Skip to main content

दैव ,नशीब कि शाप ? भाग २

लेखक स्वीत स्वाति यांनी मंगळवार, 18/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
bhag ek हे कुटुंब ज्या गावात राहते ते गाव छोटे च असून पूर्ण गाव एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी असते. जेव्हा किरण चा अपघात झाला तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी खूप लोक धावले . लोंकाचा या कुटुंबावर असणारा जिव्हाळा तेव्हा दिसून आला. अर्थात या कुटुंबातील सर्वजन माणुसकी जपणारी आहेत . ग्रामीण भाग असल्यामुळे बर्याच वेळा वीज गायब असते . किरण पोस्टाच्या कामाबरोबर च इतर इलेक्ट्रीक कामे हि करायचा …जेव्हा कधी वीज जायची तेव्हा वीज मंडळाचा कर्मचारी न बोलवता किरण च डीपी वर चढून काम करत असे .शिवाय कोणाचा पंखा बंद असेन , वीज संबधित काही काम असेन तर किरण ते विना मोबदला करत असे. जेव्हा किरण चा अपघात झाला त्या नंतर त्याला पुण्याला हलवायला सांगितले आणि पुण्याला आणत असतानाच त्याचा मृत्यू झाला. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते कि त्या वेळेस रुग्णवाहिके मध्ये गावातील लोक ,किरण ची पत्नी तर होतीच त्या शिवाय अजून एका जीप मध्ये गावातील मंडळी रुग्णवाहिके बरोबर पुण्याकडे येत होती. त्या वेळेस गावाकडे किरण च्या छोट्या दोन मुलांना शेजारील घरातील मंडळी पाहत होती. किरण च्या अपघाताची बातमी मिळाली तेव्हा किरण ची आई , प्रवीण ची पत्नी , प्रवीण ची मुले आणि बहिण,मेव्हणे वगैरे नातेवाईक गावाकडे रवाना झाले होते. त्या वेळेस गावातील दृश्य पाहून थक्क झाले होते . रात्री दोन वाजता पूर्ण गाव किरण च्या घराबाहेर बसले होते. गावकरी मंडळी किरण च्या पत्नीला सोबत करत होते आणि पूर्ण रात्र तिथे च होते. किरणचे शव एका शवागृहात ठेवले गेले होते. शव विच्छेदन झाल्यानंतर दुसर्या दिवशी ताब्यात दिले गेले ,किरण च्या आई ला फक्त अपघाताची कल्पना देण्यात आली होती . त्या रात्री गावात वीज नव्हती ती दुसर्या दिवशी संध्याकाळीच आली. सर्व गावकरी म्हणत होते कि , पहिल्यांदा असे झाले कि गाव इतका वेळ अंधारात राहिला किरण नाहीये म्हणून च… किरण गेला तो गावात अंधार करून आणि कुटुंबाला अंधारात ढकलुन. किरण च्या मृत्यू चा धक्का सर्वानांच बसला पण जास्त धक्का होता तो त्याच्या आईला. त्या माउलीचे कुंकू आधी गेले त्यानंतर शेंडेफळ प्रवीण आणि आता किरण. तिचा शोक शब्दात मांडणे कठीण आहे. किरण गेल्या नंतर सर्वात जास्त फरफट या माउलीची झाली. पुण्यात ती प्रवीण च्या पत्नी सोबत राहते , प्रवीण ची पत्नी कामाला जाते तर तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आणि तिला सोबत पण. आता प्रश्न होता कि गावाकडे किरण च्या पत्नी जवळ कोण थांबणार ? किरण च्या पत्नी चे शिक्षण दहावी पण तिने प्रवीण च्या पत्नी चे पार्लर ती आधी पासून चालवत होतीच ते आणि शिलाई काम हि सुरु केले. किरण च्या जागेवर तिला रुजू करणार असे आश्वासन पोस्टाच्या लोकांनी किरण च्या अंत विधीच्या वेळेस केले होते . दोन वर्षे उलटली तरीही अजून रुजू करण्यात आले नाहीये , सुरुवातीला दोन महिने घेतले आणि पुन्हा ब्रेक दिला गेला . पार्लर आणि शिलाई यातून फार काही उत्पन्न होत नाहीये, आणि पोस्टाच्या आशेवर गाव पण सोडवत नाहिये. किरण ने पोस्टात कायमस्वरूपी होण्यासाठी परीक्षा दिली होती , तिचा निकाल येण्याआधी च काळाने घाला घातला त्यiमुळे पोस्टात किरण च्या पत्नी च्या जोब चे पण काही होत नाहीये, जर तो कायमस्वरूपी लागला असता पोस्टात तर त्याच्या पत्नीचे काम लवकर झाले असते. इकडे प्रवीण ची पत्नी बी ए या शैक्षणिक अहर्तेवर वीज मंडळात करार बेसिसवर कामाला आहे . प्रवीण च्या पत्नी सोबत पुण्याला त्या माउलीला थांबायला लागणार त्यामुळे असा तोडगा निघाला कि किरण च्या पत्नी चे वडील तिच्या सोबत गावाला राहतील (तिची आई काही वर्षापूर्वी च गेलीये आणि एक भाऊ त्याच्या पत्नी मुलां सोबत राहतो तर वडिलांनी किरण च्या पत्नी सोबत राहायला काही हरकत नाहीये). पण जेव्हा तिच्या वडिलांना काही कामा निमित्त मुलाकडे जावे लागते तेव्हा या माउलीला पुण्याहून गावाकडे आणि पुन्हा पुण्याकडे असा प्रवास नेहमीच करावा लागतो . आपल्या काही परंपरा या किती दुख: दायक असतात याचा अनुभव यायला लागला. या घरी गणपती आणि गौरी बसते . परंतु किरण गेल्या नंतर घरात कोणी हि पुरुष नाही फक्त स्त्रिया आणि त्याही अभागी विधवा , त्यामुळे गौरी बसवता येणार नव्हती , कारण शास्त्रात फक्त सवाष्ण स्त्री हि च गौरी चे आवाहन करू शकते असे सांगितले आहे . ब्राह्मणाच्या सांगण्यावरून गौरी कपाटात ठेवण्यात आल्या,कमीत कमी १५ वर्षासाठी,जेव्हा किरणच्या मोठ्या मुलाचे लग्न (त्याचे वय वडील गेले तेव्हा आठ वर्ष ) होईल तेव्हाच गौरी बसवता येतिल. यामुळे प्रत्येक गणपती उत्सवामध्ये जखमेवरची खपली काढली जाते.अजून एक शास्त्रातील पद्धत जी मला खूप खटकते ती म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा वारला कि त्याला पुरताना त्या स्त्री च्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यातील एक मनी नवर्या बरोबर पुरायचा आणि मंगळसूत्र पण दुसर्या एका विधवा स्त्रीनेच तोडायचे.( जेव्हा प्रवीण वारला तेव्हा त्याची पत्नी त्याला पुरत असताना आधीची पूर्ण रात्र आणि पुरायला आणले तोपर्यंत बिचारी रडत होती ती जरा शांत झाली होती तेव्हाच स्वामी जे मृत व्यक्तीचे विधी करत होते त्यांनी सांगितले कि तिच्या गळ्यातले मंगळसूत्र तोडा आणि एक मनी द्या त्यावेळेस पुन्हा एकदा एक कल्लोळ झाला रडारडी चा आणि प्रवीण च्या पत्नी सोबतच इतर स्त्रियाहि भयानक रडल्या होत्या.त्यावेळेस काहीतरी हरवत आहे आपल्या पासून दूर जात आहे अशी जाणीव झाली आणि हेच पुन्हा किरण अंत विधीच्या च्या वेळेस घडले आणि त्याच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडायला घरातलीच स्त्री होती तिथे .... किती भयानक परिस्थिती कल्पना करून पहा. ) एवढे होऊनही नियतीने अजून बरेच काही वाढून ठेवले होते… क्रमश:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4262
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

बाप्रे !! आता याच्यापुढे काय आहे ? सुन्न !!

बापरे..!! हे सर्व वाचून आमची दु:खे काहीच नाहीत असे वाटले...

प्रचंड यश, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, कीर्ती असलेल्या जगातल्या प्रत्येकापासून अगदीच भणंग व्यक्तीच्या वाट्याला काही ना काही दु:ख आहेच. कुणाचं जाणवतं, कुणाचं जाणवत नाही. एखाद्याची साधी कैद एखाद्याची सक्तमजुरी. एखाद्याची राजकीय कैद तर एखाद्याची काळ्यापाण्याची सजा. आयुष्य असंच आहे. आयुष्यात सुख शोधणं म्हणजे ढेकणानं भरलेल्या बाजेवर सुखाच्या झोपेची कल्पना करणं. (आमचे तुकारामबुवा म्हणतात)

शास्त्र, परंपरांच्या जोखडातून बाहेर पडणे, आपल्या दु:खाला 'दैव, नशीब किंवा शाप' ह्या तिनपैकी एकाला किंवा दोघांना किंवा तिघांनाही जबाबदार मानून, ह्या आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी असतात, अशी स्वतःचीच समजुत घालीत निष्क्रिय आणि (म्हणून) दु:खी आयुष्य जगण्यापेक्षा, आयुष्याकडे व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहणे आणि तदनुरुप आचरण करणे हाच ह्या सर्व समस्यांवरचा जालीम उपाय आहे असे मला वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचे मत बरोबर आहे . आणि हे कुटुंब सध्या येणाऱ्या संकटांशी सामना करत जगत आहे …चांगल्या आणि उज्वल भविष्याच्या आशेवर.

In reply to by प्रभाकर पेठकर

ओ काका, जे झालं त्याबद्दल परखड आत्मपरीक्षण करता येतं का? तेवढं बळ असतं का? नेमकं काय केलं नाही म्हणून असं झालं? काय केलं असतं तर टळलं असतं? असे काही प्रश्न निर्माण होतात. वरील घटनांमध्ये काही गोष्टींची कारणमीमांसा होऊ शकेल तर काहींची नाही. ज्यांची कारणमीमांसा करता येत आहे त्यांबाबत ती तशी करुन सुधारणा काही अंशी(च) करता येईल पण ज्या गोष्टींमध्ये न भरुन येण्यासारखं नुकसान आहे अथवा ज्या गोष्टी सुधारता येणं अशक्य आहे अशांबाबत कुणालाही अथवा कशालाही दोष न देता 'नशीबा'चा टॅग लावून त्याला मागं टाकून 'निष्क्रीय' न बसता पुढं सरकणं, प्रयत्न कर णं ह्याला दैववाद म्हणत नाहीत. तुमच्या प्रतिसादाचा टोन, 'नशीब मानणारे' निष्क्रीय असतात, 'असेल हरि तर...' अशा प्रकारचा विचार करणारे असतात असा वाटला म्हणून लिहीलं.

In reply to by प्यारे१

>>>>तुमच्या प्रतिसादाचा टोन, 'नशीब मानणारे' निष्क्रीय असतात, 'असेल हरि तर...' अशा प्रकारचा विचार करणारे असतात असा वाटला म्हणून लिहीलं. असं वाटलं असेल तर तो माझ्या लेखन दौर्बल्याचा भाग आहे असे समजावे. 'नशिब मानणारे' निष्क्रिय असतात असे नाही तर सर्वस्वी 'नशिबावर हवाला ठेवून प्रयत्न न करणारे' निष्क्रिय असतात असा त्याचा अर्थ आहे. आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक घटनांना कुरवाळत बसणं आणि 'आता मी काय करू?' ही हतबलता जोपासणं अत्यंत चुकीचं आणि घातक असतं. लोकं सहानुभूती दाखवितात आणि एखाद्याला त्या सहानुभूतीतच सुख दिसायला लागतं. संकटाचा आघात होतो तेंव्हा प्रत्येक बेसावध माणूस भांबाऊन जातो आणि हतबलता अनुभवतो. परंतु, ह्या अवस्थेतून लवकरात लवकर बाहेर पडणे आणि कंबर कसून परिस्थितीशी दोन हात करणे हे त्याच्या हाती असतं. इथे जर तो नशिब आणि प्रारब्धाच्या जाळ्यात सापडला तर निष्क्रिय होत जातो. यशापयशात ८० टक्के प्रयत्न आणि २० टक्के नशिब असे समीकरण मानून चालले तर यशाची शक्यता वाढते. पण नशिबातच पाय अडकून पडल्यास प्रयत्नांची धार आणि टक्केवारी कमी होऊन यश तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता बळावते. मृत्यूसारख्या नैसर्गिक आघातात बाहेरील मदतीचा प्रभाव कमी अपेक्षून स्वतःच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे, ह्यातून सावरणे केवळ आणि केवळ माझ्याच हाती आहे हा विश्वास बाळगून कालक्रमणा करणेच जास्त उचित असते.

मी इथे नमूद करू इच्छिते कि माझा प्रश्न असा आहे कि या कुटुंबाच्या प्रारब्धाला तुम्ही काय म्हणाल....... नशीब ,दैव कि शाप ? बाकी या कुटुंबाने जे काही होत आहे ते स्वीकार करत (जरी स्वीकार करायला कठीण गेले तरीही ) आयुष्य जगायला सुरुवात केली आहे . उद्याचा दिवस तरी त्यांचा असेन या आशेवर.

In reply to by स्वीत स्वाति

मी इथे नमूद करू इच्छिते कि माझा प्रश्न असा आहे कि या कुटुंबाच्या प्रारब्धाला तुम्ही काय म्हणाल....... नशीब ,दैव कि शाप ?
या कुटुंबात जे काही घडतंय ते खरंच दु:खद आहे. पण याला मिपाकर किंवा अन्य कोणीही काहीही म्हणालं तरी त्यातून काय निष्पन्न होणार आहे?

In reply to by स्वीत स्वाति

स्वीत स्वातीजी, >>>>या कुटुंबाने जे काही होत आहे ते स्वीकार करत (जरी स्वीकार करायला कठीण गेले तरीही ) आयुष्य जगायला सुरुवात केली आहे . उद्याचा दिवस तरी त्यांचा असेन या आशेवर. असं असेल तर ते चांगलच आहे. 'त्यांच्या प्रारब्धाला एखादे 'लेबल' लावण्यापेक्षा त्यांच्या धडपडीला मदत होईल असे काय करता येईल' ह्यावर उहापोह व्हावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यांच्या धडपडीला मदत होईल असे काय करता येईल' ह्यावर उहापोह व्हावा. जे घडलं ते घडून गेलं, भूतकालच्या दु:खद घटनांमधून शिकावं जरूर, पण त्यांतच गुंतून न राहता भविष्य कसं बदलता येईल हे पहाणं आधिक महत्वाचं आहे असं वाटतं. मन हलकं होण्यासाठी लिहा जरूर, पण यातून बाहेर कसे पडलात किंवा त्या दिशेने काय प्रयत्न केले जात आहेत, ते पुढील लिखाणात वाचायला मिळेल अशी आशा आहे.

हे दु:ख फार मोठे आहे हे सांगायला कुण्या वाचकाच्या पावतीची आपल्याला नक्कीच गरज नाही. पण जी दु:खद गोष्ट आहे ती आणखी आणखी उगाळ्ण्यापेक्षा पटकन सांगून संपवायला हवी, असे वाटते.