✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सुर्याची लेकरे

म
मृत्युन्जय यांनी
Wed, 07/22/2015 - 12:43  ·  लेख
लेख
एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला. नेहमीच्या पात्रांबद्दल अथवा घटनांबद्दल लिहिण्यापेक्षा थोडे अज्ञात असलेले वृषसेनाचे पात्र डोक्यात होते पण मग नंतर कर्णाच्या सगळ्याच मुलांवर एक लेख लिहावा असा विचार केला (फोकस तरीही वॄषसेनावर आहे) :). कर्ण सुर्यपुत्र म्हणुन मग ही सगळी सुर्याची लेकरे :) कर्ण स्वतः महाभारतातल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. कर्णाभवतालचे वलय खरे सांगायचे तर कृष्णार्जुन वगळता इतर सर्वच पात्रांना झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की कृष्ण, अर्जुन आणि कर्ण ही तीन पात्रे मिळुन महाभारतावर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते असे नाही पण या तीन पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते. अर्जुनाच्या वलयातुन बाहेर पडुन अभिमन्युने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो पण त्यातही 'अरेरे बिचारा कोवळा जीव ६ लोकांनी मिळुन मारला' अशी हळहळच जास्त दिसते. घटोत्कच सुद्धा कर्णाच्या शक्तीमुळे जास्त भाव खाउन जातो. त्यामानाने एका साध्या बाणाने मारला गेलेला वृषसेन किंवा भानुसेन मात्र त्या मानाने कमी प्रसिद्धी पावतात. त्यामुळेच अश्या कमी माहितीतल्या कर्णपुत्रांसाठी हा लेख. महाभारतानुसार कर्णाला ५ मुले: १. वृषसेन २. भानुसेन ३. चित्रसेन ४. सुषेन ५. सत्यसेन शिवाजी सावंतांनी मृत्युंजय मध्ये सुदामन नावाच्या अजुन एका मुलाला जन्म दिला आहे. मला इतर कुठल्या प्रतीत मात्र हा सुदामन दिसला नाही. सावंतांनुसार द्रौपदी स्वयंवरात सुदामन भीमार्जुनांकडून मारला गेला. नंतर कर्णाने दिग्विजया दरम्यान द्रुपदाला नतमस्तक करुन सुदामनाची समाधी बनवुन घेतली असा उल्लेख सावंतांनी केल्याचे आठवते. कर्ण युधिष्ठिरापेक्षा १६ वर्षांनी मोठा होता असे म्हणतात (हे देखील माझ्यामते एक अनुमानच आहे. स्पष्ट उल्लेख बहुधा कुठेही नाहित). त्यामुळे द्रौपदी स्वयंवराच्या वेळेपर्यंत कर्णाचे लग्न होउन त्याचा एक मुलगा तरी हाताशी आला असावा असा तर्क करुन कदाचित सावंतांनी हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा. अजुन एका मुलाचा उल्लेख काही कथांमध्ये येतो. नेमक्या पुराणाचे नाव मला आत्ता आठवत नाही पण बहुधा जैमिनी भारतात वॄषकेतुचा उल्लेख येतो. हा कर्णाचा सगळ्यात धाकटा मुलगा. युद्धाच्यावेळेस हा खुपच लहान असल्याने याने युद्धात भाग घेतला नव्हता. कर्णाच्या सर्व मुलांमध्ये दैवी अंश असलेला किंवा दैवी कार्यसंपादनासाठी जन्मलेला हाच एक. शैशवावस्थेत असताना कृष्णाने याच्याकरवी एका दैत्याचा वध घडवला. या दैत्याला कुठल्याही पुरुष अथवा स्त्री कडुन अथवा कुठल्याही शस्त्राने मरण येणार नाही असे अभय होते. शैशव अवस्थेतील मुले म्हणजे स्त्री अथवा पुरूष नाहित असा कुठलासा धर्माचा आधार घेउन वृषकेतुच्या हातात मंतरलेल्या दर्भाची काडी देउन कृष्णाने त्या दैत्याचा वध करवला अशी कथा मला पुसटशी आठवते. अर्थात मान्य प्रतींमध्ये हा उल्लेख कुठेच नाही. मुळात वॄषकेतुचा उल्लेखच जैमिनी भारत सोडून इतर कुठेही नाही. जैमिनी भारतानुसार वृषकेतु अर्जुनाबरोबर अश्वमेध यज्ञाच्या युद्धांमध्ये सहभागी होता आणि बर्याच ठिकाणी त्याने शौर्य दाखवले. बभ्रुवाहनाबरोबर त्यांचे जे युद्ध झाले त्यात अर्जुनाबरोबर वॄषकेतु देखील मारला गेला. मात्र नंतर अर्जुना बरोबर त्यालादेखील परत जिवंत केले गेले. जैमिनी भारताचे केवळ अश्वमेध पर्व सध्या अस्तित्वात असल्याने युद्धोत्तर काळात वृषकेतुचे काय झाले आणि राज्य त्याला न मिळता परिक्षिताला का मिळाले याबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही. कर्णाच्या इतर पाचही मुलांनी महाभारत युद्धात भाग घेतला होता. महाभारताच्या युद्धापुर्वी युद्धाचे काही नियम ठरवले गेले होते. ठराविक अंतराने जवळजवळ सगळ्याच नियमांना दोन्ही बाजुंनी तिलांजली दिली गेली. युद्धाच्या अनेक नियमांपैकी एक नियम होता की एका यौद्धाशी एकाच यौद्धाने लढावे. लढाईच्या पहिल्याच दिवशी काही मिनिटांमध्येच अनेक यौद्ध्यांनी भीष्मावर हल्ला करुन या नियमाला तिलांजली दिली. दुसरा नियम असा होता की कुणीही इशारा न देता दुसर्या यौद्ध्यावर हल्ला करु नये. या नियमालाही लवकरच तिलांजली दिली गेली. त्यामुळे बहुतेक प्रमुख यौद्धांना मारण्यासाठी कुठुनही कसाही हल्ला होउ शकतो हे लक्षात घेउन सगळ्याच प्रमुख यौद्धांचे रक्षण आजुबाजुला राहुन इतर दुय्यम दर्जाचे यौद्धे करत असत. स्वत: कृष्ण ज्याचा सारथी होता त्या अर्जुनाच्या रथाचे रक्षण त्याचे दोन मेव्हणे उत्तमौजा आणि युधामन्यु करायचे (हे दोघे शिखंडी, दॄष्ट्यद्युम्नापेक्षा धाकटे म्हणजे अर्थात द्रौपदीपेक्षादेखील लहान) तर कर्णाच्या रथाचे रक्षण पुढच्या बाजुने सुषेण आणि चित्रसेन करायचे आणि मागील बाजुने वॄषसेन करायचा. वॄषसेन वगळता कर्णाच्या सर्व मुलांनी कर्णाच्या आजुबाजुला राहुन युद्ध केले याचा एक अर्थ असाही काढता येइल की ते कदाचित युद्धात वॄषसेना इतके निपुण नव्हते. अर्थात सुषेण आणि चित्रसेन युद्धनिपुन होते असा उल्लेख काही ठिकाणी दिसतो. कर्णार्जुनाची जेव्हा तुलना होते तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की अर्जुनाच्या उपस्थितीत फार कमी प्रमुख यौद्ध्यांचे बळी गेले. त्याने जवळजवळ सर्वांना वाचवले. कधी पुढुन बाण मारुन तरी कधी मागुन अधर्माने बाण मारुन. कर्ण मात्र आपल्या उपस्थितीत आपल्या मुलांना वाचवु नाही शकला किंवा कदाचित त्याला तितका वेळ नाही मिळाला. त्याच्या दोन किंवा तीन मुलांना पांडवांनी त्याच्या उपस्थितीत मारले. सर्वप्रथम बळी गेला भानुसेनाचा. त्याला भीमाने मारले. त्याच वेळेस सुषेणाचा देखील बळी जायचा मात्र ऐनवेळी वृषसेनाने भीमापासुन त्याला वाचवले आणी स्वतः भीमाशी युद्ध सुरु केले. सत्यसेन आणि चित्रसेन मात्र इतके सुदैवी नव्हते. या दोघांनाही नकुलाने मारले. चित्रसेन हा एक कसलेला धनुर्धर होता. त्याने नकुलाचे धनुष्ञ तोडले, रथ मोडला, घोडे मारले. मात्र त्यानंतर नकुल त्याच्या आवडत्या शस्त्रानिशी चित्रसेनावर तुटुन पडला. नकुलाने तलवार हातात घेउन चित्रसेनाच्या रथावर उडी मारली आणि तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. कर्ण आणि वृषसेनाच्या मृत्युनंतर देखील शेवटच्या दिवशी चित्रसेन आणि सत्यसेन जिवंत होते. दोघांनाही नकुलानेच मारले. सुषेण होता की नाही याबाबत गोंधळ आहे. सुषेणाच्या मृत्युसंदर्भात बराच सावळागोंधळ आहे. एकतर सुषेण हे नाव त्या काळातले निखिल, सचिन किंवा अमित होते. १० पात्रांपैकी एकाचे नाव तरी सुषेण असायचेच. धृतराष्ट्राच्या एका मुलाचे नाव देखील सुषेण होते (एकाचे कर्ण आणि एकाचे चित्रसेन देखील होते म्हणा. १०० वेगळीवेगळी नावे कशी आठवावीत. ही मुले जेव्हा गांधारी धृतराष्ट्राला भेटायला जात असतील तेव्हा कदाचित सांगत असतील की मी तुमचा ३३ वा मुलगा नंदक बरंका. आठवते का आपण साडेतीन वर्षापुर्वी भेटलो होतो वगैरे. कसे ना लक्षात राहणार सगळे आणि त्यांची नावे). तर सुषेण नावाबद्दल खुप गोंधळ आहे. एक तर खुप सुषेण होते. त्यातले बरेच राजे, एक धृतराष्ट्राचा मुलगा, दोन्हीकडच्या राजांची नावे सुषेण. या गोंधळात व्यासांनी या सुषेणाबद्दल गोंधळ केला. हा एक निष्णात धनुर्धर परंतु कसा मारला गेला याबद्दल गोंधळ आहे. एकेठिकाणी व्यास म्हणतात की शेवटच्या दिवशी चित्रसेन, सत्यसेनापुर्वी नकुलाने त्याला देखील मारला तर दुसरीकडे हेच व्यास म्हणतात की त्याला उत्तमौजाने कर्णाच्या डोळ्यादेखत मारला (आणि मग पळुन गेला). नक्की काय कळत नाही. पण ही मुले म्हणजे कर्णाचे कवच होते. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत कर्ण सुरक्षित राहिला. मात्र एक एक करत त्याचे विश्वासु संरक्षक मारले गेले. अंतिम युद्धापुर्वी वृषसेन मारला गेल्यावर त्याचे मुख्य संरक्षक कवचच तुटले. तसे अर्जुनाच्या बाबतीत कधीही झाले नाही. अर्थात हे संरक्षक अंतिम कर्णार्जुन युद्धात असेही कुचकामीच ठरले असते. कारण महाभारतात लिहिल्याप्रमाणे ते युद्ध इतके भीषण झाले की त्यांच्या जवळपासच्या प्रत्येक यौद्धाला त्या दोघांनी मिळुन टिपुन काढले. त्या दोघांच्या आसपास लढाई करायची म्हणजे मृत्युला आमंत्रण द्यायचे हे ओळखुन इतर सर्व यौद्धे लांब जाउन थांबले. अंतिम काही पळांमध्ये तर आजुबाजुच्या सैनिकांनी युद्ध पुर्णपणे थांबवले होते. तिथे वृषसेन असता तरीही फारसा फरक पडला नसता. इतर सर्व प्रमुख यौद्ध्यांसमोर वृषसेन थोडासा झाकोळला गेला आहे. परंतु महाभारताने त्याचे शौर्य वेळोवेळी मान्य देखील केले आहे. युद्ध्याच्या सुरुवातीला दृष्ट्यद्युम्नाने जेव्हा यौद्ध्यांची वाटणी केली तेव्हा एकेका यौद्ध्याला त्याने कौरवपक्षातील एकेका यौद्ध्याला मारण्याची जबाबदारी दिली. त्यात अर्जुन - कर्ण, भीम - दुर्योधन अशी वाटणी झाली तेव्हा अभिमन्यु - वृषसेन अशी देखील वाटणी झाली. दृष्ट्यद्युम्नाच्या मते अभिमन्यु अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता हे लक्षात घेता वृषसेनाचे महत्व जाणवते. भीष्माने देखील त्यांच्या पक्षातल्या यौद्ध्यांचे मुल्यमापन