चारोळ्या - २
चारोळ्या - १
या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.
११
कुठल्याही नात्याची खोली
प्रसंग आल्यावरच कळते
नेहमीची पायाखालची वाटही
कधी आडवाटेला वळते
१२
अस्वस्थता ही मनाची मी
सांगू कशी अन् कुणाला
असून गजबज भोवताली
आतून मात्र मी एकला
१३
नसतं आपल्या हातात काही
फक्त नियतीचे इशारे पाळणं
मार्ग आपला आधीच आखलेला
आपण फक्त त्यावरून चालणं
१४
इथे प्रत्येकाच्या संधिसाधूपणाला
तसा आपुलकीचा मूलामा असतो
गरजांतून जन्मतात काही नाती
त्यात भावनेचा ओलावा नसतो
१५
उगवत्याला नमस्कार करणं
हा तर जगाचा नियम आहे
मावळत्याला अर्घ्य देणं मात्र
तसं थोडं त्रासाचं काम आहे
१६
शब्द तसे भारावलेले
पाठी स्वार्थ दडलेला
गाढवांचीच मीजास इथे
हरी बिचारा अडलेला
१७
अनपेक्षित होतं तसं मित्रा
तुझं अस तरहेवाईक वागणं
जे कधीच देता येणार नाही
ते दान तू माझ्याकडे मागणं
१८
मी हाक मारली होती
तुला येता आलं नाही
दान तुझ्या पदरात टाकलं
तुला ते घेता आलं नाही
१९
खूप काही हवं आहे पण
काहीच लागत नाही हाताला
गजबजलेल्या या दुनियेत
मी शोधत बसतो स्वता:ला
२०
मी आकाशी झेप घेतली तेव्हा
तुझे डोळे पाण्याने भरून आले
नतमस्तक झालो तुझ्यासमोर
अन् पंखात माझ्या बळ आले
२१
चढलो नाही मी कधीही
पायरी तुझ्या मंदिराची
गरजच नाही तशी त्याची
तू तर सर्वव्यापी सर्वसाक्षी
२२
तप्त झाला आहे आसमंत सारा आज
थोडी प्रेमाची बरसात इथेही होऊ दे
तसं नसतं कुणीच कुणाचं इथे तरीही
जिव्हाळ्याची रुजूवात इथेही होऊ दे
२३
सावळं घनश्याम रूप तुझं मी
काळ्याभोर मेघांतून पाहिलं होतं
आकाशीचं अमृत तेव्हा जणू
त्या जलधारांतून वाहिलं होतं
२४
मान वर करताच जाणवलं मला
पर्वत शिखर नभात हरवून गेलेले
न्याहाळून पाहिलं एकटक जेव्हा मी
कळलं, मेघ त्याना भेटावयास आलेले
२५
कसं जगावं आयुष्य हे कधी
तुम्हीच मला शिकवलं होतं
त्याच शीदोरिच्या जोरावर
मी अश्रूना नेहमी थोपवलं होतं
२६
मी कधीच म्हटलं नाही तुला की
मित्रा मला तुझी पूर्ण साथ हवी
समर्थ आहे तुफान झेलण्यास मी
फक्त एक विश्वासाची सांज वात हवी
२७
श्रावणाच्या या संतत जलधारांतून
मी तुझं निरागस रूप पाहिलं होतं
पाणी फक्त मेघांतुनच नव्हे तर
माझ्या डोळ्यांतूनही वाहिलं होतं
२८
जेव्हा हरवून जातात दिशा सार्या
प्रत्येक लाट आयुष्याला हादरा देते
बावरल्या मनाने किनारा शोधताना
तुझी मला खूप आठवण येते
२९
उगवला नाही जरी सूर्य इथे
तरीही गीत उजेडाचे गाईन मी
नसो कुणी सोबतीस् माझ्या
तरीही साथ सत्याची देईन मी
३०
तुझ्याच शोधात जिवलगा
एकटा अथक चालतो मी
जीव शब्दांत ओतून माझ्या
साद तुला मित्रा घालतो मी
३१
एव्हढ्याशा ओंजळीत माझ्या
तुझं विशाल आभाळ मावू दे
पाठीवरचा हात तुझा, मित्रा
क्षण दोन क्षण असाच राहू दे
३२
डोळे पाण्याने भरून येतात अन
वेडे मनही मग ओलावून जाते
पापण्यांत तरारते तुझी मूर्ती
जेव्हा मला तुझी आठवण येते
अरे मस्तच लिहीले आहे....
आवडल्या. १६ १८ १९ २० विशेष!
२८ सगळ्यात जास्त आवडली आणि १६
२१, २८ आणि ३१.
जब्रराट
छान
सूरेख चारोळ्या
खूप सुंदर रे.
खुप सुंदर आहेत चारोळ्या
सुरेख!
जिओ दोस जिओ.
वा वा वा ढन्याकाका ! ऑणसाईट
अन्याय आहे हा या कवितांवर.
धनाजीराव झींदाबाद!
लैच भारी.. एक लंबर.. आवडेश..
_/\__/\__/\_ ग्रेट.
नसतं आपल्या हातात काही