✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चंदबरदाई

ह
हृषीकेश पालोदकर यांनी
Fri, 10/21/2016 - 15:25  ·  लेख
लेख
चंदबरदाई हे नाव तुम्हाला माहिती आहे का ? ch स्वामीनिष्ठेचं आणि मैत्रीचं असं उदाहरण मानव इतिहासात फक्त छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांच्या व्यतिरिक्त कुठेच पाहायला नाही. उत्तर भारतात ही कथा खूप प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे खूप कमी लोकांना याची माहिती आहे. त्यासाठीच ही माहितीपर कथा आपल्यासाठी देत आहे. चंदबरदाई हा दिल्लीचे राजे पृथ्वीराज चव्हाण तिसरे यांचा बालमित्र आणि त्यांच्याच दरबारातील राजकवी व मुख्य सल्लागार होता. त्याने पृथ्वीराजावर “पृथ्वीराज रासो” हा हिंदी काव्यग्रंथ लिहिला जो नंतर त्याच्या मुलाने पूर्ण केला. तो गणित आणि ज्योतिषशास्त्रात पारंगत होताच पण वेश बदलून बेमालूमपणे हेरगिरी करण्यात देखील पटाईत होता. तुम्ही विविध हेरगिरीच्या आणि जेम्स बॉन्डच्या खूप कथा वाचल्या असतील पण चंदबरदाईची सर कशातच नाही. इ. स. ११४९ ते १२०० हा त्याचा जीवनकाळ. योगायोग असा कि याचा आणि पृथ्विराजांचा जन्म एकाच दिवशीचा. पृथ्वीराज हे धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण होते व ते शब्दभेदि बाण चालवीत. पृथ्वीराज चव्हाण हे राजा सोमेश्वरनंतर गादीवर बसण्याआधी डोळ्यांवर पट्टी बांधून चंदबरदाई ने सांगितलेल्या ठिकाणी अचूक बाण सोडत. कन्नोजचे राजा जयचंद हे दिल्ली राज्याचे शेजारी. दोघेही राजपूत आणि टोकाचे शत्रु. राजा जयचंद याची कन्या “संयुक्ता” व राजा पृथ्वीराज दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शत्रूच्या घरात मुलगी देणे जयचंदला शक्य नव्हते. त्याने संयुक्ताचे स्वयंवर आयोजित केले. त्यात चंदबरदाई हा राजपूत राजा व पृथ्वीराज चव्हाण त्याच्या सेवकाच्या रुपात या स्वयंवराला दाखल झाले. स्वयंवरादरम्यानच संयुक्ताला पृथ्विराजाने जयचंद समोरून पळवून नेले व नंतर लग्न केले. अपमानित जयचंदने पृथ्विराजांचा जुना शत्रू अफगाणिस्थानमधील मोहम्मद घौरीशी करार करून पृथ्विराजांचा पराभव केला. तसं पाहिलं तर याआधी या दोघांने एकटे लढून पृथ्वीराज्यांकडून पराभव पहिला होता पण हि अभद्र युती त्यांना पृथ्विराजास हरविण्यास कामी आली. पृथ्वीराज घौरीच्या हाती लागले. ह्याच घौरीला पृथ्विराजाने अभय दिले होते पण त्याने अफगाणिस्थान मधील “गझनी” येथे कैदेत ठेऊन पृथ्विराजाचे डोळे काढून घेतले. आता सुरु होते चंदबरदाईची कमाल. चंदबरदाईने खडतर प्रवास करून गझनी गाठले. तेथील बाजारात छोटे मोठे खेळ व जादू करून लोकांचे तो मनोरंजन करू लागला.नंतर त्याने जादुद्वारे सोन्याचे नाणे बनवून लोकांना दिले. यामुळे संपूर्ण गझनीमध्ये ही वार्ता वणव्याप्रमाणे पसरली आणि लवकरच राजा घौरीच्या कानापर्यंत पोहोचली. त्याने या अवलियाला त्वरित पकडून आणायचे फर्मान सोडले. अफगाण हा प्रदेश वेगवेगळ्या आदिवासी टोळ्यांचा. मुळचेच हे लोक अशिक्षित व अंधश्रद्धाळू. घौरी त्यांचाच राजा. तो तर कमालीचा अंधविश्वासू. चंदबरदाईने राजाला दरबारासमोर अनेक जादू म्हणजेच हातचलाख्या व गणिती आधार असलेले प्रयोग सादर केले.राजा व दरबार हे पाहून चकित झाले व ही व्यक्ती दैवी आहे यावर त्यांचा पक्का विश्वास बसला. त्यातच भारी गम्मत म्हणजे चंद बरदाईने मी सूर्य देखील झाकू शकतो असे घौरीला सांगून प्रयोगाची तिथी आणि वेळ पण सांगून टाकली. आधी सांगितल्याप्रमाणे चंदबरदाई हा जोतिषशास्त्रात पारंगत. जी तिथी आणि वेळ दिली ती होती सुर्याग्रहणाची. संपूर्ण प्रजेत कुतूहल पसरले.मग काय सर्व उपस्थितांसमोर व खूद्द राजा घौरी समोर चंदबरदाईने ध्यान मुद्रा धारण केली व हळूहळू चंद्राच्या सावलीने सूर्य झाकायला लागला. ओ....हो .....मग काय “ सुभानल्ला, सुभानल्ला !!!!!” म्हणत संपूर्ण राज्याने चंदबरदाईला डोक्यावर घेतले. राज्याच्या गळ्यातला तर ताईतच. घौरीने त्याला राज्यातील विषेश व्यक्तीचा दर्जा दिला ज्याला आजकाल आपण व्ही.आय.