Skip to main content

घरातल्या गोष्टी-उपयुक्तता की अडगळ ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 22/07/2016 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही.... घरातला पसारा ! दर्शनीय खोली स्वच्छ ठेवून इतर खोल्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेलं असतं.... हल्ली बऱ्याच घरांमध्ये गरजेच्या नावाखाली भरमसाठ गोष्टींची खरेदी झालेली असते भले त्या उपयुक्त असोत अथवा नसोत.... दिसताक्षणीच गोळ्या घालण्याच्या आदेशासारखं दिसताक्षणी विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. मग ह्या सगळ्या स्वकष्टार्जित कमाईने जमा केलेल्या गोष्टी घरातली धूळ चवीने खाऊ लागतात. बरं , ज्याने आणलंय त्यांचं मनही मोडवत नाही पण तरीही हळूहळू घरातल्या कानाकोपऱ्यात एक एक करून अनावश्यक वस्तू साठत जातात आणि घराला अडगळीच्या खोलीचे रूप प्राप्त होते. मग सणावाराला आधी साफसफाई मोहीम उघडली जाते .... मुळात माणसाला इतक्या गोष्टींचा हव्यास असतोच का? आपल्या मानसिकतेचा नियम हेच सांगतो की जोपर्यन्त एखादी गोष्ट आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंतच आपल्याला तिचे आकर्षण असते... एकदा का ती आपल्या ताब्यात आली कि तिच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही आणि हे सरसकट सगळ्यांनाच लागू आहे. घरातला स्त्रीवर्ग विशेषतः ज्या गोष्टीत विशेष अडकलेला असतो ते म्हणजे जुने कपडे, भांडी, प्लास्टिकचे पदार्थ/पिशव्या आणि इतर भंगार सामान ! कधीतरी लागेल म्हणून वर्षानुवर्षे ती गोष्ट जीवापाड जपून ठेवायची ( विशेष म्हणजे ती कधीही "लागत" नाही)...या संदर्भातच मला काही प्रश्न पडले आहेत ते असे - १) अशा जपून ठेवलेल्या गोष्टी नक्की काय आणि कधी कामाला येतात ? २) घर सफाई मोहिमेत मध्येच घुसून घराबाहेर काढायच्या ठेवलेल्या वस्तूंवर आक्रमण करून सुरतेची लूट असल्यासारखे परत सगळे पदार्थ घराच्या आत का जातात? मग सफाई मोहिमेचे उद्दिष्ट काय असते ? फक्त धूळ हटवणे ? ३) एखादी गोष्ट आपल्याकडे होती पण आपण तिचा वापर केला नाही याची रुखरुख नेमकी किती दिवस टिकू शकते ? ४) आपले सामान ३ बीएचकेचे असून आपण १ बीएचकेमध्येच राहतो हे सत्य त्या कधी स्वीकारतात ? ५) सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अश्या गोष्टींना ज्याला बोलीभाषेत अडगळ म्हणतात त्याच्याशी भावनिक नातं असणं म्हणजे नक्की काय?

वाचने 15586
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

बाई, बाई, बाई माझ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या. (आवरायच्या दिवशी) . . . . आल्या की नाही बघ कामाला. तरी सांगत होते. (चारच दिवसानी)

अजिबात कामाला न येणाऱ्या प्रचंड अडगळ असणाऱ्या अनेक गोष्टी घरात केवळ त्यावरून ज्येष्ठांशी तणाव निर्माण होऊ नये म्हणून ठेवल्या जातात बुवा.भयंकर भावना दुखावणारा इश्यू आहे हा ;) - माळ्यावरच्या वाळवी लागून वाया गेलेल्या वह्या असलेल्या गंजक्या ट्रंका, दोनेकशे जुन्या त्यात काही फिती निघालेल्या कॅसेट,एक शंखाच्या कानात शंकर असे फँटँस्टिक काँबो असणारी फुटकी सिरॅमिकची मूर्ती हे फेकुन देता न येणारी अजया!

खरंय. बरेच लोकांना उगाचच्या उगाच खरेदी करण्याची सवय आणि अडगळीचे समान टाकून न देण्याचा खूप मोठा मेण्टल ब्लॉक असतो. ज्या गोष्टींशी खरोखर भावनिक जवळीक असते अशा मोजक्या वस्तू ठेवून बाकीच्या गोष्टी टाकून द्याव्या. एकदा घरातून गेल्या की त्यांची आठवण पण येत नाही नंतर.

