मक्केतील उठाव ६
आधीचा भाग ५
जॉर्डनचा राजा हुसेन सौदी राजाला भेटायला आला. त्याला आपले सैनिक पाठवून मक्केतील बंडखोरांचा निकाल लावण्याची खूप इच्छा होती. सौदी राजाने आदरातिथ्य, आगतस्वागत व्यवस्थित केले. पण जेव्हा मक्केचा विषय आला तेव्हा स्पष्ट सांगितले की तुमची मदत घेणे आम्हाला परवडणार नाही. किंग हुसेनचा आजोबा हा मक्केचा सेनापती (शेरीफ ) होता. तो हाशमी टोळीचा. ऑटोमन साम्राज्य अरेबियावर राज्य करत असताना त्यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी होती. नंतर सौदी सैन्याने त्यांचा १९२४ साली पराभव करून त्यांना जॉर्डनला हाकलले. हा इतिहास असल्यामुळे आणि तेव्हाही काही स्थानिक हाश्मी लोक जॉर्डनच्या राजाशी निष्ठा ठेवून असतील ह्या भीतीने सौदी राजाने जॉर्डनची मदत नाकारली. एक सौदी अधिकारी अमेरिकन वकिलातीत एकाशी बोलताना म्हणाला की जॉर्डन सैन्य मदत करायला आनंदाने मक्केला येईल पण काम झाल्यावर इथून जाईलच ह्याची खात्री नाही! वास्तविक जॉर्डनचे सैन्य चांगले तयार होते. नुकतेच पेलेस्टाईनच्या बंडखोरांशी यशस्वीरीत्या लढण्याचा त्यांना अनुभव होता. अरबी भाषिक, मुसलमान त्यामुळे मक्केत यायला अडचण नाही. पण राजकीय इतिहासामुळे ते शक्य झाले नाही. ट्युनिशिया व अन्य देश त्याच कारणाने नाकारले गेले. एकंदरीत सौदी सरकार कायमच स्वतः:ला असुरक्षित समजते. कुठेही बंद, उठाव होईल अशी शक्यता असेल तर तो टाळणे वा वेळच्या वेळीच चिरडणे असेच पर्याय निवडते. (सौदी राजाने राज्य हे असेच बंड करून मिळवलेले असल्यामुळे आपल्याकडूनही कोणीतरी ते हिरावेल अशी एक कायम भीती त्यांना असणे स्वाभाविकच आहे. हे काही लोकशाही मार्गाने मिळवलेले राज्य नाही.)
मग सौदी सरकारने अमेरिकेकडे मोर्चा वळवला. आधीच अमेरिकेविरुद्ध वातावरण तापलेले, इराण प्रकरण झाल्यामुळे त्या वकिलातीत लोकांच्या जीवाची भीती. त्यामुळे सौदी आणि अमेरिका दोघेही घाबरत घाबरतच भेटले. शेवटी निव्वळ सामग्री आणि तांत्रिक मार्गदर्शन इतकेच अमेरिका पुरवेल असे ठरले. त्यानुसार त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने अश्रुधुराच्या नळकांड्या पुरवायचे ठरवले. तळघरात हे अश्रूधूर सोडून बंडखोरांना नामोहरम करायचे आणि मुखवटे घालून सैनिक आत शिरणार आणि अतिरेक्यांना मारणार किंवा पकडणार अशी योजना होती.
बंडखोरांच्या सुदैवाने आणि सौदीच्या दुर्दैवाने हा बेत फसला. अश्रूधूर हा फार हलका होता. तो वेगाने तळघरातून निघून वरती जाऊ लागला. त्याचा त्रास तळघरातील लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांनाच झाला. उलट्या, चक्कर अशा प्रकारामुळे सौदी सैनिक हैराण झाले. वाऱ्याची दिशा, तापमान ह्या सगळ्या गोष्टींचा बंडखोरांना फायदा झाला. अशा गोष्टींवर उपाय काय करायचा ह्याचे प्रशिक्षण मिळालेले असल्यामुळे पाण्याने भिजवली कापडे वगैरे तोंडावर लावून ते अश्रुधुराला व्यवस्थित तोंड देऊ शकले.