पी. म्हणतो ते. घौरीला वाटलं असा “खुदा का फरिश्ता” आपल्या सोबत असेल तर आपण कुठलीही लढाई सहज जिंकू. इतिहासातील पात्रांबद्दल असं बोलू नये पण घौरीला चंदबरदाईने आपल्या हुशारीच्या बळावर “मूर्ख” बनविले होते. आता विषेश दर्जा मिळाल्याने चंदबरदाई कैद्यांच्या कोठडी सोडल्यास संपूर्ण राज्यात कोठेही विना परवानगी फिरू शकत होता पण त्याचे काम कैद्खान्याशीच होते. त्याने युक्तीकरून कैद्यांच्या कोठडीजवळ प्रवेश मिळवलाच. त्याला घाई झाली होती राजा पृथ्विराजाची भेट घेण्याची. राजा जिवंत तरी आहे कि नाही याची पण खबर मिळत नव्हती. कैदखान्यात चंदबरदाई अल्लाचे भजन गुणगुणत जात असताना पृथ्वीराजाने त्याचा आवाज ओळखला व त्याने आवाज दिला. चंदबरदाई राजाला पाहून हळहळला. खूप हाल आणि वेदनेत पृथ्वीराज होते. जिवंतपणी डोळे काढणे हा क्रूरपणा घौरीने केला होता आणि तेही त्याचे ज्याने आपल्याला युद्धात पराभानंतर प्राणाचे अभय दिले होते.याहूनही क्रोर्य औरंग्याने छत्रपती संभाजी सोबत केले होते याची आठवण आपल्याला अजून अस्वस्थ करते. तर राजाचे हे हाल पाहून चंदबरदाई भयंकर भडकला पण पर्याय नव्हता. पृथ्विराजाच्या शौर्याची परिसीमा तेंव्हा झाली ज्यावेळी त्याने चंदबरदाईकडे सुटकेची नव्हे तर अपमानाचा बदला घेण्याची इच्छा यक्त केली, परत राजा होण्याची नव्हे तर ज्याने राज्याचा अपमान केला त्याला यमसदनी (?) धाडायचा निश्चय केला. काही दिवसांनी चंदबरदाईने घौरीला धनुर्विद्येत श्रेष्ठ सैनिक कोण आहे याची परीक्षा घेण्याची विनंती केली व घौरीने ती मान्य केली. राज्यभरातून अनेक धनुर्धर येऊन आपली विद्या दाखवून गेले. त्यात घौरीचा एक सैनिक अत्यंत तरबेज होता, त्याने त्याच्या विद्येने राजा घौरीसह सर्वांचे मन जिंकले. पण आपल्या चंदबरदाई ने काही तिळमात्रदेखील त्या सैनिकाचे कौतुक केले नाही. आता असं केल्यावर कुठल्याही राजाला अपमानित वाटणारच ना ? तेच घौरीच झालं. तो कोड्यात पडला व चंदबरदाईला त्याच्या अश्या वागण्याबद्दल विचारले. चंदबरदाईची चाल ठरल्याप्रमाणे यशस्वी होत होती. त्याने घौरीला सांगितले कि तुझ्या कैदेत असलेल्या एक कैदी शब्दाभेदी बाण सोडतो तुम्ही त्याला पण एक संधी द्या व तुमच्या सैनिकापेक्षा तो श्रेष्ठ आहे कि नाही हे पहा. घौरी साहेब चटकन मंजूर झाले कारण पृथ्वीराजाला त्याने दृष्टिहीन केले होते. झालं तर म पृथ्वीराजाला आणण्यात आले. सर्व धनुर्विद्येतील सैनिक, राज्यातील व दरबारातील प्रतिष्ठित मंडळी हा खेळ पाहण्यासाठी आधीच जमली होती त्यात नुकतेच ज्याला हरवले तो आपला कैदी पृथ्वीराज येणार म्हणल्यावर बघ्यांमध्ये अजूनच उत्साह आला. हा सर्व प्रकार राजे घौरी आपल्या सज्ज्यातून (मोठी खिडकी) पाहतच होते. चंदबरदाई या क्षणाची न जाणो किती दिवसांपासून वाट पाहत होता. अंध पृथ्विराज्याच्या हातात धनुष्यबाण दिला गेला. तो एकंदरीत बाणाचा व परिसराचा अंदाज घेतच होता तेव्हड्यात त्याच्या कानावर ओळखीचे शब्द पडले ..... "चार बांस, चौबीस गज़, अंगुल अष्ठ प्रमाण, ता ऊपर सुलतान है, मत चूको चौहान" पृथ्वीराज चव्हाणाने घेतले धनुष्य हाती व जो बाण सोडला तो सरळ घौरीच्या नरड्यात आणि घौरी साहेब क्षणार्धात अल्ला ला प्यारे झाले...........आणि चंदबरदाईने आपल्या हुशारीने आपल्या राजाचा व राज्याचा बदला घेण्याचा निश्चय तडीस नेला. सगळीकडे गोंधळ उडाला व चंदबरदाईचे खरे रूप घौरीच्या सैन्याला कळाले. त्यांने तत्काळ पृथ्वीराजाला आणि चंदबरदाईला एकाच कोठडीत टाकले. यापुढे आता आपले काय होणार हे दोघांना माहित होते. चंदबरदाईला आपल्या स्वामीची सुटका हवी होती आणि राजासोबत स्वतःची देखील. या दोघांचा जन्म एकाच वेळचा आणि दुर्दैवाने मृत्यू देखील. कैदेतूनतर सुटका शक्य नव्हती त्यामुळे दोघांनी कैदेतच एकमेकांना मारून सुटका स्वतःची सुटका करून घेतली.एक शूरवीर राजा आणि एक स्वामिनिष्ठ सैनिक किंवा दोन जिवलग मित्रांची हि कथा इथेच संपली. धन्यवाद !!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
12158 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

