मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भय इथले संपत नाही (एक)

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28992 ------------------ कवितेतून नक्की काय म्हणायचंय ते ग्रेस स्वत: कधीही सांगणार नाही. तो फक्त जीवाला सैरभैर करणारी त्याची कविता तुमच्यासमोर ठेवेल आणि प्रत्येक वेळी ती, एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी असेल. हरेक रसिकाला ती कवितेत, स्वत:चा अर्थ शोधायला भाग पाडेल. आणि ग्रेसच्या कवितेचं वेगळेपण हेच, की समजत नाही म्हणून तुम्ही तिला अंतर देऊ शकणार नाही. एखाद्या विलोभनीय आणि दुष्प्राप्य कामिनीसारखी ती तुम्हाला सतत घेरुन राहील. कारण ग्रेसची मराठी ही तुमची माझी भासली, तरी स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी त्यानी निर्माण केलेलं ते त्याचं, स्वतंत्र आकाश आहे. त्याच्या शब्द आणि रुपकांच्या अनमोल बिलोरी खजिन्याचा तो स्वत: अनभिषिक्त सम्राट आहे. आणि सरते शेवटी त्याच्या लयकारीचा, (म्हणजे मांडणीचा), ‘अंदाजे बयां’ मराठीत (आजमितीला तरी) दुसरा कुणीही नाही. थोडक्यात, पराकोटीची संवेदनाशिलता हा ग्रेसचा कॅनव्हास आहे. रसिकांची संवेदनाशिलता जरी तितकी प्रगल्भ नसली तरी दोघांची जाणिव एक असल्यामुळे, ग्रेस त्या कॅनव्हासवर (त्याला) हवी ती अभिव्यक्ती देऊ शकतो. ग्रेसनं स्वत:ची स्वतंत्र परिभाषाच निर्माण केली आहे आणि त्यावर कहर म्हणजे ती पुन्हा `डायनॅमिक' आहे. ग्रेसच्या प्रत्येक नव्या संवेदनेसाठी ती नवा शब्द घेऊन येऊ शकते. परिणामी ग्रेसकडे रंगवैभवाचा अलय खजिना आहे. त्यामुळे त्याच्या कवितेला शब्दविभ्रमांच्या सोबतीला, रंगवैभवाचं परिमाण आहे. आणि सरते शेवटी, मांडणीची सौंदर्यदृष्टी, ग्रेस बहुदा पारलौकिकातूनच घेऊन आलायं! त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल. तर अशा या ग्रेसची, भयासारख्या आदिम आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या संवेदनेवरची, ही अशीच एक जीवघेणी कविता : भय इथले संपत नाही! _______________________________________________ लताचा आयुष्याच्या संध्यासमयीला साजेसा झालेला आवाज. हृदयनाथांची ज्यावर निर्विवाद हुकूमत आहे अशा यमनमधला, कवितेला चढवलेला कमालीचा धीरगंभीर स्वरसाज. आणि स्वत:ला ‘दु:खाचा महाकवि’ संबोधणार्‍या ग्रेसचे, निव्वळ अलौकिक रुपकांचे आणि गूढतम अनुभवांचे शब्दविभ्रम! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते… मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते… ____________________________________ ( कवितेच्या रसग्रहणाचं साहस दुसर्‍या भागात)

वाचने 16944 वाचनखूण प्रतिक्रिया 44

सह्यमित्र Tue, 09/30/2014 - 18:53
आपण थोड्या शब्दात अतिशय सुंदर आणि नेमके विश्लेषण केले आहे. कविवर्य ग्रेस आणि पंडित हृदयनाथ ह्या दोन मनस्वी कलाकारांच्या सर्जनशीलतेचा हा एक अजोड असा कलाविष्कार आहे.

अर्धवटराव Tue, 09/30/2014 - 18:56
आणि त्यावर चिंतन करुन अर्थ शोधण्याच्या भानगडीत देखील कधि पडावंसं वाटलं नाहि. संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त आहे कि त्या पलिकडे लक्ष्य जातच नाहि.

In reply to by अर्धवटराव

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:06
संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त आहे कि त्या पलिकडे लक्ष्य जातच नाहि.
हे १००००% खरे आहे. ग्रेस खरेतर एक आत्ममग्न व्यक्तीमत्व होते. दुर्बोधतेचा वसा त्यांच्या कवितेत नेहमीच असायचा. ग्रेस यांची " ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निनादत होता...... ती आइ होती म्हणून घनव्याकूळ मीही रडलो " कविता वाचताना काही वेगळ्या भावना जाणवल्या होत्या. मात्र कवितेतली "ती" कोण हे कळाल्यानंतर तर निशःब्द झालो होतो. भावना ठार कोसळल्या होत्या

In reply to by पिलीयन रायडर

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:17
कोण आहे "ती"
ती त्यांच्या वडिलांची बायको. साधारणतः ग्रेस यांच्याच वयाएवढी होती. ती ग्रेस यांना बरीच समजून घेई. काही कारणामुळे ती ग्रेस यांच्या वडिलाना सोडून दुसर्‍या कोणासोबत निघून गेली " ग्रेस याना हा जबरदस्त मानसीक धक्का होता .त्या नंतर ग्रेस नी ही कविता लिहीली असा उल्लेख आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:21
कोण आहे "ती"
ती त्यांच्या वडिलांची बायको. साधारणतः ग्रेस यांच्याच वयाएवढी होती. ती ग्रेस यांना बरीच समजून घेई. काही कारणामुळे ती ग्रेस यांच्या वडिलाना सोडून दुसर्‍या कोणासोबत निघून गेली " ग्रेस याना हा जबरदस्त मानसीक धक्का होता .त्या नंतर ग्रेस नी ही कविता लिहीली असा उल्लेख आहे.

वरवर पाहता त्यांचा तसा अर्थ लागत नाही पण गाणं जसं गात्रात उतरतं तसा त्यातला भाव काळजाला भिडतो. मी माझ्याही नकळत किती वेळा हे गाणं गुणगुणलंय …. दर वेळी त्याचं काम ते चोख बजावतं …. मनाला सैरभैर करून सोडतं !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:40
हृ मंगेशकरांची चाल उत्तम आहे म्हणुन हे गाण आवडते. बाकी अर्थ वगैरे काही लागत नाही कोणाला. मग लोक ओढुन ताणुन काहीतरी उच्च दर्जाचा अर्थ शोधतात आणि वा वा म्हणतात. ओढुनताणुनच अर्थ लावल्यामुळे कित्येक शब्दांचे प्रयोजन च कळत नाही. ह्या कवितेचे गाण नसते झाले आणि नुस्ती ही कविता वाचायला दिली असती तर कीती लोकांना आवडली असती? त्यात जर "ग्रेस" ह्या कवितेचे कवि आहेत हे सांगीतले नसते तर मग कीती लोकांना आवडली असती?

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर Wed, 10/01/2014 - 11:10
ग्रेस खूपच चांगले कवी आहेत असं म्हणतात. गाणं सुंदर आहे; कविता कशी आहे हे मला माहित नाही. अर्थच नाही कळला तर कविता (किंवा कुठलीही कलाकृती) रचण्यात काय हशील? बाकी गहन अर्थ, वेगवेगळे अर्थ, अर्थाचे वैविध्यपूर्ण पदर वगैरे मला कळत नाही. :-( किंबहुना सैरभैर होणं हे गाण्याच्या चालीमुळे, गायकीमुळे, आणि सुरावटींमुळे होत असावं असा अंदाज आहे. नुसतीच कविता कुणी वाचून दाखवली तर मला नाही वाटत कुणी सैरभैर होईल म्हणून. अर्थ जरी लागत नसला तरी त्यांची कविता दर्जेदार आणि सकस वाटते हे खरे. त्यांच्या कविता सगळ्यांनी उचलून धरल्या. हृदयनाथांनी त्यांच्या कवितांना अजरामर करून सोडले. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते पुण्यात मंगेशकर हॉस्पीटलमध्येच होते आणी त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च हृदयनाथांनी उचलला होता. त्यांची त्याकाळात विशेष काळजी अंकुश काकडे यांनीदेखील घेतली होती.

In reply to by समीरसूर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 11:55
अर्थच नाही कळला तर कविता (किंवा कुठलीही कलाकृती) रचण्यात काय हशील?
आधी कोणीतरी अर्थच लावता येणार नाही अशी कविता लिहायची आणि मग १० लोकांना त्याचे १० अर्थ काढायचे. पुर्वी एकदा हृ. मंगेशकर आणि ग्रेस ह्यांची चर्चा टीव्ही वर बघितली होती. ऐकायला फार छान वाटत होती, फार इम्प्रेस झालो होतो. पण दुसर्‍या दिवशी लक्षात आले की फक्त ऐकायलाच छान वाटत होती पण कसलाच अर्थ लागत नव्हता.

In reply to by स्पा

धन्यवाद! मला तुझा प्रतिसाद खुप आवडला. पण खर सांगू, आपण एका फार मोठ्या कलावंताबद्दल बोलतोय इथे. आपल्या कल्पनाशक्तिला त्या कविता झेपत नाहीत हा त्या कविचा दोष नाही. आपल्याला खुप काही कळतय असा आव आणणे जेवढे चुकीचे तेवढेच काही कळत नाही म्हणून त्या कविला दोष देणारे वा त्याची खिल्ली उडवणेही वाईटच. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. मला स्पावड्याचा प्रतिसाद आवडला तो एवढ्याच करता की तो स्पष्ट त्याच्या समजूतीची कुवत सांगून मोकळा झाला. उगाच खुप कळल्याचा आवही आणला नाही आणी कळले नाही म्हणून कविच्या नावाने शंखही केला नाही.

In reply to by समीरसूर

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 12:58
तुम्ही साजणवेळा ऐकलय का? त्यात काही कवितांना (अप्रतिम) चाली लावल्या आहेत.. आणि काही कविता नुसत्याच वाचल्या आहेत... दोन्ही वेडच लावतात.. कळत नसल्या तरी... मी माझ्या लहानपणापासुन त्या ऐकतेय.. आधी काहीही कळायचं नाही.. पण ऐकायला आवडायचं म्हणुन ऐकायचे... आता पर्यंत मी पण माझ्या आयुष्यात बर्‍याच अनुभवांमधुन गेले.. स्वभाव..दृष्टीकोन.. सगळंच खुप बदलत गेलं.. आता त्या कवितांचा थोडा थोडा अर्थ लागतो.. आर्तता भिडते.. रिलेट करता येतं... कदाचित अजुन २५ वर्षांनी अजुन काही वेगळं कळेल त्यातुन... कळत नाही म्हणजे त्यात अर्थच नाही असं नाही... आपल्याला अजुन अर्थ सापडला नाहीये इतकंच... (फक्त समीरसुर ह्यांना उद्देशुन नाही.. जनरल लिहीलय...)

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 15:13
कळत नाही म्हणजे त्यात अर्थच नाही असं नाही... आपल्याला अजुन अर्थ सापडला नाहीये इतकंच...
तुमच्या जीवनातल्या अनुभवामुळे तुम्ही काहीतरी अर्थ चिकटवाल हो त्याला. कारण तुम्हाला ती चाल, संगीत आवडले आहे. पण तुम्हाला खरेच असे वाटते की तुमच्या मायबोली मधे लिहीलेली कविता( कविता, लेख, वाक्य ) तुम्हाला विचार केली तरी कळणार नाही. खरेच असे वाटते की तुमच्या रोजच्या बोलीभाषेतील कवितेचा अर्थ तुम्हाला लागणार नाही? तुम्हाला एखादा अनुभव भिडणार नाही, आपला वाटणार नाही, तुम्ही Relate करु शकणार नाही हे मान्य आहे. पण अर्थ कळणार नाही? अर्थ तर लागलाच पाहीजे हो, नंतर च्या जगण्यानी relate करता येऊ शकेल. पण अर्थ लागलाच पाहीजे. आणि तो लागत नसला तर त्या कवितेला काय अर्थ आहे?

In reply to by प्रसाद१९७१

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 15:20
का अर्थ लागलाच पाहिजे? मराठीतले मला अर्थ माहित असणारे शब्द एकत्र आले की मी त्याचा अर्थ समजु शकले पाहिजे असं थोडिच असतं... त्यातला सिंबोलिझम कळायला मी त्या भावावस्थेत जायला हवे ना... त्यालाच रिलेट करणं म्हणतात ना.. लहान मुलांना मोठी माणसं काय बोलत आहेत हे समजत नाही.. शब्द माहिती असतात..पण त्यांनी विचार केला तरी त्यांना ते कळत नाही... मोठं झाल्यावर.. अनुभवांमधुन गेल्यावर आपोआप अर्थ लागतात.. तसं नसेलल तर "बबन नमन कर" आणि ग्रेसची कविता ह्यात फारसा फरक उरत नाही...

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 15:30
मी काय म्हणलो आहे ते तुम्ही वाचले नाही नीट. वाक्याचा ( कवितेतील ) अर्थ लागलाच पाहीजे. तुम्ही ते relate करुन शकणार नाही हे चालेल, पण अर्थ लागलाच पाहीजे. जर अर्थ पण लागत नसेल तर निरर्थक आहे असे म्हणायला पाहीजे. उदा. ह्याच लेखात गालिब चा एक शेर दिला आहे. तुम्ही जर उर्दू समजु शकत असाल तर तुम्हाला अर्थ नक्की लागेल ( किंवा कोणी भाषांतर करुन सांगीतला तर ). पण एखाया दारुप्रेमी सारखे तुम्ही relate करु शकणार नाहीत हे शक्य आहे. पण इथे अर्थच लागत नाही. relate वगैरे काय करणार हो. बादवे "बबन नमन कर" ह्याचा अर्थ लागतो, ग्रेस च्या बर्‍याच कवितांचा अर्थ लागत नाही - हा फरक आहे. संक्षी - तुम्ही गाणे म्हणुन गाजलेल्या कविता निवडता आहात. ज्या त्याच्या चालीमुळे आणि गाणार्‍यांमुळे सर्वांना आधीच आवडतात. तरी ह्या कवितेमधल्या एका कडव्याचा अर्थ पण लागतो आणि relate पण करता येते. 'तो बोल मंद हळवासा .... "

In reply to by प्रसाद१९७१

शब्दरचना रुपकात्मक नसायला हवी. मग ग्रेसच काय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा तुम्ही नाकाराल. आता, जिथे (तुम्हाला) अर्थ लागलायं आणि रिलेट होतंय असं कडवं तुम्ही दिलंय :
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
यात मजा म्हणजे दुसरी ओळ रुपकात्मक आहे. अर्थ लागण्यासाठी रुपकात्मकता सोडायची तर : `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' इतकं सुद्धा स्पष्ट लिहून चालणार नाही. कवीच्या अनुभवाशी रिलेट व्हायला प्रथम काव्यविषयाशी रिलेट होता आलं पाहिजे. माझ्या मते रिलेट होणं आधी आहे आणि अर्थ उलगडणं नंतर आहे. हे व्यक्तिगत संबधाबाबत देखिल आहे. आधी त्या व्यक्तीप्रती आपण उत्सुक होतो आणि मग तीच्याशी संवाद साधला जातो. ग्रेस दुर्बोध वाटण्याच खरं तर हेच कारण आहे. आपल्याला ग्रेसच्या सौंदर्यदृष्टीचं, त्याच्या तरल संवेदनाक्षमतेचं कौतुक असेल तर त्यानं इशारा केलेला अनुभव किती मोहक आहे ते कळू शकेल. `ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया' या ओळींचा अर्थ लागायला चंद्राची शीतलता (कधी तरी) झर्‍यासारखी देहात प्रवाहित झालेली हवी. आणि `भगवी माया' चा अर्थ उलगडायला आसक्ती आणि विरक्तीचा खेळ जीवनात झालेला हवा. आणि यापैकी अगदी काहीही नसेल तर, कुणी तरी आत्मियतेनं काही लिहीतंय ते समजून घेण्याची तयारी तरी हवी. कुणी जाल का सांगाल का वर ७३ प्रतिसाद आहेत त्यापैकी किमान ३०/३५ तरी दाद देणारे आहेत. ती कविता साधी सोपी आहे, अर्थ उघड आहे, पण तुम्ही म्हटलंय :
मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची
असा जर दृष्टीकोन असेल तर कवितेसारखी नाजूक गोष्ट हाती लागणं दुष्पूर आहे. यू विल मिस अ लवली डायमेन्शन ऑफ लाईफ.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 16:51
संक्षी - तुम्ही मला ओळखत नाही, त्यामुळे यु डोंट नो व्हेदर आय मिस अनीथिंग ऑर नॉट. तुम्हाला माझा कवितांचा अभ्यास पण माहीती नाही. ते जाउ दे - मुद्दामुन दुर्बोध लिहीणे आणि त्यातुन तुम्ही ओढुन ताणुन अर्थ काढणे हे दोन्ही निरर्थक आहे. दुर्बोध म्हणजे काहीच अर्थ लागु नये असे. ज्ञानेश्वरांना , गालिब ला ,साहीर ला कधी दुर्बोध लिहावे लागले नाही. त्यांचा अर्थ ही लागत होता आणि अनुभव असेल तर relate पण होता येत होते. तुम्हाला आधीच सांगितल्या प्रमाणे, ज्या कविता चाली मुळे लोकांच्या मनात आहेत, त्या सोडुन दुसर्‍या घ्या, कवि अनिलांच्या कवितेचा तुम्ही जो ओढुन ताणुन अर्थ लावला आहे तो फार काही बरोबर नाही.

In reply to by प्रसाद१९७१

त्यामुळे ते जाऊं द्या. पण तुम्ही म्हटलंय
तुम्हाला माझा कवितांचा अभ्यास पण माहीती नाही.
तसं असेल तर तुम्ही एखादं रसग्रहण लिहा, आवडलं तर नक्की दाद देईन. मला काय आनंदाशी कारण!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 17:14
एक तर मला तुमच्या सारखे चांगले लिहीता येत नाही. चांगले सोडाच सामान्य दर्जाचे पण लिहीता येत नाही. दुसरे म्हणजे कविता, गाणे ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्याचे गद्य रसग्रहण काय करणार? कित्येक सिनेमे, इतके प्रचंड भावलेले आहेत आणि त्यांचा हँगओव्हर सतत असतो. तो सिनेमा बघत असताना, त्यातल्या लपलेल्या गोष्टी दुसर्‍याला व्यवस्थित उलगडुन पण सांगता येतात. पण त्या बद्दल लिहायचे म्हणले तर एक ओळ सुचत नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

कार्यालयीन कामानिमित्त कवी ग्रेस ह्यांच्याशी बोलणे झाले होते ते आठवले …. काय तो मधाळ आवाज होता … संवेदनशील माणसाचा स्वभाव आवाजावरून कळतो हे खरे आहे !

मित्रहो Tue, 09/30/2014 - 21:15
पण ह्या ओळी मात्र नेहमीच चटका लावून गेल्या स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

In reply to by मित्रहो

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:42
आपल्याला "हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाच" ही ओळ एकदम आवडते. पण पहील्या ओळीचा काही अर्थ लागत नाही. आणि स्तोत्र वगैरे शब्दांचे प्रयोजन तर अजिबात कळत नाही.

मितान Tue, 09/30/2014 - 21:28
खरं आहे. ग्रेसची कविता ही प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव असतो. सीतेच्या वनवासाला, राघवशेल्याला प्रत्येकासाठी वेगळा रंग गंध असतो. लेखन आवडले.

दशानन Tue, 09/30/2014 - 21:31
>>>त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... अप्रतिम!!

रेवती Tue, 09/30/2014 - 21:35
एक नितांतसुंदर गाणं. ग्रेसांइतके प्रतिभावान नसलो तरी आपल्याला जितका अर्थ लागतो तितकाच पुरेसा असतो. अवांतर: हे गाणे संपादकांना अर्पण केलेत तरी खपून जाईल असे आहे. ;)

In reply to by जेनी...

पैसा Wed, 10/01/2014 - 09:32
नीलकांत, वल्ली, गवि, लीमाउजेट हे सगळे

माझेच्च

आयडी आहेत. झालंस्तर जास्त गडबड करणार्‍या आयडींना "ड्युप्लिकेट" आयडी चे "अदृश्य" आयडी कसं करायचं ते पण मला माहिती आहे. तुझ्यावर प्रयोग करून दाखवू? ;)

साहेब वाट बघतोय विश्लेषणाची. लताबाईंचे शब्दोपचार अतिशय स्पष्ट आहेत (सगळ्याच गाण्यात असतातच) या गाण्यात. त्या मुळे कधी कधी श्लोक असल्याचा भास होतो. धन्यवाद

सौंदाळा Wed, 10/01/2014 - 10:19
वाट बघतोय विश्लेषणाची.+१ संक्षी तुम्ही स्क्रिप्ट लिहिलय का हो कधी? खुपच सफाईदार लिहिता तुम्ही रसग्रहण च्यामारी आपले मराठी चॅनलवाले असले प्रोग्रॅम ठेवतील तो सुदिन

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 11:59
एक इंग्लिश चा प्राध्यापक मुलांना एका दिवंगत कवि ची एक कविता समजवुन सांगणार असतो. तेंव्हा तो म्हणतो, जेंव्हा ही कविता लिहीली तेंव्हा तिचा अर्थ दोघांना माहीती होता, एक तो कवि आणि दुसरा देव. आता कवि मेल्यावर तो फक्त देवाला माहीती आहे.

साहेब नुकताच तुमचा या विषयावर तुम्ही आधीच लिहलेला हा लेख वाचला. त्यातील खटासी खट व यकु यांंच्या वाद / प्रतिवादातुन खुप छान माहिती मिळाली.

जेपी Wed, 10/01/2014 - 17:10
हम्म, काव्य/कविता फारश्या वाचल्या नाहित पण ग्रेस यांना गाठायला पायजे