क्लटर मॅनेजमेंट हा इतका क्लीष्ट इश्यू आहे की हल्ली सायकीअ‍ॅट्रिस्टकडे पण जावे लागते यावरून लोकांना. क्लटर(अडगळ) गोळा करण्यात माझा हात कुणी धरू शकेल असे वाटत नाही. २०-२५ वर्षांपूर्वीची पत्रे, कपडे, पर्सेस असे काय काय माझ्याकडे कुठेतरी कोंबलेले सापडेल. एखाद्या रवीवारी मूड झाल्यास क्लटर साफ करूया असा विचार येतो. पण फक्त या कप्प्यातल्या गोष्टी त्या कप्प्यात सरकवल्या जातात. ;) कुणीतरी निर्ढावलेले अँटीक्लटर व्यक्तीमत्त्व सोबत असेल आणि क्लटर निर्मूलनाकरिता लागणारा मॉरल सपोर्ट काम पूर्ण होईपर्यंत (म्हणजे ती वस्तू टाकूया म्हणून फक्त बाजूला काढण्यापर्यंत नव्हे तर खरोखरच त्या वस्तूचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत) देणार असेल तरच मोठ्या कष्टाने ५ टक्के अडगळनिर्मूलन करू शकते.

In reply to by साती

तू माझी कुंभमेळ्यात हरवलेली बहीण आहेस!

In reply to by साती

आई शप्पत, कुंभमेळ्यात पण काय अडगळीच्या वस्तू असतात नै ! :-))) कृहघे !

In reply to by चौथा कोनाडा

अय्या, दादू! तू पण कुंभमेळ्याला गेलास तो आत्ता दिसतोयस बघ!

घरातील जी वस्तु सहा महीणे वापरत नाहीत आपण ती माळावर टाका. माळावरील ती वस्तु अजुन सहा महिने वापरात आली नाहीतर भंगारात काढा. एकुणच वर्षभर वापरात नसलेले वस्तु भंगारात काढा.

आमच्या वडिलांचे घर जेंव्हा पुनर्विकासासाठी जाणार होते (२००५) तेंव्हा तेथील सामान हलवण्यासाठी मी होतो. आमच्या माळ्यावर असणारे क्रॉकरीचे चार नवे कोरे सेट्स वडिलांच्या परवानगीने लग्नात आहेर म्हणून मी देऊन टाकले. आजतागायत आमच्या आईला ते देऊन टाकलेले आहेत हे समजलेले नाही. कारण अजून दोन सेट्स नंतर भेट म्हणून आले तेच वापरले जात नाहीत.

अडगळ काय फेकता वस्तुंची फेकायचीच असेल तर वाइट विचारांची अडगळ फेका तेही जमत नसेल तर किमान सुविचार तरी फेका पण काही ना काही फेकाच दावणीला बांधायचाच असला तर मामलेदार पंखा नाय सुविचार बांधा

अमेरिकेला येताना मला माझ्या चार खोल्यांमधलं सामान एकाच खोलीत ठेवुन घर बंद करायचं होतं. तेव्हा लक्षात आलं की किती प्रचंड सामान गोळा झाले आहे. खुप सामान लोकांना देऊन टाकलं. आणि अत्यंत आवश्यक असंच सामान एका रुम मध्ये ठेवलं. ते चक्क मावलं. एक मोठा बेड, कपाट, फ्रिज, वॉशिंग मशिन, कॉम्प्युटर विथ टेबल आणि सगळी भांडी. बास.. इतकंच हवं असतं. बेडच्या स्टोरेज मध्ये अंथरुणं आणि आवश्यक कागदपत्र किंवा काही वस्तु ठेवल्यात. एकाच कपाटात ३ लोकांचे आवश्यक कपडे. मी सांगते काहीही करुन सामान पॅक करायला लागलं की आपोआप वस्तु भंगारात जातात. नाही तरी वर्षानुवर्ष पडुन रहातात. काही गोष्टी फेकवतही नाहीत. जसं की अबीरचे लहानपणीचे कपडे. पण उगाच एका बॅगेत ठेवुन दिले आहेत. त्याचं मी कोलाज सारखं करुन घेणारे. गोधडी सारखं. म्हणजे भिंतीवर लावायचं, त्याच्याच खोलीत! अशाने जागाही वाया जात नाही आणि वस्तु पण जपुन ठेवली जाते. अजयाशी ज्येष्ठांच्या अनुभवाबद्दल सहमत. जुने कपडे लोकांना देऊन टाकुया म्हणलं तर साबांना ते देऊन एक डबा घ्यायचा होता. म्हणलं मग माझ्याकडचे डबे घेऊन जा. मला कुठे आता लागणारेत? तर म्हणे नको ग बाई! आधीच खुप संसार जमलाय, खुप भांडे झालेत. म्हणलं मग कशाला बोहारणी कडुन डबा हवाय? =)) पण जुन्या लोकांना असे कपडे सांभाळत बसायची एक सवय असते. "असु देत, राहु देत, पुसायला वगैरे कामाला येईल. बोहारणीला देऊ.." वगैरे वगैरे करत ४ मोठ्या बॅगा भरुन कपडे जमा झाले. सरळ उचलुन देऊन टाकले. एका सेकंदात किती जागा रिकामी झाली! ह्यावरुन आठवलं की आजकाल चेपुवर मिनिमलॅझम बद्दल खुपच दिसायला लागलय. कमीत कमी वस्तु मध्ये रहायचं. - http://www.theminimalists.com/about/#the_mins लहान लेकरांना घेऊन हे करणं काही शक्य नाही. पण आयडीया उत्तम आहे. महत्वाच्या गोष्टींवर फोकस करा. कचरा फेकुन द्या.

कधीतरी उपयोगाला येईल म्हणुन खुप गोष्टी साठवुन ठेवतो आपण. यामध्ये महिला वर्ग प्रामुख्याने खुप गोष्टींबद्दल भावनीक असतो असे माझे मत.

लेखातले काही मुद्दे पटले. दर्शनीय खोली स्वच्छ ठेवून इतर खोल्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेलं असतं.... >> हे तर सध्या माझ्या घराशी अगदी तंतोतंत जुळत आहे. खरे तर दोन-तीन आठवड्यांत कुणाला तरी जेवायला बोलवावं अशी सध्या मी युक्ती केली आहे, म्हणजे निदान त्यानिमित्ताने तरी घर आवरुन होते. पण स्त्रीवर्ग या गोष्टींत अडकलेला असतो याच्याशी १००% सहमत नाही. घरात वर्षानुवर्षे पडून राहिलेली वस्तू मी घराबाहेर कढली की बरोबर आमच्याकडे नवर्‍याला त्याची गरज पडते. त्या पिशव्यांमध्ये तर माझ्या बाबांचाही फार जीव अडकलेला असतो ;) मध्ये कंपनीतून एक कार्यक्रमासाठी आमची पूर्ण टीम गेली होती. मी सोडून बाकी सगळे पुरुष. तिथे बर्‍याच कंपन्यांचे डेमो होते आणि प्रत्येक स्टॉलला काहीतरी भेटवस्तू. स्टारबक्सच्या गिफ्टकार्डपासून, पेन, बॉल, पिशव्या, कुठला सेमिनार झाला की टी-शर्ट वाटणार, कुठे तर त्या चमकणार्‍या तलवारी. जास्त सामान गोळा झाले की ते सामान ठेवण्यासाठी त्या पिशव्या वाटणार्‍या ठिकाणी जाऊन लोक पिशव्या घेऊन आले. दोनतीन वस्तू हातात आल्यावर आता मी या घरात ठेऊ कुठे म्हणून मी त्या घेणे बंद केले. पण पुरुषवर्गातल्या एकानेही एकही वस्तू सोडली नाही. अतिशय बटबटीत रंग आणि पूर्ण टी-शर्टभर काहीतरी लिहिलेले असले तरी रात्री घालायला कामी येतील म्हणून त्यांनी ते गोळा केले. एकापेक्षा जास्त मुले असणार्‍यांनी मुलांत भांडणे नको म्हणून मागून मागून अजून तलवारी घेतल्या. ५० डॉलर भरुन आलो आहोत तर ते वसूल करायला नकोत का असे प्रत्यक्ष बोलून दाखवून हा धडाका सुरुच होता. यातले काही मर्सिडीज चालवणारे आहेत. इकडे मी मनातल्या मनात घरी गेल्यावर इतका पसारा आणल्याबद्दल यांना त्यांच्या बायकांची किती बोलणी खावी लागतील हा विचार करत होते.

In reply to by कंजूस

खरय. प्रत्येक टाकावू वस्तू वापरात येऊ शकते. घराच्या टेरेसचा ब्रिक बॅट कोबा झाल्यावर ७ दिवस क्युरींगसाठी पाण्याखाली ठेवला होता. कडक उन्हामुळे व पाणी वाचविण्यासाठी पुढील १५ दिवस घरातील जुन्या सतरंज्या,कॉटनच्या साड्या, फाटक्या बनियन व टॉवेल टेरेसवर पसरवून दर ३ -४ तासांनी पाणी शिंपडून कोबा थंड ठेवला. काही कपडे सडून खराब झाले, चांगले कपडे परत घड्या करून गाठोड्यात ठेवले.

भांडी आणी अगदी मोजकं फर्निचर आहे. आम्हा दोघांचे आणी मुलीचे नाव येणारे किंवा वापरात नसणारे कपडे खेळणी अशा गोष्टी मी ऑफिसात डोनेशन बाॅक्स मधे नियमीत पणे देते यामुळे कपड्यांचा पसारा अजिबात नसतो.तसेच जुनी वस्तु देऊन टाकल्याशिवाय नवी सेम वस्तू आणत नाही.

मी यावर एक उपाय शोधला आहे. जेव्हा शॉपींगला बायको म्हणते, "हे छानै, घेउया!" तेव्हा लगेच तीला विचारायचे हे तु घरात कुठे ठेवणार? कोणत्या भींतीवर लावणार? पहीले आहे त्याचे काय करणार? लगेच उत्साह मावळतो "त्यांचा" असा आणुभवै...

In reply to by खटपट्या

आम्ही पण हा प्रयोग केला होता... एकदा आम्ही पण असेच शॉपिंगला गेलो होतो.बायको म्हणाली, "हे छानै, घेउया!" मी तिला विचारले,"हे तु घरात कुठे ठेवणार? कोणत्या भींतीवर लावणार? पहीले आहे त्याचे काय करणार?" आमची अर्धांगिनी म्हणाली, "दुसरे घर घेवू." आम्ही म्हणालो,"त्या घराला घरपण देण्यासाठी अजून एक घरवाली पण ठेवू." ह्यावर बायकोने दिलेले उत्तर अद्याप शिरावर मिरवत आहे.

In reply to by मुक्त विहारि

त्यात भेटायचं काय इशेष ? 'मग या घरासाठी दुसरा घरवाला पण बघायला पाहिजे !' हेच ना ते उत्तर ? अ

कमावत्या वयापासून कायम घरे बदलत राहत असल्याने अडगळ गोळा करण्याची संधी मिळालेली नाही. तरीही बऱ्यापैकी अनावश्यक गोष्टी जवळ आहेतच. सुदैवाने जेव्हा अडगळ गोळा होऊ लागते तेव्हा त्याचा मनस्वी वैताग येतो किंवा योगायोगाने घर/नोकरी बदलावी लागते. पण आमच्या मातोश्री-पिताश्रींनी त्यांना लग्नात मिळालेली भांडीही 'लागतील' म्हणून जपून ठेवली आहेत. पण ती भांडी वापरण्याची संधी अजूनही त्यांना आलेली नाही! http://www.paulgraham.com/stuff.html या विषयावर पॉल ग्रॅहमचा वरील लेख छान आहे.

गरजेची वस्तु घ्या, वस्तुची गरज निर्माण करु नका. उदा- १.मला वारंवार जेवण गरम करण्याची गरज भासतेे- ओव्हन घेतला वापरात आहे. उदा-२.खाण्याची वस्तु कधीही गरम करुन खाऊ शकतो म्हणुन ओव्हन घेऊ -वापर एखादया वेळेस होईल बाकी वेळ तो कीचनचा एक भाग व्यापणारी अडगळ.

अगदी दुखर्‍या नसेवर बोट ठेवलेत. सुदैवाने माझ्याकडे जमवाजमव कमी आहे. गोष्टी जितल्यातिथे असण्याची शक्यता जास्त असते. हे कौतुक म्हणून नाही तर माझ्या वडिलांना जमवाजमव करण्याची हौस आहे व त्याला आम्ही भावंडे वैतागलेली आहोत. आपल्या घरी तरी असे नको करायला म्हणून घरे बर्‍या अवस्थेत आहेत. आत्ता माहेरी मी आईला ३ जुन्या ट्रंका सफाईला मदत केली, तिच्या ३० जुन्या न वापरातल्या साड्या काल देऊन टाकल्या, स्वयंपाकघरातील एक खोके रिकामे केले, एक पत्र्याचा डबा रिकामा केला. मला जी भांडी, झाकण्या, पातेली हवी होती व आईचे बेकिंगचे साहित्य माझ्या सूटकेसमध्ये ठेवून दिले. ज्या वस्तू वापरात नाहीयेत त्या मोडक्या टाकून दिल्या व बर्‍या असलेल्या देउन टाकल्या. जुने वाळ्याचे पडदे नुसतेच पडले होते ते टाकून दिले. मग बाबा म्हणाले की तू इथे विश्रांतीसाठी आलेली असताना यात पडू नकोस. मग मोर्चा माझ्या बंद घराकडे वळवला. तिथे वहिनीच्या लग्नात आलेल्या रुखवताची दोन पोती माळ्यावर आहेत. तिला त्यात काय आहे हे आठवतही नाही म्हणाली. पण सगळ्या चांगल्या वस्तू आहेत व त्यांचे काय करायचे हे ती ठरवेल म्हणून मी काही हात लावला नाही. आज सहा कप्पे सफाई कामगिरी करणार आहे. त्यात नवर्‍याची कॉलेजची काही पुस्तके, कागदपत्रे जी टाकून द्यायची आहेत ती टाकणार, ठेवायची ती ठेवणार. लग्न झाल्यावर पहिल्यांदा कोणाकडे गेल्यास देतात तसा पंचविसेक ब्लाऊज पिसेसचा गठ्ठा सापडला. मध्यंतरी सासूबाईंनी एक मोठा कपड्यांचा गठठा दिला कारण आम्ही नसताना आम्हाला आलेले लग्नाचे आहेर त्यात होते. त्यातील साड्या मी वापरणार नसल्याने देऊन टाकल्या, आता शर्ट पिसेस व पँटपिसेसचा प्रश्न आज कामवाल्या बाई आल्या की सोडवणार आहे. कमळातला गणपती, घड्याळातला गणपती, पिटुकले फ्लॉवर पॉटस वगैरेंपैकी जे खरेच लागेल ते नेणार नैतर देऊन टाकणार. मला हवे ते ३ डबे व लसूण ठेवायची टोपली असे आज सूटकेसमध्ये टाकणार. हुश्श्य! हा धागा मी अनंत काळापर्यंत चालू ठेवू शकते. एक समजले की मी आता एकही भांडे, क्रॉकरी सेट, चमचा विकत घेण्याची कधीच गरज नाही. आईकडे प्रेझेंट म्हणून आलेले, माझ्याकडे प्रेझेंट म्हणून आलेले, वहिन्यांकडे आलेले आहेर जे वापरात नाहीत ते अफाट आहेत. शिवाय सासूबाईंनी जुन्या पद्धतीचे व चांगले आहे असे म्हणत दिलेले सामान काल सापडले. त्यात आजेसासूबाइंची पातेली, झारा पळी, उलथणे, विणकामाच्या सुया असे आहे तर सासूबाईंच्या पितळी रुखवतातील त्यावेळची फ्यान्सी भांडी अशी आहेत. परवा दोन कपडे शिवायला टाकले. ही माझी तिसरी भारतवारी आहे की ज्यात मी फक्त आहेरात आलेली ड्रेस मटिरियल्स शिवून नेतीये. सहा वर्षांपूर्वी ५ ड्रेसेस एकदम घेतले तेवढेच. हे आहेर करणे जरी थांबले ना, तरी खूप गोष्टी कंट्रोलमध्ये येणार आहेत. तरीही काल माझ्या मुलाचा गोड दिसणारा एक शर्ट सापडला. त्यावर वय वर्षे १ असे लिहिले असल्याने तो पुन्हा ठेवून दिला.

In reply to by रेवती

मध्ये भावाचे लग्न झाले तेव्हा आईला मदत केली सामान काढून टाकायला. त्या दिवशी भांडीवाल्या मावशीने जरा अजून चांगली भांडी घासली आणि प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी घरात 30-35 माणसं सामानासकट मावली. ;) आमच्याकडे सगळ्यांनाच गोष्टी जमवायची हौस आहे. मला कागद अजिबात टाकवत नाहीत. असं प्रत्येकाचं टाकवता न येणाऱ्या गोष्टींचं वेगवेगळं भांडार आहे. आईने आता या गोष्टी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणल्या आहेत पण एक स्थिरस्थावर घर झाल्यावर मी काय करेन या विचाराने मलाच टेन्शन येतं. :(

आमचे बाबा महाराज म्हणतात, "लग्न झाले की घरात अडगळीचे सामान यायला सुरु होते." बाबांची संसार वचने ह्या ग्रंथातून साभार.

In reply to by संदीप डांगे

नाही रे बाबा !!!! ही वस्तूस्थिती आहे. नौकरीला परदेशी गेलो, तरी माझे सगळे सामान एका सुटकेस मध्ये आणि एका हॅवरसॅक मध्ये मावते आणि त्यात भागते.....अगदी स्वयंपाकासकट. पण, आमच्या घरांत फक्त पुस्तकांचाच पसारा खूप आहे.(असे आमच्या सौ.चे मत...त्यामुळे तेच सत्य.) कधी घर आवरायचा विषय बायकोपुढे काढला तर, ती प्रथम पुस्तके आवरायला घेते.एखादे जुने पुस्तक आमच्या वाचनांत येते आणि मग ते वाचता-वाचता, घर आवरायचे विचार विसरले जातात. असो, घर में पसाराच पसाराच रहता हय.

In reply to by मुक्त विहारि

अर्थात घरात (सव्तःच्या) वेळ (साखरझोपेतली ) प्रसंग : माझ्याच स्वप्नातला मी घाबराघुबरा होऊन बाबांसमोर उभा, मुविंनी पेटतं वाक्य टाकलयं भडका होईल का आगडोंब का फटाक्याची माळ लागेल दहा-वीस हजाराची? बाबा नेहमीप्रमाणे शांत मंदस्मित चेहर्यावर ठेऊन, जवळच्या पुस्तकातले एक पान (न बघता) उघडून मला दाखवले, "लिहून घे, पान फाडू नकोस मागच्या वेळे सारखे आणि डोक्यात मोरपिसाचा झाडू मारला." मी थेट जागा आणि जाग्यावर आलो . हातातल्या चिठ्ठीवर लिहिले होते...

"हे जग एक पसारा आहे पाहिजे तिथे पसरा पण नंतर आपले आपणच आवरा"

संतवचने भाग ६ पान २३७... परात्पर शिष्य नाखु

धागा आणि आत्तापर्यंतचे प्रतिसाद वाचले. घरातल्या अनावश्यक (?) गोष्टी कमी करायचा एक प्रामाणिक सल्ला. सध्या तुम्ही रहात असलेल्या घराचे भाडे किती मिळते ते बघा. त्यापेक्षा कमी पैशात जवळपास घर भाडयाने मिळत असेल तर पहा. जमल्यास, रहाते घर भाडयाने देऊन दुसऱ्या भाडयाच्या घरात राहायला जा. चार पैसे सुध्दा वाचतील आणि घरातल्या गोष्टी हलवताना किमान थोडीतरी अडगळ साफ होईल (अशी आशा आहे). रहात्या घरातल्या सगळया गोष्टी नविन घरात घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे थोडयाफार, किमान काही प्रमाणात तरी, अडगळ कमी होऊ शकते. कृहघे.

अनावश्यक साठवणूक बंदच करणं जमेल तेंव्हा जमेल, पण तोपर्यंत निदान यार्ड सेल वा गराज सेल नाहीतर कन्साईनमेंट स्टोअर सारखे पर्याय भारतात उपलब्ध असायला हवेत असं वाटतं.

जर कोणाकडे जुन्या भरलेल्या ( सील्ड ) स्कॉच व्हिस्की किंवा विदेशी दारू च्या बाटल्या असतील तर मी हे अनावश्यक अडगळ घायला एका पायावर तयार आहे ! इच्छुकांनी संपर्क साधावा ..

In reply to by हेमन्त वाघे

आणि इतर सील्ड मदिरांच्या बाटल्या. ह्यांना अडगळ म्हणत नाहीत. जातीवंत मदिराप्रेमी (मदिरा प्रेमी, म्हणजे ज्याच्या प्रेमात मदिरा पडली अहे तो...जो मदिरेच्या प्रेमात डुंबतो, तो रसातळाला जातो.....) त्या बुधल्यांना अडगळ समजत नाही.

पहिली जॉईंट अट्टाचमेंट गोरखा रायफल्स सोबत, गोरखा पोरांनी प्रेमाने दिलेली क्रॉस खुकुरी टाय पिन, इलेक्शन करता बिहारात केलेली ड्युटी, निघताना दिलेले मिथिला पेन्टिंग (मिथिला शैलीतले पेन्टिंग), नॉर्थ ईस्ट पोस्टिंग मधून आणलेली नागा शॉल, केरळी बॅचमेट न दिलेला यक्षांगण मुखवटा,........ ही सुरुवात आहे, आयुष्य अजून काय काय अनुभव परसोनिफाय करून देईल ते सांगता येत नाही, आत्ता कुठे सुरुवात झाली आहे

वस्तू जमा करणे मुळात मानवी स्वभाव असावा. लहान मूल देखील खिसे भरून चॉकलेट जमा करून घेतंच ना. तरुण पिढीला अडगळ जमा करायला आवडत नाही असे साधारण निरिक्षण आहे. स्वस्तात मिळतात म्हणा किंवा खर्च करायची प्रवृत्ती वाढली असे म्हणा. पण आधीचं जग निराळं होतं हे नक्की. आधीच्या पिढीत गरीबी तित्कीच होती आणी वस्तू स्वस्तही नक्कीच नव्हत्या. जितके शक्य तितके पैसे वाचवणे हा जुन्या पिढीचा पिंड होता. कपडे वापरण्याजोगे नाही राहिले की त्याचे हातरुमाल्/आतले कपडे होत, मग फरशी पुसणे, मग गाडी पुसणे होऊन मगच त्या कापडाला सद्गती प्राप्त होई. हाच प्रकार ईतर वस्तूंबाबत होई, जसे चप्पल तुटली तर दुरुस्त करून तीच पुन्हा वर्षभर चाले. आता किती लोक चप्पल दुरुस्त करून वापरतात?. त्या वस्तूचे मुल्य मूळ किमतीपेक्षा कैक पटीने वसूल केले जाई. आई वडील मुलीच्या लग्नासाठी मिळालेली सर्व नवी भांडी जमा करून ठेवत. घरातल्या माळ्याचं महत्व भारतीयांपेक्षा जास्त कुणाला माहित नसेल. ज्याने ती गरीबी अनुभवली आहे त्याला ह्या वस्तू अडगळ वाटणार नाहीतच, उलट अचीवमेंट वाटेल. आयुष्यभर पै पै वाचवून संसार केलेल्या लोकांना कसं ते सगळं टाकून देता येईल. ती अडगळ नाही तर त्या मंडळींच्या अमुल्य आठवणींचा भाग असतो आणी काही अंशी जीवही त्यात अडकलेला असतो. काळ बदलला, आता त्या वस्तू महत्वाच्या नाहीत हे कलत असलं तरी वळणं फार अवघड.

मझ्याघरी पण खुप जुने कपडे माझ्या साबांनि जपून ठेवले होते..अगदी २ ३ बॅग भरून होतील इतके..बोहरणीला देऊन त्याना बादली घ्यायची होती.आता १ते२ सहज कुठेपण मिळणाऱ्या वस्तूनसाठी इतके कपडे म्हणजे कहरच. शेवटी एकदा साबा १५ दिवस गावाला गेल्या तेव्हा त्यात उंदीर शिरला नि कपड़े खाल्ले त्याने असे खोटेच सांगितले नि कपड़े देऊन टाकले .ऑफिस साफ करणाऱ्या बाईला.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मापं, असं नाई म्हणायचं बरका टकामालकांना. त्यांच्या साईटवरुन तुझे वाचन कमी म्हणून तुला बॅन करतील.

In reply to by टवाळ कार्टा

पहिलीच ओळ : सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही. टका ( नेहमीप्रमाणे ) न वाचाताच प्रतिसाद देउन रिकामा !

हे डेटा बॅक-अप कींवा इंशुरन्स सारखं आहे. कधी वापरायला लागेल सांगता येत नाही. ओव्हरहेडस असल्या तरी मनाचं समाधान म्हणून केलं जात असं. त्यामुळे आयत्या वेळी लागल्यास मिळवायला किती कष्ट/खर्च/मनस्ताप यावरून बाळगायच्या की नाही ते ठरवायच.