वाह!!!

पद्मावति
Fri, 10/21/2016 - 15:40 नवीन
वाह!!! इतिहासातल्या या अनोळखी सोनेरी पानाची ओळख करून दिलीत तुम्ही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

खास .....

भम्पक
Fri, 10/21/2016 - 16:15 नवीन
जबरदस्त कथा.....खरेच 'पृथ्वीराज रासो ' या ग्रंथाबद्दलच चांदबारदाई परिचित होता. धन्यवाद त्याच पूर्ण इतिहास सांगितल्याबद्दल....
  • Log in or register to post comments

छान कथा.

एस
Fri, 10/21/2016 - 16:22 नवीन
छान कथा.
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा.

यशोधरा
Fri, 10/21/2016 - 16:32 नवीन
जबरदस्त कथा.
  • Log in or register to post comments

जबरी कथा अन भयानक इतिहास !

सस्नेह
Fri, 10/21/2016 - 16:34 नवीन
जबरी कथा अन भयानक इतिहास !
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख करुन दिलित. धन्यवाद

टुकुल
Fri, 10/21/2016 - 16:58 नवीन
सुंदर ओळख करुन दिलित. धन्यवाद. --टुकुल
  • Log in or register to post comments

ह्म्म

चांदणे संदीप
Fri, 10/21/2016 - 17:11 नवीन
एपिक चॅनेललवर सतत रिपीट टेलिकास्ट होत असते या कथेचे. रोचक आहे निश्चीतच! Sandy
  • Log in or register to post comments

हो मला पण प्रथम तेथूनच कळाले.

हृषीकेश पालोदकर
Fri, 10/21/2016 - 17:45 नवीन
हो मला पण प्रथम तेथूनच कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

भारीच की!

चांदणे संदीप
Fri, 10/21/2016 - 21:06 नवीन
भारीच की! या कधीतरी... टीव्ही बघू सोबत! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

अवश्य

हृषीकेश पालोदकर
Mon, 10/24/2016 - 18:54 नवीन
अवश्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

रोचक

नाखु
Fri, 10/21/2016 - 17:17 नवीन
आणी विलक्षण
  • Log in or register to post comments

+१

शरभ
Fri, 10/21/2016 - 17:59 नवीन
आणि तुम्ही छान लिहीताय, असेच लिहीत रहा. - शरभ
  • Log in or register to post comments

जबरदस्त आहे ही कथा!

किसन शिंदे
Fri, 10/21/2016 - 18:00 नवीन
जबरदस्त आहे ही कथा!
  • Log in or register to post comments

कथा

स्वाती दिनेश
Fri, 10/21/2016 - 21:25 नवीन
इतिहासातली कथा आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments

रोचक

टवाळ कार्टा
Fri, 10/21/2016 - 21:42 नवीन
रोचक
  • Log in or register to post comments

मी लहानपणी ही कथा वाचली होती.

पिलीयन रायडर
Fri, 10/21/2016 - 22:27 नवीन
मी लहानपणी ही कथा वाचली होती. पण त्यात घौरी वाचतो असं लिहीलं होतं. फार वाईट वाटलं. आज ही गोष्ट वाचुन बरं वाटलं!
  • Log in or register to post comments

आमच्या वडीलांनी लहानपणी काही

जानु
Fri, 10/21/2016 - 22:40 नवीन
आमच्या वडीलांनी लहानपणी काही संस्कार कथा आणल्या होत्या त्यात ही कथा होती. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/21/2016 - 22:42 नवीन
जबरदस्त कथा ! जयचंदने परकिय सत्तेला आमंत्रण देणे हे अक्षम्य आहेच. पण त्याचबरोबर, पृथ्वीराजाबद्दल प्रचंड आत्मियता व आदर असला तरी युद्धात हरलेल्या घौरीला त्याने (काही कारणाने का होईना पण अनेकदा) सोडून दिले होते, हे कधीच पटले नव्हते. त्याने घौरीला सोडले नसते तर आजचा भारताचा इतिहास वेगळा असता. एखाद्या महत्वाच्या माणसाच्या चुकीच्या निर्णयाने देशाचा इतिहास कसा बदलू शकतो याचे ते उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा आहे ही.

अजया
Fri, 10/21/2016 - 22:55 नवीन
जबरदस्त कथा आहे ही.
  • Log in or register to post comments

चांदबरदाई _____/\_____

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/22/2016 - 00:10 नवीन
चांदबरदाई _____/\_____
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

रेवती
Sat, 10/22/2016 - 03:44 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

विषय अजून फुलवता आला असता,

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/22/2016 - 08:43 नवीन
विषय अजून फुलवता आला असता, असो. रॉक्सी वाचण्या इतकी मजा नाही आली, हे माझे वैयक्तिक मत, चांदबरदाई प्रसिद्ध आहेत ते पृथ्वीराज रासोमुळे, रासोचा अजून उल्लेख चालला असता, त्याचे डिटेल्स भाषा कुठली वापरली आहे, हिंदुस्तानी आहे का खडीबोली, कुठल्या लहज्यात लिहिलंय, भाषासौष्ठव, इत्यादी इत्यादी सोबत असते तर अजून मजा आली असती असे वाटते, इतिहास लेखन ललित शैलीत करायला काही नाही फक्त त्यात विषयाची खोली हरवून उपयोगी नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

आपले निरीक्षण मान्य आहे

हृषीकेश पालोदकर
Sat, 10/22/2016 - 09:50 नवीन
आपले निरीक्षण मान्य आहे सोन्याबापू. कथा रूपी अल्प परिचय देणे एवढाच हेतू होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

पॄथ्वीराज चौहान

सिरुसेरि
Sat, 10/22/2016 - 10:35 नवीन
पॄथ्वीराज चौहान हि मालिका दुरदर्शनवर पाहिल्याचे आठवते . त्यामध्ये शाहबाज खानने पॄथ्वीराज चौहानची भुमिका केली होती . विशेष म्हणजे , अनंगपाल देसाई या अभिनेत्याने अनंगपाल राजाची भुमिका केली होती.
  • Log in or register to post comments

ये भी क्रेक्ट है

चांदणे संदीप
Sat, 10/22/2016 - 12:36 नवीन
:) ये मालिका भी हम बघ च्युकलेले हय! =)) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

छान कथा

पैसा
Sat, 10/22/2016 - 13:35 नवीन
छान कथा
  • Log in or register to post comments

छान कथा

बरखा
Sat, 10/22/2016 - 16:31 नवीन
खुप सुंदर वर्णन केल आहे चंदबरदाई यांच. आवडली कथा.
  • Log in or register to post comments

खरी कथा आहे का?

गामा पैलवान
Sat, 10/22/2016 - 17:24 नवीन
हृषीकेश पालोदकर, कथा रंजक पद्धतीने मराठीतनं सांगितल्याबद्दल धन्यवाद. पूर्वी तुटक तुटक वाचली होती. आता सलग साखळी लागली. पण एक शंका आहे. ही सत्यकथा आहे का? मलातरी ही मिथक वाटते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

इतिहासतज्ञांच्या मताप्रमाणे

एस
Sat, 10/22/2016 - 18:31 नवीन
इतिहासतज्ञांच्या मताप्रमाणे पृथ्वीराज चौहानांचा मृत्यू युद्धातच झाला होता. पुढची सर्व कथा ही लोककथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मिथक आहे

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 10/23/2016 - 23:05 नवीन
पृथ्विराजांचा अंत युद्धातच झाला. बाकी पुढे जयचंद किंवा इतरांचे काय घडले ते माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

चार बांस , चौबिस गज, अंगुली

युगंधर
Sat, 10/22/2016 - 17:48 नवीन
चार बांस , चौबिस गज, अंगुली अष्ट प्रमाण, ते पे सुलतान हे मत चुकियो चोहान.
  • Log in or register to post comments

चार बांस , चौबिस गज, अंगुली

युगंधर
Sat, 10/22/2016 - 17:48 नवीन
चार बांस , चौबिस गज, अंगुली अष्ट प्रमाण, ते पे सुलतान हे मत चुकियो चोहान.
  • Log in or register to post comments

...

chitraa
Sat, 10/22/2016 - 19:54 नवीन
एक कथा म्हणून रोचक आहे. ध्यानमुद्रा लावून ग्रहण लावले म्हणे. सगळे फसले म्हणे
  • Log in or register to post comments

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/22/2016 - 20:24 नवीन
कथा वाचायला मजा आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त ; पण काल्पनिक

