Skip to main content

सैराट आन सैराटच

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 05/05/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली. म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय. परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी. आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला. आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती. खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती. एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्‍या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्‍याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव. . आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग... आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल. परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार. होतेत...... अगदी असल्या स्टोर्‍या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 59761
प्रतिक्रिया 219

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

सैराटमय लेखन आहे. फॅन्ड्री पाहताना नागराज यांचं वेगळेपण जाणवलं होतं. जानेवारी १६ मध्ये पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सैराट दाखवणार होते, पण रद्द झालं. या फेस्टिवलमध्ये चित्रपट क्षेत्रातली अनेक मंडळी सहज दिसतात आणि प्रेक्षकांशी बोलतात देखील. तेंव्हा नागराज यांच्य़ाशी सैराटबद्दल बोलायची संधी मिळाली होती. फॅन्ड्रीच्या यशानंतरही हा माणूस जमिनीवर आहे याची झलक तेंव्हा दिसली होती. सैराट पाहायचा तर आहेच, कधी योग येतोय ते बघायचं.

एक अनुभव चिटकव्तोय इथं. https://www.facebook.com/raj.asrondkar/posts/10205881532349729 जातीयता की पुरुषप्रधानता ? मला माझ्या घराजवळचं अलिकडचंच एक उदाहरण माहितीय. समाजातलंच प्रेमप्रकरण आहे. दोघेही बौध्द. मुलीच्या घरातून विरोध. मुलगा चांगला शिकलेला, चांगली नोकरी, चांगला पगार, स्वत:चं घरदार. विरोधाचं काही कारण नव्हतं. तरीही मुलीच्या बापाने व भावांनी मिळून दोघांना मारहाण केली. पोलिसांतही तक्रारी झाल्या. काही काळ गेला. दोघांना मूल झालं. एक दिवस मुलगी तिच्या माहेरघराजवळच्या दुकानात आली असता, तिच्या बापाने व भावांनी मिळून तिला लाथाबुक्क्यांनी मारली. विशेष म्हणजे, मुलीच्या भावाचं दरम्यानच्या काळात आंतरजातीय लग्न झालं होतं. पण त्याचा बहिणीवरचा राग गेला नव्हता. यात एकच कारण दिसतं. मुलीने मर्जीने लग्न केलेलं कुटुंबांच्या पचनी पडत नाही. हा पुरुषप्रधान माज आहे. दुसरं काही नाही. अशा घटनांचं आकलन नेमकं कसं करायला हवं ? कारण सैराट पाहून काढली जाणारी अनुमानं इथे लागू होत नाहीत. - राज असरोंडकर

शेवटी एकदाचा सैराट पाहिला. नागराजचा फॅन्ड्री पाहिला नाहीये त्यामुळे पाटी कोरी होती. एवढी हवा झालीये सैराटची की चुकून एखाद परीक्षण वाचून स्टोरी आधीच कळली तर चीडचीड व्हायला नको म्हणून सक्तीचा सोशल मीडिया संन्यास घेतला आणि त्याचं चीज़ झालं! गाणी ऐकून आधीच वेड लागलेलं. कित्तीतरी दिवसांनी टाळ्या शीट्टीची मजा अनुभवली. सैराट तुम्ही पाहू शकतचं नाही. तो फक्त अनुभव करायचा आहे. एक एक फ्रेम एक एक अँगल असा सफाईदार आहे की जीव ओवाळून टाकावा. आर्ची आणि परश्या तर नंबर १ आहेतचं पण सगळीच्या सगळी कास्ट् इतकी तगडी आहे की कुणीही कुठेही अनावश्यक वाटत नाही. इतक्या बारीक बारीक गोष्टी टिपल्यात की मला काही वेळ स्वतःला सांगाव लागत होतं की आपण फक्त पिक्चर बघतोय. हे सगळं पडद्यावर आहे फक्त. गावातले वातावरण गजब कहर घेतलं आहे. पाटलाचं रानातल घर असंच असत अगदी सेम टू सेम. विहीरीत मुलं अशीच सूर मारून पोहतात. मित्राच्या प्रेमप्रकरणात मदत करणारे प्रदीप आणि सल्या असेच असतात. आर्चीला चिठ्ठी दिल्यावर तिच्या मागं पुढं करत मुद्दाम चिठ्ठी शब्द येईल असे बोलणारे, परश्याला मार पडल्यावर गप घरी जायचं सोडून पुन्हा त्याच्याशी बोलायला गेलेले अनेक सल्या याची देही याची डोळा पाहिलेत. जेवढी यांची मैत्री सच्ची दाखवली आहे तेवढीच आर्चीची न तिच्या मैत्रिणीची. प्रत्येक ग्रुप मधे एखादी अशी बंडखोर मुलगी असते आणि हिच्यामुळे आपण गोत्यात येऊ या टेन्शनखाली असणारी आनि असतीचं असती. वर्गात ओळख करून देताना काय आवडतं हे सांगताना मैत्रीनीला कोपरानी ढोसुन अजून काय ग असं विचारन, एखाद्या कमी मार्क वाल्या मुलाने मला वाचायला आवडत म्हणून सांगितलं की पिकलेला हशा आणि सगळ्यात हाईट म्हणजे आम्ही शाळेत खो खो खेळायचो तेव्हा आजुबाजुला घुटमळनारे अनेक होतकरू परश्या त्यानिमित्त डोळ्यासमोर येऊन गेले. ;) त्या वयात होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी इतक्या अस्सल दाखवल्यात की अनेक आर्ची आणि परश्या त्यांचा भूतकाळ पुन्हा जगले असतील. प्रेमी युगुलांचा फोनवर बोलताना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जेवला का! तोही प्रसंग इतक्या खूबीने रंगवलाय की कुठेही शब्दबंबाळपणा न करता कळत जात की झालं आता ह्यांची विकेट गुल! आर्ची फुल ऑन बंडखोर आहे. पहिल्या भागात जेवढी आहे तेवढीच दुसऱ्या भागात. उगीच आता केलंय तर निस्तरायला पाहिजे म्हणून ती परश्याबरोबर रहात नाही. भांडण झाल्यावर आता मी घरी कशी जाऊ मला काय म्हणतील हा असला रडुबाइपणा करत न बसता तिच्यात पुन्हा परत जाण्याची धमक आहे. तीच्यातल्या "ती"ला ती पूर्ण चित्रपटात एकही क्षण गमावत नाही. तिच्या मनाने कौल दिल्यावरचं ती परश्याकडे परत जाते. आणि खऱ्या अर्थाने दोघे एकमेकांना समजून घेऊ लागतात! अनोळखी शहरात बसस्टॉपवर वाट पहात असताना माय सेफ्टी माय रेस्पॉन्सिबिलिटीचा झळकणारा बोर्ड अनेक शब्दांचे काम करून जातो. मी तर म्हणेन पूर्ण चित्रपटचं हा डोळे आणि कान सजग ठेऊनचं बघा. प्रेम कहाण्या काय कमी पाहिल्या असतील का आजपर्यंत पण कधीही हीरो हिरोइन आपल्या मातीतले नाही वाटले. इथले आर्ची आणि परश्या हे वेगळे वाटतंचं नाहीत. सदा न कदा मार खाणारा परश्या आणि त्याला सोडवत बसणारी आर्ची पाहून खरोखर एक क्षण म्हणावस वाटलं मॅन अप परश्या! पण पळून गेल्यावर तोच परश्या डोशाच्या गाडीवर काम करायला सुरवात करतो. रात्री घरी आल्यावर आर्ची तू कामाला जात जाऊ नको म्हणती तेव्हा असं दुसर्याच्या जिवावर जगणं बर दिसत का म्हणतो तेव्हा ओठावर आलेलं मॅन अप आतच रहात आणि नागराजने ज्या प्रकारे हे सेंसिबल केरक्टर डेवलप केलंय त्याला मी कोपरापासून दंडवत घातला! कमाल! लिहायला गेलं तर या पिक्चरची एकूण एक फ्रेम शब्दात मांडण्याएवढी सुरेख आहे! क्रीमच्या बिस्कीटा तल नुसतं क्रीम खाणारा छोटा मुलगा, बंड करून पळून आलेली, जीवावर उठलेले असूनही वडील किती चांगले आहेत हे सांगणारी आर्ची, पाहुणे पहायला आल्यावर विचारा की असं सांगताना पाटलांचा नरम झालेला आवाज, वाकळ शिवत बसलेली आजी, याचं आजीचा अजून एक शॉट आहे माशा मारल्याची ऍक्शन केल्याचा नक्की नमस्कार करतायत की माशा मारतायत हे न कळणारा पण मी खलास झाले तिथे. आजोबा गेल्यानंतर उतार वयात चिडचिड करणारी आणि तेव्हा असेच हातवारे करणारी आजी समोर आली आणि मी म्हणलं अरे काय हे! मला तर शंका आली की नागराज हा माणूस हजार डोळ्यांनी बघतो का काय माणसं! ज्यांनी कुणी अजून पाहिला नसेल त्यांनी फक्त एका गोष्टीसाठी बघा हा पिक्चर. खरेपणा. सच्चेपणा. काहीही खोटं मुलामा लावलेलं नाहीये यात. सुरवातीपासून ते शेवटापर्यंत फक्त आणि फक्त जे खरं आहे तेच दाखवलंय कोणताही आव न आणता. इथे थियेटरमधे झिन्गाट गाणं दोनदा लावल. एकदा खास नाचन्यासाठी आणि एकदा बघण्यासाठी. तसं तर आता पारायण झाली या गाण्याची पण त्या वातावरणात ते ऐकण्याची मजा काही औरच! पब्लिक फुल ऑन नाचल. शिट्ट्या वाजल्या. पण खरं सांगू तक्रार करावीशी किंवा ऑकवर्ड अजिबात नाही वाटलं. आमच्या इथलं पब्लिक काही लहान नव्हतं. सोमवार ते शुक्रवार मान मोडून पाट्या टाकून येणारे सगळे इंजिनेर लोक. त्यांना गणपती डान्स नाचताना बघून झकास वाटलं. असं पण व्हायलाच हवं ना कधी कधी. हा उथळपणा आहे असं म्हणतील म्हणणारे पण काही क्षण का होईना खांद्यावरचं समजुतीचं, समाजाच, बंधनाचं जोखड उतरून ठेऊन पाय थिरकले नाही तर तुम्ही मेले आहात! शेवटाबद्दल काही लिहणार नाही. पिक्चरमधे शेवटी काही संगीत नाही फक्त मूक आक्रोश आहे आणि तो तसाच आत आत टोचत जातो. बधीर करून सोडतो. त्याला शब्दात मांडण केवळ अशक्य आहे. टोटल रेस्पेक्ट फॉर नागराज!

In reply to by रातराणी

जब्रा, लिहिलं आणि ते आवडलं. चित्रपट आम्हालाही असाच आवडला. सैराटबद्दल किती सांगू आणि किती बोलू असं होतं. सालं मी मिपावरच्या पब्लिकला सांगून थकलो. मनाची पाटी कोरी करुन जा चित्रपट आवडेल, ऐकणार ते मिपाकर कसले. स्वतंत्र धागा पाहिजे होता हो.... असो क्लास लिहिलं. लिखते रहो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद मंडळी. प्रतिसाद लिहिताना एवढा मोठा होईल असं वाटलं नव्हतं त्यामुळे दुसरा धागा काढला नाही + कंटाळा :)

बरा वाटला. चित्रपटाच्या शेवटाबद्दल इथे बरच चर्वीतचर्वण झालय :) जातीयवाद काय, हॅप्पी एण्डीगची निकड काय... सर्वच भन्नाट. चित्रपटाचा शेवट अत्यंत दु:खद असला तरी तो एक त्याच कहाणीचा एक पापुद्रा आहे. कथेचा पहिला भाग म्हणजे जनरल टीन एजर्सची सामाजीक आणि कौटुंबीक भेदांविरुद्धची लढाई. आजवर याविषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. नायीकेच्या बापाला ज्या अवस्थेत आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणाचा पत्ता लागतो त्यानुसार त्याची तत्कालीन रिअ‍ॅक्शन अगदी स्वाभावीक दाखवली आहे. त्यानंतर प्रेमी युगुल-खास करुन मुलगी, आपली हिम्मत अजमावतात. ति पण एक मसालेदार पण नॉर्मल कथा आहे. जोशमे आके उचललेल्या पावलांना वास्तवीक जीवनाचे चटके बसु लागतात व त्यात प्रेम तपके उजला बनके बाहर निकलता है, हा कथेचा दुसरा भाग. हा सिनेमा बघुन कोवळ्या मनांना चुकीचा संदेश जाईल अशी काळजी करणार्‍यांसाठी हा भाग विशेष महत्वाचा. आपण करत असलेल्या धाडसाबद्द्ल, निर्णयांबद्द्ल "सिग्रेट पिना शेहेत के लिये हानिकारक है" टाईप "वैज्ञानीक इशारा" अगदी चपखल देऊन जातो हा भाग. पण हि कथा या हॅप्पी नोटवर संपत नाहि. प्रेमकथा सहसा ज्याला टच करत नाहि असा तिसरा भाग इथे दाखवतात. प्रेमी युगुलाचं जगणं तर लाईनवर लागलय. पण त्यांच्या एकुण कृत्याने त्यांच्या कुटुंबांवर जे आघात होतात ते सांधले जात नाहित. त्या दुभंगाची, जखमांची कथा पुढे चालु राहाते. सहसा चित्रपटाच्या कथानकात असं दाखवतात कि या जखमा अपोआप भरल्या जातात, किंवा त्या प्रेमप्रकरणाचा दृष्य परिणाम (नातवंड :) ) वणवा शांत करतात. पण ते तसच व्हावं यामागे काहि लॉजीक नाहि. मुलाच्या बापाला त्याच्या समाजात सतत जी मानहानी सहन करावी लागते त्यावर युगुलांचं प्रेम म्हणजे काहि औषध नाहि. मुलीच्या बापाची राजकारणी महत्वाकांक्षा मातीत मिसळते. तिथेसुद्ध लव्ह काण्ट हेल्प. शेवटी या न भरलेल्या जखमा उफाळुन येतात व आपला सुड उगवतात. चित्रपटाचा शेवट याच जखमांच्या कहाणीवर भाष्य करतो. सदर प्रेमकथेचाच तो एक पापुद्रा आहे.

In reply to by अर्धवटराव

शेवट थोडा पटला नाही.. म्हणजे मध्ये ४-५ वर्षाचा कालावधी जाउन सुध्दा आग विझत नाही.. का फ़ोटोत परश्याचा सुखी संसार बघुन प्रिन्स चिडतो, हे कळले नाही. खरच जर अपमानाची सल एव्हढी तीव्र होती, तर सल्या व प्रदिप कसे वाचतात ?

In reply to by ब़जरबट्टू

ऑर्डर तात्यांचा असतो. अर्थात, तसं दाखवलं नाहि चित्रपटात. पण दोन्ही साइडचे बाप लोक घुमसत असतात. आर्ची आईला विचारते कि तात्यांचा राग कमि झाला असेल का ते. पुढे आईने तात्याकडे विषय काढणे व तात्याने संधीचा फायदा घेणे हे आमचं आम्हि गृहीत धरलं :)

In reply to by अर्धवटराव

"सिग्रेट पिना शेहेत के लिये हानिकारक है" टाईप "वैज्ञानीक इशारा 'वैधानिक इशारा' Scientific/ biological warning is different than statutory warning.

In reply to by अर्धवटराव

"सिग्रेट पिना शेहेत के लिये हानिकारक है" टाईप "वैज्ञानीक इशारा 'वैधानिक इशारा' Scientific/ biological warning is different than statutory warning.

अभ्या भावा एक नंबर लिवलस. त्येबी आपल्याच भाषेत. पयल्या आटवड्यात पिच्चर नाय पाहता आला. तोप्रेंत 'परिक्षणं' लय वाचलेत. आन शेवट खत्रा हाय हे समजलं. सालं आपन लय मोटं मोटं बोल्तो पन मनानं लय कमजोर हाय. (खरं सांगाया लाज का वाटावी). म्हून थेटरात पिच्चर पायला पन शेवट टाळला. तेच्यानंतर तूनळीवर नागराजदादा, परशा आन आर्चीचा इंटर्व्ह्यू पाह्यला. दादा जे जगला ते त्यांने डायरेक्टरच्या अँगलने दावलेय. आपल्याला विचार कराया लावला हेच त्या पिच्चरच यश आहे.

In reply to by पाषाणभेद

म्हून थेटरात पिच्चर पायला पन शेवट टाळला.
अगदी अगदी.. मी सुद्धा अगोदरच ठरवलेलं शेवट बघायचा नाही. माझ्या मूळे बाकीच्या फमिली मेम्बर्सनी सुद्धा नाही बघितला शेवट. घरी आल्यावर आईने सांगितलं कि "मला बघायचा होता शेवट"

सर्व वाचकांना धन्यवाद. प्रतिसादकांचा मी ऋणी आहे. सैराट पाहिल्यावर सर्वांना आवडेल अशी अपेक्षा नाहीच. बर्‍याच जणांना रिलेट होता येत नाही म्हणून आवडला नाही असाही मतप्रवाह असेल. कुणाविषयी तक्रार करायचा हेतू नाही. पुण्यामुंबई बाहेरही महाराष्ट्र आहे. प्रेमकहाण्या तर जिथे जिथे माणूस तिथे घडणारच. घडणार, सांगितल्या जाणार. मुद्दा सांगायच्या पध्दतीतला आहे. प्रत्यक्ष घडतेय असे वाटणे, आपल्याला त्या कहाणीचा एक भाग करुन घेणे अन प्रेक्षकाने आपली कहाणी त्या चित्रपटात पाहणे (सौजन्य : त.जोकरभाव) हे दिग्दर्शकाचे कौशल्य असे मी मानतो. अकलूज करमाळ्याकडचा भाग माझ्याच जिल्ह्यातला. भाषा मी बोलतो तीच, वातावरण रोज जे अनुभवतो तेच. घटना जशा घडलेल्या पहिल्यात तशीच. मला रिलेट होणं साहजिकच आहे. पण ते ज्या प्रामाणिकपणे मांडले गेले आहे ते दाद देण्यासारखे आहे. बॉलीवूडी चित्रपटाचा प्रभाव ग्रामीण भागात सुध्दा असतो. तो सैराटमध्येही दिसतो पण त्यापलिकडे शिक्षण, प्रसार आणि संवादमाध्यमे आदी गोष्टीमुळे आलेली मानसिकता परत चित्रपटाद्वारेच चित्रीत करायचे काम नागराज मंजुळेने केलेले आहे. अगदी दोन महिन्याखाली माझ्याच जिल्ह्यात अशाच एका जोडप्याने पळून लग्न केले. मुलगी उच्चवर्णीय राजकीय नेत्याच्या घरातलीच. चारपाच वर्षे बाहेर काढून दोघेही मुलासह मूळ गावी आले. पोलीसांच्या संरक्षणात सुध्दा राहिले. एके संध्याकाळी भर रस्त्यात त्याचा भोसकून खून करण्यात आला. मुलगी लहान मुलासह असल्याने वाचली. अगदी सोलापूर गावात मुलीशी बोलतो ह्या कारणाने तिच्या वर्गमित्राला समज देण्यात आली. तरीही मुलगी एक दिवस क्लासला जाते म्हणून तासभर गायब झाली. मुलीच्या आर्मीतल्या बापाने सरळ मुलाला हुडकून गल्लीत गाठून गोळी घातली. मुलगा ठार. काय विचार करायचा आम्ही? मनासारखे वागले नाहीतर आपल्याच किंवा कुणाच्यातरी औलादीला संपवायचे चक्क? कशाचा हा हक्क? बर यातून साध्य होते काय? कष्टाने उभारलेला संसार क्षणात मातीमोल? कायद्याच्या कचाट्यात सापडतील किंवा ज्या प्रतिष्ठेपायी हे खून होतात त्याच प्रतिष्ठेचा वापर करुन सुटतीलही. पण जीवच घ्यायचा ही मानसिकता अनाकलनीय आहे. अगदी पूर्ण सैराट पाहताना ऑनर किलींग हा शब्द माझ्या डोक्यात घुसला नाही इतके ते साहजिक वाटले. कशामुळे ही बधीरता आमच्या डोक्यात आलीय? पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान अन अस्मितांच्या कल्पना इतक्या पक्क्या होत चालल्यात की त्यापायी घडणार्‍या गैरकृत्यांना वैध ठरवले जातेय. ह्या गैरकृत्यांमुळे खरोखर कशाचा बळी चाललाय ह्याचा जरी विचार लोकात घुमला तरी सैराटने खूप सारे मिळवलेय. नागराज, रिंकू, आकाश, अजय अतुल ह्यांना केलेल्या कामाचे कौतुक मिळतेय, ते मिळावेच. त्यांचा गाववाला म्हणून अगदी हिरीरीने त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे हे माझे काम आहे. बाकी माझ्या अनुभवालाही आपण जी दाद दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद.

In reply to by अभ्या..

अगदी खरं बोललात! आपला हा प्रतिसाद आणि मूळ धागा सुद्धा आवडला. मुळात या चित्रपटाबद्दल इतकी चर्चा होतेय - उलट असो किंवा सुलट- याचाच अर्थ हा चित्रपट उल्लेखनीय आहे . यातच दिग्दर्शकाचं पहिलं यश. मी खरं सांगतो, इतकी सगळी चर्चा आणि तुम्ही व अजून काही जणांनी इथे मिपावर टाकलेले धागे वाचूनच मी हा चित्रपट बघायला गेलो. शेवट आणि डायलॉग सकट सर्व स्टोरी आधीच कळली होती. त्यात चित्रपट गृहातली काही तरुण मुलं शेवटच्या सीन मध्ये ही आरडा ओरडा करण्याच्या/ कमेंट्स करण्याचा मूड मध्ये होती. त्यामुळे म्हणावा तसा प्रभाव पडू शकला नाही, पण जर असे नसते तर माझ्यावर प्रभावी परिणाम झाला असता हे नक्की. बाकी तांत्रिक बाजूंमध्येही चित्रपट कुठेही कमी पडत नाही. स्टोरी ची वगैरे पूर्व कल्पना असल्यामुळे चित्रपट केवळ सादरीकरणाच्या दृष्टीकोनातून बघितला. सादरीकरण एकूणच मला अफलातून वाटलं. बाकी एक मनापासून वाटतं की एक मराठी चित्रपट एवढी प्रगती करत असताना त्याला जातीयवादाचे आणि इतर कुठलेही लेबल लावणे योग्य नाही. अगदी बिगर मराठी लोक सुद्धा हा चित्रपट पाहायला जाताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या यशातून मराठी चित्रपटसृष्टी अजून एक पाऊल पुढे जातेय किंवा निदान जाण्याचा प्रयत्न करतेय एवढं तरी सर्व मराठी जनतेने ध्यानात ठेवायला हवं असं मला वाटतं.

In reply to by अभ्या..

प्रतिसाद आवडला. लेखापेक्क्षाही जास्त आवडला. पण जीवच घ्यायचा ही मानसिकता अनाकलनीय आहे. सैराट आवडणे, न आवडणे हा वेगळा मुद्दा. पण ही मानसिकता कधीच कळलेली नाही. भारतातल्या सगळ्या सज्ञान मुलींचे भाउ आणि बाप यांनी मुलगी/बहिण ही आपली जबाबदारी आहे किंवा तिच्यावर आपली मालकी आहे या बुरसटलेल्या संस्कारातून मुक्त व्हावे. झालंच तर ते राखी बांधणे, रक्षण करणे वगैरे सोडून दिले तर अति उत्तम.

In reply to by अप्पा जोगळेकर

ज्यांचे प्रतिसाद वाचून मी मिपावर आलो त्या अप्पानी कौतुक केले, भारी वाटले. शतश: धन्यवाद अप्पा.

तजो लंबे रेस का घोडा है.....लेकिन इस घोडे ने दौड मे भाग तभि से लिया है जब एक मेगाबाईटी प्रतिसाद खःडग सन्यस्तः हो गयि थि ! बाकि मिपाकर समझदार है. और ह्म भि तजो उर्फ सन्यस्तः खःडग के तलबगार है.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

साहेब, तुम्ही ज्यांच्या विषयी बोलताय त्यांनी सन्यस्त होणे आणि माझे बॅन उठणे एकाच वेळेस घडले आहे हे लक्षात आलेले दिसत नाही. नको तिथं फार डोकं चालवून नेमकं काय मिळतं राव लोकांना? कसला तो आसुरी आनंद?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

श्रीयुत ईश्वरसर्वसाक्षी, तुमचा मिसळपाववरचा वावर फारच म्हणजे फारच मर्यादित दिसतो. कदाचित तुमची कंपनी तुम्हाला कंपनीचे इंटरनेट वापरु देत नसेल. तरी जेवढा वेळ आपण इथे दिसता तेवढा वेळ तर्राट जोकर हे माझा डुआयडी आहेत ह्याचा घोष करत असता हे दिसते. हे वेळोवेळी घडत आहे व त्यासंदर्भात एक गंभीर बाब म्हणून मला इथे लिहावेसे वाटले. ईश्वरसर्वसाक्षी, तुमच्या मिपासदस्य काळास आज १ वर्ष, ३ दिवस झालेत. तसेच तुमच्या सदस्यखात्यावर तुमची कुठलीही माहिती दिसत नाही. तुम्ही स्वतः आजवर एकही धागा काढला नसून निवडक अशा धाग्यांवर निवडक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुमचे वर्तन व प्रतिसादांचा बाज बघता तुम्ही स्वतःच एक डु-आयडी आहात अशी शंका आहे. पण तो माझा मुद्दा नाही. ते एक असो. तर्राट जोकर हे प्रत्यक्ष आयुष्यात कोण आहेत, त्यांना आपली ओळख का लपवाविशी वाटते किंवा खर्‍या नावाने लिखाण न करणार्‍या अनेक आयडींसारखे त्यांना राहावेसे वाटत असेल, तो त्यांचा प्रश्न झाला. त्यात मी किंवा कोणीही मिपासदस्य इथे कुणालाही जाब विचारु शकत नाही. तसे करायचे असेल तर मिसळपाववरच्या प्रत्येक सदस्याला आपले मूळ नाव, घराचा पत्ता, नोकरीचे ठिकाण, हुद्दा, फोटो आयडी सगळं जाहीर करावं लागेल. तसे मिसळपाव संस्थळाच्या धोरणात बसते किंवा कसे हे बघावे लागेल. आता प्रश्न माझा. मी इथे सुमारे पावणेदोन वर्ष लिहित आहे. सुरुवातीपासूनच मला कोणताही आडपडदा न ठेवता खरे नाव व खरी ओळख घेऊन लेखन करायची सवय आहे. पहिल्या धाग्यापासूनचा माझा मिपावावर बघितलात तर ज्याने माझ्या वैयक्तिक हितसंबंधांना बाधा येऊ शकेल अशा स्वतःच्या आयुष्यातल्या अतिवैयक्तिक बाबीही स्पष्टपणे मांडण्यात कचरलो नाही. काही कारणास्तव मी काही काळापासून मिपापासून दूर आहे पण नियमित वाचत आहे. चर्चांमधे भाग घेणे आता टाळतो, कारण त्यात खूप वेळ फुकट जातोय असे लक्षात आले. लक्षात घ्या मी कधीही निलंबित झालेलो नाही. तसेच कोणत्याही धाग्यावर कोणत्याही विषयावर कोणतीही मते मांडण्यास मला कोणतीही भीती कधीच वाटली नाही व आताही वाटत नाही. इथल्या कोणत्याही सदस्याच्या कोणत्याही मताला विरोधी मत द्यायचे असेल तर मी आयडीकडे न बघता मत देत आलो आहे. काही विषयांवरची माझी मते विखारी वाटली आहेत पण मी ती ह्याच आयडीतून दिली आहेत. मला दहा बारा डुआयडींची फौज बाळगून नपुंसक हल्ले करायची सवय नाही व गरजही नाही. इथे काही लोक मी नाना स्कॉच, तर्राट जोकर वैगरे आयडी घेऊन वावरतो असे समजतात. इतका वेळ घालवायला मजकडे सद्यस्थितीत वेळच नाही व गरजही नाही. मला जे काही लिहायचे असेल ते इथे बिन्धास्त-बेधडक माझ्याच आयडीने लिहू शकतो. आताही आणि भविष्यातही. ह्या काही लोकांची मला खरंच मौज वाटते कारण एकसारखे विचार असणारे सदस्य हे एकाच व्यक्तीचे डुआयडी आहेत असे ह्यांना खरोखर वाटते. जणू ह्यांच्या विरोधी विचार असणारा एखादा दुसराच प्राणी जगात आहे असे वाटत असावे. की आपण जसे वागतो तसेच दुसरेही वागत असतील अशी चोराच्या मनात चांदणं छाप मनोवस्था आहे की काय असे वाटते. हा प्रतिसाद देण्याचे कारण एवढेच की तुम्ही कुणावरही कोणाचे डुआयडी असल्याचा आरोप करत असता तेव्हा त्या सदस्याच्या सार्वजनिक वावरावर प्रश्नचिन्ह उभे करुन अपमानित करत असता. इथे माझे अनेक चाहते आहेत, काही घनिष्ठ मित्र आणि स्नेही ही आहेत. मला व्यक्तिगत ओळखणारे खूप लोकं आहेत, जे माझ्या फेसबुकवरुन, फोनवरुन प्रत्यक्ष संपर्कात आहेत. अशा लोकांच्या नजरेत मी विश्वासार्ह नाही, खोटारडा आहे असे चित्र उभे करण्याचे व माझ्यावरचा त्यांचा विश्वास घालवण्याचे हे तुमचे व काही विशिष्ट लोकांचे जे प्रयत्न होत आहेत ते अतिशय हिन दर्ज्याच्या मनोवृत्तीचे निदर्शक आहेत. विरोधी विचारांचा सरळ सामना न करु शकल्याने येत असलेल्या वैफल्याचेच हे लक्षण आहे. मी आजपर्यंत कोणत्याही सदस्यावर डु-आयडी असल्याचा आरोप केलेला नाही. (अर्थात मोगा, ग्रे.थिंकरसारखे लोक सोडून). मलाही असे आरोप सहन होणारे नाहीत. हे माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक प्रतिमेचे हनन आहे असे मला वाटते. माझ्यामते आयडी-डुआयडी ह्याबद्दल सगळे निर्णय घेण्याचा एकमेव व संपूर्ण अधिकार मिसळपाव मालक निलकांत ह्यांच्याकडे आहे. इतर कुणाही सदस्याने ह्याबाबतीत आगावू चोंबडेपणा करु नये असे माझे मत आहे. तुमचे जे काही तर्राट जोकर ह्या सदस्यासोबत स्कोअरसेटलींग असेल, तक्रार असेल ती तुम्ही तुमच्या व त्यांच्या दोघांमधे बघून घ्यावी. त्यात मला ओढण्याचे काहीही कारण नाही. धन्यवाद! - संदिप डांगे. (मिपा मेगाबायटी सन्यस्त खड्ग)

In reply to by संदीप डांगे

माबोवर तुम्ही नानाकळा या नावाने आहात आणि इथे मिपावर नाना स्काॅच म्हणून एक आहेत त्यामुळे काहीजण शंका घेत असावेत.तसेच एक "स्काॅच" मारली कि माणूस "तर्राट" होतो म्हणूनही असेल कदाचित. शिवाय लेखनशैलीत साधर्म्यता आणि ठराविक विषय असलेल्या(भाजप/हिंदूत्व/संघ/मोदी)धाग्यांवर स्काॅच आणि जोकर यांचे प्रतिसाद देतेवेळी साधलेले टायमिंग संशयास्पद वाटते म्हणूनही असेल कदाचित. असो, .. : :{डुआयडी}

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

हे सौंशयबिंशय घेत बसायला, डिटेक्टीवग्री करायला फार टाईम भेटत आसंल ना लोकांना? चार आयडी एकाच विचाराचे दिसतात म्हणून चारही एकाचेच हे अफलातून लॉजिक लावायचं तर भाजप/हिंदूत्व/संघ/मोदी च्या बाजूने लिहिणारे सगळे एकाचेच डुआयडी समजले पाहिजेत. क्या बोल्ते...?

In reply to by तर्राट जोकर

एकाच पद्धतीचे विचार असण्याचा प्रश्न नाय,प्रश्न टायमिंग साधण्याचा पण आहे. . डुआयडी असणे ही एक काॅमन बाब आहे,हा काही मोठा अपराध नाही,इथे मिपावर भल्याभल्यांचे डुआयडी आहेत. डिवचणार्यांना फाट्यावर मारा आणि लिहित रहा:-D

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

झिंग असं 17 वेळा आणि मग झिंगाट जाळ आणि धूर संगट च. आपल्या जवळ च्या सिनेमागृहात.... पहा फक्त सैराट. धन्यवाद

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

=)) =)) भल्याभल्यांचे डुआयडी!!! धन्यवाद!!!!!!!! असो. टायमिंगवरुन काही नसतं राव. ज्यांना डुआयडी ठेवायचेत ते असले 'ऑब्वियस' कामं करत असतील असं नसेल.

ए जिगर. सैराट १५० झाले की राव प्रतिसाद. माझा मीच करुन घेतो सत्कार ;) थेट आर्चीचे डोळे असणार्‍या आमच्या हिरवीनीचा एन्लार्जड फोटो घेऊन.

अभ्या भैताड, ह्यो धागा दोनशे कर्नार . आधीच सांगिटलो हुतो तुला. रातराणी ने पण भारी लिहिलंय ड्यू आयडी घिऊन ;)

पर्वती झोपडपट्टी मधले शुटींग आहे असे मला आज कळलं (https://www.facebook.com/abpmajha/videos/10156973288055271/). आता ज्यांनी हा सिनेमा -neet पाहिला असेल त्यांना झोपडपट्टी मधला एक गुलाबी झेंडा आठवत असेल… गुलाबी झेंडा == TRS == Telangana ==Hyderabad :D ह्याच्या 'attention to detail ' वर आपण फिदा हाय

यावेळच्या दहीहंडीचे फ्लेक्स आतापासुनच डोळ्यासमोर येत आहेत .

जबरदस्त परीक्षण!!! आपले लिखाण एक नंबरच असते. अगदी अर्चीसारखे तिखट-गोड! :-) मला काही दिवसांत बरेच नग भेटले. मी प्रत्येकाला 'सैराट' पाहिला का विचारतो. काही नमुनेदार उत्तरे: "चांगला आहे का? मी ऐकलं की वाह्यात आहे खूप? खरंच इतका चालतोय का? की नुसती हवा?" (तुझ्या त, नुसतं कुंपणावरून माशा हाकलतोय, जाऊन बघ की जरा) "अरे, मी म्हटलं चंपकला की एट लिस्ट मराठी फिल्म इंडस्त्रीला कोंट्रिब्युट करण्यासाठी तरी थिएटरला बघू बट चंपक यु नो म्हटला की लेपटोपवरच बघू. तिथे इतकी क्राऊड असेल..." (हिच्यामुळेच तर मराठी फिल्म इंडस्ट्री चालू आहे. हिने खांदा हलवला की खल्लास!) "थिएटरला जाऊन बघण्यासारखा नाहीये. इतका काही खास नाहीये. आजच मोबाईलवर मिळालाय. बघू सावकाश" (अरे साल्या, कधी तर पैसे काढ पाकिटातून!) जाऊ द्या...राग येतोय मला... बाकी अर्ची हे एक स्वप्न आहे. अर्ची एक गूढ रहस्य आहे. अर्ची पहाटेचा मंद गारवा आहे. अर्ची सुरेल मारवा आहे...जाऊ द्या.

In reply to by रमेश भिडे

भिडे अण्णा (जल्ला मेला चुकीचा शब्द) एक वार सैराट बघाच एकदम भारी लिवलाय अद्ध्यान अन् रातराणीन साल झिंग उतरना झालीय बघा सैराटची !!!

In reply to by माझीही शॅम्पेन

बघितला की! 'एवढं' काय आवडण्यासारखं आहे ते समजलं नाही. ख फ वर आधीही लिहिलेलं, पाटील आपल्या दांडग्या पोरांना आवरायचं सोडून त्यांना पाठीशी घालत असतो. आर्ची ही पण तशीच दांडगी आहे, बेजबाबदार आहे, सत्तेचा आणि बापाच्या पैशाचा आणि एकंदर सगळा माज असलेली आहे. याच मस्तीत एक पोरगा तिला आवडतो. त्याला 'थेट' पळवून न्यायचं धाडस दाखवते आणि फसते. त्यातनं जमिनीवर आल्यानंतर 'चलो, ठीक है' म्हनेस्तोवर माहेरचि माणसं येऊन 'कांड' करुन जातात. आर्चीच्या बंगल्याचं नाव पाहिलं का? 'अर्चना'. ती पाटलाची लाडकी पोरगी हाय दादा. नंतर सगळं तपशिलात येतं. गुंठामंत्र्यांची बिघडलेली पोरं आठवत राहतात. इथे आर्ची पोरगा असती तर लोकांच्या याच प्रतिक्रया असत्या का???

In reply to by रमेश भिडे

'एवढं' काय आवडण्यासारखं आहे ते समजलं नाही.
आता रामाची सीता कोण असा प्रश्न झाला हा , ढीगभर धागे आलेना मिपा वर , वाचले असतीलच की नवीन काय सांगणार
इथे आर्ची पोरगा असती तर लोकांच्या याच प्रतिक्रया असत्या का???
हा नवीन धाग्याचा विषय आहे (अजुन एक :) ) तुम्ही काढा मग त्यावर बोलू , हाकानाका

In reply to by रमेश भिडे

मला एकट्यालाच नव्हे, ८० कोटीचा धंदा 'सैराट'ला करून देणाऱ्या लाखो प्रेक्षकांना अर्चीने भुरळ घातली आहे. तिच्यामधला एक्स फ़ेक्टर जबरदस्त आहे. :-)

काय गोड कामं करतात ओ हल्लीची पोरं.... आणि आमच्या वेळचे गावाकडे असलेले पात्र सुद्धा भाषेवर मेहनत घेत नव्हते. इकडे आक्ख्या गावरान बोलीत च सिनेमा बनतोय. आवडलं आपल्याला!

काय गोड कामं करतात ओ हल्लीची पोरं.... आणि आमच्या वेळचे गावाकडे असलेले पात्र सुद्धा भाषेवर मेहनत घेत नव्हते. इकडे आक्ख्या गावरान बोलीत च सिनेमा बनतोय. आवडलं आपल्याला!

कडू प्यार्याची बत्तीशी वठली राव. 200 झाले. आपला सत्कार सेल्फ असतंय, कारन कुनाच्या बुडाखाली किती अंधार हाय समद्या मिपाला म्हैतेय. येत्या धाग्यात इरोधकांच डिपॉझिट जप्त झाल्याबिगर राहणार नाही.

दोनशे (प्रतिसादा)निमित्त अभ्याशेठ यांचा सत्कार या ठिकाणी जव्हेरगंज भाऊ याचे उप्स्थीतीत्,या ठिकाणी म्हाराष्ट्रातील लोककलांचे अभ्यासक आणि रसरशीत ग्रामीण जीवणाचे अनुभवी लेखक श्री धन्या भाऊ उर्फ गावडे मास्तर यांचे हस्ते, याठिकाणी तसेच का तर वेळ" असल्याने ज्येष्ठ लेणीबाज आणि सौंदर्यप्रेमी वल्ली चिंचवडकर्,याठिकाणी मध्य पुण्यातील धडाडीचे नेतृत्व वप्याभाऊ यांम्च्या उप्स्थीतीत्,अखिल मिपा "बघता काय्,लिहिते रहा" संघाचे आजीवन अध्यक्ष" सुक्ष्रीके यांच्या विद्यमाने पुण्यात मंडई गणपतीजवळ करण्यात येत आहे. याठिकाणी फूल ना फुलाची पाकळी ऐवजी थेट पुष्पगुच्छ याठिकाणी सर्वांचे लाडके आत्मुदा (मिपा भाव विष्व फेम व यमकांचे स्वामी) यांनी दिला आहे. या ठिकाणी अभ्या यांना एक जलरंगांची पेटी,एक ताव आर्ट पेपर आणि एक पेन्सिल संच देण्यात येत आहे. या ठिकाणी त्यांनी प्रेमाने दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करावा ही विनंती. अभ्या शेठ यांनी मान्य केल्यासच त्यांना "मस्तानी"पेय देण्यात येईल. आग्रह मान्य करावा ही याठिकाणी गाववाल्यांकडून नम्र विनंती. सचिव अखिल मिपा धागा शताब्दी/द्विश्ताब्दी सत्कार समिती पिंचि शाखा .

In reply to by नाखु

आयोव. मंडळ आभारी आहे मंडळ लै भारी आहे मंडळी तर लैच भारी आहेत.