साहजिक महत्व आलं. अरबांना चुचकारून तेल उत्खननाचे ठेके मिळवण्यासाठी आता इंग्रजांना आपले धोरण बदलणे भाग पडले. त्यांनी याहुद्यांच्या तिकडे येण्य्च्या संख्येवर मर्यादा घातली. इकडे युरोपातली राष्ट्र नाझी जर्मनी पुढे धडाधड कोसळून पडत होती आणि त्या त्या राष्ट्रांमध्ये असलेले यहुदी जर्मनीच्या भक्ष्य स्थानी. लवकरच खाडी पलीकडचा इंग्लंड हा एकाच देश उरला जो अजून जर्मनीशी लढत होता आणि एकंदरीत १९४०-४१ मध्ये त्याची अवस्था फार चांगली नव्हती.अशात त्यांनी युरोपातून पलेस्ताइन मध्ये येणाऱ्या याहुद्यांच्या संख्येवर मर्यादा घातली, सगळ्यांना दूर अमेरिकेत जाणे शक्य नव्हते. असे लक्षावधी दुर्दैवी यहुदी लोक नाझी जर्मनांच्या कचाट्यात सापडले. ह्या गदारोळात जवळपास ६० लाख यहुदी जर्मनीच्या फक्त छळ छावण्यात सापडून मारले गेले.नाझी जर्मनी जसा ह्याचा दोषी आहे तसेच ह्या पापाचा काही भार इंग्लंडला हि उचलावा लागणार (आणि काही अरबांना...)
नाझी लोक यहुद्यांचे काय करतात हे पोलंड मध्ये जवळून पाहिलेला आणि जीव मुठीत घेऊन तिथून वेळीच पळून आलेला एक तरुण डेव्हिड बेन गुरियन हे सगळे पाहून अस्वस्थ होत होता. तेलासाठी इंग्रजांनी अरबांची मनधरणी करायला सुरुवात केल्या पासून अरबांचे मनोधैर्य वाढीला लागले होते. त्यांनी आता निर्वासित याहुद्यांच्या वस्त्यांवर हल्ले , जाळपोळ लुटालूट सुरु केली. युरोपातून पळून आलेली यहुदी लोकांनी भरलेली जहाजं इंग्रज बंदरात अडवत, त्यातील लोकांना उतरू देत नसत. पण हे अरब त्यावर हल्ला करत, बरं जहाज खोल समुद्रात नेऊन उभी करावी तर युद्ध सुरु होते, अख्खे जहाजाच रसातळाला जायची भीती होती. अशात आपण फक्त गप्प बसून भागणार नाही हे गुरीयनने ओळखले त्याने ‘ हगाना’ हि यहुदी निर्वासितांची रक्षा करणारी लष्करी संस्था स्थापन केली. हे लोक अरब हल्लेखोरापासून यहुदी वस्त्यांचे रक्षण करणे, बंदरात उभे असलेल्या यहुदी निर्वासितांचे रक्षण करणे त्यांना गुपचूप जहाजावरून काढून सुरक्षित स्थळी पोहोचवणे अशी कामे करत. सुरुवातीला लहान असलेली हि संस्था पुढे चांगलीच फोफावली. ह्यात युरोपातून पळून आलेले आणि तिथे लष्करी प्रशिक्षण घेतलेले लोक हि होते.त्यांना पैसा अमेरिकेतले सधन आणि सुरक्षित असलेले यहुदी पुरवत असत. १९१८ साली फक्त पालेस्ताईनच्या फाळणीचा प्रस्ताव संसदेत मंजूर करून पुढे २०-२२ वर्षं फक्त चालढकल करत बसलेले इंग्रज आपली फारशी मदत करणार नाहीत हे गुरियन यांनी ओळखले. अरब मागास असंघटीत होते आणि तसे हगना पुढे कच्चे होते. खरे आव्हान इंग्रजांचे असणार होते म्हणून मग त्यांनी हळूहळू आपला मोहरा इंग्रजाकडे वळवायला सुरुवात केली.हगाना चे लोक आता ब्रिटीश लष्करी तळांना लक्ष्य करू लागले त्यापायी ब्रिटीशाना आपल्या तिथे तैनात करायच्या लष्करी शिबंदीत वाढ करावी लागली. ऐन युद्ध चालू असताना इथे त्यांचे जवळपास १ लाख सैन्य अडकून पडले होते. ह्याचा फार मोठा बोजा त्यांच्या तिजोरीवर पडत होता. अखेरीस युद्ध संपले पण तरीही ब्रिटिशांना इथून सैन्य काही काढून घेता येईना आता हगाना अधिकच आक्रमक झाली होती शिवाय दुसरे महायुद्ध संपल्याने अमेरिकेतून शस्त्रास्त्रांची मिळणारी मदत आता