✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 03/28/2013 - 12:37  ·  लेख
लेख
हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता. एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले. मी आदेशाप्रमाणे तो अहवाल घेऊन आलो त्यात शुक्राणू नाहीत असा निर्वाळा होता. अर्थात याची पार्श्वभूमी मला माहित होती. ती अशी वरील अधिकारी हा आपली नसबंदी ३ महिन्यांपूर्वी करून गेला होता. परंतु त्याची पत्नी गरोदर आहे असा तिचा मुत्र तपासणी अहवाल सांगत होता.नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात. आपले जाट भाई सैनिक अशी कोणतीही काळजी घेत नसत आणि बायका गरोदर झाल्या तर त्यांना मारहाण करून 'साफ सफाई" करण्यासाठी येत असत.पण हा सुशिक्षित अधिकारी होता आणि त्या अधिकार्याने अशी सर्व काळजी घेतली होती पण तरीही त्याची पत्नी गर्भार आहे हे पाहून तो तिला रुग्णालयात घेऊन आला होता. आता हा अहवाल पाहून मुखर्जी सर( विभागप्रमुख) पण जरा चक्रावलेच. त्यांनी त्या स्त्रीला भेट देण्याच्या अगोदर स्त्रीरोग विभागातील आम्हा सर्व डॉक्टरना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले कि मी आता जे करणार आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तुम्ही ते करावे कि नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही पण मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे करीत आहे.त्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी कदाचित चुकीचे काम करणार आहे.पण मी हे पूर्ण सदभावमूलक मनोवृत्तीने (BONAFIDE INTENTION) करीत आहे तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही तुम्हाला पटेल तसे करा. यानंतर आम्ही अधिकार्यांच्या कौटुंबिक वार्ड राउंड ला गेलो तेंव्हा त्या स्त्री च्या कक्षात जाऊन तिला असे सांगितले कि "बेटी तू जे काही करते आहेस ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तू ते करावेस कि नाही हे सांगण्याचा माझा अधिकार नाही पण वयाच्या अनुभवाने मला असे वाटते कि तू जे करीत आहेस ते बरोबर नाही. आता तुझ्या यजमानांचा अहवाल शुक्राणू नाहीत असे दाखवीत आहे त्यावर काय करायचे आहे. ती काहीच बोलली नाही.त्यांनी असे सुचवले कि आत्ता तर गर्भपात करणे आवश्यक आहे.तो आपण करू त्याबरोबर तुझे गर्भनलिका बंद करण्याची शस्त्रक्रिया पण करू आणि या स्थितीत तू म्हणत असशील तर मी तुझ्या यजमानांना काहीच सांगत नाही.तुझे कौटुंबिक जीवन सुरळीत होण्याचा मला हा एकच उपाय दिसतो आहे यावर तिने होकार दिला. यावर तिच्या नवऱ्याला असे कधी कधी होते त्याला सांगितले कि नसबंदी ची शस्त्रक्रिया कधीकधी फेल जाते(नीट होत नाही)आणि म्हणून एकाच बेशुद्धीकरणात आपण गर्भपात आणि नलीकाबंदी ची शस्त्रक्रिया करून टाकू. हे सांगून तिचा गर्भपात आणि गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केली. आजही हि गोष्ट मला वारंवार आठवते कारण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करताना एखादा रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात (stage) असलेला आढळतो. कर्करोगाच्या विभागात काम करीत असताना घेतलेल्या अनुभवातून माहित असते कि या रुग्णाचा रोग शस्त्रक्रियेच्या पलीकडे गेला आहे आणि याचे काही दिवस किंवा महिने शिल्लक आहेत. अशा रुग्णाला अहवाल सांगण्याची पाळी येते तेंव्हा मी अनेकदा असे सांगितले आहे कि तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही औषधाने उपाय होऊ शकतो.(हे करताना मी अनेकदा तोंड फिरवून डोळे पुसले आहेत) शब्द हे फसवे असतात, हे बोलणे खोटे आहे हे मला पूर्ण माहित असते पण दुसरे काय करता येईल हे मला अजून तरी समजलेले नाही. रुग्णाला सत्य सांगितले कि आपले शेवटचे काही दिवस बाकी आहेत तर त्याला धक्का बसतो त्याचे शेवटचे दिवस कष्टात जातात.(अज्ञानात आनंद असतो).कर्करोगाच्या विभागात असे शेवटच्या टप्प्यातील अनेक रुग्णांनी मला विचारलेले आहे कि साहेब आम्ही या रुग्णालयातून घरी जाऊ शकू का? मी उत्साहात त्यांना नक्कीच म्हणून उत्तर हि दिले आहे.त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मला हात वर करून धन्यवाद दिले आहेत. पण पहिल्यांदा जेंव्हा हा प्रश्न आला तेंव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि आपण रोज या रुग्णालयात यतो पण आपण येथून कधीच जिवंत बाहेर पडणार नाही हा विचार किती भयानक आहे माणूस म्हणून आपण किती तोकडे आहोत हि जाणीव वारंवार टोचत राहते. माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. मी त्याला म्हटले कि मी सांगत नाही पण त्यांना ते समजून चुकेल.कालपर्यंत ते काही बोलत असताना तुम्ही पूर्ण लक्ष देत होतात असे नाही पण आज नंतर तू किंवा तुझी बहिण त्यांनी पाणी मागितले तर धावून धावून कराल.हे न कळण्या इतके ते मूढ नाहीत. हि मानवी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किमत कळते जेंव्हा ती आपल्याकडे नसते किंवा ती नाहीशी/ गहाळ झाली. सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात (सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका )
  • सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २
  • सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे

Book traversal links for सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

  • सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
52876 वाचन

💬 प्रतिसाद (184)

प्रतिक्रिया

पहिला प्रतिसाद वाचून मलापण

कवितानागेश
Mon, 04/01/2013 - 15:23 नवीन
पहिला प्रतिसाद वाचून मलापण यशोधरासारखंच वाटलं.. की लग्नाआधी गरोदरपण हा रोग कसा काय ठरवता येइल? पण विवाहपूर्व गर्भारपण हे किती तर्हेने त्रासदायक होऊ शकते हे पहिले तर तो रोग म्हणावा या पातळीवर पोहोचतो. नुसतेच त्यामुलीसाठी नव्हे तर आई वडिलांसाठीही काय घोर आहे ते सर्वाना माहिती आहेच पण ज्यावेळी या मुली गर्भपात करून घेतात त्यातून त्यंच्या मनावर एक कायमचा आघात होऊन राहतो. हे सर्वसामान्यपणे लोकांना जाणवत नाही....... दुय्यम वंध्यत्व हे उपचार करण्यासाठी जास्त सोपे आहे तसेच त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते......... म्हणून जी गोष्ट लग्नानंतर अत्यंत आनंदात जाहीर केली जाते ती लग्नापूर्वी काळजीची गोष्ट आहे म्हणून हा प्रतिसाद दिला.>> ही वाचल्यावर अश्या बघितलेल्या काही केसेस आठवल्या आणि शंकानिरसन झालं. जी गोष्ट स्वतःच्या आणि जवळच्यांच्या जीवाला घोर लावते ती गोष्ट एकाप्रकारे रोगच! तो घोर लागण्याचे कारण समाजरचनेत आहे, त्याला इलाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सहमत आहे.

पिलीयन रायडर
Mon, 04/01/2013 - 15:30 नवीन
मलाही आधी गरोदरपणा कुठल्याच अँगलने रोग म्हणुन पहता येत नव्हता. कारण आपले मूल आपण ह्या भावनेने बघु शकत नाही. पण लग्नाआधी ही सगळी गणिते वेगळी असतात (असावीत की नसावीत.. हा पुर्णपणे वेगळा विषय आहे.. पण भारतात आहेत.) तेव्हा मुला बद्दल कुठल्याही चांगल्या भावना न येता जर ती एक "कटकट आणि त्रास" वाटत असेल तर "मातेच्या दृष्टी कोनातुन" तो रोगच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माऊ, मग मी तो समाजमनाला वा

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 17:33 नवीन
माऊ, मग मी तो समाजमनाला वा अशा मुली/ स्त्रियांना जज करणार्‍यांच्या मानसिकतेला लागलेला रोग म्हणेन. रोग ही संकल्पना (इथे जसे वापरले आहे त्यासंदर्भात) लक्षात आली होती अणि ते लक्षात घेऊनच त्याला "रोग" का म्हणता हा प्रश्न होता. असो. जाऊदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

१००% सहमत. लग्नाआधी की

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 17:47 नवीन
१००% सहमत. लग्नाआधी की लग्नानंतर ह्यातला फरक सामाजिक पातळीवर आहे, वैद्यकिय किंवा जीवशास्त्रीय पातळीवर नाही. डॉक्टरांचे क्षेत्र हे वैद्यकिय आहे ह्याचे भान त्यांनी ठेवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फक्त 'जीवशास्त्रीय' पातळीवरुन

कवितानागेश
Mon, 04/01/2013 - 17:56 नवीन
फक्त 'जीवशास्त्रीय' पातळीवरुन विचार करणारा माणूस 'डॉक्टर' होउ शकत नाही. ...असं माझे मत आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

बरोबर आहे माऊ, तसंच

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 18:07 नवीन
बरोबर आहे माऊ, तसंच अडचणीतल्या पेशंटला इतके जज करणार्‍या डॉ बद्दल माझ्या मनात तरी १००% विश्वास पैदा होणं कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पण त्याचा प्रयत्न तरी असावा.

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 18:11 नवीन
पण त्याचा प्रयत्न तरी असावा. आपण डॉक्टरकडे का जातो? त्याचा जीवशास्त्राचा /वैद्यकिय शास्त्राचा अभ्यास आहे म्हणून ना की तो समाजशास्त्राचा तज्ञ आहे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आपण डॉक्टरकडे का जातो? त्याचा

कवितानागेश
Mon, 04/01/2013 - 18:18 नवीन
आपण डॉक्टरकडे का जातो? त्याचा जीवशास्त्राचा /वैद्यकिय शास्त्राचा अभ्यास आहे म्हणून ना > आपण डॉक्टरकडे जीवशास्त्राबद्दल चर्चा करायला जात नाही. 'आजारातून बरे' व्हायला जातो! समोरच्या पेशन्तकडे फक्त जीवशास्त्रीय यन्त्र म्हणून बघणारा माणूस 'डॉक्टर' होउ शकतो का हे मला माहित नाही. त्यांच्या पुरेसे ज्ञानी असण्याला पर्याय नाहीच. पण त्याचबरोबर समोरच्या माणासाचे आयुष्य सुसह्य व्हावे याची कळकळ असणं आवश्यक आहे असं मला वाटतं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

यंत्रामध्ये जीवच नसतो.

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 18:27 नवीन
यंत्रामध्ये जीवच नसतो. त्यामुळे जीवशात्रीय यंत्र म्हणून बघणे म्हणजे काय? जीवशास्त्र हे खूप मोठे शास्त्र आहे, त्यातल्या वैद्यकिय शास्त्र ह्या उपशाखेचा अभ्यास डॉक्टरांनी केलेला असतो, म्हणूण आपण त्यांचा सल्ला, उपचार घेण्यास त्यांच्याकडे जातो. आणि त्यांनी आपल्या ह्याच ज्ञानाला प्रामाणिक राहुन सल्ले द्यावेत. उद्या मी कायदेशीर सल्ल्यास घेण्यास वकिलाकडे गेल्यास त्याने, 'काय मामा थोडे वजन कमी करा पोटाचा घेर वाढतो आहे, कोलेस्टेरोल किती आहे' वगैरे (माझ्या हिताचे असले तरी) सल्ले दिल्यास मला ते आवडणार नाही कारण त्याचे ते क्षेत्र नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

(No subject)

कवितानागेश
Mon, 04/01/2013 - 18:34 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

मामू...

दादा कोंडके
Mon, 04/01/2013 - 18:49 नवीन
उद्या मी कायदेशीर सल्ल्यास घेण्यास वकिलाकडे गेल्यास त्याने, 'काय मामा थोडे वजन कमी करा पोटाचा घेर वाढतो आहे, कोलेस्टेरोल किती आहे' वगैरे (माझ्या हिताचे असले तरी) सल्ले दिल्यास मला ते आवडणार नाही कारण त्याचे ते क्षेत्र नाही.
हो पण उद्या मी छोट्याश्या कारणावरून काडीमोड घेण्यासाठी वकीलाकडे गेलो तर त्याने समुपदेशकाकडे जाण्याचा किंवा कोर्टा बाहेर सामजस्यानी काही तोडगा काढण्याचा सल्ला त्याने देउ नये का? की तो वकील आहे फक्त कायशीर बाबी बघावेत असं तुम्हाला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

कारण छोटेमोठे आहे हे कोण

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 20:28 नवीन
कारण छोटेमोठे आहे हे कोण ठरवणार? घटस्फोटापर्यंत जाण्यासाठी तुमच्या दृष्टीने महत्वाचे असणारे कारण वकिलाला किरकोळ वाटू शकते ना? समजा विवाहित असुनही तुमचे दुसर्र्या एका स्त्री वर प्रेम आहे आणि त्या स्त्रीशी तुम्हाला विवाह करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सद्यपत्नी पासुन घटस्फोट मिळवण्यासाठी कायदेशीर मसलत करायला तुम्ही वकिलाकडे गेलात. अशावेळेस त्या वकिलामे तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन न करता तुम्ही करता अहात ते चूक आहे/ अनैतिक आहे वगैरेवर बोलायला सुरु करुन खोटा सल्ला दिला तर तुम्हाला ते रुचेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हम्म...

दादा कोंडके
Mon, 04/01/2013 - 20:41 नवीन
अश्या दोन्ही बाजूच्या उदाहरणांना काही तोटा नाही. वरच्या प्रतिसादात माउ का हसली ते कळलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

पण मग मूळ मुद्द्याचे काय?

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 20:47 नवीन
पण मग मूळ मुद्द्याचे काय? डॉक्टरने वैद्यकिय कक्षेच्या बाहेर जाऊन ढवळा ढवळ करावी का? मूळ लेखातील नवर्‍याची फसवणूक तुम्हाला योग्य वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हो/नाही

दादा कोंडके
Mon, 04/01/2013 - 23:20 नवीन
मूळ लेखातील नवर्‍याची फसवणूक तुम्हाला योग्य वाटते का?
माझा मुद्दा हाच की आपण इथं बसून ती गोष्ट योग्य की अयोग्य सांगू शकत नाही. त्यामुळे नवर्‍याची फसवणुक योग्य की त्याचा संसार मोडणं योग्य हे ठरवण्यासाठी अनेक इंप्लिसिट गोष्टी असू शकतील की त्या आपल्याला माहीत नाहीत. परिस्थिती बघून डॉक्टरांनी तेव्हडं स्वातंत्र्य घेतलं तर ते अगदीच चुकीचं नाही. यावरून मुन्नाभाई एमबीबीएस मधला पेशंटला 'सबजेक्ट' म्हणणारा आणि नियमाप्रमाणे फॉर्म भरल्यावरच रुग्णाला अ‍ॅडमिट करणारा बोमन आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

सर्वप्रथम ती कृती अयोग्यही

बंडा मामा
Tue, 04/02/2013 - 18:19 नवीन
सर्वप्रथम ती कृती अयोग्यही असू शकते ही शक्यता ध्यान्यात घेतल्या बद्दल धन्यवाद. राहिला सवाल अपुर्‍या माहितीचा. इथे जी उपलब्ध माहिती आहे त्यावरुन मला डॉक्टरांची कॄती अयोग्य वाटते. आणखी माहिती दिल्यास माझे मत बदलू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

तुम्ही करता अहात ते चूक आहे/ अनैतिक आहे

अनिरुद्ध प
Mon, 08/05/2013 - 16:23 नवीन
बन्डा मामा, असे सान्ग्णारे वकिल कुठे मिळतील याची माहिती असेल तर अवश्य द्यावी,चरणतिर्थ घ्यावे असे ते व्यक्तिमत्व असेल्,नाहितर Lawer = Layer,असे म्हट्ल्या गेले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

मैत्र

निनाद मुक्काम …
Mon, 04/01/2013 - 15:48 नवीन
मैत्र आपण वकिली करत नाही आहोत असे जे म्हणत आहात ते खरे असू शकते , मात्र येथे एखादा आयडी दु आयडी आहे का असा प्रश्न नेहमीच विचारला जातो , तेव्हा अमोल खरे ह्यांनी योग्य ते स्पष्टीकरण दिले ,प्रश्न मिटला. मात्र तुम्ही यशोधरा ताई ह्यांना असा प्रश्नच कसा विचारला असा जाब कम सवाल विचारला तेव्हा खरे ह्यांचा पेशा व अनुभव ह्यांचा दाखला दिला , त्यातून तुमची व्यक्ती पूजा डोकावली ,ह्या आधी नुकतेच प्यारे १ ह्यांनी स्वप्नातील राणी हा दु आयडी असल्याची शंका , दुबई ची काळी बाजू ह्या धाग्यात व्यक्त केली , त्यांच्या मनातील शंका त्यांनी व्यक्त केली ह्यात वावगे काहीच नाही , मात्र त्यांना जाब विचारायला कोणीच आले नाही , कदाचित स्वप्नातील राणी ह्यांनी आपला व्यवसाय ,शिक्षण ह्या बाबत कल्पना दिली नसेल , येथे सुका ह्यांच्याशी अनेकांचे मदभेद झाले ,मात्र कुणी सुका ह्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा दाखला दिला नव्हता. मिसळपाव वर अभिव्यक्त होणारा फक्त मिपाकर असतो , व त्याला उत्तर देणारा सुद्धा फक्त मिपाकर , ह्यासाठी अनेक जण टोपण नावाने लिहितात. एखाद्या आय डी ची व्यक्ती पूजा सुरु झाली कि आपसूकच कंपू निर्माण होतो, हे माझे निरीक्षण व मत आहे आणि यशोधरा ताई तुम्ही जसे थांबायचं निर्णय तो योग्यच आहे , खरे ह्यांची महिलांच्या विषयी मते ,त्यांचे समाजातील वर्तन ,त्यावर टिप्पणी व त्यांची खाजगी मते, ह्या बद्दल आक्षेप मी आधी सुद्धा एका वेगळ्या धाग्यावर वेगळ्या संधर्भात घेतला होता ,त्यामुळे तोच मुद्दा येथे मी सर्वप्रथम उरकला असता तर ते जुने हिशेभ चुकते करत आहे , असे सगळ्यांना वाटले असते. म्हणून मी लिहिले नाही , तुम्ही माझ्या मनातील बहुतेक मुद्दे मांडले , धन्यवाद,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुमची मते

मैत्र
Mon, 04/01/2013 - 16:32 नवीन
तुम्हाला लखलाभ असोत. मुळात वाद / चर्चा / काथ्याकूट हा "मला असं वाटतं" किंवा "माझं हे मत आहे" असल्या फुटकळ आधारावर कधीच होत नसते. तुमच्या जर अजूनही लक्षात आलं नसेल तर इतक्यात इतरत्र झालेल्या चर्चांमध्ये बहुतेक आयडींनी तुम्हाला किंवा इतरांना काही मुद्दा समजून देण्याचा अथवा तुमचा एखादा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न सोडून दिला होता. याचा अर्थ तुम्हाला समजून सांगण्याची माझी इच्छा नाही. पण तुम्ही थेट लिहिल्याने माझा नाईलाज आहे म्हणून तुम्हाला उत्तर देतो आहे. कृपया याला वैयक्तिक मानू नये -- १. निनाद तुम्ही आधी एका धाग्यावर आणि एका मुद्द्यावर राहण्याचा प्रयत्न करा. इथे डॉक्टर कसे वागायला हवेत / वागतात - सत्यं ब्रूयात यावर चर्चा चालु आहे. दुबईच्या धाग्याची चर्चा तिथे करा. २. यशोधरा ताई खूप पूर्वीपासून मिपावर आहेत. नुकत्याच लिहिलेल्या गंगामैय्या यासारखे लेख किंवा समतोल प्रतिसाद काही वर्षे पाहिले आहेत. तेव्हा नावाने चांगले लेखन करणार्‍या दुसर्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीला त्यांनी आयडी जेन्युईन असल्याची शंका व्यक्त करणे मला धक्कादायक वाटले. मतभेद असणे वेगळे आणि वैयक्तिक आरोप वेगळे. (हे मी तुम्हाला सांगायला नको. तुम्ही अनुभवले असेल) त्यामुळे मी त्यांना थेट आणि नम्रपणे विचारले. तुम्हाला त्यात व्यक्तिपूजा दिसली. कारण तुम्हाला सुबोध खरे यांची मते पटत नाहीत / पटली नाहीत. ३. यात कंपू बाजी तुम्हाला कुठे दिसली -- मी सुबोध खरे यांना ओळखत नाही आणि बहुसंख्य इतर मिपाकरांनाही. / अमोल खरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतरच मी यशोधरा ताईंना लिहिले. तेव्हा फुकाच कंपूबाजीचे बाष्कळ आरोप करु नका. ४. "कावीळ झालेल्या माणसाला सर्व जग पिवळेच दिसते" असे म्हणतात. तुमच्या प्रतिसादातून तसे वाटले. एका व्यक्तीची काही मते पटली नाहीत अथवा मतभेद झाले म्हणून कुठेही आणि कुठल्याही मुद्द्यावर मतभेदच झाले पाहिजेत असे नाही. आणि काही मुद्दे पटले म्हणून सगळेच योग्य वाटले पाहिजेत असे नाही. यासाठी जे तारतम्य हवे ते तुम्ही गेल्या काही दिवसात दाखवलेले नाही. ५. "खरे ह्यांची महिलांच्या विषयी मते ,त्यांचे समाजातील वर्तन ,त्यावर टिप्पणी व त्यांची खाजगी मते, ह्या बद्दल आक्षेप मी आधी सुद्धा एका वेगळ्या धाग्यावर वेगळ्या संधर्भात घेतला होता ,त्यामुळे तोच मुद्दा येथे मी सर्वप्रथम उरकला असता तर ते जुने हिशेभ चुकते करत आहे , असे सगळ्यांना वाटले असते. म्हणून मी लिहिले नाही ," -- हे लिहून तुम्हि तेच करत आहात. जर हे वाक्य लिहिलेच नसते तर तसं वाटलं नसतं. ६. तुमचा तुमच्या क्षेत्रातला अनुभव मोठा आहे ( आणि मला त्याबद्दल आदर आहे. गैरसमज नको). मग तुम्हाला तुमचं मत एकदम चुकीचं आहे. माझा तुमच्या क्षेत्राशी काहीही संबंध नाही कदाचित काही वेळा बिझनेस पार्ट्यांसाठीच्या भेटी आणि मी दोन वेळा जर्मनीत आलो होतो. मग मी तात्विक पातळीवर योग्य विचार जरी करत असलो तरी तुमच्या अनुभवातून आलेल्या ज्ञानाला पूर्णतः चूक म्हणू शकतो का ? शक्य असल्यास असा संतुलित विचार करा आणि मग कोणावरही टिका करा. ७. माझ्या प्रतिसादाला यशोधरा ताई, सुबोध खरे आणि इतर काहींनी खरोखर संतुलित आणि लॉजिकल (मराठी?) प्रतिसाद दिले आणि आधीच्या काहीशा एकांगी वाटणार्‍या प्रतिसादांचे / विचारांचे खुलासे / खंडन केले. तरीही त्यानंतर ते प्रतिसाद समजून न घेता तुम्हाला हा प्रतिसाद लिहावासा वाटला यातच बरंच काही आलं. याउपरही हा उगाच मोठा प्रतिसाद वाया जाण्याची शक्यता जास्त आहे. पण तुम्ही मध्ये पडून थेट नाव लिहिल्याने नाईलाजास्तव प्रयत्न केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

निनाद तुम्ही आधी एका धाग्यावर

निनाद मुक्काम …
Mon, 04/01/2013 - 20:14 नवीन
निनाद तुम्ही आधी एका धाग्यावर आणि एका मुद्द्यावर राहण्याचा प्रयत्न मैत्र साहेब तुम्हाला प्रतिसादात देतांना लिंक देण्याची सुविधा उपलब्ध आहे व त्याचा उपयोग अनेक मिपाकर आपले मत संधर्भासहित स्पष्टीकरण देऊन करण्यासाठी करतात व ह्यात ते अनेकदा आपल्या मतांच्या समर्थनार्थ मिपावरील अनेक चर्चचा . मुद्द्यांचा , विषयांचा संदर्भ देतात ,हे आपणास ठाऊक असेल , मी आपणाला उद्देशून जे विधान केले त्यांच्या समर्थनार्थ मी नुकत्याच मिपावर त्या धर्तीचे एक उदाहरण दुबई ची काळी बाजू ह्या धाग्यात पहिले व त्याचा उल्लेख केला , हे आपणास का खटकले देवच जाणे, कारण तसे केले नसते तर तुम्ही मी वैयक्तिक लिखाणातून हल्ले केले असे सुध्धा म्हणाला असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपणच नमूद केली की मुळात वाद / चर्चा / काथ्याकूट हा "मला असं वाटतं" किंवा "माझं हे मत आहे" असल्या फुटकळ आधारावर कधीच होत नसते. ह्या तुमच्याच मताला तुम्हीच ह्याच प्रतिसादात सदर विधान करून हरताळ फासला. तेव्हा नावाने चांगले लेखन करणार्‍या दुसर्‍या एका ज्येष्ठ व्यक्तीला त्यांनी आयडी जेन्युईन असल्याची शंका व्यक्त करणे मला धक्कादायक वाटले. मतभेद असणे वेगळे आणि वैयक्तिक आरोप वेगळे. ह्यावर माझे मत तुमच्या मतानुसार माऊ व पिलियन रायडर ह्यांनी यशोधरा ह्यांना मुद्देसूद प्रतिसाद देऊन आपली मते मांडली , ते तुम्ही न करता सरळ यशोधरा ह्यांना जाब विचारला. माफ करा मतभेद असणे वेगळे आणि वैयक्तिक आरोप वेगळे. आपले हे विधान मला जरासे विनोदी व एकांगी वाटले , आपण यशोधरा व खरे ह्यांच्यातील चर्चा नीट पहिली तेव्हा असे लक्षात येईल की ह्या चर्चेच्या शेवटी यशोधरा ह्यांचे एका क्षणी खरे ह्यांचे विचार वाचून असा प्रश्न पडला येथे विचार वाचून हे महत्त्वाचे आहे की एक डॉक्टर असलेल्या व्यक्तीचे असे मत कसे होऊ शकते , तेव्हा खरे ह्यांच्या काही विधानांच्या वरून यशोधरा ह्यांनी त्या आयडी बाबत फक्त शंका व्यक्त केली. आता आपली शंका व्यक्त करणे म्हणजे तुम्हाला वैयक्तिक आरोप वाटले , ज्याची त्यांची समज किंबहुना खरे ह्यांच्या विधान किंवा मतांच्या वर कोणी मतांतर तीही तर्क शुद्ध केलेली तुम्हाला धक्कादायक वाटणे व त्यावर इतर आयडी करतात तसा मुद्देसूद प्रतिवाद न करता तुम्ही यशोधरा ह्यांना प्रश्न विचारणे हे मला व्यक्ती पूजेचे उदाहरण वाटले , तेव्हा फुकाच कंपूबाजीचे बाष्कळ आरोप करु नका. येथे नम्रपणे सांगू इच्छितो की मी आरोप केले नाही आहेत पण कंपू होण्यास कारणीभूत एक कारण एखाद्या व्यक्तीविषयी असलेली अवास्तव आदर व त्यातून निर्माण होणारी व्यक्ती पूजा , थोडक्यात सध्या येथे कंपू बाजी होत आहे असे माझे म्हणणे नव्हते पण कंपू आपसूकच तयार होतो ह्या विधानातून भविष्यात एखादा कंपू होऊ शकतो अशी भीती व शक्यता मी वर्तवली , मिपावर लिहिणारा फक्त मिपाकर असतो हीच त्याची खरी ओळख व त्याला उत्तर देणारे सुद्धा फक्त मिपाकर असतात हीच त्यांची खरी ओळख येथे संपादक मंडळ जेष्ठ व अनुभवी मिपाकर मंडळींसाठी वेगळे निकष लावत नाहीत , तेव्हा एखाद्याचा अनुभव ,शिक्षण , व्यवसाय , ह्यापेक्षा महत्त्वाचे एखाद्या व्यक्तीचे विचार असतात , हेच मला येथे म्हणायचे होते , कारण विचारसरणी ,मानसिकता हे अनुभव , शिक्षण , व्यवसाय ह्यांची बांधील नसते , माझा विरोध येथे व्यक्तीला नसून त्यांनी मांडलेल्या विचारांना आहे , असा संतुलित विचार करा आणि मग कोणावरही टिका करा. हे मला खरे तर तुम्हाला सांगणे भाग पडत आहे , कारण येथे आपण पहिलेच असेल मीच नव्हे तर अनेक मिपाकरांना खरे ह्यांचे जे विचार पटले नाही त्यावर त्यांनी आक्षेप घेत आपली मत मांडली आहेत , माझी ह्या धाग्यावर खरे ह्यांच्या लेखनावर मते तारतम्य बाळगून किंवा मुद्देसूद नसती तर ती संपादक मंडळाने उडवली असती , मी येथे मुद्द्याला धरून लिहित आहे ह्याचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अमेरिकेविषयी.... ह्या मुद्द्यावर वरती मी खरे ह्यांना त्यांना जी माहिती आहे त्यांनी ती देण्यास विनंती केली ह्याप्रमाणे खरे ह्यांनी ती दिली ,त्यापाठोपाठ अमेरिकास्थित एका महिला मिपाकाराने त्याला अनुमोदन दिले , ह्यावर मी कोणताही उगाच घालायचा म्हणून परत प्रतिवाद केला नाही आहे ,ह्याची आपण नोंद घेतली तर बरे होईल. बंडा मामा ह्यांनी माझी खरे ह्यांच्या लेखनाविषयी जी मते आहेत ती अधिक मुद्देसूद पणे मांडली आहेत असे सुद्धा नमूद करतो , मैत्र आपण वैयक्तिक घेऊ नये कारण प्रत्येकाला आपापली मते लखलाभ असतात असतात असे माझे मत आहे , जे आपल्या म्हणण्यानुसार मला लखलाभ आहे ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

अखेरचा प्रयत्न

मैत्र
Mon, 04/01/2013 - 22:29 नवीन
मी काय विधान केले जे फक्त माझे मत म्ह्णून मुद्दा आहे... आणि वैयक्तिक आरोप वेगळे आणि मतभेद वेगळे यात तुम्हाला विनोदी काय वाटले? नुकत्याच याच धाग्यावर झालेल्या वादात तुमच्यावर काही कॉमेंट्स झाल्या त्यात कदाचित तात्विक तथ्यही होते पण असे वैयक्तिक शेरे किंवा आरोप आणि मतभेद यात फरक नसतो असं तुमचं म्हणणं आहे का? (तुमच्या प्रमाणेच इतर संदर्भ देतो आहे बरं का...) जेव्हा मतभिन्नता या टोकाला गेली तेव्हा त्यांच्या विधानामागचा विचार (तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच) समजून घेणे गरजेचे वाटले. म्हणून थेट विचारले. तेव्हा जाब विचारला याला काही अर्थ नाही. हरताळ फासला वगैरे उत्तम वाक्प्रचार वापरता तेव्हा जाब विचारला हा प्रयोग जपून वापरावा. माउ किंवा पिलियन रायडर यांनी त्या विधानावर काहिही थेट प्रतिवाद केला नाहीये. त्यांचे प्रतिसाद हे चर्चा पुढे गेल्यावर काहि विशिष्ट वाक्यांच्या संदर्भात आहेत. व्यक्तीपूजा हे तुमचे मत झालेले आहे. सुबोध खरे त्या मानाने नवीन आहेत. माझा त्यांचा परिचय नाही. त्यांच्या अनुभवांवर बरीच चर्चा आणि वाद होतात. पण त्यांचे लिखाण, मांडणी विचार यातून ते स्वत:ची ओळख निर्माण करत आहेत. मिपावर ज्येष्ठतेपेक्षा विचार महत्त्वाचे हे खरेच. त्यामुळेच नवनवीन उत्तम लेखक येऊन चांगले लेख, प्रतिसाद, माहिती आणि मुद्दे यावर स्थान निर्माण करू शकतात. त्यातही त्यांचे काही मत पटले नाहि तर कोणीही सरळ तसं मांडतात. त्यामुळे व्यक्तीपूजा असं ते तुमचं मत आहे ते अनाठायी आहे. जर लेखकाच्या इतिहासाचं, त्याच्या किंवा तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा काही संदर्भ प्रतिसाद लिहिताना किंवा लेखनाचा उहापोह करताना विचारात नाही घेतला तर चालेल काय? जुनाच मुद्दा. तुमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून तुम्ही तुमच्या क्षेत्रातला मुद्दा मांडला तर तो अनुभव शून्य उपयोगाचा आहे असं म्हणून केवळ माझं मत वेगळं आहे असं म्हणून फेटाळून लावला तर चालेल का? कारण विचारसरणी ,मानसिकता हे अनुभव , शिक्षण , व्यवसाय ह्यांची बांधील नसते , - १००% मान्य. माझा विरोध येथे व्यक्तीला नसून त्यांनी मांडलेल्या विचारांना आहे -- हे तुम्ही खरे यांचे धागे धरून विरोधासाठी जो विरोध करताय आणि काही जणांनी स्पष्ट मांडलं आहे त्यावरून तर खरं वाटत नाही. संतुलित विचाराचा मुद्दा तुमच्याशी संबंधित होता. त्याला बगल देऊन तुम्ही इतरांनी दर्शवलेली मतभिन्नता सांगताय. माझी ह्या धाग्यावर खरे ह्यांच्या लेखनावर मते तारतम्य बाळगून किंवा मुद्देसूद नसती तर ती संपादक मंडळाने उडवली असती , -- मुद्देसूद नसलेले प्रत्येक प्रतिसाद संमं उडवत नाही असा माझा समज आहे. तसं करायचं झालं तर मंडळाला रात्रंदिवस सफाईच करावी लागेल आणि प्रतिसादांची संख्या अतिशय कमी होईल. अमेरिकेच्या मुद्द्यात तुम्ही वाद वाढवला नाहीत हे मान्य आहे. मुळात विचारताना "डॉक्टर साहेब हे तुमचे व्यावसायिक मत आहे का वैयक्तिक." अशा स्वरुपाचा डाउट तुम्ही मांडलात तो कितपत योग्य होता हा वादाचा मुद्दा असू शकतो. या धाग्यावर अनेकांनी विरोधी मते मांडली. प्रत्येकाचे खंडन करून खरे यांचे समर्थन करण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. जेव्हा यशोधरा ताइंनी विधान केले तेव्हा मी त्यामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही प्रमाणात उत्तर दिले. नंतरच्या चर्चेत अनेकांची मते आणि विचार स्पष्टही झाले आणि साफही. तरीही यशोधरा ताईंनी माझ्या प्रश्नांची उत्तरं पूर्णत: दिली नाहीत असं मला वाटतं. असो. झाला तेवढा काथ्याकूट पुरे झाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

@आणि वैयक्तिक आरोप वेगळे आणि

निनाद मुक्काम …
Tue, 04/02/2013 - 00:30 नवीन
@आणि वैयक्तिक आरोप वेगळे आणि मतभेद वेगळे यात तुम्हाला विनोदी काय वाटले? नुकत्याच याच धाग्यावर झालेल्या वादात तुमच्यावर काही कॉमेंट्स झाल्या त्यात कदाचित तात्विक तथ्यही होते विनोदी आता सुद्धा तुम्ही जो संदर्भ दिला आहे त्याबद्दल वाटते , आपला जर मिपा वर बर्‍यापैकी वावर असेल तर आपणास कळून येईल की माझ्यावर ज्या काही कॉमेंट आल्या , त्या ज्या आयडी कडून आल्या त्यांच्यात व माझ्यात आधी अनेक ठिकाणी वैयक्तिक वाद झाले आहेत, व म्हणूनच ते मिटविण्याचे मी आवाहन येथेच केले , तेव्हा त्या आयडी व आमच्यातील वादाला भूतकाळातील वादांची झालर होती , म्हणूनच मी त्यास उत्तर दिले व वाद वाढला , मात्र येथे यशोधरा व खरे ह्यांच्यात अशी वादाची कोणतही पार्श्वभूमी नव्हती. मुळात खरे व यशोधरा ह्या दोन आयडी मध्ये आधी माझ्या माहितीनुसार कोणतेच वैचारिक मतभेद नव्हते मात्र येथे त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वैचारिक मतभेद उत्पन्न झाले तेव्हा यशोधरा ह्यांनी माझ्या मते शंका उपस्थित केली , त्यामुळे तुम्ही माझे जे उदाहरण दिले ते पूर्णतः येथे गैरलागू आहे , आपण बहुदा माझे धागे वाचले असतील किंवा माझ्या दीर्ध प्रतिसाद वाचले असतील माझे अनेकांशी वैचारिक ,अत्यंत टोकाचे , दीर्घकाळ वाद झाले , उदा द्यायचे तर क्लिंटन ह्यांच्याशी बोस ह्यांच्या वरून महात्मा हि पदवी ह्यां धाग्यावर मग ऋषिकेश ह्यांच्याशी ५५ कोटी , राही ह्यांच्याशी हिटलर मात्र येथे दोन्ही बाजूने मुद्देसूद टोकाचे वाद प्रतिवाद झाले. , तस्मात मी फक्त खरे ह्यांच्या धाग्यावर विरोधाला विरोध म्हणून वाद घालत नाही आहे , ताजे उदाहरण श्री गुरुजी विषय कंदहार विमान अपहरण मात्र येथे उल्लेख करतो ह्या वादाच्या शेवटी मला गुरुजी ह्यांचे म्हणणे तत्त्वतः पटले ह्याला कारणीभूत ठरले मोदक , श्रीरंग , सूर्याजीराव ह्यांचे प्रतिसाद व ह्या विषयावरील वेगळ्या धाग्यावर मी विरोध न करता पूरक प्रतिसाद दिला , तेव्हा मी वाद , विवाद केले तरीही मत परिवर्तन होऊ शकते म्हणजे तशी शक्यता असतोच येथे ऋषिकेश ह्यांच्या मताला माझा पूर्ण पाठिंबा आहे ,आहे उद्या अजून एका धाग्यावर कदाचित खरे ह्यांच्या मताला सुद्धा असेल. कुणी सांगावे. येथे एक आवर्जून सांगतो ,जे तुमच्या लक्षात आले नाही आहे , माझे आधी खरे ह्यांच्याशी ज्या मुद्द्यावर वाद झाले त्यापैकी महिला व अजून बरेच मुद्दे ह्या धाग्यावर सामाईक आहेत म्हणून मी येथे माझे मतांतर व्यक्त केले , म्हणून तुम्ही सोयीस्कर अर्थ काढला की मी खरे ह्यांचे धाग्यावर वादासाठी वाद घालत आहे , आपणास हे आवर्जून सांगतो की बोस , गांधी ह्या विषयी सुद्धा माझी ठाम मते आहेत त्यामुळे जेव्हा हे विषय मिसळपाव वर काही महिन्याच्या आड नियमित पणे येतात तेव्हा मी त्यावर माझी मते मांडतो व वरती उल्लेख केलेले आयडी ह्यांनी त्यांची मते मांडल्यावर जर आमच्यात मतांतर झाले तर वाद होणार हे नैसर्गिक आहे तेथे वादासाठी वाद कोणीच म्हणणार नाही , क्लिंटन ह्यांचे अर्थशास्त्रीय व ऋषिकेश ह्यांचे राजकीय धागे माझे आवडते आहेत तेव्हा मते वेगळी असली के मी हक्काने तात्त्विक वाद घालेन , @तेव्हा जाब विचारला याला काही अर्थ नाही. हे तुमचे स्पष्टीकरण असेल तर ते मी मान्य करून तुम्ही जाब नाही मात्र हरकतीचा मुद्दा मात्र उपस्थित केला , असे म्हणूया. पण तरीही मला त्यात व्यक्ती पूजा दिसली हे माझे मत आहे ,असो माउ किंवा पिलियन रायडर यांनी त्या विधानावर काहिही थेट प्रतिवाद केला नाहीये. त्यांचे प्रतिसाद हे चर्चा पुढे गेल्यावर काहि विशिष्ट वाक्यांच्या संदर्भात आहेत. हेच माझे म्हणणे आहे , शंका उपस्थित करण्याचा यशोधरा ह्यांचा अधिकार बहुदा त्या नाकारत नसाव्यात , @इतक्या वर्षांच्या अनुभवातून तुम्ही तुमच्या क्षेत्रातला मुद्दा मांडला तर तो अनुभव शून्य उपयोगाचा आहे असं म्हणून केवळ माझं मत वेगळं आहे असं म्हणून फेटाळून लावला तर चालेल का? अहो का नाही चालणार जरूर चालेल एकाच शेत्रात राहून एकाच प्रकारचे अनुभव घेऊन तुम्हाला जे अनुभव येतात त्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन हा तुमच्या विचारसरणी , मानसिकतेवर अवलंबून असतो , ह्याचे उत्कृष्ट उदाहरण मोदी ह्यांनी दिल्लीत दिले , त्यांनी सांगितले दोन कामगार भर उन्हात मंदिर उभारण्यासाठी दगड तासत होते , त्यात पहिल्याला तू काय करतो असे विचारले भर उन्हात उगाच माथेफोडी करत आहे, असे सांगून त्याला मिळणारे कमी पैसे व असे बरेच मुद्दे त्याने मांडले तर दुसर्या कामगाराने तो एक भव्य मंदिर उभारायच्या कामात मदत करत आहे असे सांगून त्याला त्या मंदिरांच्या भव्य व दिव्य वास्तू प्रकल्पाविषयी सांगितले , तेव्हा दोन्ही कामगार एकाच पद्धतीचे कामं जरी एकाच वेळी करत असले तरी त्यांचा कामासंबंधी दृष्टीकोन वेगळा असतो म्हणून त्यांच्या कामासंबंधी अनुभव वेगळा असतो, मुळात आपण जेव्हा आपले अनुभव आभासी जगतात लिहितो तेव्हा त्यावर हरकती ह्या उपस्थित होणारच , @जर लेखकाच्या इतिहासाचं, त्याच्या किंवा तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा काही संदर्भ प्रतिसाद लिहिताना किंवा लेखनाचा ऊहापोह करताना विचारात नाही घेतला तर चालेल काय? हो नक्की चालेल , मला गवि, रामदास , वल्ली , ननी , माऊ , राही , पिलियन रायडर , बंडा मामा , श्री गुरुजी ह्यांच्या संबंधी अजिबात माहिती नाही किंबहुना आमच्यात खरडा खरड सुद्धा झाली नाही , ,तरीही मला त्यांचे मुद्दे पटले तर ठीक नाहीतर जे पटले नाही त्यावर मी जरूर आक्षेप नोंदवले आहेत , माझ्या मलाला लेखात सुरवातीला मी जेव्हा हे सर्व परकीय प्रसार माध्यमे करवून घेत आहेत असे लिहिले तेव्हा अनेकांनी माझ्याशी टोकाशी वाद घातले , मी सर्वांना त्रागा न करता उत्तरे दिली ह्यात कोणी माझे व मी त्यांचे वय , अनुभव , व्यवसाय पाहीलाच नाही , @मुद्देसूद नसलेले प्रत्येक प्रतिसाद संमं उडवत नाही असा माझा समज आहे. तसं करायचं झालं तर मंडळाला रात्रंदिवस सफाईच करावी लागेल आणि प्रतिसादांची संख्या अतिशय कमी होईल. हे विधान ह्या ठिकाणी माझ्यावर लागू होत नाही ह्याची तुम्हाला कल्पना असायला हवी , कारण येथे संपादक मंडळाने माझा खरे ह्यांच्या विषयी एक दीर्घ प्रतिसाद व इतर अनेक प्रतिसाद संपादित केले आहेत ह्या अर्थी ते प्रतिसाद संपादित करण्याच्या दर्जाचे होते पण जे प्रतिसाद कायम ठेवले आहेत त्यावर सुद्धा त्यांनी आधी व आता नजर ठेवून नक्कीच असतील , तेव्हा तुमचे वरचे विधान जरासे किंवा बर्‍याच प्रमाणात मला ढोबळ वाटले असे मी नम्रपणे आपल्या निदर्शनी आणू इच्छितो. गतकाळात आपण केलेले सर्वच कृत्य आपल्याला योग्य वाटले म्हणजे त्यावर जगाकडून बरोबर असल्याचा शिक्कामोर्तब होत नाही , नाण्याच्या दोन बाजू असतात पण माझ्या मते ह्या दोन बाजूंना सुद्धा अनेक कंगोरे असतात. , आणि आपण केलेल्या कृत्यावर, निर्णयावर जग कदाचित वेगळ्या दृष्टी कोनातून पाहू शकते त्याला इलाज नाही , एक उदाहरण आज लष्कर आपल्या कृतीचे नेहमीच समर्थन पण तरीही त्यांच्यावर मानवी हक्क भंगाच्या तक्रारी होतात , हा मुद्दा येथे ह्यासाठी दिला की भले लष्कर त्यांच्या मुद्द्यावर कितीही ठाम राहिले किंवा त्यांच्या दृष्टी कोनातून बरोबर असले म्हणजे लष्कराला तसे वाटले तरी न्यायालयाला तसे वाटले नाही तर अनेक अधिकाऱ्यांवर कारवाया होतात हे सत्य आहे ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

काथ्या कुटणे

मैत्र
Tue, 04/02/2013 - 10:36 नवीन
आता अगदी काथ्या कुटणे शब्दप्रयोग सार्थ होत आहे त्यामुळे थोडी मुद्देसूद करुन चर्चा व्यनि / खरडिंमध्ये न्यावी ... यापुढे इतरत्रही थोडे संदर्भ असलेले सुसंगत मुद्दे मांडावेत अशी विनंती आहे...काही वेळा योग्य असलेले तुमचे मुद्देही या शब्दबंबाळात आणि विसंगत उदाहरणात हरवून जातात किंवा चुकीचे वाटतात.. असो हा माझ्या या चर्चेतला शेवटचा प्रतिसाद.. या पुढे यावर काथ्या कुटून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही म्हणून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

काही वेळा योग्य असलेले तुमचे

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 04/02/2013 - 11:38 नवीन
काही वेळा योग्य असलेले तुमचे मुद्देही या शब्दबंबाळात आणि विसंगत उदाहरणात हरवून जातात किंवा चुकीचे वाटतात
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

यशोधरा, तुम्ही नाण्याची एकच

michmadhura
Wed, 04/03/2013 - 18:27 नवीन
यशोधरा, तुम्ही नाण्याची एकच बाजू बघत आहात. अशा गर्भपातासाठी आलेल्या कुमारी मातांच्या केसेस अपघाताने झालेल्या असतात का? दिवसभर आई वडील ऑफीसमध्ये आणि लक्ष ठेवणारे कोणी नाही, अशा किती मुली भावनेच्या भरात वा नकळत मर्यादांची पायरी ओलांडली गेल्यामुळे तसेच नाईट आउट, वन डे पिकनिक अशा ठीकाणी मर्यादा न पाळल्याने गरोदर होतात. नवरात्रात देवीच्या पवित्र उत्सवाचे निमित्त करुन गरबा खेळायला गेलेल्या मुली भलत्याच ठिकाणी जाउन असे प्रताप करतात. अशांसाठी डॉक्टर म्हणतात ते खरेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+११११११. पूर्ण सहमत.

बॅटमॅन
Wed, 04/03/2013 - 18:38 नवीन
+११११११. पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

मधुरा, असे धरुन चालू की

यशोधरा
Wed, 04/03/2013 - 18:45 नवीन
मधुरा, असे धरुन चालू की मुळीचच अपघाताने अशा केसेस होत नाहीत, तर जाणून बुजून मुली असे "प्रताप" करतात. तरीही डॉ ला त्यांचे कॅरॅक्टर जज करायचे काही कारण आहे, असे मला वाटत नाही. ते माझे मत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

विचार

प्रकाश घाटपांडे
Sun, 03/31/2013 - 16:28 नवीन
तसेच ती व्यक्ति कुठल्या विचार व संस्काराची आहे त्यावर ही अवलंबून आहे. बाकी डॊक्टर साहेब तुमचे लेख विचार करायला लावणारे असतात. तसेच चुक असल्यास त्याकडे पहाण्याचा तुमचा दृष्टीकोन ही आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खुप कौतुक वाटले. आधी तुमच्या

अमोल खरे
Mon, 04/01/2013 - 10:02 नवीन
खुप कौतुक वाटले. आधी तुमच्या सरांचे आणि नंतर तुमचेही. तुमचे अनुभव वाचुन तुमच्या निर्णयक्षमतेचा अंदाज येतो. असले निर्णय घेणे ही सोपी गोष्ट नाही. कोणीतरी आधी म्हणाल्याप्रमाणे एकवेळ डॉक्टर बनणे कदाचित सोपे असेल पण असले गुंतागुंतीचे निर्णय घेणे खुप कठीण. तुमच्या आधीच्या लेखांमधुनही तुमच्या उत्तम निर्णयक्षमतेची चुणुक दिसलीच होती. (जसे सैनिकाची धावण्याची शिक्षा कमी करुन त्याला उत्तम बाग करायला सांगणे). तुमच्यासारखे डॉक्टर आहेत म्हणुन भारतात अजुनही डॉक्टरांवर लोकांचा विश्वास आहे हे आवर्जुन नमुद करावेसे वाटते. असेच अनुभव आमच्याशी शेअर करत राहा.
  • Log in or register to post comments

ऋषीकेश व यशोधरा शी सहमत. जर

शुचि
Mon, 04/01/2013 - 10:19 नवीन
ऋषीकेश व यशोधरा शी सहमत. जर प्रामाणिक वीष की अप्रामाणिक श्रीखंड यात मी प्रामाणिक वीष निवडेन. आणखी एक मुद्दा कशावरुन प्रत्येक व्यक्ती मृत्यूला भीते?????? आपण आपली गृहीतके बांधून खेळी करायची. इट इज डिस्गस्टींग. आय अ‍ॅम सॉरी पण अप्रामाणिकपणाची मनस्वी चीड वाटते.
  • Log in or register to post comments

मनोबल आणि बाह्योपचार.

प्रभाकर पेठकर
Mon, 04/01/2013 - 12:28 नवीन
कशावरुन प्रत्येक व्यक्ती मृत्यूला भीते??????
मला वाटतं जो पर्यंत मृत्यू तुमच्या समोर उभा ठाकत नाही किंवा विचारांमध्ये तुम्ही मृत्यूला डोळ्यास डोळा भिडविण्याइतपत समिप अनुभवत नाही तो पर्यंत कोणी मृत्यूला घाबरत नाही. पण जेंव्हा असे घडते, तेंव्हा ९९% रुग्ण हादरतात कारण कोणालाच मरण नको असते.
आपण आपली गृहीतके बांधून खेळी करायची. इट इज डिस्गस्टींग. आय अ‍ॅम सॉरी पण अप्रामाणिकपणाची मनस्वी चीड वाटते.
रुग्णाच्या बरे होण्यात, रोगाशी निकराची झुंज देण्यात त्याच्या मनाची उभारी, 'मी ह्यातुन बरा/बरी होणारच' हा आत्मविश्वास बाह्य उपचारांना शरिराने सकारात्मक साथ देण्यास साह्यकारी असतो. म्हणजेच, असा विश्वास रुग्णाच्या मनांत निर्माण होण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करणे नितिमत्तेत बसतेच पण डॉक्टरने तसे न करणे अनैतिक मानायला पाहिजे. ही रुग्णाची मृत्यूशी, डॉक्टरची रुग्णाच्या रोगाशी झुंज असते, लढाई असते, समर असतो. आणि प्रेमात आणि युद्धात विजयासठी सर्व माफ असते असे म्हणतात (निदान युद्धात तरी). डॉक्टर आपल्याला नुसतीच गोड गोड आणि चविष्ट औषधे देतो का? अत्यंत कडूजहर औषधेही देतो. ती देताना औषध कडू आहे हे त्याने रुग्णाला सांगावे का? सांगितले नाही तर ते अनैतिक आहे का? तर ते तसे नसते. जे औषध रुग्णासाठी हितकारी आहे त्याचीच योजना डॉक्टर करीत असतो. तद्वत, जर खोटे बोलून रुग्णाचे आत्मबळ वाढणार असेल आणि तो रोगमुक्त होण्याची १% जरी आशा असेल तरी ते खोटे बोलणे नैतिक आहे. त्यात फसवेगिरी नसून तो उपचाराचाच एक भाग आहे. ज्या केस मध्ये रुग्णाचा मृत्यू अटळ दिसतो आहे अशा केस मध्ये, रुग्णाचा मानसिक कणखरपणा जोखून, थेट शब्दांत किंवा आडवळणाने रुग्णास तसे सुचवावे असे मला वाटते. पण जर का रुग्ण मनाने कमकुवत असेल तर खोटा आत्मविश्वास त्याला देऊन रिव्हायव्हलचा एक शेवटचा प्रयत्न जरून करावा. कारण कधी कधी चमत्कार सुद्धा घडतात. असा एखादा कमकुवत मनाचा रुग्ण, मृत्यूच्या दारात पोहोचून परतला, खडखडीत बरा झाला तर तो डॉक्टरला देव मानेल की अनैतिक कृत्य करणारा राक्षस? अशा सर्व केसेस मध्ये रुग्णाचे मनोबल फार महत्त्वाचे. आणि ते कितपत आहे ह्याचा अंदाज घेणे डॉक्टरलाच करावे लागते. डॉक्टरांना ह्या विषयातील ज्ञानही असते असा माझा समज आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात रुग्णाची मानसिकता आणि मनोबलाचे बाह्य उपचारांच्या परिणामकारतेतील महत्त्व ह्याचाही समावेश असतो, असे मला वाटते, डॉक्टरांनी ह्यावर प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पण रुग्णाची अत्यवस्थ अवस्था

शुचि
Mon, 04/01/2013 - 14:22 नवीन
पण रुग्णाची अत्यवस्थ अवस्था भले डॉक्टर लाख लपवेल, कशावरुन ती अन्य रीतीने बाहेर पडणार नाही? आणि जेव्हा असे होइल तेव्हा त्या रुग्णाला किती धक्का बसेल? एक वेळ डॉक्टरांकडे जाताना तो मानसिक तयारी करुन गेलेला असेल पण अशी तयारी नसताना जर ही गोष्ट कानावर आली तर त्याचे हाल कुत्रा तरी खाईल काय? आता मृत्यूच्या भीतीबद्दल - जसजसे आयुष्य पुढे पुढे जाते तसतसे मृत्यूला सामोरे जायचे बळ गोळा करणे हे देखील प्रत्येकाचे कर्तव्य असते. मग कोणी अध्यात्मातून मिळवेल तर कोणी आतापर्यंतच्या वाटचालीचा सकारात्मक आढावा घेऊन. प्रत्येकाचे टूल्स निरनिराळे. "सब घोडे बारा टक्के" या न्यायाने सर्वजण मृत्यूस घाबरत असतीलसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

शुचि,

पिलीयन रायडर
Mon, 04/01/2013 - 15:23 नवीन
शुचि, तुही सब घोडे बारा.. हाच न्याय लावत आहेस.. कोण म्हणलय की सरसकट सगळ्यांना सांगा / सांगु नका... वय, परिस्थिती पाहुन तारतम्य बाळगायला अहवे. आणि अत्यंत जवळच्या नातेवाईकांना माहिती असतेच / असावीच (जर रुग्णाला माहिती नसेल तर..). "तुझ्या मनाचं काहिही असो..तू जगो अथवा मरो.. तुझ्या जवळ ऐकण्याचं धैर्य असो वा नसो.. मी सत्य सांगणारच.." असा पवित्रा डॉक्टर कसा घेऊ शकेल? पेठकर काकांनी लिहील्या प्रमाणे हा ही "उपचाराचा भाग" असु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

+१

दादा कोंडके
Mon, 04/01/2013 - 15:02 नवीन
सहमत. बाकी, डॉक्टरांसाठीचे प्रोफेशनल इथिक्स ब्ल्याक अँड व्हाइट असू शकत नाहीत. मोठ मोठ्या शहरात राहून दोन-चार पुस्तकं वाचून, जगातल्या सगळ्या घडामोडी आणि ज्ञान आंतरजालावर उपलब्ध आहे असं वाटणार्‍यांनी थोडं खेड्या-पाड्यात जाउन अनुभव घ्यावा. बाळंतपणात जबरदस्तीने सुनांना मजूरीला पाठवूनये त्यांच्या सासवांना खोटं-नाटं आजाराचं कारण सांगून ग्लुकोजच्या गोळ्या देणारे डॉक्टर बघितले नाहीत का कधी? सुबोध खरेंचे सगळे प्रतिसाद पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बाळंतपणात जबरदस्तीने सुनांना

ऋषिकेश
Mon, 04/01/2013 - 15:21 नवीन
बाळंतपणात जबरदस्तीने सुनांना मजूरीला पाठवूनये त्यांच्या सासवांना खोटं-नाटं आजाराचं कारण सांगून ग्लुकोजच्या गोळ्या देणारे डॉक्टर बघितले नाहीत का कधी? सुबोध खरेंचे सगळे प्रतिसाद पटले.
उदाहरण दिली जातायत तिचा आणि मुळ मुद्द्याचा फारसा संबंध नाही. आक्षेप आहे तो रुग्णाला माहिती न देण्याला किंवा अर्धवट देण्याला आणि त्याहुनही घातक असे रुग्णला टाळून केवळ त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्याला. तुम्ही देताय त्या उदाहरणात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाचे नाते कायम आहे. डॉक्टर उलट रुग्णाची काळजी घेण्यासाठी इतरांना प्रसंगी खोटे बोलत आहेत (मात्र रुग्णाला सत्य माहित आहे). (जे योग्य की अयोग्य हा वादजन्य मुद्दा हे मान्य पण किमान रुग्णाशी -ग्राहकाशी- प्रतारणा नाही) डॉक्टरांनी रुग्णाशी कसे बोलावे, किती वेगाने व कसे सांगावे वगैरे बाबतीत ते प्रशिक्षित असतात. अश्यावेळी ती माहिती रुग्णापासून लपवायला आक्षेप आहे. असो. धागा दुसर्‍या पानावर गेल्याने नवी प्रतिक्रीया शोधायला त्रास होतो आहे, तेव्हा या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हम्म...

दादा कोंडके
Mon, 04/01/2013 - 17:07 नवीन
तुम्ही देताय त्या उदाहरणात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाचे नाते कायम आहे. डॉक्टर उलट रुग्णाची काळजी घेण्यासाठी इतरांना प्रसंगी खोटे बोलत आहेत (मात्र रुग्णाला सत्य माहित आहे).
नाही. या केसमध्ये सुद्धा रुग्णाला सत्य माहीत असेलच असं नाही. बहुतेक वेळेला फक्त रुग्णाला वेगळे भेटण्यासारखी परिस्थिती नसते. हे जग खूप वेगळं असतं हो. त्यांच्या भल्यासाठी प्रसंगी पुस्तकी तत्वं गुंडाळून ठेउन अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. याची दुसरी बाजू ही आहे. पण म्हणून खरे साहेबांनी केलं ते चूक होतं असं नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+१

आजानुकर्ण
Tue, 04/02/2013 - 01:52 नवीन
सहमत. मला मागे काही गुंतागुंतीचा आजार झाला असताना उपचार घेत होतो तेव्हा डॉक्टरांना अनेक शंका विचारत होतो. त्यावेळी एका वयस्कर आणि अनुभवी डॉक्टरांनी 'तुम्ही तुमच्या आजाराच्या लक्षणांबाबत इंटरनेटव फार माहिती शोधता काय' असे नेमके विचारून नंतर सरळ मला वगळून आईवडिलांशी सल्लामसलत सुरू केली. तीनचार वेगवेगळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि नशीबाने त्या औषधांच्या चक्रातून सुटलो. मात्र डॉक्टरांनी फक्त माझ्याशीच चर्चा चालू ठेवली असती तर कदाचित आजही उपचार चालू असते असे वाटते. (आईवडिलांपेक्षा मला जास्त कळते असा माझा त्यावेळी समज होता...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अगदी नेमकी अशी परिस्थिती माझी

५० फक्त
Tue, 04/02/2013 - 07:20 नवीन
अगदी नेमकी अशी परिस्थिती माझी पण होती, तिस-या बैठ्कीत डॉक्टरांनी सांगितलं की एकतर मी किंवा इतर कोणत्याही डॉक्टरकडं जा, त्याचं ऐका नाहीतर गुगलत बसा, अर्थात अर्धवट आंतरजालीय ज्ञानाच्या आधारावर त्या त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तज्ञांच्या ज्ञानावर शंका घेणे हे वैद्यकीयच नव्हे तर सर्वच क्षेत्रात दिसुन येते आहे हल्ली, अगदी आमच्य तथाकथित रुक्ष बांधकाम धंद्यात सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अगदी अगदी

अभ्या..
Tue, 04/02/2013 - 11:53 नवीन
अर्थात अर्धवट आंतरजालीय ज्ञानाच्या आधारावर त्या त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तज्ञांच्या ज्ञानावर शंका घेणे हे वैद्यकीयच नव्हे तर सर्वच क्षेत्रात दिसुन येते आहे
अगदी मनापासून सहमत पन्नासदादा. आणि तसल्या ज्ञानाच्या बळावर इतरांना (ज्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोहोचले नाही अजून त्यांना) शाणपणा शिकवायचा हे तर लै डोक्यात जाते. नेटवरचे चार लेआऊट बघून आम्हाला डिझाईन कसे असावे असे शिकवणारे पण भेटलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मनोबल, परिस्थिती आणि तारतम्य

मैत्र
Mon, 04/01/2013 - 17:03 नवीन
अतिशय उत्तम मुद्दे पेठकर काका. धन्यवाद. कदाचित सुबोध खरे यांचे सर्व प्रतिसाद आणि मूळ लेखाइतका किंवा किंचीत जास्त योग्य असा विचार वाटला. सरसकट १००% सत्य बोलणेच योग्य असे म्हणणार्‍यांनी काहि काळ दुसर्‍या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करावा.. डॉक्टरने खोटे बोलू नये हे नक्कीच मान्य. म्हणजे फसवणूक करण्यासाठी / स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलू नये हे मान्य करायला काही चर्चा किंवा विचार करायला नको. दोन उदाहरण देतो -- हे जवळून पाहिलेले अनुभव आहेत आणि त्यामुळे तुमचे मुद्दे अतिशय पटले -- एका वयस्कर बाईंची अँजियोग्राफी केली जात होती. ती झाल्यावर मोठा ब्लॉक असल्याचे लक्षात आले. जवळच्या नातेवाईकांना बोलवून डॉक्टरांनी त्यांना परिस्थिती दाखवली आणि अँजियो प्लास्टी करण्यास पर्याय नाही हे स्पष्ट केले. प्लास्टी नंतर करण्याचा पर्याय होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि नातेवाइकांच्या विचाराने लगेच करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि पुन्हा पेशंटला टेबलवर हलवून स्टेंट टाकण्यात आला. प्लास्टी होऊन बाहेर आणून अतिदक्षता विभागात जाईपर्यंत रुग्णाला मोठा ब्लॉक असल्याची किंवा प्लास्टि पूर्ण झाल्याची कल्पना दिली गेली नाही. प्लास्टी झाली असल्याने आता काही धोका नाही आणि प्रकृती उत्तम आहे हे नंतर सांगितले गेले. रुग्णाच्या मानसिकतेचा / धीराचा किंवा मनाच्या कमकुवतपणाचा विचार करून हा निर्णय घेतला गेला. सत्यप्रियते साठी त्यांना बाहेर आणून तुम्हाला मोठा ब्लॉक आहे आता प्लास्टी करणार आहोत असं सांगितलं असतं तर अशा व्यक्तीने काय पद्धतीने सर्जरीला सामोरं गेलं असतं ? आता मी बरी झाले आहे या विचाराने त्यांनी नंतरच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद दिला. २. एका पंचाहत्तरीला आलेल्या पण अतिशय खंबीर गृहस्थांना अनेक ब्लॉक निघाले. अत्यंत उच्च मनोबल असण्याचा त्यांचा इतिहास होता आणि मोठ्या ऑपरेशन्स नंतर ८व्या दिवशी उठून चालणे आणि नंतर स्वतः सीडी बघणे अशी स्थिर मानसिकता होती. त्यांना दोन बैठकांमध्ये हृदयाला तीन आणि मेंदूला दोन ब्लॉक आहेत हे सांगण्यात आले. त्यांनी ऑपरेशन न करण्याचा स्वतः निर्णय घेतला. ते न करता स्थिती सुधारण्याचे उपाय विचारले आणि अतिशय निष्ठेने / निग्रहाने ते पार पाडले - ५० वर्षांचे सिगारेटचे व्यसन एका दिवसात सोडण्यापर्यंत. अशा स्थितीत जेव्हा मनुष्य धक्क पेलू शकतो तेव्हा जिवावरचे दुखणेही स्पष्ट सांगता येते आणि त्याचा फायदा होतो. तसाच कमकुवत मनाच्या व्यक्तीला न सांगूनही रुग्णाला फायदा होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नाही पटले

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 17:40 नवीन
डॉक्टरांनी रुग्णाचे 'वैद्यकिय हित' ह्या एकमेव गोष्टीला प्राधान्य देऊन काय तो व्यवहार करावा. मग त्यासाठी सगळे सत्य सांगणे आवश्यक असेल वा कधी संक्शिप्त सत्य सांगणे आवश्यक असू शकते. परंतू हा व्यवहार रुग्णाचा संसार वाचवणे, नितीमत्ता तपासणे, न्याय करणे वगैरे हेतुने केल्यास ते चुकीचे आहे. डॉक्टर कधी कधी स्वतःला न्यायाधिशही समजू लागतात आणि त्यातुन असे गोंधळ होतात. एखादी स्त्री गर्भार असेल तर तिला त्याची कल्पना देऊन योग्य ते उपचार/सुचना/खबरदारी देणे हे डॉक्टरचे कर्तव्य. ती कशी गर्भार झाली, नव्यर्‍यापासुन की बॉयफ्रेंड पासुन, लग्नाआधी की लग्नानंतर ह्याच्याशी त्याला काही मतलब असू नये. ह्याचे भान ठेवल्यास विवाहपूर्व संबंधांमधून गर्भार राहणे हा रोग आहे असे विनोदी निदान डॉक्टर करणार नाहीत. वरील लेखातील उदाहरणात, सदर महिलेचा नवराही ह्या डॉक्टरांचा रुग्ण होता आणि त्याला रिपोर्ट माहित असुनही सत्य परिस्थिती न सांगता त्याची निश्चितच फसवणुक केली गेली आहे. त्याची पत्नी त्याच्याशी एकनिष्ठ नसल्यास ते माहित करुन घेण्याचा त्याला हक्क नाही का?त्या महिलेची ही चूक (चूक आहे हे ही ह्यांनीच ठरवले) परस्पर माफ करुन त्याचा न्याय निवाडा करणारे हे डॉक्टर कोण? इथे ह्या निर्णयाचे स्वागत करणारे किती लोक त्या नवर्‍याच्या भुमिकेतुन विचार करुन ह्या निर्णयाला सहमती देतील? उद्या एखाद्या व्यक्तिच्या हाताचे ठसे एका चोरीच्या संदर्भात तपासण्यास पोलिस घेऊन आले तर ठसे तपासणार्‍या व्यक्तिने ते ठसे तपासुन काय तो निकाल देणे आवश्यक असते. उगाच ठसे तर जुळत आहेत पण त्याने ह्याच्यावर चोरीचा गुन्हा सिद्ध होऊन ह्याच्या कुटुंबाची वाट लागेल, त्याचा संसार वाचवण्यासाठी मला खोटे बोलणे भाग आहे म्हणून नाही जुळले ठसे असे सांगणे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का?
  • Log in or register to post comments

नाही पटले

अधिराज
Tue, 04/02/2013 - 00:11 नवीन
डॉक्टरांनी रुग्णाचे 'वैद्यकिय हित' ह्या एकमेव गोष्टीला प्राधान्य देऊन काय तो व्यवहार करावा.
बंडा मामा ,तुम्ही म्हणता तसे डॉक्टरांनी वागायचे असेल तर मग स्त्रीभृणहत्येसाठीसुद्धा डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. कारण मुलगी आहे म्हणून गर्भपात करण्यासाठी ते लोकच स्वतःहून डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर्स त्यांना असे करण्यासाठी निमंत्रण देत नाहीत. पण अशावेळी हेच अभिप्रेत असते कि डॉक्टरांनी त्यांना सामाजिक भान ठेवून व परिणामांची जाणीव करून देऊन ह्या कृत्यापासून परावॄत्त करावे व आपण ते कृत्य करू नये. तुमच्या वरील विचारांप्रमाणे अशी अपेक्षा डॉक्टरांकडून ठेवणे मग चूकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

अहो अधिराज मी रुग्णाचे

बंडा मामा
Tue, 04/02/2013 - 18:16 नवीन
अहो अधिराज मी रुग्णाचे 'वैद्यकिय हित' म्हंटले आहे 'वैयक्तिक स्वार्थ' नव्हे. स्त्रीभ्रुण हत्या करण्यात रुग्णाचे वैद्यकिय हित कसे काय आहे ते सांगा वरे? तसेच इथे आई आणि मुल हे दोन्ही डॉक्टरांचे रुग्ण आहेत, त्यातील एकाची निव्वळ स्वार्थपोटी हत्या करणे हा तर गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

उद्या एखाद्या व्यक्तिच्या

श्री गावसेना प्रमुख
Mon, 04/01/2013 - 17:58 नवीन
उद्या एखाद्या व्यक्तिच्या हाताचे ठसे एका चोरीच्या संदर्भात तपासण्यास पोलिस घेऊन आले तर ठसे तपासणार्‍या व्यक्तिने ते ठसे तपासुन काय तो निकाल देणे आवश्यक असते. उगाच ठसे तर जुळत आहेत पण त्याने ह्याच्यावर चोरीचा गुन्हा सिद्ध होऊन ह्याच्या कुटुंबाची वाट लागेल, त्याचा संसार वाचवण्यासाठी मला खोटे बोलणे भाग आहे म्हणून नाही जुळले ठसे असे सांगणे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का? चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही, इथे तो थोडे दिवस जेर्ल मध्ये गेल्याने त्याचा संसार कसा काय उधळला जाइल
  • Log in or register to post comments

चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 18:08 नवीन
चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही, इथे तो थोडे दिवस जेर्ल मध्ये गेल्याने त्याचा संसार कसा काय उधळला जाइल
एकदा चोरीचा शिक्का लागला की कुठेही नोकरी मिळणे दुरापास्त होते. सामाजिक खच्चीकरण होते. त्यातुन त्याचा संसार उधळला जाणार नाहीतर काय आणखी बहरणार का? डॉक्टरांच्या उदाहरणातला संसारही १००% उधळलाच गेला असता ह्याची खात्री काय? कदाचित नवर्‍याने समजुतदारपणा दाखवुन एक चूक पोटात घातलीही असती. मुलांकडे पाहुन वा इतर कारणे बघुन अशा परिस्थितीतही लोकं बर्‍याचदा टोकाचे निर्णय घेत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

कदाचित नवर्‍याने समजुतदारपणा

श्री गावसेना प्रमुख
Mon, 04/01/2013 - 18:20 नवीन
कदाचित नवर्‍याने समजुतदारपणा दाखवुन एक चूक पोटात घातलीही असती चुक नवरा ह्या कॅटेगरीतल्या लोकांची मानसीकताच अशी असते की मी बाहेर कुठेही तोंड मारीन पण बायको चरित्रवान हवी,हे माझ म्हणने समस्त पुरुष जातीला लागु पडत असाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

नवरा ह्या कॅटेगरीतल्या

बंडा मामा
Mon, 04/01/2013 - 18:31 नवीन
नवरा ह्या कॅटेगरीतल्या लोकांची मानसीकताच अशी असते की मी बाहेर कुठेही तोंड मारीन पण बायको चरित्रवान हवी,हे माझ म्हणने समस्त पुरुष जातीला लागु पडत असाव
हे तुमचे मत तुम्ही आवश्य बाळगू शकता जो पर्यंत तुम्ही त्यावर आधारीत उपचार लोकांना करत नाही. वरील उदाहरणातही त्या व्यक्तिचा संसार धोक्यात आहे असे माझे मत आहे त्यावर आधारीत मी निर्णय पोलिसांना कळवला तर तुम्हाला तो मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

वरील उदाहरणातही त्या

श्री गावसेना प्रमुख
Mon, 04/01/2013 - 19:06 नवीन
वरील उदाहरणातही त्या व्यक्तिचा संसार धोक्यात आहे असे माझे मत आहे त्यावर आधारीत मी निर्णय पोलिसांना कळवला तर तुम्हाला तो मान्य आहे का? बिनधास्त कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

लग्नाआधी गरोदर असणं चोरी करणं

यशोधरा
Mon, 04/01/2013 - 18:12 नवीन
लग्नाआधी गरोदर असणं चोरी करणं आणि तुरुंगात जाण्यापेक्षाही वाईट आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

या क्षणी समाजरचना अशीच आहे!

कवितानागेश
Mon, 04/01/2013 - 18:26 नवीन
या क्षणी समाजरचना अशीच आहे! :( आणि कुणीही समाज सोडून कुठे जाउ शकत नाही. ....कदाचित माणसे हळूहळू चांगली होतील आणि नसते समज आणि अडाणीपणा सोडतील, अशी आशा आहे (नसते समज= माणसाचे चारित्र्य 'केवळ' त्याच्या सेक्स लाईफवरुन न पारखणं, अडाणीपणा सोडणे= गरोदरपण टाळण्यासाठीचे उपाय शास्त्रशुद्धरित्या माहित होणं आणि सेक्स म्हणजे नक्की काय ते कळणं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा