Skip to main content

कामगार कट्टा एक अस्वस्थ करणारे वास्तव :

लेखक psajid यांनी मंगळवार, 17/12/2013 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ए.बी.पी. माझा वर एक मन सुन्न करणारी बातमी पाहिली. नांदेड लातूर या ठिकाणच्या कायम विना अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापक दुपारनंतर कुणी हॉटेलमध्ये वेटरचे कुणी शेतीमध्ये रोजगाराचे कुणी रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. ही बातमी पाहून मन हेलावून गेले. भारतामध्ये आज रोजगाराची फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे. आज कौटुंबिक जबाबदारी किंवा परिवाराचे पालनपोषण या साठी लोकांचा परीस्थीतिशी, महागाईशी अविरत असा न संपणारा झगडा सगळीकडे सुरु असल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रामध्येही रोजगाराचे चित्र फार आशादायक नाही हे वरील उदाहरणावरून लक्षात येते. मी काम करतो त्या भारती विद्यापीठामध्ये जाताना (धनकवडी ते कोथरूड ) प्रवासामध्ये मी रोज वारजे जकात नाका च्या पुलाखाली सकाळी अकुशल कामगारांचा (जवळ जवळ ५०० ते १००० कामगार असतील ) मेळा पाहत असतो, त्यांची ती जगण्याची धडपड पहिली कि मनाला वेदना होतात. तिन्ही ऋतूमध्ये ऊन, पाऊस, वारा, थंडी यांची पर्वा न करता हे लोक रोजच्या भाकरीसाठी, मुलांच्या पोटातील भूक भागवण्यासाठी एक दिवसाच्या रोजगाराची प्रतीक्षा करत उभे राहिलेले दिसतात. अश्या लोकांना तात्पुरता रोजगार देणारा ठेकेदार तिथे आला तर हे लोक एकदम त्याच्याकडे धाव घेतात. मग कमिशन (जे २० ते ३० टक्के असते ) ठरवून तो त्यातील जेवढ्या कामगारांची गरज आहे तेवढ्याच लोकांच्या हाताला काम देतो उरलेले बाकी कामगार कुणीतरी काम देईल या आशेवर दिवसभर तिथे आपल्या लेकरांना घेवून बसून राहतात. रोजच सर्व लोकांना काम मिळत नाही. काही लोक हताश उदास आपल्या डोळ्यापुढे भविष्याची चिंता घेऊन उद्याच्या रोजगाराची काळजी करत घरी परततात. लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावरील केविलवाणी निरागसता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील मूक आक्रोश माझ्या मनाला उद्विग्न करून जातो. ईश्वराने बनवलेली आपण सर्व लेकरे एक ए. सी. मध्ये बसून काम करणारे आपण आणि दुसरे उन्हा मध्ये राबणारे त्यांचे कष्टकरी हात परिस्थितीचा किती विरोधाभास ! नामांकित शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या आपल्या पाल्यांना त्यांनी मागताच पिज्झा बर्गर देणारे आपण या काबाडकष्ट करणाऱ्या लोकांच्या मुलांना जे शिक्षणापासून मैलो दूर आहेत त्यांना बालमजूर होण्यापासून रोखू शकतो का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4224
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

विषय चान्गला घेतला आहे. बाकी तुम्ही ज्या मजुर लोकान्विषयी म्हणत आहात, त्यानच्या या परिस्थि ती ला तेच लोक जवाबदार आहेत. कारण , ते त्याना हवे तेवधे पैसॅ मीळ्णार् नसतीळ तर ते नुसते बसुन राह्तील, काम करणार नाहीत. वैयक्तीक अनुभव आहे.

In reply to by आनंदराव

सहमत आहे. काम मिळेपर्यंत फार दीनवाण्याचेहर्‍याने बसलेले असतात. एकदा का काम मिळाले की ते काम करण्याचे मुलभूत कौशल्य त्यांच्या जवळ नसल्याचे आपल्या लक्षात येते. बहुतेक कामगार त्यांचे हे 'अकौशल्य' बदलण्याचा, आवश्यक ते कौशल्य मिळविण्याचा प्रयत्न करीत नाही. व्यसनाधिनतेचे (विडीकाडी, दारू) प्रमाणही अधिक दिसून येते. गरीबांचा कळवळा येऊन, त्यांच्या कौशल्याच्या भूलथापांना बळी पडून अनेकांकडून फसविला गेलो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठी माणूस म्हणून कामगाराला प्राधान्य द्यावे तर गोड बोलून बांबू टाकला गेल्याचाही अनुभव आहे.

कॉलेजमधील प्राध्यापक दुपारनंतर कुणी हॉटेलमध्ये वेटरचे कुणी शेतीमध्ये रोजगाराचे कुणी रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. ही बातमी पाहून मन हेलावून गेले.
यात मन हेलावण्यासारखे काय आहे समजले नाही. त्यांना अधिक पैशाची गरज होती म्हणून त्यांनी अधिक श्रम करायला सुरूवात केली. नुसते बसून सरकार काही करत नाहिये म्हणत रहाण्यापेक्षा ते स्वतः कष्ट घेऊन अधिकची भाकरी कमावताहेत त्यात वाईट वाटण्यासारखे काये?

शेतात काम केलं किंवा रिक्षा चालवली तर वाईट वाटुन घेण्यासारखं काहीच नाही. सरकार काय करते ते माहित नाही पण मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यावर शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा असच होणार ना.. बाकी येथे जमणारे कामगार किंवा कंस्ट्रक्शन साईटवरचे कामगार हे बर्‍याचदा कर्नाटकी/नॉर्थवाले (नॉन-महाराष्ट्रीयन) असतात.त्याची कारणे पण बघावी लागतील. म्हणजे तिकडे त्यांना काम मिळवुन दिल्यास आपणास पुण्यात असा (मानसिक) त्रास होणार नाही.

कॉलेजमधील प्राध्यापक दुपारनंतर कुणी हॉटेलमध्ये वेटरचे कुणी शेतीमध्ये रोजगाराचे कुणी रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. ही बातमी पाहून मन हेलावून गेले.
त्यात एवढ मन हेलाव्ण्यासारख काय आहे? अनेक लोक ह्या पेक्षा जास्त कष्ट करतात . विषय चांगला आहे पण AC मध्ये बसणाऱ्या , पिझ्झा खाणार्या लोकांचा विषय काढायचं कारण समजल नाही . ते गरीब आहेत म्हणून त्यात काय AC मध्ये बसणार्यांचा दोष आहे का? एकदा ह्या कामगार लोकांच्या घरी जावून बघितल तर लक्षात येइल. स्वताल खायला नाही पण घरात मात्र ६ - ७ पोरं . रोज्गारातले निम्मे पैसे दारूवर उडवणार . बचत नहि. भविष्याची काळजी नाही . संस्कार नाहीत .

नामांकित शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या आपल्या पाल्यांना त्यांनी मागताच पिज्झा बर्गर देणारे
पिज्झा बर्गर नाही दिले तर त्या हॉटेल च्या कामगारांचे काय होणार?

अमेरिकेत खोब्रागडे बाईंबरोबर गेलेल्या रिचर्ड बाईना दिवसाला नउ हजार पगार मिळतो. त्यांचे असे काय गुण आहेत हो ? शेवटी नशीबचा भाग आहेच. त्या पण ए सी मध्ये बसून मुले सांभाळतात. असेच आहे. रस्त्यावरील कुत्री उकिरडा हुंगत फिरतात, गाडीखाली येउन मरतात पण मलबार हिल वरील कुत्रं रोज दोन तीन शे रुपयाचं पेडिग्री( कुत्र्याचं खाणं) खातंच कि.मी पण ओडिशा मध्ये जगण्यासाठी मजूर लोक उंदीर खाताना पाहिले आहे. किंवा बिहार मधील शेत मजुराला दोन वेळचे जेवण (लिट्टी चोखा) आणि अठराशे रुपये पगार( वर्षाचा, महिन्याचा नव्हे) घेताना पाहिले आहे. लष्कराच्या भरतीसाठी गेलो असताना लोक तुमच्या पाया पडत असत वैद्यकीय दृष्ट्या नापास केल्यावर पण आपण आपले काम करीत रहावे. आपल्याला वाईट वाटतं ते आपलं मन संवेदनशील आहे म्हणून.असो आपले मन मारू नका जमेल तेवढी समाज सेवा करा पण थोडेसे दुर्लक्ष्यपण करायला शिका.शेवटी आपला रक्तदाब वाढवून आपण आपल्या कुटुंबावर अन्याय करत असता माझ्या मन बन दगड अशी कविता आहे ती वाचा एकदा. कालाय तस्मै नमः.

In reply to by सुबोध खरे

साधारण असंच काहीतरी सांगणार होतो.. पण लगेच "अ-संवेदनशील" अशी शिवी कोणीतरी देईल, अशी भिती वाटते.

भावना पोचल्या . पण जग असेच चलते . :-(

मला एक कळत हे वरील जे काय मी लिहलं ते मला मनापासून ज्या गोष्टीचं वाईट वाटलं ते लिहलं खरंतर इथे (मी.पा.वर) मी बऱ्याच विषयावरील चर्चा, मत - मतांतरे वाचतो एखाद्या विषयावर चर्चा करताना ज्यामध्ये समाज, निसर्ग आणि ईश्वराने ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या आहेत त्या गोष्टीतसुद्धा या लोकांना काही वावगं वाटत नाही असं या चर्चेमधून दिसून येत असतं. आपणच मोठे प्रज्ञावंत, विचारवंत हुशार आणि जगातील सर्व ज्ञान एकवटून आपल्यात ठासून भरलंय या तोऱ्यात वावरणाऱ्या लोकांपुढे मनातील दु:ख उघड करणे म्हणजे भावनेचा बाजार मांडणे आहे असा माझा ठाम विश्वास होत चालला आहे. चालताना पायाखाली येणाऱ्या मुंगीचा जीव वाचवण्यासाठी लांब किंवा छोटी ढेंग (एक पाऊल) टाकणाऱ्या माझ्या स्वभावाचं हसं उडवताना तुम्ही "मग तिचा जीव वाचण्यासाठी आपली गती का रोकायची?" असं कारण देऊन तुमचं मत मांडू शकता हे आता इथे सरावाने मी शिकलो आहे. १) होय माझं मन हेलावून जातं समाजातील अश्या घटना बघून कारण धावपळीच्या आणि आधुनिकतेच्या जगातही मी माझ्या मनाला बोथट नाही बनवलं, कारण संस्काराची संवेदनशीलता मनात अजूनही मी जपली आहे याचा सार्थ अभिमान मला आहे. म्हणूनच प्राध्यापक होण्याचं स्वप्न घेऊन शिक्षकी पेशा पत्करणाऱ्या त्या लोकांना केवळ अधिक पैसे हवेत म्हणून नाही तर पगार देत नाहीत म्हणून जगण्यासाठी रोजगार करावा लागतोय हे पाहून दु:ख झाले. २) हवे तेव्हढे पैसे नसतील तर बसून राहतात हे पाहिलेल्या किंवा त्यांच्या कडून फसवले गेलेले सुद्धा इथे उपस्थित आहेत मात्र ठेकेदाराकडून होत असलेली पिळवणूक पाहिलेलाही मी आहे कारण एम बी ए करताना एक छोटा प्रोजेक्ट अकुशल कामगारांचे कामाचे व्यवस्थापन यावरती केला होता. ३) ए सी मध्ये बसणारांचा दोष आहे असं मला म्हणायचे नव्हते मात्र आपण संवेदनशील लोकांनी अश्या लोकांसाठी सामाजिक काहीतरी करण्यासारखे आहे का? हा प्रश्न यानिमित्त मी उपस्थित केला होता. (गावी माझे डॉक्टर मित्र आहेत त्यांनी आणि आम्ही एकवेळ शेजारील गावातील चौकामध्ये मोकळे box ठेवून लोकांना आवाहन केले कि, त्यांच्या घरातील उपचारानंतर राहिलेली औषधे (tablet syrup इत्यादी) त्यात ठेवावीत त्यानंतर त्यामध्ये ठेवली गेलेली औषधे expiry date पाहून जी चांगली आहेत ती औषधे त्या डॉक्टर मित्रांच्या मदतीने गरीब आणि गरजू लोकांची चिकित्सा करून त्यांना दिली होती. खूपच साधी गोष्ट होती ती.) साऱ्या जगाचा भार वाहतोय या अविर्भावात कट्ट्यावर चकाट्या पिटणाऱ्या सुज्ञांनी या कामी उपाय सुचवावेत अशी अपेक्षा होती. असं म्हणतात कि रोम जळत असताना निरो फिडल वाजवीत होता आपणही आपल्या भोवती हे सर्व पाहतो ते पाहून मन हलू न देण्याइतपत आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत का? (ह्या गरीब लोकांना संस्कार देण्यासाठी, मुलांची संख्या आटोपती ठेवण्याकामी काय प्रबोधन करता येईल हे ही सुचवावे कारण लवकरच मी माझ्या वडिलांच्या नावे एक सामाजिक न्यास स्थापन करतो आहे ज्यायोगे आम्हाला तुमच्या उपाययोजना आखता येतील.) ४) मी प्रदर्शित केलेल्या माझ्या कोणत्याही कथा, कवितेवर किंवा लेखावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेवर माझे मत मांडत नाही किंवा खुलासा करत नाही . मात्र इथे जे दु:ख व्यक्त केले त्यावर आसूड ओढायचाच या धारणेने तुम्ही प्रतिक्रिया दिल्यात म्हणून हा खुलासा ! बाकी तुमचे मन दुखवायचे नव्हते तरीही कुणाला वाईट वाटले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हां मोठ्यांचा आदर करून मी थांबतो. - साजीद पठाण

In reply to by psajid

पठाण साहेब, एक तर हे टोक नाहीतर ते टोक असा आपला आग्रह दिसतो आहे. एक तर माझ्या इतके संवेदनशील व्हा नाहीतर तुम्ही असंवेदनशील, बोथट भावनांचे, रोम जळत असताना फिडल वाजवणारे निरो वगैरे वगैरे वगैरे. मुळात जो खरोखर संवेदनशील असतो तो दुसर्‍यांच्या बिनबुडाच्या आरोपांनी दुखावतो. त्यामुळे तो कधीही दुसर्‍यांना दुखावणारे बिनबुडाचे आरोप करीत नाही. थेट नाही आणि आडून आडूनही नाही. हं जे 'दाखविण्यासाठी' संवेदनशील असतात त्यांच्या लेखनाला कांही धरबंद नसतो. गरजच नसते. असो.
आपणच मोठे प्रज्ञावंत, विचारवंत हुशार आणि जगातील सर्व ज्ञान एकवटून आपल्यात ठासून भरलंय या तोऱ्यात वावरणाऱ्या लोकांपुढे ....
साहेब, तुम्ही मिपावर तुमचे विचार मांडलेत. ते पटले तर तसे, पटले नाही तर तसे, अंशतः पटले तर तसे, संसदिय मार्गाने, प्रतिसाद देणे हा मिपाच्या प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे. तो बजावल्यास एवढा तिळपापड का व्हावा? तुमच्यावर कांही वैयक्तिक चिकलफेक केली आहे का?
होय माझं मन हेलावून जातं समाजातील अश्या घटना बघून कारण धावपळीच्या आणि आधुनिकतेच्या जगातही मी माझ्या मनाला बोथट नाही बनवलं, कारण संस्काराची संवेदनशीलता मनात अजूनही मी जपली आहे याचा सार्थ अभिमान मला आहे.
हातीपायी धड असणार्‍या, कुठलेही कौशल्य शिकण्याची तयारी नसणार्‍या, काम मिळेपर्यंत विड्या पित बसणार्‍या, काम मिळून थोडेफार पैसे हाती पडले तर घरच्या बायकोमुलांची पर्वा न करता दारू ढोसणार्‍या 'गरीबांबद्दल' तुम्हाला संवेदनापूर्ण कळवळा आहे. कधी, त्यांचा कांही दोष नसताना, अपंग जन्माला आलेल्या अभाग्यांसाठी कांही काम केले आहे? जा करून पाहा. जन्मांधांसाठी, जन्मतःच कमरेखाली लुळे असणार्‍यांसाठी, जन्मतःच हात नसणार्‍यांसाठी काम करून पाहा. त्यांना तुमच्या सहानुभूतीची गरज नसते. त्यांना तुमच्याकडून कांही शिकायचं नसतं. पठाण साहेब, त्यांच्या कडून आपणच शिकायचं असतं. बहिणाबाईंची एक कविता आहे.... अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा
तिची उलीशीच चोच तेच दात, तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा बोट....
ह्या पूर्ण कवितेवर आणि विशेषतः शेवटच्या कडव्यावर विचार करा.
म्हणूनच प्राध्यापक होण्याचं स्वप्न घेऊन शिक्षकी पेशा पत्करणाऱ्या त्या लोकांना केवळ अधिक पैसे हवेत म्हणून नाही तर पगार देत नाहीत म्हणून जगण्यासाठी रोजगार करावा लागतोय हे पाहून दु:ख झाले.
मग तुमची विषय मांडणीत चूक झाली आहे. तुमच्या लेखात प्राध्यापकांना पगार मिळत नाहीए ह्याचा उल्लेख नाहिए. वाचकांना अंतर्ज्ञानाने समजेल असे गृहीत धरू नका. आणि असेही प्राध्यापकांना हॉटेलात वेटरचे किंवा शेतीवर मजूराचे काम का करावे लागते? शिक्षण क्षेत्रात 'लातूर पॅटर्न' फेमस आहे. शिकवण्या घेणारे प्राध्यापक पगाराच्या कितीतरी जास्त कमवितात हे पाहिलेले आहे. नांदेड लातूरात विद्यार्थी मिळत नसतील तर हे प्राध्यापक स्थलांतर का करीत नाहीत. पुणे, मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरात स्थलांतर करून शिकवण्या करून मुख्यतः स्वार्थ आणि किंचित पर्मार्थही साधता येईल. पुण्यात वातानुकुलीत शिकवणी वर्ग प्रत्येक कोपर्‍यावर दिसतात. शिकवण्या करणारा प्राध्यापक वर्ग घरात २-२ गाड्या बाळगून आहेत. स्वतःच्या मुलाला 'लाँच' करण्यासाठी चित्रपट निर्मितीही करतात.
हवे तेव्हढे पैसे नसतील तर बसून राहतात हे पाहिलेल्या किंवा त्यांच्या कडून फसवले गेलेले सुद्धा इथे उपस्थित आहेत मात्र ठेकेदाराकडून होत असलेली पिळवणूक पाहिलेलाही मी आहे कारण एम बी ए करताना एक छोटा प्रोजेक्ट अकुशल कामगारांचे कामाचे व्यवस्थापन यावरती केला होता.
तुम्ही एम बी ए केले आहे, उत्तम आहे. त्या दरम्यान अकुशल कामगारांचे व्यवस्थापन यावर प्रोजेक्ट केला आहे, ह्याचेही कौतुक आहे. पण, म्हणून ज्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात कांही वेगळा अनुभव घेतला असेल तर त्याची किंमत कमी ठरते का? एम बी ए केले म्हणून अशा वेगळ्या अनुभवांना कमी लेखण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त होतो का? पठाण साहेब, तुमच्या प्रोजे़क्ट दरम्यान तुम्ही काय पाहिलंत, काय निष्कर्ष काढलेत ह्यावर एक वेगळा धागा काढून सर्व मिपासदस्यांना उपकृत करावे ही विनंती. (ही गंभीर विनंती आहे, चेष्टा करत नाहीए.)
(गावी माझे डॉक्टर मित्र आहेत त्यांनी आणि आम्ही एकवेळ शेजारील गावातील चौकामध्ये मोकळे box ठेवून लोकांना आवाहन केले कि, त्यांच्या घरातील उपचारानंतर राहिलेली औषधे (tablet syrup इत्यादी) त्यात ठेवावीत त्यानंतर त्यामध्ये ठेवली गेलेली औषधे expiry date पाहून जी चांगली आहेत ती औषधे त्या डॉक्टर मित्रांच्या मदतीने गरीब आणि गरजू लोकांची चिकित्सा करून त्यांना दिली होती. खूपच साधी गोष्ट होती ती.)
पठाण साहेब, मिपावरचे बरेच सदस्य गवगवा न करता बरेच समाजकार्य करीत असतात. असे संवेदनशील आपण एकटेच आहात ह्या भ्रमात कृपया राहू नका.
साऱ्या जगाचा भार वाहतोय या अविर्भावात कट्ट्यावर चकाट्या पिटणाऱ्या सुज्ञांनी....
ही इतरांना तुच्छ लेखणारी विशेषणं वापरणं सोडून समानतेच्या पातळीवर येऊन लिहा.
मी प्रदर्शित केलेल्या माझ्या कोणत्याही कथा, कवितेवर किंवा लेखावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेवर माझे मत मांडत नाही किंवा खुलासा करत नाही .
मर्जी तुमची.
इथे जे दु:ख व्यक्त केले त्यावर आसूड ओढायचाच या धारणेने तुम्ही प्रतिक्रिया दिल्यात म्हणून हा खुलासा !
मिपा सदस्यांनी आपापले अनुभव मांडले आहेत. तुमच्या मनाविरुद्ध ते गेले म्हणून तुम्ही त्याला आसूड समजता आहात.

पठाण साहेब … अगदी मुंगीच काय पण झाडाचं पण सुधा तोडताना दुख होत मला . गरिबांवर प्रेम करावं . गरीबीवर नाही . एवढाच म्हणायचं होतं . तुम्हाला ह्या लोकांसाठी काही करायचं असेल तर जरूर करा . आणि बघा काय अनुभव येतात ते .

याच विषयावर स्वतंत्र लेख लिहीत होतो ...पण काही ( म्हणजे कै च्या कै) प्रतिसाद वाचुन साजिदभाई वाटतय की द्यावा पेन्डींग मध्ये टाकुन .. मिपावर सवेंदनशील लिखाण करणे (कोणे एकेकाळी) बंद केलेला.

In reply to by सुहास..

संवेदनशील लेखन करणे म्हणजे गुन्हा नाही. अशा लेखांचं, कवितांचंही स्वागत होतं. फक्त विचार मांडताना समतोल ढळू देऊ नये. कांही उथळ आणि विपरीत प्रतिसादही येऊ शकतात. जिथे शक्य असेल तिथे प्रतिवाद करावा पण कोणी विनाकारण खील्ली उडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर सरळ दूर्लक्ष करावे.