निर्धोक पणे त्यांच्या हाती पडू लागली . जर्मनीने यहुद्यांवर केलेले अत्याचार जगाने बघितल्यामुळे यहुद्यान्बद्दल सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यामुळे हगाना चा कठोर उपायांनी बंदोबस्त करणे अवघड जात होते. तशात आता पूर्वेकडचे भारत, श्रीलंका, सिंगापूर इथल्या वसाहती सोडून देऊन त्यांना स्वतंत्र करायचेही इंग्रजांनी ठरवले होते अशावेळी फार उशीर न करता हे जवळपास ३० वर्षे भिजत पडलेलं आणि आताशा भलतच अवजड झालेले घोंगडं त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या गळ्यात टाकलं आणि आपण तिथला बाडबिस्तरा गुंडाळला. जगाचा भार आपल्या शिरावर घेऊन जिथे तिथे नाक खुपसण्याची (आणि बर्याचदा ते कापून घेण्याची) अनिवार हौस( पक्षी खाज) असलेला अमेरिका आता मध्ये आला. त्याने लगेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या भात्यातून पहिला तीर मारला तो १९१८ पासून फक्त कागदावर असलेला फाळणीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्याचा. तशी औपचारिक घोषणा झाली आणि कार्यवाहीही सुरु झाली . हा पहिलाच तीर अरबी मधमाशांच्या पोळ्यावर लागला आणि अरबी माशा चवताळून उठल्या. अरबी निदर्शकांचा नेता शेख साबरी ह्याने हि फाळणी रद्द करण्यची जोरदार मागणी केलीच शिवाय यहुद्याना हा भूभाग सोडून जाण्याची अन्यथा सगळ्यांना जीवे मारण्याची धमकीच दिली. झालं यादवी माजायला एवढे कारण पुरेसं होतं पण यहुदी आपल्याला जड जातायत हे पाहून त्याने संयुक्त राष्ट्रसंघाला फाळणी रद्द करा नाहीतर तेल पुरवठा बंद करू म्हणून दम दिला. हि मात्रा लागू पडणार असे दिसू लागले.गुरियन ह्यांच्या पोटात गोळा आला. असिरीयान राजवटीच्या ताब्यात आपली भूमी गेल्यापासून २७०० वर्ष यहुदी रानोमाळ भटकत होते आता अगदी हातातोंडाशी आलेला घास जातो कि काय असे त्यांना वाटू लागले. काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते.गुरियन हा जात्याच कणखर स्वभावाचा आणि निर्णय घेताना न डगमगणारा नेता होता. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाने फाळणी रद्द करण्याच्या आधीच म्हणजे १४ मी १९४८ रोजी संध्याकाळी इस्रायल ह्या देशाच्या स्थापनेची घोषणा करून टाकली.हा जगाला मोठाच धक्का होता. धक्का ओसरल्यावर अरब गप्प बसणारा नाहीत, ते हल्ला करतील हे गृहीत धरून आधीच त्याची व्यूह रचना आखली जात होती, त्याचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी स्वत:ला नवीन इस्रायल देशाचे पंतप्रधान म्हणून जाहीर करून टाकले आणि लगेच सूत्र हातीही घेतली.इकडे अमेरिकेत मोठा पेच प्रसंग उभा राहिला. अरबांनी हल्ला केल्यावर काही भलतं सलतं झालं तर अमेरिकेची नाचक्की होणार होती. शिवाय यहुद्यांची त्यांच्या निर्वासितांची सोय ही पहावी लागणार होती. त्यांना असे वाऱ्यावर सोडता येणार नव्हते. अनेक यहुदी शास्त्रज्ञ, व्यापारी उद्योजक कालावंत अमेरिकेत होते आणि त्यांची लोबी चांगलीच प्रभावशाली होती तिचा दबाव हि होताच.