स्वच्छता आणि आपली मानसिकता
माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच. घाल घाल शिव्या घातल्या आणि असभ्य भाषेत 'आता इथेच उत्सर्जनही करून टाक' अशा आशयाचा डायलॉग मारला. तो एकदम गांगरलाच. तोंडातल्या तोंडात 'तुम्हारा क्या जाता है, सब फेकते है' असं काहीबाही बोलू लागला. आमचा वाद वाढायला सुरुवात झाली तसा त्याचा आवाज सुद्धा वाढायला लागला. तिथेच साध्या कपड्यात एक पोलीस बसला होता. त्याने त्याला गप्प केलं.
या प्रकारानंतर जेव्हा माझं घरी गेल्यावर डोकं शांत झालं, तेव्हा मी या गोष्टीचा खूप विचार केला. आज माझं डोकं ताळ्यावर नव्हतं, म्हणून दुस-या कोणाचा तरी राग मी त्याच्यावर काढला. एरवी माझं डोकं ताळ्यावर असताना मी अशी समज कोणालाही का देत नाही? अगदीच अरेरावीच्या भाषेत नाही, पण सौम्य आणि समजूतीच्या भाषेत स्वच्छतेचं महत्त्व लोकांना सांगायला काय हरकत आहे?
माझ्या मित्र-मैत्रीणींपैकी कोणी कचरा खाली टाकला की मी त्यांना तिथेच झापायला सुरुवात करतो आणि त्यांनी फेकलेला कचरा त्यांनाच उचलायला लावतो. जर त्यांनी नाहीच उचलला, तर त्यांना खजील करण्यासाठी मी तो कचरा उचलून कचरापेटीत टाकून येतो. बहुतांशी वेळा खजील होणं सोडा, पण निर्लज्जपणे माझी टर उडवली जाते. 'माझाच कचरा का उचललास, तो बघ तिकडे सुद्धा कचरा पडलाय, तो सुद्धा उचल, अख्खा रस्ता साफ कर.' मी त्यांना समजवायचा निष्फळ प्रयत्न करतो, की एखाद्याने फेकलेला कचरा त्याच्या समोर उचलल्याने त्याच्या मानसिकतेत फरक पडेल अशी अपेक्षा असते, त्याच्या अपरोक्ष तो उचलल्याने कचरा फेकणा-याच्या मनात काय फरक पडणार आहे? त्याला समज कशी येणार? पण ही साधी गोष्ट काही त्यांच्या डोचक्यात शिरत नाही. खिल्ली उडवत बसतात.
जर माझ्या ओळखीच्या मंडळींना समजावताना नाकी नऊ येतात, तर अनोळखी लोकांना कितीही गोड शब्दांत सांगितलं, तरी काय परिणाम होणार, अशी शंका मनात येते, आणि मग संकोचापोटी मी कोणालाही स्वच्छतेचं महत्त्व सांगण्याच्या फंदात पडत नाही.
याचा मी कचरा फेकणा-याच्या दृष्टीने विचार करून पाहिला. आपल्या ओळखीच्या माणसाने आपल्याला समज द्यायचा प्रयत्न केला की 'गप रे' असं म्हणून आपल्याला दुर्लक्ष करता येऊ शकतं. पण अनोळखी माणसाशी बोलताना तो ज्या आवेशाने बोलतोय, त्याच किंवा त्याच्यापेक्षा शक्यतो कमी आवेशात बोलण्याचा शिष्टाचार पाळावा लागतो. निदान, स्वतःला सुसंस्कृत म्हणवणा-या 'हुच्चभ्रू' लोकांनी तरी तो पाळावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे कधी कधी वाटतं, की ओळखीच्या माणसांपेक्षा अनोळखी लोकांना समजावणं जास्त सोपं आणि यशस्वी होऊ शकतं. पण ही समोर दिसणारी, कचरा फेकणारी व्यक्ती हे शिष्टाचार पाळणारी असेलच, असा आडाखा तरी कशावरून बांधायचा? वर्णावरून? कपड्यांवरून? वावरावरून? कशावरून?
कधीकधी मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. आपल्या भारत देशाच्या महान, प्राचीन अशा संस्कृतीचे आपण मारे गोडवे गात असतो. पाश्चिमात्य देशांतला, युरोप-अमेरिकेतला सांस्कृतिक दर्जा आपल्या मानाने तसा ब-यापैकी "निसर्गाच्या जवळचा" वाटतो मला. कुटुंबव्यवस्थेच्या बाबतीत तर आपण नक्कीच चांगले आहोत त्यांच्यापेक्षा. म्हणजे मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याकडे जास्त वाव आहे. असं असूनही त्या देशांतली सार्वजनिक स्वच्छता आपल्या मानाने एवढी चांगली कशी? आपल्याकडे सार्वजनिक स्वच्छतेबाबत संस्कार का होत नाहीत? आपली सुसंस्कृत विचारसरणी, मानसिकता, एवढी गलिच्छ कशी? आणि जर पूर्वी कोणी एके काळी स्वच्छतेचं महत्त्व आपल्याही देशात सगळ्यांच्या आचरणात होतं, तर मग ते संस्कार पुढच्या पिढ्यांना देताना ही मंडळी कुठे आणि कशामुळे कमी पडली? दारिद्र्य? शिक्षणाचा अभाव? कंटाळलो या नेहमीच्या कारणांना. कुठलीही सामाजिक समस्या असो, फिरून फिरून शेवटी गरिबी आणि अशिक्षण यांच्याच उंबरठ्यांवर येऊन ठेचकाळते.
पण मध्यमवर्ग किंवा श्रीमंत वर्ग अशिक्षित आहे का? गरीब आहे का? की त्यांचे पूर्वज अडाणी आणि गरीब होते, त्यांच्यात संस्कार करण्यात कसर राहिली, असं म्हणून गप्प बसायचं आपण? गरीब परिस्थितीत वाढून शिक्षण आत्मसात केलंत, धनसंपत्ती कमवलीत, स्वतःचं सगळं चांगलं चांगलं, छान-छान केलंत, मग आपल्या आजुबाजुचा परिसरही छानछान असावा, असं कोणालाच वाटू नये? लाज वाटते अशा समाजात आपण राहतो याची.
राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही इथे असताना इथली परिस्थिती बदलण्याचा तुमच्या परीने प्रयत्न केलात का? तिथे सगळं चांगलं आहे कारण तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या मानसिकतेत बदलत्या काळानुसार योग्य तो बदल घडवून आणून परिस्थिती बदलण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांचा इतरांनी आदर केला. आपल्याकडे स्वतः कोणाला प्रयत्न करायला नको, आणि दुसरा करतोय तर त्याला तो धड करू द्यायला नको, अशी विकृत प्रवृत्ती आहे(आणि हे मी परदेशांत न जाता, किंवा तिथे जाण्याचा कुठलाही हेतू मनात न बाळगता म्हणतोय बरं का). ही प्रवृत्ती बदलायला हवी. आणि ती देशाला रामराम ठोकून बदलता येणार नाही. इथे राहून प्रयत्न करायला हवेत, लोकांना बोलूदेत काय हवं ते. माझ्या व्यक्तिगत पातळीवर सांगायचं तर माझ्या परीने मी प्रयत्न करत आलोय, करत राहणार आहे. मी सार्वजनिक स्वच्छतेची सगळी तत्वं पाळतो, त्यामुळे मला दुस-यांना समज देण्याचा नैतिक अधिकार आहे. हा अधिकार इतरांनीही लवकरात लवकर मिळवावा, आणि एके दिवशी तो अधिकार बजावायची वेळच येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण व्हावी, या आशेला मनात बाळगून मी हे लेखन थांबवतो.
प्रतिक्रिया
याची सुरवात शाळेपासून व्हायला
खूप मनातलं लिहिलंत
लेख आवडला.
ज्या नैतिक अधिकाराने तुम्ही
अल्मोस्ट सगळा लेख आवडला होता.
राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?याचा कडक निषेढ. बोलू द्या जे खरं आहे त्याबद्द्ल. उद्या म्हणाल तिकडच्या राजकारण, सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर याबद्द्लसुद्धा बोलायचं नाही. अरे बोललंच पाहिजे. राग येउद्या ज्यांना येतोय.योग्य
हो बॅगेतच ठेवाव्यात
की टर्फले,पिशव्या बॅगेतच
की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्याचा डबा शोधत?अर्थातच होय ! माणुस सुसंस्कृत असला तर हा प्रश्न मनात येणारच नाही. कारण, एकाने केलेली चूक (प्रशासनाने कचरापेटी न ठेवणे) आपण दुसरी चूक (कचरा जमिनीवर टाकणे) करून सुधारू शकत नाही. हा प्रश्न भारतात विचारणार्यांच्या मनाला तो सिंगापूरसारख्या सर्वव्यापी कायद्याचा बडगा असणार्या ठिकाणी (जवळपास कचरापेटी नसली तरीसुद्धा) शिवत नाही... असा अनुभव आहे ;)पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी
पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको?प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही. मेंटॅलिटी महत्वाची. एक उदा. बघा. न्युरेंबर्ग ते मुंबई व्हाया इस्तांबूल फ्लाईट होती. सगळ्या जागा भरल्या होत्या. न्युरेंबर्ग ते इस्तांबूल अल्मोस्ट सगळं युरोपियन पब्लिक होतं. ८०% लोक इस्तांबूलला उतरले. आता इस्तांबूलला सगळे भारतीय चढले. मजा बघा.. फ्लाईट तीच. प्रवाशांची संख्या तितकीच. व्यवस्था/सुविधाही तितक्याच. पण इस्तांबूल पर्यंत अगदी स्वच्छ असलेल्या फ्लाईटम्ध्ये, मुंबईपर्यंतच्या प्रवासात वॉशरूमची काय हालत झाली होती विचारू नका. काही सिटवर तर चॉकलेट्/बिस्कीटपुड्यांचे रॅपर, कागदी पेले तसेच टाकले होते लोकांनी.भयानक सहमत. आधी आधी
+११११११११११११११११११
आपण जिथे रहातो तो परिसर "आपला
+१ माउ!! 'आपला' समजलं तर
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक
स्वदेशातले दांभिक का बरे
प्रयत्न सुरू ठेवा
ह्म्म!!
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत
शांतपणे "शिकलेले दिसता. मग
हे बोलण्याचा तुम्हाला काय
वरच्या लेखात आणी परवाच्याच या
>>परदेशी जाणार्यांना,
प्रसंग
मुलांवर संस्कार करा....
छान लेख