Skip to main content

शिळी जिलेबी - १

लेखक धन्या यांनी सोमवार, 07/10/2013 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणीव, मोहरून जायला ६ चांगलं वाईट तसं काहीच नसतं हा सारा खेळ आपल्या मनाचा दुखात हसत असे कुणी येथे अन् कुणी सुखात आसरा घेई वनाचा ७ आपला परका आभास सारे इथे कुणीच कुणाचं नसतं प्रत्येक क्षण सापेक्ष इथला तरीही मन जाळ्यात फसतं ८ भावनेचा ओलावा शोधताना मी मलाच हरवून गेलो शिकलो मात्र बरंच काही अन् वृत्तीने नीर्विकार झालो ९ जाणिवेनेनीवेच्या पलीकडे एक अस्वस्थ जग असतं साथ आपलीच आपल्याला तिथेही कुणी आपलं नसतं १० विसरायचं आता सारं अस मी पुन्हा पुन्हा ठरवतो क्षण दोन क्षण जातात अन् मी पुन्हा स्वत:ला हरवतो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6481
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

विसरायचं आता सारं अस मी पुन्हा पुन्हा ठरवतो क्षण दोन क्षण जातात अन् मी पुन्हा स्वत:ला हरवतो

झक्कास्स्स्स्स्स... भावनेचा ओलावा शोधताना मी मलाच हरवून गेलो शिकलो मात्र बरंच काही अन् वृत्तीने नीर्विकार झालो क्या बात है...

अभिव्यक्ती ताजी असताना शिळे म्हणणे अन जिलेबीसारख्या मिपा-बदनाम नावाने याची संभावना करणे हे काही झेपले नै धनाजीराव. बाकी, कविता आवडली हेवेसांनल.

मिपाला अजुन एक कवि लाभला.. आनंद वाटला

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मिपाला अजुन एक कवि लाभला..
नाही. घाबरुन जायचे कारण नाही. :) माझ्याच ब्लॉगवरील मार्च २००८ च्या म्हणजे साधारण साडे पाच वर्षांपूर्वीच्या पोस्ट आहेत या. सहज ब्लॉग चाळताना जाणवलं की आज मी जे लिहितो त्यापेक्षा हे कितीतरी वेगळं आहे. ओळी-ओळीत माझं तेव्हाचं "हरवलेपण" दिसतं. म्हटलं टाकावं मिपावर.

In reply to by धन्या

अहो खरचं मनापासून लिहीले मी ते... तिमा म्हणतात तेच खरं
मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अहो काय हे?? सखू सारखं अजरामर काव्य फार पूर्वीच मिपावर लिहिणार्‍या कवीची संभावना तुम्ही 'मिपाला अजुन एक कवि लाभला' अशी करता... धनाजीरावांच्या कोमल कवीमनाला किती यातना होतील बघा अशानं.

अहो, या शिळ्या जिलब्या नाहीयेत. २००८ सालच्या चांगल्या कविता आमच्यापासून लपवून ठेवल्या याचा निषेध! मिपाला अजुन एक कवि लाभला.. @मिका: मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात.

पण आपले (खोल [विचारांचे]) लेखन वाचुन... सगळकाही असुनही नसल्या प्रमाणे... पाण्यात राहुन कोरडा... धरलं तर चावतय सोडल तर पळतय... जाणवतय पण गवसत नाही... वगैरे वगैरे मानसिकतेमधे सापडलेल्या व्यक्तिचे चित्र समोर येते. काही टोचतय काय ?

In reply to by अग्निकोल्हा

तुम्ही म्हणताय ते खरं आहे. सुदैवाने बर्‍याच उशीरा का होईना पण नेमकं काय "मिसींग" आहे ते कळलंय. :)

सुंदर कविता रे धन्या! मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे. जिलेबी हा अत्यंत 'वेगळा' पदार्थ आहे. ह्या वरच्या कविता नि श्चितच जिलेबी नाहीत. शिळ्या तर मुळीच नाहीत. कवितेत व्यक्त झालेल्या भावना ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. रिले स्पर्धे मध्ये धावताना एकाकडून दुसरीकडे दिल्या जाणार्‍या बॅटनसारख्या इकडून तिकडे दिल्या घेतल्या जाणार्‍या ह्या सातत्यानं जिवंत राहणार्‍या अशा भावना आहेत. (वैधानिक इशारा : स्वतःकडे जास्त काळ ठेवू नयेत. त्रास होतो.) वर मातब्बरांनी आपले अभिप्राय दिलेले आहे तच. तद्वत कवीवर्य धनाजीरावांनी आपली वाटचाल करावी. -उत्तम गोष्टींचा नेहमीच चाहता प्यारे

In reply to by प्यारे१

सुंदर कविता... मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे. +१

जाणिवेनेणीवेच्या पलीकडे एक अस्वस्थ जग असतं साथ आपलीच आपल्याला तिथेही कुणी आपलं नसतं प्लस ११११.......

कविता छान रे. आता आपले परवा पाबे घाटातून जातांना ज्यावर बोलणे झाले होते त्यावर लिही रे जरा. :)

विसरायचं आता सारं अस मी पुन्हा पुन्हा ठरवतो क्षण दोन क्षण जातात अन् मी पुन्हा स्वत:ला हरवतो फारच छान. :)

दोन -तीनदा अगदी वर आलेला धागा शीर्षक वाचून टाळत होते उघडायचा :-) पण धागा उघडला ते छान झालं. चारोळ्या आवडल्या.

वाटले शिळ्या जिलब्या कशाला खायच्या, पण फारच मस्त जमल्यात.....

धनाजी राव इतक्या सुंदर चारोळ्यांना शिळ्या जिलब्या का बरे म्हणालात? शिर्षक पाहुन मी बर्‍याच वेळा टाळला होता धागा. आता सुध्दा काहितरी पानचट पणा वाचायच्या अपेक्षेने धागा उघडला आणि सुखद धक्का बसला. हे म्हणजे टॉयलेट पेपर मधे मोगर्‍याचा गजरा बांधुन दिल्या सारखे वाटले.