Skip to main content

चोरी प्रकाशाची (१)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 25/07/2016 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! , अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...! आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब. जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते. सर्वसाधारण पणे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पूर्वेकडे हे प्रमाण जास्त आहे. काही प्रतिष्ठित उद्योगधंदेसुद्धा वीज-चोरीसारख्या अनिष्ट गोष्टी सर्रास करताना आढळले आहेत. वीज चोऱ्या पकडण्यासाठी खास पथके नियुक्त केलेली असतात. पूर्वेकडच्या भागात अशाच एका पथकाचे नियंत्रण करण्याची एकदा वेळ आली होती. तेव्हा विजेची चोरी करण्यात आणि ती पकडण्यातही किती कल्पकता असते हे बघायला मिळाले. त्यातले काही मजेदार किस्से. भाग बरेचदा अनोळखी असे. पोलिसांचे जसे खबरे असतात, तसे आमचेही. हे खबरे म्हणजे लोकल माहितगार व्यक्ती. त्या त्या भागातल्या वायरमन लोकांना सर्वसाधारणपणे चोऱ्यावाले ठाऊक असत. पण त्यांनी चोरी पकडली तर नंतर त्या भागात काम करणे जिकिरीचे होई. म्हणून ते प्रत्यक्ष भाग न घेता आम्हाला मार्ग दाखवत. पुढे चोरी पकडली तरी ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करणे फार तापदायक काम असे. डायरेक्ट मीटरमध्ये लुडबुड केलेली बरेचदा वरवर पाहणी करून दिसत नाही. मग मशीन लावून युनिटची तुलना केल्यावर फरक दिसे. त्यानंतर मीटर काढून सील करून त्यावर ग्राहक आणि साक्षीदाराची सही घेणे, ते व्यवस्थित सील करणे, तपासणीला पाठवणे, मग टेम्परिंग कन्फर्म झाल्यावर चोरीचा हिशेब काढणे इ. सोपस्कार होत. तत्पूर्वी ग्राहकाकडून अंदाजे फरकाची रक्कम भरून घ्यावी लागे. तिथेच मतभेद होत. वीज चोर काही केल्या सहकार्य करीत नसे. चोरी नेमकी कधीपासून सुरू होती, ते कळायला पुष्कळदा मार्ग नसे. मग कमीतकमी कालावधी म्हणजे सहा महिन्याच्या बिलाची फरक रक्कम काढून कोटेशन द्यायचे आणि रक्कम भरून घ्यायची. ही रक्कम ग्राहक काही केल्या मान्य करत नसे. ग्रामीण भागात दादागिरी. ‘चोरी बिरी काही नाही, बिल भरणार नाय, कनेक्शन बंद करू देणार नाय’ ही भाषा. मग पोलिसांची मदत घ्यावी लागे. हजार लफडी. एकदा एका घरात मीटरमध्ये गडबड आहे असे अनेक जणांकडून कळले होते. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे आणि आपण घरात जाऊन दार बंद करून बसे. कुत्रा वायरमन लोकांना कंपाउंडच्या आत येउच देत नसे. मग आमच्या वायरमनने एकदा गुंगीचे औषध घातलेले बिस्कीट आधीच कुत्र्याला चारले आणि मग मागील दाराने जाऊन चेकिंग केले. चोरी होतीच. मीटरमध्ये अंदाधुंद गडबड. मशीन लावायची गरजच पडली नाही. टेम्परिंग सरळ दिसत होते. सापडली ना चोरी न काय ? घरमालकीण कधी न ऐकलेल्या शिव्या देऊ लागली. पोलिसांचं नाव काढल्यावरच गप्प झाली. असाच आणखी एक किस्सा. बऱ्याच दिवसापासून ही केस सस्पेक्टेड होती. दुमजली घर. मीटर जिन्यात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी. तिथे उजेड बेतास बात होता. मीटर बघायला दिवसासुद्धा टॉर्च वापरावा लागे. घरात बारा पंधरा माणसे. वर-खाली मिळून आठ-दहा खोल्या. आठ दहा ट्यूबलाईट्स, दोन फ्रीज, दोन टीव्ही,आणि इतर भरपूर वापर. पण बिल