Skip to main content

चोरी प्रकाशाची (१)

लेखक सस्नेह
Published on सोमवार, 25/07/2016
...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! , अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...! आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब. जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते. सर्वसाधारण पणे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पूर्वेकडे हे प्रमाण जास्त आहे. काही प्रतिष्ठित उद्योगधंदेसुद्धा वीज-चोरीसारख्या अनिष्ट गोष्टी सर्रास करताना आढळले आहेत. वीज चोऱ्या पकडण्यासाठी खास पथके नियुक्त केलेली असतात. पूर्वेकडच्या भागात अशाच एका पथकाचे नियंत्रण करण्याची एकदा वेळ आली होती. तेव्हा विजेची चोरी करण्यात आणि ती पकडण्यातही किती कल्पकता असते हे बघायला मिळाले. त्यातले काही मजेदार किस्से. भाग बरेचदा अनोळखी असे. पोलिसांचे जसे खबरे असतात, तसे आमचेही. हे खबरे म्हणजे लोकल माहितगार व्यक्ती. त्या त्या भागातल्या वायरमन लोकांना सर्वसाधारणपणे चोऱ्यावाले ठाऊक असत. पण त्यांनी चोरी पकडली तर नंतर त्या भागात काम करणे जिकिरीचे होई. म्हणून ते प्रत्यक्ष भाग न घेता आम्हाला मार्ग दाखवत. पुढे चोरी पकडली तरी ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करणे फार तापदायक काम असे. डायरेक्ट मीटरमध्ये लुडबुड केलेली बरेचदा वरवर पाहणी करून दिसत नाही. मग मशीन लावून युनिटची तुलना केल्यावर फरक दिसे. त्यानंतर मीटर काढून सील करून त्यावर ग्राहक आणि साक्षीदाराची सही घेणे, ते व्यवस्थित सील करणे, तपासणीला पाठवणे, मग टेम्परिंग कन्फर्म झाल्यावर चोरीचा हिशेब काढणे इ. सोपस्कार होत. तत्पूर्वी ग्राहकाकडून अंदाजे फरकाची रक्कम भरून घ्यावी लागे. तिथेच मतभेद होत. वीज चोर काही केल्या सहकार्य करीत नसे. चोरी नेमकी कधीपासून सुरू होती, ते कळायला पुष्कळदा मार्ग नसे. मग कमीतकमी कालावधी म्हणजे सहा महिन्याच्या बिलाची फरक रक्कम काढून कोटेशन द्यायचे आणि रक्कम भरून घ्यायची. ही रक्कम ग्राहक काही केल्या मान्य करत नसे. ग्रामीण भागात दादागिरी. ‘चोरी बिरी काही नाही, बिल भरणार नाय, कनेक्शन बंद करू देणार नाय’ ही भाषा. मग पोलिसांची मदत घ्यावी लागे. हजार लफडी. एकदा एका घरात मीटरमध्ये गडबड आहे असे अनेक जणांकडून कळले होते. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे आणि आपण घरात जाऊन दार बंद करून बसे. कुत्रा वायरमन लोकांना कंपाउंडच्या आत येउच देत नसे. मग आमच्या वायरमनने एकदा गुंगीचे औषध घातलेले बिस्कीट आधीच कुत्र्याला चारले आणि मग मागील दाराने जाऊन चेकिंग केले. चोरी होतीच. मीटरमध्ये अंदाधुंद गडबड. मशीन लावायची गरजच पडली नाही. टेम्परिंग सरळ दिसत होते. सापडली ना चोरी न काय ? घरमालकीण कधी न ऐकलेल्या शिव्या देऊ लागली. पोलिसांचं नाव काढल्यावरच गप्प झाली. असाच आणखी एक किस्सा. बऱ्याच दिवसापासून ही केस सस्पेक्टेड होती. दुमजली घर. मीटर जिन्यात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी. तिथे उजेड बेतास बात होता. मीटर बघायला दिवसासुद्धा टॉर्च वापरावा लागे. घरात बारा पंधरा माणसे. वर-खाली मिळून आठ-दहा खोल्या. आठ दहा ट्यूबलाईट्स, दोन फ्रीज, दोन टीव्ही,आणि इतर भरपूर वापर. पण बिल जेमतेम पन्नास युनिट्स. वायरमनला पक्की खात्री होती की चोरी आहे. पण मीटरच्या पारदर्शक कव्हरमधून टॉर्चच्या उजेडात काहीच संशयास्पद आढळत नव्हते. कुठे अन कशी गडबड केलीय तेच समजत नव्हते. बरं, जास्त तपास अन चिकित्सा करायचा प्रयत्न केला तर वायरमनचीच गचांडी धरली जाण्याची शक्यता. मागच्याप्रमाणेच आम्ही तिघे चौघे सस्पेक्टेड स्पॉटवर गेलो. जाताना दुसऱ्याच भागातल्या वायरमनला बरोबर घेतले होते. मोठा टॉर्च बरोबर नेला होता. अडचणीच्या चिंचोळ्या जिन्यात आमचे पथक खाटखुट करू लागताच घरातले अन शेजारचे दहा-पाच मेंबर गोळा झाले अन आमचे अंधारातील कृष्णकृत्य (?) टाचा उंचावून उत्सुकतेने पाहू लागले. नित्याप्रमाणे त्या भागातील नेहमीच्या वायरमनला पाचारण केले गेले. तो आल्यावर पहिले त्याची झाडाझडती. मग मुख्य काम सुरु झाले. चोरी ओळखण्याची हमखास पद्धत म्हणजे मीटरचा मेनस्विच बंद करायचा अन मग घरातील लाईट्स अन विजेची उपकरणे एकामागोमाग एक सुरु करायची. एक जरी सुरु झाले, तरी चोरी आहे, हे निश्चित झाले. त्याप्रमाणे वायरमनला मेनस्विच बंद करण्यास फर्मावले आणि ट्रायल घेतली. मेनस्विच बंद असूनही वरच्या मजल्याच्या अर्ध्या भागातील सर्व लाईट्स आणि उपकरणे सुरूच होती ! म्हणजे चोरी आहे हे नक्की झाले. आता कुठून अन कशी ते शोधल्याशिवाय पंचनामा कसा करणार ? आम्ही पाच जणांनी मिळून डोळ्यात तेल घालून सगळे वायरिंग तपासले. घरातील वायर अन वायर पिंजून काढली. मीटर खालून वरून तपासले. पण छे ! कुठेच काही गडबड दिसेना. आता काय करावे ? चक्कीत जाळ झाला ! मग खाली जाऊन आम्ही डोक्याला डोकी लावली. पलीकडच्या भागातून बोलावून आणलेल्या वायरमनमामांनी युगत लढवली. आम्हाला डोळा मारला आणि शेजारीच रहात असलेल्या घरमालकाच्या पुतण्याला हाक मारून गल्लीच्या कोपऱ्यावर घेऊन गेले. आम्ही पलीकडच्या गल्लीतल्या हॉटेलात च्यापाणी करत बसलो. इकडे पुतण्याला वायरमनने हॉटेलात नेऊन चहा पाजला आणि अघळपघळ गप्पा सोडल्या. चुलत्या-पुतण्यांचे काही बरे नव्हते, ही गोष्ट वायरमनमामांना ठाऊक होती. चहा पोटात गेल्यावर पुतण्या बोलता झाला. मीटरची मेख त्याला बरोब्बर माहिती होती. लगेच मामा परतून आले आणि आम्हाला फोन मारला. गेलो. परत बघे मंडळी जमा झाली. मामांनी खिशातून एक भक्कम चाकू काढला. मीटर अन भिंतीच्या मधल्या सापटीत टॉर्चचा झोत टाकला आणि चाकूचे पाते आत खुपसले. जsरा ताण दिला अन फट मोठी झाली. मग त्यांनी आम्हाला एकेकाला येऊन फटीत डोकवायला सांगितले. बघतो तर काय, त्या फटीतून एक केबल मीटरच्या बाहेरून थेट भिंतीत गेलेली दिसली. आमच्या खांबावरची केबल मीटरमध्ये जाण्यापूर्वीच तिला वाटा फुटल्या होत्या. भिंतीला बेमालूम आरपार भोक पाडले होते अन त्यातून ती केबल जिन्याच्या आधार-पाईपमध्ये अलगद शिरली होती ! आणि तिथून छुप-छुपके वरच्या अर्ध्या मजल्याला वीज पुरवत होती ! झाले. समोरच्या बघ्यांमधल्याच दोघांना पकडले आणि पंच बनवले. पंचनामा केला. मालकाची घाबरगुंडी उडालेली. त्याच्या सह्या घेतल्या. बिलाचे रेकॉर्ड काढून हिशेब केला आणि फरकाचे बिल काढून मालकाच्या हातात ठेवले. या प्रकाशाची किंमत काही हजारात गेली होती ! (क्रमशः )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 34345
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

एनर्जीवर एकेकाळी काम केल्याने हा जिव्हाळ्याचा विषय. अश्या अनेक सुरस कथा ऐकल्या आहेत. ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे चोर्‍या होतच असतात. प्रीपेड मीटर्स हा वसूलीवर एक चांगला उपाय आहे, पण चोर्‍या शोधण्याला पर्याय नाही!