मन१
Sun, 10/23/2016 - 22:48 नवीन
लिखाण आवडलं. काव्य , कल्पना, भावनोत्कटता, निष्ठा , चातुर्य, चातुर्य ह्यांचं थोर उदाहरण म्हणून छान आहेत कथा. पण.... वास्तव इतिहास वेगळा आहे. . . माझ्या माहितीप्रमाणे -- घौरीने पृथ्वीराजास बंदी केले. मारुन टाकले. नंतर काही वर्षे मुहम्मद घौरी जिवंत होता. पृथ्वीराजाने घौरीस मारले ते काव्यातच. अर्थात त्यातील राजपूतांचा लढाउ बाणा दाखवणार्‍या आशयाशी सहमत आहेच. . . ज्यांच्या सतत्येबद्दल शंका येण्यास बराच वाव आहे अशा इतर काही प्रचलित समज/कथा/दंतकथा आठवल्या; त्यांची यादी देतोय. चूभूद्याघ्या; काही राहिले असल्यास, त्यात दुरुस्ती सुचवल्यास आभारी असेन. पुढील सर्व प्रतिसाद अवांतर आहे
  1. राणी पद्मावती आणि तिने केलेला जोहार
  2. अल्लाउद्दीन खिल्जीनं राणी पद्मिनीच्या सौंदर्याची किर्ती ऐकून तिला प्राप्त करण्यासाठी चित्तोड गडावर स्वारी केली. अफाट सैन्य घेउन आलेल्या खिल्जीचा राजपूतांनी हिमतीनं सामना केला. पण काही कारणानं (बहुतेक कपटानं) पद्मिनी आणि इतर राज्स्त्रिया त्याच्या हाती लागतील की काय अशी परिस्थिती आली. शूर राजस्त्रियांनी त्याच्या हाती पडण्यापेक्षा स्वतःला संपवलं. जोहार केला. स्वतःची आहुती दिली. (बहुतेक अग्निप्रवेश करुन, स्वतःला जाळून.) पण अर्थातच.... हेही काव्य आहे; इतिहास नसावा. मलिक मुहम्मद जयसि ह्याने हे काव्य लिहिलं १५३० च्या सुमारास. त्यानं त्यावेळी सांगितलं की घटना घडून सुमारे अडीचशे वर्षं होउन गेलित. मात्र प्रत्यक्षात ह्याचा समकालिन उल्लेख कुठेच सापडत नाही. मलिक मुहम्मद जयसिच्या आधीच्या आख्ख्या अडिचशे वर्षापूर्वीच्या उल्लेख राजपूत किम्वा अल्लाउद्दीन खिलजीच्या तुर्क कागदपत्रांत कुठेच नाही. पण पुन्हा वरीलप्रमाणेच इथेही जी भावना प्रतिबिंबित होते ती महत्वाची आहे. राणी पद्मिनी हे काव्यातील पात्र आहे. पण त्यायोगे तत्कालिन स्थानिक हिंदू रयत परकिय तुर्क आक्रमणांखाली कोणकोणत्या संकटांना तोंड देत होती; ह्याचा अंदाज येतो. तेव्हाच्या जनमानसाचा कवडसा घेता येतो.
  3. शिवराय आणि कल्याणच्या सुभेदाराची सून
  4. इथेही तेच. कल्याण - भिवंडी शिवाजी महराजांनी स्वराज्यविस्तारा दरम्यान ( बहुतेक १६५० च्या आसपास) जिंकून घेतली मुघलांकडून हे खरं. मोहिमेत आबाजी सोनदेव आणि इतर मराठे वीर अग्रेसर होते, हेही खरं. पण मुळात कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराला मुलगाच नव्हता. त्यामुळे सून असण्याचाही प्रश्न नाही. समकालिन कागदपत्रात कुठेही कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्या भेटिस आल्याचे उल्लेख नाहित. त्यामुळे तिला सन्मानपूर्वाक परत पाठवण्याचाही प्रश्न नाही. मग
    "अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीहि सुंदर झालो असतो" वदले छत्रपती !
    असं महाराज म्हटल्याचं बोललं जातं; त्याबद्दल काय ? त्याचा अर्थ इतकाच की त्यातून एकूण जनभावना प्रतिबिंबित होते. शिवराय परस्त्रीला सन्मानाने वागवत; इतर सत्ताधार्‍यांहून अत्यंत धवल चारित्र्य असल्याचं जनता जाणित व मानीत होती; व त्याचच हे प्रतिबिंब पडल्याचं दिसतं; इतकं नक्की म्हणता यावं.
  5. बजाजी निंबाळकरांचं आधी मुस्लिम आणि मग पुनः हिंदू बनण