त्यामुळे घाई घाई ने त्यांनी इस्रायलला मान्यता देऊन टाकली. अमेरिकेने मान्यता दिल्यावर अमेरिकेच्या गोटातले इतर देशही मान्यता देणार हे उघड होते. पण त्याने काय होणार! अरबांनी आक्रमण केलेच. पश्चिमेकडून इजिप्त तर पूर्वेकडून सौदी अरेबिया, जोर्डन, इराक, लेबनान, सिरीया ह्यांनी संयुक्तपणे आक्रमण केलं. अरबांनी केलेल्या ह्या आक्रमणात ३०हजार सैनिक, १५० च्यावर तोफा, १८० रणगाडे, तर साधारण ५०-६० लढाऊ विमानं सामील झाली होती.आणि इस्रायल कडे होत्या ५ तोफा , रायफल्स आणि काही मशीन गन्स. सैनिक होते २६००० च्या आसपास. ह्या संघर्षात इस्रायाचा निभाव लागण कठीण होत आणि “आमच्या कडे अस्त्र शस्त्र कमी असली तरी देशभक्ती आहे आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करायची आमची तयारी आहे.” वगैरे असली वाक्य नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्यात शोभतात प्रत्यक्ष व्यवहारात त्यांचा तितका उपयोग नसतो. अरबी सैनिक कमी शूर किंवा कमी देशभक्त होते असे म्हणणे वेडे पणाचे होईल नाहीका! पण इस्रायल कडे एक फार महत्वाची गोष्ट होती जी अरब राष्ट्राकडे नव्हती...आजही तितकी कार्यक्षम नाही ती म्हणजे प्रभावी गुप्तचर यंत्रणा.
फाळणीच्या वेळचा इस्रायल. निळ्या रंगात दाखवलेला भाग इस्रायल असणर होता
पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन आणि इस्रायलचा राष्ट्रध्वज.
शिन बेत
इस्रायलच्या स्थापनेच्या हि आधी पासूनच्या काळातली शिन बेत हि गुप्तचर यंत्रणा होती. ब्रिटीशांशी गनिमी युद्ध खेळताना हगानाला महत्वाची माहिती पुरवणे, इंग्रज सैनिकांची दिशाभूल करणे, चोरून माणसे, लष्करी साहित्य रसद इकडून तिकडे पोहोचवणे अशा महत्वाच्या कामासाठी हगानामाधुनच काही अनुभवी मनसे वेगळी करून शिन बेत स्थापिली होती. शिन बेत ने ह्या पहिल्याच युद्धात फार मोलाची कामगिरी पार पडली.सैन्यात घातपाती कारवाया पार पाफ्दाने, संदेश वाहन बंद पाडणे किंवा चुकीचे संदेश प्रसारित करून दिशाभूल करणे. अशा कारवाया करून त्यांनी अरबी हल्ला लांबवला त्याचा प्रभाव कमी केला शिवाय त्यांच्या महत्वाच्या मोहिमांची हालचालींची खबरबात इस्रायली सैन्याला दिली.त्यांच्या २ मोठ्या कामगिऱ्या म्हणजे लीनो नावाचे जहाज जे इटलीहून ८००० रायफली घेऊन जोर्डनला निघाले होते ते जहाज भर समुद्रात बुडवले. पण त्याआधी त्यावरच्या रायफली काढून घेतल्या. आणि इटलीनेच इजिप्तला ४ लढाऊ विमाने विकली होती ती त्यांच्या हाती पडण्याआधीच नष्ट केली. ह्यामुळे अरबी सैन्याच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाला.तयारी करायला, मदत मिळवायला हवा असलेला महत्वाचा वेळ इस्रायला मिळाला. त्यांनी धनिक अमेरिकन यहुद्यांकडून पैसा गोळा केला. ह्या पैशाच्या आधारावर अधिक शस्त्र सरंजाम विकत घेतला. आता इस्रायलची बचाव सोडून आक्रमक व्हायची पाळी होती. त्यांनी जोरदार हल्ला चढवत संयुक्त अरबी सैन्याला पिटाळून तर लावलच पण पुढे जाऊन त्यांच्या प्रदेशावरही हल्ला केला. त्यांच्या ह्या झंझावातापुढे अरब राष्ट्र हबकून गेली. त्यांच्या आक्रमणाचा कणाच मोडला. १६ मे १९४८ ला सुरु झालेलं हे युद्ध २२ जुलै १९४९ला संपलं तेव्हा पूर्वी पालेस्ताइन च्या फाळणीत ५५% भूभाग मिळालेलं इस्रायल आता ८०% भूमीचं मालक होतं.आज ७० वर्षे होत आली तरी हा भूभाग इस्रायालींनी कधीही सोडला नाही. ते तो सोडणारही नाहीत.
