धरम वीर
हा खरे म्हणजे त्या दशकातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. मलाही लहानपणी जेव्हा पाहिला तेव्हा खूप आवडला होता. गाणी चांगली आहेत, धर्मेन्द्राचे काम मस्त आहे. टिपिकल मनमोहन देसाई फॉर्म्युला आहे.
त्यामुळे यातील अचाट आणि अतर्क्यपणा मी वेगळ्या नजरेने बघतो. तेव्हा हे सगळे केवढे आवडायचे याची आता गंमत वाटते. सगळ्या चित्रपटाबद्दल लिहायचे झाले तर एक ग्रंथ होईल. तेव्हा थोडक्यात जमते का बघू :)
ही कथा कोणत्या काळात आणि कोणत्या प्रदेशात घडते माहीत नाही. एक मोठे राज्य असते. जीवन त्यात कोण असतो माहीत नाही पण त्याची बहिण मात्र राजकन्या असते. इंद्राणी मुखर्जी ती राजकन्या म्हणजे केवढा जुना काळ असणार! जीवनला राजगुरू असे सांगतो की तुझा 'बडा भांजा' तुला मारणार आहे. त्यामुळे तो आपल्या बहिणीला मारण्याची योजना आखतो. एकदा ती शिकारीला गेलेली असते. तर तिला पाण्याजवळ एक वाघ दिसतो. ती एक बाण मारते. तो बाण त्याला जेमतेम डार्ट बोर्ड वरचे डार्ट जेवढे चिकटतात तेवढाच लागतो. पण तो लगेच आडवा होतो. आणि दोन मिनीटात पायच काय पण शेपूट सुद्धा हवेत तरंगेल एवढा ताठ होउन जातो. ही तेथे जाईपर्यंत तिच्यावर हल्ला होतो. पण प्राण तिला वाचवतो. प्राण हा एक शिकारी असतो, त्याच्याकडे एक बाझ (ससाणा?) असतो, त्याने त्याला खबर दिलेली असते राजकन्या धोक्यात असल्याची. तो नक्की कोणता पक्षी आहे हे माहीत नसल्याने आपण त्याला 'शेरू' म्हणू, ते त्याचे नाव असते.
आता राजकन्या त्याच्याबरोबर त्याच्या घरी येते. हा आधीच तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि तिचा एक पुतळा बनवत असतो. मग तुला काय इनाम पाहिजे विचारल्यावर आणि 'जो मांगो वोह देंगे' वगैरे झाल्यावर तो त्या पुतळ्यावरचे कापड काढून तिला दाखवतो. तो पुतळा म्हणे तिचा असतो. वास्तविक तो 'शेरू' सोडून कोणाचाही म्हणून खपला असता. राजकन्येला लगेच लक्षात येते की हा तिलाच मागणी घालतो आहे. मग ते तेथेच लग्न करायचे ठरवतात.
त्यानंतर चित्रपटाला हीरो देण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट ते करत असताना एक वाघ तेथे येउन खिडकीची काच फोडून जातो. बहुधा वॉर्निंग द्यायला आला होता. प्राण तिला सांगतो की ही शेरनी आहे आणि त्या (मारलेल्या) वाघाचा बदला घ्यायला आलेली होती. ती पुन्हा येइल म्हणून आधीच तिला मारायला तो अंगावर एक तपकिरी शाल घेउन बाहेर पडतो. तेवढ्यात ती वाघीण एका वाटेत आलेल्या आदिवासीला मारून जाते. ते पाहून प्राण आपली शाल त्याच्या अंगावर टाकतो. मग तो आणि वाघीण यांची जोरदार लढाई होते. त्यात त्या वाघिणीचे इतके हाल केलेत की तेव्हापासून मनमोहन देसाईचा पिक्चर म्हंटला की वाघ दोन्ही हात जोडून उभे राहतात (आठवा 'मर्द' मधला तो नम्र वाघ). मग थोड्या झटापटीनंतर प्राण व वाघीण दोघे कड्यावरून खाली पडतात.
इकडे प्राण ला शोधायला ई.मु. बाहेर पडते आणि शाल घातलेला तो माणूस पाहून तिला वाटते की प्राणच मेला. हातातील तलवारीने जरा शाल इकडेतिकडे करून खात्री करणे वगैरे काही नाही. डायरेक्ट निष्कर्ष! आणि ती एखाद्या दगडाच्या पुतळ्यासारखी निर्वीकार होते. स्वयंवराला तिला तशी पाहून आलेले राजे निघून जातात. फक्त प्रदीप कुमार उरतो. त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी अनुरूप वाटेल यात आश्चर्य काय!
मग लग्नानंतर ती त्याला सर्व सांगते. येथे आपण नीट लक्ष दिले नाही तर "जब आपकी शादी हुई तब आप होशो-हवास मे नही थी" सारखे gems निसटतात. तेवढ्यात तिला चक्कर येते त्यामुळे ती गरोदर आहे हे निष्पन्न होते. तिचा मुलगा आपल्या राज्याचा वारस होईल हे प्रदीप कुमार तिला सांगतो. नंतर जीवन तेथे येतो. त्याची बायकोही गरोदर असते.
दोघी एकाच वेळेला मुलांना जन्म देतात. आता खरी मजा चालू होते. बाळ क्र. १ म्हणजे जीवन च्या बायकोचे. त्याला तो पाळण्यात ठेवतो तोच ई.मु. ला ही बाळ झाल्याचे त्याला कळते. तिची दाई त्याला शेजारी पाळण्यात ठेवण्याच्या ऐवजी सहज पळवून नेता येण्यासारख्या एका ठिकाणी ठेवते व ई.मु. ला जुळे होत असल्याचे कळल्याने आत जाते. तेथे जीवन येतो व बाळ क्र. २ ला राजवाड्यावरून खाली टाकून देतो. पण 'शेरू' त्याला वरच्यावर कॅच करतो. वास्तविक त्याने झेलला नसता तरी त्या बाळाला घाबरायचे काहीच कारण नव्हते कारण त्याला शक्यतो दुसर्या धर्माच्या एखाद्या माणसाने आपोआप झेलला असताच- एका स्लिप च्या हातातून उडालेला चेंडू कधीकधी दुसर्या स्लिप मधला फिल्डर पकडतो तसा. मग बाळ क्र. ३ त्याच जागी आणून ठेवले जाते. ते जीवन पळवतो आणि आपले बाळ (क्र. १) तेथे आणून ठेवतो. पण हे न आवडल्याने त्याची बायको रात्री परत अदलाबदल करते. दरम्यान बाळ क्र. २ ला 'शेरू' एका लोहाराच्या घरी आणून ठेवतो.
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे नंबर दिले कारण नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही.
'शेरू' त्या लोहाराच्या घरी आणतो कारण तेथे प्राण बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. लोहार व त्याच्या बायकोला कळते की नऊ महिने प्राणची सेवा केल्यामुळे त्यांना हे बाळ मिळाले. त्यामुळे ते त्याचा सांभाळ करायचे ठरवतात. तेवढ्यात प्राण शुद्धीवर येतो. आणि आश्चर्य म्हणजे ती आधी त्या आदिवासीच्या अंगावर टाकलेली शाल - ज्यामुळे तो मेला हे ई.मु. समजली- ती येथे परत त्याच्या अंगावर असते!
मग त्या लोहाराचा मुलगा दगड फोडताना दाखवला आहे. त्याच्या अंगात चकचकीत चामड्याचा काळ्या रंगाचा आणि लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य! तो मुलगा एका घावात तो दगड फोडतो आणि एकदम मोठा होतो. त्याचा तो ड्रेस ही त्याच्याबरोबर मोठा होतो. हा धरम. तिकडे डबल अदलाबदल झाल्याने जीतेन्द्र व्हायचा चान्स हुकलेला रणजीत जीवन चा मुलगा आणि जितेन्द्र राजपुत्र.
मग धर्मेन्द्रला झीनत च्या सैनिकांनी बंदी बनवलेले असताना जितेन्द्रने बंजारा लोकांबरोबर गाणे म्हणून नाचणे, नंतर त्या पिंजर्याभोवती धूर करून धरम ला त्यातून काढून वरती झीनत च्या शेजारी बसलेल्या सुजीत कुमार ला त्यात बांधणे वगैरे चमत्कार घडतात. यांचे घोडे वेव्हलेन्थ वरून आपापल्या मालकाची शिटी ओळखून कोठूनही धावत येतात. धर्मेन्द्र राजकन्या झीनत ला तर जीतेन्द्र बंजार्यांच्या कबिल्यातील नीतू सिंग ला पटवतो. झीनत तर आखडू राजकन्याच असते, पण नीतू सिंग सुद्धा फारशी 'सेन्सिटिव' नसावी. कारण आंघोळ करताना आपल्या पाठीवर नेहमीच्या मैत्रिणी ऐवजी जीतेन्द्र हात फिरवतोय हे तिला कळत नाही. मग या सगळ्यांनी नाकारलेले मंगेतर, झीनत चा भाऊ देव कुमार, जीवन, रणजीत वगैरे फौज एकत्र होते व त्यांच्या उद्योगांमुळे धरम व जीतेन्द्र यांच्यात वितुष्ट येते. शेवटी दोघांची मारामारी चाललेली असताना ते भाऊ आहेत हे लक्षात येते.
मग क्लायमॅक्स चालू होतो. इतका वेळ सर्व जमिनीवर चाललेले असताना शेवटचे युद्ध मात्र तीन जहाजांवर होते. एक हीरोंच्या साईडचे, एक जीवन वगैरेंचे आणि एक सुजीत कुमार आणि कं चे. पण हे फक्त एक मिनीट टिकते. कारण नंतर दर मिनीटाला कोणीतरी दातात तलवार धरून पाण्यात उडी मारून दुसर्या जहाजावर जात असतो. नंतर इतका गोंधळ होतो की मला वाटले यांनी दोन मिनीटे ब्रेक घेउन कोण कोणत्या जहाजावर आहे याची खात्री करून मग युद्ध चालू करावे.
शेवटी ई.मु. किनार्यावर येते, तिच्या मागोमाग जीवन चाकू घेउन येतो, तो तिला मारणार एवढ्यात 'शेरू' मधे येतो आणि तो चाकू जीवन च्या हातातून उडून खडकावर वरती पाते उभे राहील असा सोयीस्कर पडतो. मग उपस्थित कोणाच्या तरी एका फाईट ने जीवन त्यावर पडतो आणि 'चक्कू खरबुजे पे या खरबुजा चक्कू पे...' उक्तीनुसार मरतो.
मात्र या चित्रपटाने बर्याच गोष्टी सिद्ध होतात. राजे महाराजे बग्गीची चाके निखळवण्यासाठी पान्हे वापरत असत. मला कॉस्च्युम मधले फारसे कळत नाही पण इतरत्र वाचलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या देशातील आणि वेगवेगळ्या काळातील कपडे भारतातील राजे, राण्या वगैरे एकाच काळी वापरत होते हे यातून सिद्ध होते. प्राण ई.मु. ला सुरक्षित आणून सोडतो आणि मग सूर्यास्ताकडे घोड्यावरून जातो हे पाहून rides into sunset हे इंग्रजी वचन सुद्धा आपल्याकडूनच आले हे उघड होते. जगात सात आश्चर्ये आहेत हे त्यावेळी सर्वांना माहीत होते हे एकवेळ समजू शकते, पण गालिब चे शेर ही आपल्याकडे आधीपासूनच माहीत होते हे 'इश्क़ और खुशबू छुपाये नही छुपते..' या ओळींतून सिद्ध होते.
यातील काही फोटो व इतर वर्णन तुम्हाला या साईटवर मिळेल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगाई गं!
+१ अगाई..ग्ग !
मस्त!!
मजा आली.
१०००%सहमत
सह्ही लिहिलं आहेस फारेंड! =))
त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी
बैलाचा डोळा ( बुल्स आय)
हॅहॅहॅ....
पण मग यातला धरमवीर कोण?
वा..
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे
कारण आंघोळ करताना आपल्या
आयायायायगं! नेहमीप्रमाणे
सुरेख्..एकदा पहायलाच हवा..
गं ज स गंगा जमुना सरस्वती
नेहमीप्रमाणेच लै भारी!
(विषय दिलेला नाही)
ठ्ठो !
खल्लास!!!!!!!!! सिनेमाला हिरो
अभिनंदन
मस्तच!!!! अगाध विनोदबुद्धी!!!
बाजार उठवला... =)) =)) =))
झक्कास!
सुपरहीट!
:)
चित्रपट पाहून जेव्हढी मज्जा
इंद्राणी मुखर्जी!
धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या आवडत्या "धरमवीर" नामक विनोदी सिनेमाचे...
ठ्ठो.......