Skip to main content

संवादिका - ३

लेखक प्रास यांनी रविवार, 22/06/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
"आहेस का रे?" "आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे." "तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?" "व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?" "माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला." "असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D" "नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..." "असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?" "तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?" "काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?" "चेष्टा नकोय रे! तुला कळणार नाही माझे हाल..." "काय झालं बेबी? तू मला सांगणार नाहीस का?" "तुला नाही तर कुणाला सांगू? मन मोकळं करण्यासाठी तुझ्याशिवाय आहे कोण मला?" "मग सांग तर काय झालं?" "का नेहमीच्या खपल्या काढायच्या? त्रास होतो रे फार आता..." "कुछ लेते क्यों नही? :-D" "ने. ने. तू सगळं चेष्टेवारीच ने." "बेबी चेष्टा नाही गं. बरं वाटत नसेल तर तू व्यवस्थित औषधं घे ना..." "देणाराच जवळ नसेल तर....?" "आता हे काय आणिक्?" "काय म्हणणार मी दुसरं? तुझ्याशिवाय झुरतेय रे मी नुसती..." "मग मी का फार आनंदात आहे?" "असशीलच. म्हणूनच इतका लांब आहेस नं माझ्यापासून?" "काय म्हणतेयस बेबी? कंपनीच्या दौर्‍यावर गेलो नाही तर ठेवतील का मला नोकरीवर? आणि आता परततोच आहे ना..." "मिळालीय का गाडी व्यवस्थित? बसायला जागा? की उभ्यानेच प्रवास?" "रिझर्वेशन मिळालं. छान बसून गप्पा मारतोय की तुझ्याशी..." "किती छळशील रे?" "आँ? आता काय झालं?" "किती दिवस झाले आपल्याला भेटून? तुझी खूप आठवण येतेय..." "बेबी आजच परततोय की मी..." "हो, पण मला लगेच थोडाच भेटणार आहेस?" "विरहाने प्रेम वाढतं म्हणे... ;-)" "अगदी दुष्ट आहेस तू. इथे मी विरहाने जळतेय नि तुला विनोद सूचतायत." "अगं, उद्या भेटू की मग आपण." "उद्यापर्यंतचा वेळ कसा काढू रे मी?" "अगं, आता हा हा म्हणता उद्या उजाडेल..." "माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठलाय. मी कुणाकडे मन मोकळं करु रे?" "बेबी, आपण काहीही झालं तरी उद्या भेटतोय." "मी रात्र कशी काढू?" "आपण उद्या नक्कीच भेटतोय बेबी." "मला तुझा आधार हवाय. तुझ्याशिवाय मी कशी जगतेय माझं मलाच माहिती." "माझी अवस्था काही वेगळी आहे का गं?" "कुणास ठाऊक. तुझी लोकं, तुझी व्यवधानं...." "काय बोलतेयस बेबी? मी तुझ्यापासून फक्त एक फोन-कॉल दूर आहे." "हो नं. एक फोन-कॉल. तो ही मी मला हवा तेव्हा करू शकत नाही कारण तुझी व्यवधानं....." "बेबी, तुझ्यासाठी कधीतरी मी त्यांचा विचार केलाय का?" "ती मला तुझ्यापासून दूर ठेवतात रे..." "आपण भेटतोय ना उद्या?" "अरे ते उद्या. मला आज, आत्ता तुझ्या खांद्यावर डोकं ठेवायचंय आणि मनसोक्त रडायचंय." "बेबी, आपण आत्ता इतके छान गप्पा मारतोय, उद्या भेटायचं ठरवतोय आणि तुला रडू का येतंय?" "आता सहन होत नाही रे. किती दिवस....? मला आता कठीण होतंय रे..." "उद्या भेटतोय ना आपण... तेव्हा बोलू." "तुझ्याशिवाय माझी अवस्था बोलण्याच्या पलिकडे गेलीय, त्याचं काय?" "बेबी....." "भीती वाटते, मी माझं काही बरं वाईट....." "बेबी, काहीतरी बोलू नकोस. मी आहे ना? उद्याच्या आपल्या भेटीचा विचार कर...." "सहन नाही होत रे आता...." "एक रात्रच फक्त बेबी, उद्या दुपारी आपल्या नेहमीच्या जागीच भेटतोय आपण...." "नक्की नं? माझ्या त्रासात भर पाडू नकोस आता आणखी. मला खरंच सहन होणार नाही...." "बेबी, तुला कधी ताटकळत ठेवलंय?" "नाही रे, आता कशाचीच शाश्वती वाटेनाशी झालीय..." "बेबी, अभद्र बोलू नकोस. जेवलीस का?" "तुझ्याविना अन्न गोड लागत नाही रे..." "वेडेपणा करू नकोस. जेवून घे थोडं तरी. रात्रीची औषधं विसरू नकोस." "कशाला घ्यायची आता ती मेली औषधं...? जगायचंय कशासाठी? कुणासाठी?" "माझ्यासाठी बेबी. तुझ्याशिवाय आहे कोण मला...?" "आहेत की ती तुझी व्यवधानं...." "का टोमणे मारतेयस? मी का सुखी आहे या सगळ्यात? तुझ्या आठवणीत जीव तुटतो गं...." "मग सोडून का देत नाहीस....?" "इतकं सोपं का आहे सारं...? जगण्यासाठी पैसा लागतो, बेबी..." "माझं काय?" "बेबी, तूच माझं सर्वस्व..." "सर्वस्वाचं सर्वस्व नकोसं झालंय नं तुला...." "बेबी, आता तू जेव. रात्रीचा औषधाचा डोस घे. गाडी स्टेशनात येतेय. आता बोलता येणार नाही. उतरायला गर्दी आहे." "नक्की भेटशील ना रे उद्या?" "हो बेबी, आपण उद्या दुपारी नक्की भेटतोय." "राजा, तुला उद्या कडकडून भेटायचंय रे..." "होय बेबी. तुझी आज्ञा शिरसावंद्य. आठवणीने औषधं घे. आता उतरेन. गाडी आली स्टेशनात...." . . . . ट्रिइइइइंग ट्रिइइइइंग! ट्रिइइइइंग ट्रिइइइइंग! "हां बोल राणी! अगं आत्ताच पोहोचतेय गाडी." ".........................................." "स्टेशनवर आलीयेस? अरे वा! प्लेझन्ट सरप्राइजच की!" "............................................." मनूपण आलीय? फारच छान!" " ……………………………." "राणी, माझा इंजिनापासून सातवा डबा आहे बघ! तिथेच थांब. उतरतोच आहे. चल थोडी गर्दी आहे उतरायला. ठेवतो." ______________________________________ त्याने 'वॉट्सॅप'वरचा 'तो' मेसेज बॉक्स उघडला आणि त्यातले नुकतेच झालेले संभाषण एक एक करून डिलीट करून टाकले. क्षणापूर्वीच्या भावनांच्या आवेगांचा आता त्या मेसेजबॉक्समध्ये मागमूसही उरला नाही. जणू काही त्यातलं सारं काही अगदी स्वच्छ आणि टापटीपित होतं. गाडीने स्टेशन गाठलं आणि उतरणार्‍यांच्या गडबडीत तो मिसळून गेला. लोकं उतरली. मी ही उतरलो. माझ्यापासून काही अंतरावर तो आपल्या बायको-मुलीसोबत जाताना दिसला. मुलगी त्याला सारखी बिलगत होती नि बायकोही काहीशी त्याला खेटूनच चालत होती. सारं काही आलबेल होतं. रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच....

वाचने 6793
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

प्रास ह्यांना लेखाच्या रुपात पाहून आनंद झाला...

होतं खरं असं! लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही!

आवल्डे !! शेवटची कलाटणी मस्त. शेवटचा भाग 2-3 वेळा वाचावा लागला. आधिचा संवाद थोडा कमी करता आला असता असे वाटले.

रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच.... लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही! खूप साऱ्या प्रवासात ( बस ट्रेन ) खूप लोकांचे खाजगी धागेदोरे आहेत मनाच्या कुपीत .... पण कधी कधी त्रास होतो खूप ....

पाहिले आहेत असले लोक्स अवतीभवती बरेचदा !

मागच्या आठवड्यात बँकेत गेलो होतो एका फॉर्मवर स्टँप घ्यायला. शेजारच्या काऊंटरवर एक जोडपं कर्मचार्‍याशी बोलत होतं. मला ज्याच्याकडून स्टँप घ्यायचा होता तो काहीश्या कारणाने प्रिंटरपाशी गेला आणि तो येईपर्यंत शेजारचं जोडपं निघून गेलं. मी जिथे होतो तिथला कर्मचारी परत येताच ते जोडपं जिथे बसलेलं होतं तिथल्याने त्याला विचारलं, "ये कौन थे पता है क्या".. "मेरे को हजबंड-वाईफ लगे, क्यों ऐसा नही था क्या?".. "सून..ये जो बंदा बैठा था उसकी ये गर्लफ्रेंड थी..ये बंदा ऑलरेडी शादीशुदा है".. "और गर्लफ्रेंड?" "डिव्हॉर्सी...एक बच्चा है तीन साल का!!" माझ्या फॉर्मवर स्टँप घेतला आणि निघालो, निघता निघता मेघना पेठेंचं नातिचरामि आठवल्याशिवाय राहीलं नाही.

रीटा वेलणकर्/वेलीणकर वाचताना-पाहाताना अशा मुलींची तगमग खूप खोलवर जाणवायची. मी कॉलेजमध्ये असताना कधी वसतिगृहात राहिले नाही परंतु नोकरी लागल्यानंतर वर्किंग वुमन्स होस्टेलवरती काही वर्षे गेली. तिथल्या काही मुलींकडे पाहाताना खरंच वाईट वाटे. लग्न झालेल्या माणसाशी प्रेमसंबंध ठेवणारी म्हणजे काही चांगले नाहीच. अशा वेळेस कर्तीसवरती, नोकरी करत असलेली अथवा वय वाढून मॅच्युरिटीपर्यंत पोचलेली मुलगी असं करतेय म्हणजे काही पौगंडावस्थेतलं प्रेम नव्हे. तरीही सगळं समजून उमजून चाललेलं असतं. एक दोघींनी मन मोकळं केलं तेव्हा प्रथमतः त्यांना पुढे जाऊन इतकं त्रांगडं होईल असं वाटलंच नव्हतं. एकतर १४ फेब, नाताळ किंवा ३१ डिसेंबर हे त्या हॉस्टेलवरचे सगळ्यात डिप्रेसिंग दिवस असायचे. बॉयफ्रेंडस असलेल्या मुली नटून थटून भुर्र निघून जात. त्यादिवशी हॉस्टेलवर असलेल्या मुली म्हणजे सिंगल हे न बोलता कळायचं. इतरांचे बॉयफ्रेंड्स पाहून थोडा कॉम्प्लेक्स आलेल्या, कुणी छान बोललं की थोड्या विरघळलेल्या, मग हळूहळू फ्लर्टिंग, भेटीगाठी इत्यादीमधून आधी अपेक्षा नसायच्या. आणि नंतर मग प्रेमात पडल्यावर हक्काचं माणूस हवं असे. त्या माणसाचं घरी अगदीच वाईट चाललेलं असे असं नाही. निदान मी ऐकलेल्या उदाहरणात तर नाहीच. दोघांच्याही बायका दिसायला बर्‍यापैकी, चांगल्या उच्चपदस्थ, करिअरमध्ये उत्तम अशा होत्या. अशा वेळेस यांना या तरूण मैत्रिणी -ज्या त्यांच्यासोबत भंकस करायला मोकळ्या होत्या आणि बायकोला करिअर-जब्बदार्‍या यातून तिला असल्या छचोरपणासाठी वेळ नव्हता. घरचं कार्य, परदेश वार्‍या किंवा इतर सोशल इव्हेंटसना बायको आणि फक्त लाँग ड्राईव्हला जायला की जिथे यांना दुसरं कुणी पाहणार नाही तिथे या मुली. भेटणं तर दूर, पण एकदा घरी पोचल्यावर फोनवर सुद्धा बोलायची मारामार. रात्री कॉरीडॉरमधून फिरताना खिडक्यांशी मुली फोनवर बोलताना दिसायच्या. एक अगदी आत्महत्येपर्यंत पोचली होती. तिच्या बाबतीत तर ती एकटीच मजेत होती. ही अशी खेळकर सुंदर मुलगी पाहून हा माणूस तिच्या मागे जवळजवळ वर्षभर होता. तेही इरिटेटिंग फ्लर्टिंग नाही तर छान मौजमजेचं. तिने त्याला सर्वतोपरी हे चांगलं नाही, मी इंटरेस्टेड नाही असं सांगत राहिली. फॅमिली फ्रेंड होता म्हणे. नंतर कधीतरी अपसेट असताना त्याने खांदा दिला आणि पुढचं रामायण घडलं. नंतर बरीच भांडणानंतर नात्यात कडवटपणा आला. घरच्यांनी तिचं जुळलेलं लग्न या माणसाने मोडलं तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं. पुढे काय झालं माहित नाही. यात पूर्ण चूक अशा एकट्या मुलींची नसली तरी ऐकलेल्या गोष्टींमधून अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. अपवाद असू शकतील. अवांतरः प्रतिसाद विस्कळित झालाय. अधिक तपशील न देता आणि चांगल्या ओळखीतल्या मुली या प्रसंगातून गेल्या असल्याने प्रतिसाद एकांगी होईल का, असे वाटून हात आखडता घेतलाय.

In reply to by मस्त कलंदर

>>अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. बर्‍याच अंशी खरं आहे!! जवळच्या नात्यात असं घडलं तर आपलं नाणं खोटं आहे म्हणून सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. कधीतरी या सगळ्यावर लिहायचा विचार आहे. बघू कसा आणि कधी वेळ मिळतो.

दुनिया मे कितना गम है..हे गाणे आठवले

सगळे प्रकार याच आकाशाखाली! यातला पुरुष नेहमीच सेफ असतो. बायकोला कळलंच तर सॉरी, तीच गळ्यात पडली म्हणून वेळ मारून नेतो. बायकोही बिचारी मुलांकडे बघून आणि समाजाच्या भीतीने गप्प बसते. दुसरी असते तिचे हाल तर विचारू नयेत. आपण दोघींवर अन्याय करतो आहोत, दोघींच्या आयुष्यांशी खेळतो आहोत असं एकदाही या लोकांच्या मनात येत नसेल का?