✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मक्केतील उठाव ६

ह
हुप्प्या यांनी
Mon, 10/24/2016 - 09:10  ·  लेख
लेख
आधीचा भाग ५ जॉर्डनचा राजा हुसेन सौदी राजाला भेटायला आला. त्याला आपले सैनिक पाठवून मक्केतील बंडखोरांचा निकाल लावण्याची खूप इच्छा होती. सौदी राजाने आदरातिथ्य, आगतस्वागत व्यवस्थित केले. पण जेव्हा मक्केचा विषय आला तेव्हा स्पष्ट सांगितले की तुमची मदत घेणे आम्हाला परवडणार नाही. किंग हुसेनचा आजोबा हा मक्केचा सेनापती (शेरीफ ) होता. तो हाशमी टोळीचा. ऑटोमन साम्राज्य अरेबियावर राज्य करत असताना त्यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी होती. नंतर सौदी सैन्याने त्यांचा १९२४ साली पराभव करून त्यांना जॉर्डनला हाकलले. हा इतिहास असल्यामुळे आणि तेव्हाही काही स्थानिक हाश्मी लोक जॉर्डनच्या राजाशी निष्ठा ठेवून असतील ह्या भीतीने सौदी राजाने जॉर्डनची मदत नाकारली. एक सौदी अधिकारी अमेरिकन वकिलातीत एकाशी बोलताना म्हणाला की जॉर्डन सैन्य मदत करायला आनंदाने मक्केला येईल पण काम झाल्यावर इथून जाईलच ह्याची खात्री नाही! वास्तविक जॉर्डनचे सैन्य चांगले तयार होते. नुकतेच पेलेस्टाईनच्या बंडखोरांशी यशस्वीरीत्या लढण्याचा त्यांना अनुभव होता. अरबी भाषिक, मुसलमान त्यामुळे मक्केत यायला अडचण नाही. पण राजकीय इतिहासामुळे ते शक्य झाले नाही. ट्युनिशिया व अन्य देश त्याच कारणाने नाकारले गेले. एकंदरीत सौदी सरकार कायमच स्वतः:ला असुरक्षित समजते. कुठेही बंद, उठाव होईल अशी शक्यता असेल तर तो टाळणे वा वेळच्या वेळीच चिरडणे असेच पर्याय निवडते. (सौदी राजाने राज्य हे असेच बंड करून मिळवलेले असल्यामुळे आपल्याकडूनही कोणीतरी ते हिरावेल अशी एक कायम भीती त्यांना असणे स्वाभाविकच आहे. हे काही लोकशाही मार्गाने मिळवलेले राज्य नाही.) मग सौदी सरकारने अमेरिकेकडे मोर्चा वळवला. आधीच अमेरिकेविरुद्ध वातावरण तापलेले, इराण प्रकरण झाल्यामुळे त्या वकिलातीत लोकांच्या जीवाची भीती. त्यामुळे सौदी आणि अमेरिका दोघेही घाबरत घाबरतच भेटले. शेवटी निव्वळ सामग्री आणि तांत्रिक मार्गदर्शन इतकेच अमेरिका पुरवेल असे ठरले. त्यानुसार त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने अश्रुधुराच्या नळकांड्या पुरवायचे ठरवले. तळघरात हे अश्रूधूर सोडून बंडखोरांना नामोहरम करायचे आणि मुखवटे घालून सैनिक आत शिरणार आणि अतिरेक्यांना मारणार किंवा पकडणार अशी योजना होती. बंडखोरांच्या सुदैवाने आणि सौदीच्या दुर्दैवाने हा बेत फसला. अश्रूधूर हा फार हलका होता. तो वेगाने तळघरातून निघून वरती जाऊ लागला. त्याचा त्रास तळघरातील लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांनाच झाला. उलट्या, चक्कर अशा प्रकारामुळे सौदी सैनिक हैराण झाले. वाऱ्याची दिशा, तापमान ह्या सगळ्या गोष्टींचा बंडखोरांना फायदा झाला. अशा गोष्टींवर उपाय काय करायचा ह्याचे प्रशिक्षण मिळालेले असल्यामुळे पाण्याने भिजवली कापडे वगैरे तोंडावर लावून ते अश्रुधुराला व्यवस्थित तोंड देऊ शकले. ओलीस ठेवलेले यात्रेकरू आणि पकडलेले सौदी सैनिक ह्यांचे प्रचंड हाल होते. त्यातले काही जखमी होते. तशात अश्रूधूर. त्यांना पाणीबिणी काही मिळाले नाही. त्यांना उलट्या, बेशुद्ध होण्याचा त्रास होताच. शिवाय अतिरेकी लोक खायला प्यायलाही फार देत नव्हते. सकाळी एक खजूर, रात्री एक खजूर आणि मध्ये एकदा पाणी इतकेच त्यांच्या नशिबी होते. एक ८० वर्षांचा यात्रेकरू असल्या हालामुळे जमिनीवर पडून होता आणि कधीतरी त्याने प्राण सोडला. बंडखोरांना वा अन्य कुणाला त्याचे सोयरसुतक नव्हतेच! हा अश्रूधूर वाऱ्याची दिशा व अन्य हवामानातील घटक ह्यामुळे आसपासच्या हॉटेलातही पसरला. कित्येक हॉटेलात पत्रकार होते. त्यांना हॉटेल रिकामे करावे लागले इतका तो त्रास तीव्र होता. अश्रूधूर प्रकरण फसले. लोकांनी अवाच्या सवा नवनव्या कल्पना सुचवल्या. एक होती की तळघरात पाणी सोडून बंडखोरांना बुडवून मारा. एक राजपुत्र म्हणाला इतके मोठे तळघर पाण्याने भरायला सगळा तांबडा समुद्र आणून ओतावा लागेल! कुणी अशीही कल्पना सुचवली की अनेक कुत्र्यांना बॉम्ब बांधून आत सोडा आणि स्फोट घडवा. पण तेही अव्यवहार्य होते. एकंदरीत असा खल केल्यावर आपल्याकडे फार काही पर्याय नाहीत आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नाहीत हे सौदी मंत्र्यांना कळले. बंडखोरांना कोंडून त्यांची उपासमार करून शरण आणणे हा एक उपाय होता. पण सौदी सरकारला इतकी वाट बघण्याची इच्छा नव्हती. शिवाय हे कमी म्हणून की काय एक नवीच डोकेदुखी सुरु होत होती. मक्केच्या पूर्वेला ८०० मैलावर, इराणी आखाताच्या किनार्यावर कतीफ नावाचे (उप)राज्य आहे. तिथे बहुसंख्य वस्ती शिया अरब लोकांची आहे. आणि हा भाग तेलाने प्रचंड समृद्ध आहे त्यामुळे तेलाच्या विहिरी आणि शुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. इथे अमेरिकन आणि अरबी उद्योजकांनी मिळून आरामको नावाची कंपनी सुरु केली आहे तिचे प्रकल्प आहेत. सौदी लोकांचा वहाबी विचार असल्यामुळे त्यांना शियांबद्दल मोठा आकस आहे. इथल्या जमिनीतून मिळणाऱ्या तेलाची रॉयल्टी तर सोडाच पण तेलाच्या प्रकल्पात नोकऱ्याही शिया लोकांना दिल्या जात नाहीत. सरकारी नोकऱ्या, पोलीस, सैन्य अशा संधीही त्यांना उपलब्ध नसतात. उलट विविध औद्योगिक प्रकल्प आपल्या कामाकरता पंपाने जमिनीचे पाणी बाहेर खेचून काढतात त्यामुळे आसपासचे शेती व्यवसायही संपले आहेत. त्यामुळे शिया लोकांमध्ये कायम असंतोष असे. मक्केतील उठावाच्या ज्या काही ऐकीव बातम्या अफवा इथे पोचल्या (सौदी सरकारने ब्लॅकआऊट केल्यामुळे अधिकृत काहीही काळात नव्हते) त्यामुळे शिया लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मुहर्रम हा त्यांचा जास्त जिव्हाळ्याचा महिना. त्याच्या दहाव्या दिवशी मिरवणूक निघतात. खरेतर हा शोकसोहळा असतो. शिया लोक महम्मदाचे नातू हुसेन आणि हसन ह्यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करतात. अशा प्रकारच्या मिरवणुकीला सौदी अरेबियात बंदी आहे. पण खाजगीत हा सोहळा होतोच. इराणच्या क्रांतीमुळे शिया इमाम पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रक्षोभक भाषणे करू लागले होते. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून इथे आंदोलने सुरु झाली. अर्थात हे शिया लोक सामान्य नागरिक होते. मक्केतील लोकांप्रमाणे प्रशिक्षित नव्हते. सौदी पोलिसांनी हे आंदोलन चिरडणे सुरु केले. लाठ्या, मग अश्रूधूर मग गोळीबार हे सगळे झाले. पुढे दंगलीचे लोण पसरत गेले. हा भाग अनेक गल्लीबोळात विभागला गेलेला आहे. एकटा दुकटा शिपाई अशा गल्लीत आंदोलकांचा पाठलाग करत पोचला की लोक त्याला मारून त्याची बंदूक पळवून नेऊ लागले. अशा बंदुका मग पोलिसांवर रोखून पोलिसांना मारले. आणि हा हिंसाचार वाढत गेला. सौदी सरकारने मक्केतील काही सैनिक ह्या बंडाचा बिमोड करायला पाठवले. मक्केतील बंडखोरांबद्दल सौदी सैन्याला नाही म्हटले तरी थोडा आदर होता. शिवाय पवित्र मशिदीत हल्ला करताना थोडे कचरायलाच होत होते. असे लोक शिया लोकांवर हल्ला करायला एका पायावर तयार होते. अशा धर्मभ्रष्ट लोकांना अद्दल घडवताना त्यांना थोडीही दयामाया दाखवायची गरज वाटली नाही. जसे दंगलीचे प्रमाण वाढले तसे जास्त कठोर उपाय केले गेले. ह्या भागातील वीज व पाणी तोडून टाकले गेले. जीपवर मशिनगन लावून सैनिक फिरू लागले. कुठे मोर्चा वा आंदोलन वा संशयास्पद दिसले की गोळ्या मारून ठार मारण्याचा सपाटा लावला. यथावकाश शिया लोक शरण आले. त्यातील वडीलधाऱ्या मंडळींनी उच्चपदस्थ लोकांशी समझौता करून हा उठाव संपवला. अर्थात शिया लोकांचा असंतोष शमला नव्हताच पण निदान परिस्थिती नियंत्रणात आली. आता सौदी सरकारने फ्रेंच सरकारकडे काही मदत मिळत आहे का ह्याची चौकशी सुरु केली. १९७२ साली म्युनिच इथे ऑलिम्पिक सामने भरले होते. तिथे पॅलेस्टीनी अतिरेक्यांनी इस्रायली खेळाडूंचे अपहरण केले. जर्मन सरकारने त्यांची सुटका करायचा प्रयत्न केला पण अनेक चुका झाल्यामुळे तो प्रयत्न फसला . ओलिस ठेवलेले सगळे खेळाडू मारले गेले. ह्यावर उपाय म्हणून अनेक युरोपीय देशात अतिरेकी हल्ल्याला तोंड देणारी पथके निर्माण केली गेली. सैन्याच्या प्रशिक्षणापेक्षा वेगळे, नागरी भागात झालेल्या हल्ल्याला तोंड कसे द्यावे, ओलीस ठेवलेल्यांची सुटका कशी करावी वगैरे गोष्टींचे प्रशिक्षण मिळालेले कमांडोज तयार केले गेले. फ्रान्समध्ये अशाच प्रकारे GIGN (https://en.wikipedia.org/wiki/GIGN) हे पथक बनले. सौदी सरकारपुढे त्यांनी आपल्या काही नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही करून दाखवले होते. अनेक लहानमोठ्या मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांनी नाव कमावले होते. अमेरिका स्वतः: संकटात होती (इराणमधील ओलीस प्रकरण) त्यामुळे फ्रेंच लोकांची मदत घ्यावी असे सौदी सरकारने ठरवले. त्याप्रमाणे एक फ्रेंच पथक रियाधला दाखल झाले. हे सगळे अत्यंत गुप्त असल्यामुळे ह्याची अधिकृत माहिती आजही उपलब्ध नाही. एका ठिकाणी असे लिहिले आहे की फ्रेंच कमांडोज धर्मांतरित केले गेले आणि ते मक्केत आले आणि त्यांनी मोहिमेत भाग घेतला. दुसरा असे म्हणतो की त्यांचा सहभाग हा सल्ला देणे इतपतच होता. ते प्रत्यक्ष हल्ल्यात उतरले नव्हते. पण निदान काही मोजके लोक मक्केला आले होते. त्यांचा पहिला सल्ला असा होता की ड्रिल मशीनने जमिनीला भोके पाडून त्यातून ग्रेनेड टाकून बंडखोरांना मारा. त्याप्रमाणे मोहीम आखली गेली. पाकिस्तानी कामगार अशा प्रकारे भोके पाडू लागले. भोक पडताच खालच्या बंडखोरांनी गोळ्या घालून अनेक कामगार ठार केले. पण यथावकाश वरून ग्रेनेडचा वर्षाव सुरु झाला आणि काही भाग बंडखोरमुक्त झाला. सौदी सैन्याने फ्रेंच लोकांच्या मार्गदर्शनाखाली असे ठरवले की हळूहळू पूर्ण तळघर अशा प्रकारे मुक्त करून त्यावर कब्जा करायचा. त्याप्रमाणे हल्ले करून त्यांनी यश मिळवले. बंडखोर अजूनही हल्ले करताच होते. पण एव्हाना सौदी बाजूचे पारडे जास्त जड होऊ लागले होते. शरण येणाऱ्या लोकांना मारू नका अशा सूचना दिलेल्या होत्या पण अनेकदा इतक्या दिवसाच्या तणावाचा राग सैनिक शरण येणाऱ्या लोकांवर काढत होते. अशा प्रकारे अनेक नि:शस्त्र लोकांना मारले गेले. तळघरात इतकी वाईट परिस्थिती होती की बघायलाही नको वाटेल. कमालीची दुर्गंधी, प्रचंड उष्णता. काही भागातील पंखे हे सगळी पाती वाकल्यामुळे एखाद्या मोठ्या फुलाच्या कळीसारखे दिसत होते. सगळीकडे घाणीचे साम्राज्य होते. कित्येक बंडखोरांना सैनिक लाथाबुक्क्यांनी तुडवून काढून अर्धमेले करत होते. शेवटी दोन खोल्या उरल्या होत्या. ह्या म्हणजे बंडखोरांचे मुख्य ठाणे होते. त्यांचे अन्नपाणी इथे साठवले होते. त्याच्या दाराला बॉम्ब लावून ते उडवले गेले आणि सैनिक त्या खोलीत दाखल झाले. खोलीतील बहुतेक बंडखोर आपला अंत जवळ आल्याचे ओळखून थरथरत होते. सगळ्यांचे चेहरे धुराने काळे होते. कपडे अत्यंत घाणेरडे दुर्गंधीयुक्त होते. पण त्यातला एक माणूस अजूनही मग्रुरी बाळगून होता (सुंभ जाळला तरी पीळ गेला नव्हता!). त्याला अबू सुलतान नावाच्या कॅप्टनने नाव विचारले "जुहेमान" असे उत्तर मिळताच तो चमकला. हाच तो म्होरक्या हे त्याला कळले. बाकी सैनिकांना हे कळले असते तर त्याला त्यांनी तिथेच संपवले असते. हे ओळखून त्याने जुहेमानाला तात्काळ एका अँब्युलन्समध्ये घालून बाहेर काढले आणि मंत्रीपदी असणाऱ्या राजपुत्रांपर्यंत पोचवले. वाटेत एका सैनिकाने उद्विग्न होऊन जुहेमानाला विचारले "इतका विध्वंस तू का केलास? कसा करू शकलास हे तू? " जुहेमान तोंडातल्या तोंडात पुटपुटला "अशीच देवाची इच्छा होती " मशिदीबाहेर मक्का हॉटेल नावाचे हॉटेल आहे. त्याच्या आवारात पकडलेले बंडखोर ठेवले होते. शक्य असेल त्यांची ओळख पटवणे आणि बाकी माहिती मिळवणे चालू होते. एका सैनिकाने रागाने जुहेमानला विचारले "इतक्या पवित्र स्थळाची इतकी विटंबना कशी करू शकलास तू?" आता जुहेमानाने उत्तर दिले "जर शेवट असा होणार हे माहित असते तर मी अशी मोहीम हातात घेतलीच नसती." ह्या वाक्याने त्याने आपला पूर्ण पराभव झाल्याचे स्वीकारले. माहदीचे काय झाले हा एक प्रश्न सौदी सरकारला होताच काही सैनिक शवागारात जाऊन प्रेतांची ओळख पटवत होते. त्यात एकाला एक प्रेत दिसले ज्याच्या चेहऱ्यावर एक लाल जन्मखूण होती. हे माहदीचे लक्षण असल्यामुळे त्याला शंका आली. त्याने पकडलेल्या बंडखोरांना घेऊन त्या प्रेताची ओळख पटवली आणि तोच तो माहदी हे निश्चित केले. प्रेताच्या स्थितीवरून असे जाणवले की कंबरेखालचा भाग छिन्न होऊनही तो अनेक दिवस जिवंत असावा. ह्या तथाकथित माहदीच्या मृत्यूमुळे हे सगळे झूट असण्यावर शिक्कामोर्तब झाले. हा दिवस होता ४ डिसेंबर १९७९. पंधरा दिवस हा हल्ला चालू होता.

Book traversal links for मक्केतील उठाव ६

  • ‹ मक्केतील उठाव ५
  • Up
  • मक्केतील उठाव ७ (शेवटचा भाग) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
27933 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

तुफान ओ .... तुफान

महासंग्राम
Mon, 10/24/2016 - 09:34 नवीन
तुफान ओ .... तुफान
  • Log in or register to post comments

भारी

टवाळ कार्टा
Mon, 10/24/2016 - 09:54 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

गुडनेस!

यशोधरा
Mon, 10/24/2016 - 10:01 नवीन
गुडनेस!
  • Log in or register to post comments

केवढी वाट बघितली राव!

चांदणे संदीप
Mon, 10/24/2016 - 11:24 नवीन
जबरदस्त लेखमाला! Sandy
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती. असे काही झाले

मृत्युन्जय
Mon, 10/24/2016 - 12:22 नवीन
उत्तम माहिती. असे काही झाले होते हेच माहिती नव्हते. ही लेख्माला आवडली.
  • Log in or register to post comments

+१...

असंका
Wed, 10/26/2016 - 10:56 नवीन
+१...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मस्तं चालली आहे लेखमाला ! हा

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/24/2016 - 13:51 नवीन
मस्तं चालली आहे लेखमाला ! हा लेखही आवडला. मक्केच्या पूर्वेला ८०० मैलावर, इराणी आखाताच्या किनार्यावर कतीफ नावाचे (उप)राज्य आहे. तिथे बहुसंख्य वस्ती शिया अरब लोकांची आहे. आणि हा भाग तेलाने प्रचंड समृद्ध आहे त्यामुळे तेलाच्या विहिरी आणि शुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. इथे अमेरिकन आणि अरबी उद्योजकांनी मिळून आरामको नावाची कंपनी सुरु केली आहे तिचे प्रकल्प आहेत. सौदी अरेबियाच्या आखाती किनार्‍यावर त्या देशाचा "पूर्व परगणा (इस्टर्न प्रॉव्हिन्स)" आहे. या बहुतेक सर्व परगण्याची जमीन तेलाने समृद्ध आहे. यातल्या दाहरान नावाच्या शहराच्या ठिकाणी Standard Oil of California (Socal) नावाच्या अमेरिकन तेल कंपनीला १९३८ मध्ये सौदी अरेबियात प्रथम तेल सापडले. अनेक स्थित्यंतरांतून जात जात त्या कंपनीचे आराम्को (अरेबियन अमेरिकन ऑइल कंपनी) हे नाव झाले. तिने दाहरानमध्ये मुख्यालय स्थापून कारभार सुरू केला. नंतर १९८८ मध्ये सौदी सरकारने राष्टियिकरण केल्यानंतर त्या कंपनीचे "सौदी आराम्को" असे नामकरण झाले आहे. आजच्या घडीला सौदी तेलापैकी बहुतेक सर्व एकट्या पूर्व परगण्यातून काढले जाते. दाहरान शहरापासून उत्तरेकडे साधारण ५० किलोमीटरवर असलेले कतीफ हे इस्टर्न प्रॉव्हिन्समधिल मरुस्थलावर वसलेले एक शहर आहे. हे शहर जगातले सर्वात मोठे मरुस्थल समजले जाते. येथे दहा लाख खजूराची झाडे असल्याचा त्यांचा दावा आहे. हे शहर शियाबहुल आहे. सौदी अरेबियाचे तेलावर आधारीत बहुतेक सर्व उद्योग कतीफच्या उत्तरेकडे ९०-१०० किलोमीटरवर असलेल्या जुबेल नावाच्या नवीन वसवलेल्या शहरात आहेत.
  • Log in or register to post comments

सौदी आणि समानता

हुप्प्या
Mon, 10/24/2016 - 21:11 नवीन
काही दिवसांपूर्वी कुण्या एका सौदी राजपुत्राचा शिक्षा म्हणून शिरच्छेद केला. तो होताच, 'बघा सौदी अरेबियात कायद्यापुढे सगळे कसे समान आहेत" अशा दवंड्या पिटल्या गेल्या. पण सौदी अरेबियातील शिया पंथियांना मिळणारी वागणूक बघून हे समानतेचे दावे अत्यंत पोकळ असल्याचे समोर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सौदी कर्मठ सुन्नी मुस्लीम

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/25/2016 - 01:33 नवीन
सौदी कर्मठ सुन्नी मुस्लीम शियांना मुस्लीम समजत नाहीत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

मरुस्थलावर ऐवजी मरुद्यानावर

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/25/2016 - 01:34 नवीन
मरुस्थलावर ऐवजी मरुद्यानावर (ओयासिस)... असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जुबेलकर...

बारक्या_पहीलवान
गुरुवार, 10/27/2016 - 18:47 नवीन
मी गेली 10 वर्ष जुबैलला सर्विस करत आहे. सौदीची लोकांची नवीन पिढी विचारधारा आता हळू हळू बऱ्यापैकी बदलत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सॉल्लीड... पुस्तक व्हायलाच

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/24/2016 - 14:00 नवीन
सॉल्लीड... पुस्तक व्हायलाच हवे ह्या लेखंमालेचे! समांतर:- लेखनशैली आणी विषयाच्या समानते मुळे प्रेषितांनतरचे चार खलीफा-अर्थात इस्लामचा सुवर्णकाळ हे पुस्तक वाचत असल्याचा भास होतोय.
  • Log in or register to post comments

अतिशय रोचक. पुढील भाग येणार

एस
Mon, 10/24/2016 - 14:11 नवीन
अतिशय रोचक. पुढील भाग येणार असल्यास लवकर लिहावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

अप्रतिम मालिका! खूप नवीन

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 14:24 नवीन
अप्रतिम मालिका! खूप नवीन माहिती मिळाली. १९८७ मध्ये इराणी सैनिकांनी मक्केवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सौदी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला करून ४०० शिया इराणी सैनिकांना मारले होते. तो आणि हा प्रसंग एकच आहेत का?
  • Log in or register to post comments

एक्दम मस्त

राधेश्याम
Mon, 10/24/2016 - 14:59 नवीन
एक्दम मस्त
  • Log in or register to post comments

संपूर्ण लेखमाला रोमांचक.

अप्पा जोगळेकर
Mon, 10/24/2016 - 15:09 नवीन
संपूर्ण लेखमाला रोमांचक.
  • Log in or register to post comments

अत्यंत माहितीपूर्ण आणि तरीही कुठेही कंटाळवाणी न झालेली

बोका-ए-आझम
Mon, 10/24/2016 - 18:11 नवीन
मालिका! लेखनशैलीही सुंदर!
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखमाला.

विवेकपटाईत
Mon, 10/24/2016 - 19:32 नवीन
अप्रतिम लेखमाला.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखमाला.

विवेकपटाईत
Mon, 10/24/2016 - 19:32 नवीन
अप्रतिम लेखमाला.
  • Log in or register to post comments

बाप रे ! हे असलं काही झालं

स्रुजा
Mon, 10/24/2016 - 21:06 नवीन
बाप रे ! हे असलं काही झालं होतं हेच माहिती नव्हतं.. खुप च नवीन माहिती , कुठे ही कंटाळवाणी न होता मिळाली. सुंदर लेखमाला.
  • Log in or register to post comments

आभार!

हुप्प्या
Mon, 10/24/2016 - 21:12 नवीन
आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदयात्री
Mon, 10/24/2016 - 21:23 नवीन
वर अनेकांनी म्हटल्यानुसार लेखमाला कुठेही कंटाळवाणी झाली नाही आणि अतिशय माहितीपूर्ण होती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखमालिका.....फ्रान्स

अमितदादा
Tue, 10/25/2016 - 23:18 नवीन
सुंदर लेखमालिका.....फ्रान्स बरोबर पाकिस्तानी सैन्याने हि ह्या कारवाई मध्ये भाग घेतलेला असा प्रवाद आहे, अर्थाथ पाकिस्तानी आर्मीचा रोल हा support साठी मोठ्या प्रमाणात होता. दुवा सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांचे लष्करी दृष्ट अत्यंत घनिष्ट संबंध पूर्वीपासून राहिले आहेत. पाकिस्तान स्वताला सौदी अरेबिया चा संरक्षक म्हणवून घेतो (सौदी अरेबिया पाकिस्तान ला आपला सेवक कम रक्षक म्हणवून घेतो हा भाग वेगळा). सौदी अरेबिया ने पाकिस्तान ला अणुबॉम्ब बनिवाण्यासाठी तसेच इतर अनेक लष्करी सामग्री साठी वेळोवेळी मोठी आर्थिक मदत केली आहे.
  • Log in or register to post comments

आज हि सौदी अरेबिया मध्ये

अमितदादा
Tue, 10/25/2016 - 23:25 नवीन
आज हि सौदी अरेबिया मध्ये पाकिस्तान चे २०००-१०००० सैनिक कायमस्वरूपी तैनात आहेत. मध्यंतरी इसीस कि येमन विरुद्धच्या इस्लामिक आघाडी मध्ये सौदी अरेबिया ने पाकिस्तान चा समावेश न विचारता केला होता त्यावरून पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात आश्चर्य कम असंतोष होता कारण ती आघाडी indirectly इराण विरुद्ध होती. सौदी अरेबिया मध्ये न्याय हा सर्वाना समान नाहीये. राजघराण्यात हि जवळचा आणि लांबचा पहिले जाते कारण मध्यंतरी एक राज्यापुत्र लेबेनॉन मध्ये २ टन drug सहित सापडला, पुढे ते प्रकरणाची काहीच बातमी आली नाही बहुदा दडपले असेल असा माझा अंदाज आहे. Lebanon charges Saudi prince over record drug haul
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

सौदी आणि पाकिस्तान

हुप्प्या
Wed, 10/26/2016 - 07:35 नवीन
सौदी अरेबिया पाकिस्तानला आपल्या नोकरासारखे वागवतो. येमेनमधे शिया लोकांचे बंड झाले ते मोडायला पाकिस्तानकडून मदत मागवली पण अशा प्रकारे पाहुण्याच्या चपलेने विंचू मारण्याला पाकिस्तानातून विरोध होतो आहे. पाकिस्तानात शिया लोक अनेक आहेत. त्यांना फार काही वाईट वागवले जात नाही. इराणशीही पाकिस्तानचे वैर नाही. (त्यांना अहमदिया पंथाचा तिटकारा आहे पण ते सोडा). सौदी अरेबियात मात्र शिया लोकांना पाण्यात पाहिले जाते. पाकिस्तानातील काही विचारवंतांचे विचार ऐकले ते असे होते की आम्ही मुस्लिमांची एकी होईल असेच पहातो. सुन्नी आणि शियांनी एकमेकात लढू नये. आणि असल्या भांडणात आम्ही कुठल्यातरी एका बाजूने लढूच शकत नाही. आमची भूमिका ही दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्याची असली पाहिजे. अर्थात सौदी अरेबिया पाकिस्तानसारख्या देशाचे (ज्याला तो आपला मिंधा समजतो आणि बिगर अरबी म्हणून थोडा कमअस्सल समजतो) ऐकणे शक्य नाही. असेही ऐकले आहे की सौदीमधे गरीब येमेनी लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेले आहेत. हे लोक सैन्यातही आहेत. जर सौदी सैन्य येमेनच्या अंतर्गत यादवीत उतरवले तर ते सौदी राज्याशी एकनिष्ठ राहतीलच अशी खात्री नाही त्यामुळे पाकिस्तान बरे असे त्यांना वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

पाकिस्तानात शिया लोक अनेक

अमितदादा
Wed, 10/26/2016 - 23:55 नवीन
पाकिस्तानात शिया लोक अनेक आहेत. त्यांना फार काही वाईट वागवले जात नाही. हे सोडून उरलेल्या प्रतिसादाशी सहमत. परवा quetta मध्ये लष्कर ए झंगवी (कट्टर शिया विरोधी संघटना) केलेले बॉम्बस्फोट पूर्ण विरोधी चित्र दर्शवते. पाकिस्तान मध्ये शिया लोकांच्या सणांना आजही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पुरवावा लागतो. हत्या, सरकारी दुजाभाव, बॉम्बस्फोट हे पाकिस्तानी शियासाठी नित्याच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

माझ्या माहितीप्रमाणे

हुप्प्या
गुरुवार, 10/27/2016 - 07:28 नवीन
भुत्तो घराणे हे शियापंथीय आहे. म्हणजे त्या घराण्याशी संबंधित दोन तीन लोक देशाच्या सर्वोच्चपदी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती इ. हे सौदीमधे घडणे केवळ अशक्य. काही डोकेफिरू लोक शियांवर हल्ला करुन त्यांना मारत असले तरी सौदी अरेबियाप्रमाणे शियापंथीयांना वाळित टाकलेले नाही. त्यांना सगळे हक्क आहेत. सरकारी नोकर्‍या, सैन्य कुठेही मज्जाव नाही. सैन्यात एअर चीफ मार्शल पदावर शिया होता. झहीर अब्बास हा पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कप्तान होता. त्याचे शिया असणे आड आले नाही. शियांना त्यांचे सणवार साजरे करायला बंदी नाही. याउलट सौदी अरेबिया. थेट अधिकृत सरकारी पातळीवरूनच शिया समुदायावरील अन्याय सुरु होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

Pakistan promises 'strong

अमितदादा
Tue, 10/25/2016 - 23:28 नवीन
Pakistan promises 'strong military response' if Saudi Arabia is threatened
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

ही बोलाची कढी आणि बोलाचाच भात

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/26/2016 - 18:18 नवीन
ही बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे ! :) (आणि हा पाकिस्तानी स्वभावाचा मूळ गुणधर्म आहे.) ) जानेवारी २०१६ मधील या बातमीनंतर जेमतेम महिन्याभरातच सौदी अरेबियाला धोकादायक असलेल्या येमेनमधील बंडखोरांच्या विरुद्ध सौदी नेतृत्वाखाली एकत्रित झालेल्या मुस्लीम सैन्यात भाग घ्यायला पाकिस्तानने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे (ज्यांच्याकडून अश्या वेळी उपयोगी पडू या वचनावर बिलियन्समध्ये डॉलर्स घेतले आहेत अश्या) सौदी अरेबियासकट सर्वच खाडी देश पाकिस्तानवर नाराज आहेत. पाकिस्तानचा हा विश्वासघात, खाडी देश भारताच्या जवळ येण्यासाठी एक कारण ठरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

बहुतांश आखाती देश पाकिस्तान

अमितदादा
Wed, 10/26/2016 - 23:46 नवीन
बहुतांश आखाती देश पाकिस्तान वर नाराज आहेत हे खरे आहे पण अजून पुरेसे दूर गेले नाहीत. आखाती देशांनी भारताबरोबर सबंध सुधारायला सुरवात केली आहे आणि मोदी नि सुद्धा योग्य परदेश नीती राबवून योग्य साथ दिली आहे.सौदी अरेबिया ने मोदी ना दिलेला सर्वोच सन्मान असो किंवा UAE च्या सुलतानाची येत्या प्रजासत्ताक दिनाला असणारी उपस्थिती असो हे भारतबरोबरचे आखाती देशांचे वाढत्या संबंधांची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. जेंव्हा सौदी अरेबिया ने पाकिस्तान चा न विचारता समावेश केला तेंव्हा नवाज शरिफंची अवस्था अत्यंत बिकट झालेली कारण ते ह्या गोष्टीला उघड पाठिंबा देऊ शकत नव्हते कारण ते इराण आणि शिया विरोधी झालं असत आणि उघड विरोध करू शकत नव्हते कारण ह्याच सौदी ने त्यांना मुर्शिरफ पासून वाचवून आश्रय दिलेला, तेंव्हा त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सगळ्या पार्टीचा ह्या गोष्टीला कसा विरोध आहे हे दाखवून दिलं तसेच सौदी अरेबिया वर हल्ला झाल्यास पाकिस्तान युद्धात उतरेल अस आश्वासन दिलं. ह्यापद्धतीने वेळ मारून नेली. असो परत पाकिस्तान वर अशी वेळ येईल आणि जर ते मदतीला नाही धावून गेले तर आखाती राष्ट्र पाकिस्तान ला नक्कीच मोठा आर्थिक आणि राजकीय दणका देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेखमाला.

स्वराजित
Wed, 10/26/2016 - 14:30 नवीन
अप्रतिम लेखमाला.
  • Log in or register to post comments

वाचत आहे

पैसा
Wed, 10/26/2016 - 18:24 नवीन
सध्या एका तेलियाने वाचत आहे. त्यामुले अनेक नावे ओळखीची झाली आहेत.
  • Log in or register to post comments

क्लासिक लेखमाला!

स्वीट टॉकर
Wed, 10/26/2016 - 23:09 नवीन
क्लासिक लेखमाला!
  • Log in or register to post comments

लैच भारी.. ईथे लिहिल्याबद्दल

मराठमोळा
गुरुवार, 10/27/2016 - 04:14 नवीन
लैच भारी.. ईथे लिहिल्याबद्दल आभारी आहे. हा शेवटचा भाग होता का?
  • Log in or register to post comments

हुप्प्या भावा __/\__

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 10/27/2016 - 11:51 नवीन
हुप्प्या भावा __/\__ १) अप्रतिम लेखमाला २) उत्तम आणि खिळवून ठेवणारी शैली ३) योग्य अंतराने टाकलेले भाग आता पुढचा विषय कोणता ?
  • Log in or register to post comments

+१११११११

शलभ
गुरुवार, 10/27/2016 - 17:28 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अतीशय उत्तम लेखमाला. पु.भा

संजय पाटिल
गुरुवार, 10/27/2016 - 12:13 नवीन
अतीशय उत्तम लेखमाला. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेखमाला. प्रत्येक

रुपी
Fri, 10/28/2016 - 05:27 नवीन
माहितीपूर्ण लेखमाला. प्रत्येक भागातला अगदी शब्द न शब्द वाचला!
  • Log in or register to post comments

भावा एक मोठ्ठा कुर्निसात.....

वटवट
Fri, 10/28/2016 - 16:53 नवीन
भावा एक मोठ्ठा कुर्निसात.....
  • Log in or register to post comments

ऊत्तम लेखमाला

मी-सौरभ
Sun, 10/30/2016 - 08:37 नवीन
पु ले प्र
  • Log in or register to post comments

ऊत्तम लेखमाला

मी-सौरभ
Sun, 10/30/2016 - 08:38 नवीन
पु ले प्र
  • Log in or register to post comments

लेखमाला आवडली... असेच लिहीत

मदनबाण
Sun, 10/30/2016 - 08:47 नवीन
लेखमाला आवडली... असेच लिहीत राहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala
  • Log in or register to post comments

मक्केतील उठाव-अतीशय उत्तम लेखमाला

दीपक११७७
Wed, 11/02/2016 - 12:44 नवीन
संपूर्ण लेखमाला रोमांचक...मी आजच सर्व लेख वचले... खूप नवीन माहिती मिळाली... असेच लिहित रहा धन्यावाद.
  • Log in or register to post comments

"पाकिस्तानी कामगार अशा

एकुलता एक डॉन
Sun, 11/06/2016 - 13:08 नवीन
"पाकिस्तानी कामगार अशा प्रकारे भोके पाडू लागले. " अचानक पाकिस्तानी कामगार मध्ये कसे आले ?
  • Log in or register to post comments

कष्टाची कामे

हुप्प्या
Mon, 11/07/2016 - 09:48 नवीन
सौदी अरेबियातील अरब हे शरीरकष्टाची कामे फारशी करत नाहीत. त्याकरता ते मोठ्या प्रमाणात कामगार आयात करतात. पाकिस्तान, बांगला देश, भारत, इंडोनिशिया आणि फिलिपिन्स अशा देशातून ते आणले जातात. मक्केत फक्त मुस्लिमांनाच प्रवेश आहे त्यामुळे पाकिस्तानी लोकांना तिथे मोठा वाव आहे. त्यामुळे ड्रिलने भोके पाडण्याचे काम पाकिस्तानी लोकांकडे होते. एक घटना अशी झाली की एक चिलखती जीप एका गेटमधे अडकून बसली होती. ती ओढून काढायला एक क्रेन मागवली. पाकिस्तानी कामगार ती चालवत होते. पण बंडखोरांनी तिच्यावर गोळीबार केला आणि हे कामगार घाबरुन पळून गेले. त्यांना शिव्या घालत एका सौदी मिलिटरी अधिकार्‍याने ती स्वतः चालवली आणि अडकलेली जीप ओढून काढली. इथेही कामगार पाकिस्तानीच होते. पाकिस्तानात असाही समज आहे की मक्केच्या हल्ल्याला तोंड देण्याकरता पाकिस्तानी सैन्याची मोठी मदत झाली पण मला तसा उल्लेख सापडला नाही. बंडखोरांत मात्र काही पाकिस्तानी लोक होते. डॉनमधे मागे एका माणसाची मुलाखत आली होती ज्याचा मुलगा बंडखोर होता आणि ज्याचे डोके उडवले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

छान

गुल्लू दादा
Fri, 03/28/2025 - 18:27 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा