Skip to main content

सुर्याची लेकरे

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 22/07/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला. नेहमीच्या पात्रांबद्दल अथवा घटनांबद्दल लिहिण्यापेक्षा थोडे अज्ञात असलेले वृषसेनाचे पात्र डोक्यात होते पण मग नंतर कर्णाच्या सगळ्याच मुलांवर एक लेख लिहावा असा विचार केला (फोकस तरीही वॄषसेनावर आहे) :). कर्ण सुर्यपुत्र म्हणुन मग ही सगळी सुर्याची लेकरे :) कर्ण स्वतः महाभारतातल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. कर्णाभवतालचे वलय खरे सांगायचे तर कृष्णार्जुन वगळता इतर सर्वच पात्रांना झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की कृष्ण, अर्जुन आणि कर्ण ही तीन पात्रे मिळुन महाभारतावर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते असे नाही पण या तीन पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते. अर्जुनाच्या वलयातुन बाहेर पडुन अभिमन्युने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो पण त्यातही 'अरेरे बिचारा कोवळा जीव ६ लोकांनी मिळुन मारला' अशी हळहळच जास्त दिसते. घटोत्कच सुद्धा कर्णाच्या शक्तीमुळे जास्त भाव खाउन जातो. त्यामानाने एका साध्या बाणाने मारला गेलेला वृषसेन किंवा भानुसेन मात्र त्या मानाने कमी प्रसिद्धी पावतात. त्यामुळेच अश्या कमी माहितीतल्या कर्णपुत्रांसाठी हा लेख. महाभारतानुसार कर्णाला ५ मुले: १. वृषसेन २. भानुसेन ३. चित्रसेन ४. सुषेन ५. सत्यसेन शिवाजी सावंतांनी मृत्युंजय मध्ये सुदामन नावाच्या अजुन एका मुलाला जन्म दिला आहे. मला इतर कुठल्या प्रतीत मात्र हा सुदामन दिसला नाही. सावंतांनुसार द्रौपदी स्वयंवरात सुदामन भीमार्जुनांकडून मारला गेला. नंतर कर्णाने दिग्विजया दरम्यान द्रुपदाला नतमस्तक करुन सुदामनाची समाधी बनवुन घेतली असा उल्लेख सावंतांनी केल्याचे आठवते. कर्ण युधिष्ठिरापेक्षा १६ वर्षांनी मोठा होता असे म्हणतात (हे देखील माझ्यामते एक अनुमानच आहे. स्पष्ट उल्लेख बहुधा कुठेही नाहित). त्यामुळे द्रौपदी स्वयंवराच्या वेळेपर्यंत कर्णाचे लग्न होउन त्याचा एक मुलगा तरी हाताशी आला असावा असा तर्क करुन कदाचित सावंतांनी हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा. अजुन एका मुलाचा उल्लेख काही कथांमध्ये येतो. नेमक्या पुराणाचे नाव मला आत्ता आठवत नाही पण बहुधा जैमिनी भारतात वॄषकेतुचा उल्लेख येतो. हा कर्णाचा सगळ्यात धाकटा मुलगा. युद्धाच्यावेळेस हा खुपच लहान असल्याने याने युद्धात भाग घेतला नव्हता. कर्णाच्या सर्व मुलांमध्ये दैवी अंश असलेला किंवा दैवी कार्यसंपादनासाठी जन्मलेला हाच एक. शैशवावस्थेत असताना कृष्णाने याच्याकरवी एका दैत्याचा वध घडवला. या दैत्याला कुठल्याही पुरुष अथवा स्त्री कडुन अथवा कुठल्याही शस्त्राने मरण येणार नाही असे अभय होते. शैशव अवस्थेतील मुले म्हणजे स्त्री अथवा पुरूष नाहित असा कुठलासा धर्माचा आधार घेउन वृषकेतुच्या हातात मंतरलेल्या दर्भाची काडी देउन कृष्णाने त्या दैत्याचा वध करवला अशी कथा मला पुसटशी आठवते. अर्थात मान्य प्रतींमध्ये हा उल्लेख कुठेच नाही. मुळात वॄषकेतुचा उल्लेखच जैमिनी भारत सोडून इतर कुठेही नाही. जैमिनी भारतानुसार वृषकेतु अर्जुनाबरोबर अश्वमेध यज्ञाच्या युद्धांमध्ये सहभागी होता आणि बर्याच ठिकाणी त्याने शौर्य दाखवले. बभ्रुवाहनाबरोबर त्यांचे जे युद्ध झाले त्यात अर्जुनाबरोबर वॄषकेतु देखील मारला गेला. मात्र नंतर अर्जुना बरोबर त्यालादेखील परत जिवंत केले गेले. जैमिनी भारताचे केवळ अश्वमेध पर्व सध्या अस्तित्वात असल्याने युद्धोत्तर काळात वृषकेतुचे काय झाले आणि राज्य त्याला न मिळता परिक्षिताला का मिळाले याबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही. कर्णाच्या इतर पाचही मुलांनी महाभारत युद्धात भाग घेतला होता. महाभारताच्या युद्धापुर्वी युद्धाचे काही नियम ठरवले गेले होते. ठराविक अंतराने जवळजवळ सगळ्याच नियमांना दोन्ही बाजुंनी तिलांजली दिली गेली. युद्धाच्या अनेक नियमांपैकी एक नियम होता की एका यौद्धाशी एकाच यौद्धाने लढावे. लढाईच्या पहिल्याच दिवशी काही मिनिटांमध्येच अनेक यौद्ध्यांनी भीष्मावर हल्ला करुन या नियमाला तिलांजली दिली. दुसरा नियम असा होता की कुणीही इशारा न देता दुसर्या यौद्ध्यावर हल्ला करु नये. या नियमालाही लवकरच तिलांजली दिली गेली. त्यामुळे बहुतेक प्रमुख यौद्धांना मारण्यासाठी कुठुनही कसाही हल्ला होउ शकतो हे लक्षात घेउन सगळ्याच प्रमुख यौद्धांचे रक्षण आजुबाजुला राहुन इतर दुय्यम दर्जाचे यौद्धे करत असत. स्वत: कृष्ण ज्याचा सारथी होता त्या अर्जुनाच्या रथाचे रक्षण त्याचे दोन मेव्हणे उत्तमौजा आणि युधामन्यु करायचे (हे दोघे शिखंडी, दॄष्ट्यद्युम्नापेक्षा धाकटे म्हणजे अर्थात द्रौपदीपेक्षादेखील लहान) तर कर्णाच्या रथाचे रक्षण पुढच्या बाजुने सुषेण आणि चित्रसेन करायचे आणि मागील बाजुने वॄषसेन करायचा. वॄषसेन वगळता कर्णाच्या सर्व मुलांनी कर्णाच्या आजुबाजुला राहुन युद्ध केले याचा एक अर्थ असाही काढता येइल की ते कदाचित युद्धात वॄषसेना इतके निपुण नव्हते. अर्थात सुषेण आणि चित्रसेन युद्धनिपुन होते असा उल्लेख काही ठिकाणी दिसतो. कर्णार्जुनाची जेव्हा तुलना होते तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की अर्जुनाच्या उपस्थितीत फार कमी प्रमुख यौद्ध्यांचे बळी गेले. त्याने जवळजवळ सर्वांना वाचवले. कधी पुढुन बाण मारुन तरी कधी मागुन अधर्माने बाण मारुन. कर्ण मात्र आपल्या उपस्थितीत आपल्या मुलांना वाचवु नाही शकला किंवा कदाचित त्याला तितका वेळ नाही मिळाला. त्याच्या दोन किंवा तीन मुलांना पांडवांनी त्याच्या उपस्थितीत मारले. सर्वप्रथम बळी गेला भानुसेनाचा. त्याला भीमाने मारले. त्याच वेळेस सुषेणाचा देखील बळी जायचा मात्र ऐनवेळी वृषसेनाने भीमापासुन त्याला वाचवले आणी स्वतः भीमाशी युद्ध सुरु केले. सत्यसेन आणि चित्रसेन मात्र इतके सुदैवी नव्हते. या दोघांनाही नकुलाने मारले. चित्रसेन हा एक कसलेला धनुर्धर होता. त्याने नकुलाचे धनुष्ञ तोडले, रथ मोडला, घोडे मारले. मात्र त्यानंतर नकुल त्याच्या आवडत्या शस्त्रानिशी चित्रसेनावर तुटुन पडला. नकुलाने तलवार हातात घेउन चित्रसेनाच्या रथावर उडी मारली आणि तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. कर्ण आणि वृषसेनाच्या मृत्युनंतर देखील शेवटच्या दिवशी चित्रसेन आणि सत्यसेन जिवंत होते. दोघांनाही नकुलानेच मारले. सुषेण होता की नाही याबाबत गोंधळ आहे. सुषेणाच्या मृत्युसंदर्भात बराच सावळागोंधळ आहे. एकतर सुषेण हे नाव त्या काळातले निखिल, सचिन किंवा अमित होते. १० पात्रांपैकी एकाचे नाव तरी सुषेण असायचेच. धृतराष्ट्राच्या एका मुलाचे नाव देखील सुषेण होते (एकाचे कर्ण आणि एकाचे चित्रसेन देखील होते म्हणा. १०० वेगळीवेगळी नावे कशी आठवावीत. ही मुले जेव्हा गांधारी धृतराष्ट्राला भेटायला जात असतील तेव्हा कदाचित सांगत असतील की मी तुमचा ३३ वा मुलगा नंदक बरंका. आठवते का आपण साडेतीन वर्षापुर्वी भेटलो होतो वगैरे. कसे ना लक्षात राहणार सगळे आणि त्यांची नावे). तर सुषेण नावाबद्दल खुप गोंधळ आहे. एक तर खुप सुषेण होते. त्यातले बरेच राजे, एक धृतराष्ट्राचा मुलगा, दोन्हीकडच्या राजांची नावे सुषेण. या गोंधळात व्यासांनी या सुषेणाबद्दल गोंधळ केला. हा एक निष्णात धनुर्धर परंतु कसा मारला गेला याबद्दल गोंधळ आहे. एकेठिकाणी व्यास म्हणतात की शेवटच्या दिवशी चित्रसेन, सत्यसेनापुर्वी नकुलाने त्याला देखील मारला तर दुसरीकडे हेच व्यास म्हणतात की त्याला उत्तमौजाने कर्णाच्या डोळ्यादेखत मारला (आणि मग पळुन गेला). नक्की काय कळत नाही. पण ही मुले म्हणजे कर्णाचे कवच होते. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत कर्ण सुरक्षित राहिला. मात्र एक एक करत त्याचे विश्वासु संरक्षक मारले गेले. अंतिम युद्धापुर्वी वृषसेन मारला गेल्यावर त्याचे मुख्य संरक्षक कवचच तुटले. तसे अर्जुनाच्या बाबतीत कधीही झाले नाही. अर्थात हे संरक्षक अंतिम कर्णार्जुन युद्धात असेही कुचकामीच ठरले असते. कारण महाभारतात लिहिल्याप्रमाणे ते युद्ध इतके भीषण झाले की त्यांच्या जवळपासच्या प्रत्येक यौद्धाला त्या दोघांनी मिळुन टिपुन काढले. त्या दोघांच्या आसपास लढाई करायची म्हणजे मृत्युला आमंत्रण द्यायचे हे ओळखुन इतर सर्व यौद्धे लांब जाउन थांबले. अंतिम काही पळांमध्ये तर आजुबाजुच्या सैनिकांनी युद्ध पुर्णपणे थांबवले होते. तिथे वृषसेन असता तरीही फारसा फरक पडला नसता. इतर सर्व प्रमुख यौद्ध्यांसमोर वृषसेन थोडासा झाकोळला गेला आहे. परंतु महाभारताने त्याचे शौर्य वेळोवेळी मान्य देखील केले आहे. युद्ध्याच्या सुरुवातीला दृष्ट्यद्युम्नाने जेव्हा यौद्ध्यांची वाटणी केली तेव्हा एकेका यौद्ध्याला त्याने कौरवपक्षातील एकेका यौद्ध्याला मारण्याची जबाबदारी दिली. त्यात अर्जुन - कर्ण, भीम - दुर्योधन अशी वाटणी झाली तेव्हा अभिमन्यु - वृषसेन अशी देखील वाटणी झाली. दृष्ट्यद्युम्नाच्या मते अभिमन्यु अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता हे लक्षात घेता वृषसेनाचे महत्व जाणवते. भीष्माने देखील त्यांच्या पक्षातल्या यौद्ध्यांचे मुल्यमापन केले तेव्हा कर्णाला युद्धभूमीपासुन दूर ठेवण्याच्या हेतुन जाणुनबुजुन त्याची अर्धरथी अशी संभावना केली मात्र वृषसेनाला त्यांनी महारथी असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचे दिसते. एकप्रसंगी कर्ण युद्धभूमीपासुन दूर असताना शल्याला भीमाने घायाळ केले तेव्हा त्याला घेउन कृतवर्मा युद्धभूमीपासुन दूर गेला असता एकट्या वृषसेनाने सर्व पांडवांना सळो की पळो करुन सोडले. त्याने भीमाला निरस्त्र केले, नकुलाच्या मुलाला शतानिकाला तो मारणारच होता इतक्यात इतर पांचाल वीर आणि द्रौपदीपुत्र मध्ये पडले म्हणुन तो वाचला. चक्रव्युहामध्ये देखील द्रोणांनी जयद्रथाला इतर पांडवांना द्वारातच रोखण्यासाठी नियुक्त केले होते (जयद्रथाला तसा वर मिळाला होता) तर त्याच्यामागे लगेच वृषसेनालाच ठेवले होते. अभिमन्यु चक्रव्युहात शिरताच त्याला सामोरा गेलेला पहिला यौद्धा वृषसेनाच होता आणि तो शौर्याने लढला मात्र अभिमन्युने त्याला बेशुद्ध केले आणी पुढे शिरला. यथावकाश अभिमन्युचा बळी गेल्यावर अर्जुनाने जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा जयद्रथाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी द्रोणांनी ज्या सहा यौद्धांना नियुक्त केले होते त्यात एक वृषसेन होता. इतर जण होते कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य आणि कृपाचार्य. थोडक्यात सांगायचे तर द्रोणाचार्यांनी त्यांचे सर्वोत्तम योद्धे त्याच्या आजुबाजुला ठेवले. पंधराव्या दिवशी खुद्द द्रोणांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्या शिरावर होती त्या लोकांमध्ये वृषसेन एक होता. त्याने आख्ख्या द्रुपद सैन्याला खिळवुन ठेवले होते. स्वतः द्रुपद जो तोवर फार कमी लोकांकडुन हारला होता तो देखील वृषसेनासमोर निष्प्रभ ठरला आणि बेशुद्ध झाला. नंतर दृष्ट्यद्युम्नाने द्रोणांना मारल्यावर मात्र तो पळुन गेला. द्रुपद, पांडव, सात्यकी, अर्जुन यापैकी सर्व महत्वाच्या यौद्ध्यांबरोबर वृषसेन लढला. अश्या या शूर यौद्धाचा अंत देखील त्याला साजेसा झाला. भीम ऐन भरात असताना त्याने कौरवांची दाणादाण उडवली होती. स्वतः कर्ण पळुन जायच्या तयारीत होता. त्यावेळेस एकटा वृषसेनच काय तो भीमाला तोंड देण्यासाठी उभा राहिला. त्याच्याकडे बघुन कर्ण देखील परत फिरला. त्यानंतर त्या युद्धभूमीवर सर्वात घनघोर युद्ध लढले गेले. भीमाच्या मदतील नकुल आला. वृषसेन एकटा त्या दोघांशीही लढत होता. नकुलाने पराक्रम गाजवला देखील मात्र वॄषसेनाने प्रथम त्याचे चिलखत आणि मग त्याचे धनुष्य तोडले आणि मग त्याचे घोडे देखील मारले. कर्णाच्या दुसर्या मुलाने चित्रसेनाने देखील हा पराक्रम नंतर केला मात्र तेव्हा नकुलाने तलवारीने युद्ध करुन चित्रसेनाला मारले . वॄषसेनाने मात्र नकुलाची तलवार देखील बाणांनी तोडली. हतबल झालेला नकुल अखेर भीमाच्या रथावर चढला आणि तिथुन त्या दोघांनी परत वॄषसेनाशी युद्ध सुरु केले. वृषसेनाचे आक्रमण इतके धडकी भरवणारे होते की भीमाने नकुलाला वाचवण्यासाठी थेट अर्जुनाची मदत मागितली. अर्जुन येइपर्यंत वॄषसेनावर द्रौपदीची पाच मुले, द्रुपदाची पाच मुले आणि स्वतः सात्यकी (भीम नकुल वेगळेच) अश्या ११ यौद्ध्यांनी हल्ला केला. इतर कौरव यौद्धेदेखील मग वॄषसेनाच्या मदतीला गेले. नेहमीप्रमाणे थोड्याच वेळात युद्ध करणार्या लोकांच्या जोड्या पडल्या. वॄषसेनाने जणू नकुलाला मारण्याचा विडाच उचलला होता. तो वारंवार त्याला निशस्त्र करुन मारु इच्छित होता. अखेर अर्जुनाने वृषसेनाला स्वतः मारण्याचे ठरवले. याखेपी भीम, अर्जुन, नकुल आणि शतानिक (नकुलाचा मुलगा) असे चार प्रमुख यौद्धे वॄषसेनाशी लढत होते. वॄषसेनाने त्या सर्वांना आपल्या बाणांनी विद्ध केले. त्याच्या या पराक्रमावर खुष होउन कौरव सैन्य त्याला उत्तेजन देत होते. तिथेच घात झाला. जखमांनी चवताळलेल्या अर्जुनाने अतिशय प्रखर युद्ध करत अखेर त्याचे दोन्ही हात बाणांनी छाटुन मग त्याचे शिर उडवले. इतर कुठल्याही यौद्ध्याच्या मृत्युपेक्षा जास्त दु:ख कर्णाला वॄषसेनाच्या मृत्युवर झाले. त्याच दिवशी लढल्या गेलेल्या महाभारतातल्या सर्वात भीषण युद्धात अखेर अर्जुनाने रथाचे चाक जमिनीत घुसलेल्या कर्णाचे देखील शीर उडवले. राधासुताचा सर्वात निष्णात शूर पुत्र युद्धाच्या सतराव्या दिवशी पडला. जैमिनी भारताकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की युद्धाच्या १८ व्या दिवशी चित्रसेन आणी सत्यसेनाच्या मृत्युसरशी राधासुताचा वंश पुर्णपणे संपला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25686
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

महाभारतातील इतर दुय्यम महत्त्वाच्या पात्रांपैकी फार कोणाची नावे लक्षात रहात नाहीत. पण मराठी कादंबरीकारांमुळे कर्णाच्या मुलाचे नाव निदान माहीत असते. इतर सर्वांच्या मुलांप्रमाणेच तोही भारतीय युद्धात मारला गेला. हे असेच होणार होते. पांडवांचीही सर्व मुले मारली गेलीच. केवळ कृष्णामुळे त्यांचा वंशविच्छेद झाला नाही.

खूप छान लिहलंय... का कुणास ठावूक पण कर्णाबद्दल फार हळवा कोपरा आहे मनात. लोक म्हणतात त्याने जे केले ते भरले. तो फक्त कौरवांसोबत होता म्हणून बदनाम झाला असेल का?

In reply to by संदीप डांगे

बदनाम होण्यासाठी कर्णाने स्वतः देखील पुरेसे प्रयत्न केले. बिचार्‍या कौरवांना दोष नका देउ त्याचा,

In reply to by प्यारे१

भन्नाट लेख ......पु ल म्हणतात त्या प्रमाणे कर्ण हा समहाउ आपला वाटतो , त्याच्या पुत्रांबद्दल नवीनच माहिती समजली ,

महाभारतातल्या फारच कमी माहीत असलेल्या व्यक्तिरेखेची अतिशय माहितीपूर्ण ओळख. सुंदर.

