Skip to main content

टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)

लेखक राजेश कुलकर्णी यांनी शनिवार, 21/11/2015 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?) कोणाच्या व्यवसायाबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या पोटापाण्याचा मार्ग असू शकतो. माझ्या मते या रेम्या डोक्याच्या सिरियल्स समाजाला मानसिकदृष्ट्या अधु करण्याचे काम करत आहेत; मराठी-हिंदी- बहुतेक सगळ्याच. समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच. महिनोंमहिने वा वर्षानुवर्षे हे दळण दळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. चांगला विषय घेऊन मोजक्या वेळेत तो पूर्ण करणे असे असायला हवे. पण त्याऐवजी प्रेक्षकांना व्यसन लावण्याचे आणि निर्बुद्ध बनवण्याचे काम केले जाते या मतिमंद मालिकांमुळे. तेव्हा टीआरपी हे तांत्रिक वा आर्थिक कारण असो की इतर काही, हे स्वत:ला विकलेले लेखकच या प्रकाराला जबाबदार आहेत यात शंका नाही. एरवी कोणतेच काम कमी दर्जाचे नसते. पण हे पांढरपेशे लेखक (खरे तर लेखक म्हणायला हे नालायक - पाट्या टाकणा-या या जातीला समर्पक काहीतरी नवा शब्द हवा. उदा. पोभपाटालेखक - पोटभरूपाट्याटाकणारे लेखक). मनोरंजनाच्या नावाखाली सतत दुस-याचा मत्सर, कटकारस्थाने, बटबटीतपणा, अतिसोशिकपणा, अचकटविचकट विनोद या गोष्टींचा मारा करत असतात. त्यांना खरोखरच लेखनाची आवड असती तर त्यांनी असे कचरा लेखन केले असते का? त्यामुळे असे विकले जाण्यास त्यांनाच जबाबदार धरायला हवे. चांगले कार्यक्रम दिले तर कोणाला नको आहेत? टीव्ही पाहण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही वा करायची इच्छा नाही, अशा लोकांनी तो कार्यक्रम पाहिला काय आणि न पाहिला काय, काय फरक पडतो? वर्तमानपत्रात जे विकते ते छापणा-यांना आपण माफ करतो का? अशांना पोटभरू पत्रकारच म्हणतो ना! क्रिकेटच्या मैदानात केवळ चॅनलला किंवा स्पर्धेच्या आयोजकांना सामना रंगतदार व्हायला हवा म्हणून नको त्या गोष्टी केल्या तर आपण त्या सहन करू का? (मॅच फिक्स्ड की काय हे कळायला सहसा मार्ग नसतो ही गोष्ट वेगळी). प्रत्येकाने आपले काम दर्जा राखून करणेच अपेक्षित असायला हवे ना? तेव्हा हे समाजात उजळ माथ्याने वावरणारे हे समाजद्रोही निव्वळ पोटभरूच आहेत आणि त्यांच्यातले काही जेव्हा उठसुट विविध पुरस्कार स्विकारायला जातात तेव्हा त्या पुरस्काराचे नावही पोटभरू आणि विकला गेलेल्यासाठीचा पुरस्कार असेच हवे. टीआरपीच्या नावाखाली चॅनलला हवे ते द्यायला यांचे डोके तरी यांच्याकडेच असते ना! व्यावसायिकता म्हणजे स्वत:ला असे विकणे असे तरी अपेक्षित नको. कोणी म्हणेल, की दाखवतात ते न पाहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. मात्र ते सोयीस्करपणे विसरतात की जे सुबुद्ध आहेत ते हे टाळू शकतील, किंबहुना पाहिले तरी विसरून जाऊ शकतील. मात्र येथे बहुसंख्य प्रेक्षक तेवढे सुबुद्ध नसतात. यात कोण किती श्रीमंत, किती शिकलेला किंवा अडाणी, कोणत्या समाजातला, हे अध्याहृत नाही. हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. तेव्हा असेच लोक बहुसंख्येने असतात. अमेरिकेसह अनेक देशांमधील सामाजिक अभ्यासांवरून लक्षात आलेले आहे की अशा मालिका समाजाला निर्बुद्ध, मठ्ठ बनवतात, स्वत:ची विचारशक्ती गमवायला भाग पाडतात, दुस-याचा हेवा, मत्सर, द्वेष करायला शिकवतात. तेव्हा कोणाला या वरकरणी हार्मलेस प्रकार वाटत असेल तर त्यामागचे सत्य हे आहे. तेव्हा यांचे पोट भरावे म्हणून कामाच्या दर्जात तडजोड करणारे हे लोक समाजाचे गुन्हेगारच आहेत. जे मनापासून वाटते ते लिहीले. शीर्षकातील लेखक या शब्दापुढील प्रश्नचिन्ह यांना लेखक म्हणावे तरी कसे यासाठी आहे. आता धडाडू देत तोफा.....मी यापूर्वी ऐकलेले प्रतिवाद....लिहिणारे लिहितात, पाहणारे पाहतात, माझे काय जाते, टीव्हीचा रिमोट तरी आपल्याकडेच असतो ना...तू नॅशनल जिओग्राफिक पहा, तुला कोणी थांबवलेले अाहे.....यात लेखकाचा/लेखिकेचा दोष नसतो, का तर ते जाहिरातदारांच्या म्हणजे टीआरपीच्या रेट्यामुळे मालिकानिर्मात्यांच्या दबावामुळे तसे लिहितात..........वगैरे. तेव्हा यापेक्षा वेगळा प्रतिवाद पहण्यास आवडेल.

वाचने 12230
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

राकु साहेब टीव्ही सिरीयल्स चे लिखाण कसे चालते याची बहुधा तुम्हाला माहिती नसावी. बहुतेक टिव्ही सिरीयल्स या कोणीतरी दिलेल्या कल्पनेवरुन लेखक लिहीत असतो. त्याला स्वतःची कल्पनाशक्ती वापरायची संधी क्वचितच मिळते. याला कारणे बरीच आहेत. सर्वप्रथम निर्मित्याला त्याची आर्थिक गणीते संभाळायची असतात. यात कलाकारांचे मानधन तारखा स्टुडिओ चे भाडे इतर तंत्रज्ञ वगैरे वगैरेची चिंता असते. उपलब्ध असतील त्या कलाकारांनुसार शुटिंग उरकून घ्यावे लागते. चॅनेल्स ला जहिराती ची चिंता असते. बर्‍याचदा चॅनेल्स हे काही कम्पन्यांशी करार करुन एखादी सिरीयल चालवतात. या सर्व गदारोळात लेखकाल नगण्य महत्व असते. बरेच कलाकार हे एकापेक्षा जास्त सिरीयल्स/नाटक/ नोकरी हे सगळे एकाचवेळेस करत असतात. त्यामुळे त्यांच्या तारखा मिळतील तशा अ‍ॅडजस्ट करुन घ्याव्या लागतात. खूपदा जे निर्मात्याला फायनानसर च्या मर्जीनुसार कथानकात एखादे पात्र / कल्पना अ‍ॅड अ‍ॅनवेळी घालाव्या लागतात. यात लेखकाला स्वतन्त्र्य नसतेच. एखाद्या लेखकाने जर स्वतन्त्र बाण्याने वागायचे ठरवले तर त्याला घरी बसण्याचीच वेळ येईल. नॅशनल जिओग्राफिक सारखे चॅनेल हे केवल एखाद्या विषयाला वाहिलेले असतात. त्यांची आर्थीक गणीते वेगळ्या गोष्टीम्वर आधारीत असतात. त्यांची तुलना करता येणार नाही

In reply to by विजुभाऊ

त्याचा उल्लेख केलाच आहे. पण यासगळ्याचा होणारा एकूण परिणाम पाहता प्रेक्षकांनी याची काळजी का करावी? प्रत्येक मालिका सर्वोपरी उत्क्ृष्टच असावी अशी अपेक्षा करता येत नाही. पण कमीत कमी ती थिल्लर तरी नसावी एवढी माफक अपेक्षा नसावी का? तुम्ही जे म्हणता की लेखकाला स्वातंत्र्य नसतेच ते खरेच आहे. तर मग स्वातंत्र्य नसलेले काम करायला हे काही मिलिटरीचे काम नाही. तेथे आदेश पाळावे लागतात. तेव्हा यामागची कारणे न पाहता या वास्तवावर व त्याच्या परिणामांवर भाष्य करणे योग्य.

In reply to by संदीप डांगे

वैयक्तिक (टीकात्मक?) प्रतिसाद टाळून मुद्द्याला हात घातला तर चर्चा अजून रोचक होऊ शकते असे मज पामराला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हाताला लागेल असा मुद्दा द्या ब्वॉ शोधून... तसेच धागालेखकास चर्चेत किती विण्टरेस्ट आहे तेही द्या शोधून.

In reply to by संदीप डांगे

त्रोटक प्रतिसादातूनही काही सध्या होईलसं दिसत नाही. बाकी लेखकाचा पुर्वोहीतसा मला माहित नाही पण खालील प्रतिक्रियांमध्ये बऱ्याचशा अशा प्रतिक्रिया दिसल्या. असो, मुद्दा ग्राह्य आहे. उपाय या लेखात नाही पण कुठेतरी शोधणे गरजेचं आहे.

त्याचा उल्लेख केलाच आहे. पण यासगळ्याचा होणारा एकूण परिणाम पाहता प्रेक्षकांनी याची काळजी का करावी? प्रत्येक मालिका सर्वोपरी उत्क्ृष्टच असावी अशी अपेक्षा करता येत नाही. पण कमीत कमी ती थिल्लर तरी नसावी एवढी माफक अपेक्षा नसावी का? तुम्ही जे म्हणता की लेखकाला स्वातंत्र्य नसतेच ते खरेच आहे. तर मग स्वातंत्र्य नसलेले काम करायला हे काही मिलिटरीचे काम नाही. तेथे आदेश पाळावे लागतात. तेव्हा यामागची कारणे न पाहता या वास्तवावर व त्याच्या परिणामांवर भाष्य करणे योग्य.

तर मग स्वातंत्र्य नसलेले काम करायला हे काही मिलिटरीचे काम नाही. तेथे आदेश पाळावे लागतात. हल्ली कोणलाच कामात स्वातन्त्र्य नसते. गिर्‍हाईकाची अपेक्षा हाच आदेश असतो.यातून अगदी अमिताभ बच्चन किंवा पंतप्रधान सुद्धा सुटलेले नाहीत. तेव्हा यामागची कारणे न पाहता या वास्तवावर व त्याच्या परिणामांवर भाष्य करणे योग्य. या काँमेन्टवर नक्की काय प्रतिक्रीया द्यावी हे उमगत नाहिय्ये. इतक्या पोकळ विचारावर हसावे की तुम्हाला कारणे न जाणून घेता केवळ फुटकळ प्रतिक्रीयेतून लेखकाना दोषी ठरवून सुळी देण्यात स्वारस्य आहे हे जाणून रडावे हे समजत नाहिय्ये. असो.......... एकूणातच तुम्हाला कुठल्याच बाबीचा खोलवर उहापोह नको आहे हे जाणवले. आता फक्त झाड शोधून पॉपकॉर्न आणतो.........

In reply to by विजुभाऊ

माझ्या होला तुम्ही हो म्हणावे अशी अपेक्षा नाही. या लेखकांवरील दबावाबद्दल तुम्ही जे लिहिले आहेत, ते मी टीआरपीच्या निकषाद्वारे, जाहिरातदारांच्या दबावामुळे होते हे लिहिलेलेच होते. तुम्ही त्याचेच वर्ण केले अाहे. तेव्हा ते का होते हे मला माहित नाही असे नाही. तेव्हा या पोस्टचा उद्देश कारणात न जाता त्याच्या परिणामाबद्दल बोलण्याचा आहे. त्याच्याही पूढे जाऊन मी लिहिलेलेआहे की पोटार्थी असण्यात गैर काही नाही. पण त्याच्यामुळे काही वाईट परिणाम होत असेल तर त्याबद्दल त्यांनाच दोषी धरायला हवे. हे तुम्ही समजून घेतलेत का माहित नाही. तरीही "इतक्या पोकळ विचारावर हसावे की तुम्हाला कारणे न जाणून घेता केवळ फुटकळ प्रतिक्रीयेतून लेखकाना दोषी ठरवून सुळी देण्यात स्वारस्य आहे हे जाणून रडावे हे समजत नाहिय्ये." असे म्हणत अाहात तर माझी हरकत नाही. असो. तुम्ही जो उहापोह म्हणून केलात त्याबद्दल तर मी लगेचच उत्तरात लिहिले आहे. त्यात तुमच्यावर टीका वगैरे काही नाही. पण तुम्हाला हसावे की रडावे हे कळेनासे झाल्यामुळे पुढे कसे जाणार? असो.

In reply to by विजुभाऊ

हल्ली कोणलाच कामात स्वातन्त्र्य नसते. गिर्‍हाईकाची अपेक्षा हाच आदेश असतो.यातून अगदी अमिताभ बच्चन किंवा पंतप्रधान सुद्धा सुटलेले नाहीत. हो. खरं आहे, विजूभाऊ. मी ही सुटलेलो नाही.

तुमचे आक्षेप बरोबर आहेत पण बाजाराचा रेटा (market pressure) हा इतका जबरदस्त आहे की अशा प्रकारच्या पाट्या टाकणं हे लोकांना करावंच लागतं. शिवाय टेलिव्हिजनमध्ये चॅनेल्सचा संयम आजकाल फार कमी असतो. जर एखादा कार्यक्रम दोन महिन्यांमध्ये पुरेसे टीआरपी जमा करु शकला नाही तर तो आॅफ एअर जाऊ शकतो. आणि हे जर बदलायचं असेल तर प्रेक्षकांनीच असल्या मालिकांवर बहिष्कार टाकला पाहिजे. पण तसं होत नाही. रच्याकने तुम्ही हा लेख लिहून अशा मालिकांवर आणि त्यांच्या लेखकांवर टीका केली आणि हा लेख लिहिण्याआधी तुम्ही अशा मालिका थोड्याफार बघितल्या असणार. म्हणजे लिकांच्या निर्मात्यांचा हेतू साध्य झाला. बदनामी होगी तो क्या नाम नही होगा हा साधासरळ हिशोब इथे आहे.

In reply to by बोका-ए-आझम

मी यासंदर्भात आणखी एक-दोन पोस्ट इतर माध्यमांमध्ये टाकल्या आहेत. त्यावर चर्चा होऊन या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसावा.

ते काहीही असू दे. तुमच्या लेखांचे शिर्षक छोटे करा बघु आधी. संपादकमंडळी यांना प्लीज मदत करा. तीन तीन ओळी एकच लेख खात आहे. जागेबद्दल व दर्जाबद्दल फारच जागरूक असलेल्यांकडून अशी अपेक्षा नाही.

या सगळ्या गोष्टींना फक्त एकच व्यक्ति जबाबदार! 'प्रेक्षक!'

असल्या सिरियल्स आम्ही बघत नसलो तरी समाजातल्या काही वर्गाला दुसरा कोणताच विरंगुळा नसतो. विशेषतः निवृत्त, खूप म्हातारे लोक्स, ज्यांचे बाकी सगळे परदेशांत रहात आहेत, अशा लोकांना काहीतरी टाईमपास हवा असतो. तो या सिरियल्सच्या रुपाने मिळतो. समाजात सर्व प्रकारचे लोक रहातात. त्यांतल्या बेताची बुद्धी असलेल्या लोकांना सुद्धा, या सिरियल्स आवडत असतील. मागे एकदा गावस्कर म्हणाला होता, " हिंदी फिल्म्स आर मेड फॉर मासेस बाय द अ‍ॅसेस." यावर मोठा गदारोळ झाला होता. कारण कोण अ‍ॅस, हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही.

In reply to by तिमा

टाइमपास म्हणजे प्रत्येकवेळी आपले डोके बाजुला ठेवून करायची गोष्ट असे असायला नको. प्रत्येक मालिका, प्रत्येक चित्रपट उत्तम बनणे शक्य नसते. पण कमीत कमी थिल्लर बनू नये व त्याचा सतत मारा समाजावर होऊ नये, एवढी अपेक्षा तरी आपण निश्चित ठेवू शकतो. सरावाने प्रत्येकाची आवड चांगली होऊ शकते. पण त्याच्या डोळ्यासमोर काही चांगले दिसायला, त्याच्या कानावर काही चांगले पडायला तरी हवे ना!

अरे आवरा यांना कुणी तरी मोगा परवडले एकवेळ काड्या करत फिरत असतात पणअसा वात आणत नाहीत जिलब्या पाडुन

In reply to by धनावडे

सुशमय, एवढे अस्वस्थ होऊ नका. वात येत असेल तर मला ब्लॉक करायचा काही पर्याय आहे का शोधा, नसेल, तर तुमचे दुर्दैव. मात्र पोस्ट वाचायची तसदी घेतली नाही तरी चालेल. तुम्हाला आणखी वात येऊ नये म्हणून ही सूचना. बाकी प्रत्येक वेळी वाचून सवरून अषिच कमेंत करायची असेल तर तुमची मर्जी. धन्यवाद.

In reply to by अजया

कळलं का मितान आय डी आता तरी?
+१ चालायला लागली का तुमची बुद्धी आता तरी? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =))

बरं, ते तथाकथित लेखक दळभद्री आहेत हे मान्य करतो! आता पुढं काय करायचं बोला?? म्हणजे तुम्हाला अपेक्षित काय आहे??

अहो, मालिकांमुळे लेखकूच्या घरी लक्ष्मी येते आणि लक्ष्मी देवीचे उल्लू (घुबड?) वर बसून घरात येते. एकदा खुशवंत सिंग म्हणाले होते, माझे लेखन अश्लील/ वाहियात असले तरी लोक आनंदाने वाचतात. माझा लेख आंग्ल भाषेत पहिल्या दिवशी ५००० रुपयात जातो, दुसर्या दिवशी अनेक हिंदी वृत्तपत्रात ५०० रुपयात आणि नंतर प्रादेशिक भाषेत १०० रुपयात. जवळपास ५०-६० वृत्तपत्रात लेख प्रकाशित होतो. माझ्या घरी लक्ष्मी येते. जळणारे लोक जळतात. तुम्हाला कुणी मालिका लिहायला बोलविले तर तुमी बी आनंदाने लिहाल हो.

In reply to by विवेकपटाईत

मी या दुष्टचक्रावर एक उपाय सुचवू पाहतो. माझी याआधीची एक पोस्ट शोधून टाकेन. त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया द्या. विषय पुढे जाईल.

In reply to by राजेश कुलकर्णी

@विषय पुढे जाईल>> काय गरज आहे? तेच पीठ त्याच जिलब्या ,णवीन काही तळा ना.. बाकी सगळे राम म्हणतात,तुम्ही मरा(तरी!) म्हणाना!

In reply to by राजेश कुलकर्णी

मी या दुष्टचक्रावर एक उपाय सुचवू पाहतो. माझी याआधीची एक पोस्ट शोधून टाकेन. त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया द्या. विषय पुढे जाईल.
एकाने काय होतंय? दहा बारा तरी शोधून आणा.

तुमच्या आधुनिक शुद्र धाग्यावर प्रतिसाद बहुधा बंद करण्यात आले आहेत म्हणुन येथे देत आहे. हा त्या धाग्यावरील प्रतिसाद आहे या धाग्याचा विषय समानच आहे काहीसा म्हणुन इथे. अशा मालिकांविषयी तुमच्या आक्षेपात काही तथ्य आहे. मात्र एक बघा एक अस आहे की जी माझी रुची तीच अभिरुची असा काहीसा अट्टाहास जाणवला. आता व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच अभिरुची असु शकतात मला लाल रंग आवडतो तुम्हाला दुसरा ही सामान्य बाब आहे त्यावरुन श्रेष्ठ कनिष्ठता ठरविणे राजेश जी काहीसे अति ताणल्यासारखेच नाही वाटत का ? दुसरं अस की काही अनेक एकाकी जीव असतात जगात काही वृद्ध मंडळी असतात त्यांना शारीरीक मानसिक सक्रीयतेची अधिक मागणी करणारे इतर छंद जोपासणं दुर्देवाने शक्य नसतं. त्यांना टीव्ही त्यातल्या मालिका हाच एकमेव खरच सांगतो एकमेव आधार असा असतो. काही एकाकींना तेचं जीवन असत अस नाही की त्यांना त्यातील फोलपणा माहीत नाही पण तो त्यांच्या जीवनाचा एक भाग असतो त्या मालिकेबरोबर त्यांच एक कौटुंबिक नात तयार झालेल असत. खोट जरी असल तरी ते त्यात एक सुख एक विरंगुळा शोधत असतात. इतर कुणाला त्रास न देता उपद्र्व न करता एक भ्रामिक जग का असेना ते त्यांना जगवत आहे. ते तरुण सक्षम आहेत तर हा सल्ला एकवेळ ठीक पण ते तसे नसले तर त्यांचा टीव्ही हाच एक मोठा मित्र कुंटुंब आधार असं बरच काही आहे. अनेकदा प्रत्यक्ष जीवनात गमावलेल्या नात्यांची, हरवलेल्या काळाची, कमतरता ते त्या मालिंकामध्ये शोधत असतात. कुठलाही पर्याय न देता तो ही आधार त्यांच्या कडुन काढुन घेतला तर .... थोड त्याकडे आपण संवेदनशीलतेने विचार करुन बघावा असे सुचवितो. तिसरं अस की प्रत्येकवेळी माणुस काहीतरी वैचारीकच श्रेष्ठ वरच्या दर्जाजच मनोरंजन हव अशी त्याची मनस्थिती नसते. दिवसभर समजा अतिशय कठोर मानसिक ताण देणारा जॉब एखादा करतो तर त्याला अस ही असतं की काहीशी कमी ताण देणारी एखादी मालिका हलक फुलक मनोरंजन हव असत. अशी पण काहींची मागणी असते. एक फार मोठे हार्ट सर्जन आहेत जे दिवसभर फार गुंतागुतीच्या शस्त्रक्रीया करतात ते घरी आल्यावर फक्त न्युज डिस्कवरी काहीच न बघता फक्त तुम्ही जी वर उल्लेख केला तीच मालिका बघतात खर सांगतोय विश्वास ठेवा आता तुम्ही त्यांना काय म्हणणार ? ही एकेकाची अनेक वर्षांच्या सवयीने तयार झालेली एक जीवनशैली असते त्यात त्याचे ठरलेले टप्पे असतात तसे त्यांचे छंद असतात. आदुबाळ जे तुम्हाला सुचवीत होते त्यामागे त्यांचा चांगला हेतु होता ( मीही त्यांना व्यक्तीगत ओळखत नाही मी त्यांची व्यक्तीगत पाठराखण म्हणून बोलत नाही कृपया गैरसमज नसावा ) मी त्यांचा आंतरजालीय वावर जो आहे त्यावरुन केवळ सांगतोय त्यांचा म्हणण्याचा अर्थ केवळ इतकाच होता की तुम्ही प्रतिसाद कमी व लेख जास्त देताय त्यावर त्यांना तुम्ही संस्थळावर अधिक सहभागी व्हावे ही अपेक्षा होती इतरांचे लेख विचार यांचाही आनंद घ्यावा या अर्थाने त्यांना ही तुमचे लेखन आवडलेले आहे हे त्यांनी तुम्ही केलेल्या टीकेनंतरही स्पष्ट करुन सांगितले थोडं लक्षात घ्या चांगल्याच भावनेने तो प्रतिसाद होता तुम्ही पुनर्विचार करावा ही नम्र सुचवणी. शीर्षक काहीसे प्रक्षोभक जरुर वाटले ते टाळता आले असते सहजच त्याने नकळत तुमच्या लेखातील मुळ आशयापासुन डायव्हर्जन च होत आहे व तुम्हालाही निष्कारण जो विचार तुम्हाला आम्हास सांगावयाचा आहे त्यात अडथळे येऊन स्पष्टीकरणे इ. होत आहेत. याने तुमच्या लेखाविषयी गैरसमजच वाढेल व मुळ हेतु बाजुलाच राहील. काहींना तो दुखावल्यासारखा होतो. बाकी राजेश जी आपले अभिनंदन व स्वागत आहे. आपल्या मते जी चांगली वा तुमची स्वतःची जी अभिरुची आहे त्याविषयी वाचायला आवडेल. धन्यवाद !

In reply to by मारवा

धन्यवाद. आदुबाळ यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. याबाबतीत मी त्यांना दिलेले अखेरचे उत्तर तुम्ही पाहिले असेल. मालिंका व शूद्र याबाबतीत: तुम्ही एकाजणांची ऍट्रॉसिटीची भीती घालणारा एक प्रतिसाद पाहिला असेल. मला या व्ृत्तीचा राग आहे. असे लोक जरा शब्द खाली पडू देत नाहीत. तेथे 'जन्माने नव्हे - कर्माने असा स्पष्ट उल्लेख असूनही. अर्थात असे स्पष्टीकरण द्यावे लागते हेच दुर्दैव. मी सदैव श्रेष्ठ मनोरंजन मिळावे असे अजिबात म्हणत नाही. पण सतत थिल्लर मारा नको असा आग्रह धरणे चुकीचे नाही. आता जे दिसते त्याला थिल्लर म्हणण्याशिवाय पर्याय नाही. मी वर एकदोन ठिकाणीही हे लिहिले आहे. शिवाय लोकांना चांगल्या अभिरूचीचे आवडत नाही असा गैरसमज या लोकांनीच पसरवलेला आहे. चांगल्या - म्हणजे श्रेष्ठच असे नाही.

In reply to by राजेश कुलकर्णी

थिल्लर असल्या तरी अशा मालिका पाहील्या जात आहेतच ना , मग इथे चर्चा करुन किंवा भांडुन अशा मालिका बंद होणार आहेत का? मालिका बनवणार्‍यांकडुन दखल घेतली जाणार आहे का? नसेल तर उगाच ईथे वाद घालुन, चर्चा करुन , एकमेकांचे अपमान करुन काही साध्य होणार आहे का? अजुन बरेच चांगले विषय आहेत ज्यावर न वाद घालता चर्चा केली जाउ शकते.

In reply to by कविता१९७८

सोशल साईट वर व्यक्त होणे म्हणजे सतत वाद , चिडचिड व्हायलाच हवी का? तुमचे लेखन चांगले आहे . एखादा माहीतीपर धागा काढा , चर्चा करायला नक्कीच आवडेल.

In reply to by राजेश कुलकर्णी

तुमच्या सतत थिल्लर मारा नको या मताशी सहमत आहे. काही सकस विचाराची स्वाभाविक भुक कुठल्याही संवेदनशील विचारी माणसाला असतेच. चांगल्या अभिरुचीचे आवडत नाही असे ही नाहीच. राजेश जी मला तुमच्या चांगल्या अभिरुंचींवीषयी जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल कुठल्या प्रकारच्या मालिका तुम्हाला आवडतात ? कुठले छंद आहेत तुमचे ? आजपर्यंत सर्वात जास्त अभिरुची संपन्न करणारा अनुभव तुम्हाला कुठल्या छंदात लाभला ? काय चांगल तुम्हाला गवसलय थोड शेअर करा आमच्या सोबत त्यावीषयी होऊन जाऊ द्या एकदा. ही विनंती. धन्यवाद

In reply to by मारवा

+१११ सांगा बरं पर्याय तुमची अर्थातच उच्च असलेली अभिरुची पण जाणून घ्यायला आवडेल.

ब्रुनेइच्या सुलतानाने पंचावन्न बायका केल्या होत्या.( आकडयाबाबत चूकभुल द्यावी घ्यावी)तुम्ही कुटचे सुल्तान वो? ते लेखाबद्दल इचारतोय, वूजिच गैरसमज नको

काय भारी लिहिले आहे! तुमची परवानगी असेल तर हे लिखाण फेसबुक आणि व्हॉटसएप वरती शेअर करू का? मी इथे फक्त तुमचे लिखाण वाचायला येत असतो. पण तुम्ही खूप कमी लिहिता अशी माझी तक्रार आहे. निदान रोज तुमचे चार धागे तरी हवेतच. तुमचा पंखा खाजेश शूलपर्णी

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेश कुलकर्णी सर, वरच्या प्रतिसादातली तक्रार (कमी लिहिता आणि रोज दोन चार धागे टाकण्याची) मनावर घेऊ नका :)

या मालिका पाहा म्हणुन अण्णा हजारे आपल्य दारात उपोषणाला बसले का? नाही! दाऊदने दुबईहून फोन केला होता का? नाही! मग का बघता? असंख्य वाहिन्यांवर असंख्य कार्यक्रम अव्याहत सुरू असताना याच मालिका का बघता? दर्जा बाजूला ठेवा. निर्माते मालिका अर्थप्राप्तिसाठी काढतात. अगदी रमाबाई रानडे यांच्या मालिकेतही रमाला पटकन मोठी न करणं, झाल्यावरही प्रत्येक भागाचा बहुतेक वेळ सासवांनी केलेला जाच, सहनशिल रमा हे दाखविण्यात गेला. ते बालपात्र प्रेक्षकांना आवडलं म्हणताना तुकोबांच्या मालिकेतही सुरुवात तुकोबांच्या आणि त्यांच्या पत्निच्या (अगदी लग्नाआधीच्या) बालपणाने केली गेली आणि अनेक महीने तुकोबा बालच राहिले, लोकांनी बहुधा ते आता संत होतील, मग संत होतील या अशेवर अनेक भाग पाहिल्यावर मालिका पाहणे बंद केले असावे. तर सांगायचं तात्पर्य निर्माता आपली मालिका चालावी म्हणून काढतो. यांचा प्रेक्षकांचा अभ्यास उत्तम असतो. मराठी मालिकांचा विद्यमान प्रेक्षकवर्ग म्हणजे साधारण ६०-६५ च्या पलिकडच्या वयाचे मराठी प्रेक्षक. हे बाहेर फारसे जात नाहीत (जाउ शकत नाहीत), घरात यांच्याशी बोलायला कुणी नसतं, घरातले सगळे आपल्या दैनंदिन जीवनक्रमात गुरफटलेले असतात तेव्हा हा वर्ग म्हणजे भरपूर संख्येने उपलब्ध असलेला लक्ष्यवर्ग. मग बहुतेक मालिकात या वर्गानं त्यांचा बालपणात, तारुण्यात जे पाहिलं, जे आजही त्यांच्या मनात अठवणीच्या रुपानं आहे आणि जे आज उपलब्ध नाही ते द्यायला सुरूवात केली. बहुतेक मालिकांत केंद्रबिंदू असलेलं कुटुंब हे एकत्र कुटुंब असतं. हे कुटुंब सदनिकांमध्ये राहात नाही तर घरात राहतं/ वड्यात राहतं, बंगल्यात राहतं. एक वडीलधारं पात्र. एक अगदी 'माठ' म्हणजे महासोशिक पात्र जे अन्याय आनंदानं सहन करतं, वर सर्वांसाठी मरतं. एक महाकजाग, कारस्थानी पात्र. अधून मधून आग लावायला बाहेरचं पात्र. भरपूर योगायोग. नेमक्या होऊ नयेत त्या वेळी चुकामुकी. एकंदर सतत एखाद्या (प्रेक्षकांना सुरुवातीलाच आवड्लेल्या) पात्राच्या वाट्याला उपहास, अन्याय, दु:ख दाखवणं अत्यावश्यक. एखाद पात्र अन्याय करत राहणारं आणि त्याला कुणाचा प्रतिकार न होणं हेही आवश्यक. या पात्राने भरपूर कारस्थानं करायची आणि ती उघडकीला येणार इतक्यात विलक्षण योगायोगानं ती बचावणं हे पाहिजेच. कुणाच्यातरी विषयी अपार साहनुभुती आणि कुणाच्यातरी विषयी अमाप तिरस्कार आणि निदान पुढच्या भागात तरी चांगल्या पात्राला न्याय मिळेल, दुष्ट पात्राचे कारस्थान उघडकीला येईल किंवा या भागात तरी प्रिय पात्रावरचं संकट टळेल अशी परिस्थिती निर्माण केली जाते. थोडक्यात दर्जा गेल्या खड्ड्यात, पण 'पुढच्या डावात नक्की जिंकु' म्हणुन कफल्लक होइपर्यंत डाव टाकत राहणार्‍या जुगार्‍याप्रमाणे प्रेक्षकांना पुढील भाग पाहायला भाग पाड्णे ज्याला जमेल तो जिंकला. तद्दन भिकार कथानक, बट्बटीत अभिनय करणारी पात्र, दिग्दर्शनाची गरज नाही . अनेक विसंगती ज्या कुणालाही पटत नाहीत, तेच ते पण, या सर्वावर मात करते ते प्रत्येक भागात आवड्त्या पात्रावर येणारे नवे संकट आणि कारस्थानी पात्राचा नवा कावा/ पवित्रा. अभिनयाची गरजच नाही - तांत्रिक बाबी ते सांभाळुन घेतात ( म्हणजे चेहरा गरागरा फिरणं, ओव्हर एक्स्पोज करुन पुन्हा नॉर्मल करणं, जोडीला कर्कश्श पार्श्वसंगीत), दिग्दर्शनाची गरज नाही कारण तमाम प्रेक्षक पुढच्या क्षणी काय होणार हे ओळखून असतात. लेखन म्हणजे बहुधा 'आजचा प्रसंग' एवढेच सांगितले जात असावे - कारण मूळ लेखनात फेरफार केल्याने वा शब्द बदलल्याने काही फरक पडत नाही. एक प्रकारे हे सुलभीकरण आहे. कोणी आला वा गेला म्हणुन काहीही फरक पडत नाही. आता या मालिकांविषयी जरा चांगलं. मालिका भिकार असतात, त्या फारशा पुढे सरकत नाही, तोचतोचपणा असतो हे तर वरदानच आहे. संध्याकाळी मालिका चालु असताना आपापसात गप्पा मारताना याची आडकाठी होत नाही, एखादा दिवस बघितली नाही म्हणुन काही फरक पडत नाही, म्हणजेच दिवसभर विखुरलेलं कुटुंब जेव्हा संध्याकाळी एकत्र येतं तेव्हा सर्वांना एकत्र बसून संभाषण करता येतं. जर मालिका अभ्यासपूर्ण, आशयघनं असत्या तर सगळ्यांना आळीमिळी गुपचिळी बसावं लागलं असतं. आणि घरातले लोक आपापल्या खोलीत आपापला मार्यक्रम लावून बसले असते. मागणी तसा पुरवठा. तुम्ही बघू नका, ते दाखवणं बंद करतील. उगाच चर्चा व्यर्थ आहे.

In reply to by सर्वसाक्षी

छान प्रतिसाद. सर्वसाक्षीजी, आता निसर्ग नियमांनाही डावलून वर्ष-वर्ष गरोदरपणं चालताहेत. (संदर्भ सांगितलाच पाहिजे का?)

In reply to by मितान

जरा कुठे समाजाचे प्रबोधन करायला निघालो होतो तर या विघ्नसंतोषी लोक्कानि खोड़ा घातला. आता बघा जान्हवी श्री बरोबर फिरायला गेली आहे. तर किमान त्यांना रायगडावर पाठवायचे मग श्री तिला रायगडाचा इतिहास समजावून सांगतो आहे किंवा टकमक टोकावर उभे राहून ते समुद्रासपाटिपासून अमुक अमुक फुट उंचीवर आहे असे सांगतो असे काहीतरी दाखवले तर कीत्ति कित्ती समाज प्रबोधन होते. श्रीचे बॉलणे संपल्यावर "काहीही हां श्री" हां पेटेंट डायलॉग मारायला आमची ना नव्हती. पण मेल्याना कदरच नाही मुळी. भागेश शू करणी रामदेव बनायला गेलो होतो. आसाराम बनवून टाकला.

मी काय म्हणतो, गरज अजिबात नाहीये पण हा धागा टाकण्याआधी एकदा टेलिव्हिजन मालिकांच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असतात तर बरं झालं असतं. अर्थात प्रेक्षकांनी तो करण्याची गरज नाही पण त्याच्या अनुषंगाने जर आपण मुद्दे मांडले असते त्याच्यावर एवढा गदारोळ झाला नसता.

जन हो आपण च्युईंग गम खाल्ले आहे का? सुरुवातीला स्वाद चांगला असतो. बराच वेळ चावले तरी पोटात काहीच जात नाही. थोड्या वेळाने स्वादही राहत नाही. मग आपण काय करतो नवे च्युईंग गम चघळायला घेतो. आणि तीच कहाणी परत चालू होते. हीच परिस्थिती सगळ्या धारा वाहिकांची आहे कोण रे ते म्हणतो आहे? हीच स्थिती काही लोकांच्या धाग्यांची आहे. पुढचा धागा बरा असेल या अपेक्षेने उघडतो आणि पूर्ण वाचतो आणि तीच कहाणी परत चालू होते.

अरे हो विचारायचंच राहिले. कसलंही कथानक नसताना किंवा काहीही पुढे किंवा मागे जात नसतानाही "बिग बॉस" चे टी आर पी का वाढते?

In reply to by अन्नू

त्यांनी मलिका म्हटलंय. मालिका नाही. ;)

खरोखरच भयानक आहे. वस्तूतः खर्‍या नायिका किंवा त्यासारखे दिसणारे नायक उपलब्द असतांना या बाप्याला सहन करणे म्हणजे आपल्या रात्री खराब करण्यासारखे आहे.

हल्ली झी वरच्या मालिकांचा दर्जा ढासळत आहे... पुन्हा एकदा उंच माझा झोका सारखी ऐतिहासिक मालिका सुरू झाली तर बरं होईल... :D