बहुरूपी ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून ऐतिहासिक संदर्भांशी आणि घटनांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे.
पहाट सरत आली होती. पुर्वेला झुंजूमुंजू झालं. दुरवर कुठेतरी टाळांच्या मंजुळ स्वरात वासुदेवाचं गाणं सुरू होतं. कोंबडं आरवलं तशी गोजाई आपल्या गोधडीत उठून बसली. रात्रभर आपल्या धन्याचा विचार करता करता झोप केव्हा लागली तिचं तिलाही कळालं नाही. मग स्वप्नात पण त्याचाच गुलजार मुखडा तिला दिसत राह्यला. तिचा धनी स्वराज्यात महाराजांच्या सेवेला होता. त्या राजावर आणि त्याच्या स्वराज्यावर अख्खा जीव ओवाळून टाकणारा होता.
म्हातारं अजून अंथरूनातच होतं. म्हातारीही उठली तसं तिनं जात्यावर धान दळायला घेतलं.
गोंडा फुटला दिसाचा जसं जास्वंदीचं फूल
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल
धान दळता म्हातारीच्या गोड आवाजात ओव्या सुरू झाल्या. भोवताली असलेल्या झाडांवर पाखरांचा किलबिलाट सुरू झाला होता. शिमग्याची होळी पेटूनही अजून बर्यापैकी थंडी होती. अंगाला बोचणार्या गार वार्याची तमा न बाळगता तपेलं घेवून डोळे चोळत चोळत गोजाईही दुध काढायला गोठ्यात गेली. गाय पिळण्याआधी गोठ्यातलं शेण काढताना रात्री पडलेल्या स्वप्नाच्या तंद्रीत ती हरवून गेली.
''ह्ये दान पावलं, दान पावलं गा.....कोल्हापूरच्या अंबाबाईला''
''ह्ये दान पावलं, दान पावलं गा.....पंढरपूरच्या ईठूबाला''
''ह्ये दान पावलं, दान पावलं गा.....जेजूरीच्या खंडेरायाला''
दारासमोर वासुदेवाचा टाळ वाजू लागला..
"दान दे माये, आई अंबाबाई तुझं कल्याण करील." "माझ्या शिवबाच्या राज्यात तुझं घर सुखाने भरून जाईल."
आवाज ऐकून क्षणभर गोजाई चमकली. तो आवाज फार ओळखीचा, कानात नेहमी रूंजी घालणारा वाटत होता. म्हातारीनं सुपात धान घेतलं न ती दरवाज्यात येवून उभी राह्यली. तोपर्यंत गोठ्यातून गोजाईही अंगणाकडे धावली. धावत येणार्या गोजाईला पाहत चेहर्यावर मिष्किल भाव असणार्या त्या वासूदेवाने हातातली झोळी म्हातारीसमोर धरली. लटपटत्या हाताने म्हातारी सुपातलं धान झोळीत टाकण्यात मग्न झाली. तोवर तिथे पोचलेल्या गोजाईने डोईवरचा पदर सारखा करून खाली वाकत वासूदेवाच्या पायांना स्पर्श केला. वासूदेवाला पाहतानाच तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आणि नजरेत खट्याळ भाव उमटले.
वासूदेव मात्र गालातल्या गालात हसत होता. मग सावकाश डोईवरचा मोरपंखी टोप काढून त्याने तो गोजाईकडे दिला. हातातली झोळी एका बाजूला ठेवली आणि म्हातारीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला.
"अरं..अरं, माह्या पाया का पडतूस लेकरा?"म्हातारीनं दोन्ही हातांनी धरत त्याला वर उठवलं. नीट निरखून पाहताच म्हातारीच्या चेहर्यावर आनंद पसरला. हर्षोल्लासाने म्हातार्याला ओरडून म्हातारी म्हणाली
"अवो! अईकलं का? उटा आता. बघा, माव्हं लेकरू किती दिसांनी घरला परतलंय."
गोजाई माय-लेकराचा हा आनंदसोहळा पाहत बाजूला गुमान उभी होती आणि आनंदाने तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळत होते. बर्याच दिवसांनी तिचं कुंकू घरी परतत होतं. घरातल्या सगळ्यांना अतीव आनंद झाला होता. म्हातारीला तर त्याला कुठं ठेवू न कुठं नको असं झालं होतं.