In reply to by पद्मावति

फार छान लेख आहे. कर्णाबद्दल हळवा कोपरा असल्याने वृषसेनाच्या पराक्रमाचा आनंद वाटला. तसेच मृत्यूबद्दल हळहळदेखील!

In reply to by एस

वृषसेनाच्या पराक्रम. तसेच मृत्यू
सगळ खोट्ट आहे हो .. चांदोबासारखा ! फार हळहळू नका :)

In reply to by एस

कर्णाबद्दल हळवा कोपरा असल्याने बर्‍याच लोकांच्या मनी ही भावना असल्याचे अनुभवला येते. हा कर्णाबद्दलचा हळवा कोपरा नक्कि काय भानगड आहे हो ? जरा स्पश्ट होइल का ? इथे नको, दुसर्‍या लेखात अथवा खवत.

In reply to by द-बाहुबली

कुडमुड्या ज्योतिषासमोर बसा. तो जे तुमचे वर्णन करेल तेच कर्णाचे आहे. म्हणून हळवा कोपरा आहे समदु:खींसाठी. अजून जास्त सान्गू का?

In reply to by द-बाहुबली

हे वाच्लं नाही का ? >> म्हणजे खरंच अजून जास्त काही सांगायची आवश्यकता आहेच का? "तुम्ही इतरांसाठी खूप करता पण तुमच्या करण्याची लोकांना किंमत नाही, तुम्ही मनाने फार चांगले आहात पण तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे लोक नाराज होतात, तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवावं असं वाटत असतं, तुमच्यात क्षमता आहेत पण त्या सिद्ध करायला तुम्हाला संधी मिळत नाहीये, तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला जॉब्/नोकरी/काम/पद्/अधिकार्/मान मिळत नाहीये." आप कन्विन्स हो गये या मैं और बोलू?

In reply to by द-बाहुबली

अहो एवढं गहन आणि विचार करण्यासारखं काय आहे त्यात? कर्णाचं कॅरेक्टर हे वर दिलेल्या वाक्यांमधून जसं व्यक्तिमत्व उभं राहतं त्याप्रमाणेच आहे. प्रत्येकाला आपल्यात क्षमता असून योग्य संधी न मिळाल्याची खंत असतेच. जे कर्णाचं झालं महाभारतात तेच कमीअधिक प्रमाणात सर्वांचंच होत असतं. कित्येकदा संधी असून ऐनवेळी चाक संसाराच्या/व्यवस्थेच्या चिखलात फसतं आणि योग्यतेचा अमानुष/धर्मबाह्य बळी जातो. चांगुलपणाच नडतो. हे अनुभव आपण कर्णाच्या चरित्राशी रीलेट करू शकतो ना? पात्र असून योग्य सन्मान/संधी न मिळण्याचं शल्य प्रत्येक हृदयात असतंच. हे फक्त व्यवसायिक नाही तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात. म्हणजे एखादा यशस्वी झाला तरी घरच्यांकडून मान-सन्मान मिळेलच असं नाही. लोक फायदा काढून घेतात आणि तुमची वेळ आली की पाठ दाखवतात. कधी हातून उगाच चुका झालेल्या असतात, ज्या आयुष्यभर सतावत असतात. असं आणि बरंच काही.

In reply to by संदीप डांगे

मित्रा धागा काढ अथवा खवत ये.. कर्ण-गेट प्रकरण आणी लोकभावना एक गहन मजेशीर विषय आहे. इथे उगा पोराच्या धाग्यावर बापाचा धिंगाणा नको ? कसे ? संपादकांनी यथाशक्ती यथामती हा सबथ्रेड अद्रुश्य केला तर मुख्य विषयावर चर्चेला जास्त स्पेस मिळेल अशी याचना आहे.

In reply to by संदीप डांगे

सध्या फक्त इतर जाणकारांनी इथेच चर्चा-प्रतिवाद थांबवायचे मनावर घेतले तरी उत्तम आहे.

In reply to by द-बाहुबली

कर्णाबद्दलचा हळवा कोपरा हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकतो. कर्ण, एकलव्य, माधवी इत्यादी सर्वच पात्रांबद्दल मला जास्त सहानुभूती वाटते कारण ह्या महाकाव्यांकडे मी तत्कालीन आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा सर्वसाधारण आरसा म्हणून पाहतो. आजही त्यातील शोषणात, अन्यायात फरक पडलेला नाही याचे वैषम्य आहे.

In reply to by बॅटमॅन

विश्वामित्रांना ८०० "शुभ्र घोडे विथ १ काळा कान" हवे होते. त्यांनी त्यांच्या एका शिष्याला ते शोधून आणायला पाठवले. खूप शोधूनही न सापडल्यावर तो ययातिकडे गेला. ययातिकडेसुद्धा असे घोडे नव्हते. मग ययातिने त्याला आपली मुलगी माधवी दिली व सांगितले की हिला कोणाकडे तरी देऊन बदल्यात घोडे घे. तो ३ राजांकडे तिला घेऊन जातो. प्रत्येक जण तिला काही काळासाठी ठेऊन घेतो व तिच्यापासून एक मुलगा झाल्यावर तिच्यासहित २०० घोडे त्या शिष्याला परत देतो. आता शिष्याकडे ६०० घोडे आहेत. त्याला आणखी २०० घोडे नाही मिळत. मग तो ६०० घोडे व माधवी विश्वामित्रांना देतो. विश्वामित्र तिला ठेवून घेतात आणि त्यांनाही तिच्यापासून एक मुलगा होतो. त्यानंतर ते माधवीला तिच्या वडीलांकडे पाठवून देतात. त्यानंतर ययाति माधवीचे स्वयंवर आयोजित करतो ज्यात अनेक वर हजेरी लावतात. पण संसारातून (किंवा पुरुषांतून) मन उठलेली माधवी वनात जाते व उर्वरित आयुष्य ब्रह्मचर्यात व्यतित करते.

In reply to by अद्द्या

कदाचित तेच तर "ज्ञान" त्यांना प्राप्त झालंय म्हणून ते संसारातून मुक्त होत असतील आणि आपल्यासारखे सामान्य लोक "संसारी" म्हणून रहात असतील.. ;)

In reply to by तुषार काळभोर

हे काय नवीन ? हेचा अर्थ ह्योच की आम्ही वाचेल महाभारत हे महाभारत नाय !

In reply to by इरसाल

माधवीची कथा उद्योग पर्वात येते. पुर्ण कथा फारच चीड आणणारी आहे तद्वतच स्त्रीच्या तत्कालीन समाजातल्या अवस्थेबद्दल अप्रत्यक्षरीत्या फार सूचक भाष्य करते. महाभारत म्हणजे अश्या शेकडो कथांची गुंफण आहे. वेळोवेळी वेगवेगळी पात्रे काही मेसेज देण्यासाठी अथवा आपला मुद्दा पटवण्यासाठी वेगवेगळ्या कथांची साक्ष काढते. माधवीची कथा त्यातलीच एक. इतके खोलात जाउन महाभारत कुणीच वाचत नाही. आणि तसे बघता ही कथा मूळ महाभारत कथेचा भाग नाही तर त्या अनुषंगाने पात्रांमध्ये झालेल्या संवादात उद्धृत केलेली कथा आहे, बर्‍याच लोकांना हे ही माहिती नसेल की रामायणाची कथा महाभारतातदेखील येते. मार्कंडेय ऋषी ही कथा युधिष्टिराला ऐकवतात. गंमत म्हणजे जी कथा आपण ऐकतो आणि जी कथा मार्कंडेय ऋषी सांगतात त्यात २-३ नजरेत येणासारखे फरक आहेत. माधवीच्या कथेसाठी एक वेगळा धागा पाडावा काय?

In reply to by मृत्युन्जय

रामाची संक्षिप्त पुन्हा एकदा द्रोणपर्वात अभिमन्यूवधानंतरच्या षोडशराजकीय आख्यानात येते. अभिमन्यू वधाचे दु:ख विसरण्यासाठी नारद पूर्वी मृत्यु पावलेल्या १६ महान राजांचा परिचय युधिष्ठिराला करून देतात.

च्यानेल बों(लभां)ड्यां धाग्यात एक झुळूक !!!!!!! दुरून्दर्शक नाखुस

क्या बात है मृत्युंजय भाऊ!! आवडले!! तूफ़ान आवडले, कर्णाचा विलक्षण अन मृत्युंजय चा अतिविलक्षण प्रभाव असलेले आम्ही, न आवडते तर काय!!!

आवडेश पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत

जब्राट ! लिखते रहो .
जयद्रथाला तसा वर मिळाला होता
रच्याकने याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का ?

तुमच्या कीर्तीला साजेसे लेखन :) और भी आंदो...

सर्वप्रथम, लेख आवडला. एकदम ओघवता लिहिलेला आहे. खूप पूर्वी मृत्युंजय वाचलंय त्यात सत्यसेन हे कर्णपत्नी वृषालीच्ता भावाचं नाव होतं असं काहीसं वाचल्याचं आठवतंय आणि कर्णाच्या मुलांपैकी एकाचं नाव वृषकेतूऐवजी वृषकेत वाचल्याचं आठवतंय. नक्की काय आहे? शिवाय धृतराष्ट्राचा मुलगा विकर्ण होता माझ्या मते. कर्ण नावाचा कोणी मुलगा धृतराष्ट्राला होता असं वाटत नाही. सुषेण हे फारच अमित, निखिल टाईप नाव होतं - हे भारीच. रामायणात संजीवनी आणायला सांगणारा वैद्यही मला वाटतं कोणीतरी सुषेणच होता.

In reply to by बोका-ए-आझम

सत्यसेन कर्णाच्या मुलाचेच नाव आहे. एके ठिकाणी हेच नाव सत्यसन्ध असे देखील लिहिले आहे. वृषकेत आणि वृषकेतु आलटुन पालटुन वापरत असावेत बहुधा. ज्याला मूळ प्रत मानले गेले आहे त्या प्रतीत वृष्केतु चे नावच नाही. वृषकेतु फक्त जैमिनी भारतात आढळतो. हा वृषकेतु वेगळा आणि वृषसेन वेगळा. केवळ एका ठिकाणीच मला महाभारतात वृषसेनालाच वृषकेतु म्हटलेले आढळले. धृतराष्ट्राच्या एका मुलाचे नाव विकर्ण होते. तो वेगळा. एका मुलाचे नाव कर्ण सुद्धा होते. हा तोच कर्ण ज्याने द्रोणाला गुरुदक्षिणा देताना केलेल्या युद्धात भाग घेतला होता. सगळ्या १०० कौरवांची नावे महाभारतात एका ठिकाणी २ वेळा आली आहेत. त्या पैकी एका ठिकाणी या कर्णाचे नाव २ वेळा आले आहे :)

लिखाण आवडले.. आता महाभारत खरे की खोटे ते माहित नाही पण हे लिखाण मात्र आवडले...!! यावर एक छान सिरीयल होऊ शकेल..."सुर्याची लेकरे किंवा पिल्ले" म्हणून..!!

'मृत्युंजय' मध्ये कर्णाच्या या दोन्हीही पत्नींचा उल्लेख आहे. या मुलांमध्ये वृषसेन आणि वृषकेत किंवा केतू - हे वृषालीचे पुत्र असतील हे तर कळतंच. बाकीच्यांबद्दल काय माहिती आहे?

In reply to by बोका-ए-आझम

कर्णाच्या वायकांबद्दलची माहिती शोधावी लागेल. माझ्या मते तरी काही संदर्भ मिळत नाही. बाकी वृषाली शब्दाचा एक अर्थ "शूद्र स्त्री" असा आहे.

In reply to by मृत्युन्जय

मला कामधेनू असा सांगण्यात आला होता. हा जो तुम्ही अर्थ सांगितलात, त्याचा काय संदर्भ आहे?

In reply to by बोका-ए-आझम

महाभारताचे इंग्रजी भाषांतर किसारी मोहन गांगुली यांनी केले आहे. भाषांतर करताना त्यांनी अनेक ठिकाणी टिप्पण्या दिल्या आहेत. त्या खुपच इंटरेस्टिंग आहेत. एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे की कर्णाने "असुरी प्रतिज्ञा केली होती" आता असुरी प्रतिद्ना म्हणजे काय तर दारु न पिण्याची. तसेच त्यांनी एके ठिकाणी वॄषालीपती हा शब्द वापरला आहे (हा शब्द कर्णाच्या संदर्भात नाही). त्या शब्दाच्या अर्थ त्यांनी असा दिला आहे: Vrishalipati literally means the husband of a Sudra woman. By actually marrying a woman of the lowest order, by marrying before the elder brother, by marrying a girl that has attained to puberty, and by certain other acts, a Brahmana comes to be regarded as a Vrishalipati ही संज्ञा आता नक्कीच कालबाह्य आणि अदखलपात्र आहे. आता १८ च्या आत मुलींची लग्ने होतच नाहित आणि जातीपातीच्या भिंती सुद्धा ढासळत चालल्या आहेत. पण त्या काळात जेव्हा महाभारत घडले असेल किंवा जेव्हा ते लिहिले गेले तेव्हा वृषालीपती या शब्दाचा अर्था हा असा होता. Vrishalipati = the husband of a Sudra woman आणि पति = Husband हे लक्षात घेता वृषाली = शूद्र स्त्री अशी फोड मी केली. चूभूद्याघ्या.

In reply to by मृत्युन्जय

किसारी मोहन गांगुली यांनी ज्या प्रतीच्या आधारे भाषांतर केलेय ती प्रत म्हणजे महाभारतावरचा फेमस टीकाकार नीलकण्ठ चतुर्धर याने वापरलेली होय. नीलकण्ठी टीकेचाही त्यांनी कैक ठिकाणी आधार घेतलाय असे वाचले आहे. हा नीलकण्ठ चतुर्धर एक मराठी माणूस होता, शिवकालीन होता. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणारा. आईचे नाव फुल्लाम्बिका (हे अर्थात संस्कृतीकरण असावे असे आपले माझे मत), वडिलांचे नाव विसरलो. १६५० नंतर काशीस स्थायिक झाला, तिथेच त्याने ती समग्र महाभारतावरची अवाढव्य टीका लिहिली, जवळपास साडेपाच हजार पानी आहे. त्याची पीडीएफच साडेचारशे एमबी आहे. लिंक इथे बघा. https://archive.org/details/mahabharata_nk इतके अवाढव्य काम एका मराठी माणसाने एकहाती केलेय ही गोष्ट अतिशय भूषणावह आहे.

In reply to by बॅटमॅन

फुल्लाम्बिका हे नाव तेव्हा असू शकेल. आत्ता माझ्या ओळखीची एक शारदाम्बा बँकेत मॅनेजर आहे. मात्र ती हुबळीकडची आहे.

In reply to by पैसा

कदाचित, पण प्रदेश बघा. अहमदनगर साईडला ब्राह्मणांत म्हटले तरी अशी नावे प्रचलित असण्याची शक्यता कमीच वाटते. त्यात परत संस्कृत ग्रंथ लिहिताना नावांचे संस्कृतीकरण करणे हे सर्रास चालायचे, उदा. शिवभारतकार परमानंद हे मालुसरे = मल्लसूरी, घाटगे = घंटक, इ. शब्दयोजना करतात. त्यामुळे तसे वाटले इतकेच. अर्थात नीलकण्ठाची आई बाय एनी चान्स कर्नाटकाकडची असेल तर तसे असूही शकेल म्हणा.

In reply to by बॅटमॅन

हेच म्हणतो. बाकी नीळकंठाची प्रत सुद्धा महाभारतातील भर इ.स. १५/१६ व्या शतकापर्यंत नेते. नीळकंठाने महाभारताच्या उत्तरी आणि दक्षिणी प्रतींचा जबरदस्त अभ्यास करुन प्रचंड संकलन केलेय. नीळकंठीप्रती पेक्षाही अधिक संशोधित प्रत म्हणजे भांडारकर संशोधीत आवृत्ती. भांडारकरप्रतीत महाभारतातील जे काही आहे ते सर्व इ.स. १० व्या शतकाच्या आधीचेच आहे असे नि:संशयपणे म्हणता येते.

In reply to by प्रचेतस

भांडारकर प्रतीबद्दल असे म्हणतात की महाभारतातले अनेक गाजलेले श्लोक तिच्यात नाहीचेत. मज्जाच आहे एकूण. हे जरा पाहिले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

भांडारकर प्रतीत वगळलेला बहुधा सर्वात ठळक उल्लेख म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणप्रसंगीचा कृष्णाचा धावा आणि कृष्णाने वस्त्रे पुरवून केलेली सोडवणूक. त्यांच्या संशोधनाप्रमाणे कृष्णाचा धावा ही १० व्या शतकानंतरची भर आहे असे मानता येते.

In reply to by प्रचेतस

हाण तेजायला. बाकी नीलकण्ठाबद्दलचे डीटेल्ड विवेचन इथे वाचता येईल. अगदी तपशीलवार पूर्ण विवेचन आहे. https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=qcq22n9NT7sC&pg=RA1-PA225… इथे पान क्र. २२५ ते २५३ पर्यंत लेख आहे.

In reply to by बॅटमॅन

बाबारे तु प्रचंड अभ्यस केलेला दिसतोस या सगळ्याच गोष्टींचा. विंटरेंस्टिंगा अहे तो लेख देखील. पुर्ण वाचला नाही अजुन. वाचेन.

In reply to by मृत्युन्जय

नै बा. तुमच्यासारखे पूर्ण महाभारत वगैरे नै कधीच वाचले. फक्त नीलकंठ या विषयात जरा इंट्रेस असल्याने शोधाशोध केली होती इतकेच.

In reply to by बॅटमॅन

आता तुम्ही हा नवीन (अथात जुनंच) किडा सोडून दिलात. च्यामारी असला माणूस इथे होऊन गेला आणि त्याचा कुठेच कधी कोणाकडून उल्लेख झाला नाही. भारी दिसतंय. वाचतो. ___/\___

In reply to by सतीश कुडतरकर

अहो असूद्यात संस्कृत. मूळ टीकाच वाचायची असे कोण म्हटलेय? अन वाचू म्हटले तरी जन्म पुरणार नै....वेल पुरेल, पण लै दिवस लागतील अन तुफान बोअरही व्हाल. त्यापेक्षा नीलकंठाबद्दल जे लिहिलेय तेवढे वाचा फक्त- पुलं म्हणतात तसे पेढा करण्याच्या कसबापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची. अनेक लोकांनी डोक्याचा भुगा पाडून बरेच काही लिहिले आहे, आपण किमान त्यांच्याबद्दलचे लिखाण तरी नक्कीच वाचू शकतो नै का?

In reply to by पैसा

अगदी असंच काही सांगता येत नाही. इतिहासलेखनातही अतिशयोक्ती असतेच. अगदी व्यासांनी लिहिलेल्या मूळ कथानकातही काही चमत्कार निश्चितपणे असतील. पण सर्वसाधारणपणे कृष्णाला जे विष्णूअवताराचे स्वरूप दिलेय हे व्यासांनी नव्हे तर इतर प्रक्षिप्तकारांनी. ह्याच न्यायाने श्रीभगवान उवाच असे सुरुवातीपासून उल्लेख असलेली भगवदगीता सम्पूर्ण प्रक्षिप्त ठरते.

In reply to by प्रचेतस

दोन्ही सैन्ये समोरासमोर उभी असताना कृष्ण १८ अध्याय सांगू शकेल का? मग त्याने इतरांना योगनिद्रेत नेले वगैरे स्पष्टीकरण द्यावे लागेल. १८ श्लोक सांगणेही खरे तर कठीण दिसते.