Skip to main content

तुकारामा-

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?..... साळसुदानी आणला गाथा वर तारून? व्यर्थ तुका, व्यर्थ तुका, व्यर्थ व्यर्थ व्यर्थ आहेस- बुडालेल्या शब्दामध्ये किती अर्थ भरला आहेस.....!!!
लेखनविषय:

वाचने 2009
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सुंदर!!! तुमची काव्यामागची भूमिका समजली!!! ईश्वराच्या शोधात फिरणार्या व्यक्तींना काय हाल भोगावे लागतात हे तुम्हाला सांगायचंय!!! आवडलं, प्रचंड आवडलं!!! मी सुद्धा हेच अनुभवतोय!!!