ताई ते वायरमन करुन देतेत ते कसलं मशीन ओ? असा छोटा डब्बा असतोय ट्युबलाईटच्या चोकएवढा. त्याला वायर आणि प्लग असतो. मीटरशेजारी सॉकेटमध्ये प्राइम टाइमला (सं. ६ ते १०) टाकतात. रीडिंग स्लो होते म्हणे. बिलात हाफ फरक पडतो असे ऐकलेय ब्वा.

In reply to by अभ्या..

तूपण नाही त्या लोकांच्या नादी कशाला लागतोस ? बादवे तो चोक जुन्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटरला लागू पडायचा. आता सगळी इलेक्ट्राॅनिक मीटर्स आहेत.

In reply to by सस्नेह

ह्या ह्या, तोच आलेला विचारत. माझ्याचयाने काय असले धंदे होत नाहीत. असे किती वाचणार होते? लै झाले 400-500 फक्त. तेवढ्यासाठी चोरीचा ठप्पा नको. जे काय ते लीगल. दोन कामे जास्त करिन पण बिल इमानदारीने भरीन.

In reply to by उडन खटोला

नाई. कधी रेल्वे तर कधी बाईकने पण जातो. ;) बाईकने गेलो तर मात्र डोक्यावर हेल्मेट घालूनच जाईन.

आणि विस्मयकारक. सध्या एक जण सांगत होता कसलेसे चुंबक आहे म्हणे (लै पावरबाझ त्याच्याच भाषेत) मीटरशेजारी खालून लावले की मीटर निम्म्यावर येतयं पळायच खरे खओटे मीटर आणि त्यो बाबा जाणे. गुमान नाखु

In reply to by नाखु

चुंबकाने जुन्या प्रकारचे मिटर स्लो व्हायचे. मागे मुंब्र्याच्या एका युवकाने इलेक्ट्रॉनिक मिटरसाठी रिमोट तयार केला होता, त्या रिमोटने मिटरचे रिडींग बंद करता येत होते.

मस्त अनुभव, हे सम्भावीत दरोडेखोरच म्हणायचे की यांना खडी फोडायला पाठवता येते का? पैजारबुवा,

In reply to by खेडूत

अन मोठ्या प्रमाणात केली तर विधानसभेत! याला म्हणतात शालजोडीतला!

In reply to by बहुगुणी

काही मंडळी चाळीस वर्षे मस्त वीज मंडळाकडून घेऊन ती म्हणे शेतकर्‍यांना विकतात, अन मंडळाला पैसे देतच नाहीत. बावीसशे कोटींची थकबाकी! व्याजाचं काय? हे महाराज मधे एकदा त्यातून सुटण्यासाठी सेनेत पण जाऊन आले. उर्वरित महाराष्ट्रातल्या गळतीपेक्षा ही एकटी रक्कम बरीच जास्त असेल.

चांगला विषय व लेख. एखाद्या विभागातील विजचोरी (विज गळती?) त्या विभागातील अन्य विजग्राहकांच्या बिलात कुठलातरी दर (बहुतेक इंधन समायोजन दर) लावून वसूल केली जाते. विजचोरी पकडल्यावर चोरी केलेल्या ग्राहकाकडून ती वसूल केली जाते, परंतू संबंधीत विभागातील ग्राहकांकडून ती अगोदरच वसूल केलेली असते. ती पुढील बिलातून वजा करून त्या विभागातील ग्राहकांना परत केली जाते का?

In reply to by मार्मिक गोडसे

हे हे..! अहो त्या महिन्याचा सुद्धा तोटा अजून मोठा नसणार का? हां, रामराज्य आल्यावर नक्कीच होईल तसं..

In reply to by मार्मिक गोडसे

वीजगळती त्याठिकाणच्या वीजबिलातून वसूल होत नाही. तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात त्या त्या वाहिनीवर लोडशेडिंग केले जाते. या पद्धतीला भारतात प्रथम क्रमांक दिला गेला आहे. इंधन समायोजन आकार कोळशाच्या दरावर अवलंबून असतो.

In reply to by सस्नेह

तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात त्या त्या वाहिनीवर लोडशेडिंग केले जाते.
किती प्रमाणात वीजचोरी झाल्यावर लोडशेडिंग सूरू होते?
इंधन समायोजन आकार कोळशाच्या दरावर अवलंबून असतो.
ह्यात पारदर्शकता असते काय? वीजबिलात स्थिर आकार कशासाठी आकारला जातो?

In reply to by मार्मिक गोडसे

किती प्रमाणात वीजचोरी झाल्यावर लोडशेडिंग सूरू होते?
किती प्रमाणात असे नाही. जेव्हा सिस्टीम शॉर्टफॉल येतो तेव्हा सर्वात जास्त गळती असलेल्या वाहिन्या प्रथम बंद केल्या जातात. त्यांनतर शॉर्टफॉल वाढेल तसतसे त्याहून कमी गळतीवाल्या वाहिन्या क्रमक्रमाने बंद केल्या जातात. इंधन समायोजन आकाराबाबत रोजचे अपडेट्स महावितरण किंवा महानिर्मितीच्या साईटसवर मिळतात. आपल्या घरापर्यंत वीज वाहन करण्याकरिता जे नेटवर्क उभे करावे लागते, त्याकरिता आणि त्याच्या देखभालीकरिता स्थिर आकार आकाराला जातो.

In reply to by सस्नेह

तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात त्या त्या वाहिनीवर लोडशेडिंग केले जाते.
म्हणजे माझ्या आजुबाजुला कुणी वीज चोरत असेल तर आमच्या लायनीचं जास्त शेडिंग करणार? च्यामारी ! याला काय अर्थ आहे? बादवे, तुझे लेख वाचुन माझी लाईन चुकली का काय वाटायला लागलंय. सॉफ्टवेअर मध्ये असलं थ्रिलिंग का ही ही नसतं ! नेहमीसारखाच खुसखुशीत लेख :) पुढचा भाग लवकर टाका हो लाईट वाल्या बाई.

In reply to by स्रुजा

म्हणजे माझ्या आजुबाजुला कुणी वीज चोरत असेल तर आमच्या लायनीचं जास्त शेडिंग करणार?
होssय ! असंच आहे. :) ते अशासाठी की लोकांनीच वीज-चोरीला पायबंद घालावा.

In reply to by सस्नेह

ज्या वाहिनीवर गळती जास्त आहे , त्या उपविभागातील सर्व कर्मचारीनच्या पगारातून गळतीमुळे होणार्या नुकसानीचा काही भाग वसूल केला पाहिजे. कारण त्यांचाही अप्रत्यक्ष आशीर्वाद असतो .

चिंधीचोर हे! आकडे टाकून मोठमोठ्या चोर्‍या पण करतात ना काहीलोक!

In reply to by सस्नेह

हे प्रकार उत्तर प्रदेशात/ बिहारमध्ये सर्रास चालतात. मोरादाबादला एका मित्राने आपल्या दुस-या स्थानिक मित्राची ओळख अशीच करुन दिल्यावर मला पहिल्यांदा समजलंच नव्हतं. मला तो रीतसर वायरमन वाटला होता. पण त्याचा एकंदरीत थाट पाहिल्यावर समजलं.

खरं गरिब लोक इमानदारीने येईल ते बील भरतात पण हे श्रीमंत लोकच आकडा टाकुन लाईट घे कधी, मीटर मध्ये गडबड कर असे प्रकार सर्रास करतात. खरं तर वीज चोरीची खबर जो वीजमंडळाला देईल त्याला बीलाची १० रक्कम बक्षिस दिली जाईल असा नियम आहे पण या बड्या धेंड्याविरुध्द तक्रार कोण करणार. शिवाय मंडळाचे लोकही सामिल असतात म्हणजे झालंच आपलाच जीव धोक्यात.

खरं तर वीज चोरीची खबर जो वीजमंडळाला देईल त्याला बीलाची १० रक्कम बक्षिस दिली जाईल असा नियम आहे
खरंच हे माहीत नव्हतं, शाळेत असताना अशी छेडछाड केलेली अनेक मिटर मला माहीत होती, पॉकेटमनी नक्कीच सुटला असता. मिटरच्या काचेच्या फटीतून मोटर वाईंडींगचा पेपर सरकवून मिटरच्या फिरणार्‍या चाकाला अडथळा येऊन ते फिरायचे थांबायचे. रिडींगच् तारखेच्या ५-६ दिवस अगोदर तो कागद काढून टाकला की पुन्हा मिटर चालू. असे प्रकार करणारे मला माहीत होते.

In reply to by मार्मिक गोडसे

आमच्या गावी एक्स-रे शिट चा तुकडा वापरायचे मीटर च्या व्हील ला थांबविण्यासाठी. परंतु आता सगळे मीटर घराबाहेर काढलेत तसेच सगळे मीटर नवीन आहेत म्हणून चोरीचे प्रमाण कमी झाले आहे.

In reply to by सस्नेह

आमच्याकडे आता इलेक्ट्रोमेकॅनिकल आयआरने रिप्लेस होतायत. जे संशयित कंझुमर आहेत त्यांचे जुने मिटर बदल्यावर ते त्यांच्यासमोर सिल करून टेसटींगला पाठवत आहेत. त्यात काही गैर आढळल्यास रिकव्हरी निघू शकेल.

वाचतोय किस्से छानच. पण, माझा एमएस्सीवर लै राग. सालं अंदाजपंचे बील मारत गेले ते रीडींग नेणारे आणि एकदा टोटल ३५ ह्जार रिकव्हरी काढली. :( बरं.... आम्ही इमानदार लोक बील भरतो म्हणून आमच्या मागे लागतात. आणि जिथे सर्रास चोरी होते त्या भागात हिम्मत नाही या पथकांची जाण्याची. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं अंदाजपंचे बील मारत गेले ते रीडींग नेणारे
असाच अनुभव आहे. :( बरे ऑफिसात जाऊन तक्रार करावी तर कोणी हजर नसते ऑफिसात वेळेवर.

In reply to by यशोधरा

यशो, महावितरणचे नवीन मोबाईल अ‍ॅप डालो करून कम्प्लेंटस, चुकीचे रीडिंग, हे सगळे ऑनलाईन करता येते. http://www.mahadiscom.in/mobile_app/msedcl_mobile_app.php

. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे
=)))) मिटररिडिंग ऐवजी कुत्राचा फोटो छापल्याचे एक बिल मध्यंतरी पाहीले .

In reply to by मितभाषी

=)) आमच्या बिलावर एकदा बंद फाटकाचा फोटो आला होता. ;)

अ‍ॅलिस्टर मक्लिनच्या " पॉवर लोड " कादंबरीत एक ठिकाणी असा प्रसंग लिहिला आहे . नायिका बाहेर गावाहून घरी परत येते . तिच्या घरी वीज पुरवठा बंद आहे हे तिला माहीत असते. म्हणुन घरी येण्यापुर्वी, ती वीज कंपनीच्या कार्यालयातुन १० युनिट चे कार्ड खरेदी करते आणि घरात शिरण्यापूर्वी, एका यंत्रामध्ये ते कार्ड सरकवते. घरातील दिवे व पंखे सुरु होतात. १० युनिट एव्हढी वीज वापरून झाली की वीज आपोआप बंद . मोबाइलच्या रीचार्ज सारखी पद्धत. बॅलन्स आहे तर बोला ,नाहीतर ' बोंबलत बसा " हा फंडा वीज मंडळाने वापरण्यास काय हरकत आहे ? बनावट कार्डे तयार करण्याची शक्यता आहे , पण त्यावरही काहीतरी तोडगा निघेलच की.

भारी किस्से आहेत. पण सरांप्रमाणेच आमचाही एमेसीबीवर राग आहे. अंदाजपंचे बील ठोकतात

चांगलंय. पण मुंब्र्यासारख्या ठीकाणी वीज बील भरत नाहीत त्याचे काय करतात्/करणार? लै दादागीरी चालते तीकडे शांतीप्रीय लोकांची. आणि त्यांच्यामुळे आख्खे कळवा परीमंड्ळ बदनाम होउन र्‍हायले...

भारी किस्से आहेत.. मला नेहमीच प्रश्न पडत आलाय.. गल्ली-बोळात होणारे..वर्षभर होणारे उत्सव ह्यांना कोण विज पुरवठा करतं? १० दिवस, ९ दिवस, आठवडाभर चालणारे उत्सव तर मस्त आरामात पार पडताना दिसतात. त्यांना कोण व कशी परवानगी देतं? (विषयांतर वाटत असेल तऱ क्षमस्व) कोणाचाच कोणाला धाक नसतो हे तर माहिती आहेच, पण नेत्रदिपक रोषणाई पाहुन मन विष्षण होतं हे खरं. ह्या मंडळअंकडे अमुक इतकी विज वापरा बाबत परवाने असतात का? नाहितर ती सरळ सरळ चोरीच नाहि का? पुभाप्र.. --मयुरा.