केले तेव्हा कर्णाला युद्धभूमीपासुन दूर ठेवण्याच्या हेतुन जाणुनबुजुन त्याची अर्धरथी अशी संभावना केली मात्र वृषसेनाला त्यांनी महारथी असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचे दिसते. एकप्रसंगी कर्ण युद्धभूमीपासुन दूर असताना शल्याला भीमाने घायाळ केले तेव्हा त्याला घेउन कृतवर्मा युद्धभूमीपासुन दूर गेला असता एकट्या वृषसेनाने सर्व पांडवांना सळो की पळो करुन सोडले. त्याने भीमाला निरस्त्र केले, नकुलाच्या मुलाला शतानिकाला तो मारणारच होता इतक्यात इतर पांचाल वीर आणि द्रौपदीपुत्र मध्ये पडले म्हणुन तो वाचला. चक्रव्युहामध्ये देखील द्रोणांनी जयद्रथाला इतर पांडवांना द्वारातच रोखण्यासाठी नियुक्त केले होते (जयद्रथाला तसा वर मिळाला होता) तर त्याच्यामागे लगेच वृषसेनालाच ठेवले होते. अभिमन्यु चक्रव्युहात शिरताच त्याला सामोरा गेलेला पहिला यौद्धा वृषसेनाच होता आणि तो शौर्याने लढला मात्र अभिमन्युने त्याला बेशुद्ध केले आणी पुढे शिरला. यथावकाश अभिमन्युचा बळी गेल्यावर अर्जुनाने जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा जयद्रथाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी द्रोणांनी ज्या सहा यौद्धांना नियुक्त केले होते त्यात एक वृषसेन होता. इतर जण होते कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य आणि कृपाचार्य. थोडक्यात सांगायचे तर द्रोणाचार्यांनी त्यांचे सर्वोत्तम योद्धे त्याच्या आजुबाजुला ठेवले. पंधराव्या दिवशी खुद्द द्रोणांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्या शिरावर होती त्या लोकांमध्ये वृषसेन एक होता. त्याने आख्ख्या द्रुपद सैन्याला खिळवुन ठेवले होते. स्वतः द्रुपद जो तोवर फार कमी लोकांकडुन हारला होता तो देखील वृषसेनासमोर निष्प्रभ ठरला आणि बेशुद्ध झाला. नंतर दृष्ट्यद्युम्नाने द्रोणांना मारल्यावर मात्र तो पळुन गेला. द्रुपद, पांडव, सात्यकी, अर्जुन यापैकी सर्व महत्वाच्या यौद्ध्यांबरोबर वृषसेन लढला. अश्या या शूर यौद्धाचा अंत देखील त्याला साजेसा झाला. भीम ऐन भरात असताना त्याने कौरवांची दाणादाण उडवली होती. स्वतः कर्ण पळुन जायच्या तयारीत होता. त्यावेळेस एकटा वृषसेनच काय तो भीमाला तोंड देण्यासाठी उभा राहिला. त्याच्याकडे बघुन कर्ण देखील परत फिरला. त्यानंतर त्या युद्धभूमीवर सर्वात घनघोर युद्ध लढले गेले. भीमाच्या मदतील नकुल आला. वृषसेन एकटा त्या दोघांशीही लढत होता. नकुलाने पराक्रम गाजवला देखील मात्र वॄषसेनाने प्रथम त्याचे चिलखत आणि मग त्याचे धनुष्य तोडले आणि मग त्याचे घोडे देखील मारले. कर्णाच्या दुसर्या मुलाने चित्रसेनाने देखील हा पराक्रम नंतर केला मात्र तेव्हा नकुलाने तलवारीने युद्ध करुन चित्रसेनाला मारले . वॄषसेनाने मात्र नकुलाची तलवार देखील बाणांनी तोडली. हतबल झालेला नकुल अखेर भीमाच्या रथावर चढला आणि तिथुन त्या दोघांनी परत वॄषसेनाशी युद्ध सुरु केले. वृषसेनाचे आक्रमण इतके धडकी भरवणारे होते की भीमाने नकुलाला वाचवण्यासाठी थेट अर्जुनाची मदत मागितली. अर्जुन येइपर्यंत वॄषसेनावर द्रौपदीची पाच मुले, द्रुपदाची पाच मुले आणि स्वतः सात्यकी (भीम नकुल वेगळेच) अश्या ११ यौद्ध्यांनी हल्ला केला. इतर कौरव यौद्धेदेखील मग वॄषसेनाच्या मदतीला गेले. नेहमीप्रमाणे थोड्याच वेळात युद्ध करणार्या लोकांच्या जोड्या पडल्या. वॄषसेनाने जणू नकुलाला मारण्याचा विडाच उचलला होता. तो वारंवार त्याला निशस्त्र करुन मारु इच्छित होता. अखेर अर्जुनाने वृषसेनाला स्वतः मारण्याचे ठरवले. याखेपी भीम, अर्जुन, नकुल आणि शतानिक (नकुलाचा मुलगा) असे चार प्रमुख यौद्धे वॄषसेनाशी लढत होते. वॄषसेनाने त्या सर्वांना आपल्या बाणांनी विद्ध केले. त्याच्या या पराक्रमावर खुष होउन कौरव सैन्य त्याला उत्तेजन देत होते. तिथेच घात झाला. जखमांनी चवताळलेल्या अर्जुनाने अतिशय प्रखर युद्ध करत अखेर त्याचे दोन्ही हात बाणांनी छाटुन मग त्याचे शिर उडवले. इतर कुठल्याही यौद्ध्याच्या मृत्युपेक्षा जास्त दु:ख कर्णाला वॄषसेनाच्या मृत्युवर झाले. त्याच दिवशी लढल्या गेलेल्या महाभारतातल्या सर्वात भीषण युद्धात अखेर अर्जुनाने रथाचे चाक जमिनीत घुसलेल्या कर्णाचे देखील शीर उडवले. राधासुताचा सर्वात निष्णात शूर पुत्र युद्धाच्या सतराव्या दिवशी पडला. जैमिनी भारताकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की युद्धाच्या १८ व्या दिवशी चित्रसेन आणी सत्यसेनाच्या मृत्युसरशी राधासुताचा वंश पुर्णपणे संपला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
25359 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

वृषाली आणि सुप्रिया

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/23/2015 - 10:12 नवीन
'मृत्युंजय' मध्ये कर्णाच्या या दोन्हीही पत्नींचा उल्लेख आहे. या मुलांमध्ये वृषसेन आणि वृषकेत किंवा केतू - हे वृषालीचे पुत्र असतील हे तर कळतंच. बाकीच्यांबद्दल काय माहिती आहे?
  • Log in or register to post comments

कर्णाच्या वायकांबद्दलची

मृत्युन्जय
गुरुवार, 07/23/2015 - 12:15 नवीन
कर्णाच्या वायकांबद्दलची माहिती शोधावी लागेल. माझ्या मते तरी काही संदर्भ मिळत नाही. बाकी वृषाली शब्दाचा एक अर्थ "शूद्र स्त्री" असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हो?

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/23/2015 - 22:35 नवीन
मला कामधेनू असा सांगण्यात आला होता. हा जो तुम्ही अर्थ सांगितलात, त्याचा काय संदर्भ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

महाभारताचे इंग्रजी भाषांतर

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 10:41 नवीन
महाभारताचे इंग्रजी भाषांतर किसारी मोहन गांगुली यांनी केले आहे. भाषांतर करताना त्यांनी अनेक ठिकाणी टिप्पण्या दिल्या आहेत. त्या खुपच इंटरेस्टिंग आहेत. एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे की कर्णाने "असुरी प्रतिज्ञा केली होती" आता असुरी प्रतिद्ना म्हणजे काय तर दारु न पिण्याची. तसेच त्यांनी एके ठिकाणी वॄषालीपती हा शब्द वापरला आहे (हा शब्द कर्णाच्या संदर्भात नाही). त्या शब्दाच्या अर्थ त्यांनी असा दिला आहे: Vrishalipati literally means the husband of a Sudra woman. By actually marrying a woman of the lowest order, by marrying before the elder brother, by marrying a girl that has attained to puberty, and by certain other acts, a Brahmana comes to be regarded as a Vrishalipati ही संज्ञा आता नक्कीच कालबाह्य आणि अदखलपात्र आहे. आता १८ च्या आत मुलींची लग्ने होतच नाहित आणि जातीपातीच्या भिंती सुद्धा ढासळत चालल्या आहेत. पण त्या काळात जेव्हा महाभारत घडले असेल किंवा जेव्हा ते लिहिले गेले तेव्हा वृषालीपती या शब्दाचा अर्था हा असा होता. Vrishalipati = the husband of a Sudra woman आणि पति = Husband हे लक्षात घेता वृषाली = शूद्र स्त्री अशी फोड मी केली. चूभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अवांतर

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 11:49 नवीन
किसारी मोहन गांगुली यांनी ज्या प्रतीच्या आधारे भाषांतर केलेय ती प्रत म्हणजे महाभारतावरचा फेमस टीकाकार नीलकण्ठ चतुर्धर याने वापरलेली होय. नीलकण्ठी टीकेचाही त्यांनी कैक ठिकाणी आधार घेतलाय असे वाचले आहे. हा नीलकण्ठ चतुर्धर एक मराठी माणूस होता, शिवकालीन होता. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणारा. आईचे नाव फुल्लाम्बिका (हे अर्थात संस्कृतीकरण असावे असे आपले माझे मत), वडिलांचे नाव विसरलो. १६५० नंतर काशीस स्थायिक झाला, तिथेच त्याने ती समग्र महाभारतावरची अवाढव्य टीका लिहिली, जवळपास साडेपाच हजार पानी आहे. त्याची पीडीएफच साडेचारशे एमबी आहे. लिंक इथे बघा. https://archive.org/details/mahabharata_nk इतके अवाढव्य काम एका मराठी माणसाने एकहाती केलेय ही गोष्ट अतिशय भूषणावह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

फुल्लाम्बिका

पैसा
Fri, 07/24/2015 - 12:04 नवीन
फुल्लाम्बिका हे नाव तेव्हा असू शकेल. आत्ता माझ्या ओळखीची एक शारदाम्बा बँकेत मॅनेजर आहे. मात्र ती हुबळीकडची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कदाचित, पण प्रदेश बघा.

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 12:07 नवीन
कदाचित, पण प्रदेश बघा. अहमदनगर साईडला ब्राह्मणांत म्हटले तरी अशी नावे प्रचलित असण्याची शक्यता कमीच वाटते. त्यात परत संस्कृत ग्रंथ लिहिताना नावांचे संस्कृतीकरण करणे हे सर्रास चालायचे, उदा. शिवभारतकार परमानंद हे मालुसरे = मल्लसूरी, घाटगे = घंटक, इ. शब्दयोजना करतात. त्यामुळे तसे वाटले इतकेच. अर्थात नीलकण्ठाची आई बाय एनी चान्स कर्नाटकाकडची असेल तर तसे असूही शकेल म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हेच म्हणतो.

