Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन - उत्तरार्ध

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 22/08/2015 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध ती चमकून वळली. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तिला खुदकन हसू आलं. तिनं खुलासा करताच तोही हसू लागला. त्यानंतरच्या तासाभरात ती दोघं नक्की काय बोलली कोण जाणे पण आयुष्यात प्रथमच ती इतकी मोकळी होत होती. स्टेशनवर उतरून थॅन्क्स म्हणून ती वळणार इतक्यात … " जस्ट इन केस " म्हणत कुठल्याशा कार्डवर त्यानं नंबर लिहून दिला आणि ट्रेन सुटलीच. झालं ते इतकंच. कधीतरी खूप उदास एकटं वाटतं, कधी माणुसकीवरचा विश्वास डळमळतो तेव्हा रेशमी साड्यांच्या बासनात जपून ठेवलेलं एक कार्ड मी काढते. त्यावर हळुवार हात फिरवते . आणि जगायला नव्यानं सिद्ध होते . ट्रुकॉलरवर नाव शोधायचा मोह अनेकदा होतो. पण … नदीच मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये म्हणतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9838
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

In reply to by एस

वाचलीये ना!!! असं काय बरं करता तुम्ही??? हिरवीण वाचवते ना हिरोला!!!

In reply to by मांत्रिक

असू दे, असू दे. प्लस वन दिलात न. मग ठीक आहे. हीरो हिरवीन सध्या तरी इम्पॉर्टेन्ट नाहीत. ;-)

In reply to by माहितगार

प्रतिक्रीया राहिली खरी, कथा का आवडली ? :माणसांच्या माणूसपणावर विश्वास निर्माण करणारी आत्मविश्वास देणारी कथा म्हणून आवडली. पुलेशु

पहिल्या भागातली कलाटणी जितकी आवडली तितकंच या भागाच्या शेवटातलं soft landing आवडलं.

+१ . कथा आवडली पण अजून वेगळे काहीतरी वाचायला आवडले असते.

मला नाही समजली... ती स्टेशनची वाट पहात असते न त्याला वाटतं की ती आत्महत्या करणारे.. ह्यात कुणी कुणाचा जीव वाचवला? मुदलात जीव देतंच कोण होतं? मला प्रभावी वाटली नाही. म्हणजे माझ्या समजण्यात जर चुक होत नसेल तर प्रसंग फार साधा आहे आणि त्यामानाने उगाच त्या हिरोला "हिरो" केलं आहे. पण ह्याहुन काही वेगळं ह्या कथेत असेल तर मात्र नक्की सांगा. कदाचित मला नीट समजलंही नसेल.

In reply to by पिलीयन रायडर

मी पण वर तेच म्हणतोय. तर बरेच जणांनी मलाच कथा समजली नाही असा सूर लावला.

In reply to by मांत्रिक

मगाशी तर स्टेशनवर उतर्नार होति. परत नंतर तास्भर बोलत बसली. उतरयचय का पूढे जायचय? नक्कि कय कळेना.

टोटल फेल... कथा सपशेल नापास . उत्तरार्ध पूर्ण गंडला आहे. (स्पष्ट मतासाठी क्षमस्व) स्पर्धेचं सोडा. अजून चांगला उत्तरार्ध लिहिण्याची तुमची क्षमता आहे. दुसरा प्रयत्न करा.

कधीतरी खूप उदास एकटं वाटतं, कधी माणुसकीवरचा विश्वास डळमळतो तेव्हा रेशमी साड्यांच्या बासनात जपून ठेवलेलं एक कार्ड मी काढते. त्यावर हळुवार हात फिरवते . आणि जगायला नव्यानं सिद्ध होते .
काही कळलं नाही.. मागच्या कथेच्या संदर्भावरुन तरी हा उत्तरार्ध पटत नाही. हा आता त्यांच्या तासाभराच्या गप्पांमध्ये त्यानी काही 'सेल्फ हेल्प' टाईपातल्या टिप्स दिल्या असतील, तर ठाऊक नाही. उगाच 'टची' टायपातला वाटतोय उत्तरार्ध..

कथा confusing वाटते . आणि कोणी सूसाइड करतच नसतं कथानायिकेने त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं ही फार मोठी गोष्ट!!!>>> हिरवीण वाचवते ना हिरोला!!!>>> कसं काय ? हिरो मागून येवून तिला म्हणतो ना "आर यु प्लानिंग टू कमिट स्युसाइड?" पूर्वार्धात लिहिलंय , तिने डोळे मिटले. दरवाजावरची पकड घट्ट केली. आणि मागून आवाज आला, .. "एस्क्युज मी , आर यु प्लानिंग टू कमिट स्युसाइड?"

बऱ्याच जणांना कथा कळली नाही म्हणून स्पष्टीकरण . ती किंवा तो कुणीही आत्महत्या करत नसतात . पण आड वेळेला, रात्री एक स्त्री सारखी दरवाजा उघडून बाहेर बघतेय आणि पुन्हा आत येतेय हे पाहून त्याला काळजी वाटते की हिचा आत्महत्या करायचा वगैरे प्लान नाही ना? म्हणून तो देखील पुन्हा पुन्हा अस्वस्थपणे बाहेर येतो आणि शेवटी तिला टोकतो. हा एक साधा माणूस आहे , हिरो वगैरे कोणी नाही . प्रथम घाबरलेल्या आणि नंतर त्याच्या प्रश्नाने गोंधळलेल्या तिला जेव्हा त्यामागची भावना लक्षात येतो तेव्हा तिला हसू येते . पण सध्याच्या स्वार्थी जगात एक अनोळखी माणूस समोरच्या व्यक्तीचा माणूस म्हणून विचार करतो, माणुसकीसाठी आपली झोप विसरून तिला मदत करायला पुढे होतो. यामागचा सच्चेपणा , कळकळ तिला जाणवते . स्त्री पुरुष , ओळख अनोळख ,सामाजिक स्थर, विवाहित अविवाहित वगैरे कसल्याही चौकटीत न बांधून घेता स्टेशन येइपर्यन्तच्या वेळात ते गप्पा मारतात. ( एक तास कसा काय हा संजय पाटील यांचा प्रश्न आवडला . पण गाडी जर मध्ये कुठेतरी लेट झाली असेल तर ते रात्री प्रवाशांना कळेलच असे नाही .:)) त्यांना एकमेकांचे नावही माहित नसते . उतरताना तो फक्त आपला नंबर देतो . जस्ट इन केस म्हणून . ही छोटीशी गोष्ट इथेच संपते पण तिच्या मनात मात्र ही साधी घटना अजूनही तरंग उमटवते . भारतामध्ये एक स्त्री जेव्हा कुणा पुरुषाबरोबर बोलते तेव्हा दोघांच्याही मनात, " मी एक स्त्री/ पुरुष आहे मी जे बोलेन त्याचा भलता अर्थ नाही ना निघणार ?" याच भान कायम ठेवाव लागतं. प्रथमच ती त्याच्याशी एक माणूस म्हणून मोकळेपणानं बोलते . या अनुभवाचं तिला अप्रूप आहे . तो तिचा नंबर किंवा नाव किंवा ओळख विचारत नाही. पण जर तिची इच्छा असेल तर पुढे मागे ओळख ठेऊ शकतो अस नंबर देऊन हलकेच सुचीत करतो . त्यात आग्रह नसतो. त्यातून नकळतपणे तिचा सहवास त्याला आवडल्याची पोच तिला मिळते .ती याच्यात हे एक प्रगल्भ platonic नात पाहते . जेव्हा कधी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बलात्काराच्या वगैरे घटना घडतात तेव्हा तर तिला ट्रेन मधील तो प्रसंग अजूनच सुंदर भासतो .या जगात माणुसकी शिल्लक आहे याची तिला खात्री पटते . या नंबरला जर फोन केला असता तर पुढे काय झालं असतं ? हे अनामिक नातं फुललं असतं का ? असं तिला अनेकदा वाटतं . अनेक शक्यता आहेत . कदाचित तो विसरूनही गेला असेल . किंवा तिला जसा तो सज्जन वाटला तसा तो नसेलही तिचा पुढे मागे गैरफायदा घेण्याचा त्याचा विचारही असू शकेल . या साऱ्या शक्यता पडताळून पाहण्यापेक्षा जे आहे ते तिथच राहू देणं जास्त चांगलं म्हणून ती ही आठवण जपून ठेवते . कारण नदीचं मूळ आणि ऋषीच कूळ शोधलं की अनेकदा पवित्रपणा उरत नाही.

In reply to by प्राची अश्विनी

तुम्ही जे वर लिहीलय ते कळतं आहेच.. की मनुष्य सज्जन आहे आणि अचानक एखाद्या माणासाशी अगदी छान गप्पा व्हाव्यात आणि त्या आयुष्यभर लक्षात रहाव्यात असं काहीसं झालंय. पण ज्या लेव्हलला तुम्ही हे शेवटी नेलयं ना, की रेशमी बासनात ठेवणे आणि ते पाहुन नव्हाय जगायला सिद्ध होणे, ह्या गोष्टी जनरली आपण ज्याच्या फार प्रेमात आहोत त्या व्यक्तिबाबत घडतात. तासभर भेटलेला माणुस फार तर चांगली आठवण म्हणुन सोबत राहील. अजुन एक असंही झालं असेल की तुम्ही "त्या" ला.. त्यांच्या गप्पांना तिच्यासाठी एवढं महत्वाचं बनवलत खरं, पण २०० ओळींमध्ये त्याबद्दल २ च ओळी आहेत. म्हणुन त्याची परिंणामकारकता तेवढी जाणवत नाही.. नसावी..

In reply to by पिलीयन रायडर

संपूर्ण सहमत. एक खरा अनुभव म्हणून, मुक्तक म्हणून चांगलं आहे. कथेसारखी नाही इतकंच. कथेत चरित्रं/घटना उभ्या करणं आवश्यक आहे. नाहीतर कुठेही न जुळणारे अनेक विचित्र आकाराचे सांधे एकत्र बांधल्यासारखे वाटतात. बाकी ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टीकोन..

छान षटकार ठोकला! आता लक्षात आलं! खूप छान स्पष्टीकरण दिलंत. अगोदर माझा गैरसमज झाला की नायिका नायकाला आत्महत्या करण्यापासून रोखते. पण आता एकदम छान विश्लेषण केलेत मानवी मनाच्या शक्यता पडतालण्याच्या शक्तिचे. अर्थात मला वाटते कथा थरारक वळण घेणार असे अनेकांना वाटले होते. पण तसे न झाल्यामुळे कदाचित मंडळी गोंधळली असावीत.

In reply to by मांत्रिक

तुमचा कसा काय गैरसमज झाला म्हणून आम्ही गोंधळलो होतो ओ. बाकी कै नै.

रात्री आडवेळी ट्रेन्च्या दरवाज्यात जाऊ नये/उघ्डू नये (फक्त पोलीसच तुम्हाला बघत नसतात) तर जगही जागे अस्ते. कुर्डुवाडीनजीक चोरट्यांच्या हल्य्याचा प्र्त्यक्षदर्शी प्रवासी नाखु