  6. हे शिवरायांचे व्याही. ह्यांना जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आलं; व नेताजी पालकरांप्रमाणेच पुन्हा हिंदू धर्मात शिवरायांनी सामील करुन घेतलं गेलं; असं मानलं जातं. पण ह्यांचं मुळात मुस्लिम धर्मांतरच झालं नव्हतं; ते हिंदूच होते. पण मग नक्की ती धर्मांतराची कथा का पसरली असावी, ते मात्र ठौक नै.
  7. संभाजी राजे आणि औरंगजेबाची मुलगी
  8. एक बंदीवान म्हणून औरंगजेबासमोर सादर केलेल्या अवस्थेत संभाजीराजांनी म्हणे औरंगजेबाच्या मुस्लिम होण्याच्या ऑफरला उत्तर म्हणून कन्येचा हात मागित्ला. ("तुझी मुलगी देणार असलास होइन मुसलमान" अशा छापाचं उत्तर दिलं म्हणे.) वस्तुस्थिती ही आहे की तेव्हाच्या तपशीलवार दिलेल्या वर्णनात खुद्द समकालिन मुघल कागदपत्रांत ( ज्यात लेखक स्वतः त्या प्रसंगात उपस्थित असण्याचे खूपच चान्स आहेत.) व इतरत्रही संभाजी राजे असं काही म्हणाल्याचा उल्लेख नाही. फक्त राजांचं वागणं " उद्धटपणाचं" वाटल्यानं औरंगजेब संतापला आणि त्यानं राजांचा छळ करण्याचा आदेश दिला; इतकेच उल्लेख आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे; जिच्याबद्दल हा किस्सा आहे ती औरंगजेबाची मुलगी राजांपेक्षा किमान पंधरा-एक वर्षे मोठी होती. औरंगजेबानं " आमची कोणती माणसं तुम्हाला सामील होती ते सांग, तुझे आमच्या इथले हेर कोण आहेत ते सांग" ह्या व इतर काही मागण्या संभाजी राजांना केल्या होत्या. त्यास राजांनी नकार दिला. राजे जे वागले ते औरंगजेबाला उद्धटपणाचं वाटणं आणि त्यानं भडकणं हे मला शक्य वाटतं.
  9. गझनीचा मेहमूद व हिंदू संस्कृतीचे संबंध
  10. " गझनीच्या महमूदानं सतरा वेळा सोमनाथाचं मंदिर लुटलं , ध्वस्त केलं " असा प्रचलित समज दिसतो. (धार्मिक हिंदू, हिंदुत्ववादी ती जखम, सुडाची आठवण, खूण गाठ म्हणून वागवतात; तर काही भडक्क , आक्रमक पाकिस्तानी त्या विजयांची फुशारकी मिरवताना दिसतात मिडियावर. ) तर साम्गायचं म्हणजे , महमूदानं सतरा वेळा "हिंद"वर स्वार्‍या केल्या , हे खरं. पण ह्या सर्व काही सोमनाथावर नव्हत्या. ह्यातल्या बहुतांश पंजाबपुरत्या ( पेशावर/पुरुषपूर, लाहोर, भटिंडा ,ठाणेसर/पुरुषपूरपर्यंत मर्यादित होत्या. किंवा फार तर कनौज पर्यंत त्यानं काही धाडी टाकल्या होत्या. ) त्यानं केलेल्या सतरा स्वार्‍यांत कित्येकदा त्याच्या सैन्याचा प्रकिंवा, व्यवस्थित पराभवही झाला. ( आजच्या यु पी मधल्या बहराइच इथल्या लढाईत तर खुद्द त्याचा पुतण्या की भाचा ठार झाला हिंदू राजांच्या आघाडीकडून) सतराव्या स्वारीत मात्र त्याने सोमनाथावर धाड टाकली, लुटले, ध्वस्त केल्याचे दिसते. पण "सतरा वेळेस" हे केलेले नाही. एकूणात तो भूभाग फारसा जिंकून घेत नसे. टोळ धाडी सारखे सैन्य घेउन येइ. लुटालूट करुन झपाट्याने निघून जाइ. त्याचा ठळक , थेट अंमल प्रामुख्याने आजच्या पाकिस्तानातील पंजाब प्राम्ताच्या आसपसच काय तो बसला. शिवाय सतरा वेळेस तो आला म्हणजे त्याने एकूणात सतरा " मोहिमा" काढल्या. एकेका मोहिमेत कैक लढाया होत्या. त्यात कित्येकदा त्याचा अगदि व्यवस्थित साग्रसंगीत पराभव झाला. कित्येकदा तर वाट अडवून बसलेल्या स्थानिक हिंदू राजांच्या फौजांशी थेट न लढताच तो परस्पर दुसर्‍या वाटेने निघून गेला (सिंध मार्गे, 'थर'च्या वाळवंटातून वगैरे.) . . बादवे, गझनीच्या मेहमुदाची सापडलेली कित्येक नाणी संस्कृतात आहेत. . . अजून एक ऐकिव माहिती. -- ( मात्र ह्याबद्दल मात्र मला खात्री नाही.) त्याने केलेल्या बहुतांश स्वार्‍यांत ( अगदि सोमनाथ मंदिरवाल्या फेमस स्वारीतही ) कित्येक मांडलिक हिंदू राजे त्याच्या सोबत होते. आणि त्याच्या विरुद्ध लढणार्‍या हिंदू राजांच्या आघाडीत कित्येक इस्मायली मुस्लिम योद्धे( मर्सिनरीज्) होते. . .