ओलीस ठेवलेले यात्रेकरू आणि पकडलेले सौदी सैनिक ह्यांचे प्रचंड हाल होते. त्यातले काही जखमी होते. तशात अश्रूधूर. त्यांना पाणीबिणी काही मिळाले नाही. त्यांना उलट्या, बेशुद्ध होण्याचा त्रास होताच. शिवाय अतिरेकी लोक खायला प्यायलाही फार देत नव्हते. सकाळी एक खजूर, रात्री एक खजूर आणि मध्ये एकदा पाणी इतकेच त्यांच्या नशिबी होते. एक ८० वर्षांचा यात्रेकरू असल्या हालामुळे जमिनीवर पडून होता आणि कधीतरी त्याने प्राण सोडला. बंडखोरांना वा अन्य कुणाला त्याचे सोयरसुतक नव्हतेच!
हा अश्रूधूर वाऱ्याची दिशा व अन्य हवामानातील घटक ह्यामुळे आसपासच्या हॉटेलातही पसरला. कित्येक हॉटेलात पत्रकार होते. त्यांना हॉटेल रिकामे करावे लागले इतका तो त्रास तीव्र होता.
अश्रूधूर प्रकरण फसले. लोकांनी अवाच्या सवा नवनव्या कल्पना सुचवल्या. एक होती की तळघरात पाणी सोडून बंडखोरांना बुडवून मारा.
एक राजपुत्र म्हणाला इतके मोठे तळघर पाण्याने भरायला सगळा तांबडा समुद्र आणून ओतावा लागेल! कुणी अशीही कल्पना सुचवली की अनेक कुत्र्यांना बॉम्ब बांधून आत सोडा आणि स्फोट घडवा. पण तेही अव्यवहार्य होते. एकंदरीत असा खल केल्यावर आपल्याकडे फार काही पर्याय नाहीत आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नाहीत हे सौदी मंत्र्यांना कळले. बंडखोरांना कोंडून त्यांची उपासमार करून शरण आणणे हा एक उपाय होता. पण सौदी सरकारला इतकी वाट बघण्याची इच्छा नव्हती. शिवाय हे कमी म्हणून की काय एक नवीच डोकेदुखी सुरु होत होती.
मक्केच्या पूर्वेला ८०० मैलावर, इराणी आखाताच्या किनार्यावर कतीफ नावाचे (उप)राज्य आहे. तिथे बहुसंख्य वस्ती शिया अरब लोकांची आहे. आणि हा भाग तेलाने प्रचंड समृद्ध आहे त्यामुळे तेलाच्या विहिरी आणि शुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. इथे अमेरिकन आणि अरबी उद्योजकांनी मिळून आरामको नावाची कंपनी सुरु केली आहे तिचे प्रकल्प आहेत. सौदी लोकांचा वहाबी विचार असल्यामुळे त्यांना शियांबद्दल मोठा आकस आहे. इथल्या जमिनीतून मिळणाऱ्या तेलाची रॉयल्टी तर सोडाच पण तेलाच्या प्रकल्पात नोकऱ्याही शिया लोकांना दिल्या जात नाहीत. सरकारी नोकऱ्या, पोलीस, सैन्य अशा संधीही त्यांना उपलब्ध नसतात. उलट विविध औद्योगिक प्रकल्प आपल्या कामाकरता पंपाने जमिनीचे पाणी बाहेर खेचून काढतात त्यामुळे आसपासचे शेती व्यवसायही संपले आहेत. त्यामुळे शिया लोकांमध्ये कायम असंतोष असे.
मक्केतील उठावाच्या ज्या काही ऐकीव बातम्या अफवा इथे पोचल्या (सौदी सरकारने ब्लॅकआऊट केल्यामुळे अधिकृत काहीही काळात नव्हते) त्यामुळे शिया लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मुहर्रम हा त्यांचा जास्त जिव्हाळ्याचा महिना. त्याच्या दहाव्या दिवशी मिरवणूक निघतात. खरेतर हा शोकसोहळा असतो. शिया लोक महम्मदाचे नातू हुसेन आणि हसन ह्यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करतात. अशा प्रकारच्या मिरवणुकीला सौदी अरेबियात बंदी आहे. पण खाजगीत हा सोहळा होतोच. इराणच्या क्रांतीमुळे शिया इमाम पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रक्षोभक भाषणे करू लागले होते. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून इथे आंदोलने सुरु झाली. अर्थात हे शिया लोक सामान्य नागरिक होते. मक्केतील लोकांप्रमाणे प्रशिक्षित नव्हते. सौदी पोलिसांनी हे आंदोलन चिरडणे सुरु केले. लाठ्या, मग अश्रूधूर मग गोळीबार हे सगळे झाले. पुढे दंगलीचे लोण पसरत गेले. हा भाग अनेक गल्लीबोळात विभागला गेलेला
आहे. एकटा दुकटा शिपाई अशा गल्लीत आंदोलकांचा पाठलाग करत पोचला की लोक त्याला मारून त्याची बंदूक पळवून नेऊ लागले. अशा बंदुका मग पोलिसांवर रोखून पोलिसांना मारले. आणि हा हिंसाचार वाढत गेला. सौदी सरकारने मक्केतील काही सैनिक ह्या बंडाचा बिमोड करायला पाठवले. मक्केतील बंडखोरांबद्दल सौदी सैन्याला नाही म्हटले तरी थोडा आदर होता. शिवाय पवित्र मशिदीत हल्ला करताना थोडे कचरायलाच होत होते. असे लोक शिया लोकांवर हल्ला करायला एका पायावर तयार होते. अशा धर्मभ्रष्ट लोकांना अद्दल घडवताना त्यांना थोडीही दयामाया दाखवायची गरज वाटली नाही. जसे दंगलीचे प्रमाण वाढले तसे जास्त कठोर उपाय केले गेले. ह्या भागातील वीज व पाणी तोडून टाकले गेले. जीपवर मशिनगन लावून सैनिक फिरू लागले. कुठे मोर्चा वा आंदोलन वा संशयास्पद दिसले की गोळ्या मारून ठार मारण्याचा सपाटा लावला. यथावकाश शिया लोक शरण आले. त्यातील वडीलधाऱ्या मंडळींनी उच्चपदस्थ लोकांशी समझौता करून हा उठाव संपवला. अर्थात शिया लोकांचा असंतोष शमला नव्हताच पण निदान परिस्थिती नियंत्रणात आली.
आता सौदी सरकारने फ्रेंच सरकारकडे काही मदत मिळत आहे का ह्याची चौकशी सुरु केली. १९७२ साली म्युनिच इथे ऑलिम्पिक सामने भरले होते. तिथे पॅलेस्टीनी अतिरेक्यांनी इस्रायली खेळाडूंचे अपहरण केले. जर्मन सरकारने त्यांची सुटका करायचा प्रयत्न केला पण अनेक चुका झाल्यामुळे तो प्रयत्न फसला . ओलिस ठेवलेले सगळे खेळाडू मारले गेले. ह्यावर उपाय म्हणून अनेक युरोपीय देशात अतिरेकी हल्ल्याला तोंड देणारी पथके निर्माण केली गेली. सैन्याच्या प्रशिक्षणापेक्षा वेगळे, नागरी भागात झालेल्या हल्ल्याला तोंड कसे द्यावे, ओलीस ठेवलेल्यांची सुटका कशी करावी वगैरे गोष्टींचे प्रशिक्षण मिळालेले कमांडोज तयार केले गेले. फ्रान्समध्ये अशाच प्रकारे GIGN (https://en.wikipedia.org/wiki/GIGN) हे पथक बनले. सौदी सरकारपुढे त्यांनी आपल्या काही नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही करून दाखवले होते. अनेक लहानमोठ्या मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांनी नाव कमावले होते. अमेरिका स्वतः: संकटात होती (इराणमधील ओलीस प्रकरण) त्यामुळे फ्रेंच लोकांची मदत घ्यावी असे सौदी सरकारने ठरवले. त्याप्रमाणे एक फ्रेंच पथक रियाधला दाखल झाले. हे सगळे अत्यंत गुप्त असल्यामुळे ह्याची अधिकृत माहिती आजही उपलब्ध नाही. एका ठिकाणी असे लिहिले आहे की फ्रेंच कमांडोज धर्मांतरित केले गेले आणि ते मक्केत आले आणि त्यांनी मोहिमेत भाग घेतला. दुसरा असे म्हणतो की त्यांचा सहभाग हा सल्ला देणे इतपतच होता. ते प्रत्यक्ष हल्ल्यात उतरले नव्हते. पण निदान काही मोजके लोक मक्केला आले होते.
त्यांचा पहिला सल्ला असा होता की ड्रिल मशीनने जमिनीला भोके पाडून त्यातून ग्रेनेड टाकून बंडखोरांना मारा. त्याप्रमाणे मोहीम आखली गेली. पाकिस्तानी कामगार अशा प्रकारे भोके पाडू लागले. भोक पडताच खालच्या बंडखोरांनी गोळ्या घालून अनेक कामगार ठार केले. पण यथावकाश वरून ग्रेनेडचा वर्षाव सुरु झाला आणि काही भाग बंडखोरमुक्त झाला. सौदी सैन्याने फ्रेंच लोकांच्या मार्गदर्शनाखाली असे ठरवले की हळूहळू पूर्ण तळघर अशा प्रकारे मुक्त करून त्यावर कब्जा करायचा. त्याप्रमाणे हल्ले करून त्यांनी यश मिळवले. बंडखोर अजूनही हल्ले करताच होते. पण एव्हाना सौदी बाजूचे पारडे जास्त जड होऊ लागले होते. शरण येणाऱ्या लोकांना मारू नका अशा सूचना दिलेल्या होत्या पण अनेकदा इतक्या दिवसाच्या तणावाचा राग सैनिक शरण येणाऱ्या लोकांवर काढत होते. अशा प्रकारे अनेक नि:शस्त्र लोकांना मारले गेले. तळघरात इतकी वाईट परिस्थिती होती की बघायलाही नको वाटेल. कमालीची दुर्गंधी, प्रचंड उष्णता. काही भागातील पंखे हे सगळी पाती वाकल्यामुळे एखाद्या मोठ्या फुलाच्या कळीसारखे दिसत होते. सगळीकडे घाणीचे साम्राज्य होते. कित्येक बंडखोरांना सैनिक लाथाबुक्क्यांनी तुडवून काढून अर्धमेले करत होते. शेवटी दोन खोल्या उरल्या होत्या. ह्या म्हणजे बंडखोरांचे मुख्य ठाणे होते. त्यांचे अन्नपाणी इथे साठवले होते. त्याच्या दाराला बॉम्ब लावून ते उडवले गेले आणि सैनिक त्या खोलीत दाखल झाले. खोलीतील बहुतेक बंडखोर आपला अंत जवळ आल्याचे ओळखून थरथरत होते. सगळ्यांचे चेहरे धुराने काळे होते. कपडे अत्यंत घाणेरडे दुर्गंधीयुक्त होते. पण त्यातला एक माणूस अजूनही मग्रुरी बाळगून होता (सुंभ जाळला तरी पीळ गेला नव्हता!). त्याला अबू सुलतान नावाच्या कॅप्टनने नाव विचारले "जुहेमान" असे उत्तर मिळताच तो चमकला. हाच तो म्होरक्या हे त्याला कळले. बाकी सैनिकांना हे कळले असते तर त्याला त्यांनी तिथेच संपवले असते. हे ओळखून त्याने जुहेमानाला तात्काळ एका अँब्युलन्समध्ये घालून बाहेर काढले आणि मंत्रीपदी असणाऱ्या राजपुत्रांपर्यंत पोचवले. वाटेत एका सैनिकाने उद्विग्न होऊन जुहेमानाला विचारले "इतका विध्वंस तू का केलास? कसा करू शकलास हे तू? " जुहेमान तोंडातल्या तोंडात पुटपुटला "अशीच देवाची इच्छा होती "
मशिदीबाहेर मक्का हॉटेल नावाचे हॉटेल आहे. त्याच्या आवारात पकडलेले बंडखोर ठेवले होते. शक्य असेल त्यांची ओळख पटवणे आणि बाकी माहिती मिळवणे चालू होते. एका सैनिकाने रागाने जुहेमानला विचारले "इतक्या पवित्र स्थळाची इतकी विटंबना कशी करू शकलास तू?" आता जुहेमानाने उत्तर दिले "जर शेवट असा होणार हे माहित असते तर मी अशी मोहीम हातात घेतलीच नसती." ह्या वाक्याने त्याने आपला पूर्ण पराभव झाल्याचे स्वीकारले.
माहदीचे काय झाले हा एक प्रश्न सौदी सरकारला होताच काही सैनिक शवागारात जाऊन प्रेतांची ओळख पटवत होते. त्यात एकाला एक प्रेत दिसले ज्याच्या चेहऱ्यावर एक लाल जन्मखूण होती. हे माहदीचे लक्षण असल्यामुळे त्याला शंका आली. त्याने पकडलेल्या बंडखोरांना घेऊन त्या प्रेताची ओळख पटवली आणि तोच तो माहदी हे निश्चित केले. प्रेताच्या स्थितीवरून असे जाणवले की कंबरेखालचा भाग छिन्न होऊनही तो अनेक दिवस जिवंत असावा. ह्या तथाकथित माहदीच्या मृत्यूमुळे हे सगळे झूट असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
हा दिवस होता ४ डिसेंबर १९७९. पंधरा दिवस हा हल्ला चालू होता.
Book traversal links for मक्केतील उठाव ६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुफान ओ .... तुफान
भारी
गुडनेस!
केवढी वाट बघितली राव!
उत्तम माहिती. असे काही झाले
+१...
मस्तं चालली आहे लेखमाला ! हा
मक्केच्या पूर्वेला ८०० मैलावर, इराणी आखाताच्या किनार्यावर कतीफ नावाचे (उप)राज्य आहे. तिथे बहुसंख्य वस्ती शिया अरब लोकांची आहे. आणि हा भाग तेलाने प्रचंड समृद्ध आहे त्यामुळे तेलाच्या विहिरी आणि शुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. इथे अमेरिकन आणि अरबी उद्योजकांनी मिळून आरामको नावाची कंपनी सुरु केली आहे तिचे प्रकल्प आहेत.सौदी अरेबियाच्या आखाती किनार्यावर त्या देशाचा "पूर्व परगणा (इस्टर्न प्रॉव्हिन्स)" आहे. या बहुतेक सर्व परगण्याची जमीन तेलाने समृद्ध आहे. यातल्या दाहरान नावाच्या शहराच्या ठिकाणी Standard Oil of California (Socal) नावाच्या अमेरिकन तेल कंपनीला १९३८ मध्ये सौदी अरेबियात प्रथम तेल सापडले. अनेक स्थित्यंतरांतून जात जात त्या कंपनीचे आराम्को (अरेबियन अमेरिकन ऑइल कंपनी) हे नाव झाले. तिने दाहरानमध्ये मुख्यालय स्थापून कारभार सुरू केला. नंतर १९८८ मध्ये सौदी सरकारने राष्टियिकरण केल्यानंतर त्या कंपनीचे "सौदी आराम्को" असे नामकरण झाले आहे. आजच्या घडीला सौदी तेलापैकी बहुतेक सर्व एकट्या पूर्व परगण्यातून काढले जाते. दाहरान शहरापासून उत्तरेकडे साधारण ५० किलोमीटरवर असलेले कतीफ हे इस्टर्न प्रॉव्हिन्समधिल मरुस्थलावर वसलेले एक शहर आहे. हे शहर जगातले सर्वात मोठे मरुस्थल समजले जाते. येथे दहा लाख खजूराची झाडे असल्याचा त्यांचा दावा आहे. हे शहर शियाबहुल आहे. सौदी अरेबियाचे तेलावर आधारीत बहुतेक सर्व उद्योग कतीफच्या उत्तरेकडे ९०-१०० किलोमीटरवर असलेल्या जुबेल नावाच्या नवीन वसवलेल्या शहरात आहेत.सौदी आणि समानता
सौदी कर्मठ सुन्नी मुस्लीम
मरुस्थलावर ऐवजी मरुद्यानावर
जुबेलकर...
सॉल्लीड... पुस्तक व्हायलाच
अतिशय रोचक. पुढील भाग येणार
अप्रतिम मालिका! खूप नवीन
एक्दम मस्त
संपूर्ण लेखमाला रोमांचक.
अत्यंत माहितीपूर्ण आणि तरीही कुठेही कंटाळवाणी न झालेली
अप्रतिम लेखमाला.
अप्रतिम लेखमाला.
बाप रे ! हे असलं काही झालं
आभार!
धन्यवाद
सुंदर लेखमालिका.....फ्रान्स
आज हि सौदी अरेबिया मध्ये
सौदी आणि पाकिस्तान
पाकिस्तानात शिया लोक अनेक
माझ्या माहितीप्रमाणे
Pakistan promises 'strong
ही बोलाची कढी आणि बोलाचाच भात
बहुतांश आखाती देश पाकिस्तान
अप्रतिम लेखमाला.
वाचत आहे
क्लासिक लेखमाला!
लैच भारी.. ईथे लिहिल्याबद्दल
हुप्प्या भावा __/\__
+१११११११
अतीशय उत्तम लेखमाला. पु.भा
माहितीपूर्ण लेखमाला. प्रत्येक
भावा एक मोठ्ठा कुर्निसात.....
ऊत्तम लेखमाला
ऊत्तम लेखमाला
लेखमाला आवडली... असेच लिहीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaमक्केतील उठाव-अतीशय उत्तम लेखमाला
"पाकिस्तानी कामगार अशा
कष्टाची कामे
छान