Skip to main content

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 19/12/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला. त्यांनी गाडीचा तपशील लक्षात ठेवला व सुरक्षेची पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले की पहारा सहज भेदता येईल. क्रांतिकार्यासाठी, शस्त्रांसाठी पैसा आवश्यक. तो मिळवायचा कसा? समजा लुटमार केली कुणा सावकाराला, जमिनदाराला लुटले तर क्रांतिकारक हे नाहक लुटारु म्हणुन बदनाम होणार व त्यांच्या कार्याचा प्रसार होण्याऐवजी बदनामी होणार व जनाधारही नाही मिळणार. मग यावर उपाय काय? तेव्हा हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांनी दिशा दाखविली. ते म्हणाले की सरकारी खजिना लुटायचा व सरकारचे धन कार्यासाठी कारणी लावायचे. त्यांनी ही योजना आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगितली व सगळे चर्चेअंती तयार झाले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी ८डाऊन मध्ये हुतत्मा चंद्रशेखर आजाद, हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अश्फाकऊल्ला, हुतात्मा राजेंद्र लाहीरी या गाडीत प्रवासी म्हणुन शिरले. गाडी काकोरी स्थानक ओलांडुन जाताच या पैकी दोघांनी गार्डला आपले काही सामान स्थानकावर राहिले असल्याचे सांगत गाडी थांबवायची विनंती केली. गार्डने ती अव्हेरताच त्याला बेसावध गाठुन त्यांनी आडवा केला व साखळी खेचून गाडी थांबविली. गाडी थांबताच इतर क्रांतिकारकांनी वेगाने हालचाल केली. काहींनी गार्डला आडवा पाडुन ठेवला, काहींनी खजिन्याच्या डब्याच्या दारावरील पहारेकऱ्यांना लोळवुन आत प्रवेश केला व तिजोरी बाहेर ढकलली. काही क्रांतिकारकांनी बाहेरचा ताबा घेतला व पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडुन घबराट निर्माण केली. मात्र हे सर्व होत असतांना क्रांतिकारकांनी ओरडुन सर्व प्रवाशांना संगितले की ते दरोडेखोर नसून क्रांतिकारक आहेत, ते देशकार्यास्तव केवळ सरकारी खजिना लुटणार असून जनतेला काही अपाय करणार नाहीत वा लुटणारे नाहीत; त्यांनी प्रवाशांना बाहेर डोकावणे धोक्याचे असल्याचे सांगुन गाडीतच बसून राहायचे आवाहन केले. गाडीतुन बाहेर फेकलेली भरभक्कम तिजोरी सहज फुटत नव्हती. अचनक समोरुन एक गाडी भरवेगाने येताना दिसली आणि आता गाडी आपण थांबविलेल्या गाडीवर आदळणार या क्ल्पनेने सगळे धास्तावले. मात्र ती गाडी बाजुने निघुन गेली, ती डेहराडुन एक्सप्रेस होती. सर्वांचा जीव भांड्यात पडला. अखेर तिजोरी फोडुन गाठोड्यात पैसे घेउन सगळे रात्रीच्या अंधारात पसार झाले. हुतात्मा चंद्रशेर आजाद यांनी सुमारे तीन मण पैशाचे ओझे सायकल वरून २४ मैल वाहुन नेले. दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्वत्र पसरली. या बातमीने इंग्रज सरकार हादरले व चवताळलेही. देशभरात काकोरीचे नाव गाजले व त्या क्रंतिकारकांची नावे सर्वतोमुखी झाली. हे क्रांतिकारक होते हुतात्मा चंद्रशेखर आजाद हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल हुतात्मा अशफाकऊल्ला खान हुतात्मा ठाकूर रोशन सिंह हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी श्री. मन्मथनाथ गुप्त श्री. केशब चतर्जी श्री. बनवारी लाल श्री. मुकुंद लाल श्री. सचिंद्रनाथ बक्षी कानशिलत बसलेली ही थप्पड सरकारला सहन होण्यासारखी नव्हती. पोलिस यंत्रणा चवताळुन उठली व काकोरी परिसरातील एक अन एक गांव पिंजुन काढले गेले. सर्व आरोपींवर मोठी ईनामे घोशीत केली गेली. प्रलोभन व धाकदपटशा अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न सुरू झाले. अखेर वाचाळता व फितुरी यांनी घात केला व २६ सप्टेंबर रोजी हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल पकडले गेले. पाठोपाठ हुतात्मा राजेंन्द्रनाथ लाहिरी, हुतात्मा ठाकुर रोशन सिंह व अनेकजन पकडले गेले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागासाठी ५४ जणांची धरपकड झाली. हुतात्मा अशफाकऊला खान दहा महिने भूमिगत राहण्यात यशस्वी ठरले. त्यांचा दिल्लीतुन कागदपत्रे मिळवून रशियात निसटुन जायचा बेत होता. मात्र या कामात मदत करण्याचा बहाणा करीत एका पठाणाने त्यांचा घात केला व ते अखेर पकडले गेले. मात्र अखेरपर्यंत हुतात्मा चंद्रशेखर आजाद व एक अन्य असे दोघेजण अखेरपर्यंत सरकारच्या हाती लागले नाहीत. अभियोग सुरू होताच देशभरात खळबल माजली. सर्वत्र प्रचंड जनजागृती झाली. या खटल्यात देशभक्तांच्या बचावासाठी संयुक्त बचाव समिती स्थापन झाली जिचे सद्स्य होते मोतीलाल नेहरु, डॉ. गणेश शंकर विद्यार्थी, गोविंद वल्लभ पंत इत्यादी नेते. लाला लजपतराय व जवाहर लाल नेहरु हे क्रांतिकारकांना तुरुंगात भेटुन गेले तर प्रसिद्ध साहित्यिक मुन्शी प्रेमचंद देखिल अभियोगाच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहिले होते. ’प्रताप’ दैनिकाने तर अग्रलेख लिहिला "देशाची मौल्यवान रत्ने सरकारी कोठडीत". हा साधासुधा खटला नव्हता तर सम्रटाच्या सत्तेला आव्हान दिल्याबद्दल उभारलेला राजद्रोहाचा महाअभियोग होता. काकोरी प्रकरणात प्रत्यक्ष घटनेच्या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत खरेतर फक्त एक जण मृत्युमुखी पडला होता, पण तरीही सर्वांना जास्तीत जास्त क्रूर सजा देऊन ऋजणारी क्रांती नष्ट करायचा सरकारचा अटोकाट प्रयत्न होता. या खटल्यातील प्रत्येक आरोपी सरकारच्या डोळ्यात आधीपासूनच सलत होता. प्रखर देशभक्ती, हिंदी, उर्दु, पंजाबी, बंगाली व इंग्रजी भाषा अवगत असणारे व साहित्यिक असलेले प्रखर नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेले रामप्रसाद बिस्मिल ज्यांनी हिंदुस्थान प्रजसत्ताक संघट्नेच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचला होता, त्यांना सरकार आपला महाशत्रू मानत होते. पंडितजी गोरखपूर तुरुंगात असताना हुतात्मा सरदार भगतसिंह प्रभृतींनी त्यांना तुरुंगातून बाहेर काढायची योजना आखली होती. भूमिगत असलेले हुतात्मा चंद्रशेखर आजाद वेश पालटुन मोटारहाक्याच्या रुपात वावरत होते. मात्र सरकारला कुणकुण असल्याने पहारा कडक होता. अनेक क्रांतिकारकांनी त्यांना नावे व वेश बदलुन भेटायचा प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न सुरू असूनही काही होत नाही असे दिसताच पंडितजींनी एका शेराच्या माध्यमातुन अखेरचा निरोप श्री. विजयकुमार सिन्हा यांच्या हस्ते सहकाऱ्यांना इशारा म्हणुन धाडला: ’मिट गया जब मिटनेवाला, फिर सलाम आया तो क्या! दिल की बरबादी के बाद, उमका पयाम आया तो क्या!’ म्हणजे आता वेळ थोडा उरला आहे, कय करायचे ते लवकर करा अन्यथा फार उशीर झालेला असेल. साहित्यिक व शायर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या हुतात्मा बिस्मिल यांचे नाव घेताच ’सर फरोशी की तमन्ना’ हे गीत ओठी येते. ही हुतात्मा रामप्रसाद यांच्या ओटी असलेली रचना, मात्र ही त्यांची आहे की हसरत मोहानींची यात काहीसा संभ्रम आहे. या अभियोगात हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अशफाकऊल्ला, हुतात्मा ठाकूर रोशन सिंह व हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मन्मथनाथ गुप्त व शचिंद्रनाथ बक्षी यांना काळ्यापाण्यावर जन्मठेपेची तर इतर अनेकांना सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठवल्या गेल्या. तुरुंगातुन आपली सुटका होणे शक्य नाही हे समजताच पंडितजींनी निरवानिरवीला सुरूवात केली, त्यांना काकोरी कटातील धन व वापरलेली शस्त्रे यांची माहिती आपल्या हिं.प्र.स. च्या साथिदारांना द्यायची होती. त्यांनी तुरुंगात गुपचुप कागद जमा करुन आपले आत्मचरित्र लिहिले व अनेक भागात ते जमेल तसे बाहेरही पाठविले. या आत्मचरित्राचा अखेरचा भाग त्यांनी आपल्या हौतात्म्याच्या अगदी दोन दिवस आधी म्हणजे १७ डिसेंबर १९२६ रोजी लिहिला व बाहेरही पाठवला. त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे जमा करुन त्यांच्या पश्चात त्यांचे आत्मचरित्र पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले व सरकारने त्यावर तत्परतेने बंदीही घातली. अखेरच्या भेटीत आई व वडिलांबरोबरच आईने आपल्या भाच्यालाही येउद्या अशी गळ घातली व तुरुंगाधीकार्‍यांनी ती मान्य केली. तो भाचा म्हणजे हिं.स्.प्र.से चे श्री. शिव वर्मा हे वेषांतरात गेले होते. त्यांना शस्त्रे व पैसा कोठे लपविला आहे ते जाणुन घ्यायचे होते. सहा फूट उंचीचे हुतात्मा अशफाकऊल्ला खान हे अत्यंत साहसी वृत्तीचे. ते उत्तर प्रदेशतील शहाजहानपूरचे. तेही शेरोशायरी करीत असत. त्यांची देशभक्ति प्रखर होतीच पण ते द्रष्टे होते. धूर्त इंग्रज हिंदु-मुसलमान यात फूट पाडीत आहेत ज्यायोगे त्यांना राज्य करणे सोपे जाईल हे त्यांनी ओळखले व त्यांनी समाजाला सातत्याने धर्म विरहीत राष्ट्रवादाचा महिमा सांगितला. फोडा व झोडा या नितीचा अवलंब करणाऱ्या इंग्रजांनी तोच प्रयोग अशफाकऊल्लांवरही करायचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिस अधिक्षक तसाद्दक हुसेन याची नेमणुक केली. धर्मांध व हिंदुद्वेष्ट्या तसाद्दकने हुतात्मा अशफाक यांना फोडायचा प्रयत्न केला. त्यांनी असे सांगितले की बिस्मिल हा पंडित. तो हिंदु देशासाठी लढतोय. पण तुझे काय? तु तर पाक मुसलमान! तुला या हिंदु राज्याचा काय उपयोग? समजा स्वातंत्र्य मिळाले तर तुला हिंदुंचा गुलाम व्हावे लागेल. यावर हुतात्मा असहफाकसाहेबांनी शांतपणे सांगितले की पंडितजी हिंदुंसाठी नव्हे हिंदुस्तानसाठी लढत आहेत. मी हिंदु नाही पण हिंदुस्थानी आहे, आणि गोऱ्यांच गुलाम होण्यापेक्षा मला आजाद हिंदुस्थानी होणे अधिक चांगले वाटते. बहुधा हुतात्मा अशफाकऊल्ला खान हे स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले पहिले मुसलमान आणि त्यांना त्याचा विलक्षण अभिमान होता. हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी हे बालपणापासुनच ध्येयाने प्रभावित झालेले. ते ’युगांतर’ चे सक्रिय कार्यकर्ते होते. ते संघटनेच्या कार्यातुन हुतात्मा बिस्मिल यांच्याकडे आकर्षित झाले व त्यांनी काकोरी प्रकरणात पुढाकार घेतला. ते मूळचे पूर्व बंगालच्या पाबना जिल्ह्यतील मोहनपूर गावचे. (आताचा बांग्लादेश). त्यांच्यावर बंगालमध्ये ही क्रांतिकारक कारवायांसाठी खटला भरला गेला होता व त्यांनी तुरुंगवासही भोगला होता (दक्षिणेश्वर बॉंब खटला). हुतात्मा ठाकूर रोशनसिंह हे शहाजहानपूर जिल्ह्यातील नवादा या गावचे ठाकुर. घरचे गडगंज श्रीमंत. हुतात्मा रोशनसिंह हे नेमबाजी व कुस्तीमध्ये प्रविण होते. त्यांना असहकार आंदोलनात दोन वर्षे शिक्षा झाली. मात्र आपला तुरुंगवास कारणी लावत ते इंग्रजी शिकले. पुढे अर्थातच आंदोलनाचे वैफल्य लक्षात येताच ते सशस्त्र क्रांतीकडे आकर्षित झाले. हे चारही हुतात्मे अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच असहकार आंदोलनात सर्वस्व त्यागुन झोकुन दिलेले. मात्र ’एक वर्षात स्वातंत्र्य देतो, मला सहकार्य द्या’अ से सांगत अनेक तरुणांना सरकारी शाळा सोडुन आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या गांधींनी अचानक आंदोलन मागे घेतले अणि हे सर्वजण आंदोलने व निषेधघोष यांचे मिथ्यापण लक्षात येऊन अखेर ’रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या?’ या उक्तीवर अढळ झाले. या चारही जणांनी आनंदाने फास गळ्यात ओढला. मात्र या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले व फाशी दिले गेले. सर्वात पहिला मान हुतात्मा राजेंन्द्रनाथ लाहिरी यांचा. ते गोंडा येथे १७ डिसेंबर १९२७ रोजी ’मृत्यु ही तर जीवनाची दुसरी अवस्था आहे, त्याचे भय वा दु:ख का करावे’ असे सांगत फासावर गेले. हुतात्मा ठाकूर रोशनसिंह १९ डिसेंबर १९२७ रोजी एका हातात वीणा घेउन दुसऱ्या हाताने आपल्याच गळ्यात दोर चढवुन अलाहाबाद येथे फाशी गेले. हुतात्मा अशफाकऊल्ला हे १९ डिसेंबर १९२७ रोजी ’माज़े हात कुणाच्यही रक्ताने भरलेले नसताना मला इंग्रज सरकार अन्यायाने फाशी देत आहे, मात्र मी देशासाठी फासावर जाणारा पहिला मुसलमान क्रांतिकारक आहे याचा मला विलक्षण अभिमान वाटतोअ असे सांगत हाती कुराण घेऊन फैजाबादच्या तुरुंगात फासावर गेले. "तुमच्या साम्राज्याचा सर्वनाश हीच माझी पहिली व अखेरची इच्छा आणि तिच्याखातर मी पुन्हा पुन्हा पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा पुन्हा फासावर जाईन" असे ठणकावुन सांगत हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल १९ डिसेंबर १९२७ रोजी गोरखपूर तुरुंगात फासावर गेले. मात्र जाताना हुतात्मा बिस्मिल जुलमी सरकारला इशारा देऊन गेले मरते ’बिस्मिल’, ’रोशन’, ’लाहिरी’, ’अशफाक’ अत्याचारसे होंगे पैदा सैंकडो इनकी रुधिर की धारसे काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन.

वाचने 34402
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. हेच म्हणते... सर्वसाक्षीजी.. आपलेही अभिनंदन. आपण इतके सुंदर लेख लिहून वेगवेगळ्या क्रांतीकारकांची ओळख करून देत आहात. इतकी माहिती कुठे मिळवता हाच प्रश्न पडतो.. आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

आपण इतके सुंदर लेख लिहून वेगवेगळ्या क्रांतीकारकांची ओळख करून देत आहात. इतकी माहिती कुठे मिळवता हाच प्रश्न पडतो.. मलाही हाच प्रश्न पडतो..! साक्षिदेवा, तुझं खरंच कौतुक वाटतं! आणि या लेखांच्या ऑथेंटिसिटीबद्दलही मला पूर्ण खात्री आहे! सर्व क्रांतिकारांना सलाम..! तात्या.

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. या चार हुतात्म्यांना आमचे ही विनम्र अभिवादन :)

गाडी काकोरी स्थानक ओलांडुन जाताच या पैकी दोघांनी गार्डला आपले काही सामान स्थानकावर राहिले असल्याचे सांगत गाडी थांबवायची विनंती केली. गार्डने ती अव्हेरताच त्याला बेसावध गाठुन त्यांनी आडवा केला व साखळी खेचून गाडी थांबविली.
या पायरीमागचे कारण नीटसे कळू शकले नाही. गाडी थांबवायचीच होती तर गार्डला गाडी थांबवण्यासाठी विनंती करण्याच्या भानगडीत न पडता कोठल्याही डब्यातून सरळसरळ साखळी ओढणे सहज शक्य होते. गार्डला विनंती करून त्याने ती अव्हेरल्यावर मग त्याला आडवा करून साखळी खेचण्याऐवजी सरळसरळ गार्ड नाही अशा ठिकाणावरून साखळी खेचण्याचा मार्ग अधिक सोपा, सरळ, शक्तीचा कमी व्यय करणारा आणि अहिंसक होता. (पुढे प्रत्यक्ष खजिना लुटताना गार्ड आडवा आल्यास त्याला आडवा करणे कदाचित गरजेचे असावे, परंतु केवळ साखळी खेचण्यासाठी गार्डला आडवा करण्याची काहीच गरज नव्हती.)
काही क्रांतिकारकांनी बाहेरचा ताबा घेतला व पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडुन घबराट निर्माण केली.
जनतेच्या मनात दहशत माजवणे हे क्रांतिकारकांचे उद्दिष्ट नसावे असे यापुढील वाक्यांवरून वाटते. कारण नाहीतर ''जनतेला काही अपाय होणार नाही" हे ओरडून सांगण्याची काहीच गरज नाही. पण मग अशा परिस्थितीत पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडून घबराट निर्माण करण्यामागचे प्रयोजन कळत नाही.
अचनक समोरुन एक गाडी भरवेगाने येताना दिसली आणि आता गाडी आपण थांबविलेल्या गाडीवर आदळणार या क्ल्पनेने सगळे धास्तावले.
या वाक्याचे या कथेच्या प्लॉटमधील महत्त्व (सिग्निफिकन्स / रेलेव्हन्स) कळले नाही.
हुतात्मा चंद्रशेर आजाद यांनी सुमारे तीन मण पैशाचे ओझे सायकल वरून २४ मैल वाहुन नेले.
या दाव्याचा काळ-काम-वेगाच्या दृष्टिकोनातून थोड्या बारकाईने अभ्यास करू. तीन मणांच्या अंदाजामागचा आधार काय ही बाब तूर्तास बाजूला ठेवू. तीन मण म्हणजे एकशेवीस शेर. म्हणजे जवळपास तेवढेच किलो. माणसाचे सरासरी वजन सत्तर किलो जरी मानले तरी हे म्हणजे दोघाजणांना डबलसीट (खरे तर ट्रिपलसीट) घेऊन सायकल चालवण्यासारखे. शिवाय गाठोडे (विशेषतः एकशेवीस शेरांचे गाठोडे) हे डबलसीट माणसासारखे सायकलच्या पुढच्या दांडीवर किंवा मागच्या कॅरियरवर व्यवस्थित बसू शकत नाही. (गाठोड्यातल्या ऐवजाची घनता माहीत नाही, त्यामुळे आकारमानाचा अचूक अंदाज बांधणे शक्य नाही, पण तरीही बर्‍यापैकी आकारमान असावे असे वाटते.) म्हणजे थोडक्यात गाठोड्यासकट सायकलवर बसून सायकल चालवणे (पेडल करणे) बहुधा अशक्य. गाठोडे गाढवाच्या पाठीवर लादल्यासारखे सायकलवर लादून सायकल हाताने ढकलत चालत गेले तरच बहुधा शक्य आहे. माणसाचा चालण्याचा सरासरी वेग साधारणतः ताशी चार मैल मानू. हा वेग म्हणजे कोणतेही ओझे न बाळगता चालण्याचा वेग. तीन मण (म्हणजे जवळपास सव्वा क्विंटल म्हणजे पुढच्या दांडीवर एक आणि मागच्या कॅरियरवर एक अशी दोन माणसे सायकलवर बसली तर होईल एवढे) ओझे ढकलत चालत जायचे म्हणजे वेग आणखीही बराच कमी व्हावा. तो जवळपास ताशी दोन मैल मानू. (रस्त्यात चढउतार नाहीत हे गृहीत धरू. चढ असल्यास वेग अर्थात आणखीही कमी व्हावा. उतार असल्यास गुरुत्वाकर्षणाने वेग नैसर्गिकतः वाढण्याची शक्यता जरी असली तरी सायकल आणि सायकलीबरोबर पर्यायाने सायकल ढकलणारा गडगडत जाऊ नये म्हणून सायकल धीरानेच ढकलणे आले.) म्हणजे चोवीस मैलांचे अंतर काटण्यास (अध्येमध्ये विश्रांतीसाठी थांबले नाही तर) किमान बारा तास लागावेत. हा किमान बारा तासांचा अंदाज हा संपूर्ण रस्ता पक्का / डांबरी होता या गृहीतकावर आधारित आहे. रस्ता रानावनातला, काट्याकुट्यांचा असल्यास आणखीही बराच वेळ लागावा. रस्त्यातले काटे टायरात घुसून टायर पंक्चर होण्याची शक्यता येथे विचारात घेतलेली नाही. दरोड्याची घटना संध्याकाळी साधारणतः साडेसातच्या सुमारास घडली असे म्हटले आहे. ही वेळ दरोडा सुरू होण्याची की दरोडा संपण्याची हे स्पष्ट नाही. दरोडा सुरू होण्याची वेळ असावी हे तर्कसुसंगत वाटते. दरोडा पूर्ण होण्यास अर्धा तास लागला असे जर मानले तर दरोडा साधारणतः रात्री आठाच्या सुमारास संपला असावा. तिजोरी फोडण्याचे काम त्यानंतर सुरू झाले की ते त्याआधीच साध्य झाले होते हाही तपशील कळत नाही. तिजोरी फोडून ऐवज गाठोड्यात भरणे आठ वाजेपर्यंत संपले होते असे मानू. तिजोरी फोडून ऐवज गाठोड्यात भरून होऊन क्रांतिकारक घटनास्थळापासून पसार होईपर्यंत आगगाडी तिथल्यातिथे उभी होती की आपली मार्गक्रमणा करायला पुढे गेली होती, पुढे गेली असल्यास पुढच्या स्टेशनावरील अधिकार्‍यांना ताबडतोब सतर्क केले गेले की नाही वगैरे मुद्दे तूर्तास कथेच्या दॄष्टीने गौण म्हणून सोडून देऊ. थोडक्यात, जर गाठोडे घेऊन आज़ादमहोदय सायकल ढकलीत रात्रौ आठ वाजता निघाले असे मानले, तर ते इष्टस्थळी पोहोचेपर्यंत किमान सकाळचे आठ वाजले असावेत असा अंदाज बांधता यावा. रस्ता रानावनातला अथवा काट्याकुट्यांचा असल्यास (याची शक्यता बरीच वाटते.) आणखीही वेळ लागावा. (मध्याह्न झाली नाही तरी सकाळचे किमान दहा तरी वाजावेत.) अशा परिस्थितीत किमान दिवस उजाडल्यानंतर तरी रस्त्यातून एवढे मोठे आणि वजनदार (आणि कदाचित आवाजही करणारे) गाठोडे घेऊन जाताना वाटेत कोणी भेटले नाही, कोणी हटकले नाही किंवा साधी चौकशीसुद्धा केली नाही याचे आश्चर्य वाटते. तपशिलात काहीतरी त्रुटी आहे असे वाटते. वजन, वेळ आणि अंतर यांचा ताळमेळ जमत नाही. एकंदरीत कथा ज्या पद्धतीने सांगितली आहे ती 'द ग्रेट ट्रेन रॉबरी'चा प्लॉट म्हणून मनोरंजक वाटते, परंतु देशभक्तांचा, क्रांतीचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा आढावा म्हणून उगाच अतिरंजित वाटते. (घटना घडल्याबद्दल शंका नाही, घटनेत भाग घेणार्‍यांच्या हेतूंबद्दल आणि देशभक्तीबद्दलही शंका नाही. आक्षेप आहे तो सांगण्याच्या आणि त्यातून भलतेच काहीतरी ठसवण्याच्या पद्धतीला.) आतापर्यंतच्या मालिकेतून एक समान धागा प्रतीत होतो: १. सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग हाच स्वातंत्र्य मिळवण्याचा एकमेव मार्ग होता. बाकी राजकीय, सनदशीर, शांततामय मार्गांनी प्रयत्न करणार्‍यांमध्ये आणि त्यांच्या चळवळींमध्ये काहीही दम नव्हता, त्यांच्या नेत्यांमध्ये, विशेषतः एका विशिष्ट नेत्यामध्ये, तर नव्हताच नव्हता. २. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांती आणि क्रांतीसाठी खून, बाँबस्फोट आणि दरोडे यांना पर्याय नाही. यांतून आणि केवळ यांतूनच स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकते, बाकी सर्व मिथ्या आहे. अशा अतिरंजित आणि एकांगी कथनातून उलट देशभक्तांचे (आणि ज्या क्रांतिकारकांबद्दल माहिती देण्याचा हा आटापिटा आहे त्यांच्याबद्दलचे) काहीसे विपरित चित्र प्रतीत होते, जे खेदजनक आणि अनावश्यक आहे असे वाटते. थोड्या वस्तुनिष्ठ कथनाची (आणि त्यासाठी इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघण्याची) गरज आहे असे सुचवावेसे वाटते.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

वा टगेराव, मानलं बॉ आपल्याला. एटीएस वा रॉ मध्ये आपल्या सारख्या तंत्रशुद्ध विचाराच्या लोकांची नितांत आवश्यकता आहे तेव्हा आपण आपल्या तार्किक गुणांचा उपयोग करायचा विचार करू शकता. ;) एक माझेही निरिक्षण - साधारणपणे तीन मन धान्याचे तीन मोठे गाठोडे होतात. त्यांच्या अकारमानामुळे ते सायकलवरुन टाकून न्यायचे म्हणजे जरा अशक्यच वाटते. पण तीन मन धातूंचे अकारमान हे एका मध्यम अकाराच्या गाठोड्यायेवढे होते. त्यामुळे अकारमानाचा तरी प्रश्न सुटलेला होता हे लक्षात घ्या. बाकी आपले चालू द्या. लेखन हे शुद्धच असायला हवे हे मान्य. कदाचित साक्षीजींच्या वाचनात हे मुद्दे लक्षात आलेले नसावेत. पण त्यांचा हेतू (जो की आपण सर्वांनी आपल्य जाज्वल्या इतिहासाची आठवण व जाण ठेवावी) हा तरी या लेखाने साध्य होत आहे. यापुढील त्यांचे लेखन तुमच्या सारख्या डिटेक्टिवांच्या नजरेतून सुद्धा १००% उत्तीर्ण व्हावे व तुम्हाला त्या लेखाच्या हेतूप्रत जाणे साध्य व्हावे यासाठी त्यांना व तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा! आपला, (गरज नसताना भिंगातून नव्हे तर केवळ उघड्या डोळ्याने व उघड्या मनाने वाचन करणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

दुसर्‍या बाजिरावचं शुध्दलेखन यावर चर्चा करावी बहुतेक :T आतापर्यंतच्या प्रतिसाद मालिकेतून एक समान धागा प्रतीत होतो: १. सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग हे चुकिचे होते व त्यांना फाट्यावर मारावे. भारताला स्वातंत्र्य फक्त अहिंसेमुळे मिळाले. २. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांती आणि क्रांतीसाठी खून, बाँबस्फोट आणि दरोडे हे पर्याय चुकीचे असुन हे सर्व करणार्‍यांना फासावर लटकवावे. यांतून आणि केवळ यांतूनच दहशतवादी निर्माण होतात. बाकी सर्व मिथ्या आहे. अशा अतिरंजित आणि एकांगी कथनातून उलट देशद्रोह्यांचे (आणि ज्या दहशतवादी कारवायंबदल माहिती देण्याचा हा आटापिटा आहे त्यांच्याबद्दलचे) काहीसे विपरित चित्र प्रतीत होते, जे खेदजनक आणि अनावश्यक आहे असे वाटते. थोड्या अहिंसक बुळबुळित कथनाची (आणि त्यासाठी इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघण्याची) गरज आहे असे सुचवावेसे वाटते (स्वगत : तिखट मिसळ झेपत नाही). असो.... पुर्वग्रहातुन कोणावरही टिप्पणी करावी भाषण स्वातंत्र्य आहे ना. शिवाय प्रत्येक ठिकाणी मतभेद असायलाच हवेत. ~X( सर्वसाक्षी चांगला लेखं धन्यावाद. (कदाचित इंग्रजांच्या पिलावळीला मिसळ सोसत नाही आहे) चेतन

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्वसाक्षी साहेब, तुमच्या कडे टाईम मशिन नाही आहे का? नेहेमीप्रमाणे सुंदर लेख.

In reply to by विनायक प्रभू

ह्यांच्याकडे साधे मागीतलेले संदर्भ नाहीत टाईम मशीन काय मागताय? :)

In reply to by _समीर_

इतिहासातले अचूक संदर्भ द्यायला टाईम ट्रॅवल करायला लागेल. त्या साठी टाईम मशिन लागते.

In reply to by विनायक प्रभू

हो का? पण टाइम मशीन नावाचा प्रकार अजुन तरी अस्तित्वातच नाही म्हणतात. तरीही ऐतिहासिक लेखन कसे काय केले जाते मग? की त्या सगळ्याच भाकडकथाच??

In reply to by _समीर_

मी फक्त अचूक बद्दल बोलतो आहे. किती खरे किती खोटे वाटावे ज्याच्या त्याच्या भावना.

In reply to by विनायक प्रभू

म्हणजे एक तर टाईम मशीनने प्रत्यक्ष घटना बघुन 'अचूक' लिहिणे अथवा ज्याच्या त्याच्या भावनांवर विसंबुन खयाली पुलाव पकवणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत का?

In reply to by विनायक प्रभू

पर्याय दोन आहेत हे मी लिहिलेच आहे. दोन आहेत का? असा प्रश्न होता..

In reply to by _समीर_

सोपे उत्तर समजले नाही तर त्याला मी करावे बॉ?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

भगवंता... बरं झालं मला जास्त बुद्धी (अक्कल) नाही दिलीस. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपीनदाशी हज्जारदा सहमत!!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भगवंता... बरं झालं मला जास्त बुद्धी (अक्कल) नाही दिलीस. हेच म्हणतो! मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत!
खरे आहे. मरणारे मरून गेले, त्यांची नावे पुढे करून आपलीच ट्यँव ट्यँव करणार्‍यांची चलती आहे. असो.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे

In reply to by विसोबा खेचर

मरणारे मरून गेले, आता फक्त नस्ती ट्यँव ट्यँव करणारे आणि घोड्यापुढे अक्कल धावणारे उरले आहेत!
सर्वात आवडलेला प्रतिसाद! :) (अतीशय धाडसी प्रतिसाद! आता त्याबद्दल कुणी कीव केली नाही म्हणजे मिळवली!)

In reply to by कोलबेर

सहमत ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by विसोबा खेचर

हा हा हा.. ट्यँव ट्यँव शब्दप्रयोग म्स्त वाटला. अतीशय चपखल. ऐतिहासिक लिखाणाला योग्य संदर्भ दिले नाहीत तर ती लोकांना संदर्भहीन ट्यँव ट्यँवच वाटणार!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भगवंता... बरं झालं मला जास्त बुद्धी (अक्कल) नाही दिलीस. धन्य! तो गणपती बाप्पा आकाशातुन ढसा ढसा रडत असेल हे वाचुन.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

टगवंतरावांचा प्रतिसाद फार आवडला. सर्व क्रांतीकारकांबाबत आदर आहेच मात्र मनात घोळत असलेलेच विचार टगेरावांनी त्यांच्या शेवटच्या परिच्छेदात दिले आहेत. क्रांतीकारकांना वंदन. आपला, (स्वतंत्र) आजानुकर्ण

