Skip to main content

सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 08/12/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना हे कायदे निजामी, का लावता फुलांना भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना अंधार दाटताना, रंगून सांज यावी थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना संध्या
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6480
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

कविता आवडली नाही. तुझ्या कविता हळूहळू टाइपकास्ट व्हायला लागल्यात असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

श्री वल्ली, तुम्हाला कवितेतले काय आवडले नाही हे सांगितले तर नक्की काय सुधारणा अपेक्षीत आहे हे सर्वांनाच कळेल. कितीही म्हटले तरी काव्यप्रकटीकरण प्रक्रियेमध्ये कवि / कवयित्रीने काहीतरी विचार केलेला असतो, तो विचार जर आपणांस कळाला असेल तर कविता जास्ती चांगल्या पद्धतीने पोहोचू शकते. किमान त्या विचाराचा उल्लेख आला असता तरी ठीक होते, अन्यथा आपल्या प्रतिसादाचे "मताची एक पिंक" या पलिकडे मूल्य काहीच नाही.

In reply to by प्रचेतस

मी सहमत आहे. संध्याबाई , समजा गजल टाईपचेच काम करावयाचे आहे तरीही वेगवेगळे विषय हाताळा ना जरा ! उदा म्हणून सांगतो . ओ पी नय्यर तसे टाईपकास्ट संगीतकार होते. तरीही रविद्र नाथांच्या मूळ एकला चलो रे या रचनेवर कवि प्रदीप यानी केलेल्या चल अकेला चल अकेला ला चाल लावताना त्यानी आपले नय्यरपण त्यात सोडले नाही. तुम्हाला गजल या आकृतीबंध अतिप्रिय असल्यास आपले गजलीपण कायम ठेवून विषयाची विविधता आणता येईल ना !

In reply to by चौकटराजा

:अओ: चौराकाका, इतर विषयांवरच्या कविता पोष्टल्यात ना मी :) चुकून राहील्या असतील पहायच्या. हे आनंदकंद वृत्त आहे. यात लाखो गीतं लिहीली गेली आहेत. कवितेबद्दल काही सूचना असतील तर अवश्य कराव्यात.

वन मोअर बेस्ट.......... :-) प्रत्येक कडवं म्हणजे एकेक रूपक,पण विषयसूत्र एकच....त्यामुळे ही रचना गजर्‍यासारखी टवटवित झालेली आहे.

व्वा ! क्या बात है !! सुन्दर ! ! !

मला तर आवडली बरका....

खळया हे अनेकवचन आहे अनेकवचनांचे आज्ञार्थी एकवचनी कसे काय बॉ ? अत: मला वाटते सांभाळा का म्हणावे गालातल्या खळ्यांना असे असावे की नाही ?

In reply to by चौकटराजा

अखेर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कविता वाचलीच!:) उत्तर एकः सांभाळा हा शब्द गझल वृत्तात बसत नाही. उत्तर दोनः खळ्यांच्या/गालाच्या मालकाला/मालकिणीला कवी एकेरीत संबोधतो आहे. (जर कळ्यांना धुंदीत तारुण्याचा अर्थ कळाला तर "गालावरच्या खळ्यांना सांभाळ हो तू" असं का बरं म्हणावं कुणी कुणाला?) अ‍ॅम आय राईट कवी?

In reply to by सुबक ठेंगणी

कविता वाचता असे वाटत नाही की पूर्ण कविता खळ्यांच्या मालकिणीला उद्देशून लिहिली आहे . उद्देशून कविता साठी ने मजसि ने ही सावरकरांची कविता समोर आणावी दुसरे असे की सांभाळा हे वृत्तात बसत नसेल तर सांभाळ वापरा हा दृषटीकोन फारच चुकीचा म्हणावा लागेल कारण कवितेत अर्थ महत्वाचा ( खरे तर अर्थ हाच साहित्याचा- भाषेचा मूल हेतू आहे ).आता वृत्ताला ही मान व अर्थालाही याचे उदाहरण देतो. त्यासाठी मराठी काव्यात संस्कुत विभक्तिचा कसा चपखल उपयोग केला आहे पहा. रामे धनुष्य मोडीले , नाते सीतेसी जोडीले . यात रामे हा शब्द मराठीत रामाने असे वापरला पाहिजे पण " रामाने हा शब्द वृत्तात बसत नाही म्हणून रामे या शब्दाचा वापर केलेला दिसतो. हंसे मुक्ता नेली ही काव्यपंक्ति अशीच आहे. वृत्तात बसावे या साठी गीतरामायणात रामासाठी श्री, राम, राघव , रामचंद्र , रघुनंदन, पतितपावन, रघुकुलदीपक अशा विविध अक्षरी शब्दांचा वापर गदिमानी केला होता. ही त्यांची कल्पकताच त्याना शब्दप्रभू ही उपाधि देवून जाते.

In reply to by सुबक ठेंगणी

येस्स :) थँक्स सुबक ठेंगणी. उशिराने पाहिल्याबद्दल क्षमस्व

गुराख्याला : "सांभाळ आपल्या गायींना" ( त्याला अरेतुरे करु शकतो) मालकाला: " सांभाळा आपल्या दिवट्यांना/गायींना " वगैरे वगैरे