मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुकोबा जितोबा तुकाराम... ढिंच्याक ढिच्यांग!

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
येणार येणार म्हणुन ज्याची वाट पहात होतो,तो अमच्या जित्याचा,,, होय जित्या म्हणजे जितेंद्र जोशी यानी साकारलेला त्याच्या इतकाच सहज सुंदर चित्रपट ''तुकाराम''... काय वर्णू ज्याच्या लीला अगाध,अंतरीची कळा तोच असे। सहजभावी सामर्थ्य,हेची मूळ रूप,तया अंतरी अन्य,काही नसे॥ या दोन ओळी आमच्या जित्याला मनापासून समर्पीत करुन हा एक जिवंत/मनस्वी/स्फूर्तीदायक चित्रानुभव लिहायला घेतो... या सिनेमाच्या पहिल्या काहि फ्रेम सरके पर्यंतच मी मनाशी एक खुणगाठ बांधली(खरं म्हणजे ती आधी बांधलेली अटकळही होती..) ती खुणगाठ म्हणजे ही की आज आपल्याला एक नवा तुकाराम पहायला मिळणार... अता नवा म्हणजे काय? तर जुन्याशी म्हणजे पागनीसांनी जो पहिला (त्यातल्या अवडाबाई इतकाच) तुकाराम मनावर कोरुन ठेवलाय/त्याच्या जोडिनी हा दुसरा तुकाराम प्रतिष्ठित होणार. आणी खरोखर तसच झालं.हा संपूर्ण चित्रपट म्हणजे तुकारामांच्या बालजीवनापासून ते त्यांच्या इंद्रायणीत गाथा बुडविण्याच्या प्रंसंगा पर्यंतचा एक जिवनपट आहे. अता हेच आधीच्यापण सिनेमात होतच की...मग यात नवं काय? असा सहाजिक प्रश्न आपल्या मनापुढे येतोच... नवं हे.. की सगळ्या कलाकारांचा सहज सुंदर आणी वास्तववादी अभिनय... कथा/पटकथा/ संगीत/गायन या प्रत्येक आघाडीवर हा सिनेमा शंभर टक्के उतरतो. अता यात कौतुक करण्यासारखं काय? असं म्हणाल तर कौतुक यासाठी की शेवटी जुन्या पागनीसांच्या तुकारामापुढे हा नवा तुकाराम उभा करणं,हे खरोखर कुठल्याच दृष्टीने खायच काम नव्हे. पण या सगळ्या टीमनी अतिशय लीलया आणी निर्भिडपणे हे आव्हान पेललय... सुरवात होते ती तुकारामाच्या बाल जीवनापासून,हा बाल तुकारामपण पद्मनाभ गायकवाड या चुणचुणीत मुलाने तितक्याच चुणचुणीतपणानी सादर केलाय. त्याचा अभिनय बघताना आपल्याला हे जाणवतं,की तुकारामाचं बालपण हे ही सर्वसामान्य माणसासारखच आहे,पण त्यात चौकसपणा/हजरजबाबीपणा/मानवते विषयी करुणा आणी निर्भिड वृत्त्ती या गोष्टी विशेषत्वानी आहेत. सुरवातीचा हा बालपणातला भाग पहाताना,आपलं शंकेखोर मन या बालपणातच सिनेमाचं मध्यंतर येणार काय? म्हणुन काहिसं व्याकुळ होतं.पण चित्रपटाची कथा अशी सहजतेनं हळूहळू पुढे सरकते की आपली ती शंकाही कुतुहला पोटी विसरली जाऊन आपण चित्रपटात कधी बुडून जातो ते कळूही नये.या बालपणातल्या/किशोरवयातल्या नानाविध प्रसंगांपासूनच आपल्याला हे जाणवू लागतं की या माणसात ही संतत्वाची बीजं मुळचीच होती. हा काही अचानक घडलेला इश्वरी चमत्कार नव्हे,तर..विलक्षण प्रतिभा आणी असामान्य मानवी गुणांचा हा एक वेगळा व्यक्तिविशेष आहे. उदाहरणा दाखल आपण यातले दोनच प्रसंग बघू या... वडीलांची सावकारी हा मुलगा लहानपणा पासुन बघत असतो... या दरम्यान एकदा तो आपल्या गरीब मित्राला हतातलं चांदिचं कडं देतो,आणी घरी ते नदीत पडलं असं सांगतो. काही अवधीत ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात येते,आणी त्याबद्दल त्याला आई जाब विचारते,''अरे मैत्रीमधे कोणी चांदीचं कडं देतं का..? कशाला दिलसं ते कडं?'' हा उत्तरतो,'' सोन्याचं नव्हतं ना,म्हणून'' क्षणभर आपण हास्यकल्लोळात रमतो,पण मागून हे लक्षात येतं अश्या लहान वयातही की आपण बहुशः बोलणारे असतो,हा करणारा आहे. दुसरा प्रसंग आहे तो जकातठाण्यावरचा... वडिलांनी व्यापाराचं दिलेलं काही सामान घेऊन तुकाराम आणी त्याचा गडी माणुस असे जकात ठाण्याजवळ येतात,आणी त्यांच्यात व जकात अधिकार्‍यात जकातीवरुन काही वादसंवाद घडत असतात.अश्यातच मठासाठी अन्नधान्य वाहून नेणारे दोन ब्राम्हण तिथे येतात,आणी त्यांनाही जकात ''लागू'' आहे या कारणावरुन ते अधिकार्‍यावर भडकतात. 'ब्राम्हणाकडून देवाधर्मासाठी न्यायच्या अन्नावर(धान्यावर) जकात कसली घेता?' असं विचारतात... तुकाराम जकात अधिकार्‍याला सुनावतो,की 'त्यांच्याकडून जकात घ्यायची नसेल,तर आमच्याकडून तरी का घेता?' या बाणासारख्या सटासट बसणार्‍या संवादाचा शेवट,सगळ्यांना एकच कायदा लागू पडण्यात होतो.आणी ते ब्राम्हण कर देऊन तुकारामावर चडफडत निघुन जातात. ... पडद्यावर प्रसंग पहातांना, हा निर्भिडपणाही सामान्य नव्हे ,हे आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही. नंतर मग पुढे तुकारामाच्या वडिलांचा,,,मागून आईच्या मृत्यूचे दोन हृदयद्रावक प्रसंग आहेत.त्यावेळी पडलेल्या भिषण दुष्काळात घरातली अजुनही एकदोन जणं दगावतात. या पूर्वी तुकारामाचं आई/वडिलांच्या इच्छेनी(पहिल्या बायकोची कुस उजत नाही,याच्या दबावामुळेही) दुसरं लग्नही झालेलं असतं. ही दुसरी बायको म्हणजे अर्थातच फटकळ अवडाबाई... ही अवडाबाईपण पहिल्या सिनेमातल्या अवडाबाईच्या अगदी तोडीसतोड आहे... जितकी कजाग तितकीच धिरोदात्तही. अवडाबाई हे तुकारामाच्या आयुष्यातलं एक प्रभावी आणी महत्वाचं पात्र आहे. ती तुकारामावर सारखी जितकी चिडते/ओरडते,तितकीच खंबीरपणे त्याला सावधही करते.गावातल्या दु:ष्काळाच्या प्रसंगी तुकाराम स्वतःच्या घरातल्या धान्याच्या कणग्या गरीबांसमोर रित्या करतो, तेंव्हा त्याच्यावर चिडणारी अवडा... तुकारामाच्या आयुष्यात संतत्वाची पहिली ठिणगी पडल्यावर त्याला, ''संतत्व की संसार?'' असा खडा सवालही करते. हा प्रसंग असा..की...ज्यांच्याकडे काहिही उरलेलं नाही,निसर्गानं दुष्काळाच्या रुपानी जोरदार चपराक मारलीये,अश्या गरीब शेतकरी/कामकरी जनतेचं आपल्याकडे असलेलं आपल्या वाट्याचं कर्ज,तुकाराम माफ करुन टाकतो...स्वतःच्या वाट्याची कर्जखतं तो इंद्रायणीत बुडवतो,आणी सावकारीला रामराम ठोकुन भांबनाथाच्या डोंगरावर चिंतन करायला निघुन जातो. घरचे शोधाशोध करतात आणी अठवड्याभराच्या कालावधी नंतर तुकोबा घरी परततात. ते थेट अवडाबाईच्या तोफेच्या तोंडी पडायला..! अवडाबाई तुकोबांना,,, ''संसार की संतत्व?'' असा खडा सवाल करते.पण या दोहोतलं एकच स्विकारतील,तर ते तुकोबा कसले? तेही तीला संसार आणी संतत्व(लोकसेवा) या वेगळ्या गोष्टी नव्हेत हे धीर देऊन सांगतात,आणी पुढे तितक्याच कठोरपणे पाळुनही दाखवतात.नंतरचे सगळे प्रसंग हे मंबाजीबुवा/रामेश्वरभट्ट यांच्या रूपानी असलेल्या अन्यायी धर्मव्यवस्थे विरुद्ध तुकारामानी जे जिवनव्यापी युद्ध खेळलं,ते दाखवणारे आहेत. हे सगळे प्रसंग म्हणजे तुकाराम या बीजामधली ''कठिण वज्रासही भेदू ऐसे'' ही वृती म्हण्जे काय? ते दाखवणारे आहेत... चित्रपटातला उत्तरार्धाचा भाग फार महत्वाचा आहे..जुना तुकाराम(पागनीसांचा) आपल्यापासून फारकत घ्यायला लागतो तो इथेच... अर्थातच... म्हणजे काय..? हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट पहावाच लागेल. तुकारामाबद्दलच्या नवसंशोधनाचा प्रभाव चित्रपटावर आहेच,पण तो स्विकार म्हणुन,सोपस्कार म्हणुन नव्हे....! आणी यातच या नव्या म्हणजे मुळच्या तुकारामाचं वेगळेपण सामावलेलं आहे. या चित्रपटाच्या जमेच्या बाजू... १)जितेंद्र जोशी(तुकोबा)/पद्मनाभ गायकवाड(बाल तुकाराम)/राधिका अपटे(अवडा) यांचा लक्षात रहाणारा अभिनय... २)संगीत ही या चित्रपटासाठी असलेली आव्हानात्म बाजू यशस्वीपणे सांभाळलेले संगीतकार- अशोक पत्की आणी अवधूत गुप्ते... ३)ज्ञानेश्वर मेश्राम यानी अतीशय समरसतेनी गायलेली गाणी... ४)शिवाजी-तुकारामाची लक्षात रहाणारी महत्वपूर्ण भेट... ५)तुकारामावरिल नवसंशेधनानुसार चित्रपटाची केलेली (बुडलेली गाथा वर येणे... इत्यादी...चमत्कार विरहीत) मांडणी या चित्रपटाची उणी बाजू म्हणावी तर ती अशी,की चित्रपटाच्या उत्तरार्धात तुकारामानी मंबाजीबुवा/रामेश्वरभट्ट-यांच्या रुपानी असलेल्या, प्रचलीत धर्मव्यवस्थेशी जो जिवन मरणाचा लढा दिला... तो हवा तितक्या विस्तारानी दाखवला गेलेला नाही. तसा जर तो दाखवला गेला असता तर तुकारामाच्या मृत्युचं गूढ सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आलं असतं. आणी ''तुकारामांची गाथा ही पाण्यातुन वर आली नाही,तर लोकगंगेनी लोकमुखी ती तरलेली राहिली'' या प्रसंगावर चित्रपटाचा शेवट करावा लागला नसता... लहानपणापसून मनावर घडलेले संस्कार आणी आजुबाजुला असणार्‍या दीन दुबळ्यांना पिचवणार्‍या समाजव्यवस्थे विरुद्धचा विस्फोट म्हणावा,अश्या स्वरुपाचा परिणाम,म्हणजे भांबनाथाच्या डोंगरावरुन परतलेले ''संत तुकाराम'' असं आपण या तुकारामाविषयी म्हणायला हरकत नाही :-)

वाचने 12442 वाचनखूण प्रतिक्रिया 47

मृगनयनी 08/06/2012 - 22:41
थॅन्क्स अ.आ. .... आपल्या परीक्षणामुळे हा चित्रपट पहावासा वाटतोये!.. अवान्तर : आवली/ आवडा- म्हणजे राधिका आपटे साऊथ इन्डियन पिक्चरमध्ये काम करते का? कुठेतरी वाचल्यासारखे वाटले!! :)

In reply to by मृगनयनी

ही रधिका तू म्हणतेस तिच आहे. ह्या आधी तिला 'मात्र रात्र' नाटकात आणि 'रक्त चरित्र' मध्ये बघितली असशील. तिने बहूदा राहूल बोस बरोबर एक बंगाली चित्रपट देखील केला आहे. सापड्या सापड्या...

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृगनयनी 09/06/2012 - 14:12
ओह येस्स येस्स.. परा!.. "मात्र रात्र"... बरोबर्र!!! आठवलं!... :) "रक्त चरित्र"चा ट्रेलर पाहिल्यामुळे तो पिक्चर पहायची माझी हिम्मत झाली नाही!!! :| आणि "मिपा-इफेक्ट"मुळे मला फक्त साऊथ-इन्डियन'च पिक्चर्स आठवले!! ;) =)) बट थॅन्क्स!.. तिच्या बन्गाली चित्रपटाची माहिती व फोटो दिल्याबद्दल!!! :)

jaypal 08/06/2012 - 23:07
संत. साध सोप तत्वज्ञान जगुन, लोकांना सांगुन गेला. हा सिनेमा नक्कीच थेटरात जाउन बघणार. अवांतर = संत तुकाराम म्हटल की मला नकळत स्व. दिलीप चित्रे आठवतात.

रेवती 08/06/2012 - 23:10
छान परिक्षण. शिनेमा पहावासा वाटतोय. आवडाबाईचं ते संसारासाठी तडतड करताना पाहणं / ऐकणं हे दु:खदायक असल्याने शक्यतो मी त्या वाटेला जात नाही. राधिका आपटे म्हणजे 'घो मला असला हवा' मध्ये काम केलेलीच ना?

In reply to by रेवती

@आवडाबाईचं ते संसारासाठी तडतड करताना पाहणं / ऐकणं हे दु:खदायक असल्याने शक्यतो मी त्या वाटेला जात नाही. >>> अहो नाही,तसं काही नाही... उलट जरुर पहा. यात प्रत्येक व्यक्तिरेखा अधिक वास्तवरुपानं सामोरी आलिये... त्या जुन्यासारखी नाही. @राधिका आपटे म्हणजे 'घो मला असला हवा' मध्ये काम केलेलीच ना? >>> होय तीच ती... :-) @जागो मोहन>>> गाणी यु ट्युबवर आली नाहीत का? >>> गाणी(ऑडिओ) डाऊनलोड करता येतील... या लिंकांवर जा--- http://www.marathimp3.in/marathi-movies/tukaram-marathi-movie-mp3-songs-download/ http://www.marathisongdownload.in/2012/06/tukaram-movie-2012-songs-download.html गाणी म्हणजे-शहेद है भाई शहेद है... ना चख्खोगे तो पछताओगे :-) @ज्यांना फोटू बघायचे असतील,त्यांनी http://www.google.co.in/search?q=tukaram+movie+2012&hl=en&prmd=imvns&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=ukLST7vbEYTprQf6ttj8Dw&ved=0CFwQsAQ&biw=1280&bih=562 इथे जा.. :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

JAGOMOHANPYARE 09/06/2012 - 00:28
काही गाणी ऐकली.. पण मॉडर्न 'अल्बम'मधली गाणी वाटतात.. गिटार, पर्कशन बीट :( सदा माझे डोळा.. आवडले.. मुलतानी राग. बाकी गाणी सामान्य वाटली.

किसन शिंदे 09/06/2012 - 04:43
मस्त लिहलंय परिक्षण. खरंतर विष्णूपंत पागनिसांचा तुकाराम मनात असा काही पाय घट्ट रोवून उभा आहे कि त्यांच्यासमोर जितूला या भुमिकेत पाहणं खुप अवघड वाटतंय.

In reply to by किसन शिंदे

@किसन देवा, तुमची शंका प्रातिनिधिक मानुन उत्तर देतो, तुकारामाचं व्यक्तित्व तेच आहे. जितेंद्र जोशीं आणी पागनीसांचा तुकाराम यात ढोबळ फरक काहिही नाही. यानी त्याच्याशी स्पर्धाही केलेली नाही. अत्यंत उत्कट मनस्विता हा दोघांमधला समान धागा आहे. पहिला तुकाराम सारंरुपानी आलेला/भक्तिमय आहे.हा तुकाराम आणखि वस्तुनिष्ठ/आणी क्रांतिकारक आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे 09/06/2012 - 07:32
हा तुकाराम आणखि वस्तुनिष्ठ/आणी क्रांतिकारक आहे.
"देतो स्पष्ट उत्तरे, पुढे व्हावयांसी बरे" अशा कडक शब्दात आणि चेहर्‍यावरच्या तेवढ्याच कडक हावभावांसकट समोरच्याला ठणकवणारा जितूचा 'तुकाराम' या चित्रपटाच्या एका प्रोमोमध्ये पाह्यलाय. त्यामुळे साहजिकच तुलना होतेय.

In reply to by किसन शिंदे

@त्यामुळे साहजिकच तुलना होतेय.>>> मान्य. आणी हे स्वाभावीकही आहे. ब्रॅडमन आणी तेंडुलकर यांची नाही म्हटलं तरी तुलना होतेच. :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिपक 09/06/2012 - 13:41
ते पागनीस हाय ना ते हंड्रेड पंर्सट तुकाराम हाय. खरा तुकाराम पण तसा नसेल. इती - पेस्तन काका :-) परिक्षण आवडले अ.आ.. लवकर टाकल्याबद्दल धन्यवाद. रविवारी पाहणार आहेच.

In reply to by किसन शिंदे

सुहास.. 09/06/2012 - 22:42
खरंतर विष्णूपंत पागनिसांचा तुकाराम मनात असा काही पाय घट्ट रोवून उभा आहे कि त्यांच्यासमोर जितूला या भुमिकेत पाहणं खुप अवघड वाटतंय. >>> महाप्रचंड आवडलं हे वाक्य ....अरे कुटं ते मळवटलेल्या कापडांमधले विरक्त भाव आणि कुठ जितु :( तरी ही तुकारामाचं नुस्त नाव एकलं तरी आवडुन जाते म्हणुन १.५ चित्रपटाला :)

इनिगोय 09/06/2012 - 09:02
वाचणार नाही.. वाचणार नाही.. बघेपर्रेंत वाचणार नाही!! या पिक्चरबद्दल फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याएवढी उस्तुकत्ता असूनही पुढच्या आठवड्यापर्यंत थांबायला लागणारे.. या दु:खात आहे तूर्तास :( (लिंकांबद्दल धन्यवादम्-..)

प्रचेतस 09/06/2012 - 09:23
उत्तम परिक्षण बुवा. तशाही चंद्रकांत कुलकर्णींचा चित्रपट म्हटल्यावर ह्या चित्रपटाकडून अपेक्षा होत्याच. तुमच्या परिक्षणामुळे त्या पूर्ण होत आहेत असेच दिसतेय.

परिक्षण आवडले. उद्या बघतो आहेच. आणि चक्क चक्क आमचे वैष्णव बांधव ह.भ.प. डाण्राव ह्यांच्या साथीने बघण्याचा योग आहे.

अत्रुप्त आत्म्याच्या परिपूर्ण सिने परीक्षणाने तृप्त झालो आहे. जित्या ला एकदा मुलाखतीत प्रश्न विचारला " कि तुझ्यात गुणवत्ता असून तू संजय ,भरत, मक्या सारखा स्टार का नाही झालास? माझ्या मते त्याच्या नशिबी लिजेंड होणे होते.

In reply to by निनाद मुक्काम …

@त्याच्या नशिबी लिजेंड होणे होते. >>> येस...!अगदी मनातलं आणी सत्य बोललात.ही इज ए लिजेंड :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 09/06/2012 - 22:39
अहो खरंच. राजा गोसावी, राजा परांजपे, आपले अशोकमामा ही खरी लिजेंड माणसे. इतक्या लवकर जितूला लिजेंड मानणे जरा अतीच होतंय हो. बाकी यात तुम्हाला दुष्टपणा अथवा छळवादीपणा काय दिसला हो???

In reply to by प्रचेतस

@काय दिसला हो??? >>> मला प्रतिसाद नेहमी सारखा खेचाखेची करणारा वाटला,म्हणुन मी(ही) नेहमीसारख्याच गमतिनं तंसं लिहिलय... बाकी लिजेंड वगैरे 'आंम्ही'' म्हटलय ते हल्लीच्या तार-तारकांच्या हिशोबात... लिजेंडपणा पासुन जित्या अजुन लांब आहे, हे आंम्हालाही ठाऊक आहे. :-)

In reply to by प्रचेतस

मोदक 09/06/2012 - 23:36
>>>राजा गोसावी, राजा परांजपे, आपले अशोकमामा ही खरी लिजेंड माणसे. दोन राजा माणसांच्या नंतर सुधीर जोशी, शरद तळवलकर, निळूभाऊ वगैरे नावे न येता डायरेक्ट अशोकमामा..? (बाकी चित्रपटातील संवाद सोडले तर दादा कोंडके पण लिजंडच पण त्यावर चर्चा इथे नको.) खवत बोलू..

In reply to by मोदक

प्रचेतस 09/06/2012 - 23:40
ते आहेतच की. नाही कोण म्हणतय. फक्त नावे किती देणार हाच प्रश्न होता. बाकी दादा कोंडक्यांना आम्ही लिजेंड मानत नाही. सोंगाड्या, पांडू हवालदार , एकटा जीव सदाशिव सोडले तर (वसंत सबनीसांबरोबरची जोडी फुटल्यावर) दादांचे बाकी चित्रपट अतिशय टुकार होते.

In reply to by मोदक

अशोक मामा म्हणजे पहिले अर्धशतक रंजनाच्या कुबड्या घेऊन पूर्ण करणारे व उरलेले आपले केसाळ ढेरपोट पोट दाखवत उद्यानात शारीरिक शिक्षणाच्या कवायती करत शाब्दिक विनोद करत एक दशक लक्ष्याच्या कुबड्या घेत मराठी सिनेमाला म्हणजे पांचट विनोदी दर्जा असे समीकरण ८० ते ९० च्या दशकात रूढ करणारे आणि हिंदी सिनेमात मराठीचा सुपर स्टार ( लिजेंड ) फुटकळ ,किरकोळ घरगडी किंवा विनोदी भूमिका करणारे खरे लीजंड

निशदे 09/06/2012 - 20:18
मस्तच केले आहे परीक्षण........ पाहायची उत्सुकता वाढली हे नक्की........

मन१ 10/06/2012 - 18:51
फुटकं नशीब आमचं. नेमकं ह्याच वेळेस चंदिगडला कडमडायचं होतं सहा महिन्यासाठी. आता थेट्रात नाही बघता येणार हा शिनुमा :(

पैसा 10/06/2012 - 19:10
विष्णुपंत पागनीस आणि गौरी यांना विसरून नवा तुकाराम पाहणे कठीण आहे. पण एकदा बघायला हरकत नाही.

सुहास झेले 11/06/2012 - 20:47
तिन्ही परीक्षणे वाचली... एकच कमेंट तिन्ही धाग्यांवर करतोय :) मी नक्की बघणार... तद्दन फालतू हिंदी चित्रपट बघायला आपण थेटरात जातो, मग मायमराठीमध्ये केलेला एक प्रयोग म्हणून, हा चित्रपट नक्की बघणार :) :)

In reply to by सुहास झेले

@तद्दन फालतू हिंदी चित्रपट बघायला आपण थेटरात जातो, मग मायमराठीमध्ये केलेला एक प्रयोग म्हणून, हा चित्रपट नक्की बघणार>>> तुमचा हेतू अतीशय भावला. :-)