Skip to main content

जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!

लेखक अभिजित - १ यांनी बुधवार, 23/01/2013 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात. एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे - 'कन्या परक्याचे धन ' मानून घडवलं व्यक्तिमत्व छान सासरी करताना वाटे सार्थ अभिमान ----------------------------------------------- आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !! अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल. इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता. तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?

वाचने 24573
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

भाषांच्या सरमिसळीविषयी, विशेषतः इतर भाषेतले शब्द घेण्याविषयी तितकंसं तीव्र विरोधी वैयक्तिक मत नसल्याने त्याबाबत पास. :)

In reply to by गवि

गविंशी सहमतच शेवटी आलोच जाहिरातीच्या मूळ तत्त्वावर. इटस अ कम्युनिकेशन. आर्ट फॉर पीपल. सांगणारा सांगेल, करणारा करेल, समजून घेणारा घेईल समजून. सगळेच ग्राहक असतात.

In reply to by अभ्या..

हेच... चुकीचं भाषांतर, विरामचिन्हाच्या चुका, शब्दशः आणि असंवेदनशील भाषांतर, संदर्भ सोडून दोन भाषांतले शब्द एकत्र आणून अनर्थ करणे हे सर्व नक्कीच खटकण्यासारखं वाटतं पण केवळ अन्य भाषेतला बहुसंख्य समकालीनांना समजेल असा शब्द आपल्या भाषेत मिसळणं हे नक्कीच वाईट नाही. उदा: अ‍ॅडवणे, पेस्टवणे, सीटबेल्ट बांधा म्हणणे, चातुर्यपूर्ण कोट्यांसाठी भाषा मिसळणे (अमूलच्या अ‍ॅड्स हे उत्तम उदाहरण..) हे सर्व आवडतं..

In reply to by गवि

गविराज, सरमिसळीबद्दल विशेष प्रतिकूल मत माझेही नाही. बोलताना पाहिजे तसे बोला, पण लिहिताना जरा डोके जागेवर ठेवा, अशा मताचा मी आहे. मुळात अशी हिंदाळलेली मराठी विदर्भ भागातसुद्धा फार आहे असे नाही. डोके जाग्यावर न ठेवता लिहिलेले मराठी पाहिले की डोके फिरते, इतकेच.

नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.
खरं म्हणजे मला हे पण खटकतं. लेखन उडवल्या जाईल च्या ऐवजी लेखन उडवले जाईल, हे जास्त बरोबर वाटत नाही का?

In reply to by चाणक्य

उडवल्या जाईल हे काही प्रान्तात बोललेच नाही तर लिहिलेही जाते (बहुदा सोलापूर वगैरे), त्यामुळे हे सवयीने होऊ शकते. अर्थात हे प्रमाण मराठी नाही, मात्र या संस्थळाचा प्रमाण मराठीचा आग्रहही नाही बाकी, (विषय काढलाच आहात म्हणून)प्रत्येक संस्थळावर अशा खटकणार्‍या गोष्टी आहेत. (असा छिद्रान्वेशीपणा करताना) मात्र वृत्तपत्रे व्यावसायिक असतात तर ही सगळीच संस्थळे ही खाजगी आणि हौसेखातर काढली आहेत हे ही ध्यानात घ्यायला हवे. अवांतरःबाकी, अन्यत्र अनेक संस्थळावर असलेले 'आलेले सदस्य' देखील मला खटकते. त्यापेक्षा मिपावरील 'हजर माणसं' हा शब्दप्रयोग अधिक सुयोग्य वाटते, पण अन्यत्र मी त्याकडे दुर्लक्ष करतो कारण त्या सगळ्याच स्थळांवर वाचण्यासारखे बरेच काही सापडते. असो.

In reply to by ऋषिकेश

उडवल्या जाईल हे काही प्रान्तात बोललेच नाही तर लिहिलेही जाते (बहुदा सोलापूर वगैरे)
अज्याबात नाही. सोलापूरात हेच वाक्य लिहायचे झाले तर उडवण्यात येईल असेच लिहितात. आणि खटकायच्या बाबतीत : बाहेरच्यांचे खटकते. आपल्या घरातील खटकत नसते हो.

In reply to by अभ्या..

आणि खटकायच्या बाबतीत : बाहेरच्यांचे खटकते. आपल्या घरातील खटकत नसते हो.
आपला तो बाब्या... ;-) अवांतर :- पूर्वेतिहास बघत हे सगळे प्रतिसाद उडवल्या जाऊ शकतात..

In reply to by ऋषिकेश

उडवल्या जाईल वगैरे मी विदर्भ-मराठवाड्यात ऐकलेले आहे. पच्चिम म्हाराष्ट्रात नै बोलत लोकं तसं.

In reply to by ऋषिकेश

वृत्तपत्रे व्यावसायिक असतात तर ही सगळीच संस्थळे ही खाजगी आणि हौसेखातर काढली आहेत हे ही ध्यानात घ्यायला हवे.
याचे भान आहेच. आणि मिपा वर वाचण्यासरखे भरपूर आहे याचीही जाणीव आहे. म्हणून तर ठाण मांडून आहे ईथे. छिद्रान्वेषीपणा करायचा हेतू नव्हता. असो.

In reply to by ऋषिकेश

उडवल्या जाईल बद्दल काही बोलू नका बरं. त्याच्याविरुद्ध बोलणार्‍यांचे प्रतिसाद 'उडवल्या' जातात असा स्वानुभव आहे.

In reply to by चाणक्य

आणि याच बाबतीत आपले ज्येष्ठ मिपाकर श्री. पेठकर काकांनी मला खूप छान सांगितले होते. त्यांच्या मते आपले आपण शुध्द लिहिणे हेच सर्वात उत्तम. त्यांचे निर्दोष मराठी लेखनातून सुध्दा बरेच काही शिकण्यासारखे आहे.

'झी २४ तास' ने काल एका गोष्टीचा 'पर्दाफार्श' केला आणि बातमीवर 'झी २४ तास इम्पॅक्ट' असा शिक्का मारून बातमी दाखविली जाते. असो. 'आलेलो', 'गेलेलो' हे तर इतकं इतकं वापरलं जातं की तेच शुद्ध आहे असं माझं मत बनत चाललं आहे. तेही असो. डेटॉलच्या जाहिरातीत ५-६ वर्षांची मुले क्रिकेट खेळत असतात त्यांचा चेंडू बाजूलाच बांधकाम चाललेल्या इमारतीच्या पाण्याच्या हौदात पडतो. त्या घाणेरड्या पाण्यात उतरायला कोणी तयार नसतं पण एक मुलगा धाडकन उडी मारतो (पाणी कमरे इतकंच खोल असतं) आणि चेंडू बाहेर काढतो. कारण का तो रोज आंघोळीच्या पाण्यात डेटॉल टाकून की डेटॉलच्या साबणाने अंग धूत असतो. त्याला जंतू संसर्ग होऊच शकत नाही. आता प्रश्न असा आहे हे चलचित्र दूरदर्शनवर पाहून दुसर्‍या एखाद्या मुलाने (तो डेटॉल वापरत असेल किंवा नसेल) एखाद्या हौद्यात उडी घेतली आणि पाण्याची पातळी ७-८ फुट असेल आणि त्या मुलाला पोहता येत नसेल तर काय अनर्थ होईल? चुकीची जाहिरात पाहून एखाद्या लहानग्याचा जीव जाऊ शकतो. डेटॉलच्याच दुसर्‍या एका जाहिरातीत त्याच वयाच्या मुलांचा क्रिकेट खेळताना चेंडू एका बाजूला उभ्या असलेल्या ट्रक खाली जातो. एक मुलगा लगेच ट्रक खाली घुसून तो चेंडू बाहेर काढतो. ट्रक खालच्या धुळीची, जळलेल्या तेलाची, वंगणाची त्याला काळजी नसते कारण तो डेटॉलने आंघोळ करत असतो. परंतु, तो मुलगा ट्र्क खाली असताना ट्रक सुरू झाला असता तर?? जाहिरातींच्या ह्या धोकादायक परिणामांना जबाबदार कोण? एका शीतपेयासाठी तरूण मुलं मुली ह्या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारत, दोरीला लटकत आणि पत्र्याच्या नळकांडीतून ७-८ मजली इमारतीवरून खाली येतात. 'आज काही तुफानी करूया' म्हणणारी ही मुलं काय किंवा अक्षयकुमार काय, शीत पेयं काय किंवा रहदारीतून वेगाने आणि वेडीवाकडी मोटरसायकल चालविणार्‍या त्या जाहिरातीतील तरूण काय सर्वजणांना धोकादायक खेळ खेळायला प्रवृत्त करताना दिसतात. खाली एक बारीक सूचना टाकली की ह्यातील सर्व स्टंट दृष्ये सराईत, पटाईत आणि व्यावसायिक कलाकारांनी केली आहेत आपण प्रयत्न करू नये, की जाहिरातदाराची जबाबदारी संपली? भाषेच्या शुद्धतेबरोबरच आचरणाची शुद्धताही तितकीच (किंबहुना जास्त) महत्त्वाची.

माझी पुतणी शाळेतून सायकलने घरी येते, काल घरी आल्यावर ती म्हणाली, मी मिठाईच्या दुकानाशी आल्यावर डचमळले, कोणत्या रस्त्याने येऊ तेच कळेना!!

मराठीच्या शिक्षिकेने मुलांना वर्गात सांगितले, वडील हा नपुसकलिंगी शब्द आहे. घरी मुलाने पेपर सोड्वताना तोच पर्याय लिहीला. मी त्याला समजावले, त्यावर त्याचे बाईंनी दिलेले स्पष्टीकरण- ते वडील म्हणजे नपुसकलिंगीच!! दुसय्रा दिवशी शाळेत गेले. बाईंचे म्हणणे ते ज्या साठी वापरतो ते शब्द नपुसकलिंगीच!! आदरार्थी बहुवचन त्यांना पटले नाही. 'व्याकरण आम्हीही शिकलोय हो!! काय पण एकेक पालक आहेत!!' एवढे ऐकून परत आले.

In reply to by अनन्न्या

'व्याकरण आम्हीही शिकलोय हो!! काय पण एकेक पालक आहेत!!' हे असलं ऐकून तुम्ही परत आलात? शाळेत मुख्याध्यापक वैगरे प्रकार असतो त्याचीही जाणीव जरा त्या शिक्षिकेला होऊ द्यायचीत की !!

In reply to by अनन्न्या

काय मूर्ख बाई आहे, मुख्याध्यापकांकडून समजावलेत ते उत्तम. अशा बायांचा त्रास शालेय जीवनात मलाही काहीवेळेस सहन करावा लागला आहे.

कालच 'मटा'त कुणीतरी 'भडास काढली' आणि 'कुण्याच्यातरी गाण्यावर तरुणाई थिरकत होती' ची बातमी होती.

२०१३च्या कालनिर्णय क्यालेंडरवर जानेवारी महिन्यातली जाहिरात पाहिल्यास 'का पत्नीच्या यशाच्या मागे पतीचा हात असू शकत नाही' असे काहीतरी लिहिले आहे. एका बाजूला दिया और बाती हम असेही आहे. म्हणजे ही एखाद्या मालिकेची जाहिरात असावी असे वाटते.

आजकाल 'घडवणे'किंवा 'करणे' ऐवजी 'रचणे' हे क्रियापद वापरले जाते. उदा.इतिहास रचला,रेकॉर्ड रचले इ.

In reply to by राही

ते फार पूर्वीपासून वापरात आहे ना ग! "आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी" इ. आहे ना!

In reply to by पैसा

जे पूर्वीपासून वापरात आहे ते योग्य अर्थाने म्हणजे कन्स्ट्रक्ट या अर्थाने आहे. नगररचना, मंदिररचना हे शब्द योग्य आहेत. पण इतिहासाच्या बाबतीत तो घडतो किंवा घडवला जातो. रचला जात नाही. तेच विक्रम किंवा रेकॉर्डच्या बाबतीत. नवा विक्रम केला, आधीचा तोडला हे ठीक वाटते.

In reply to by राही

कविता रचली हे ठीक वाटते, इमारत रचली हेही बरोबर. पण "एखादी कथा रचून सांगतोय" म्हटलं की कल्पनेतलं सांगतोय असाच अर्थ घेतला जातो. इतिहास रचला म्हटले तर तो इतिहास रहात नाही खरे तर!

फसणे या क्रियापदाचा वापर सुद्धा असाच डोक्यात जाणारा असतो. दुसर्‍या भाषेतले शब्द देवनागरीत लिहिताना झालेल्या चुका समजू शकतो. पण कुणी असं माशी टू माशी भाषांतर केलं की उलटं टांगून मिरच्यांची धुरी द्यायची इच्छा होते. यात स्वतःला "मराठी" म्हणवून घेणारी सगळी वर्तमानपत्रे आघाडीवर आहेत. तशी प्रतिक्रिया लिहिली तरी त्या प्रकशित होत नाहीत आणि पुढच्यावेळी तीच चूक पुन्हा केली जाते. यावर आपण काय करू शकतो काही कळत नाही.

मध्यंतरी पुण्यात असताना महानगरपालिकेचे रस्त्यांवरचे फलक वाचनात आले.. "वसंधरेची एकच हाक, पर्यावरण रक्षणाचा घ्या ध्यास"... पुणेकरांकडून तरी अशुद्धलेखनाची अपेक्षा नव्हती...

In reply to by नानबा

कश्यावरून तो पेंटर पुणेकर असेल? आँ? आजकाल कोणालाही कंत्राटे मिळतात असल्या कामांची हे लक्षात यायला हवे आपल्या.

In reply to by नानबा

अहो कधी कधी काय होतं, उकारांच्या जागेवर कोणीतरी रंगाचा ब्रश मारतो आणि असल्या गमती होतात. उदा. सिंहगड रस्त्यावर एका ठिकाणी "वडगाव बदक" असं लिहिलं आहे!

In reply to by आदूबाळ

सूड आणि रेवतीचे प्रतिसाद आधी पाहिले नव्हते. सगळे पुणेकर आपल्या पेंटरांची लाज वाचवायला धावले याची मजा वाटली!

पुणे-बंगळूरू , अर्थात एनेच - ४ वरती, सातार्‍याच्या अलीकडे एक माईल स्टोन म्हणून हाटेल आहे, शिवनेरी बसेस तिथेच थांबतात. तिथे "अनोखे प्रदर्शन" असे लिहिण्याऐवजी "अनोळखी प्रदर्शन" लिहिलेय =))

अहो सुज्ञ पुणेकरांनो, हा फलक रस्त्यापासून निदान २०-२५ फूट उंचावर होता, रस्त्याच्या कडेला नाही. एवढ्या उच्च प्रतिचे पुणेकरच आहेत हो, मुंबईकर बिचारा सामान्य माणसासारखा रस्त्याच्या कडेला थुंकेल, पुणेकरांइतक्या उंचीवर आम्ही कुठले पोचणार? बाकी पुणेकरांना त्यांच्या चुका दाखवल्यानंतर त्यांचा होणारा तिळपापड समजण्यासारखा आहे....

In reply to by नानबा

>>बाकी पुणेकरांना त्यांच्या चुका दाखवल्यानंतर त्यांचा होणारा तिळपापड समजण्यासारखा आहे मुंबैकरांनी ट्रेनमध्ये आधी मराठीत भांडायला शिका, मग पुण्याच्या चुका काढायला या. कसें? नाही म्हणजे पुणेकर जर तुमच्या चुका काढू लागले तर ती धरणी पोटात घेईल तर बरं अशी गत होईल.

In reply to by सूड

चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या.. काय फसवून साबुदाणा खिचडी नायतर मस्तानी घातलनीत की काय तुझ्या अन्नपाण्यात पुणेकरांनी ?!

In reply to by अभ्या..

हेच खरं. मोर पुणेरी दॅन पुणेकर्स व्हायचा प्रयत्न केल्याबद्दल सुडक्याचा तीव्र निषेध. ;)

In reply to by गवि

चाराठ महिन्यांत बाटलास मेल्या.. काय फसवून साबुदाणा खिचडी नायतर मस्तानी घातलनीत की काय तुझ्या अन्नपाण्यात पुणेकरांनी ?!
तुमच्याशी शंभर टक्के सहमत हो गवि. पुण्याला राहायला लागल्यापासून असलंच काही बाही बरळत असतो हा सुड. ;)

अजुन एक... मी सिद्धिविनायकला गेली....मी गिरगावला गेली.. अरे.. सिद्धिविनायकाला... हिंदी मध्ये विभक्ती लावल्यावर शब्द आकारन्त होत नाही..मराठीत होतो... (असचं काहीसं मला शिकल्याच आठवतय..) हिंदाळलेली मराठी...

परवाच एका राजकीय सभेत उद्घोषकाने उच्चारलेले वाक्य " आलेल्या सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत...." आलेले आणि उपस्थित एकच की हो. टी. व्ही वर इंटरव्यू घेताना मरठी पत्रकार.." आता तुमच्या पुढच्या भविष्याच्या काय योजना आहेत...?" हे पुढच आणि मागच भविष्य म्हणजे काय...?

मुंबईतील लोकं मी गेली/आली अस म्हणतात. तसच आपण एखाद्याला म्हणतो कि "एखादा गाणं म्हण बर!" तर मुम्बई त हेच वाक्य "एखादं गाणं बोल बर!" अस म्हणतात. गाणं असं कधी "बोललं" जात का? तसच एखादी निर्जीव गोष्ट कितीला "भेटली" अस विचारतात. एक साधा नियम का लक्षात घेत नाहीत? वस्तू "मिळतात/सापडतात", आणि माणस/व्यक्ती "भेटतात". आणखीन एक नवीनच सापडल. ते म्हणजे एखाद्या क्रियापदाचे एक वेगळाच रूप जे मराठीत अस्तित्वातच नाही. वापरले - "वापरल्या"(???) गेले आहे. खुद्द मिपा च्या धोरणात असे वाक्य आहे. "मात्र कुठल्याही जात, धर्म, वंश, लिंग, भाषा द्वेशासाठी मिसळपाव कधीच वापरल्या जाणार नाही."

शुद्ध मराठी, अशुद्ध मराठी हे मला नेमकं कळत नाही. चुकीचे शब्द, बरोबर शब्द, हेही मला कळत नाही. पण, सर्वांना समजेल असं लिहिलं म्हणजे झालं असं वाटतं. :) [शब्दातून आशय पोहचला की झालं. हे माझं जालावरील प्राचीन मत आहे] :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आशय पोहोचवण्याचे शब्द हे एकमेव नसले तरी महत्वाचे माध्यम आहे. शब्दांच्या योग्य वापराने आशय पोहोचण्याची/ आपले म्हणणे इतरांना समजण्याची शक्यता वाढते हे नक्की!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा, डॉ. बिरुटे यांनी विनोदासाठी वरील प्रतिक्रिया लिहिली असेल तर काही म्हणणे नाही. गंभीरपणे बोलत असतील तर मग 'आनंदी-आनंद' आहे.

In reply to by योगप्रभू

होय, मी गंभीरपणेच बोललो आहे. >>>गंभीरपणे बोलत असतील तर मग 'आनंदी-आनंद' आहे. आपल्या मताचा मी आदर करतो. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by योगप्रभू

>>> माझे मत केवळ आपल्या पहिल्या वाक्यासंदर्भात आहे, इतकेच नमूद करतो. बरं.....!!! कळतच नै म्हणजे एकदमच अडाणी असं नै हो. ''अमूक अमूक चूक कसं आणि धमूक धमूक बरोबर कसं'' या अर्थाने म्हणतो. उदा. ओसाड गावातल्या आमच्या या गावगप्पा पाहा आणि ही चर्चाही मजेदार होती. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, तुमास्नी आडानी म्हनून आमाला पाप पदरात घ्यायाचं न्हाई. पन तुमी सुरवातच येकदम 'माला काई सुद्द-आसुद्द, चूक-बरुबर कळत न्हाई' आशी क्येली तवा म्या तीन्ताड उडालोच. कसं हाय, आमच्याकडं पाटलाखालोखाल मान साळंतल्या गुर्जींचा आस्तुया. आमच्या पोरांना 'सुद्द काय आन् आसुद्द काय' हे तुमी न्हाई तर कोन शिकिवनार?' राग मानू नका मास्तर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दातून आशय पोहचला की झालं.
एक जाहिराती तयार करणारा म्हणून मी प्राडॉ साह्यबांशी अगदी १०० % सहमत आहे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात मराठी भाषा अनेक वेगवेगळ्या शैलीत वापरली जाते. स्वतःची सोडून इतरांच्या शैलीला अशुद्ध म्हणणे हे काही बरे नाही. मला देखील एकेकाळी म्हणाला/म्हणाली ऐवजी म्हणला/म्हणली असे ऐकून खूप विचित्र वाटायचे पण हळू हळू सवय झाली.

मराठीवर हिंदीचा प्रभाव असण्यावर कोणताच आक्षेप नाही. पण ह्या हिंदी सिनेमांमधून हिंदीची जी भ्रष्ट आवृत्ती सादर करतात आणि त्यामुळे आपले लोक तिचाच वापर करत अस्सल मराठ्मोळ्या शब्दांना जी कायमची तिलांजली देतात हे मात्र डोक्यात जाते. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर आपले अस्सल मराठी शब्द भाऊजी, दाजी हे कुठेतरी हरवून त्यांची जागा अगदी सहजपणे 'जीजू' ह्या कपाळाची शीर उडविणार्‍या शब्दाने घेतली आहे.