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 12:06 नवीन
हेच म्हणतो. बाकी नीळकंठाची प्रत सुद्धा महाभारतातील भर इ.स. १५/१६ व्या शतकापर्यंत नेते. नीळकंठाने महाभारताच्या उत्तरी आणि दक्षिणी प्रतींचा जबरदस्त अभ्यास करुन प्रचंड संकलन केलेय. नीळकंठीप्रती पेक्षाही अधिक संशोधित प्रत म्हणजे भांडारकर संशोधीत आवृत्ती. भांडारकरप्रतीत महाभारतातील जे काही आहे ते सर्व इ.स. १० व्या शतकाच्या आधीचेच आहे असे नि:संशयपणे म्हणता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भांडारकर प्रतीबद्दल असे

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 12:14 नवीन
भांडारकर प्रतीबद्दल असे म्हणतात की महाभारतातले अनेक गाजलेले श्लोक तिच्यात नाहीचेत. मज्जाच आहे एकूण. हे जरा पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भांडारकर प्रतीत वगळलेला बहुधा

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 12:44 नवीन
भांडारकर प्रतीत वगळलेला बहुधा सर्वात ठळक उल्लेख म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणप्रसंगीचा कृष्णाचा धावा आणि कृष्णाने वस्त्रे पुरवून केलेली सोडवणूक. त्यांच्या संशोधनाप्रमाणे कृष्णाचा धावा ही १० व्या शतकानंतरची भर आहे असे मानता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हाण तेजायला.

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 12:51 नवीन
हाण तेजायला. बाकी नीलकण्ठाबद्दलचे डीटेल्ड विवेचन इथे वाचता येईल. अगदी तपशीलवार पूर्ण विवेचन आहे. https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=qcq22n9NT7sC&pg=RA1-PA225&redir_esc=y#v=onepage&q&f=false इथे पान क्र. २२५ ते २५३ पर्यंत लेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओझरतं पाहिलं. जबराटच दिसतंय.

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 12:54 नवीन
ओझरतं पाहिलं. जबराटच दिसतंय. डिट्टेलवार वाचतो रात्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बाबारे तु प्रचंड अभ्यस

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 13:18 नवीन
बाबारे तु प्रचंड अभ्यस केलेला दिसतोस या सगळ्याच गोष्टींचा. विंटरेंस्टिंगा अहे तो लेख देखील. पुर्ण वाचला नाही अजुन. वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नै बा. तुमच्यासारखे पूर्ण

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 13:53 नवीन
नै बा. तुमच्यासारखे पूर्ण महाभारत वगैरे नै कधीच वाचले. फक्त नीलकंठ या विषयात जरा इंट्रेस असल्याने शोधाशोध केली होती इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बॅटमॅन

सतीश कुडतरकर
Fri, 07/24/2015 - 16:11 नवीन
आता तुम्ही हा नवीन (अथात जुनंच) किडा सोडून दिलात. च्यामारी असला माणूस इथे होऊन गेला आणि त्याचा कुठेच कधी कोणाकडून उल्लेख झाला नाही. भारी दिसतंय. वाचतो. ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संस्कृत आहे :-(

सतीश कुडतरकर
Fri, 07/24/2015 - 16:19 नवीन
संस्कृत आहे :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

अहो असूद्यात संस्कृत. मूळ

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 17:07 नवीन
अहो असूद्यात संस्कृत. मूळ टीकाच वाचायची असे कोण म्हटलेय? अन वाचू म्हटले तरी जन्म पुरणार नै....वेल पुरेल, पण लै दिवस लागतील अन तुफान बोअरही व्हाल. त्यापेक्षा नीलकंठाबद्दल जे लिहिलेय तेवढे वाचा फक्त- पुलं म्हणतात तसे पेढा करण्याच्या कसबापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची. अनेक लोकांनी डोक्याचा भुगा पाडून बरेच काही लिहिले आहे, आपण किमान त्यांच्याबद्दलचे लिखाण तरी नक्कीच वाचू शकतो नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

चमत्कार

पैसा
Fri, 07/24/2015 - 18:02 नवीन
मुळात तो जय नावाचा इतिहास असेल तर त्यातले सर्व चमत्कार हे प्रक्षिप्तच असतील ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी असंच काही सांगता येत

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 18:41 नवीन
अगदी असंच काही सांगता येत नाही. इतिहासलेखनातही अतिशयोक्ती असतेच. अगदी व्यासांनी लिहिलेल्या मूळ कथानकातही काही चमत्कार निश्चितपणे असतील. पण सर्वसाधारणपणे कृष्णाला जे विष्णूअवताराचे स्वरूप दिलेय हे व्यासांनी नव्हे तर इतर प्रक्षिप्तकारांनी. ह्याच न्यायाने श्रीभगवान उवाच असे सुरुवातीपासून उल्लेख असलेली भगवदगीता सम्पूर्ण प्रक्षिप्त ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नक्कीच!

पैसा
Fri, 07/24/2015 - 18:48 नवीन
दोन्ही सैन्ये समोरासमोर उभी असताना कृष्ण १८ अध्याय सांगू शकेल का? मग त्याने इतरांना योगनिद्रेत नेले वगैरे स्पष्टीकरण द्यावे लागेल. १८ श्लोक सांगणेही खरे तर कठीण दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गीतेचा भाग प्रक्षिप्तच असावा.

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 18:54 नवीन
गीतेचा भाग प्रक्षिप्तच असावा. मात्र ७०० श्लोक घडाघडा पाठ बोलुन दाखवायला वेळ तो असा कितीक लागणार? होउ शकेल की तासा दोन तासात. तितका वेळ इतर लोक स्वस्थ कसे बसले हा प्रश्न मात्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गीता नक्कीच संपूर्णपणे

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 19:10 नवीन
गीता नक्कीच संपूर्णपणे प्रक्षिप्त आहे. भगवद्गीता उपपर्वाच्या आधी युद्ध सुरु होण्यापूर्वी धर्मार्जुनांचा संवाद आहे. हयात धर्माला विषाद होऊन त्यास अर्जुन युद्ध करण्यासाठी उद्युक्त करतो. लगेचच पुढच्याच २/३ अध्यायात अर्जुनालाच विषाद कसा उत्पन्न होईल? अजून एक ग्रांथिक पुरावा म्हणजे धृतराष्ट्र गीतेच्या आदल्या अध्यायात युद्ध कसे सुरु झाए ते विचारतो आणि लगेचच पुढच्या गीतेमधील अध्यायात परत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे करत पुनरुक्ती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

भगवदगीता पूर्ण म्हणायला दीड

प्यारे१
Sun, 07/26/2015 - 02:19 नवीन
भगवदगीता पूर्ण म्हणायला दीड दोन तास पुरेसे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ऐन धुमश्चक्रीमध्ये दोस्त राष्ट्रांनी बैठका घेतल्या होत्या त्यामुळे असा युद्धभूमीवर शांत राहता येतं का वगैरे गौण ठरावं. (युद्धाचा format बदलला वगैरे मान्य केलं तरी मध्ये रथ नेऊन ठेव सांगणारा आणि त्याचं ऐकून तसं करणारा दोघेही महापराक्रमी असल्यानं अगदीच टिवल्याबावल्या करायला आले नसतील ही खात्री सगळ्यांना असणार ;) बाकी आपलाच राजा (कृष्ण) विरुद्ध बाजूनं शांत बसून का होईना युद्धात सहभागी होतो म्हटल्यावर यादवसेनेने किती जोरकस आणि मन लावून युद्ध केलं असेल असा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. की ही देखील कृष्णानीती च होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कृष्ण राजा नव्हता. वसुदेव

प्रचेतस
Sun, 07/26/2015 - 05:47 नवीन
कृष्ण राजा नव्हता. वसुदेव होता. यादवांमधेही अंधक, भोज विरुद्ध वृष्णी, शिनी अशी गटबाजी पहिल्यापासून होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कृष्ण राजा नव्हता हे तांत्रिक

प्यारे१
Sun, 07/26/2015 - 11:46 नवीन
कृष्ण राजा नव्हता हे तांत्रिक दृष्टया बरोबर आहे. वसुदेव मनमोहनसिंगांची प्राचीन आवृत्ती आहे. ;) मृत्युंजय चं शतकी धाग्यासाठी हार्दिक अभिनन्दन! कौरवांशी मैत्री म्हणजे 'शतका'ची खात्री असा काही प्रवाद 'तेव्हाच्या' मिपा मध्ये होता का? (शंभर कौरवांचा एक एक प्रतिसाद मिळून )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

महाभारतात बर्‍याच ठिकाणी

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 18:51 नवीन
महाभारतात बर्‍याच ठिकाणी कृष्ण आणि अर्जुनाचा उल्लेख नारायण आणि नर म्हणुन येतो. नर आणि नारायण दोन्ही विष्णुची रुपेच. मात्र काही ठिकाणी कॄष्ण विष्णुचाच अवतार असल्याचे उल्लेख सोकॉळ्ड वरिजिनल महाभारतात देखील आहेतच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नक्कीच आहेत.

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 18:57 नवीन
नक्कीच आहेत. फार कशाला अगदी भांडारकरप्रतीत देखील आहेतच. पण भांडारकर प्रत फ़क्त १० शतकापूर्वीच्या महाभारतापर्यंत आपणास नेते. विष्णूचे उल्लेख साधारण इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत खेचले जाऊ शकतात. तर शुद्ध मानवी स्वरुप बुद्धपूर्व काळातील मानावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ही नविनच माहिती आहे. धन्यवाद.

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 12:07 नवीन
ही नविनच माहिती आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मस्तच लिखाण . आवडले

प्रीत-मोहर
गुरुवार, 07/23/2015 - 10:28 नवीन
मस्तच लिखाण . आवडले
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/23/2015 - 12:11 नवीन
छान लेख.. सावकाशीने परत एकदा वाचायला वा खू साठवते आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

छानच!!

इशा१२३
गुरुवार, 07/23/2015 - 12:52 नवीन
महाभारत अत्यंत गहन.(खरे खोटे हा वेगळा मुद्दा)तरिहि आवडिचे.कर्ण आणि कृष्ण हे तर आवडिचे पात्र.कर्ण आणि त्याच्या मुलांची खूप कमी माहिती मिळते वाचायला.(त्यातल्या त्याय मृत्युंजयमधेच जास्त)बाकी वृषसेनाचा उल्लेख काहि ठिकाणी वाचलाय.इतर मुल दुर्लक्षितच. त्यामुळे या विषयावर लिहिलेला लेख आवडलाच.
  • Log in or register to post comments

महाभारत

अरवीन्द नरहर जोशि.
गुरुवार, 07/23/2015 - 23:07 नवीन
अत्यंत उत्तम व रोचक विषय असून फारच चांगले लिहिले आहे .
  • Log in or register to post comments

खुप छान लेख. फार पुर्वीपासुनच

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 07/24/2015 - 06:58 नवीन
खुप छान लेख. फार पुर्वीपासुनच कर्णाच्या बाबतीमधे हळवा कोपरा आणि सहानुभुती आहे. वास्तविक पाहता हा जेष्ठ पांडव कुंतीच्या चुकीमुळे (चुक म्हणवी का विधी का विधान ह्याबद्दल अंमळ गोंधळामधे असल्यानी सद्ध्या चुक असचं म्हणतो) आयुष्यभर स्वकियांकडुनचं हिणावला गेला. ज्याने हस्तिनापुरावर राज्य करावे त्याला दुर्योधनाने दिलेल्या राज्यावर समाधान मानावे लागले. एक जन्माने आणि कर्माने क्षत्रिय असुनही द्रौपदीकडुन सुतपुत्र म्हणुन हिणवले गेले (ह्या बैका ना अश्याच पुर्वीपासुन ;) ). जर का कवचकुंडलांची कथा खरी असेल तर इंद्राने कपटाने त्याच्याकडुन ती काढुन घेउन अधर्मचं केला. जर का कपटाने ती कवचकुंडलं काढुन घेतली नसती तर पांडवांचा त्याच्यासमोर टिकाव लागला असता काय? असे अनेक खटकणारे मुद्दे आहेत. एक खुप सुंदर लेख लिहिल्याबद्दल मृत्युंजयांचे आभार :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

जुइ
Fri, 07/24/2015 - 07:13 नवीन
महाभारतातील वेगळ्या पात्रावरील माहिती नविनच कळाली.
  • Log in or register to post comments

सर्व वाचक आणि

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 10:43 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार. धाग्याचे काश्मीर न केल्याबद्दल सूज्ञ वाचकांचे डब्बल आभार :)
  • Log in or register to post comments

महाभारताचा खरा हिरो भीम आहे.

प्रसाद१९७१
Fri, 07/24/2015 - 10:51 नवीन
महाभारताचा खरा हिरो भीम आहे. पण काय कारण असावे की तो दुर्लक्षीत केला गेला आहे? भीमानी द्रॉपदीची कधीही साथ सोडली नाही. अज्ञातवासात असताना द्रौपदीला वाचवायला भीमच उभा राहीला. धर्माच्या द्युतात द्रौपदीला बेट म्हणुन लावण्याला भीमानेच फक्त विरोध केला, बाकी अर्जुन वगैरे मुग गिळुन बसले होते. द्युतात युधिष्टीर हरल्यावर दुर्योधना ने द्रॉपदीला त्याच्या मांडीवर बसायला सांगीतल्यावर द्रौपदीने पांडवांची निर्भत्सना केल्यावर भीमानेच प्रतिज्ञा केली दुर्योधनाला मारण्याची. तेंव्हा युद्ध होणार हे माहीतीपण नव्हते. द्रौपदीला कदाचित हे सर्व नंतर जाणवल्यामुळे, ती मरताना भीमाला तिने पुढ्च्या जन्मी "थोरला हो" असे सांगीतले.
  • Log in or register to post comments

द्रौपदीला कदाचित हे सर्व नंतर

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 11:21 नवीन
द्रौपदीला कदाचित हे सर्व नंतर जाणवल्यामुळे, ती मरताना भीमाला तिने पुढ्च्या जन्मी "थोरला हो" असे सांगीतले हे रोचक आहे. पण महाभारतात असे कुठे लिहिलेले मला आढळले नाही. मरताना द्रौपदी काहिच म्हणाली नाही. ती फक्त मेली. संपुर्ण स्वर्गारोहण पर्वाला तसा फारसा अर्थ नाही. ते नंतर घुसडले आहे असे तज्ञांचे मत आहे. तरीही "थोरला हो" असे ती कुठेही भीमाला म्हणताना दिसत नाही. तिला म्हणायचेच झाल्यास ती कदाचित त्याला "अर्जुन हो" असे म्हणाली असती. असो. भीम शूर आणी बलवान असला तरी तो महाभारताचा होरो त्याच कारणाने होउ शकत नाही ज्या कारणाने दुर्योधन होउ शकत नाही. तो क्रोधिष्ट, संतापी आणि अविचारी होता. अर्जुनातल्या नम्रतेचा त्याच्यात अभाव होता आणि कृष्ण, दुर्योधन आणि युधोष्टिर यांच्यातील मुत्सद्देगिरीचाही त्याच्यात अभाव होता. सर्वांचे सर्व गुण अंगी असलेला कृष्ण म्हणुनच महाभारताचा हिरो आहे. तो नम्र, सज्जन, दयाळु, शूर, धैर्यशील आणि बलवान तर होताच पण त्याशिवाय उत्तम मुत्सद्दी, राजकारणी आणी विद्वान देखील होता. महाभारतात राजा एकच कृष्ण. बाकी सगळी केवळ प्यादीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

>>>>सर्वांचे सर्व गुण अंगी

प्यारे१
Fri, 07/24/2015 - 12:19 नवीन
>>>>सर्वांचे सर्व गुण अंगी असलेला कृष्ण म्हणुनच महाभारताचा हिक्यूरो आहे. तो नम्र, सज्जन, दयाळु, शूर, धैर्यशील आणि बलवान तर होताच पण त्याशिवाय उत्तम मुत्सद्दी, राजकारणी आणी विद्वान देखील होता. महाभारतात राजा एकच कृष्ण. बाकी सगळी केवळ प्यादीच. एक नंबर! (तुझं आवडतं नाव घेतोस की काय असं उगाच वाटलं. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हे रोचक आहे. पण महाभारतात असे

प्रसाद१९७१
Fri, 07/24/2015 - 11:33 नवीन
हे रोचक आहे. पण महाभारतात असे कुठे लिहिलेले मला आढळले नाही. मरताना द्रौपदी काहिच म्हणाली नाही. ती फक्त मेली. संपुर्ण स्वर्गारोहण पर्वाला तसा फारसा अर्थ नाही. ते नंतर घुसडले आहे असे तज्ञांचे मत आहे. तरीही "थोरला हो" असे ती कुठेही भीमाला म्हणताना दिसत नाही.
हे मी ऐकलेले आहे, महाभारतात कुठे आहे वगैरे माहीती नाही. तज्ञ सांगु शकतील. "थोरला हो" म्हणण्या मागे कारण असे होते की युधीष्टीर थोरला असल्यामुळे त्याचे विचार कोणाला पटले नाहीत तरी ते ऐकायला लागायचे. द्युताच्या वेळी जर भीम थोरला असता तर तो युधीष्टीराला ओव्हरराईड करु शकला असता. वस्त्रहरणाचे शल्य द्रौपदीला कायमच जाचत असणार म्हणुन थोरला हो असे म्हणले असावे.
तो क्रोधिष्ट, संतापी आणि अविचारी होता
ह्याची काय उदाहरणे?
कृष्ण, दुर्योधन आणि युधोष्टिर यांच्यातील मुत्सद्देगिरीचाही त्याच्यात अभाव होता
युधीष्टीराची कुठली मुत्सद्देगीरी?
  • Log in or register to post comments

भीमाच्या अविचारी संतापाची

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 11:45 नवीन
भीमाच्या अविचारी संतापाची अनेक उदाहरणे सांगता येतील. भर सभेत, द्युत हारलेले असताना आणि स्वतः दास झालेले असताना (कुरुसभेतील सर्व ज्येष्ठांनी त्यांचे दास्यत्व मान्य केले होते) दुर्योधनाला धमकी देणे हा अविचार होता. पांडव कौरवांमध्ये अतीव द्वेषाची पहिली ठिणगी देखील भीमाच्या दांडगाईने पडली. युद्धात आपल्या शत्रुचे रक्त पीणे हा देखील आततायीपणा होता. हतबल झालेल्या दारुण अवस्थेतील आपल्या अंध काकाला जाणुनबुजुन सर्वांसमोर त्याच्या मुलाला कसे मारले हे सांगुन हिणवण्याच्या प्रकार भावनाहीन आणि विवेकशून्य होता. भीमाला राग प्रत्येक प्रसंगी इतरापेक्षा लवकर आणि अधिक यायचा आणि अनावर व्हायचा. त्याचे ते धसमुसळे वागणे कदाचित द्रौपदीला आवडत असावे पण एक राजा किंवा राजकुमार म्हणुन ते अनुचित आणु अयोग्य होते म्हणुनच भीम महाभारताचा हिरू होता होता राहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

युधीष्टीराची कुठली

मृत्युन्जय
Fri, 07/24/2015 - 11:49 नवीन
युधीष्टीराची कुठली मुत्सद्देगीरी? हा माझ्या एका लेखाचाच विषय आहे. संदर्भांची आणि घटनांची नीट बांधणी करतो आहे. त्यामुळे आत्ता लगेच यावर काही बोलत नाही. पण महाभारताचे राजकारण मुख्यत्वे तीन माणसांच्या अवतीभोवती फिरते कृष्ण, दुर्योधन आणी युधिष्ठिर (शकुनी तोंडी लावण्यापुरता). या तिघांची प्रत्येक चाल ही त्या त्या परिस्थितीतल्या राजकारणाची एक उत्कृष्ट खेळी होती. यात कृष्ण दुर्योधनाला भारी पडला. युधिष्टिर या दोघांपेक्षाही राजकारणात थोडा कच्चा होता पण इतरांपेक्षा खुप पुढचा. म्हणुनच तो इतर सर्व बाबतीत उणा असुनही यथायोग्य राज्य करु शकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

'थोरला हो' हे शब्द मूळ

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 12:01 नवीन
'थोरला हो' हे शब्द मूळ महाभारताच्या प्रतीत नाहीत. हे शब्द इरावती कर्व्यांनी 'युगांत' मध्ये द्रौपदीच्या विवेचनात वापरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

त्यांच्या तशा शब्दयोजनेमागील

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 12:04 नवीन
त्यांच्या तशा शब्दयोजनेमागील सोर्स काय होता हे दिलेय का कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सोर्स कसला. हे नुसते विवेचन

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 12:09 नवीन
सोर्स कसला. हे नुसते विवेचन आहे. बाकी ह्या शब्दावरुन कुरंदकर आणि बाईंमध्ये वाद झाल्याचे स्मरते. बाईंनी हे वाक्य पुढील प्रतीत 'पाचांमध्ये थोरला हो' असे दुरुस्त केले. नेमका वाद काय होता ह्याचा संदर्भ युगांतमध्ये बघावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हात्तेरेकी, असंय होय.

बॅटमॅन
Fri, 07/24/2015 - 12:34 नवीन
हात्तेरेकी, असंय होय. बाकी प्रकाशक रा० ज० देशमुख यांना लिहिलेल्या एका पत्रात कुरुंदकरांनी बाईंची फुल साले काढली आहेत. "एकदा वादविवादाच्या राउंडात घेतले तर बाईंना झेपणार नाही" अशा आशयाचा मजकूर तिथे वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी खरंय.

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 12:42 नवीन
अगदी खरंय. कुरुंदकरांनी युगांतमधल्या बाईंच्या इंटरप्रीटेशनमधले बरेच कच्चे दुवे दाखवून दिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरे तर

पैसा
Fri, 07/24/2015 - 17:57 नवीन
त्यांचे लिखाण हे त्यांच्या मते घटनांचा अर्थ आणि व्यक्तिरेखांच्या वागण्याचे त्यांना वाटणारे विश्लेषण असेच आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो.

प्रचेतस
Fri, 07/24/2015 - 18:36 नवीन
हो. पण ते बऱ्याच ठिकाणी गंडलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अप्रतिम लेख

जगप्रवासी
Fri, 07/24/2015 - 12:16 नवीन
अप्रतिम लेख
  • Log in or register to post comments

वा..खूपच छान लेखन. कर्णाबद्दल

अस्मी
Fri, 07/24/2015 - 19:20 नवीन
वा..खूपच छान लेखन. कर्णाबद्दल बोलायचं झालं तर कृष्णानंतर तोच लाडका आहे. मृत्युंजय खूपदा वाचलय, पण ह्या लेखामुळे वृषसेनाबद्दल खूप छान माहिती कळली. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा