Skip to main content

विहीर

लेखक सिध्दार्थ यांनी मंगळवार, 16/06/2015 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
तिने पटापटा भाकऱ्या टाकल्या. लाल भडक पातळ तुरीची डाळ करून गाडग बाजूला ठेवलं. झोपलेल्या आपल्या बापाला उठवत ती म्हणाली ”जेवण करून ठेवल हाय, नंतर खाऊन घे. म्या जरा विहिरीवर जाऊन येते.” बापाने काही न बोलता हातानेच तिला जाण्याचा इशारा केला. इशारा करणारा हात खाली जोरात आदळला तशी शेजारी ठेवलेली दारूची बाटली पडली. तिने बाटली सरळ करून ठेवली आणि विहिरीला जाणारा रस्ता धरला. वाहिरी जवळ पाच सहा बायका आधी पासूनच पाणी भरत होत्या. रोज तीन चार घागरी घेऊन येणारी ती आज एकच घागर घेऊन कशी आली याच आश्चर्य करत कास्तुराने तिला विचारले, “आज एकच घागर ? सकाळी लवकर उठून पाणी भरल व्हत का ” ती विहिरीत पाहत म्हणाली. “आज जास्त पाणी नाही लागणार म्हनुन एकच घागर आणली.” कस्तूरा त्यावर काही बोलली नाही पण अचानक काही आठवून कस्तुरा म्हणाली, “ रात्री लय मारलं का तुझ्या बापाने ?" ती तशीच एकटक विहिरीत पाहत होती. कास्तुराचा प्रश्न तिला ऐकू आला नाही. तिच्या कोपराला झालेली जखम बघत कास्तुराही शांत राहिली. सगळ्या बायका जाऊन तिथे फक्त ३ जणी उरल्या होत्या. ती पाणी न भरता तशीच उभी होती. अचानक तिच्या डोक्यात काही विचार आला. तीने आपले पाय आतल्या दिशेने टाकले आणि ती विहिरीच्या कट्ट्या वर बसली. ति अशी बसलेली पाहून मागच्या कास्तुराने तिला हाक मारली, “ अगं तस बसू नकोस, उगाच मरशील.” ति मागे पाहत म्हणाली “सगळ्यांनाच कधी ना कधी मारायच आहे मग आज मेल काय आणि उद्या मेल काय, एकच आहे”. तिने वाकून विहिरीत पहिले. काही वेळाने विहिरीत कोणी तरी पडले आहे हि बातमी गावभर पसरली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3009
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

लिखान आवडले .. बाकी कहानी बालपण हरवलेल्यांची ही माझीच लिहिलेली कविताशृंखला सहज आठवून गेली... असे बालपण कोणास न मिळो ही इच्छा !

असे बालपण कोणास न मिळो ही इच्छा !
खरंच!

तरी जाताना जेवण तयार करून जावं तिने? देवा, तू कुठे आहेस का रे?