In reply to by मयुरा गुप्ते

उत्सवांसाठी तात्पुरता मीटर घ्यावा लागतो वीज मंडळाकडून. पण उत्सव मंडळे कुठून वीज घेतात ते आपण जाणतोच...

काही भागात एमेशिबिला गुंडाळून ठेवतात अजूनही.नगरसेवक,आमदार,खासदार यांना बोलावतात साधे विनातिकीट पकडले तरी. एका गावात घराघरात गणपतीचं डेकरेशन केलेले असते.चलचित्रे असतात.लाइट गेली की शिव्या देतात एमेशिबिला.सगळ्यांनी आकडे टाकून वीज घेतलेली.

भारी किस्से ! अश्या अनेक क्लुप्त्या करून लोक महाडिस्कॉमला चुना लावतात आणि "वीजगळती"मुळे वाढलेल्या दरांचा फटका इमाने इतबारे बिल भरणार्‍या प्रामाणिक ग्राहकांना सोसावा लागतो.

किस्से भारी आहेत. अजून सगळीकडचे जुने मीटर बदलले नाहीत वाटतं.

भारतात तीन लाख "कोटी" रुपयांची बिले थकीत आहेत. म्हणजेच माणशी २४०० रुपये आणि घरटी १० हजार. हे पैसे "जर भरले गेले तर" "अच्छे दिन" फार दूर नाहीत. पूर्णपणे वाचावा असा सुंदर लेख. http://prashantkarhade.com/power-theft-in-india/

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा "अच्छे दिन" वर मोदी साहेबांचीच मक्तेदारी आहे का? सामान्य माणसांनी जर विजेची बिले भरायला सुरुवात केली( आणि इतर नागरी कर्तव्ये) तर भारताचा विकास दूर नाही. विकास म्हणजे फक्त चार पैसे जास्त मिळवणे नव्हे विकासाला अच्छे दिन म्हणालो तर लगेच आपले १५ लाख आले का? तो लेख आपण नीट वाचून पहा एवढीच विनंती.

In reply to by सुबोध खरे

अतिशय उत्तम लेख आहे. माझे एक वरिष्ठ सवलत मागणाऱ्या ग्राहकांना एक उदाहरण नेहमी देतात. 'तुम्ही मोबाईल वापरता, बिल आधी भरता. एस.टी/रेल्वेने प्रवास करता, तिकीट आधी काढता. वीज महिनाभर वापरता, त्याचे बिल पुढे पंधरा दिवसांनी येते, त्यातसुद्धा सवलत मागता ?' विजेच्या बाबतीत 'अतिपरिचयात अवज्ञा' असे निदान महाराष्ट्रात तरी चित्र दिसते.

In reply to by सस्नेह

आम्ही देयक महिन्या नंतर भरतो म्हणूनच महावितरण किमान एक महिन्याच्या वापर एवढी सुरक्षा ठेव घेते. रेल्वे तिकीट /भ्रमणध्वनी साठी ही सुरक्षा ठेव देत नाही , यात वितरण कंपनी काही उपकार करत नाही .

मनमानी कारभार चालु आहे यांचा... कोणतेही नियंत्रण नाही की कसले तपासनी नाही.. मुळात यांना महाराष्ट्र मधे कोण स्पर्धक नाही याचाच गैर फ़ायदा घेतय... महावितरण

मी गावी गेलो होतो , तेथे एका बाबाचा , सात दिवस एकाच जागी , उभे रहाण्याचा कार्यक्रम सुरु होता . मोट्ठा शामियाना, भरपूर लाईटिंग, मोठे फोकस, मात्र ह्या साठी , वीज पुरवठा ,माझ्याच घराजवळील , वीजेच्या खांबावरून , जाड जाड केबलचे आकडे टाकून , विना मीटर , सुरु होता. पुतण्याला विचारले कि हे असे उघड उघड कसे चालते ? ह्या वीज चोरीचे काय ? त्यावर त्याचे म्हणणे , " समोर दिसतो आहे ,त्या ट्रान्स्फोर्मरवर मीटर लावलेले आहे, त्याच्यावरून वीजपुरवठा केलेल्या सर्व घरांच्या बिलात , ह्या ज्यादा वापरलेल्या विजेची आकारणी केली जाईल. म्हणजे सार्वजनिक उपक्रमाचा असा प्रामाणिक ग्राहकांना फटका !

एका वायरमने एका अडानी मुलीवर प्रेम केल.. त्याने तिला "एक लव्ह लेटर" दिल आनि त्या येडीने तिच्या बापाला दिल आनि म्हनाली.. आबाव "लाइट बील" आलय .

चांगला व माहितीपूर्ण लेख. आमच्या बिल्डींगमधल्या एका कुटुंबाने त्यांची केबल आमच्या मीटरमध्ये घुसवून ठेवल्यामुळे कित्येक महिने आम्हाला पाच-सहाशे रुपये जास्त बिल आले. उघडकीला आल्यावरही त्यांनी थोडीसुद्धा भरपाई दिली नाही. :(

मी पण ऊर्जा क्षेत्रात काम करत असल्याने वाचायला मजा आली...! पुढील भागाच्या प्रतीक्षेत. मिपा वर समदुःखी पण आहेत म्हणायचं तर!:)

ताई, वीजचोरी बद्दल जशी माहिती दिली तशीच आम्हा ग्राहकांच्या खिशातून एमएसइबी करत असलेल्या चोरीवर प्रकाश टाकाल जरा? मी वसईत राहतो आणि हे बिल्डींग्स काँम्प्लेक्स असल्याने इथे 'तारेवर आकडा टाकणे' वैगरे प्रकार होत नाही. पण अधून मधून वीज महामंडळ ७०-८०% ने वाढीव बील पाठवून सर्वांना 'शाॅक' देत असते. आठ दिवसांपुर्वी एका राजकिय पक्षाने बँनरबाजी करत मोर्चासुद्धा काढला होता. पण त्याने येत्या वीजबीलात काही चमत्कार घडेल अशी शक्यता फार कमी आहे. सोसायटीत एमएसइबीचा मीटर रिडींग घेणार्‍याने सुद्धा आमचे रिडींग जवळपास १०० युनिटने जास्त आले आहे असे (आॅफ द रेकाॅर्ड) सांगितले. नालासोपारा पुर्वेला अनधिकृत परप्रांतिय वस्तीमध्ये आकडा टाकून भरमसाठ वीज चोरी होते. कदाचित काहि कारणास्तव महामंडळाला तिथून वसूली आणि कारवाई करता येत नसल्याने जे लोक नियमितपणे वीजबील भरतात तिथून आपली नुकसान भरपाई करून घेतात. महिन्याची आर्थिक घडी बिघडविणार्‍या बिलाचे जाउद्या पण मेंदूचा 'फ्यूज' तेव्हा उडतो जेव्हा सोसायटीतील एखादी अमराठी व्यक्ति 'महाराष्ट्र' या शब्दावर जोर देत म्हणते "ये माराष्ट्र बोर्ड ना एक नम्बर का चोर है।" यावर कुठची भुमिका घ्यावी काय प्रत्युतर द्यावे ते कळत नाही.

In reply to by ससन्दीप

आपले वीज बिल जास्त आले असे वाटले तर तुम्ही खालील चेक करू शकता. १. बिलावरील फोटोतील रीडिंग आणि घरातील मीटरचे रीडिंग पडताळून पाहणे. २. बिलावर सहा महिन्याची बिल हिस्ट्री असते त्यानुसार महिन्याचे अ‍ॅव्हरेज कन्झम्प्शन बरोबर आहे का ते पाहणे. ३. घरात कुठे लिकेज आहे का हे पाहणे. ४. त्या महिन्यात वीज दर वाढलेले आहेत का हे पाहणे. हे सगळे बरोबर असेल तर मीटरबद्दल तक्रार नोंदवू शकता. वर प्रतिसादातील मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केलेत तर घरबसल्या हे करू शकता. याउपरही समाधान झाले नाही तर बिलावर पत्ता असतो त्या कार्यालयात जाऊन सक्षम अधिकाऱ्यास भेटा. खालच्या कर्मचाऱ्यांना बरेचदा वस्तुस्थिती व्यवस्थित सांगता येत नाही अथवा अधिकार नसतात. महावितरण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तथापि वाढत्या ग्राहक संख्येमुळे बरेचदा तक्रारींचे नियोजन वेळेत होत नाही.

In reply to by सस्नेह

मुंबई वगळता महाराष्ट्रात महावितरण ही एकमेव वितरण कंपनी आहे.तिची एकाधिकारशाही कमी करण्यासाठी एकपेक्षा जास्त कंपन्यांना वितरण परवाना दिला पाहिजे. म्हणजे यांचे दर स्पर्धात्मक पातळीवर येतील .

In reply to by एस

वायर्स/ उपकरणे जुनी झालेली असतील किंवा अर्थिंग व्यवस्थित नसेल तर अशा प्रणालीमध्ये नॉर्मलपेक्षा जादा वीज खर्च होते. त्याला लीकेज समजतात.

In reply to by एस

विजेचं मीटर फिरतं त्याला साधारणपणे दोन कारणं असू शकतात. एकतर घरात स्टँडबाय मोडवरती असलेली बरीच उपकरणी वापरात आहेत किंवा/आणि विजेची गळती आहे. जेंव्हा आपण रिमोटवरती चालणारी साधने बंद करतो तेव्हा ती स्टँडबाय मोडवरती जातात. त्या अवस्थेत ती वीज खर्च करत असतात. त्याशिवाय खराब उपकरणे किंवा खराब/चुकीचे वायरिंग दोन्हीमुळे गळती होते. ही दुसर्‍याप्रकारची गळती धोकादायक ठरु शकते. उपकरणातले वायरिंग खराब झाले असेल तर विजेचा धक्का बसू शकतो. त्यामुळे गळती शोधणे आणि आटोक्यात आणणे गरजेचे असते.

In reply to by चतुरंग

स्टँडबाय मोड वरती वीज खर्च - बरीच आधुनिक उपकरणे जसे कि LED TV , होम थिएटर ऍम्प्लिफायर , होम ऑटोमेशन ची उपकरणे स्टँडबाय मोड मध्ये अतिशय कमी वीज खर्च करतात , आणि ते बहुदा माहितीपत्रकात दिले असते . कारण अनेकदा परस्परावलंबी उपकरणे हे स्टॅन्डबी मोडे माधेयच ठेवावी लागतात .. तसेच काही उपकरणे आता 24 X 7 चालू ठेवावी लागतात , जसे कि वायफाय रूटर , NAS इ ...

In reply to by शलभ

घरातील सर्व दिवे होल्डर मधून काढायचे, सिलिग पंख्याची वायर सोडवावी .इतर उपकरणाची पिन काढून ठेवावी व सर्व बटणे सुरु करून मीटर bilinking होते का ते पाहावे.गरज भासल्यास परवानाधारक ठेकेदारा कडून घरातील वायारिग चे insulation resistancce तपासून घ्यावेत.

In reply to by मार्मिक गोडसे

१. बिलावरील फोटोतील रीडिंग आणि घरातील मीटरचे रीडिंग पडताळून पाहणे.
दोन वर्षापूर्वी घराचे असेच चुकीचे ज्यादा बिल आले होते, बिलावरील फोटोतील आकडे व वापरलेले युनीटमध्ये बराच फरक होता. तक्रार केल्यानंतर तासाभरात वीजमंडळाची माणसे आली, एका कोर्‍या कागदावर मीटर क्रमांक व मीटर रिडींग लिहून त्यावर आमची सही घेतली व मीटरसमोर तो कागद धरून फोटो काढला. पुढच्या महिन्याचे बिल फरक वजा करून आले.

आत आल्यावर फारच भौतिक प्रश्नाला हात घातलेला दिसला. बाकी चोरीची एक मजा असते. जर पाकिटमारी गुन्हा असेल तर त्याची तक्रार करता येते. चोराला शिक्षा करता येते. मात्र समजा जर अधिकृतरीत्या कायदेशीररीत्या कायदा करुन कलम लावुन मग खिसा कापला तर तो कापु दिला नाही यासाठीच उलट शिक्षा होते. खासगी कंपन्याच्या स्ववापरासाठी च्या कॅप्टीव्ह पॉवर प्लान्ट ला एकीकडे वीज शुल्क लावण्याइतपत एमएसइबी कमाल करु शकते. दुसरीकडे फुकट पंप मिळाला हो चा जल्लोष आवाज वाढवतो. मजा आहे कायदेशीर पाकीटमारीची. शिवाय पाकीटमारांची फिलॉसॉफीपण असते. ती एक आणखीन गंमत

कटियाबाज म्हणून एक डाकुमेंट्री कम सिनेमा आहे. उत्तर प्रदेशातल्या वीज चोरीबद्द्ल. त्याची आठवण झाली.

अश्या चोरींची माहिती नव्हती. लवकर टाका पुढचा भाग.