  11. अफझलखान आणि देवळांची तोडफोड
  12. अफझल खानाने शिवरायांना डिवचायला आणि दुर्गम गडकोटांतून खाली खेचायला मुद्दाम तुळजापूर व पंढपूरच्या मूर्ती फोडल्याचा जो समज आहे; त्यावरही शंका घेतली जाते. कारण समकालिन कागदपत्रांत फोडले जाण्याचा उल्लेख नाही. शिवाय त्याचा कारभार स्वतःच्या जहागिरीत चोख होता, प्रजाहितदक्ष ( न्यायी ?) म्हणता यावा असा होता म्हणतात. ( अधिक संदर्भ मिपाकर मालोजीराजे नेमके सांगू शकतील.) . .
  13. आदिलशहा आणि मोरया गोसावी तीर्थक्षेत्र
  14. मोरया गोसावी ह्यांचे जे प्रसिद्ध चिंचवड देवस्थान आहे; ( "गणपत्ती बाप्पा मोरया" ह्या घोषणेत बाप्पा सोबत ज्यांचं नाव हायफनेट केलं जातं त्या मोरया गोसांवींचं देवस्थान चिंचवड; ) त्याला आदिलशाही दरबाराकडून मानधन ( की इनाम ? ) मिळत असे. आदिलशाही घराण्यातला इब्राहिम आदिलशहा हा विशेषतः गणेशभक्त व सरस्वतीभक्त होता. . .
  15. आदिलशहा आणि दत्तक्षेत्र नरसोबाची वाडी
  16. आदिलशाही घराण्यातल्या एका सुल्तानाने प्रसिद्ध दत्तक्षेत्र " नरसोबाच्या वाडी"ला नवस बोलला. देव नवसाला पावला. तेव्हापासून तो आदिलशहा नरसोबाच्या वाडीचा भक्त झाला. इतका की सध्याचं नरसोबाच्या वाडीचं देऊळ त्यानच बांधलेलं आहे. . .
  17. अनारकली आणि सलिम/ जहांगीर
  18. मुघल ए आझम हा पिच्चर बघून अलिम - अनारकली ह्यांची प्रेमकथा एकदम भव्य आणि उत्कट वाटत असेल; तर एक इंट्रेस्टिंग बाब ऐका. अनारकली नावाची खरीखुरी व्यक्ती कुणी अस्तित्वात होती की नव्हती हे पुरेसं स्पष्ट अजूनही नाहिये. त्याबद्दल शंका घेतल्या जाताहेत. लाहोरमध्ये एक कबर अनारकलीची कबर म्हणून दाखवली जाते; पण त्याचीही सत्यता बियॉण्ड रिझनेबल डौट सिद्ध झालेली नाही. आणि अनारकली ही व्यक्ती अस्तित्वात असलीच, तरी शहजादा सलिमनं तिच्यासाठीच बंड केल्याचं दिसत नाही. कारण बंडाची तारिख, आणि अनारकलीचा सांगितला जाणारा मृत्युदिवस ह्यात काही वर्षांचं अंतर आहे. शिवाय सलिमनं बंड केलं हे खरं असलं तरी सिनेमात दाखवलय तसं तो धाडसानं सम्राट अकबराला सामोरा वगैरे काही गेला नव्हता. लढाईपूर्वीच तो कल्टी मारायच्या प्रयत्नात होता. तसाच अकबराच्या हाती लागला. अपल्या पुत्रात लढण्याइतकीही हिंमत नसल्याचं बघून अकबराला त्रास झाला. सलिम बंडाला उभा राहिलेला पाहून जित्का त्रास झाला, त्याहून अधिक त्यानं धड सामनाच न केल्याचं बघून झाला म्हणे. . .
  19. राधा - कृष्ण
  20. राधा - कृष्णाची मंदिर भारतभर दिसतात. पण राधा हे पात्र खर्‍या महाभारतात , व्यासांच्या मूळ कथेत कुठेच नाही. ते पात्र "गीत-गोविंद " ह्या जयदेवाच्या काव्यात प्रथम सापडतं. तिथून पुढे विविध भागवत कथांमध्ये त्याचा विस्तार होत गेला. थोडक्यात, "राधा" ही मूळ महाभारताचा भाग नाही. ( ह्याबद्दल नेमका तपशील वल्ली/प्रचेतस देउ शकेल. )
  • Log in or register to post comments

+११

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 10/23/2016 - 23:11 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

बरोबर.

एस
Mon, 10/24/2016 - 00:39 नवीन
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

सहमत आहे

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 13:14 नवीन
मन१, तुमच्याशी याबाबत सहमत. अफझलखानावरून एक आठवलं. त्याने लिहिलेल्या एका पत्रात त्याने जनता आमचे पोंगडी आहेत असा उल्लेख आहे. पोंगडी म्हणजे कन्नडमध्ये हितचिंतक. हा उल्लेख बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या शिवचरित्रात आहे. तो वाचून मलाही प्रश्न पडला होता की कर्नाटकातल्या जनतेला आपला मित्र मानणारा अफझलखान महाराष्ट्रातल्या जनतेच्या श्रद्धास्थानांवर भीषण अत्याचार का करतो? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

धन्यवाद !

हृषीकेश पालोदकर
Mon, 10/24/2016 - 13:51 नवीन
धन्यवाद ! लोककथेमधून लोकभावना प्रतिबिंबित होते आणि लोकभावना हा इतिहासाचा सर्वात मोठा पुरावा असावा. कारण इतर पुराव्या अभावी एखादी गोष्ट नाकारावी हे मला काही पटत नाही, मात्र ती लोक्भावानेच्या बळावर जरूर स्वीकारावी. इतिहास हा तटस्थ नसतो. त्याला लिहिणार्याची किंवा सांगणार्याची भावना चीटकलेलीच असते. भावना आणि मत यांना वगळून टाकल्यास फक्त तारखेचे संदर्भ, घटना आणि घटनेतील पात्रच उरतात इतिहासात, मग तो केवळ घटनाक्रम राहतो. याचप्रमाणे चंदबरदाई आणि पृथ्विराजाची कथा मी पाहतो. मला यात स्वामीनिष्ठा आणि चतुराई दिसली तीच आपणासमोर मांडली.हा इतिहास कि कथा याच्या मी खोलात गेलो नाही कारण इथे पुरावे आणि तारखेचे गणित मला फारच गौण वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हम्म ओके

मन१
Mon, 10/24/2016 - 14:38 नवीन
हम्म ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

लोककथेमधून लोकभावना

प्रचेतस
Mon, 10/24/2016 - 14:59 नवीन
लोककथेमधून लोकभावना प्रतिबिंबित होते आणि लोकभावना हा इतिहासाचा सर्वात मोठा पुरावा असावा.
तीव्र असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

+१

चांदणे संदीप
Mon, 10/24/2016 - 15:06 नवीन
तीव्र असहमतीशी सहमत! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/24/2016 - 17:38 नवीन
असहमतीशी सहमत ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

लोकभावना आणि इतिहास

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 17:46 नवीन
प्रचेतस, तुमच्या विधानाशी सहमत आहे. लोकभावना आणि इतिहास या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यांना इतिहासापासून काही शिकायचं आहे त्यांनी लोकभावनांत वाहवत जाता कामा नये. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रचेतस तुम्ही माझं अर्ध

हृषीकेश पालोदकर
Mon, 10/24/2016 - 18:48 नवीन
प्रचेतस तुम्ही माझं अर्ध वाक्यच लक्षात घेताय असं वाटतंय. जेंव्हा कुठलाच पुरावा नसतो त्यावेळी काहीच घडले नाही असं आपण म्हणू शकत नाही, त्यापेक्षा लोकभावना हा पुरावा असावा असे मी लिहिले आहे. परंतु पुरावा असल्यास एखादी गोष्ट निव्वळ लोकभावनेनीच अथवा लोककथेनेच धोपटली जावी हे मी देखील मानीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इतिहास हा नेहमी तटस्थ असतो,

प्रचेतस
Mon, 10/24/2016 - 19:47 नवीन
इतिहास हा नेहमी तटस्थ असतो, तटस्थ असावा. त्याला भावभावना नसतात. खरा इतिहास संशोधक जेव्हा काहीच पुरावा नसतो तेव्हा तो 'पुराव्याअभावी काही सांगता येणार नाही'असंच म्हणतो. तो लोकभावनेसोबत वाहवत जात नाही. अर्थात लोककथांमध्ये काहीही तथ्य नाही असंही अजिबात नाही.अल्पसा का होईना काही वेळा सत्यांश असू शकतो पण आपण केवळ जर तर असा अंदाज लावू शकतो आणि इतिहास जर तर वर चालत नाही, त्याला निर्विवाद पुरावा लागतो. बाकी इतिहास संशोधनाची साधने हा वेगळा विषय. त्यात लोकसाहित्याला अत्यन्त निम्न स्थान आहे. बाकी पृथ्वीराज चौहान हा ११९३ साली मारला गेला तर घोरीची हत्या पंजाब मधल्या गकर नामक रानटी टोळ्यांनी ११९४ साली केली असे मुसलमानी रियासत म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

+१११

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 10/24/2016 - 20:13 नवीन
तीव्र असहमतीशी पुर्ण सहमत! फक्त इतिहास हा कधीच तटस्थ नसतो, तर तो जेते लिहितात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मनराव, ह्या प्रतिसादाकरता

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 14:11 नवीन
मनराव, ह्या प्रतिसादाकरता बालके बापुसाहेबाचा साष्टांग दंडवत स्वीकारावात ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मस्त प्रतिसाद.

अप्पा जोगळेकर
Mon, 10/24/2016 - 15:22 नवीन
मस्त प्रतिसाद. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या 'रासो' या काल्पनिकच आहेत. रामायण किंवा महाभारत यांसारख्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

म्हणजे राम, हनुमान, रावण कोणी

हृषीकेश पालोदकर
Mon, 10/24/2016 - 19:04 नवीन
म्हणजे राम, हनुमान, रावण कोणी नव्हतेच ? सर्व केवळ काल्पनिक पात्रे आहेत ? कि पात्रे खरी पण कथा काल्पनिक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा