Skip to main content

मूर्तीपूजा

लेखक राही यांनी रविवार, 22/12/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा). देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. 'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही. बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते? खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार. आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत पण आधी म्हटले तसे त्यांना विरोधही प्रचंड आहे. पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्‍या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)

वाचने 33162
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत.
ही ओळ उद्धृत करण्यासाठी धन्यवाद. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हरीपाठातील हरी ही मानवाची कल्पना आहे असं (मला) जाणवल्यानंतर हरीपाठाला (माझ्या दृष्टीने) काही अर्थ उरला नाही. तरीही हरीपाठातील अशी एखादी ओळ जरी वाचनात आली तरी अंगावर शहारे येतात. ज्ञानदेवांच्या शब्दांचा महीमा. या जगाचा कर्ता करविता हरी आहे आणि मी जर त्याची भक्ती केली तर तो माझ्या प्रपंचाची काळजी घेईल, मला भवसागरातून सोडवेल (ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे) हा विचार देव नाही असं मानणार्‍यांना खुळचटपणाचा वाटतो. परंतू देव न मानणारे बहुतेक वेळा याची दुसरी बाजू विचारात घेत नाहीत. "देव आहे" ही श्रद्धा आहे. आणि श्रद्धेचा उगम मनात असतो. "तो माझ्या सोबत आहे" हे एकदा का मनाने स्विकारले (सेल्फ सजेशन) की माणूस काळालाही भिडायला तयार होतो. श्रद्धा माणसाला जगण्याचे, आयुष्याला सामोरं जाण्याचं बळ देते. आणि ज्यांची श्रद्धा देवावर नसते त्यांचीही स्वतःवर, जगण्यावर श्रद्धा असते. दोन्ही मार्ग आपापल्या जागी योग्य वाटतात. त्यामुळे एका मार्गाने जाणार्‍याने दुसर्‍या मार्गाने जाणार्‍याला "माझा रस्ता बारोबर आहे. तुझा मार्ग चुकीचा आहे." असं सांगण्याच्या भरीस पडू नये. माणूस दुसर्‍याच्या सांगण्यावर कितीही मान डोलवत असला तरी शेवटी तेच करतो जे त्याला करायचं असतं. ओह माय गॉड चित्रपटाच्या शेवटी मिथून चक्रवर्तींनी साकारलेल्या पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे, "दीज आर नॉट गॉड लव्हींग पीपल, दीज आर गॉड फीअरींग पीपल". जे गॉड लव्हींग आहेत ते कर्मकांडांच्या वाटेला जात नाहीत. आणि जे गॉड फीअरींग आहेत ते देवभक्तीच्या खुळचट कल्पनांमध्ये अडकून पडतात. मंथूनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग...

In reply to by धन्या

छान प्रतिसाद रे धन्या! आवडला. बाकी देव आहे म्हणून देवावर भार टाकण्याची अंतःस्थिती आल्याशिवाय तसल्या भानगडीत पडू नये. देव मानणाराचा स्वतःवर विश्वास नसतो अथवा तो आळशी असतो हा आणखी एक आक्षेप आहे. खरा भक्त आपल्या उपास्याला प्राणापेक्षा प्रिय मानतो त्यामुळं आपलं काम व्यवस्थित केल्याशिवाय त्याला चैन नसतं. गॉड लव्हिंग म्हणालास त्यातला हा प्रकार. आपल्यामुळं आपल्या प्रियतमाला तोशिस लागू न देण्याचा सातत्याचा प्रयत्न आणखी चांगलं काम करायला प्रवृत्त करतो. ह्यावर 'अत्यंत भणंग अवस्थेतले तुकाराम' हे संसार सोडून भक्तीला लागले असं लाडकं उदाहरण दाखवलं जातं. पण त्याबरोबरच एकनाथ महाराज नि विदेही जनकांसारखी उदाहरणंदेखील आहेत. बाकी भेसळ कुठं नाही म्हणा? धर्माधारित जीवनशैली हा प्राण असलेल्या भारतीय समाजमनामध्ये तितक्याच आळशी, सत्तालोलूप, लोभी प्रवृत्तींनी धर्माला नि देवाला बदनाम केलंय हे ठळकपणं जाणवतंच .

In reply to by धन्या

ज्ञानदेवांनी हरिजप मानवी प्रयत्नांना रिप्लेसमेण्ट म्हणुन सांगितलं नाहि. मनाला हरिशी सन्मुख करायला म्हणुन हि ओवी आहे. ज्ञानदेव सोन्याच्या किल्लीने सोनं लपवलेल्या तिजोरीचं कुलुप उघडलायला सांगताहेत. असो.

In reply to by अर्धवटराव

संत वचनांमधून, धर्म ग्रंथांमधून, धार्मिक ग्रंथांमधून हवा तो अर्थ काढता येतो. "गणी गण गणात बोते" या वरकरणी काहीही अर्थबोध न होणार्‍या शब्दसमुहाचा दासगणू यांनी श्री गजानन विजय या ग्रंथात दिलेला अर्थ असा: त्या सूत्रमय भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा। गणी या शब्दाचा। अर्थ, मोजी हाच असे।। जीवात्मा म्हणजे गण। तो ब्रह्माहून नाही भिन्न। हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे।। बोते हा शब्द देखा। अपभ्रंश वाटे निका। बाते हा शब्द ऐका। तेथे असावा नि:संशय।। बा या शब्दे करून। घेतले पाहिजे मन। ते हे आहे सर्वनाम। गण शब्दाऐवजी आलेले।। म्हणजे मना दिसे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य।

बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
मूर्तिपूजेपलिकडे तीनचार गोष्टी सहज सुचतात. - पुनर्जन्मावर विश्वास - आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास - शेकडो वेगवेगळ्या देवदेवता - वर्णव्यवस्थेचं समर्थन. (भारतीय घटनेने हा शेकडो वर्षं टिकलेला सुंभ जाळून टाकला, पण पीळ अजून आहे)

In reply to by राजेश घासकडवी

+१ ह्याला आनुषंगिक किंवा हे विचार ज्यातून आले त्या भगवद्गीता, उपनिषदं नि ब्रह्मसूत्र त्याबरोबरच वेद नि अन्य टीकांवर श्रद्धांचा समावेश. वर्णव्यवस्थेचं समर्थन मध्ये 'व्यक्तिच्या गुणांवर नि कर्मांवर आधारलेल्या वर्णव्यवस्थेचं समर्थन' अशी दुरुस्ती सुचवू इच्छितो. विकृत स्वरुप नंतर आलं.

In reply to by प्यारे१

वर्णव्यवस्थेचं समर्थन मध्ये 'व्यक्तिच्या गुणांवर नि कर्मांवर आधारलेल्या वर्णव्यवस्थेचं समर्थन' अशी दुरुस्ती सुचवू इच्छितो. विकृत स्वरुप नंतर आलं.
नाही हो. मनुस्मृतीमध्ये असलेलं स्वरूप विकृतच आहे. तेव्हा किमान गेली दोन हजार वर्षं तरी माणसाला जन्मानुसार उच्चनीच मानण्याची प्रथा हे हिंदुधर्माचं लक्षण आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मनुस्मृती एकच माहितीये का? ;) भगवदगीतेमध्ये कुणाला कुठल्या गुणांच्या प्रकारानं काय म्हणायचं ती लिस्ट दिलीये ती वाचा की! (ती ५००० वर्षांहून जुनी आहे असा माझा समज आहे.) बाकी अनेक लोकांची नावं नि कार्यं वाचा, त्यांचे जन्म वाचा (बाकी ऋषीचं कूळ शोधू नये म्हणतात ते ह्यासाठीच) बाकी सिलेक्टीव्ह रीडिंगनं आपलं कन्क्लुशन काढायचं असेल तर ... चालू द्या! :)

In reply to by प्यारे१

(ती ५००० वर्षांहून जुनी आहे असा माझा समज आहे.)
हा समज बाळगून धरणार असाल तर बोलणंच खुंटलं. गीता इस पूर्व पाचव्या ते दुसऱ्या शतकात लिहिली असा अनेक अभ्यासकांचा अंदाज आहे. गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' हे तत्त्व नाही का? म्हणजे वर्णव्यवस्थेचं समर्थन आहेच. आणि काळ कुठचा हे ठरवता आलं नाही तरी महाभारतातली कर्णाची गोष्ट त्याच वेळची नाही का? क्षत्रियांनी त्याला 'सूतपुत्र' म्हणून हिणवलंच. ग्रंथांनी काहीही सांगितलं असेल, जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था व तदनुषंगिक उच्चनीचता त्या काळी समाजात होतीच.
बाकी सिलेक्टीव्ह रीडिंगनं आपलं कन्क्लुशन काढायचं असेल तर ... चालू द्या!
ग्रंथांचं सिलेक्टिव्ह रीडिंग नाही, आख्खी मनुस्मृती वाचलेली आहे. असो. मला हिंदू धर्माची व्यवच्छेदक लक्षणं म्हणून चार गोष्टी सुचल्या, त्या लिहिल्या. त्यातल्या तीन चांगल्या, एक वाईट. मूळ धागा मूर्तिपूजेच्या महत्त्वाबद्दल आहे, तेव्हा हिंदूधर्मात काय वाईट आहे किंवा मी वाईटच का लिहिलं, आणि ते वाईट कसं नाहीच्चे, याबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही. मला वाटतं 'हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेचा उगम आणि तिचं अन्यायकारक व्यवस्थेत परिवर्तन' याबद्दल एक स्वतंत्र लेख तुम्ही लिहावात. प्रतिसादांतल्या एक दोन मुद्द्यांवर वाद घालणं फार उपयुक्त ठरत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' हे तत्त्व नाही का? नाही. आपलं विधान चुकीच्या समजावर लिहीलेलं आहे म्हणूनच लिहीलं. (श्लोक आहे, सापडला की देतो.) अवांतरः आक्खी मनुस्मृती वाचलीत तशी संपूर्ण भगवद्गीता वाचावी ही विनंती :) एखाद्या वैशिष्ट्याबद्दल लिहीताना एवढं सरधोपटपणं आम्ही लिहीतो मालक.(हा उपहास आहे, काय मालक कसं काय मधला मालक ! ;)) आपण 'विद्या'(डेटा)बोलत नाही म्हणून आश्चर्य वाटून मुद्दाम लिहीलं. बाकी मुद्द्यांबद्दल एवढा अभ्यास नाही. जमल्यास नि गरज वाटल्यास वाढवेन. ;)

In reply to by प्यारे१

भगवद्गीता चौथा अध्यायः ज्ञान कर्म संन्यास योग चातुर्वण्यं मया सृष्टं गुण-कर्म-विभागशः । तस्य कर्तारम् अपि मां विद्धय् अकर्तारम् अव्ययम् ॥१३॥ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र नाम के ये जो चार वर्ण हैँ, इन की रचना मैँ ने गुण और कर्म के विभाजन से की है. मैँ ने इन की रचना तो की है, फिर भी तू यह समझ कि मैँ न तो कुछ करता हूँ, न मुझ मेँ कोई परिवर्तन होता है. भगवद्गीता अठरावा अध्यायः मोक्ष संन्यास योग ब्राह्मण-क्षत्रिय-विशां शूद्राणां च परन्तप । कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव-प्रभवैर् गुणैः ॥४१॥ ब्राह्मणोँ, क्षत्रियोँ, वैश्योँ और शूद्रोँ के कामोँ का विभाजन गुणोँ के आधार पर किया गया है. इन गुणोँ का जन्म उन के स्वभाव से हुआ है. शमो दमस् तपः शौचं क्षान्तिर् आर्जवम् एव च । ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्म-कर्म स्वभावजम् ॥४२॥ एक : शम – कल्याण, मंगल कामना, और शांति. दो : दमन – इंद्रियोँ का निग्रह, आत्म नियंत्रण. तीन : तप – साधना, तपस्या. चार : शौच – स्वच्छता, सफ़ाई, तन और मन की पवित्रता. पाँच : क्षांति – क्षमा, सहनशीलता, उदारता. छः : आर्जव – सरलता, सादगी, निष्कपटता, खरापन. सात : ज्ञान – अव्यक्त ब्रह्म का ज्ञान. आठ : विज्ञान – ब्रह्म के व्यक्त कर्मोँ का ज्ञान, प्राकृतिक ज्ञान, पदार्थ ज्ञान. नौ : आस्तिक्य – आस्तिकता, ईश्वर मेँ विश्वास, भक्ति, श्रद्धा. ये ब्राह्मणोँ के कर्म हैँ. ये उन के स्वभाव से उत्पन्न हुए हैँ. शौर्यं तेजो धृतिर् दाक्ष्यं युद्धे चाप्य् अपलायनम् दानम् ईश्वर-भावश् च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥४३॥ एक : शौर्य – शूरवीरता, पराक्रम, बहादुरी. दो : तेज – शक्ति, ओज, ऊर्जा. तीन : धृति – धैर्य, दृढ़ता, स्थिरता. चार : युद्ध मेँ दक्षता – रण की कला मेँ महारत. पाँच : अ-पलायन – शत्रु के सामने डटे रहने की हिम्मत, हिम्मत न हारना. छः : दान – उपहार और पुरस्कार देने की भावना, उदारता, दानशीलता. सात : ईश्वर भाव – अपने को स्वामी समझने की आदत, स्वामित्व. ये क्षत्रियोँ के कर्म हैँ. ये उन के स्वभाव से उत्पन्न हुए हैँ. कृषि-गौरक्ष्य-वाणिज्यं वैश्य-कर्म स्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥४४॥ कृषि – खेती. गोरक्षा – गौ पालन, मवेशियोँ को पालना. वाणिज्य – व्यापार. ये वैश्योँ के कर्म हैँ, जो उन के स्वभाव से उपजे हैँ. परिचर्या, सेवा, टहल जैसे काम शूद्रोँ के हैँ. ये भी उन के स्वभाव से उपजे हैँ. स्वे स्वे कर्मण्य् अभिरतः संसिद्धिं लभते नरः । स्वकर्म-निरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छ्रुणु ॥४५॥ अपने अपने काम मेँ लगे मनुष्य को सिद्धि मिलती है. सुन, अपने काम मेँ लगे रहने से सिद्धि कैसे मिलती है. http://arvindlexicon.com/3420/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A…

In reply to by प्यारे१

चातुर्वण्यं मया सृष्टं गुण-कर्म-विभागशः । तस्य कर्तारम् अपि मां विद्धय् अकर्तारम् अव्ययम् ॥१३॥
हा श्लोक वर्णपद्धतीच्या पुरस्कारासाठी मागाहून घुसडलेला आहे असं दामोदर कोसंबींच्या "मिथ अँड रिअ‍ॅलीटी" या पुस्तकात वाचल्याचं आठवतंय. व्यक्तिशः माझंही हेच मत आहे. मुळची भगवदगीता भीष्म पर्वाचा छोटासा भाग असावी. अठरा अक्षौहीनीचं सैन्य लढण्यासाठी फुरफुरत असताना केवळ एका टीमचा ओपनर कच खातोय म्हणून कुणी त्याला समजावण्यासाठी त्याच्या मेंटरला नऊशे श्लोक सांगण्याइतपत अवधी देईल असं वाटत नाही. बाकी काहीही असलं तरी वर उद्धॄत केलेल्या श्लोकांसारखे काही श्लोक वगळले तर भगवदगीतेला समुपदेशनावरील आद्यग्रंथ म्हणता येईल एव्हढं मानवी मनाचा वेध घेणारं ज्ञान ठासून भरलं आहे यात शंका नाही.

In reply to by धन्या

>>दामोदर कोसंबींच्या "मिथ अँड रिअ‍ॅलीटी" या पुस्तकात मार्क्सवादी विचारांनी प्रेरीत होत भारतीय इतिहास आणि तत्वज्ञानाची केलेली चिरफाड मिथ अँड रिअ‍ॅलिटी मधील सीमारेषा पुसून टाकते आणि ब्रह्म सत्यं जगन्मिथ्याची प्रचिती देते.

In reply to by प्यारे१

हा वाद का चालू आहे कळत नाही. गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारतात समाजात जन्मानुसार वर्णाधिष्ठित विचार व आचार होता हे चित्रण केलेलं आहे. मग गीता या ग्रंथात काय लिहिलंय याबद्दल वाद कशाला? तो ४-१३ श्लोक फेमस आहे, मुद्दामच मी तो उद्धृत केला नव्हता. कारण माझं म्हणणं ग्रंथ काय सांगतात यापेक्षा 'हिंदूंचं व्यवच्छेदक लक्षण काय तर समाजात प्रचलित धर्ममान्य वर्णव्यवस्था' इतकंच होतं. असो. हा वाद आवरूया. गीता नक्की किती जुनी आहे याविषयी थोडा अभ्यास करावा. पण ती चर्चाही इथे अवांतर होईल. तुम्ही स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

>>>>गीतेतही 'जन्मानुसार वर्ण' हे तत्त्व नाही का? हा प्रश्न विचारला नसतात तर काही बोलण्याची गरज नव्हतीच्च. बाकी स्वतंत्र लेख लिहावा वगैरे बद्दल.... तात्विक नि इंटुक चर्चा आणि वाद माध्ये थोडा जास्त फरक राहणारच. चालायचंच. हिंदूंचं व्यवच्छेदक लक्षण काय ह्याबाबत चर्चा सुरु असताना वर्ण आणि आश्रम येणार ना? वर्णाश्रम जीवनपद्धती हा हिंदू चं व्यवच्छेदक लक्षण आहे हे सांगितलं जातं ना? उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय लोकशाहीबाबत चर्चा करताना आजच्या समाजाची स्थिती नि काय काय गोंधळ सुरु आहेत हे 'आधी' लिहीणार की लोकशाहीमध्ये काय काय अपेक्षित आहे हे राज्यघटनेच्या आधारे प्रेझेन्ट करणार? आधी आदर्श भूमिका मांडणं उचित ठरतं ना? त्या पद्धतीनंच हिन्दू म्हणवणार्‍यांच्या ग्रंथामध्ये काय लिहीलंय ते नको सांगायला? वर्णव्यवस्था कशा प्रकारची आहे हे सांगितलं. त्यात असणार्‍या घटकांच्या कडं काय गुण असणं अपेक्षित आहे हे सांगितलं. एवढंच. बाकी कर्णाबद्दलचे उद्गार हे सूतपुत्र म्हणून आले असले तरी त्यानं दुर्योधनाच्या मदतीनं राज्य मिळाल्यावर अर्जुनाशी युद्ध केलेलं आहेच की. त्याच्या कडं क्षमता होती त्यानं युद्ध केलं. ब्राह्मण अश्वत्थामा, द्रोण नि कॄपाचार्य लढले, क्षत्रिय शल्य सारथी बनला, कृष्ण टेक्निकली गवळी म्हणून वैश्य त्यानं शूद्राचं काम केलं. नि हे मुळात का सांगितलं गेलं त्याबद्दल .... माणसाच्या मूळ पिंडानुसार (त्याच्या नैसर्गिक कलानुसार) त्याला एखाद्या कामाची निवड करता आली तर त्याला कामात आनंद मिळतो. त्याचं काम हेच त्याचं स्वधर्म बनतं. आहे अत्यंत मठ्ठ नि अधिकार पदावर बसलाय तर त्याला देखील त्रास नि दुसर्‍याला देखील. अशा पेक्षा हुशार व्यक्तीला अधिकारी म्हणून बसायला पण आनंद. त्याचं काम होतंच मात्र त्याला त्या मध्ये त्रास देखील नाही. (हे आज भारतात सगळे जण भोगतो आहोत.) अशा प्रकारच्या कार्यानं मन व्यापलं जात नाही. डोकेफोड होत नाही. त्या त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार काम करता येतं नि असं काम करता करताच 'स्पिरिच्युअ‍ॅलिटी' जोपासली जायला मदत होते.

In reply to by प्यारे१

घासकडवींना हा समर्पक रिप्लाय आहे. विशेषतः घटना आणि सद्यसमाज यांचे उदाहरण लैच चपलख आहे.

सगुणोपासनेचा मुख्य दोष [तात्विक अर्थाने] म्हणजे अनेक मूर्तींच्या आधारे होणारे धर्माचे आणि त्या अनुषंगाने होणारे समाजाचे विभाजन. "इंडिया आफ्टर गांधी" या रामचंद्र गुहा यांच्या ग्रंथात एक वाक्य होते,
मुस्लिमांच्या इच्छेविरुद्ध भारत एक ठेवण्यासाठी जितकी शक्ती ब्रिटिशांना वापरावी लागली असती तेवढी शक्ती हिंदूंच्या इच्छेविरुद्ध पाकिस्तान निर्माण करण्यासाठी नक्कीच वापरावी लागली नाही.
बाकी फसवणूक, लुबाडणूक तर मूर्तीपूजा नसणाऱ्या धर्मांत देखील नित्यनेमाने चालूच असते. तो दोष मूर्तीपूजेचा नव्हे. इतर धर्मांत देखील अनेक पंथ असून त्यांच्या रक्तरंजित लढाया देखील झालेल्या आहेत. मानवजात ही ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरा, त्या ओघातून विकसित झालेली संस्कृती आणि भौगोलिक वैशिष्ट्ये यांच्या आधारे विभागली गेली आहे. या सर्व गोष्टींतून प्रत्येक समूहाला स्वत:ची एक विशिष्ट ओळख मिळालेली आहे. जे धर्म ह्या सर्व वेगवेगळ्या समूहांच्या मूळच्या ओळखी नष्ट करून किंवा धूसर करून या सर्व समूहांना एकाच साच्यात बसवायचा प्रयत्न करतात ते संघटित धर्म आहेत. आता कोणतीही संघटना म्हटली की तिथे सत्तेचा संघर्ष ओघानेच आला. म्हणूनच ह्या सर्व संघटित धर्मांतील अंतर्गत पंथांमध्ये लढाया झालेल्या आहेत. हिंदू धर्माचे वैशिष्ट्य हे आहे की या धर्माने स्वत:च्या अनुयायांची मूळची ओळख नष्ट न करता त्यांच्यातील अनेक पंथांना एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला. ह्याचा फायदा हा झाला की इतर धर्मियांप्रमाणे हिंदूंमध्ये धर्माच्या नावावर लढाया झाल्या नाहीत. पण नुकसान हे झाले की इतर धर्मीयांची आक्रमणे परतवून लावण्यासाठी जे संघटित प्रयत्न आवश्यक असतात ते देखील झाले नाहीत. हिंदू म्हणजे कोण ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणूनच सरळ देता येत नाही. जिथे संघटना असते तिथे निष्ठा कशावर आणि कोणावर ठेवायची हे स्पष्ट असते. जिथे संघटनाच नाही तिथे ह्या उत्तराला फाटे फुटतात. म्हणूनच हिंदूंना आक्रमक बनवणारे नेत्तृत्व हे इतर धर्मांप्रमाणे धार्मिक नसून राजकीय नेतृत्व आहे. म्हणूनच हा धर्म तात्विक दृष्ट्या हजारो वर्षे जुना असून देखील हिंदूंना संघटित करण्यासाठी तुलनेने आधुनिक काळातील एखादा शिवाजी किंवा सावरकर शोधावा लागतो.

>>देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. -- हि चुकीची धारणा या सर्व चर्चेचं मूळ आहे. या धारणेचा अर्थ काहिसा असा: एखादा अंपायर मैदानात यावा. तिथे त्याला बेशिस्त कारटे टारगटपणा करताना दिसावे. त्याने त्या कारट्यांना काहितरी कामाला लावायचं म्हणुन एक दगड उचलावा. त्या दगडावर आधारीत कथानक तयार करावं. काहि समाजोपयोगी नियमांची चौकट तयार करावी. अशा रितीने मनोरंजनाच्या माध्यमातुन एक सामाजीक स्ट्रक्चर तयार व्हावं. पण ते असं नाहिए. एक्च्युली झालं असं कि माणसाला सत्याकांक्षा, मानवी जन्माचा उद्देश वगैरे जाणण्याचे किडे स्वस्थ बसु देईनात. हि आकांक्षा जेंव्हा एका विशिष्ट तिव्रतेला पोचली तेंव्हा ते सत्य अगदी सर्व बाजुंनी-सर्व थरांतुन-जाणिवेच्या सर्व माध्यमातुन माणसाला भिडलं. शरीर, मन, बुद्धी, गात्रे, जाणिव-नेणिवेच्या सर्व पातळ्या त्या अनुभुतीने चिंब भिजल्या. त्या अनुभुतीच्या अनुषंगाने त्या सिद्धाची कर्मे होत गेली व त्याच कर्मांना अधारभूत प्रॅक्टीस म्हणुन समाजाने स्विकारले. हे सगळं कधि घडलं? कोणासोबत घडलं? तर हे असं अगदी आजही घडतय आणि इच्छेची एक विशिष्ट पातळी गाठणार्‍या कुणाबद्दलही हे घडु शकतं. तात्पर्य हे कि भक्तीमार्ग हा काहि नियम बांधुन मांडलेला मनाचा खेळ नाहि तर अनुभवातुन इव्होल्व्ह झालेली ति एक अवस्था आहे. धर्मसंस्था, आणि त्यातल्यात्यात हिंदु धर्म कसा तयार झाला, त्यात भक्तीमार्गाचं स्थान काय वगैरे विषय वेगळा आहे व त्यावर काथ्याकुट करता येईल, पण प्रस्तुत चर्चेच्या अनुषंगाने तो अवांतर विषय आहे. >>या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. -- डेफिनेटली. हा प्रॉब्लेम तर आहेच. पण त्यासर्वांचा भक्ती अवस्थेशी काहि संबंध नाहि. एखादा भीमसेन जोशी रागदरबारीत अगदी देहभान विसरुन तल्लीन होऊन गेलाय व सवई गंधर्व उत्सव मंडपाबाहेर "लर्न शास्त्रीय संगीत इन ट्वेंटीवन डेज" पुस्तक विक्री, वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल, खर्‍याखोट्या ब्लॅकतिकीट विक्री, कर्णकर्कश्य वाद्यांचे डेमो असा सगळा तमाशा चालला आहे. आपण कुणिकडे लक्ष्य द्यावे? >>'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. -- अगदी नेमकं. जर मुळात लाईट गुल्ल असेल तर कितीही सॉकेट प्लग लावा, इंस्ट्रुमेण्ट चालणार नाहि. मुळात इच्छा, भाव नसेल तर प्रोसेसचं कितीही अवडंबर केलं तरी ते व्यर्थ आहे. >>आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही. -- धर्माचा बुरखा पांघरलेली झुंडशाही हा सनातन प्रॉब्लेम आहे आणि पुढेही ति चालु राहिल. पण त्याला कारण माणसाची झुंडशाहि करण्याची वृत्ती आहे, धर्म नाहि. >>बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते? -- हिंदु धर्मावर बरच काहि टंकता येईल. सध्या एव्हढच सांगावसं वाटतं कि ज्याला आज हिंदुधर्म म्हणतात ति सत्याप्रति जिज्ञासेवर आधारीत एक जीवन प्रणाली आहे. या जिज्ञासेची प्रखरता, ति शमवायला चोखळण्यात आलेले अनेक मार्ग, प्रणालीचं अविच्छीन्न लक्षण जे मुस्कटदाबी वगैरे अनेक बर्‍यावाईट बाबींचा उहापोह करता येईल... असो. >>पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्‍या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.) -- मानव इतीहासात हि घुसळण सतत होत आलि आहे व पुढेही सुरु राहिल. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे, कर्माप्रमाणे लाभ-हानी होत आलि व पुढेही असच सुरु राहणार. हे ताक घुसळण्यासारखं आहे. माठातलं ताक कधि डावीकडे तर कधि उजवीकडे मूव्ह होत राहिल. आपापल्या इच्छेप्रमाणे लोणि मिळेल किंवा पाणि.

मूर्तीपूजा हा एक संकेत आहे. ‘धर्म’ ही संकल्पना त्यापेक्षा खूप व्यापक आहे. गाडगेबाबांनी कधी मुर्तीपूजा केली नाही. पण ते ‘संत’ ठरले. वेदशास्त्रपारंगत दिग्गजांनी मूर्तीपूजेला फारसे महत्व दिलेले दिसत नाही. मूर्तीपूजा व इतर कर्मकांडे संत किंवा धर्मपंडितांनी सामन्यांसाठी बनवली असावीत असे वाटते. कर्मकांडाच्याहि पलिकडे धर्म हि जाणीव पोचते. ‘धर्म’ याचा अर्थ प्राप्त कर्तव्य असाही आहे. मुळात हिंदू धर्म नक्की कोणता ? वेदांनी सांगितलेला ? मनुने सांगितलेला ? शंकराचार्यांनी उधृत केलेला ? की भगवद्गीतेने विषद केलेला ? धर्म आणि देव यांचे नाते काय ? एखादा माणूस देव मानत नाही म्हणजे तो अधार्मिक आहे, असे म्हणावे का ? देवपूजा करणारा पण नैतिक मूल्ये न पाळणारा माणूस धार्मिक म्हणावा का ? पाप-पुण्याच्या व्याख्या काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय हिंदुत्वाची किंवा एकूणच धार्मिक असण्याची व्याख्या करणे कठीण आहे.

एक राजा असतो. काव्य शास्त्र विनोद साहित्य वगैरे मधे अभिरुची असलेला,तसेच पुरोगामी विचारांचा, सगळ्यांचा आदर करणारा गुणवंत असतो. ईश्वर हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे. मुर्ती काय दगड आहे, मुर्तीत कधी देव असतो का? वगैरे विचारांचा त्यावर पगडा असतो. एकदा त्याच्याकडे एक साधू येतो. साधूशी तो म्रुर्तीपूजा निरिश्वरवाद वगैरे वर वाद संवाद करतो.साधू त्या राजाची तसबीर मागवतो. प्रधान एक सुंदर तसबीर देतो. साधू ती हातात घेतो व त्यावर थुंकतो. राजाला राग येतो.साधू म्हणतो की मी तुझ्यावर थोडेच थुंकलो. मी तर तसबीरीवर थुंकलो. तसबीर म्हणजे तू नव्हेस. ही कथा प्रवचनात व कथेकरी बुवा वेगवेगळ्या छटा देउन सांगत असतात. माणसाला अमुर्त निर्गुण निराकार असे स्वरुप कल्पायला कठीण जाते मग ही प्रतिक त्याची काम करतात. प्रतिक आली त्याला भाव भावना चिकटल्याच. राष्ट्रध्वज हे देशाभिमानाच मोठ प्रतिक मग त्याच्या साठी ध्वजसंहिता आली. ध्वज पायद्ळी तुडवला तर तो राष्ट्राचा अपमान, पुतळ्यांची विटंबना म्हणजे महापुरुषांची विटंबना, निषेध करण्यासाठी फोटो जाळणे व पुज्य भाव व्यक्त करण्यासाठी फोटोची पुजा करणे/ हार घालणे. या गोष्टी आल्याच. पुरोगाम्यांनाही प्रतिक लागतातच.पारंपारिक लोकांपेक्षा वेगळी असतील ती. माणसच आहेत ना ती शेवटी.

In reply to by प्रकाश घाटपांडे

कथा ऐकली होती ती स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात! बाकी पूजा करणं/ मान तुकवणं हे मानवी स्वभावाचं वैशिष्ट्यच आहे. हिरो, हिरॉईन्स, खेळाडू, राजकारणी, बुद्धीमान शास्त्रज्ञ, बॉडीबिल्डर्स, प्रतिमा, इ.इ.इ.इ. एक ना अनेक. वेगवेगळ्या प्रतवारी मध्ये, वेगवेगळ्या तीव्रतेनं (इन्टेन्सिटी) ही सुरु असते. बाकी काही नसलं तर स्वतःची पूजा करण्यात तरी माणूस मश्गुल असतोच. :) ह्यातलं साम्य म्हणजे आपण अपूर्ण आहोत असं सतत वाटत असतं. सौंदर्य, शारिरीक, मानसिक, बौद्धीक क्षमता ह्यांचा अत्युच्च बिंदू, अतिमानवी शक्ती, अर्थसत्ता म्हणून कुणीतरी आपल्या समोर दिसला की आपल्याला त्याबद्दल आकर्षण वाटतं, त्याची पूजा करावीशी वाटते. भव्य समुद्र, शांत जलाशय, सुंदर नजारा ह्याद्वारे आपली पूर्णत्वाची भूक आत कुठंतरी भागत असल्याचा भास होत असल्यानं 'मस्त ' वाटत असतं. बाकी जास्त चिरफाड करुन उपयोग नाही. अनुभव तो अनुभवच!

मूर्ती पूजा ज्ञात असलेल्या सर्व धर्मान मध्ये आहे . चर्च मदर मेरी समोर लोक मेणबत्ती लावतात, प्रार्थना करतात (उदा: दिल्लीतील जनकपुरी ब-१ येथील चर्च मध्ये चर्चच्या बाहेर पटरीच्या जवळ मदर मेरीचा पुतळा आहे, येणारे-जाणारे बाहेरूनच नमस्कार करतात आणि दानपेटीत पैशे ही टाकतात (रस्त्यावर बांधलेल्या मंदिरा सारखेच), पीर फकिरांच्या समाध्यांवर ही धूप, अगरबत्त्या लावल्या जातात व प्रार्थना केली जाते, शिवाय घरात व दुकानात असलेल्या 'काबाच्या फोटो' ला ही धूप अगरबत्ती लाऊन लोक प्रार्थना करतात. बुद्ध धर्मीय ही गौतम बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतात. सारांश प्रत्येक धर्मात मनाला एकाग्र आणि शांत करून भगवंताच्या सहवासाचा किंवा कृपेचा अनुभव प्राप्त करण्यासाठी मूर्ती, फोटो किंवा इतर वस्तू प्रतिक म्हणून वापरल्या जातात. केवळ हिंदू मूर्ती पूजक आहे अन्य नाही हे म्हणणे चुकीचे आहे. शेवटी हिंदू धर्म नव्हे तर जगण्याची पद्धत आहे ज्यात सर्व प्रकारच्या ईश्वरिय प्रतिक आणि पूजा पद्धतीचा समावेश आहे. गीतेत ही भगवंत म्हणतात, वृक्ष, यक्ष, सर्प, मानव, पर्वत, पशु किंवा कुठल्याही इतर प्रतीकांची पूजा केली तरी ही ती भगवंता पर्यंत पोहचतेच.

धर्माचे दोन अर्थ आहेत : एक, ज्यानं सर्व चराचर धारण केलंय ते (धारयिती इती धर्मः) - (सत्य). आणि दुसर्‍या अर्थानं धर्म हा सत्य शोधनाचा मार्ग आहे. मग धर्म कोणताही असू शकतो आणि ते व्यक्तीचं परम स्वातंत्र्य आहे. खरं तर तो जन्मानं प्राप्त होतो ही मूलभूत धारणाच चुकीची असल्यानं मानवतेचं विभाजन झालंय. हिंदू कुटुंबात जन्मलेला सत्यशोधनासाठी इस्लामची सूत्रं वापरु शकतो (निराकारला शरण). आणि एखादा जन्मानं मुस्लिम असला तरी क्रिस्टशिअन तत्वप्रणाली (सेवेनं अहंकाराचं निरसन) आजमावू शकतो. एखाद्या क्रिस्टशिअन व्यक्तीला हटयोग किंवा सांख्ययोग मोहवू शकतो. जर मानवता थोडी सुजाण झाली तर कागदोपत्री कोणताही बदल न करता एका कुटुंबातल्या व्यक्ती स्वरुचीप्रमाणे भिन्नधर्माचरणानं सत्य शोधू शकतात. आणि असा दिवस सर्व धार्मिक कलहाचा अंत ठरेल. मुळात धर्म सर्वसमावेशक आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं तो निर्वैयक्तिक आहे. धार्मिक विभाजन हे सत्य न समजलेल्यांच्या अज्ञानाची परिणिती आहे. कमिंग टू द पॉइंट. जेंव्हा तुम्ही असं म्हणता :
आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत
तुम्हाला बहुदा सत्यशोधनात मूर्तीपूजा आवश्यक आहे का? असा प्रश्न आहे.

@ राही : मूर्तीपूजा का? मूळ विषयाकडं मूर्तीपूजा करताना एक आलंबन म्हणून वापरलं जावं. आत्मस्थिती सांभाळणं सातत्यानं शक्य नसतं किंबहुना दिवसाच्या २-५ मिनीटांपेक्षा जास्त आपण ध्यानाच्या अत्युच्च पातळीवर राहू शकत नाही हे वास्तव आहे. झोपेतून डोळे उघडले की आपण असतो द्वैतामध्ये (एकापेक्षा अधिक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती) . खोलीत माझ्याशिवाय दुसरं कुणी नाही म्हणताना सुद्धा खोली ज्यातून बनली त्या वस्तू असतातच. त्या माझ्याहून वेगळ्या आहेत. त्यामुळं द्वैत राहणारच. कर्म देखील आहेच. काही न करता बसून राहतो म्हणताना बसण्याचं कार्य होतंच. आत्मस्थिती सांभाळ्ण्याचं उत्तम कार्य सगुणाच्या अथवा मूर्तीच्या उपासनेनं होतं. तुकाराम महाराज 'परब्रह्म विटेवरी' म्हणताना विठ्ठलाच्या मूर्तीलाच परब्रह्म म्हणतात. रामदास स्वामी 'गणाधीश जो ईश' म्हणताना सुरुवातीलाच 'मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नि नमू शारदा मूळ चत्वार वाचा' म्हणतात. जो सगळ्याचा आरंभ अगदी निर्गुण म्हणण्याचा आरंभ आहे तो गणाधीश म्हणतात. चारी वाणींची मूळ स्थान शारदा ह्यांचं वंदन करताना त्यांचं मूळ स्वरुप निर्गुणाचंच आहे. स्त्री मंगळसूत्र घालते तेव्हा तो नवर्‍याकडं निर्देश असतो, पुरुष एखाद्या सांकेतिक नावानं आपल्या वरिष्ठाचा उल्लेख करतो हातात बांधलेला एखादा दोरा नि प्रिय व्यक्ती ह्यात बदल नसतो. फ्रिज वर ठेवलेला मुलाचा फोटो मुलाची सातत्यानं आठवण करुन देतो तसंच मी एखादी मूर्ती बघतो तेव्हा माझ्या मनामध्ये मूर्ती पाहता क्षणी आत्मस्थितीचाच विचार असतो इतकं ते समीकरण जुळायला हवं. मूर्तीपूजा हे साधन, भक्ती हे साधन, ज्ञान हे देखील साधनच. आत्मस्थिती जाणण्याचं. संतांनी सगुण स्वीकारताना सामंजस्याची नि समन्वयाची भूमिका स्वीकारली ती बहुनज उद्धारासाठी. बाकी प्रत्येकाच्या कलानुसार मार्ग निवडण्याचा पर्याय आहेच. (सगुणाच्या विरोधात म्हणून निर्गुण असा विषय आहे दोन्ही एकच असल्याचा भाव असल्यावर सगुणाच्या सापेक्षतेचा विषय संपतो)

In reply to by प्यारे१

अतिशय छान समजून सांगितलेत तुम्ही प्यारेलाल!
(सगुणाच्या विरोधात म्हणून निर्गुण असा विषय आहे दोन्ही एकच असल्याचा भाव असल्यावर सगुणाच्या सापेक्षतेचा विषय संपतो)
सगुण निर्गुण हे मुळातच सापेक्ष भाव आहेत हे पटते. अहो फक्त मूर्तिपूजेचे काय घेऊन बसलाय? दक्षिणेत तर शैव आणि वैष्णव असाही भेद चालतो. म्हणजे देवांमध्ये हि कोणाला पूजणार त्यावरून आमचा रोटी बेटी व्यवहार!!! कमालच झाली यांची तर!

In reply to by अमित खोजे

सगुण निर्गुण अतिशय छान समजून सांगितलेत तुम्ही प्यारेलाल!
ह. भ. प. प्यारेमहाराज वाईकरांसारखा शब्दांवर पकड असणारा, ओघवत्या रसाळ शैलीत प्रवचन लिहणारा दुसरा प्रवचनकार माझ्यातरी पाहण्यात नाही. य निमित्ताने म्या पामरास ह. भ. प. प्यारेमहाराज वाईकरांना सुचवावेसे वाटते की त्यांनी गीता प्रेस, गोरखपूर यांच्याशी संपर्क करावा. महाराजांच्या लेखनशैलीने प्रभावित होऊन गीता प्रेसवाले नक्की त्यांना पुस्तकांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायची संधी देतील.

In reply to by धन्या

अरे सहीच्च! चांगली आयडीया. पण मीच त्यांच्याकडची नि बाकीची पुस्तकं वाचून वाचून लिहीतो रे. ;) बाकी तुलाही म्हशींना रेडा लावण्याबद्दल बरीच माहिती आहे की! तू कधी उपयोगात आणणार? =))

In reply to by प्यारे१

बाकी तुलाही म्हशींना रेडा लावण्याबद्दल बरीच माहिती आहे की! तू कधी उपयोगात आणणार?
छ्या. एव्हढं साधंही कळेना राव तुम्हाला. माझ्या त्या ज्ञानाचा आता काही उपयोग नाही. मला कीबोर्ड बडवण्याचे पुरेसे पैसे मिळतात. त्यामुळे आता मला म्हशी पाळ्ण्याचा जोडधंदा करण्याची आवश्यकता राहीली नाही.

कुणीही यावं हिंदूंना दोन शब्द सुनावून जावं अन हिंदूंनी शांतपणे ऐकून घेऊन जे करायचं ते करावं हेच हिंदूंचं वैशिष्ट्य आहे.

@राही , काही प्रश्न : १) आपण महायान ह्या बौध्द पंथाचे नाव ऐकुन आहात का ? २) त्याचा वैदिक हिंदु धर्मावर काय प्रभाव आहे ? ३) बुध्दाच्या मुर्ती आणि स्तुप बांधायचा सपाटा कोणत्या राजाने लावला ? ४) यज्ञामध्ये तुप अन लाकडं जाळणार्‍या वैदीक आर्यांना मंदीरे अन मुर्त्या बांधायची हौस कुठुन आली असेल ? ५) सगळ्यात पहिले हिंदुमंदीर / मुर्तीपुजा कोणत्या काळात सुरु झाली ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न : की हिंदु धर्मातील मुर्तीपुजेच्या उदयानंतर बौध्द धर्म ( केवळ महायानच नव्हे तर हीनयान सुध्दा ) नामशेष का बरे झाला असावा ? ह्याचे थोडे तरी क्रेडीट मुर्ती पुजेला देता येईल काय ? ( अवांतर : मी अपलं सहजच प्रश्न विचारलेत , आजकाल अभ्यास न करता हिंदुधर्माविषयी टीका करायची टुम निघालीये म्हणु जरा चेक करुन पाहतोय की इथेही तसाच प्रकार तर नाही ना ? नो ऑफेन्स हं )

In reply to by प्रसाद गोडबोले

बौद्ध धर्मास उतरती कळा लागल्यानंतर त्याचे हीनयान आणि महायान असे दोन प्रमुख पंथ झाले. महायानातही पुढे फूट पडून मंत्रयान, वज्रयान असे आणखी काही उपपंथ तयार झाले. बौद्ध धर्माची ही वज्रयान शाखा आणि शैवपंथ यांच्या मिश्रणातून सहजयान या पंथाची निर्मिती झाली. सहजयानातील गुरुंना सिद्ध म्हटले जायचे. सरहपाद हा सहजयानाचा मुख्य प्रवर्तक होता. याच सहजयानातून नाथसंप्रदायाचा उगम झाला असावा अशी एक विचारधारा आहे. हे जर खरे मानले तर सरहपाद ते ज्ञानदेव हा सहजयान ते वारकरी पंथ व्हाया नाथ संप्रदाय हा प्रवास असा आहे: सरहपाद - शबरपाद - लुईपाद - विरुपा - दारिकपा - घंटापा - मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) - गोरखनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - ज्ञानदेव संदर्भः नाथसंप्रदाय - उदय व विस्तार लेखकः डॉ. प्र. न. जोशी

In reply to by धन्या

बौद्ध धर्मास उतरती कळा लागल्यानंतर त्याचे हीनयान आणि महायान असे दोन प्रमुख पंथ झाले.
ह्याच्याशी मात्र असहमत. हीनयान असा मूळात कुठलाच पंथ नव्हता. शुद्ध बौद्ध धर्माचे पालन करणारे थेरवादी असत. पुढे साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकात चौथ्या धम्म परिषदेत कनिष्काने बौद्धांमध्ये मूर्तीपूजेला मान्यता दिली व पुढे बुद्धमूर्ती कोरण्यात येऊ लागल्या. महायान परंपरेचा हा एक प्रकारे उगमच ठरला. अर्थात बुद्धाची मूर्ती जरी असली तरी तिची पूजा करण्यात येत नसे. बुद्धाच्या जीवनातले प्रसंग, विविध जातककथा मूर्तीच्या रूपात कोरले जात असत. त्यानंतर मात्र हळूहळू स्तूपांमध्येसुद्धा बुद्धमूर्ती स्थापित झाल्या व त्यांची पूजा करण्यात येऊ लागली. आधीच थेरवादी बुद्धांना हीन अथवा कमी श्रेष्ठ समजून महायानांनी त्यांना हीनयान असे नाव दिले. हीनयान कालखंडात बौद्ध धर्माचा प्रचंड उत्कर्ष झाला. महायान काळातही बौद्ध धर्म उत्कर्षावरच होता पण त्याच काळात दक्षिणेत स्वतः वैदिक धर्माभिमानी असूनही बौद्ध धर्माचे आश्रयदाते असलेल्या सातवाहन साम्राज्याचा र्‍हास झाला व उत्तरेत कट्टर वैदिक असलेल्या गुप्त साम्राज्याचा उदय झाला व हिंदू धर्मात पुराणे, चातुर्वण्यवर्णव्यवस्था, कर्मकाण्डे बळकट होऊ लागली व बौद्ध धर्माचा र्‍हास सुरू झाला. साधारण ६/७ व्या शतकात भारतातून बौद्ध धर्माचे जवळपास उच्चाटन झाले.

In reply to by प्रचेतस

मला इतकेच म्हणायचे होते की शुध्द वैदीक धर्मातील लोक केवळ यज्ञ याग करीत .( एव्हन शंकराच्याही पिंडी नसाव्यात तेव्हा) मुर्तीपुजा हिंदु धर्मात घुसण्याचे एकमेव कारण म्हणजे बौध्दातील मुर्ती / स्तुप ह्यांचे अवडंबर !! त्यातही एस्पीशीयली अशोकाने जो आतातायी प्रसार केला अन अचानक बुध्द धर्म फोफावला त्याचा प्रचंड प्रभाव वैदीकांवर पडल्याने त्यांनी मुर्तीपुजा स्विकारली असावी . ( हा केवळ माझा अंदाज आहे , प्री-अशोकन टाईम मधील हिंदु / वैदीक देवतेची एखादी मुर्ती पाहण्यात आहे का आपल्या कोणाच्या? तसे असल्यास माझे मत रेक्टीफाय करुन घावे लागेल मला )

In reply to by प्रसाद गोडबोले

बौद्ध प्रभावासोबतच अनेक अवैदिक स्थानिक मूर्तिपूजक जमाती होत्या त्यांना आपल्यात घेण्यासाठीही तसे झाले असावे. शंकराची पिंडी हा त्यातलाच प्रकार असण्याची शक्यता जास्त. वेदांतल्या रुद्राशी त्याचे कनेक्शन जोडणे हा नंतरच्या हातचलाखीचा भाग झाला. अन दगडविटांची देवळे उभारून त्यात दगडी मूर्ती स्थापून तिची पूजाअर्चा करणे हा प्रकार गुप्तकाळापासून (इ.स. ३२० ते ५५०) खूप जास्त फोफावला. बाकी अशोककाळातील प्रसारामुळे बौद्ध धर्म फोफावला, पण तेव्हा त्यात मूर्तिपूजेचे इतके अवडंबर नव्हते. पुढे पुढे अजून १००-२०० वर्षांनंतर ते जास्त वाढले. अफगाणिस्तानात बौद्ध धर्म पसरला तेव्हा तेथे असलेल्या ग्रीक प्रभावाखाली बुद्धप्रतिमा बनवल्या जाऊ लागल्या. अन बहुतेक त्यातूनच बुद्ध प्रतिमा नामक प्रकार उदयास आला असावा. अशोकपूर्व काळातली देवतेची मूर्ती माझ्याही पाहण्यात नाही. नसावीच. मात्र जैन धर्माचं माहिती नाही. बौद्ध धर्मही सुरुवातीला अन-आयकॉनिक होता नंतर बुद्धप्रतिमा दाखवणे सुरू झाले. जैनांचं तसंच होतं की कसं काय माहिती.

In reply to by बॅटमॅन

हरप्पन काळातील मुर्तिपुजेची माहिती काही लेखात सापडते. त्यातील एका लेखाचा धागा खाली देत आहे. http://www.indianetzone.com/18/religion_indus_valley_civilization.htm

In reply to by प्रसाद गोडबोले

सहमत आहे. पण केवळ बौद्धांतील मूर्ती हेच एकमेव कारण नक्कीच नाही. शिवाय हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांमध्ये मूर्तीस्थापत्याचा कालखंड सर्वसाधारणपणे सारखाच आहे. साधारण इस. २ रे ३ रे शतक. पण मंदिर निर्मिती मात्र बौद्ध लेण्यांपासून प्रेरणा घेऊन सुरु झाली असावी असे मात्र म्हणता येऊ शकते.
अशोकाने जो आतातायी प्रसार केला अन अचानक बुध्द धर्म फोफावला त्याचा प्रचंड प्रभाव वैदीकांवर पडल्याने त्यांनी मुर्तीपुजा स्विकारली असावी
काहीसा उलटा प्रभाव किंवा रिएक्टिव्ह रिअ‍ॅक्शन म्हणणे जास्त संयुक्तिक ठरावे. अशोकाने इतक्या मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार केला की धर्मप्रचार हाच धर्म बनून गेला. साहजिकच वैदिक धर्मास निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेतून हिंदू देवतांच्या व त्यातही त्यांमध्ये चमत्कार करणार्‍या देवतांच्या सगुणोपासनेस जास्तच महत्व प्राप्त झाले. अशोकपूर्व कालखंडात शिवलिंगे बहुधा अस्तित्वात होती आणि स्थानिक आदीवासींमध्येही मूर्तीपूजा प्रचलित होती.

In reply to by स्पा

तू आपला थ्री डी गणपती तयार कर जा एखादा गपचूप! नसत्या चौकशा तुला!! =))

In reply to by पैसा

सहमत. मी चमचा आणि दूध घेऊन तयार आहेच! :)

In reply to by स्पा

माझ्या अल्पज्ञानानुसार संगणकावर तयार केलेल्या गणेशाच्या त्रिमित चित्रात केशाकर्षण परीणाम होणार नाही त्यामुळे अशा गणेशाला तुम्ही चमच्याने दूध पाजू शकणार नाही.

In reply to by स्पा

बेस्ट प्रश्न! बहुदा निष्फल चर्चा करण्यासाठीच फोरम वापरला जातो. अनाकलानामुळे झालेल्या समाजाच्या धार्मिक विभाजनाप्रती जनजागृती करण्याचा अशा चर्चेतनं मी प्रयत्न करतो. (नाही तर संकेतस्थळावर हुज्जत घालण्यापेक्षा टाईमपासचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत).

In reply to by संजय क्षीरसागर

अनाकलानामुळे झालेल्या समाजाच्या धार्मिक विभाजनाप्रती जनजागृती करण्याचा अशा चर्चेतनं मी प्रयत्न करतो.
बोला धृतराष्ट्र महाराज की जय!!!!

नॉट ईंटरेस्टेड ईन सब्जेक्ट !! मिपावर अश्या चर्चा आधी ही झालेल्या आहेत आनि त्यातुन काही साफल्य झालेल नाही ... उगा फुकाची बॅडबिड्थ वापरायचे धंदे ( वांझोटे धंदे च्या चालीवर ;) )

कसं असतं निर्गुण निराकार ईश्वराची संकल्पना लोकांना झेपत नहि. तो गुणातीत आहे , डोळ्यांना दिसत नाही, स्पर्शाने जाणवत नाही प्रयोगशाळेत तो सिद्ध करता येत नाही म्हणजे तो नाहीच अशी लोकांची धारणा होते . मग तो कोणीतरी गूढ आहे आणि त्याची प्राप्ती हि आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे अशी मतं होतात . म्हणून सामान्य लोकांसाठी मूर्तीपूजा , कर्मकांड सांगितली आहेत कारण मूर्ती समोर असली कि लगेच हाथ जोडले जातात , सात्विक भाव जागृत होतात, देवावर लक्ष केंद्रित होतं म्हणून हि मूर्तीपूजा. आता बघा न वाटेत एखादं मंदिर लागल तर आपण लगेच हाथ जोद्तो. बाकी मग दिवस भरात देवाची आठवण आपल्याकडून होत नहि. ५ मिनितेसुधा ध्यानात बसणं , ५ मिनटाच्या वर नास्मरण करण जमत नहि. योग तर फार दूरची गोष्ट आहे. खरं तर मूर्तीपूजा हि अध्यात्माची सगळ्यात पहिली पायरी आहे . पण मूर्ती आणि देवूळ ह्याच्यातच सगळा ईश्वर सामावला आहे असा समजून लोक त्याच्यापुढे जायलाच तयार नसतात . ज्यांनी हि पायरी already ओलांडली आहे त्यांच्यासाठी मूर्तीपूजा आणि कर्मकांड गौण अहेत. मागच्या एका लेखात देव सर्वशक्तिमान आहे मग त्याने ४ देवळ वाचवून स्वतःच रक्षण का नाही केला असा हास्यास्पद प्रश्न विचारला होता . अनेक वेळा सांगूनही देवळाच्या बाहेर चा देव हि संकल्पना काही प्रश्नकर्त्याला पटली नहि. सुशिक्षितांची हि गत तर अडण्यांची काय असणार? देवळात असणारी ती अस्वछता , भक्तीचा अभाव, लुटालूट बघता देव देवळात असतो का अशी शंका येते . अर्थात हे फक्त हिंदूच नाही तर प्रत्येक धर्मात असत. त्याचं मुल कारण माणसाची स्वार्थी, कुरघोडी करण्याची वृत्ती , अति लोभ हे आहे इथे धर्माचा किवा देवाचा संबंध नाही .
"तो माझ्या सोबत आहे" हे एकदा का मनाने स्विकारले (सेल्फ सजेशन) की माणूस काळालाही भिडायला तयार होतो.जे गॉड लव्हींग आहेत ते कर्मकांडांच्या वाटेला जात नाहीत. आणि जे गॉड फीअरींग आहेत ते देवभक्तीच्या खुळचट कल्पनांमध्ये अडकून पडतात.
दोन्ही गोष्टींशी एकदम सहमत. भक्ती जसजशी वाढीस लागते तशी पहिल्यांदा घडणारी गोष्ट म्हणजे भयाचा नाश . तेव्हा घाबरून भक्ती करणं हा भक्तीचा देखावा झाला.प्रेमाने केलेली भक्ती देवाला अपेक्षित असते
मुस्लिमांच्या इच्छेविरुद्ध भारत एक ठेवण्यासाठी जितकी शक्ती ब्रिटिशांना वापरावी लागली असती तेवढी शक्ती हिंदूंच्या इच्छेविरुद्ध पाकिस्तान निर्माण करण्यासाठी नक्कीच वापरावी लागली नाही.
ह्याच्याशी सुधा एकदम सहमत अहे. मुसलमानात सुधा वेल्वेग्ल्या जाती आहेत आणि त्या आपापसात लढत असतात . पण हि लढाई उच्च नीच तेच्या कल्पनेतून उद्भवली असते. अल्ला आणि इस्लाम धर्म ह्यांच्याबाब्तीत मुसाल्मानांच्यात दुमत आढळत नाही . हिंदू मात्र आपल्याच देव धर्माच्या related फुटकळ गोष्टींवरून एकमेकांशी भांडत बसतात . तेव्हा वाईट गोष्टींना हद्दपार करून आपणच आपला धर्म बळकट केला पाहिजे असं वाटत

@ प्रसाद : बौद्ध धर्म भारतातून नामशेष झाला हे खरे पण भारताबाहेर तो पुष्कळ पसरला. या उलट भारताबाहेर थोडाफार पसरलेला हिंदूधर्म मात्र नेपाळ वगळता त्या त्या ठिकाणी नामशेष झाला. @ वल्ली : प्रतिसाद नेहेमीप्रमाणे आवडला आणि सहमत आहे. @राजेश : मूर्तीपूजा, गोमांसनिषेध, जातिव्यवस्था, पुनर्जन्मावर विश्वास ह्या गोष्टी सर्वसाधारणपणे हिंदूधर्मनिदर्शक मानता येतील. पण यातील जातिव्यवथा सोडून अन्य तीन न मानताही मनुष्य हिंदू असू शकतो. जात मात्र जन्मानेच त्याला चिकटते. तो धर्मांतर करू शकतो, जात्यंतर मात्र नाही. कान टोचलेले असणे हे एक बाह्य लक्षण मानता येईल. पण या कृतीचीही सक्ती नाही. @ प्यारे-१ : गीता, वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे हे माहीतही नसलेला एक फार मोठा समाज हिंदू आहे. मग त्यावर श्रद्धा असणे दूरच. 'गुणकर्मविभागशः' हे वचन सुप्रसिद्ध आणि बहुपरिचित आहे. भगवंतांनी गुणकर्मानुसार काही केले असेल, परंतु पुढे त्यांच्या हिंदू अनुयायांनी जाती जन्मसिद्ध केल्या आणि आज हिंदूंमध्ये जातिव्यवस्था दृढमूल आहे.

मूर्तिपूजा संपूर्ण नष्ट करावी असे नाही. तशी ती होणारही नाही. पण आज जे स्तोम माजले आहे ते कमी व्हावे असे वाटते. एकोणिसावे शतक हे भारतीय प्रबोधनाचे शतक होते. या काळात ब्रह्मसमाज, आर्यसमाज, प्रार्थनासमाज, थोड्याफार प्रमाणात सत्यशोधकसमाज यांनी मूर्तिपूजेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. आर्यसमाजाचे मर्यादित यश वगळता बाकीच्यांना अपयशच आले, पण आधुनिक समाजधुरिणांच्या मनात हा विचार घोळत होता आणि आजही आहे; तो केवळ हिंदू धर्मावर हल्ला करायचा या हेतूने नाही, तर हिंदू धर्म हा आचरणास सोपा आणि सुटसुटीत व्हावा यासाठी आहे. ब्रह्मसमाजाने हिंदूंची कर्मकांडे सोपी करणे हे उद्दिष्ट मानले होते. उदाहरणादाखल त्यांनी सत्यनारायणाची पूजा तळागाळात रूढ केली. ( त्या आधीही कदाचित ती होती असेल पण ब्रह्मसमाजाच्या प्रयत्नांमुळे ती बहुजनसमाजाभिमुख झाली. हे लो. टिळकांच्या सार्वजनिक गणपतीसारखेच. ) त्या काळच्या प्रचलित पद्धतीविरुद्ध ही पूजा होती. इथे यज्ञ- यागाची आवश्यकता नव्हती, संस्कृताची नव्हती, सोंवळे-ओवळे नव्हते. कोणीही ही पूजा करू शकत असे. आणि नैवेद्यही अगदी साधा, कोणालाही परवडणारा गव्हाचा शिरा. ही पूजा अल्पावधीतच लोकप्रिय झाली खरी पण विरोध असा की तिचेच आज अवडंबर होऊन बसले आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या रूढी, प्रथा तपासून पहायला हव्यात. दत्तोपासना काही शतकांपासून सुरू झाली. त्या आधी ती नव्हती, किमान सार्वत्रिक नव्हती. मग त्या आधी कोणत्या प्रथा होत्या असतील? काही तरी होते असेलच ना? तात्पर्य, या रूढी, प्रथा बदलत राहतात. नवे नियम येतात. (भारतीय) माणसाची जीवनशैली झपाट्याने बदलते आहे. या बदलाच्या काळात रूढींची नव्याने चिकित्सा व्हावी. भोळ्या-भाबड्या जनतेला 'हे सर्व कशासाठी' हा प्रश्न पडावा, हे प्रयोजन.

In reply to by संजय क्षीरसागर

ते समाजधुरिणांचे प्रयोजन होते. ह्या लेखाचे प्रयोजन शेवटी दिले आहे. हे सर्व का? कशासाठी हा प्रश्न 'भोळ्याभाबड्या' जनतेच्या मनात उभा रहावा या साठी. खरे तर हे सर्व सगुणोपासनेपासून सुरू झाले. सगुणोपासना, मूर्तिपूजा, कर्मकांडे हे विषय एकमेकात गुंतलेले आहेत. त्यातल्या मूर्तिपूजेचा वेगळा विचार व्हावा या हेतूने हा धागा वेगळा करण्याची विनंती संपादकांना केली होती. त्यांनी तसा तो केला या साठी त्यांचे आभार. सगुणोपासनेवर लिहिताना बरेच काही मनात आले. ते एका प्रतिसादात मावण्याजोगे नव्हते म्हणून त्यावर वेगळा धागा काढण्याचे मनात आहे. चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by राही

हे तर मी इथेच उघड विचारलं होतं :
तुम्हाला बहुदा सत्यशोधनात मूर्तीपूजा आवश्यक आहे का? असा प्रश्न आहे.
त्याला तुम्ही प्रतिसाद दिला नाहीत. आणि चर्चा विषय असा मांडल्यानं :
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
चर्चा भरकटली आहे.

मूर्तीपूजा अथवा विभूतीपूजे बद्दल आक्षेपचा प्रत्यक्ष घडलेला एक किस्सा... एका दुस-या धर्माचा हिरीरीने प्रचार करणारा एक माणूस मुद्दा मांडत होता. त्याच्या मते रामाला हिंदू लोक देव मानतात ते फार चूक करतात. (अर्थात किती हिंदू लोक रामाला देव मानतात किंवा किती लोक एक विभूती मानतात हा वेगळा मुद्दा आहे पण त्याच्या मते राम हा हिंदुंचा देव आहे आणि त्याला रामाचे देवत्व खोडून काढायचे होते) त्याचे म्हणणे असे जेव्हा सीताहरण झाले तेव्हा राम फारसा दूर गेला नव्हता जवळपास जंगलातच तर होता. जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा तिने केलेला आक्रोश जर रामाला त्याच वनात ऐकू आला नाही तर तो दूर वर असलेल्या भक्ताच्या प्रार्थना काय ऐकणार? म्हणून रामाची पूजा करणे चूक आहे अन लोकांनी त्याच्या सर्वव्यापी देवाची आराधना करावी. प्रश्न…. जर त्याचा देव सर्वव्यापी आहे, अन तोच मनुष्याचे रक्षण करू शकतो तर मग त्याने का सीतेचे रक्षण केले नाही? मुद्दा हा की मूर्तीपूजा असो वा कुठल्याही वेगळया उपासना पद्धती त्यात फारसा फरक नाही.

सर्वप्रथम: या विषयावर मिपावर झालेली आधीची (किमान एक) चर्चा २०१० सालातली आहे. गेल्या तीन वर्षात हा विषय चच्रीला गेला नसेल हे शक्य वाटत नाही. :) तरी देखील चर्चेत थोडीफार मुद्यांची भर.. देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. हे कुणाचे मर्यादीत निरीक्षण असेल पण मूर्तीपूजा करणाराच हिंदू असू शकतो असे कुठेही म्हणलेले नाही, अर्थात ते लक्षण नाही. तेच जाती-पातीचे आहे. अगदी थोडक्यात बोलायचे झालेच तर "ओन्ली" पेक्षा "ऑल्सो" (सर्वसमावेशक) असणे इतकेच काय ते हिंदू धर्माचे लक्षण आहे.. सुप्रिम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे:
When we think of the Hindu religion, unlike other religions in the world, the Hindu religion does not claim any one prophet; it does not worship any one god; it does not subscribe to any one dogma; it does not believe in any one philosophic concept; it does not follow any one set of religious rites or performances; in fact, it does not appear to satisfy the narrow traditional features of any religion or creed. It may broadly be described as a way of life and nothing more.
अमेरीकन हेरीटेज डिक्शनरीप्रमाणे हिंदू धर्माचा अर्थः
A diverse body of religion, philosophy, and cultural practice native to and predominant in India, characterized by a belief in reincarnation and a supreme being of many forms and natures, by the view that opposing theories are aspects of one eternal truth, and by a desire for liberation from earthly evils.
या दोन्हीकडे मूर्तीपुजेचा अथवा जातीपातीचा विषय देखील काढलेला नाही. वर दिलेल्या दुव्यातील चर्चेत माझेच काही प्रतिसाद मिळाले त्यातील काही भाग... खालील एकात्मता मंत्र त्याचे चांगले वर्णन करतो. (हिंदी विकीपिडीयामधून)(http://hi.wikipedia.org/wiki/एकात्मता_मंत्र) यं वैदिका मंत्रदृशः पुराणाः इन्द्रं यमं मातरिश्वा नमाहुः | वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति || शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरीति स्तुवन्ति | बुद्धस्तथार्हन इति बौद्ध जैनाः सत् श्री अकालेति च सिख्ख सन्तः || शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या | यं प्रार्थयन्ते जगदीशितारम स एक एव प्रभुरद्वितीयः || एकात्मता मंत्र का अर्थ प्राचीन काल के मंत्र दृष्टा ऋषियों ने जिसे इन्द्र (देवताओं के राजा, वर्षा के देवता), यम (काल के देवता), मातरिश्वा (हर जगह विद्यमान) कहकर पुकारा और जिस एक अनिर्वचनीय (जिसका वर्णन नहीं किया जा सके) को वेदांती (वेद, शास्त्र के ज्ञाता) ब्रह्म शब्द से निर्देश करते हैं. शैव जिसकी शिव और वैष्णव जिसकी विष्णु कहकर स्तुति करते हैं. बौद्ध और जैन जिसे बुद्ध और अरहंत (जिसका कोई अंत न हो ) कहते हैं. जिसे सिख संत सत श्री अकाल (कालातीत या समय से परे का सत्य) कहकर पुकारते हैं. जिस विश्व के स्वामी को कोई शास्ता (शास्त्र निर्माता) तो कोई कुमार (अखंड ब्रह्मचारी), कोई जिसको स्वामी, माता - पिता कहकर भक्तिपूर्वक प्रार्थना करते हैं, वह प्रभु एक ही है और अद्वितीय है यानि उसका कोई दूसरा जोड़ या विकल्प नहीं

In reply to by विकास

दर काही वर्षांनी (‍आं.जा. वर तीन-चार वर्षांनी) नवी पिढी तयार होते, जिला अभिव्यक्त व्हायचे असते आणि जुने संदर्भ माहीत नसतात. गांधी, सावरकर, कश्मीर, आरक्षण या विषयांवर अनेकदा पुस्तके लिहिली जातात, चर्चाही होत राहतात. बहुतेक आंजालीय चर्चा वाचलेल्या आहेत. या धाग्याचे निमित्त म्हणजे प्यारे-१ यांचा दत्तजयंतीचा धागा. मूर्तिपूजा ही हिंदू असण्याची अट नाही. किंबहुना तशी कोणतीच अट हिंदू असण्यासाठी नाही. पण निदान नव्वद टक्के लोक मूर्तिपूजा करीत असावेत, (याचा नक्की विदा मजजवळ नाही. हे निव्वळ एक मर्यादित निरीक्षण आहे) म्हणून मूर्तिपूजा हे हिंदूंचे एक लक्षण मानता येईल, अट नव्हे. जर मूर्तिपूजा धर्माने सांगितलेलीच नाही, जर ती आवश्यकच नाही, तर आपण ती का करतो आणि तिचे इतके स्तोम का माजले आहे हा प्रश्न आहे. आपण हिंदूच राहावे यासाठी अर्थातच कोणी काही करीत नाही कारण तशी आवश्यकताच नाही. मग भोळी भाबडी जनता आणि तिचे (माझ्या मते तात्पुरते) समाधान याकडे स्पष्टीकरण वळते. मूर्तिपूजा आणि सगुणोपासना हे एकमेकांशी घट्ट बांधले गेले आहेत. मूळ रोख सगुणोपासनेवरच होता. पण मूर्तिपूजा हे एक दुय्यम आणि मूर्त अंग असल्यामुळे आधी त्यावर चर्चा होऊ दे असे वाटले. सगुणोपासना आणि भोळीभाबडी जनता यावर लिहायचे आहेच. पण ते आणखी एका धाग्यात. धन्यवाद.

In reply to by राही

आहो तेच तर लिहील अशी अपेक्षा होती! एनी वे, एकदा लिहून पाहा, "भोळीभाबडी जनता" काय करते ते.

बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते? आमच्या मते हिंदू म्हणजे ईश्वर अल्ला वेगळे नाहीत असे समजतो .सबब मशीदीत चर्चमधे जायला आम्ही तयार असतो, तसे केले तर आमचे मन आम्हाला खात नाही. आम्ही चर्चमधे गेल्यावर होली वाटर तितक्याचे श्रद्धेने प्राशन मरतो जितक्या श्रद्धेने राउळातील तीर्थ ! असे करण्यात ज्याला शरम व संकोच वा अपराधीपणा वाटतो तो अहिंदू. ( म्हण्जे तो वाईट माणूस आहे असे नव्हे.त्याचा आपला एक नजरिया आहे.)

"देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली." केवळ काही लोकांच्या पोटापाण्याच्या सोयीसाठी मूर्तिपूजा रूढ झाली व त्याच्या आजूबाजूने सगळी थोतांडं उभी केली गेली. आज तो बाजार एवढा मोठा झालाय की त्यातून कुणाचीही सुटका नाही. नसलेल्या देवाला दगडात बसवून स्वतःची पोटे भरणे हाच एकमेव धंदा. मग त्याला "सगुणोपासना", "भक्ती", "श्रध्दा" अशी लेबलं चिकटवली की झालं, आत सगळा धंदाच.

In reply to by दिवटा कारटा

केवळ काही लोकांच्या पोटापाण्याच्या सोयीसाठी मूर्तिपूजा रूढ झाली व त्याच्या आजूबाजूने सगळी थोतांडं उभी केली गेली.
यात आक्षेप फक्त "काही" लोकांना का असावा? मारामारी करून पोट भरणारे सैनिक, इकडचे तिकडे विकून पैसा जमा करणारे व्यापारी हे का वगळावेत? काही लोकांच्या पोटपाण्याच्या सोयिसाठी युद्ध केले जाते असे म्हटले तर?

मूर्तीपूजा हे हिंदू धर्मीय असण्याचे व्यवच्छेदक लक्षण मानण्याचे कारण नाही. मुळात हिंदू धर्मात अनेक तत्वज्ञाने सामावलेली आहेत. आणि त्यापैकी काही थेट नास्तीकातावादीही आहेत. उदाहरणार्थ लोकायत तत्वज्ञान अथवा चार्वाक तत्वज्ञान हे त्यापैकीच. आणि हे विचार हिंदू तावज्ञानाचे भाग होते आणि आहेत. निर्गुण, निराकार ईश्वर ही संकल्पना देखील हिंदू तत्वज्ञानात समाविष्ट होती. मूर्तीपूजेचेच स्तोम माजाण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यातला सोपेपणा आणि बुद्धीपेक्षा भावनेकडे असलेला झुकाव. या एकूणच विषयावर Dr अमर्त्य सेन यांच्या Argumentative Indian या पुस्तकात फार तर्कपूर्ण आणि छान विवेचन आहे. आजच्या काळात मला वाटत केवळ मुर्तीपूजेवर रोख ठेवण्याऐवजी धर्म ही संकल्पनाच कशी अडगळीत टाकता येईल याचा विचार होण्याचीही गरज आहे. उदाहरणार्थ जर मला मूर्तीपूजा पटत नसेल तर मी ती करू नये, त्यामुळे मी हिंदू ठरतो की नाही या प्रश्नाला फारसे महत्व असू नये.

In reply to by SAKHARBHAT

लोकायत अथवा तत्सम तत्त्वज्ञाने हा निश्चितच हिंदूधर्माचा भाग आहे पण त्याचे अनुयायी फार कमी आहेत. बहुसंख्य लोक ज्याचा अनुकार करतात अशी मूर्तिपूजा आणि सगुणोपासना ही दोन अंगे आहेत म्हणून त्याचा विचार केला. मूर्तिपूजा आणि सगुणोपासना आपण मनातून काढून टाकू शकत नाही मग धर्माला अडगळीत टाकण्याचा रॅडिकल विचार तर कित्येक योजने दूरच. रिलिजन आणि स्पिरिचुआलिटी असेही एक द्वंद असते. (हिंदू) धर्माला दूर लोटले तरी त्या (हिंदू) धर्मातली स्पिरिचुआलिटी पाहिजे असेही वाटत असते. वरती म्हटल्याप्रमाणे हे प्रश्न फार जटिल आहेत आणि ते भोळ्या-भाबड्या जनतेचा विचार करून हळूवारपणेच उकलायला हवेत. तत्त्वज्ञांनी, संतांनी बरेच काही सांगून ठेवले आहे पण त्यातले सोयीस्कर तेवढेच उचलायचे ही जनरीत असते.

@ वल्ली आणि बॅट्मन, सहमत आहे. आदिवासीच काय, अनेक आदिम लोकसमूहात मूर्तिपूजा ओबडधोबड स्वरूपात प्रचलित होती. त्यातल्या काहींनी तिचा (वेळीच) त्याग केला तर काहींनी तिचे उन्नयन केले आणि पुढे स्तोम माजवले.

In reply to by राही

पण मूर्तीपूजेमुळेच भारत कलाक्षेत्रात संपन्न झाला. अप्रतिम अशी शिल्पे निर्मिली गेली. ऐहोळे, पट्टदकल, वेरूळ, बेलूर हळेबीडू, कोणार्क, खजुराओ सारखी अप्रतिम मंदिरे बांधली/कोरली गेली. सूर्य, दशावतार, शिव, सप्तमातृका, अष्टदिक्पाल, रामायण, महाभारतातील प्रसंग, सुरसुंदरी, नायिकापट्ट असे अनेक प्रकार कोरले गेले. ह्या सर्व मूर्तींचे विभ्रम वैग्रे पाहणे विलक्षण आनंददायी असते.