Skip to main content

रत्नागिरी कट्टा.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस बराच व्यस्त होतो आणि शेती विकत घ्यायला किती प्रयास पडतात ह्याचा अनुभव पण घेत होतो.वडीलोपार्जित शेती नसल्याने त्रास जरा जास्तच होत होता. शोधा-शोध करत असतांनाच आमच्या एका ओळखीच्या मित्राकडून देवरूखला एका जणाला शेती विकायची आहे, असा निरोप मिळाला.आता देवरूखला जायचेच आहे तर बसणीला पण जावून येवू म्हणून मग रत्नागिरीत मुक्काम करायचे ठरवले.साहजिकच आमच्या शिरस्त्याप्रमाणे, रत्नागिरीत कुणी अहे का? अशी दवंडीपण पिटवली. दवंडीला थोडा फार प्रतिसाद मिळाला आणि एक कट्टा करायचा बेत ठरला.आमच्या मुलाला पण रत्नागिरीला यायची ओढ असल्याने तो पण बरोबर होताच.पॅसेंजरने रडत-खडत रत्नागिरीला पोहोचे पर्यंत २ वाजले. मुलाच्या पोटात कावळे ओरडायला लागले आणि मग आम्ही हॉटेल प्रशांतला भेट दिली.रत्नागिरीला गेलो की आधी प्रशांतला भेट देणे, हा पण आमचा शिरस्ता.प्रशांतचे जेवण अंगावर यायच्या आत, यजमानांच्या घरी मुक्काम टाकणे भाग होते. संध्याकाळी मग काळ्या समुद्रावर कट्टा करायचा बेत होताच.यजमानांची तशी परवानगी घेवून मग मी आणि माझा मुलगा, रत्नागिरीतील इतर मिपाकरांना भेटायला निघालो. थोडी फार फोना-फोनी आधी झाली होतीच, त्यानुसार नंदादीप आणि मंदार कात्रे हे नक्की भेटणार होतेच.तसे आम्ही डोंबोलीकर वेळेच्या बाबतीत पक्के.त्यामुळे ६च्या (म्हणजे भेटायच्या वेळेच्या) अगोदरच जावून पोहोचलो. काळ्या समूद्रावरची जेट्टीचे स्वरूप फारच बिघडले आहे.ही एक नोंद मनांत करून ठेवली.फार पुर्वी म्हणजे जेंव्हा बोटीनेच कोकण प्रवास होत असे त्या काळात, ही जेट्टी फारच गजबजलेली असायची, असे आमच्या शेजारचे सांगायचे.इंग्रजांनी केलेल्या बांधकामाची भक्कमता म्हणजे ही जेट्टी.मी लहान असतांना तिथे एक सार्वजनिक मुतारी पण होती आणि आता ती पण नाहीशी झालेली. गेल्या ४०-५० वर्षात तिची काहीही डागडूजी न केल्याने पुर्ण जेट्टी आता म्हातारपणामुळे रया गेलेल्या एखाद्या रुपगर्वितेसारखीच. तिचे हे रूप पाहतांना मनांत एक गढूळ असे वातावरण तयार झाले आणि तितक्यात ,"ओ मुवि." अशी हाक ऐकू आली. नंदादीप ह्यांना मी प्रथमच भेटत होतो पण त्यांना आणि मला कुठेही संकोचल्यासारखे वाटत न्हवते.नंदादीपशी बोलत असतांनाच मनातील ती गढूळता कधी नाहीशी झाली ते पण समजले नाही.थोड्याच वेळात, मंदार कात्रे आणि अनन्या पण कट्ट्याला आल्या. बाकरवड्या आणि आंबा-बर्फी (किंवा आंबा वडी) खाता-खाता आणि गप्पा मारता-मारता वेळ कसा गेला ते पण समजले नाही. आता कट्ट्याची सांगता एखाद्या पेयाने व्हावी असा घाट घातला गेला आणि मग शहाळ्याच्या पाण्याच्या साथीने कट्ट्याची सांगता झाली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6088
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अरे वाह रत्नागिरी कट्टा वृत्तांत आला तर. मांडवी बंदर खुप बदलले आहे. सगळे रत्नागिरी बदलले म्हटले तरी चालेल पण मज्जा येतेच. मस्त मस्त कट्टा

In reply to by अनन्न्या

आता मी थोडा फार वृत्तांत टाकला आहेच. तुम्ही पण थोडी भर प्रतिसादाच्या निमित्ताने टाकल्यास उत्तम.

मी लहान असतांना तिथे एक सार्वजनिक मुतारी पण होती>>> बरोब्बर लक्षात ठेवता हा तुम्ही.... फक्त मुतारी नसून शौचालय पण होते. संपूर्ण मांडवी वाडीतील लोक्स तिकडेच जायचे.... आज मात्र तो एक तूफान गर्दीचा लव्हर्स स्पॉट बनलाय. तिकडे लक्ष गेल की इतिहास आठवून हसूच येत... बाकी भेटून बर वाटल. पहिल्यांदाच भेटतोय अस वाटलच नाही...

छान लेख . फोटोही येउ देत . थिबा पॉईंटवरुन ( थिबा पॅलेस समोरील मोकळी जागा ) पाहिलेला सुर्यास्त , तिथे मिळणारी भेळ , कोनाच्या आकाराचे सामोसे यांची आठवण झाली .

In reply to by खटपट्या

ताच म्हनतय......कट्टो केलास नि एकय फोटो ताकुक नाय....बरा नाय हां या.... (मालवणी) अनिरुद्ध

अरे वा! आम्ही मिस केला हा कट्टा! बसणी माझ्या गावाच्या अगदी जवळ आणि रत्नागिरीत एम ओ शिप करत असताना बसणीत एक दिवस ओपिडी पहायचे मी. आता डिसेंबरात कट्टा असेल तर नक्की कळवा. मी नाताळाच्या आसपास येणार आहे.