१९४८ साली अरब राष्ट्रांनी केलेले आक्रमण.
हिटलर आणि त्याच्या नाझी समर्थकांनी जवळपास ६० लाख यहुदी छळ छावण्यात मारले. इस्रायल जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्याची लोकसंख्या होती ८ लाख जेमतेम. सैन्य संख्या होती ३० हजार. पण त्यांनी किडा मुंगी सारखं छळछावणीत असो वा रणांगण प्रतिकार न करता मरण्याऐवजी शत्रूशी प्रतिकार करायचे ठरवले.किडा मुंगी सारख किंवा शेळ्या मेंढ्यासारख याहुद्यांना मारलं आणि ह्या यहुद्यानी फारसा प्रतिकार केला नाही. गुपचूप मृत्यू स्वीकारला ह्याचे वैषम्य, लाज त्यांना वाटत असे. (आपण देखिल ह्याचे काही जुने विडीयो यु ट्यूब वर पाहतो तेव्हा शेकडो यहुदी स्त्री-पुरुष, वृद्ध, मुल, अगदी तान्ही बाळ ह्यांना एकत्र करून, विवस्त्र करून गास चेंबर मध्ये ढकलत असलेले किंवा फायरिंग स्क्वाड समोर उभे केले जात असलेले दिसते, आता पुढे काय होणार हे डोळ्यासमोर दिसत असताना त्यांच्या पैकी एकही जण प्रतिकार करायचा साधा प्रयत्नही करत नाही! मरायचेच आहे तर किमान एक दगड, एक लाथ, अगदी एक बुक्की तरी मारू असे एकालाही वाटत नाही? लहानसे मांजराचे पिल्लू आपण जर कोपऱ्यात कोंडले तर ते पळून जायचे सगळे उपाय थकले हे समजून, शेवटचा उपाय म्हणून आपल्यावर हल्ला करते, ते कितीही लहान, अशक्त असले तरीही. ही नैसर्गिक प्रेरणा आहे.पण हे यहुदी! हि तर माणसं होती! मग ही अशी निमूटपणे मृत्युच्या दाढेत का गेली? ते पण आपल्या म्हातार्या आई वडील बायको ते अगदी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन. नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची हि अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते. मला ह्या घटनेचे आश्चर्य वाटते. अनेक प्रकारे मी ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर अजून तरी नाही मिळाले.) “पुन्हा कधी हि अशी वेळ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या यहुद्यावर येणार नाही. आम्ही ती येऊ देणार नाही. आम्ही जगाच्या चांगुलपणाच्या आणि न्यायीपणाच्या भरवशावर राहणार नाही” असे गुरियन यांनी एके ठिकाणी म्हटले होते. आजपर्यंत तरी त्यांनी आणि इस्रायल ने आपले म्हणणे खरे करून दाखवले आहे.
मी काही वर्षापूर्वी म्हणजे नक्की सांगायचे तर २००५ सालच्या नोव्हेंबर मध्ये दिल्लीला जवाहरलाल युनिवर्सिटीत गेलो होतो. तिथे मला इस्रायलची निंदा, नुसती निंदा नाही तर गलिच्छ शब्दात नालस्ती करणारे आणि फिलीस्तिनी संघर्ष, गाझा, P.L.O.बद्दल गळे काढणारे पोस्टर्स भिंती भिंतीवर लागलेले दिसले. निमित्त होते यासार अराफात ह्याच्या पहिल्या पुण्यातिथीचे.(११ नोव्हे.) ह्याचा युनिवर्सिटीशी काय संबंध असा प्रश्न मला तेव्हा पडला होता पण तेव्हा मला इस्रायल आणि एकंदर ह्या एकूण संघर्षा बद्दल काहीच माहिती नव्हतं. पण तिथे J.N.U. मध्ये यासार अराफात चे खालील वाक्य भिंती भिंतीवर छापलं होतं
Peace for us means the destruction of Israel. We are preparing for an all-out war, a war which will last for generations.
इस्रायलचा, तिथल्या यहुद्यान्चा सर्वनाश हेच ज्याचं जीवनध्येय आहे त्या लोकांचे फोटो J.N.U.मध्ये काय करत होते? हा प्रश्न पडल्याने मी ह्या विषयाकडे वळलो. ह्या मध्ये अरबांची बाजू मांडणारी, प्रभावी पणे मांडणारी पुस्तकं फारशी नाहीत किंवा ती मला सापडली नाहीत. पण J.N.U. मध्ये फोटो-पोस्टर्स लावण्याऐवजी त्यांच्या समर्थकांनी ती लिहिली- छापली तर अधिक बरे होईल असे मला प्रामाणिकपणे वाटते. आणखी एक, ज्या अरब राष्ट्रांशी जन्मापासून उभा दावा इस्रायलचा आहे तिथे गेली सतत ७० वर्षे लोकशाही – खरीखुरी लोकशाही नांदते आहे. अरब राष्ट्रांचे काय! इस्रायल हे अरबी लांडग्यांच्या घोळक्यात सापडलेले एक दुर्बळ कोकरू नक्कीच नाही. पण त्यांच्या करता हा संघर्ष जीवन मरणाचा, अस्तित्वाचा संघर्ष आहे हेही आपण विसरून चालणार नाही. ते तर विसरत नाहीच. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे पाहताना हा पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे आपण इस्रायलची स्थापना कशी झाली त्याचा थोडक्यात आढावा घेतला. हा कदाचित थोडा लांबला असे वाटले असेल पण ह्यातल्या बऱ्याच संज्ञा आणि संकल्पना आणि महत्वाचे म्हणजे घटना अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणून एवढे पाल्हाळ.
क्रमश:
--आदित्य
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बऱ्याच बाबींना एकदमच हात
म्हणजे....
बाकी सगळे ठीक आहे.
विंटेरेष्टींग विषय आहे
आपण नवे नवे हत्तीचे पुतळे,
चालुद्या!
धागा मोसाद सोडून जेएनयु वरच
अतिशय उत्तम लेख!!!
माहिती ने भरलेला लेख...अरब
विषयाचा आवाका मोठा आहे.
+१
परिचयच खूप वाचनीय झाला आहे.
आपण देखिल ह्याचे काही जुने
"त्यावेळी ज्यू लोकांना आपण
ओके, माफ करा हां तुम्हाला
हे मला वाटते नवीन येणार्या
मुद्दा असा आहे कि हे जे
(जसे आज आपण मुस्लिम
अहो मुद्दा छळ्चावणीचा आहे ना
नाही...निमूट्पणे बळी
त्या काळात ज्यु समाज जगभर
AavaDala
मस्त माहिती
ईस्रायलची स्थापना
तसे म्हणा हवेतर , पण आपण काय
लेख बराच विस्कळीत झाला आहे.
संदर्भाकरता वापरलेली पुस्तके सांगाल प्लीज
संदर्भग्रंथ
+१
इस्रायल आणि मोसाद. भाग १ ह्या लेखमालेतला हा परिच्छेद आवडला नाही
असो..
यांपैकी किती विडिओ खरेखुरे आहेत?
खरंच 60 लाख मारले गेले का??
दुरुस्ती
लेख उत्तम बोकाःच्या मोसाद
कोणतेच लेखन हे संपूर्ण नसते.
उत्तम लेख. पुभाप्र
खूप माहितीपर आणि ओघवता लेख.
इतिहास माझा आवडता विषय
एक जबरदस्त लेख वाचल्याचं
अन्ध
काहि प्रॉब्लेम आहे का
"सल्ला" कधी कधी ऐकावं माणसानं.
थोडक्यात दुश्मन का दुश्मन
सॉरी "विचारा" लिहायचा होत, "विचार" लिहिला गेला
श्री. कर्ण यांना
तुम्ही "लै भारी"
"तुम्ही" लिहिता म्हणून तुम्ही
पुढचा लेख कधी?
कंपनीत कामाचे प्रेशर