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

१) गार्डला पटवुन गाडी थांबवता आली तर ते अधिक सोयीचे असावे. स्वतः साखळी खेचली तर गार्ड व कदाचित उपथित पोलिस साखळी कोणी व का खेचली हे पाहायला जमले असते व तसे होणे अनुकुल नव्हते. २) हवेत गोळया झाडल्या गेल्या त्या प्रतिकारासाठी रकक्षकांनी पुढे येउ नये म्हणुन. मात्र आपल्याच देशबांधवांना इजा होऊ नये यासाठी तसेच कुणी गाडीवर दरोडा आहे असे समजुन प्रतिकारासाठी आले तर नाहक आपल्याच बांधवांवर शस्त्र चालवाचा प्रसंग येऊ नये म्हणुन. आपल्या जिवनातील अखेरच्या संग्रामात आल्फ्रेड पार्क येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांनी पोलिसांना आवाहान केले होते की तुम्ही माझे देशबांधव आहात, माझे तुमचे वैर नाही आणि मला तुमच्यावर शस्र चालवायची इच्छा नाही. या प्रसंगी अनेक विद्यार्थी आजुबाजुला जमले होते तेव्हा त्यांनाही आजादांनी सांगितले होते की त्यांचा जिवाला धोका आहे, इथे प्राणही जाऊ शकतात तेव्हा त्यांनी शक्य तितक्या लवकर दूर जावे. ३) काळ काम वेग गणित. आपल्या शंका रास्त आहेत. मात्र ते हुतात्मा आजाद होते, कुणी लेचापेचा मनुष्य नव्हता. झाशी येथे मोटार मिस्त्री च्या रुपात वावरताना त्यांनी सिराजौद्दीन यांचेकडे नोकरी पत्करली होती. त्यांचा विश्वास जिंकण्यसाठी आजादांनी सिराजऊद्दिन यांच्या मुलीच्या लग्नप्रसंगी प्रांतनिर्यात निर्बंध चुकवुन सायकल वरुन ओरछा येथून शेरभर तुपाची पींपे सायकलवरुन चौदा मैल आणली होती. आजाद झाशी परिसरात असलेल्या किल्ल्यावरील सोजिरांच्या तळात एका विजेचे काम करणार्‍या मिस्त्रीचे ओळखीने जायचे. किल्ल्याला चांगला चढ होता. ज्या चढणीवर सोजिरांची फाफु होत असे व ते सायकली हातात धरुन चढ चढत असत तिथे आजाद रपारप सायकल हाणीत जिद्दीने तो चढ चढुन जायचे. असो. ही माझी माहिती माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकानुसार. या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता.

In reply to by सर्वसाक्षी

सर्वसाक्षी, निरसन आपणच मांडले हे चांगले झाले. टगेदादांविषयी माझ्या मनात अतीव स्नेह आहे आणि आदरही. संदेह निर्माण होणे आणि त्या मांडणे हा जन्मजात स्वभाव आहे. पण शंकांचा फुटकळपणा पाहून आश्चर्य वाटले होते. असो.. तरीही टगेदादांना शेवटच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे "थोड्या वस्तुनिष्ठ कथनाची" भर टाकता आली तर (टगेदादा प्रेरित नाही!) डायव्हर्जन साठी संधी राहणार नाही. (लहान तोंडी मोठा घास घेणारा) एकलव्य अवांतर - टगेदादांच्या तिसर्‍या शंकेचे निरसन होइल किंवा नाही याचा खुराक एन्जॉय करतो आहे.

In reply to by एकलव्य

पण शंकांचा फुटकळपणा पाहून आश्चर्य वाटले होते. असो...! आपला, (अतिशहाणा) तात्या.

In reply to by सर्वसाक्षी

या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता. हा डिस्क्लेमर टाकलास ते बाकी बरं केलंस साक्षी! त्यामुळे आता काही शंकेखोर आणि त्यांचे पित्ते चार दिवस मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणत हिंडत फिरतील! हे डिस्क्लेमर टाकून त्यांचे आत्मे शांत केलेस हे बरेच झाले! तात्या.

In reply to by सर्वसाक्षी

ही माझी माहिती माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकानुसार. या भाकडकथा वा क्रांतिकारकांना फुकट चढवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असे आपण म्हणुन शकता. कमाल आहे! मग असा डिस्क्लेमर लेखात घालुन आणि लेखन 'विरंगुळा' सदरात घालणे योग्य नाही का? क्रांतीकारकांविषयी आयुष्यभर लेखन करीन वगैरे म्हणणारर्‍या कडुन हा प्रतिसाद अनपेक्षीत होता. हेच का तुमचे डेडिकेशन? तुम्ही मला ह्या विषयातील अभ्यासू तज्ञ वगैरे वाटलात. असो...

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

टग्यांच्या काळ-काम-वेग गणिताचा प्रतिसाद म्हणजे अगदी अव्वल नंबर. आज आठवण झाली म्हणून मुद्दामून धागा वर आणत आहे. पण टग्या आज मिसळपाववर नाहीत याचेही दु:ख होत आहे.

सुरेख लेख... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

आपल्या लिखाणामुळे क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण राहते.आज ज्यांच्यामुळे स्वतंत्र भारतीय राष्ट्राचे नागरीकत्व आपल्याला मिळाले त्या हुतात्म्यांना अभिवादन.

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. साक्षीजी .. लेख आवडला.... (रंग दे बसंती फेम) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तुमचे नाव जरी सर्वसाक्षी असले तरी तुम्ही ह्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होतात असे वाटत नाही. म्हणजेच हा लेख तुम्ही कुठल्यातरी ऐकिव/वाचीव माहितीवर लिहिला आहे असा अर्थ होतो. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे इतके डिट्टेलवार वर्णन केले जाते तेव्हा त्याचे योग्य ते संदर्भ देणे आवश्यक आहे असे वाटत नाही का? आपला मागच्या लेखात देखिल असे संदर्भ नव्हते. ऐतिहासिक घटनांना योग्य संदर्भ न देता लेख लिहिणे आणि प्रकशित करणे हे काहिसे बेजवाबदारपणाचे वाटते. पडताळून बघण्यास संदर्भ नसतील तर अश्या गोष्टींची विश्वासहर्ता कमी वाटते आणि त्यामुळेच वर टग्या ह्यांनी विचारलेल्या विसंगती अनुत्तरीत राहतात. मागे देखिल इथे असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते, नंतर लक्षात आणुन दिल्यावर सुधारणा केली. समीर

In reply to by _समीर_

असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते अहो काय हे समीरशेठ? तुम्ही केलेल्या टंकनात कधी नजरचुका होत नाहीत असे म्हणायचे आहे का आपल्याला? त्या महाशयांकडून तो एक टायपो होता (३ ऐवजी ३०) असे स्पष्टीकरण तिथल्या तिथे मिळालेले असताना पुन्हा तेच ओढायचे म्हणजे उगीच ओढून ताणून काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न वाटतो. किमान तो अकडा तरी कोणी सुजान व्यक्ती ठोकून देऊ शकेल येवढा लहान नव्हाता असे वाटते. आपला, (संमजस) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

त्याचं काय आहे तीन लाखाचे तीन हजार झाले असते तर टायपो म्हणण्याला वाव होता. पण तीन लाखाचे जेव्हा तीस लाख करण्याचा टायपो होतो तेव्हा तो सोयिस्कर टायपो वाटण्याची शंका येते. असो..माझ्या प्रतिसादातील एकच वाक्याला धरुन उपप्रतिसाद दिलात म्हणजे उरवरीत प्रतिसादाला सहमती समजायची का?

In reply to by _समीर_

मागे देखिल इथे असेच एका महाशयांनी कश्मिर मध्ये ३० लाख हिंदू मारले असे वाक्य ठोकुन दिले होते, नंतर लक्षात आणुन दिल्यावर सुधारणा केली.
बाकी इतर विषयावर कधीतरी नंतर, पण वरील वाक्य मात्र एकदम परफेक्ट! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by _समीर_

तुमचे नाव जरी सर्वसाक्षी असले तरी तुम्ही ह्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होतात असे वाटत नाही. म्हणजेच हा लेख तुम्ही कुठल्यातरी ऐकिव/वाचीव माहितीवर लिहिला आहे असा अर्थ होतो. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे इतके डिट्टेलवार वर्णन केले जाते तेव्हा त्याचे योग्य ते संदर्भ देणे आवश्यक आहे असे वाटत नाही का? आपला मागच्या लेखात देखिल असे संदर्भ नव्हते. ऐतिहासिक घटनांना योग्य संदर्भ न देता लेख लिहिणे आणि प्रकशित करणे हे काहिसे बेजवाबदारपणाचे वाटते. > महाशय, आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का? कुठे बाबासाहेब आणि कुठे मी, माझी पात्रता त्यांच्या जोड्याइतकीही नाही पण जे विधान आपण केलेत ते त्यांनाही लागु होते! लिहिणारा प्रत्येक लेखक हा लिहिलेल्या घटनेचा साक्षीदार असतोच असे नाही. इथे गांधीवादावर लिहिणारे कितीजण गांधींबरोबर वावरले आहेत? पण गांधीवादांवरील लेखनात हा प्रश्न तुम्हाला पडला नाही. तुम्ही कोणता संदर्भही मागितला नाहीत. असो, आपली मर्जी. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी बेजबाबदार आहे. मान्य आहे. मग आपण कोणते जबाबदार वर्तन केलेत? आपण कोणते संदर्भ शोधायचा प्रयत्न केलात वा मी लिहिलेले खरे की खोटे हे पडताळुन पाहिलेत? या विषयी आपण कोणते वाचन केले आहेत ज्यायोगे मी लिहिलेले खरे नाही असे आपल्याला वाटते? प्रश्नाचा रोख पाहता आपण बराच शोध घेतला असावात आणि अशी कुठलिच घटना न घडल्याचे लक्षात आल्याने आपण जाब विचारीत आहात असे वाटते. अहो माझ्या सारख्या बेजबाबदार व खोटे नाटे लिहिणार्‍यांसाठी आपल्या सारख्या विजीगिषु विद्वानांनी खरी घटना शोधुन काढणे आवश्यक आहे. मग आपण आपल्याला ज्ञात झालेली घटना सर्वांना कथित करुन मी कसे खोटे लिहिले आहे ते दाखवुन दिले पाहिजेत. आपणं शोध घ्या, व जर वरील घटना घडलीच नव्हती वा हे लोक दरोडेखोर असून खुन व दरोड्यांसाठी त्यांना फासावर लटकावले असे आपल्याला आढळुन आले तर ते संदर्भ देउन मला जाब विचारा. हा लेख लिहिताना मी नामवंत लेखकांची पुस्तके, जालावरील माहिती तसेच हुतात्मा अशफाकऊल्ला यांच्या जन्मशताब्दी प्रसंगी राष्ट्रपतींनी केलेले भाषण यांचा आधार घेतला आहे. अर्थात आपण ज्या पद्धतिने प्रश्न विचारला आहेत ते पाहता मी आपल्याला कोणताही संदर्भ देऊ इच्छित नाही. आपण आपल्याला सोयिस्कर असा निश्कर्ष काढु शकता.

In reply to by सर्वसाक्षी

आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का?
बाबासाहेब पुरंदर्‍यांचे लेखन वाचलेले नाही, ते करताना त्यांनी शिवरायांबद्दल किंवा एकंदरीतच त्यांच्या विषयावर किती खोलात जाऊन संशोधन केले आहे याची कल्पना नाही, परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे जर त्यांनी कोणतेही संदर्भ न देता लेखन केले असेल तर 'पुरंदर्‍यांचे मत अथवा दृष्टिकोन' आणि 'मनोरंजन' यापलिकडे त्याला महत्त्व राहत नाही, 'अधिकृत ऐतिहासिक संदर्भग्रंथ' म्हणून तर निश्चितच नाही, आणि त्यात शंकेला जागा राहतेच. (बाबासाहेबांचे लिखाण काय किंवा 'मृत्युंजय'सारख्या कादंबर्‍या काय, वाङ्मय म्हणून त्यांना निश्चितच अप्रतिम मूल्य आहे, परंतु त्यांना ऐतिहासिक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच मानता येणार नाही. अर्थात या लेखकांचा तसा दावाही नसावा, परंतु त्यांमधील तपशिलांत त्रुटी आढळल्यास त्यात वावगे काहीही नसावे.) कदाचित बाबासाहेब आपल्या लेखनाचा उपयोग शिवाजीमहाराजांचे निमित्त करून इतरांवर गरळ ओकायला करत नसावेत आणि म्हणूनच त्यांच्या तपशिलांत चुका आढळल्या तरी त्यांची चिकित्सा करण्याच्या फंदात फारसे कोणी पडत नसावे.
लिहिणारा प्रत्येक लेखक हा लिहिलेल्या घटनेचा साक्षीदार असतोच असे नाही. इथे गांधीवादावर लिहिणारे कितीजण गांधींबरोबर वावरले आहेत? पण गांधीवादांवरील लेखनात हा प्रश्न तुम्हाला पडला नाही. तुम्ही कोणता संदर्भही मागितला नाहीत. असो, आपली मर्जी.
लेखन जेव्हा एखाद्या घटनेबद्दल होते तेव्हा पुराव्याचा, संदर्भांचा प्रश्न येतो. लेखन जेव्हा एखाद्या विचाराबद्दल होते तेव्हा हा प्रश्न सहसा येत नाही, कारण 'मला समजले त्याप्रमाणे विचार' हे सहसा अध्याहृत असते. ('गांधींनी असेअसे कृत्य केले' किंवा) 'गांधींनी असाअसा विचार मांडला' (घटना) म्हटले तर पुराव्याचा, संदर्भाचा प्रश्न येऊ शकतोच. 'अहिंसाविचार/सत्याग्रहविचार/अगदी गांधीविचारसुद्धा असाअसा आहे' (विचार) म्हटले तर त्यात 'लेखकाला हा विचार असाअसा समजला' हा भाग येतो, आणि अर्थात त्याच्यावरही प्रतिवाद अथवा चर्चा होऊ शकतेच, परंतु संदर्भाचा प्रश्न उद्भवत नाही, कारण तो लेखकाचा विचार असतो, गांधींचा नव्हे. गांधी त्या विचाराला चालना मिळण्यासाठी केवळ निमित्तमात्र होते एवढाच त्यात गांधींचा सहभाग असतो. अर्थात 'गांधींनी असा विचार (उदा. अमूकअमूक ठिकाणी, इतक्याइतक्या साली, अमूकअमूक प्रसंगी) मांडला होता' (पुन्हा घटना) असे जर कोणी ठाम विधान केले तर त्याचा पुरावा मागितला जाऊ शकतोच. गांधीवादावर झालेल्या चर्चा या बहुतांशी गांधींच्या कृत्यांवरील ('घटनांवरील') चर्चा नसून गांधींच्या विचारसरणीवरील ('विचारांवरील') आहेत असे वाटते. त्यामुळे संदर्भांचा, पुराव्यांचा मुद्दा गैरलागू असावा. अर्थात विचारांवर उलटसुलट वाद-प्रतिवाद, उहापोह (यातील 'उ' र्‍हस्व की दीर्घ?) होऊ शकतोच. बाकी संदर्भांचा, पुराव्यांचा मुद्दा जेथे लागू होतो तेथेसुद्धा कशाच्या संदर्भाबद्दल प्रश्न उपस्थित करायचे आणि कशाबद्दल नाहीत याचे स्वातंत्र्य पूर्णपणे वाचकास असते. लेखक ते ठरवू शकत नाही. वाचकाने लेखकास लेख लिहिण्यास सांगितलेले नसते, तेव्हा वाचकास लेखकाचे मुद्दे मानण्याची गरज नसते आणि गरज वाटली, शंका आली तर (प्रतिसंदर्भ देऊन किंवा कोणतेही प्रतिसंदर्भ न देतासुद्धा*) प्रश्न उपस्थित करण्याची (आणि तशी गरज आहे की नाही ते ठरवण्याची) मुभा तर निश्चितच असते हा एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा. (*वाचकाची शंका कशी असावी हे वाचकच ठरवतो; लेखक ते वाचकावर लादू शकत नाही.) अर्थात लेखकही वाचकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील नसतो, आणि 'मी जे मांडले आहे ते असे आहे; पाहिजे तर घ्या नाहीतर मर्जी तुमची' ही भूमिका घेऊ शकतोच. त्यामुळे कदाचित कधीकधी लेखनाचे स्वरूप 'कन्व्हर्टिंग द ऑलरेडी कन्व्हर्टेड' (मराठी?) अशा प्रकारचे होऊ शकते खरे, पण त्याची पर्वा नसेल तर प्रश्नच मिटला. तेव्हा आपल्या लेखनावर शंका उपस्थित करणारे वाचक गांधीवादावरील लेखनावर तशाच शंका उपस्थित करत नाहीत हा मुद्दा फोल आहे. वाचकांवर तसे कोणतेही बंधन नाही. उलटपक्षी गांधीवादावरील चर्चांत आपल्याला शंका असल्यास त्या तेथे मांडण्यासाठी आपणावर कोणतीही बंदी कोणीही घातलेली नाही हेही नम्रपणे सुचवावेसे वाटते.
आपण कोणते जबाबदार वर्तन केलेत? आपण कोणते संदर्भ शोधायचा प्रयत्न केलात वा मी लिहिलेले खरे की खोटे हे पडताळुन पाहिलेत?
वर म्हटल्याप्रमाणे तसे करण्याचे वाचकावर कोणतेही बंधन नाही. 'आपले लेखन बेजबाबदार नाही' हे सिद्ध करण्याची जबाबदारी लेखकावर आहे, वाचकावर नाही. कारण (पुन्हा एकदा) 'क्रांतिकारकांवर (किंवा कोणत्याही विषयावर) आम्हाला काही माहिती सांगा' असा आग्रह वाचकाने धरला नव्हता, तर आपली सांगण्याची इच्छा असल्यामुळे आपण तो लेख लिहिलात. अर्थात तो वाचण्यास वाचक बांधील नाहीच, पण वाचल्यावर काही शंका आल्यास त्या उपस्थित करण्याचा अधिकार वाचकास निश्चितच आहे. अर्थात त्या शंकांचे निरसन न झाल्यास लेखाबद्दल, लेखातील दाव्यांबद्दल, लेखकाबद्दल, लेखकाच्या हेतूंबद्दल आणि लेखकाच्या मानसिकतेबद्दल योग्य वाटतील ते निष्कर्ष काढण्यास वाचक मुखत्यार असतोच.
आपण आपल्याला सोयिस्कर असा निश्कर्ष काढु शकता.
वर म्हटल्याप्रमाणे आपापल्या समजुतीप्रमाणे निष्कर्ष काढण्यास वाचक मुखत्यार आहेच. त्यासाठी लेखकाच्या परवानगीची गरज नाही. निष्कर्ष काढलेला आहेच. काळजी नसावी.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

धन्यवाद टग्याभाऊ. सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही योग्य समाचार घेतलेला आहेच, त्यात थोडीच भर घालू इच्छीतो. बाबासाहेबांनी लिहिलेली शिवरायांवरील कादंबरी हे ललित लेखन आहे म्हणून त्यात संदर्भसुची दिलेली नसावी कदाचित. पण बाबासाहेब हे स्वतः एक हाडाचे इतिहास संशोधक आहेत.त्यांच्या लिखाणातील तपशीलांविषयी शंका उपस्थित केल्यास ते अक्षरशः शेकडो संदर्भ देउन निरसन करतात.ही माहिती मला त्यांना प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तिकडून मिळाली. "मला वाटले ते मी लिहीले, ज्यांना भाकडकथा वाटतात त्यांना खुश्शाल वाटोत" असले उर्मट उत्तर ते देत नसावेत.

In reply to by सर्वसाक्षी

आपल्या मतानुसार बाबासाहेब पुरंदरे ज्या तळमळीने लिहितात व ज्या तपशिलात लिहितात त्यानुसार ते शिवरायांचे समकालिन असावेत का? आणि त्यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी संदर्भग्रंथांची यादी वा ऐतिहासिक कागदपत्राच्या छायप्रतीही जोडलेल्या नाहीत. मग त्यांचे लेखन काल्पनीक वा खोटे मानावे का? बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांविषयीची निष्ठा व प्रेम वादातीत आहे. केवळ आडनाव भोसले आहे म्हणून सातारच्या गादीला कुर्निसात करण्याइतका भाबडेपणाही त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही त्यांनी केलेले लेखन हे संदर्भ म्हणून देता येणे शक्य नाही. त्यांच्या लेखनाला मनोरंजनमूल्य आहे. जाणता राजा सारखी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सर्कस इतकी वर्षे त्यांनी चालवली ही चिकाटी त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही सरदेसाई, राजवाडे, किंवा शेजवलकरांच्या ग्रंथांना जी विश्वासार्हता आहे ती पुरंदऱ्यांच्या लेखनाला नक्कीच नाही. पुरंदरे यांच्या राजकीय निष्ठाही वादग्रस्त आहेत. मात्र तो प्रतिसादाचा विषय नाही. चौकस यांच्या मनोगतावरील लेखातून साभार शिवसेनेसारख्या राडेबाज पक्षात वीसेक वर्षे काढलेली असल्याने राज ठाकरेंना 'तसल्या' माणसांत वावरायची, नव्हे, त्यांना कसे वापरायचे याची पूर्ण जाण होती. त्या क्षेत्रातील महामहोपाध्याय नारायण तातोबा राणे यांचे राज ठाकर्‍यांशी घट्ट संबंध. या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल, एकीकडे बाबासाहेब पुरंदरे, वीणा पाटील, अतुल परचुरे अशी मंडळी गोळा करताना विक्रम बोके, विद्यावत्सल अन्नाप्रगाडा अशी झकनाट मंडळीही त्यांनी गोळा केली. विक्रम बोके जरी धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून गाजून निवृत्त झाले असले, तरी त्यांची धडाडी खुलण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे जवळचे नातेवाईक शरद पवार हे सगळ्यांनाच माहीत आहे. निवृत्त झाल्यावरचे त्यांचे "सुसंस्कृत" वागणे अनुभवायचे असेल तर पुणे विद्यापीठातले सुरक्षा अधिकारी व्हा! आणि विद्यावत्सल अन्नाप्रगाडा हा भिडू तर गावावरून ओवाळून टाकलेला. मूळच्या आंध्रातल्या या गड्याची पुण्याच्या जवळपास प्रत्येक पोलिस-स्थानकावर नोंद होती. हा हिरा शिवसेनेत कधीच नव्हता. तो पतितपावन संघटनेचा नावापुरता टिळा लावून उंडारत असे. तो मनसेनेत थेट शहर उपाध्यक्ष झाला. सांगलीचा मनसेनेचा अध्यक्ष (दलित अल्पवयीन स्त्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी आत गेलेला) हे अजून एक रत्न. पुण्यात खंडणी गोळा करण्याच्या आरोपात आत गेलेली एक महिला ही मनसेनेची अजून एक पदाधिकारी. असे हे रत्नालय. एक विसंवादी सूर. अशा पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे भाषणे ठोकताना बाबासाहेब पुरंदर्‍यांना "रांझ्याच्या पाटलाने एका बाईबरोबर बदकर्म केल्याचे कळताच, छत्रपतींनी त्याचे दोन्ही हात आणि पाय कलम करण्याची आज्ञा केली" हे वाक्य आठवत असेल का? की वाढलेल्या वयाचा परिणाम म्हणून अशा गोष्टी विस्मरणात जात असतील? असो. आपला (ऐतिहासिक) आजानुकर्ण शेजवलकर

ह्यावेळेस मनोगतावर टाकले नाही? कि तिकडे प्रशासकाच्या अनुमतीची भिक्षा मिळण्यासाठी ताटकळले आहे? बाकी चालू द्या.. (कट्टर मिपाकर) खरा डॉन

आवडला लेख. तुम्ही देत असलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by यशोधरा

आवडला लेख. तुम्ही देत असलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.

In reply to by अभिरत भिरभि-या

मेहनत घेतात हे ऐकले होते. मेहनत देतात म्हणजे नक्की काय? मला मिळाली नाही हो मेहनत. कुठुन आणि कशी घ्यायची ती? अघळ पघळ

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन. या क्रांतिकारकांना माझे पण कोटी कोटी प्रणाम! साक्षी साहेब, आजकाला आम्हा सर्वांना आमच्या स्वार्थाचेच पडलेले आहे. अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! काकोरीचे धाडस या क्रांतिकारकांनी पेलले हे सूर्यप्रकाशायेवढे सत्य आहे. त्यावर ज्याला शोभेल तो तसा कीस पाडेल. माझ्या दृष्टीने असा कीस पाडणे आता गौण आहे. आपल्याला स्वांतंत्र्य हे अनेकानेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या बलिदाणाने मिळालेले आहे व त्याचा आपण योग्य तो आदर व रक्षण केले पाहिजे ही जाणीवच जास्त महत्वाची. ती जाणीव करुन देण्याचे कार्य आपला लेख बजावतो आहे हे नक्की. अभिनंदन! आपला, (नतमस्तक) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

अशा वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या त्यांचे स्मरण आम्हाला करुन देऊन त्यांच्या उपकरांची आम्हाला किमान जाण रहावी या निस्वार्थ उद्देशाने आपण वेळोवेळी समयोचित लेखन करत आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! भारताच्या स्वातंत्रासाठी आयुष्य, प्राण वेचलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन. क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल सर्वसाक्षी यांना धन्यवाद. बर्‍याच गोष्टी काल-परिस्थीती सापेक्ष म्हणता येतील. गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी.

In reply to by सहज

गांधीवादाच्या कट्टर विरोधकांनी टग्या यांनी शेवटी मांडलेल्या मुद्यांवर थोडा विचार करावा ही अपेक्षा जास्त नसावी. सहजराव, एक स्पष्टीकरण. मी कट्टर बिट्टर विरोधक नाही. स्वतः गांधीजीं बद्दल माझ्याही मनात अथांग आदर आहे. पण चीड येते ती त्यांच्या "वादा"चा अतिरेक करणार्‍यांची. जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते. पण "केवळ आणी केवळ गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले", "गांधींनी केले ते सर्वच बरोबरच" , "दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल", "अहिंसा व गांधीवाद हाच सर्व प्रश्नांवरील एकमेव उपाय" या असल्या वल्गनांनी डोके खराब होते. माझ्या अतापर्यंतच्या सर्व प्रतिसादांतून हेच म्हणने आहे. पाच हजार वर्षांचा जाज्वल्य इतिहास असणार्‍या राष्ट्राचा "पिता" काल परवा कसा काय होऊन गेला हेही मला न उमगलेले कोडे आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणार्‍यांनी स्वतः विधायक असे काही न करता हे असले टिमटिमे वाजवत राहिल्याने त्यांच्या बद्दल डोक्यात तिडीक आहे. स्वतः गांधींबद्दल नाही. आपला, (सर्वच थोर नेत्यांसमोर नतमस्तक असणारा) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

जसे राणा संगा, शिवराय, विवेकानंद, सावरकर, टिळक, बोस, भगतसिंग म्हटले की आदराने शीर झुकते तसेच गांधीसमोरही झुकते.
सहज आता जुने प्रतिसाद चाळायला हवे. नव्या प्रतिसादांवर लक्ष ठेवायला हवे. (मसण्याऊद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by भास्कर केन्डे

राष्ट्रपिता या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. "राष्ट्रपिता महात्मा गांधी" या पूर्ण वाक्प्रयोगाचा अर्थ राष्ट्र पित असताना(ही) गांधी महात्मा होते असा आहे. किंबहुना अशोक नायगावकरांनी देशाचे भारत हे नाव बदलून बारत करावे असे म्हटलेच आहे. आपला (प्रोप्रायटर) आजानुकर्ण झमझम बार

काकोरी पर्वातील हुतात्म्याना सलाम. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्य्म दिनी विनम्र अभिवादन! माझेही या सगळ्यांना विनम्र अभिवादन. मुमुक्षु आपल्या क्रांतीकार्याला लागलेली फितुरीची कीड शेवटपर्यंत सुटली नाही. इतके मोठे लोक नाहक अशा हरामखोर लोकांमुळे मारल्या गेलेत. बहुतांश सगळे असेच फासावर गेलेत. कितीतरी मोठी कामे त्यांच्याकडून आणिक झाली असती. फार वाईट वाटते असे आठवले की. या फितुर लोकांना काहीच वाटत नसेल का हो? थोडाही पश्चात्ताप होत नसेल? १८५७ च्या लढ्यातही हेच झालेले दिसते. रायगडावरचे सूर्याजी पिसाळ सर्वत्र पसरले असे वाटायला लागते.

In reply to by राघव

काकोरीपर्वातील ह्या हुतात्मांना विनम्र अभिवादन! बाकी, मुमुक्षु ह्यांच्याशी पुर्णतः सहमत! शाप आहे हो हा आपल्या भारतमातेला.... फितुरीशिवाय कोणतंही काम जमतच नाही आपल्याकडे! चालायचंच.

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे

सर्वसाक्षीजी, विस्मृतीत जाणार्‍या क्रांतिकार्याबद्दल सातत्याने लेख लिहित आहात त्या बद्दल तुमचे खूपच कौतुक करावेसे वाटते. असेच लिहित राहा. खरं म्हणजे हे सगळं आम्ही सगळेच शाळेत शिकलोय पण तेव्हा हे सगळं ४-५ मार्कांशी निगडीत होतं आणि नंतर बराच काळ गेला आहे मधे. या निमित्ताने ही नावे आणि घटना परत जाग्या होत आहेत. वर, बरेच आक्षेप वगैरे आले आहेत. मला वाटते की अश्या घटनांबद्दल लिहिताना थोडे नाट्यमय लिहावेच लागते. अर्थात् ते एकांगी होता कामा नये हे पण खरेच. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

खरं म्हणजे हे सगळं आम्ही सगळेच शाळेत शिकलोय पण तेव्हा हे सगळं ४-५ मार्कांशी निगडीत होतं आणि नंतर बराच काळ गेला आहे मधे.
मनातले बोललात! (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सर्वासाक्षीजी, आपले लेख कालोचित असतातच पण नकळतच आपण रसभंग करुन टाकतात. उदा.
हे चारही हुतात्मे अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच असहकार आंदोलनात सर्वस्व त्यागुन झोकुन दिलेले. मात्र ’एक वर्षात स्वातंत्र्य देतो, मला सहकार्य द्या’अ से सांगत अनेक तरुणांना सरकारी शाळा सोडुन आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या गांधींनी अचानक आंदोलन मागे घेतले अणि हे सर्वजण आंदोलने व निषेधघोष यांचे मिथ्यापण लक्षात येऊन अखेर ’रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या?’
अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही हे माहित असूनही अथवा १ वर्षात स्वातंत्र्य मिळनार नाही हे मान्य करुनही १९२७ नंतर जवळजवळ २० वर्ष थांबावे लागलेच. सशस्त्र लड्याची प्रेरणा म्हणून गांधीच्या आंदोलन मागे घेण्याच्या घोषणेला का दिले जाऊ नये? असो. स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सर्वच लोकांबद्दल आदर आणि अभिमानच असायला हवा. संदर्भ ग्रंथाची यादी / नावे दिली तर सामान्य लोकांना त्यात अजूनही भर टाकता येईल. शेवटी किती दिवस आपण एकहाती हे काम करणार आहात? कोणालातरी यात पारंगत करा तर.

In reply to by कलंत्री

द्वारकानाथजी, कुणाला पारंगत करणारा मी कोण? मला स्वतःला असे काय मोठे ज्ञान आहे तर मी काय कुणाला पारंगत करणार. ज्याच्याकडे एखादी गोष्ट करण्याची ईच्छा असेल तो स्वत: त्या विषयावरील माहिती शोधुन काढतो. आपण स्वतः व्यासंगी आहात, आपल्याला ईच्छा असेल तर क्रांतिकारकांवरील भरपूर माहिती आपल्याला वा ज्या कुणाला हवी असेल त्याला पुस्तके व जाल या स्वरुपात सहज मिळवता येइल. बाकी माझे काम एकहाती नाही. अनेकांचे हात माझ्या मस्तकावर व पाठीवर आहेत. आणि मी जिवंत असे पर्यंत ज्यांनी या देशासाठी काही केले आहे आणि जे आजपर्यंत अप्रसिद्ध ठेवले गेले आहेत, उपेक्षिले गेले आहेत त्यांची माहिती जिथे व जशी देता येईल तिथे व तशी मी देतच राहीन. ते महान हुतात्मे काल दिव्य करुन गेले म्हणुन आपण आज आहोत या कृतज्ञतेने त्यांचे ऋण अत्यल्प का होईना पण फेडण्याचा एक प्रामणिक प्रयत्न मी सातत्याने करीत राहीन. कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही.

In reply to by सर्वसाक्षी

कुणी टर उडवली वा धिक्कार केला तरी मला फरक पडत नाही. केलेल्या संकल्पांना तडीस नेण्याचा बाणा फार कमी लोकांत असतो. तो तुमच्यात दिसत आहे हे पाहून आनंद झाला. आपल्या सारख्यांच्या कष्टाने आम्हा पामरांना आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या उपेक्षित पानांची ओळख होत आहे हे आमचे भाग्य. आपला, (कृतज्ञ) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by सर्वसाक्षी

प्रिय सर्वसाक्षीजी, आपला प्रतिसाद आवडला. खरेतर आपणाकडुन एक भारतीय म्हणून माझी बरीच अपेक्षा आहे. क्रांतिकारकाचे समग्र वाड्मय प्रसिद्ध व्हावे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या विचारधारेची ओळख जगाला व्हावी. दुर्दैवाने हे मात्र घडत नाही. आपण हे करण्यासाठी पूर्ण सक्षम आहात. आपण नकळतच गांधीमधे अडकत जातात आणि अकारणच धुरळा उडत जातो. खरेतर हे दैवी असे कार्य आहे आणि माझ्याकडुन तन-मन-धनाने मदत करण्याचे मी आश्वासन देतो. आम्ही तुमच्याकडुन स्नेहाची अपेक्षा करतो आणि आपल्या कार्याचेही महत्व जाणतो. २००९ मध्ये याबाबतीत आपल्याकडुन भरीव असे कार्य व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपला, द्वारकानाथ कलंत्री