"आज कशी काय आमची आटवन आली म्हनं.?" रात्री बहिर्जीच्या कुशीत शिरता शिरता गोजाई लाडीकपणे तक्रारीच्या सुरात बोलली.
"आजंच का म्हनं." "आमाला रोजच तुमची आटवन येत असती, पर तुज्याशी लगीन लागायच्या आदीच माजं या सोराज्याशी लगीन लागल्यालं हाय!"
"ते तसं लागलं का असंना, पर कवातरी यखांद्या येळेला घरलाबी येत जावा की. हे आसं कितेक दिस याचंच न्हाई म्हनल्यावर कसं व्हायाचं?" आताशा गोजाऊ थोड्या दु:खी स्वरातच बोलू लागली होती. आणि तिच्या बोलण्यातली आर्तता कळून मग बहिर्जी महाराजांनी गाजवलेल्या पराक्रमाविषयी तिला सांगू लागला.
"परतापगडाच्या पायथ्याला त्या अफजुल्याला धुळीला मिळवला तवा आमा समद्यांच्या मनावरचं लई मोट्टं ओझं उतरलं बग."
"अफजुल्या धुळीला मिळाला. त्यानं आनलेलं अमाप घोडदळ, हत्तीदळ, बाडबिछायत हे समदं सोराज्याची धन झाली."
"पर या समद्यात त्याच्या बेट्याला फाजल खानाला मातुर पळून जान्यात येस आलं."
"बर या यवढ्या मोठ्या अवघाड कामगिरीनंतर आराम करत बसतील तर ते राजं कसलं. दुसर्याद दिसापासून त्यांनी आदीलशाहीतले गडकोट किल्ले सोराज्यात सामील करून घ्याची मोहीम उघाडली."
विस्फारल्या नेत्रांनी आपल्या धन्याच्या तोंडून महाराजांचा पराक्रम ऐकताना गोजाई फार आश्चर्यचकीत झाली होती. मग महाराजांनी प्रतापगड जिंकल्यानंतर तिथून पुढचे सलग काही दिवस आदिलशाहीतल्या बहूसंख्य गड-किल्ल्यांवर चढाई करत ते स्वराज्यात सामील करून घेतले. त्यानंतर करवीरच्या अंबाबाईचा आशिर्वाद घेत फारशी लढाई न करता पन्हाळ्यासारखा बलाढ्य किल्लाही ताब्यात घेतला. अत्यंत रोमहर्षकपणे आणि अभिमानाने या सगळ्या गोष्टी आपल्या बायकोला सांगताना बहिर्जी पुढे बोलू लागला.
"आता काही दिसांनी चैत लागंल, तवा पाडव्याला जरा घरला जाऊन ये आसं महाराजांनी फरमावलं तवा लगोलग इकडं आलो."
शेवटचे दोन चार शब्द ओझरते कानावर पडले तेव्हा गोजाई गाढ झोपी गेली होती अन् तिच्याकडे पाहून मंद स्मित करत बहिर्जीही झोपायच्या तयारीला लागला खरा, पण पूर्वेकडून हरकार्यांनी आणलेली गुप्त खबर त्याला काही केल्या झोपू देत नव्हती.
*******************************************************************
निष्पर्ण झाडांना पालवी देऊन चैत्र सरला होता. वैशाखातलं ऊन मी म्हणत होतं. ऊन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेलं सिद्दी जौहरचं सारं सैन्य शिवाजी लवकर पकडला जावा म्हणून अल्लाकडे दुवा मागत होतं. आणि त्याला कारणही तसंच होतं. पन्हाळ्याला वेढा घालून बरेच दिवस होत आले होते, पण तरीही तो बदमाश सिवा काही शरण यायचं नाव घेत नव्हता. केवढी ती त्याची चिकाटी !!
त्यात स्वतः सिद्दी जौहर म्हणजे या खुदा !! अतिशय कडक शिस्तीचा माणूस. सैन्यातली बेशिस्ती त्याला बिलकुल खपत नसे हे त्याच्या सैन्याला चांगलं ठाऊक होतं, त्यामुळे सिवा कधी पकडला जातोय याची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. स्वतःच्या सामर्थ्यावर प्रचंड विश्वास असणारा आणि हट्टाला पेटलेला सिद्दी जौहर सिवाला गर्देस मिळवून विजापुरी दरबारात बड्या बेगमेसमोर घेतलेली कसम पूर्ण करणार होता.
"शहाजीके उस बदतमीज लडकेको पकडकर जिंदा या मुर्दा पेश करूंगा राणीसाहेबाकी खिदमतमें."
मुख्य शामियान्यात सिद्दीसह, रूस्तम-ए-जमाँ, सिद्दी मसूद, फाझल खान विचारमग्न स्थितीत बसले होते. त्यातला फाझल खान हा अफझल खानाचा मुलगा. महाराजांच्या खानावरील हल्ल्याच्या वेळी त्याला कसबसं पळून जाण्यात यश मिळालं होतं. बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्दीसोबत तो परत आला होता. आपल्या सैन्यात असलेल्या तोफा लांब पल्ल्याच्या नाहीत हे सिद्दी जाणून होता, म्हणून टोपीकर इंग्रजांना गुप्तपणे खलिता पाठवून त्यांची मदत त्याने मागितली होती आणि त्याच खलित्याचे आलेले सकारात्मक उत्तर पाहून सगळ्यांना आनंद झाला होता.
दहा हजारांच्या प्रचंड सैन्यानिशी सिद्दीने घातलेला वेढा शिवाजीला काही फोडता यायचा नाही. करकचून आवळलेल्या वेढ्याने गडावर पोचणारी रसदही बंद झाली होती आणि गडावर शिल्लक असलेल्या रसदेवर शिवाजी काही फार दिवस टिकू शकणार नाही. एक ना एक दिवस त्याला सिद्दीसमोर शरण यावेच लागेल अशी अटकळ बांधून दगाबाज टोपीकर इंग्रज महाराजांना दिलेले वचन मोडून सिद्दी जौहरला मदत करायला तयार झाले होते.
"अल्ला-हु-अकबर!! ऐ खुदावंत बादशाह, परवरदिगार आपकी हर मुरादे पुरी करेगा." कडक पहारे असणार्या त्या शामियान्याबाहेर झोळी घेतलेला एक फकीर मोठ्याने ओरडत होता.
आवाजाने दचकलेल्या सिद्दीने त्या फकीराला आत घेऊन येण्याची आपल्या हशमाला आज्ञा दिली.
"कौऽऽन हो तूम? कही सिवाके हेजीब तो नही..?" डोळ्यात सुरमा घातलेली सिद्दीची वेधक नजर त्या फकीरावर रोखली गेली.
"तौबा! तौबा!! जहापनाह, हमने तो आजतक उस सिवा के बच्चे को देखा तक नही. हम कहासे उसके हेजीब होंगे?"
"तो फिर कौन हो तूम?"
"आपने शायद हमें पहचाना नहीं"
"ख्वाजा हजरत सय्यद बाबाके दरगाहपर रहते है, और वहीपर आपसे मुलाकात हुई थी."
"अच्छा...अच्छा. याद आया." थोडावेळ विचारात पडलेला सिद्दी अचानक काही आठवून तडक आपल्या आसनावरून उठता झाला. जवळ येऊन त्याने त्या फकीराच्या उजव्या हाताचे चुंबन घेतले. फकीरानेही त्याच्यासोबत शामियान्यातल्या इतरांना आळीपाळीने आशिर्वाद दिला.
"बाबा, इतने दूर यहा कैसे आ गये आप?"
"हम फकीर है बेटा. एक जगह नही रूका करते. तुमे यहाँ आगाह करने आये थे."
"........."
"नही समझे? तो सुनो !!"
"वो सिवा तुम समझते हो उतना सीधा नही है. बहोतसी काली जादुए उसे आती है. पलमें यहाँ दिखे तो दुसरे पल गायब होकर और कही दिखे."
"किसी भी आदमी का रूप लेकर सामने आ सकता है."
"बडा मायावी है. उससे बचके रहना"
"बाकी अल्ला आपको हमेशा बरकत दे."
फकिराच्या या वाक्यांनी शामियान्यातल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द सिद्दीचा चेहराही फकीराच्या या आगाह करण्याने पडला. इंग्रजांनी पाठवलेल्या मदतीच्या खलित्याने मिळालेल्या आनंदावर फकिराने सांगितलेल्या वाक्यांनी विरजन पडले. जो तो एकमेकांच्या चेहर्याकडे पाहू लागला आणि इकडे तो फकिर जसा आला तसाच निघूनही गेला. खबर कानोकानी पोचायला वेळ लागला नाही आणि कडक पहार्याच्या सिद्दीच्या आदिलशाही सैन्यात वेगवेगळ्या चर्चांनी जोर पकडला आणि पुढे काय होणार याची धास्ती प्रत्येकाला लागली.
पश्चिमेला सूर्य अस्ताला चालला होता. दिवस आणि रात्रीला दुभागणार्या त्या कातरवेळी संपूर्ण छावणीत एक भकासपण भरून राह्यले.
...आणि कोकीळेची एक गुढ शिळ आसपासच्या रानात घुमू लागली.
क्रमश:
वाचने
11794
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतोय, ...
सुंदर.
अतिशय सुंदर लिहिताय.
मस्त आहे. एका भागातच एकदम
अले वा किश्णु आला
भले व्वा! खौट मेंला.
In reply to अले वा किश्णु आला by स्पा
मस्त लिहिलंय!
वाचतांय!!
मस्त लिखाण
पुढचा भाग
झक्कास जमलाय हा भाग
छान जमलंय. येऊ द्या पुढचे भाग
+१११११ असेच म्हणतो
In reply to छान जमलंय. येऊ द्या पुढचे भाग by अभ्या..
दमदार सुरुवात आणि रोचक कथानक
+१
In reply to दमदार सुरुवात आणि रोचक कथानक by सस्नेह
मस्तच
मस्तच
पुभाप्र :)
पुभाप्र
जबरदस्त..अस काही वाचायला
+१००
In reply to जबरदस्त..अस काही वाचायला by जेपी
वाचतोय
खूप छान मालिका वाचायला मिळणार
In reply to वाचतोय by खटपट्या
वाचतांव हां! पुभाप्र!
फळीफोड लिहिलंय! पुभाप्र.
छान
क्या बात ! पहिल्याच भागात
+१००००००
In reply to क्या बात ! पहिल्याच भागात by स्रुजा
आवडले
हय हय! जब्राट!
किसनदेवा.. दंडवत घे रे देवा..
दमदार सुरुवात.झटपट येऊ द्या
खूप सुंदर... खूप आवडलं..
वाचतेय..पुभाप्र.
अप्रतिम लिहिलंय
भारीच सुरुवात झालीये !
मस्त जमलंय.. पुढचा भाग
जबरा लिहिलेय ! वाचताना प्रसंग
भारी रे
ओघवते लेखन.
+१११
In reply to ओघवते लेखन. by आतिवास
क्रमशः खुपच लवकर आले. :(
खूपच सुंदर लिहिलंय.
नवीन माहिती धन्यवाद
In reply to खूपच सुंदर लिहिलंय. by प्रचेतस
होय! प्रतापगड आजही उदयनराजे
In reply to नवीन माहिती धन्यवाद by रुस्तम
आणी थोडे दखनी भाषेच्या
In reply to खूपच सुंदर लिहिलंय. by प्रचेतस
सुचनेबद्दल धन्यवाद वल्ली सर.
In reply to खूपच सुंदर लिहिलंय. by प्रचेतस
गोष्ट आवडली..
सुरेख!!!
फारच रोचक!
जबरी
//ऐतीहासीक अभिनिवेशाने भारून
In reply to जबरी by स्वच्छंदी_मनोज
अर्रर्र
In reply to //ऐतीहासीक अभिनिवेशाने भारून by जयंत कुलकर्णी
पुभाप्र
आता एखादं समर्पक चित्र येऊ
आमचा चित्रकार सध्या गडबडीत
In reply to आता एखादं समर्पक चित्र येऊ by कंजूस
जबरा सुरुवात, पुढचा भाग लवकर येऊ द्या
सुरेख चित्रण केलय.उत्सुकता
सुरेख चित्रण केलय.उत्सुकता
सुरेख चित्रण केलय.उत्सुकता
एक . दोन . तीन.
In reply to सुरेख चित्रण केलय.उत्सुकता by इशा१२३
१ प्लस
In reply to सुरेख चित्रण केलय.उत्सुकता by इशा१२३
वा वा. किसनदेव प्रकटले..
जबरदस्त सुरुवात....
पु.भा.प्र.
मस्त
मस्त सुरुवात! पु भा प्र.
आज वाचली!!!
मस्त जमलीय
दुर्दैवाने बहिर्जी
In reply to मस्त जमलीय by रंगासेठ