जेमतेम पन्नास युनिट्स. वायरमनला पक्की खात्री होती की चोरी आहे. पण मीटरच्या पारदर्शक कव्हरमधून टॉर्चच्या उजेडात काहीच संशयास्पद आढळत नव्हते. कुठे अन कशी गडबड केलीय तेच समजत नव्हते. बरं, जास्त तपास अन चिकित्सा करायचा प्रयत्न केला तर वायरमनचीच गचांडी धरली जाण्याची शक्यता. मागच्याप्रमाणेच आम्ही तिघे चौघे सस्पेक्टेड स्पॉटवर गेलो. जाताना दुसऱ्याच भागातल्या वायरमनला बरोबर घेतले होते. मोठा टॉर्च बरोबर नेला होता. अडचणीच्या चिंचोळ्या जिन्यात आमचे पथक खाटखुट करू लागताच घरातले अन शेजारचे दहा-पाच मेंबर गोळा झाले अन आमचे अंधारातील कृष्णकृत्य (?) टाचा उंचावून उत्सुकतेने पाहू लागले. नित्याप्रमाणे त्या भागातील नेहमीच्या वायरमनला पाचारण केले गेले. तो आल्यावर पहिले त्याची झाडाझडती. मग मुख्य काम सुरु झाले. चोरी ओळखण्याची हमखास पद्धत म्हणजे मीटरचा मेनस्विच बंद करायचा अन मग घरातील लाईट्स अन विजेची उपकरणे एकामागोमाग एक सुरु करायची. एक जरी सुरु झाले, तरी चोरी आहे, हे निश्चित झाले. त्याप्रमाणे वायरमनला मेनस्विच बंद करण्यास फर्मावले आणि ट्रायल घेतली. मेनस्विच बंद असूनही वरच्या मजल्याच्या अर्ध्या भागातील सर्व लाईट्स आणि उपकरणे सुरूच होती ! म्हणजे चोरी आहे हे नक्की झाले. आता कुठून अन कशी ते शोधल्याशिवाय पंचनामा कसा करणार ? आम्ही पाच जणांनी मिळून डोळ्यात तेल घालून सगळे वायरिंग तपासले. घरातील वायर अन वायर पिंजून काढली. मीटर खालून वरून तपासले. पण छे ! कुठेच काही गडबड दिसेना. आता काय करावे ? चक्कीत जाळ झाला ! मग खाली जाऊन आम्ही डोक्याला डोकी लावली. पलीकडच्या भागातून बोलावून आणलेल्या वायरमनमामांनी युगत लढवली. आम्हाला डोळा मारला आणि शेजारीच रहात असलेल्या घरमालकाच्या पुतण्याला हाक मारून गल्लीच्या कोपऱ्यावर घेऊन गेले. आम्ही पलीकडच्या गल्लीतल्या हॉटेलात च्यापाणी करत बसलो. इकडे पुतण्याला वायरमनने हॉटेलात नेऊन चहा पाजला आणि अघळपघळ गप्पा सोडल्या. चुलत्या-पुतण्यांचे काही बरे नव्हते, ही गोष्ट वायरमनमामांना ठाऊक होती. चहा पोटात गेल्यावर पुतण्या बोलता झाला. मीटरची मेख त्याला बरोब्बर माहिती होती. लगेच मामा परतून आले आणि आम्हाला फोन मारला. गेलो. परत बघे मंडळी जमा झाली. मामांनी खिशातून एक भक्कम चाकू काढला. मीटर अन भिंतीच्या मधल्या सापटीत टॉर्चचा झोत टाकला आणि चाकूचे पाते आत खुपसले. जsरा ताण दिला अन फट मोठी झाली. मग त्यांनी आम्हाला एकेकाला येऊन फटीत डोकवायला सांगितले. बघतो तर काय, त्या फटीतून एक केबल मीटरच्या बाहेरून थेट भिंतीत गेलेली दिसली. आमच्या खांबावरची केबल मीटरमध्ये जाण्यापूर्वीच तिला वाटा फुटल्या होत्या. भिंतीला बेमालूम आरपार भोक पाडले होते अन त्यातून ती केबल जिन्याच्या आधार-पाईपमध्ये अलगद शिरली होती ! आणि तिथून छुप-छुपके वरच्या अर्ध्या मजल्याला वीज पुरवत होती ! झाले. समोरच्या बघ्यांमधल्याच दोघांना पकडले आणि पंच बनवले. पंचनामा केला. मालकाची घाबरगुंडी उडालेली. त्याच्या सह्या घेतल्या. बिलाचे रेकॉर्ड काढून हिशेब केला आणि फरकाचे बिल काढून मालकाच्या हातात ठेवले. या प्रकाशाची किंमत काही हजारात गेली होती ! (क्रमशः )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34385
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

