वयम् मोठम् खोटम्!
माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही. चुकूनमाकून मिळालेच, तर ते योग्य वेळी मिळाले नाही असे आपल्याला वाटते.
माणसाच्या वयाचे पण असेच आहे. आपले सध्याचे वय कधी कधी आवडत नाही. आपण सध्याच्या वयाच्या आगेमागे घोटाळतो. चिमुरडी सोनीया गाजराचा माईक हातात धरून पॉप सिंगरच्या थाटात गाणे म्हणते. बालवाडीत जाणारा कुणाल शाळेतल्या भावाचे दप्तर खांद्यावर लटकवून माझी परीक्षा आहे म्हणत तरातरा निघतो. प्रायमरीतली निशा आत्याच्या मेक़अप बॉक्समधले लांबवलेले सामान वापरून जुही चावला होण्याची स्वप्ने पहाते. नोकरीच्या कटाकटींना वैतागून कुलकर्णी केव्हा रिटायर होऊन आरामात दिवस घालवीन म्हणत असतो. निवृत्त झालेले आजोबा आमच्या वेळी हे असे होते तसे होते या आठवणींचे उसासे सोडत असतात.
लहानपणी तुम्ही काळ्या शाईने ओठांवर मिशा रंगवून, वडीलांचे ढगळ होणारे कपडे घालून आपल्यापेक्षा जड असलेली बॅग ओढीत ऑफ़ीसला जाण्याचे नाटक केलेले नसेल, तर तुम्ही लहानपणातील एका आनंदाला मुकलात. ते जरी केलेले नसले, तरी लहान भावाने तुमचे ऐकले नाही म्हणून, वडीलांचा आव आणुन त्याची काऩउघाडणी केली असेल. कुठे एखादी पमी, आजीचा चष्मा चढवून ज्ञानेश्वरी वाचून पहात असेल. लहानपणी आपण सारेच, मी मोठा कधी होणार ह्या ध्यासाने पछाडलेले असतो. पु.लं.नी लहानांची ही धडपड, "वयं मोठं खोटं" मधे त्यांच्या मिष्कील शैलीत अचूक टिपली आहे.
लहानपण हे असे असते. मोठ्यांच्या बुटांत पाय घालण्याची धडपड करता करता ते वय भुरकन उडून गेले, ही बोंच बुट चावायला लागतात तेव्हाच कळते. वर्षावर्षांच्या उन्हात कुणाचे केस पिकतात, तर कुणाचे काळाच्या वादळवाऱ्यात वाहून जातात. मधुमेह जीवनातला नाही, तरी जेवणातला मधू पळवून नेतो. पडलेले दात वाणीतला गोडवा लपवितात. अशा वेळी तुकारामांची "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" ही उक्ती दुसऱ्या अर्थाने आठवते. आपले वय आपल्याला वाकुल्या दाखवायला लागते. "वो कागजकी कश्ती, वो बारीशका पानी गहीवर आणतात. लहानपणी मोठे होण्याची उतावीळता. मोठे झाल्यावर लहानपण आठवून उसासे. एकूण काय, सध्याचे वय आपणाला आवडतच नाही.
फ़क्त आपल्याच नाही, पण इतरांकडूनही वयानुसार आपल्या ठराविक अपेक्षा असतात. त्या अपेक्षांना कुणी खरे उतरत नाही असे दिसले, तर आपण कासाविस होतो. एखादे म्हातारबुवा बर्फ़ाचा गोळा खातांना दिसले, तर आपल्यालाच खोकला येतो. केसांचा फ़ुगा पाडलेला तरूण युवक किर्तनाला आलेला दिसला, तर "पोरींवर लाईन मारयला आला असेल" हीच प्रतीक्रिया संभवते. कोणत्या वयात काय करावे, काय करू नये, ह्याचे सगळे आराखडे ठरलेले असतात. काही क्षेत्रे फ़क्त तरुणांचीच मक्तेदारी चालू देतात.
मागे एकदा आम्ही ऑफ़ीसचे सहकारी दुपारच्या जेवणाला निघालो होतो. साहजीकच चर्चेचा ओघ त्यावेळी झालेल्या क्रिकेटच्या मॅचकडे वळला. ती टीम कां हरली ह्याचे सहज उत्तर तीशीतल्या नरेन्द्रकडे होते. "त्यांचा प्लेअर लाईऩअप बघा. कीतीतरी खेळाडू पस्तीशी ओलांडलेले आहेत. How can anyone expect them to perform?"
पन्नाशी ओलांडलेल्या मला ते वाक्य खुपले. वयाविषयी आपले कीती पूर्वग्रह असतात! ज्यांना दोनच वर्षांपुर्वी डोक्यावर चढवले होते, तेच स्टार प्लेअर्स पस्तीस वर्षाचे होताच मोडीत काढले जातात! अशा जगात आपला काय पाड लागणार? आपण नां स्टार नां प्लेअर. पस्तीशी तर केव्हाच इतीहासजमा झालेली. सुन्नपणे नरेन्द्रची मल्लीनाथी ऐकतांना मला एका विचाराने मात्र दिलासा दिला. "नरेन्द्र बेटा. आज तू खैर मानून घे. पण दिवसांगणीक तू देखील तेथेच पोहोचत आहेस! शुअरली, उद्या एखादा तरुण तुझ्याविषयी असेच बोलेल!" ही छोटी गोष्ट एक खुणगाठ बांधून जाते. इतरांचे वाढते वय दिसते, पण तिथेच नेणाऱ्या आपल्या वयाच्या पाउलखुणा आपल्याला दिसतच नाही.
पाउलखुणा कदाचित नजरेआड केल्या जात असतील. पण वाढत्या वयाचा सुप्त आकस मनांत खोल कुठेतरी जाणवत असावा. तीशीतली दोन पोरांची आई असलेली ओळखीतली बाई, जेव्हा तुम्हाला सर्वांसमोर काका म्हणून बोलावते, तेव्हा तिला काय सांगायचे असते? तुम्ही माझे (वयस्कर) काका, म्हणजे मी आपोआपच तरूण, असे ते व्यस्त गणीत असते. स्वत:चे तारुण्य आणि म्हणजेच स्वत:चा ताजेतवानेपणा जाहीर करायची ती एक धडपड असेल कां? ती धडपड करतांना समोरच्या काकाचा आपण पार मामा करून टाकत आहे ह्याचे सोयरसुतक तिला नसते. असे पाहीले की मला अमेरिकन संस्कृतीचे कौतुक वाटते. तीन वर्षाची चिमुरडी देखील शेजाऱ्याला सरळ "हाय फ़ीलीप" पुकारते. उगाच कामापुरता मामा नाही. त्या लोकांची स्वतंत्र व्यक्तीमत्वे अशीच लहानपणापासून फ़ुलवल्या जातात. आता फ़्लीप साईड म्हणून कोणी असे म्हणेल की त्यांना वडील मंडळींचा आदर वगैरे नसतो. पण आदर काय नांवाने हाक मारली की नाहीसा होतो? की काका म्हटल्यावर मिळतो? समोरच्या व्यक्तीविषयी मनांत जशी भावना असेल त्याप्रमाणे आदर, अनादरही शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होतोच. समोरच्या माणसाला त्याच्या नावाने सन्मानपूर्वक संबोधायचे, त्याचे नांव घेऊन उद्धार करायचा, कां "पिकले पान’ म्हणून गळण्याआधीच जळण्याची आशा धरायची हे तुम्हीच ठरवायचे. तुमच्या वागण्यातून तुमचे व्यक्तीमत्व जगाला दिसेलच.
मला सकाळी धावायला जाण्याचा छंद आहे. गेली वीस वर्षे मी रोज न चुकता चार किलोमिटर धावायचा नियमच केला आहे. आजकाल जॉगींगचा विषय कुठे निघाला की मला चूप बसणेच आवडते. आपल्या जॉगींगचा उल्लेख केला तर कोणितरी म्हणतोच "कमाल आहे बुवा तुमची. ह्या वयांत देखील कसे काय जमते हे तुम्हाला?" अशी वाक्ये धावण्याच्या कौतुकापेक्षा, "ह्या वयाचा" सल घेऊनच येतात.
मधमवयीन आयष्यात असे अनेक सल सतावित असतात. धड इकडे नाही, धड तिकडे नाही असा हा धेडगुजरी काळ असतो. नवीन युग प्रचंड वेगवान झाले आहे. आजचे तंत्रज्ञान उद्या कबाडखान्यात फ़ेकल्या जाते. परवाच एका पस्तीस वर्षाच्या युवकाला बोलतांना ऐकले की चार पाच वर्षे अनुभव असलेल्या यंग स्मार्ट कॅंडीडेटसच्या बरोबर नवीन नोकरीसाठी स्पर्धा करणे खूप कठीण झाले आहे.
आजच्या युगातील चंट, अती वेगवान आणि आक्रमक तरूणांच्या झंझावाती कार्यप्रणालीत, "थांबा, थंड डोक्याने विचार करा" वगैरे धोरणी संथपणाला वाव नसतो. त्य़ांच्या लेखी मधमवयीन म्हणजे "बसून अडचण आणि असून खोळंबा" अशी ब्याद असते. मला वाटते, वयोगटांमधे सर्वांत गोंधळलेले अशे दोन गट असतात. टीनएजर्स आणि मधमवयीन. एका विचीत्र आयडेंटीटी क्रायसीस मधे सापडलेली ही मंडळी असतात. टीनएजर्सला कोणी समजावून घेत नाहीत. मधमवयीन सतत इतरांना समजावण्याचा निष्फ़ल प्रयत्न करत असतात. ह्या वयातील जोडीचा, म्हणजे बापलेकांचा संवाद, किंबहुना संवादाचा अभाव ऐकण्यासारखा असतो.
जीवनातील सारे खाचखळगे, उंबरठे ओलांडून शेवटी आपण वृद्धकाळाच्या शांतवनांत पोहचतो. जे मिळवायचे ते सारे मिळवून झालेले असते. जे गमवायचे ते गमावलेले असते. आता कोणाकडून काही अपेक्षा नसतात. आपल्याकडूनही कोणी काही अपेक्षा करू नये येवढीच एक रास्त अपेक्षा उरलेली असते. मुलाबाळांचे, नातवंडांचे कौतुक करत, त्यांच्या जीवनातला आनंद उपभोगत शांतपणे उरलेली वाटचाल करायची असते. पण हे सूख, कीती लोकांच्या वाट्यास येते? कुठे तरी काही तरी खटकत राहते. मुलांचा आनंद आपलासा मानता मानता नकळत एखादी अदृष्य सीमा पार करून आपण त्यांच्या आयुष्यावर अतिक्रमण करतो. आपल्याला ते त्या क्षणि उमगतही नसेल. लहानपणी मोठ्यांच्या बुटांत पाय घालून स्वत: चालून पाहीले होते. आता लहानांच्या बुटांत पाय घालून त्यांना चालविण्याची घोडचूक करतो आणि तोंडघशी पडतो.
म्हातारपणी शरीर थकायचे हा तर निसर्गनियमच आहे. देवाने निर्माण केलेल्या शरीर नामक अद्भुत बायोमशीनचे एक एक पुर्जे नाकाम बनु लागतात. मुलाबाळांचे बंध कदाचित आधीच सुटले असतील. आता उरलेले सारेच पाश सुटू लागतात. आतापर्यंत जे खरोखर अगदी आपले स्वत:चे वाटत होते, ते शरीर देखील साथ सोडू लागते. असे झाले की पुन्हा एकदा आपण आपल्या वयालाच दोष देतो.
वयाचे हे असेच आहे. वयम् मोठम् खोटम्! पण वयातील खोट काढत बसणेही खरे नाही. सत्य फ़क्त सध्याचे वय असते, आधीचे धुके , नंतरचे स्वप्न! असा विचार करा, सध्याचे वयही क्षणाक्षणाला धुक्यात जमा होते आणि दर क्षणाला समोरची स्वप्ने साकार होत रहातात. वयाची गंमत ह्यातच आहे.
वाचने
5033
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
अंतर्मुख
वयम मोथम खोतम
स्वीकृती..
ह्म्म..
चांगला लेख
In reply to चांगला लेख by प्रकाश घाटपांडे
हे बेस्टच!
का? का?
In reply to का? का? by प्रमोद देव
एकमेव?
In reply to एकमेव? by प्रभाकर पेठकर
हाहाहा!
In reply to हाहाहा! by प्रमोद देव
धन्यवाद काका !!!
In reply to एकमेव? by प्रभाकर पेठकर
काका,
खरे
सुरेख लेख
खरंच छान आहे लेख.
लेख आवडला.
छान लेख
समवयस्क
धन्यवाद
लेख सुंदर