आज आम्ही चार जण बोलत असताना एक जण अगदी असं कसंनुसं होत घाम पुसत 'कसलं उकडतंय ना!!' असं म्हणाला. तापमान खरंच प्रचंड वाढलंय एकंदर. त्याचे परिणामही दिसतायतच.
तेंव्हा विचार आले मनात, की साला उकडतं उकडतं म्हणत आपण सगळेच तक्रार करतोय... हे होतंय आपल्यामुळेच.
बरं तेही आपल्याला माहिती आहे, तशी पकपक आपण सोशल मिडियावर करत असतोच की. पण,
आपण झाडं लावतो, किंवा ती तोडली जाऊ नयेत म्हणून काही करतो? नाही.
आपण पाणी वाचवतो? नाही.
आपण एसी वापरणं कमी करतो? नाही.
आपण गाड्या वापरणं कमी करतो? नाही.
आपल्याला शहरं हवीत? हो.
प्रगती हवी? हो.
मॉल, टॉवर हवेत? हो.
तथाकथित लॅव्हिश लाईफ हवं? हो.
जंगलं हवीत? हो; म्हणजे फक्त वाघाचे फोटो काढून गावभर दाखवायला.
दुष्काळाचा मेसेज फॉरवर्ड करायचा, वाटल्यास नाम सारख्या संस्थांना एखादा चेक फाडून माज करायचा आणि मग गाडी धुवायला पाईप सोडायचा; गाडी किती मळते एका दिवसात!
दोन वेळा शॉवर खाली अर्धाअर्धा तास अंघोळ करायची; चिकचिक होते नुसती अंगाची!’
’आमच्याकडे चोव्वीस तास पाणी असतं’, हे सांगताना काय तीर मारल्यासारखं वाटतं लोकांना. काहींना मैलोनमैल चालावं लागतं एका घागरीसाठी, किंवा अनेक शहरातूनही आज एक दिवसाआड पाणी सोडलं जातंय; ... पण आपण काय करणार ना त्याला?
आपल्याला पैसे भरून वॉटर किंगडम परवडतं, टँकर मागवून रेन डान्स चालतो;
पण रेनच नसेल तेंव्हा मग शॅ शॅ म्हणत खिशातून रुमाल काढताना करावा लागणारा डान्स नाही आवडत.
मिळतंय म्हणून माजतोय माणूस. पूर्वी जमिनीवरूनही दिसणारा 'व्ह्यू' मिळण्यासाठी आता किमान १०व्या मजल्यावर जावं लागतं. मग फ्लोअर राईज...तोही द्यायचा. आणि मग सगळ्यांना बोलवून 'व्ह्यू' दाखवायचा 'व्ह्यू'.
'मला मेन म्हणजे उजेड आणि गार वारा हवा होता!' असं सांगायचं अभिमानाने. का?? म्हणजे उजेड, गार वारा तेवढा हवा, आणि ती बिल्डिंग उभी करण्यासाठी तोडलेल्या झाडांचं काहीच नाही? गार वारा येणार कुठून?
फ्रेंच नाही अजून अमेरिकन, अंटार्क्टिकन विंडो जरी केल्या ना तरी वारा यायचा नाही एक दिवस. हो; पण कोण इतका विचार करतंय?
पुढचं पुढे बघायचं. लिव्ह इन द प्रेझेंट. त्यामुळे सगळं चालतं. सोयीचं तेवढं सगळं आपल्याला चालतं.
अन्नाची, पाण्याची, सगळ्याची नासाडी आपल्याला चालते, पण मग टंचाई, महागाई झोंबते.
इलेक्ट्रिसिटी बिलांमुळे डोळ्यासमोर अंधारी आलेली चालते, पण लाईट गेले की नुसती तडफड!
झाडांची सावली दिसली नाही तरी चालते; गॅलरीला सन शेड, गाडीला कव्हर्ड पार्किंग मात्र मस्टच आहे आजकाल;
डेव्हलपमेंट, स्मार्ट सिटीच्या नावाने झाडं तोडलेली चालतात, पण पाऊस पडला नाही, उकाडा वाढला, की.....
कसले नालायक झालोत आपण!
प्रतिक्रिया
13 May 2016 - 9:43 pm | शान्तिप्रिय
लेख वास्तववादी असला तरी, लेखात नकारात्मकता ठासून भरली आहे.
14 May 2016 - 12:21 pm | शिव कन्या
आपण काहीच सकारात्मक करत नाही.
तर लेखात पण तसेच येईल कि!
लेख आवडला. भिडला.
14 May 2016 - 2:14 pm | खटासि खट
लेखात नकारात्मकता ठासून भरली आहे >> आँ !!
14 May 2016 - 3:04 pm | वेल्लाभट
इलाज नाही.
15 May 2016 - 11:50 am | बोका-ए-आझम
नकारात्मकता नाही. आपल्या चुका दाखवणं यात नकारात्मक काय आहे? अवांतर होईल कदाचित - पण यावरून सत्यजित राय यांच्यावर भारतातील गरिबी दाखवल्याचा आरोप केला जायचा तसे वाटले.
13 May 2016 - 9:48 pm | एस
भापो.
13 May 2016 - 9:48 pm | मुक्त विहारि
आपण आपले मस्त थंडगार पेय पित ए.सी.त बसू या.
13 May 2016 - 10:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
उगा झाडे वगैरे कशाला? एसीवाल्यांचा धंदा बसायचा :D अन पाणी काय .. येतंय की बिसलरीच्या गाड्यामधून
ह्या अवस्थेवर येऊन पोचलोय मी.
13 May 2016 - 10:05 pm | स्पा
लेख पटला
13 May 2016 - 10:19 pm | काळा पहाड
इको-टेररिझम नावाचा एक प्रकार असतो (https://en.wikipedia.org/wiki/Eco-terrorism). एन्व्हायरॉनमेंटल लिबरेशन फ्रंट (https://en.wikipedia.org/wiki/Earth_Liberation_Front) नावाची पण एक ऑर्गनायझेशन आहे.
13 May 2016 - 11:27 pm | सतिश गावडे
लेख काळजाला भिडला. अजून येऊ द्या.
14 May 2016 - 2:19 pm | किसन शिंदे
धन्याशी सहमत! लेख वाचून प्रचंड विचारात पडलोय.
14 May 2016 - 12:39 pm | पैसा
स्फुट आवडलं. आपल्याला जमेल तेवढा खारीचा वाटा आपण उचलायचा.
14 May 2016 - 2:32 pm | चलत मुसाफिर
कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईट असतो. पण भौतिक प्रगतीच नको असा जो अट्टाहास पर्यावरणवादी करतात तो अयोग्य आहे.
माणसाने पहिली होडी समुद्रात लोटली, तेही निसर्गनियमाच्या विरोधातच होते. किंवा पहिली आग पेटवली, पहिले चाक फिरवले, पहिली बैलजोडी जुंपली, पहिल्यांदा अन्न शिजवून खाल्ले इ.
14 May 2016 - 3:04 pm | वेल्लाभट
पहिल्या वाक्याशी सहमत.
होडी सोडणे, आग लावणे, चाक वगैरे यात 'निसर्गनियम' कुठे तोडला होता ते सविस्तर सांगितलंत तर बरं. त्याच्याशी असहमत आहे हेवेसांनला.
14 May 2016 - 9:21 pm | चलत मुसाफिर
माणूस हा एकच प्राणी या गोष्टी करतो. निसर्गाला हे सर्व अभिप्रेत नाही.
मूळ मुद्दा असा होता की रस्ते, शहरे, धरणे, कारखाने, खाणी या सर्वांना घाऊक आणि आंधळा विरोध करणारे पर्यावरणवादी हे (जाणूनबुजून?) विसरतात की मानवी संस्कृतीचा प्रवास याच मार्गाने झालेला आहे.
14 May 2016 - 2:42 pm | उगा काहितरीच
काय करणार मग ?
14 May 2016 - 9:27 pm | सतिश गावडे
त्यांनी लेख लिहिला. आपण प्रतिसाद दिले. झाले की. आता अजून काय करायचे? :)
14 May 2016 - 8:08 pm | पिंगू
सरळ ठोकलं की लागणारच ना.
दुर्दैवाने वास्तव नेहमीच जळजळीत असते, हे कुणी मुळात ध्यानातच घेत नाही..
15 May 2016 - 9:55 pm | नमकिन
15 May 2016 - 9:56 pm | नमकिन
16 May 2016 - 11:00 am | पथिक
पूर्णपणे सहमत !
16 May 2016 - 11:43 am | विटेकर
निसर्ग ओरबाडला की असे होणारच !
आपले पोट भरले की बाळ आईपासून आपोआप बाजूला होते पण हाच बाळ्या मोठा झाला की भूमातेला ओरबाडतो.
कमीत कमी स्त्रोतामध्ये अधिकाधिक उत्पादन - या तत्वावरच युरोपातील औद्योगिक क्रान्ती उभी राहीली. हे कमीत कमी स्त्रोत वापरणे इन्पुट= आउट्पूट च्या अगदी विरुद्ध होते कारण असे अस्तित्वातच नसते. हा विज्ञानाचा नियम आहे . या उत्पादन हव्यासात आपण निसर्ग कसा ओरबडला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. चैनीच्या वस्तु गरजेच्या केव्हा बनल्या हे ध्यानातच आले नाही ! आता या ओरबडण्याला पर्याय नाही !
असेल तर आपल्या गरजा कमी करणे ! आणि हेच भारतीय तत्त्वज्ञान कानी कपाळी ओरडून सांगत आहे .. त्येन तक्थेन भुंजिता!
16 May 2016 - 11:47 am | पथिक
अगदिच! त्यक्तेन भून्जीतः
17 May 2016 - 4:26 pm | मराठी कथालेखक
एखादी गरज भागवण्याकरिता आधी उपाय शोधले जातात त्यावेळी ते खर्चिक (म्हणजे उपलब्ध स्त्रोतांचा भरपूर वापर करणारे) असले तरी त्या टप्प्यावर त्याचा विचार केला जात नाही. हे उपाय (म्हणजे यंत्र वगैरे) हळूहळू स्थिरावल्यावर अधिक संशोधन करुन ते अधिकाधिक किफायतशीर बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
फार विस्ताराने लिहित नाहि , काही उदाहरणे देतो.
१) आधी वीजेवरील दिवे नव्हते, मग ते आले त्यावेळी भरपूर उजेड देणारे दिवे ही मुख्य गरज होती. उर्जेचा अपव्यय फारसा विचारात घेतला गेला नसणार.. मग आता CFL ,LED ई दिवे आलेत ते वीज वापर कमी करत आहेत. आता ७ वा ९ वॅटचा LED दिवा एका छोट्या खोलीला पुरेसा ठरतो (४० W च्या ट्युबलाईटच्या तुलनेत)
२) एसी, फ्रीज यांची ह्यांची क्षमता वाढवली जात आहे आहे (वीजेचा वापर कमी होत आहे)
३) पुर्वीच्या CRT टीव्हीच्या तुलनेत आताचे LED संच कमी वीज खातात.
अर्थात फक्त ही तांत्रिक प्रगती पुरेशी नाही आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माणसाने आपल्या सवयी तपासायला/बदलायला हव्या, वाया घालवणे योग्य नाहीच. पण फ्रीज, एसी, वाहन ह्या गोष्टी अनेकदा गरजेच्या झाल्या आहेत.
17 May 2016 - 5:07 pm | समीरसूर
पटलं. लिहिण्यातली कळकळ जाणवली. मी पण लिहायचो असं पोटतिडकीने पण आता 'विकासा'चं अजस्त्र धूड थांबणं अशक्य आहे. गरजा कमी करणे हा नामी उपाय आहे पण तो तितकासा पटत नाही कुणाला.
प्रत्येकी तीस-तीस किलो सामान विमानप्रवासात अलौड असतांना मी आणि बायकोने दोघांचे मिळून फक्त १२ किलो सामान घेतले हे बघून सहप्रवाशांनी आमची किती खिल्ली उडवली होती म्हणून सांगू...आम्हाला दरिद्रीच समाजात होते सगळे. :-) गरजेला अंत नाही, काय, किती आणि कशासाठी हवंय हे कळलं आणि त्यानुसार गरजांचं नियोजन केलं तर फार काही लागत नाही व्यवस्थित जगायला...असो. लेख छान झालाय. रिसोर्सेस वाचवायलाच हवेत याबद्दल शंकाच नाही. नाहीतर काही खरं नाही ३०-५० वर्षांनंतर...
17 May 2016 - 5:31 pm | sagarpdy
असो यावर्षी इन्फ़र्नो येईल ती बघूया.
17 May 2016 - 6:13 pm | पाटीलभाऊ
17 May 2016 - 6:14 pm | पाटीलभाऊ