चांगला व माहितीपूर्ण लेख. आमच्या बिल्डींगमधल्या एका कुटुंबाने त्यांची केबल आमच्या मीटरमध्ये घुसवून ठेवल्यामुळे कित्येक महिने आम्हाला पाच-सहाशे रुपये जास्त बिल आले. उघडकीला आल्यावरही त्यांनी थोडीसुद्धा भरपाई दिली नाही. :(

मी पण ऊर्जा क्षेत्रात काम करत असल्याने वाचायला मजा आली...! पुढील भागाच्या प्रतीक्षेत. मिपा वर समदुःखी पण आहेत म्हणायचं तर!:)

ताई, वीजचोरी बद्दल जशी माहिती दिली तशीच आम्हा ग्राहकांच्या खिशातून एमएसइबी करत असलेल्या चोरीवर प्रकाश टाकाल जरा? मी वसईत राहतो आणि हे बिल्डींग्स काँम्प्लेक्स असल्याने इथे 'तारेवर आकडा टाकणे' वैगरे प्रकार होत नाही. पण अधून मधून वीज महामंडळ ७०-८०% ने वाढीव बील पाठवून सर्वांना 'शाॅक' देत असते. आठ दिवसांपुर्वी एका राजकिय पक्षाने बँनरबाजी करत मोर्चासुद्धा काढला होता. पण त्याने येत्या वीजबीलात काही चमत्कार घडेल अशी शक्यता फार कमी आहे. सोसायटीत एमएसइबीचा मीटर रिडींग घेणार्‍याने सुद्धा आमचे रिडींग जवळपास १०० युनिटने जास्त आले आहे असे (आॅफ द रेकाॅर्ड) सांगितले. नालासोपारा पुर्वेला अनधिकृत परप्रांतिय वस्तीमध्ये आकडा टाकून भरमसाठ वीज चोरी होते. कदाचित काहि कारणास्तव महामंडळाला तिथून वसूली आणि कारवाई करता येत नसल्याने जे लोक नियमितपणे वीजबील भरतात तिथून आपली नुकसान भरपाई करून घेतात. महिन्याची आर्थिक घडी बिघडविणार्‍या बिलाचे जाउद्या पण मेंदूचा 'फ्यूज' तेव्हा उडतो जेव्हा सोसायटीतील एखादी अमराठी व्यक्ति 'महाराष्ट्र' या शब्दावर जोर देत म्हणते "ये माराष्ट्र बोर्ड ना एक नम्बर का चोर है।" यावर कुठची भुमिका घ्यावी काय प्रत्युतर द्यावे ते कळत नाही.

In reply to by ससन्दीप

आपले वीज बिल जास्त आले असे वाटले तर तुम्ही खालील चेक करू शकता. १. बिलावरील फोटोतील रीडिंग आणि घरातील मीटरचे रीडिंग पडताळून पाहणे. २. बिलावर सहा महिन्याची बिल हिस्ट्री असते त्यानुसार महिन्याचे अ‍ॅव्हरेज कन्झम्प्शन बरोबर आहे का ते पाहणे. ३. घरात कुठे लिकेज आहे का हे पाहणे. ४. त्या महिन्यात वीज दर वाढलेले आहेत का हे पाहणे. हे सगळे बरोबर असेल तर मीटरबद्दल तक्रार नोंदवू शकता. वर प्रतिसादातील मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केलेत तर घरबसल्या हे करू शकता. याउपरही समाधान झाले नाही तर बिलावर पत्ता असतो त्या कार्यालयात जाऊन सक्षम अधिकाऱ्यास भेटा. खालच्या कर्मचाऱ्यांना बरेचदा वस्तुस्थिती व्यवस्थित सांगता येत नाही अथवा अधिकार नसतात. महावितरण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तथापि वाढत्या ग्राहक संख्येमुळे बरेचदा तक्रारींचे नियोजन वेळेत होत नाही.

In reply to by सस्नेह

मुंबई वगळता महाराष्ट्रात महावितरण ही एकमेव वितरण कंपनी आहे.तिची एकाधिकारशाही कमी करण्यासाठी एकपेक्षा जास्त कंपन्यांना वितरण परवाना दिला पाहिजे. म्हणजे यांचे दर स्पर्धात्मक पातळीवर येतील .

In reply to by एस

वायर्स/ उपकरणे जुनी झालेली असतील किंवा अर्थिंग व्यवस्थित नसेल तर अशा प्रणालीमध्ये नॉर्मलपेक्षा जादा वीज खर्च होते. त्याला लीकेज समजतात.

In reply to by एस

विजेचं मीटर फिरतं त्याला साधारणपणे दोन कारणं असू शकतात. एकतर घरात स्टँडबाय मोडवरती असलेली बरीच उपकरणी वापरात आहेत किंवा/आणि विजेची गळती आहे. जेंव्हा आपण रिमोटवरती चालणारी साधने बंद करतो तेव्हा ती स्टँडबाय मोडवरती जातात. त्या अवस्थेत ती वीज खर्च करत असतात. त्याशिवाय खराब उपकरणे किंवा खराब/चुकीचे वायरिंग दोन्हीमुळे गळती होते. ही दुसर्‍याप्रकारची गळती धोकादायक ठरु शकते. उपकरणातले वायरिंग खराब झाले असेल तर विजेचा धक्का बसू शकतो. त्यामुळे गळती शोधणे आणि आटोक्यात आणणे गरजेचे असते.

In reply to by चतुरंग

स्टँडबाय मोड वरती वीज खर्च - बरीच आधुनिक उपकरणे जसे कि LED TV , होम थिएटर ऍम्प्लिफायर , होम ऑटोमेशन ची उपकरणे स्टँडबाय मोड मध्ये अतिशय कमी वीज खर्च करतात , आणि ते बहुदा माहितीपत्रकात दिले असते . कारण अनेकदा परस्परावलंबी उपकरणे हे स्टॅन्डबी मोडे माधेयच ठेवावी लागतात .. तसेच काही उपकरणे आता 24 X 7 चालू ठेवावी लागतात , जसे कि वायफाय रूटर , NAS इ ...

In reply to by शलभ

घरातील सर्व दिवे होल्डर मधून काढायचे, सिलिग पंख्याची वायर सोडवावी .इतर उपकरणाची पिन काढून ठेवावी व सर्व बटणे सुरु करून मीटर bilinking होते का ते पाहावे.गरज भासल्यास परवानाधारक ठेकेदारा कडून घरातील वायारिग चे insulation resistancce तपासून घ्यावेत.

In reply to by मार्मिक गोडसे

१. बिलावरील फोटोतील रीडिंग आणि घरातील मीटरचे रीडिंग पडताळून पाहणे.
दोन वर्षापूर्वी घराचे असेच चुकीचे ज्यादा बिल आले होते, बिलावरील फोटोतील आकडे व वापरलेले युनीटमध्ये बराच फरक होता. तक्रार केल्यानंतर तासाभरात वीजमंडळाची माणसे आली, एका कोर्‍या कागदावर मीटर क्रमांक व मीटर रिडींग लिहून त्यावर आमची सही घेतली व मीटरसमोर तो कागद धरून फोटो काढला. पुढच्या महिन्याचे बिल फरक वजा करून आले.

आत आल्यावर फारच भौतिक प्रश्नाला हात घातलेला दिसला. बाकी चोरीची एक मजा असते. जर पाकिटमारी गुन्हा असेल तर त्याची तक्रार करता येते. चोराला शिक्षा करता येते. मात्र समजा जर अधिकृतरीत्या कायदेशीररीत्या कायदा करुन कलम लावुन मग खिसा कापला तर तो कापु दिला नाही यासाठीच उलट शिक्षा होते. खासगी कंपन्याच्या स्ववापरासाठी च्या कॅप्टीव्ह पॉवर प्लान्ट ला एकीकडे वीज शुल्क लावण्याइतपत एमएसइबी कमाल करु शकते. दुसरीकडे फुकट पंप मिळाला हो चा जल्लोष आवाज वाढवतो. मजा आहे कायदेशीर पाकीटमारीची. शिवाय पाकीटमारांची फिलॉसॉफीपण असते. ती एक आणखीन गंमत

कटियाबाज म्हणून एक डाकुमेंट्री कम सिनेमा आहे. उत्तर प्रदेशातल्या वीज चोरीबद्द्ल. त्याची आठवण झाली.

अश्या चोरींची माहिती नव्हती. लवकर टाका पुढचा भाग.

पुण्यात अफलातून विजचोरी केली जाते
तुमचं बरय बाबा, तुम्ही काहीही म्हटले तरी तुमचे कपडे कोणीही काढू शकणार नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

कुठल्याही थराला जाऊन कौतुक करु शकता हा एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे माझ्या आयुष्यात पुणेकराने पुण्याच्या कुठल्या गोष्टींची बढाई मारली. मी तर एका पुणेकराकडुन चक्क आमच्या पुण्याचे नाल्याची तारीफ या कानाने ऐकली आहे. मला तर ते ऐकुन " कौन कहता है नाला-ए-पुलु को बेअसर ? वैग्रे वाटुन तिथेच चाक हो गये. असो या गंभीर धाग्यावर उगा अवांतर नको.

In reply to by जव्हेरगंज

चक्कीत जाळ ? हा वाक्यप्रचार मी फार थोड्या वेळा वाचला या आहे - तर याचा अर्थ काई ?? हा चक्कीत चाळ असा पण वापरला जातो का?

>>>...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! , अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...! आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब. हा परिच्छेद म्हणजे शाळेतला निबंध जोरकस लिहायचा असला की घ्यायचा रन अप वाटतोय.

पुण्यात स्लम एरिया मधे एक जण चोरीचे कनेक्शन घेतो,आजु बाजुचे पाच सहा लोक त्याच्या कडून कनेक्शन घेतात,चोरी सापडली तरी सगळे चोर दंड विभागुन भरतात,आहे की नाही अफलातून चोरी :)

दिवा बत्ती साठी कोणी वीज चोरी करत नाही. घरघुती ग्राहकात जलतापक,पाण्याची मोटा,वातानुकूलित यंत्र, या जास्त वीज खपत होणाऱ्या उपकरणासाठी होते .

आता फ्लॅट सिस्टिम मुळे ते वीज चोरण्यातले स्किल गेले राव.. गावाकडे जाऊन कधी कधी हौस पूर्ण करून घेतो.. :)