✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

स
सोत्रि यांनी
Tue, 03/13/2012 - 04:00  ·  लेख
लेख
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली. सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले. साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
127826 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

योगप्रभू आणि यकु यांचे

बॅटमॅन
Tue, 03/13/2012 - 19:13 नवीन
योगप्रभू आणि यकु यांचे प्रतिसाद सही आहेत.
  • Log in or register to post comments

सोत्रि लेख छान!

पैसा
Tue, 03/13/2012 - 20:09 नवीन
पण काही म्हणा, काड्या करण्यात स्त्री पुरुष समानता आहे हे नक्कीच! योग्या, आमची गणना गाढवातच पण तुझं नाव आजपासून सावळ्या कुंभार!
  • Log in or register to post comments

काय कटकट आहे..

चेतनकुलकर्णी_85
Tue, 03/13/2012 - 20:58 नवीन
काय कटकट आहे.. |( \( :angry:
  • Log in or register to post comments

अहो हे एकमेकांना पुरक वागणं

पिलीयन रायडर
Tue, 03/13/2012 - 21:07 नवीन
अहो हे एकमेकांना पुरक वागणं वगैरे फार नंतर येतं हो...इथे आधी जन्मु तर द्या मुलीला... शक्य झाल्यास गर्भात नाही जमलं तर जन्मल्या नंतर मारलं जाण्याची भीती.. बरं जन्मलात सुखरुप तर धड वागवलं जाल याची काही खात्री नाही... घरात एक न एक तरी "नातेवाईक" सापडतोच जो तुम्हाला तुमच्याच शरीराची किळस आणेल.. बर ते नाही तर बाहेर पडाल तेव्हा 'भीती' घेउनच फिरायच... ही भिती अगदी वय वर्ष २ ते ६० पर्यंत सगळ्याच बायकांना... आम्ही कोणीही असु हो... आंतरजालावर "वैचारिक मैथुन" करणार्‍या, रात्री उशिरा पर्यंत क्लबात पत्ते खेळणार्या, घरातच बसुन राहणार्या, लोकांकडे धुणी भांडी करणार्या, अंगणात खेळणार्‍या, पाळण्यात लोळणार्या..... वर लिहिलेलं चुकतं नाही... कारण ह्या असुरक्षिततेच कारण म्हणजे "शरीर"...सोबतच घेउन फिरतो ना आम्ही... मी मासिक पाळी, गर्भारपण ह्या बद्दल बोलतच नाहीये कारण त्या नैसर्गिक गोष्टी आहेत.. त्याला कोण काय करणार?...मी पुरुषांना भांड्कुदळ बायका कशा वागवतात आणि त्यांची पण कशी दु:ख आहेत ह्या बद्दल पण बोलत नाहीये.. कारण त्या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत... स्वभावावर अवलंबुन... मी बोलतेय अशा समस्यांबद्दल ज्या स्त्रीयांना "स्त्री" म्हणुन आहेत.. आणि त्या पुरुषानी नाही निर्माण केल्या, त्या समाज नावाच्या मिश्रणानी तयार झाल्यात... समानता म्हणजे जे पुरुष करतात ते आम्हालाही करु द्या असं नाहीये.. तर एका माणसाला जे हक्कानी करता आलं पाहिजे ते करु द्या...एखादी गोष्ट न कर्ण्याच कारण "तु मुलगी आहेस" हे असु नये एवढच... ....इथे जन्माचीच शाश्वती नाही तिथे समानता फार लांबची गोष्ट आहे.... आधी किमान जगात येउ तरी द्या...
  • Log in or register to post comments

अगदी अगदी आणि सभ्यतेच्या

जाई.
Wed, 03/14/2012 - 00:08 नवीन
अगदी अगदी आणि सभ्यतेच्या बुरख्याआड लपलेले विकृतांची गोष्टच वेगळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

स्त्रीमुक्ती पेक्षा स्त्री

मराठे
Tue, 03/13/2012 - 22:22 नवीन
स्त्रीमुक्ती पेक्षा स्त्री स्वातंत्र्य हा शब्द मला अधीक पटतो. स्वतः एक स्त्री म्हणून जन्माला आल्याशिवाय त्याची गरज किती आहे हे पुरूषांना समजणारच नाही. काही काही गोष्टी इतक्या सहज गृहीत धरल्या जातात की त्यात काही अन्याय्य आहे हे पुरूषाला काय स्त्रीलाही समजणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक समाजात ही गरज वेगवेगळ्या लेवल ची असून शकते. पाश्चात्य देशातल्या स्त्रीया आपल्या देशापेक्षा जास्त मुक्त आहेत हे स्पष्ट आहे. अर्थात पाश्चात्यांची नक्कल करून दारु किंवा सिगरेट पिणारी मुलगी हे काही त्याचं प्रतिक नव्हे, तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन अगदी लष्करी कारवायात भाग घेणार्‍या स्त्रीयांबद्धल मी बोलतोय. (अर्थात तिथेही सगळं आलबेल आहे असं मानायचं काही कारण नाही). त्याउलट अफगाणीस्तान सारख्या देशांमधे किंवा 'प्रगत' आखाती देशांमधे स्त्रीयांना मिळणारी वागणून सर्वश्रूतच आहे. अगदी भारताबद्दल बोलायचं तर त्यातही समाजरचनेप्रमाणे स्त्रीस्वातंत्र्याचा वेगवेगळ्या पातळ्या आहेत. त्यामुळे एकच एक जनरलाझेशन करून त्यावर बोलणं जवळ जवळ अशक्य आहे. स्वातंत्र्याची सुरूवात मात्र समान संधी देण्यापासून नक्कीच करता येईल. वर काहींनी म्हटल्याप्रमाणे 'जगण्याच्या संधी' पासूनही सुरूवात करता येईल. आजची स्थिती बघता मात्र स्त्रीस्वातंत्र्याची गरज आहे हेच समजण्यासाठी काही पिढ्या जाव्या लागतील असं दिसतंय.
  • Log in or register to post comments

दो. आ. प्र. का. टा. आ.

सेरेपी
Tue, 03/13/2012 - 22:28 नवीन
दो. आ. प्र. का. टा. आ.
  • Log in or register to post comments

दुव्यांवरील निबंध वाचले

धनंजय
Tue, 03/13/2012 - 23:36 नवीन
लेखात उल्लेखलेला पहिला दुवा वाचला :
एके ठिकाणी (दुवा) स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली.
दुवा वाचला. मला हा सारांश तितकासा पटला नाही. "पुरुष कुंकू लावत नाहीत" हा मुद्दा एक विनोदी-क्षुल्लक मुद्दा आहे. मुख्य मुद्दे गुप्त नाहीत, स्पष्ट सांगितलेले आहेत :
विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.
आणि
जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे.
हे दोन्ही मुद्दे मला तरी निरीक्षणावरून ठीकठाक वाटतात. माझ्या नातेवाइकांत तरी माझे निरीक्षण असे आहे : माझ्या चुलत-मावस-आत्ये-मामेभावंडांत आई-वडलांना मुलीच्या लग्नाच्या जितका घोर लागून होता, त्यापेक्षा मुलांच्या लग्नाबाबत घोर लागून नव्हता. माझे कुटुंब हे तितके अपवादात्मक नाही. त्यामुळे दुव्यातील निबंधाचा मुद्दा सकृद्दर्शनी पटण्यासारखा आहे. माझ्या मित्रांपैकी मुले मुली-बघायला गेली, आणि प्रथम नकाराचा हक्क मुलाकडे होता, तर मुली दाखवल्या-गेल्या आणि मुलींकडे फक्त द्वितीय-नकाराचा हक्क होता. अशा प्रकारचा बाजार हा व्यवहारकर्त्यांसाठी वेगवेगळा अकतो. त्यामुळे "जोडीदार मिळण्याबाबत नियम वेगवेगळे आहेत" ही बाब मला पटते. आज कित्येक नवविवाहित जोडपी स्वतंत्र संसार थाटतात. परंतु जी जोडपी आदल्या पिढीसह राहातात, त्यांच्यात नवर्‍याच्या आईवडलांबरोबर राहायचे प्रमाण अधिक आहे, आणि बायकोच्या आईवडलांबरोबर राहाण्याचे प्रमाण कमी आहे. (स्त्रीभ्रूणहत्या वगैरे प्रकार धरूनही) हम दो हमारे एक-दो जमान्यात मुली सुद्धा एकुलत्या असतात. मुलींनी लग्नानंतर लग्नाच्या आदल्या आयुष्याचा मोठा भाग त्यागण्याची प्रथा अजून खूप प्रचलित आहे. (मागच्या पिढीत तर फारच : खुद्द माझ्या आईने लग्न होताच होती ती पर्मनंट नोकरी सोडली, आणि दूरगावी निघून गेली. त्या काळी माझ्या वडलांची नोकरी पर्मनंट नव्हती, आणि थोड्याच वर्षांत त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली. त्या काळात याच्या विरुद्ध सल्ला माझ्या आईला कोणीही दिला नाही. [अशाच परिस्थितीत असलेल्या माझ्या एका नाते-बहिणीने स्थिरस्थावर होईस्तोवर नोकरी सोडणार नाही, असा निर्णय घेतला, हे सांगण्यास आनंद वाटतो. पण आजही काही बायका नोकर्‍या सोडून दुसर्‍या गावात कमी प्राप्तीची नोकरी पत्करतात.] उलट माझ्या आईचे वागणे अपेक्षितच मानले गेले. माझ्या आईच्या फार थोड्या मैत्रिणी त्या नोकरीत टिकून राहिल्या, त्यांना - आणि मग त्यांच्या नवर्‍याला, अपत्यांना - पुष्कळ आर्थिक फायदा झाला. माझी आई तशी शांत आहे, पण क्वचित कधीतरी या निर्णयाबाबत ती खंत व्यक्त करते. हे सर्व वैयक्तिक अनुभव मला क्षुल्लक वाटत नाहीत.) एकूण दुव्यावरच्या निबंधात चांगले, गंभीर आणि माझ्या ओळखीच्या स्त्रियांना सुख-दु:ख देणारे मुद्दे आलेले आहेत. निबंधाची सुरुवात "पुरुष कुंकू लावत नाहीत" या विनोदाने केली आहे, पण कुठल्याशा क्षुल्लक विनोदाने निबंधांची सुरुवात करण्याची शैली सुद्धा प्रचलित आहे. दुसरा दुवासुद्धा चांगला आहे. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक आहेत ही कल्पना फार काळापासून मान्य आहे. शरिरे वेगवेगळी असएले स्त्री-पुरुष कित्येक बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी करतील हे ठीकच आहे निबंधकार म्हणतात :
हां, उस स्थिति में अवश्य बैठाना है जहां वह पूर्ण रू पेण पुरूष के समकक्ष हो।
पण या "समकक्ष"मध्येच तर ग्यानबाची मेख आहे. या दुसर्‍या निबंधातील त्रुटी ही, की समकक्षतेचे कुठलेही उदाहरण नीटसे दिलेले नाही. हे न दिले, तर वाटेल ती बाब "पूरक"मध्ये ढकलली जाऊ शकते. जॉन रस्किन (१८१९-१९००) हा माझ्या आवडत्या निबंधकारांपैकी आहे. त्याच्या न-पटलेल्या भूमिकांपैकी ही एक : त्याच्या मते पुरुषांचे शिक्षण असे असले पाहिजे, की समाजात त्याला महत्कार्ये करता यावीत. स्त्रीचे शिक्षण असे असले पाहिजे की घरच्या पुरुषाला उत्तम सल्ला-मसलत देऊ शकेल, त्यास योग्य मार्गावर ठेवू शकेल, वगैरे. जॉन रस्किन हा एक विशालहृदयी गृहस्थ होता. त्याचा हा निबंध वाचताना स्त्रियांबाबत त्याच्या मनातील सन्मान अगदी स्पष्ट होता. समाजात दोघांचे पूरक आणि वेगळे स्थान आहे, पण दोन्ही स्थाने सन्माननीय आहेत, असे त्याचे मत होते. (संदर्भ : ऑफ किंग्स ट्रेझर्स (पुरुषांच्या शिक्षणाबाबत); ऑफ क्वीन्स गार्डन्स (स्त्रियांच्या शिक्षणाबाबत) त्याचे मत मला न-पटण्याचे कारण २१व्या शतकात सांगायची गरज पडू नये. मात्र जॉन रस्किनची या बाबतीत तरी स्तुती करावीशी वाटते, की "सुविद्य शिक्षकाकडून शिक्षण मिळावे या बाबतीत समकक्ष, तर काय शिक्षण मिळावे त्याबाबत पूरक-वेगळे" हे त्याने स्पष्ट करून सांगितले आहे. दुव्यावरील "अर्धनारीश्वर"मध्ये या उपमा-रूपकाचा प्रत्यक्ष काय परिणाम व्हावा, हे काहीच सांगितलेले नाही. (कुठल्या बाबतीत "समकक्ष" असावे? कुठल्या बाबतीत भिन्न असावे?*) त्यामुळे प्रत्येक जण "आपण आधीच या सुवर्णमध्य पूरकतेपाशी पोचलो आहेत" ही गोड शाबासकी देऊन निबंध वाचून संपवू शकतो. - - - *
"परिवार और समाज में भी कामों के बंटवारे में दोनों को एक-दूसरे का पूरक ही बनाया था। लेकिन बराबरी की बात कहकर स्त्रियों के मन में हीन भावना उपजाई गई है, मानों घर-परिवार में वह पुरूष के बराबर नहीं रही, इसलिए पिछड गई। यह गलत सोच है। यदि पुरूष भी घर से बाहर का काम करता रहा तो वह भी तो पिछड गया। फिर उसके अन्दर तो हीन भावना नहीं है। पुरूष प्रधान समाज कहकर भी हम स्त्रियों के अन्दर हीन भावना का ही सृजन करते हैं।
निबंधलेखिकेचे असे म्हणणे आहे काय की ही गलत सोच नसली, तर स्त्री आनंदाने घरातले काम करत राहील - पुरुष बाहेरची कामे हीन-भावने-विण करत राहातो, तशी स्त्री आनंदी होईल. मला वाटते, की निबंधलेखिकेचे मत साधारणपणे जॉन रस्किनसारखे असावे. २१व्या शतकात?
  • Log in or register to post comments

माझं मत

Pearl
Wed, 03/14/2012 - 02:21 नवीन
या आणि अशा प्रकारच्या धाग्यांवर प्रतिक्रिया देण्यात खरचं काही अर्थ राहिलेला नाही. कारण इथे कुणाला चर्चाच करायची नाहिये. विचार करायचा नाहिये. काही समजावून नाही घ्यायचय. आम्ही म्हणतो तेच खरे आणि ते जोपर्यंत तुम्ही मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही तेचतेच लिहिणार. आणि बाकीचे जण सोयीस्कर मुद्दयांवर +१, +१ करत रहाणार. चर्चा दोन्ही अंगांनी करा ना. दोन्ही बाजू समजावून घ्या. झोपलेल्याला जागं करता येतं. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही जागं करता येत. तुमच्या मते सध्याचा विचार करता जर खरचं स्त्री आणि पुरूष दोघांना समाजात समान (सारखचं) स्थान असेल, तर ज्यांना असे वाटते त्यांनी स्त्री-भ्रूण हत्येचे रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करावे आणि का लोकांना मुली नकोशा झाल्या आहेत ती कारणे स्पष्ट करावीत आणि त्यावर काय उपाय करता येतील सुचवावेत. अगदी भ्रूणहत्या तर लांब राहिली, मुलगी झाली की ज्यांना मुलगी झाली आहे ते माता-पिता, बाळाचे आजी-आजोबा, नातेवाईक यासगळ्यांच्या मनात काय भावना येते?, पहिली प्रतिक्रिया काय असते?, ते खूष होतात का दु:ख्खी होतात?. जर समान स्थान असतं तर का वाईट वाटलं असतं लोकांना. [याला अपवाद असतात. नाही असं मी म्हणत नाही. पण %चा विचार करा.] मुलगी झाली की लोकांना वाईट का वाटतं? किंवा का वाईट वाटत असेल याचा विचार करा. याचाही रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करा ना. काय कारण आहेत? ती दूर करणं आवश्यक आहे की नाही. समाजात जे आजवर चाललं आहे त्यात काहीच इम्प्रूव्हमेंट एरिआ नाहियेत का. आणि आपण सुजाण नागरिक असू तर ते बदल आपल्याला आपल्यापासूनच करायला हवेत ना, आपल्या घरापासून सुरूवात करून. स्त्री-मुक्ती/ स्त्री-स्वातंत्र्य /स्त्री-समानता ..... सोडून द्या हे शब्द. शब्दाभोवती वाद घालणे राहू द्या. पण मुख्य मुद्दा, प्रोब्लेम काय आहे, समस्या काय आहे ते समजून घ्या. अवतीभोवती काय चाललं आहे याचा माणूस म्हणून विचार करा ना. माणूस म्हणून दुसर्‍या माणसाच्या समस्या समजावून घ्यायचा प्रयत्न करा ना. त्यावर काय करता येईल ते पहा ना. माझ्या मते, इथे स्त्री किंवा पुरूष कोण श्रेष्ठ हा मुद्दा नाहिये. दोघही आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत. पण डोळ्याला दिसतं आहे, मनाला जाणवतं आहे, बुद्धीला पटतं आहे की एखादी गोष्ट चूकीची आहे तरीही त्याला ( प्रथेने चाललं आहे म्हणून किंवा त्यात बदल झाला तर आपली गैरसोय होईल म्हणून) विरोध न करणं कितपत बरोबर आहे. बरोबर नाहिये ना.
  • Log in or register to post comments

अर्थकारण

नगरीनिरंजन
Wed, 03/14/2012 - 08:50 नवीन
सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण आहे. घरातली (कुळातली) संपत्ती घरात राहावी म्हणून वारस हवा. वारस सध्याच्या व्यवस्थेत मुलगा असतो. म्हणून मुलगा हवा. मुळात विवाहसंस्थेचा (आणि एकपत्नीत्वाचा/एकपतीत्वाचा) उद्देशच संपत्तीसाठी वारस निर्माण करणे हा आहे. हे कसं बदलायचं? १. मुलग्यांच्या जागी मुलींना वारस मानलं आणि मातॄसत्ताक पद्धती आणली तर? कदाचित अल्पकाळासाठी प्रश्न सुटेल पण दीर्घकालीन परिणाम पाहिला तर आजच्या उलट स्थिती झालेली असेल. शिवाय असा बदल बळंच आणणे शक्य नाही. २. स्त्रियांसाठी कायदे करणे. स्त्रियांनीही अन्याय होत असेल तर अशा विवाहातून बाहेर पडण्याची हिंमत दाखवणे. मला वाटतं हे सद्य स्थितीत होत आहे. स्त्रियांना कायद्याचे बरेच पाठबळ आहे. गरज आहे ती स्त्रियांच्या कृतीची. आज कितीतरी शिकलेल्या मुली पटत नसल्यास सरळ विवाहविच्छेदाचा मार्ग अवलंबत आहेत. त्या स्वतःच्या पायावर उभ्या असल्याने त्यांना संपत्तीला वारस वगैरे प्रश्न तितकेसे भेडसावत नाहीत. याच्या पुढची पायरी म्हणजे गरज आणि इच्छा नसल्यास लग्न न करणे, आपापल्या आई आणि/किंवा वडिलांबरोबर राहणे आणि तरीही अपत्य हवे असल्यास ते जन्मास घालण्याचा हक्क असणे. हे ठरवून केले नाही तरी आपोआप होईल असा मला विश्वास वाटतो. अजूनही मुलगा म्हणजे वारसदार अशी समजूत असलेली स्त्रियांची पिढी अस्तित्वात आहे. ही पिढी गेल्यानंतर उरलेल्या, जागृतीचे प्रमाण जास्त असलेल्या स्त्रियांची पिढी येईल तेव्हा परिस्थिती झपाट्याने बदलू लागेल. आता कोणी म्हणेल हा आपल्या संस्कृतीवर घाला आहे. पण मुळात प्रश्नच (मूळ अर्थकारण लपवणार्‍या) संस्कृतीमुळे निर्माण झाला आहे हे मान्य नसेल तर मग उपाय न करता नुसता वितंडवाद चालूच राहणार. शिवाय समजदार स्त्री-पुरुष एकमेकांच्या सहजीवनाचा आनंद घेतीलच आणि विवाहसंस्था अगदीच नष्टही होणार नाही. कोणी वितंडवाद घालो वा न घालो, बदल करणारे आपल्या आयुष्यात हिंमतीने बदल घडवून आणतच असतात हे किती चांगले आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण

५० फक्त
Wed, 03/14/2012 - 17:19 नवीन
सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण आहे. - उत्तम, आता कुणीतरी मुळ कारणाला हात घातला, ताप आलाय तो व्हायरल आहे, चिकन गुनिया का ड्येंग्यु हे आता समजत आलंय. स्त्रि - पुरुष विषमते / समानतेमागं अर्थकारण हा फार मोठा भाग आहे, जसं जसं अर्थकारण बदलत गेलं, तसा तसा हा विषमता/समानतेचा तोल एकतर ढासळत गेला किंवा साधला गेला असं म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण

Pearl
गुरुवार, 03/15/2012 - 00:58 नवीन
>>सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण आहे.>> बर्‍याच प्रमाणात आहे. पण फक्त तेच एक कारण नाही. अजून अनेक आहेत. वाट पहात आहे अजून काही कोणी त्या मुद्द्यांना हात घालतो/घालते आहे का ते. नाही तर मी नंतर लिहिनच. हे कसं बदलायचं? >>१. मुलग्यांच्या जागी मुलींना वारस मानलं आणि मातॄसत्ताक पद्धती आणली तर? कदाचित अल्पकाळासाठी प्रश्न सुटेल पण दीर्घकालीन परिणाम पाहिला तर आजच्या उलट स्थिती झालेली असेल. >> मान्य. >>२. स्त्रियांसाठी कायदे करणे. स्त्रियांनीही अन्याय होत असेल तर अशा विवाहातून बाहेर पडण्याची हिंमत दाखवणे.>> हे प्रत्येक वेळी शक्य होत नसते. आणि प्रत्येक स्त्री मध्ये तेवढे धाडस असेलच असे नाही. (व्यक्ति तितक्या प्रकृती. नाहितर सगळेचं शिवाजी महाराज/झाशीची राणी झाले असते ना.) तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी अन्यायाला विरोध केलाच पाहिजे, हिंमत दाखवली पाहिजे. (ज्यांना शक्य होत नाही विरोध करणे त्यांच्या बाबतीत असंही होत असावं की लहानपणापासून बर्‍याच जणींची जडणघडण अशी झाली असते किंवा त्यांच्यावर बिंबवले असते की कितीही झालं तरी बायकांनी सहनच करायचे असते, सोसायचे असते etc etc अशा क्रॅप गोष्टी त्यामुळे त्यांना अचानक विरोध करणे अवघड जात असावे.) १) शिवाय मुलं-बाळं झाली असतील तर प्रश्न अजूनच क्लिष्ट, अवघड, गुंतागुंतीचा होतो. कारण आई झाल्यानंतर अपत्यामध्ये जीव अडकलेला असतो. त्याची निकोप वाढ व्हावी असं वाटतं असतं, त्याला आई-वडिल दोघांची गरज आहे हे कळतं असतं, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हाव असं वाटतं असतं. त्यामुळं पटकन विवाहविच्छेद (घ्या असं म्हणायला सोपं वाटतं असलं तरी करायला खूप अवघड आणि पेनफूल असतं) करण्याचा निर्णय घेतला जात नाही. शिवाय मूल झाले असल्यास ते (आईने किंवा वडिलांनी) एकट्याने वाढवणे (सिन्गल पॅरेन्टिंग) हे प्रचंड अवघड काम आहे. आणि त्यामध्ये मुलावर (परिस्थितीमुळे अकारण त्याचा/तिचा दोष नसताना) अन्याय होतो. २) दुसरी केस म्हणजे मुल-बाळ झालं नसेल तर, अशा डिवोर्सीला (किंवा इन जनरलच कोणत्याही) एकट्या स्त्रीला समाज जगणे अवघड करून टाकतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहिर असं होतं असावं. अशा स्त्रियांना (निदान स्त्रियांनी तरी नक्कीच) सपोर्ट दिला पाहिजे. त्यांच्याशी ऑड नाहि वागलं पाहिजे. टोचून नाही बोललं पाहिजे. कमेंट्स नाही पास केल्या पाहिजेत. कमेंट्स पास करणार्‍यांना/त्रास देणार्‍यांना विरोध केला पाहिजे/खडसावलं पाहिजे. असं करणं आपल्या हातात आहे. समाज म्हणून असं वागणं ही आपलीच जबाबदारी आहे. पारंपारिक विवाह पद्धतीतही अनेक दोष होतेच ना. जसं सती जाणे, जरठ-कुमारी विवाह, बहुपत्नीत्व, पाळण्यात लग्न लावणे वगैरे वगैरे. पण वेळोवेळी समाजसुधारकांनी त्याविरूद्ध आवाज ऊठवून या अन्यायकारक रूढी-प्रथा-परंपरा बंद पाडल्या ना. (तेव्हा तेही लगेच अन्याय होतोय ना मग बंद करा ही लग्नपद्धत, लग्न मोडा किंवा लग्न करूच नका, असे म्हणाले नाहीत.) आपल्या समाजसुधारकांनी जे काही चुकीचे होते त्याला कडवा विरोध करून त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणल्या. त्यासाठी अथक प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की हेच केलं जावं. हेच अपेक्षित आहे. जे आपल्याला जाणवतं आहे, आपल्या बुद्धिला पटत आहे की चूक आहे तिथे करेक्शन केलेच पाहिजे आपण. उदा. १) साखरपुडयाचा,लग्नाचा खर्च वधू-वर दोन्ही बाजूंनी ५०-५०% केला पाहिजे. २) हुंडा पद्धत पूर्ण बंद झाली पाहिजे. लग्नातले मानपान पूर्ण बंद केले पाहिजेत. ३) लग्नानंतर मुलीच्या माहेरकडून एका पैशाचीही मागणी होता कामा नये. ४) लग्नानंतर सण-वार आपापले किंवा मिळून साजरे करा. पण सण-वाराच्या नावाखाली मुलीच्या माहेराकडून भेटवस्तू, कपडे, सोन्या-चांदीचे दागिने उकळणे बंद झालेच पाहिजे. ५).... अजून N नंबर ऑफ थिंग्ज. (जे नंतर कधीतरी डिस्कस करू) असो. याचा अर्थ सर्वांनी लग्न करावचं असं काही नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न. >>गरज आहे ती स्त्रियांच्या कृतीची. >> मान्य. अन्याय होत असेल तर त्याला कडाडून विरोध केलाच पाहिजे. >>त्या स्वतःच्या पायावर उभ्या असल्याने त्यांना संपत्तीला वारस वगैरे प्रश्न तितकेसे भेडसावत नाहीत. >> हे काही कळले नाहे. टँजंट गेले. >>याच्या पुढची पायरी म्हणजे गरज आणि इच्छा नसल्यास लग्न न करणे, आपापल्या आई आणि/किंवा वडिलांबरोबर राहणे >> हे मान्य. पण पुढची पायरी वगैरे म्हणून नाही. >>आणि तरीही अपत्य हवे असल्यास ते जन्मास घालण्याचा हक्क असणे. >> याबद्दल विचार करत आहे. >> आता कोणी म्हणेल हा आपल्या संस्कृतीवर घाला आहे. पण मुळात प्रश्नच (मूळ अर्थकारण लपवणार्‍या) संस्कृतीमुळे निर्माण झाला आहे हे मान्य नसेल तर मग उपाय न करता नुसता वितंडवाद चालूच राहणार. शिवाय समजदार स्त्री-पुरुष एकमेकांच्या सहजीवनाचा आनंद घेतीलच आणि विवाहसंस्था अगदीच नष्टही होणार नाही. >> हम्म. >>कोणी वितंडवाद घालो वा न घालो, बदल करणारे आपल्या आयुष्यात हिंमतीने बदल घडवून आणतच असतात हे किती चांगले आहे! >> बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>त्या स्वतःच्या पायावर उभ्या

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/15/2012 - 09:46 नवीन
>>त्या स्वतःच्या पायावर उभ्या असल्याने त्यांना संपत्तीला वारस वगैरे प्रश्न तितकेसे भेडसावत नाहीत. >> हे काही कळले नाहे. टँजंट गेले.
अशा स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रिया नवर्‍याच्या संपत्तीवर १००% अवलंबून नसल्याने वेगळं व्हायचा विचार करू शकतात. किंबहुना त्यांची संपत्ती ही नवरा कमवत असलेल्या संपत्तीइतकीच असू शकते.
हे मान्य. पण पुढची पायरी वगैरे म्हणून नाही.
हे काय समजलं नाही. हे मान्य आहे पण पुढची पायरी म्हणून नाही? म्हणजे ही मागचीच पायरी (म्हणजे आधीच घडलेले) आहे काय? तुम्हाला काही मुद्दे पटले नाहीत आणि काही समजले नाहीत हे अपेक्षितच होतं. कारण बर्‍याच स्त्रियांना स्त्रियांमध्ये आणि विवाहसंस्थेत स्त्रियांना मिळणार्‍या फायद्यांमध्ये बदल नकोयत तर विवाह संस्था टिकवून त्यात त्यांना हवे तेच बदल हवेत आणि पुरुषांनीही कोणताही इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह नसताना केवळ नैतिकता म्हणून पुरुषांना सोयीस्कर असलेली व्यवस्था नष्ट करावी असा आग्रह आहे. अशा स्त्री-समानतेची वाट पाहणार्‍या स्त्रियांना आमच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

(१) >>अशा स्वतःच्या पायावर

Pearl
गुरुवार, 03/15/2012 - 21:55 नवीन
(१) >>अशा स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रिया नवर्‍याच्या संपत्तीवर १००% अवलंबून नसल्याने वेगळं व्हायचा विचार करू शकतात. किंबहुना त्यांची संपत्ती ही नवरा कमवत असलेल्या संपत्तीइतकीच असू शकते.>> बरं मग इथे वारस वगैरेचा काय संबंध आहे. तुमची खाली दिलेली दोन विधाने कॉन्ट्रॅडिक्टरी वाटली. असो. १) त्या स्वतःच्या पायावर उभ्या असल्याने त्यांना संपत्तीला वारस वगैरे प्रश्न तितकेसे भेडसावत नाहीत. २)घरातली (कुळातली) संपत्ती घरात राहावी म्हणून वारस हवा. वारस सध्याच्या व्यवस्थेत मुलगा असतो. म्हणून मुलगा हवा. मुळात विवाहसंस्थेचा (आणि एकपत्नीत्वाचा/एकपतीत्वाचा) उद्देशच संपत्तीसाठी वारस निर्माण करणे हा आहे. असो. (२) >>याच्या पुढची पायरी म्हणजे गरज आणि इच्छा नसल्यास लग्न न करणे, आपापल्या आई आणि/किंवा वडिलांबरोबर राहणे >> हे मान्य. पण पुढची पायरी वगैरे म्हणून नाही. असं मी म्हंटल कारण हे आत्ताही घडत आहे (अगदी तुरळक प्रमाणात का होईना). माझ्या माहितीतली २-३ स्त्री-पुरूषांची उदाहरणं आहेत ज्यांना लग्न करायचं नाहिये. म्हणून मी असं म्हंटलं आहे. (३) >>कारण बर्‍याच स्त्रियांना स्त्रियांमध्ये आणि विवाहसंस्थेत स्त्रियांना मिळणार्‍या फायद्यांमध्ये बदल नकोयत तर विवाह संस्था टिकवून त्यात त्यांना हवे तेच बदल हवेत आणि पुरुषांनीही कोणताही इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह नसताना केवळ नैतिकता म्हणून पुरुषांना सोयीस्कर असलेली व्यवस्था नष्ट करावी असा आग्रह आहे.>> पूर्णपणे अमान्य. विवाहसंस्थेत फक्त स्त्रियांना फायदे आहेत (??) नवीनच कळलं. फक्त स्त्रियांनाच होणारे कोणते फायदे आहेत ते स्पष्ट करा. म्हणजे त्यावर सविस्तर बोलता येईल. माझ्या मते जे लोक विवाह करतात त्यामध्ये दोन्ही बाजूंना विवाह करण्यामध्ये रस असतो, ('इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह' सोडून इतरही) फायदा दिसतो म्हणून हे विवाह होतात. फक्त 'इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह' चाच विचार करायचा झाला तर, १) तुम्ही तुमच्या वृद्ध आई-वडिलांना का सांभाळावं. आता त्यांच्याकडून कोणताच 'इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह' मिळणार नसतो. झालाचं तर खर्चच होणार असतो. मग त्यांना का सांभाळावं? २) आज जी व्यवस्था चालू आहे ती तशीच चालू रहावी असं वाटतं असेल तर त्या व्यवस्थेत 'इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह' मिळणार नसल्याने कोणीही स्त्री-अपत्याला जन्म का द्यावा. त्यांना मारूनच टाकायला हवे किंवा जन्मूच न द्यायला हवे. तेच बरोबर आहे. हो ना. फक्त खर्चच होणार असेल, 'इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह' किंवा 'रिटर्न्स' मिळणार नसतील तर मुलींना जन्माला घालून तोटा का सहन करावा. खरं की नाही. आता 'नैतिकतेचा' विचार करू. नैतिकतेचा फायदा तर पुरूषही सर्रासपणे घेतातच ना. 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' असं जर शब्दश: अस्तित्त्वात आलं तर ते तुम्हालाही नको आहे. कमजोर-दुर्बळ(शरीराने) आणि ताकदवान सगळ्यांना नीट जगता यावं म्हणून तुम्हालाही हीच नैतिकता हवीच आहे, हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरता आहात. त्यासाठी तुम्हालाही कायदा आणि सुव्यवस्था हवी आहे. पोलिस यंत्रणा हवी आहे. १) उद्या रस्त्याने जाता येता सुद्धा तुमच्यापेक्षा ताकदीने जास्त माणसाने विनाकारण (शक्ती जास्त म्हणून) तुमची धुलाई केली तर तुम्हाला चालेल का. २) तुमच्या घरात येऊन गुंडागर्दी करून विनाकारण एखाद्या टोळक्याने तोडफोड केली तर तुम्हाला चालेल का. ३) सहज वाटले म्हणून ताकदवान माणसाने किंवा इतर कोणीही चोरी, दरोडे, खून, मारामार्‍या, बलात्कार, भोकसाभोकसी, लुटालूट केली तर तुम्हाला चालेल का? हे होऊ नये म्हणून तुम्हालाही (सोयीस्कर ठिकाणी) नितिमत्ता हवीच आहे ना. (४)<<तुम्हाला काही मुद्दे पटले नाहीत आणि काही समजले नाहीत हे अपेक्षितच होतं.<< <<अशा स्त्री-समानतेची वाट पाहणार्‍या स्त्रियांना आमच्या शुभेच्छा!<< पण तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. मी समजावून घ्यायला तयार आहे ना. तुमच्या मते मला काय समजत नाही ते समजावून सांगा ना. सविस्तर लिहा. थोडी उदाहरणं देऊन स्पष्ट करा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

प्रथमत: माझ्या दुसर्‍या

नगरीनिरंजन
Fri, 03/16/2012 - 09:30 नवीन
प्रथमत: माझ्या दुसर्‍या प्रतिसादातली भाषा अनावश्यक बोचरी झाल्याबद्दल क्षमा मागतो.
बरं मग इथे वारस वगैरेचा काय संबंध आहे. तुमची खाली दिलेली दोन विधाने कॉन्ट्रॅडिक्टरी वाटली. असो.
ती वाक्ये परस्परविरोधी वाटतात कारण ती दोन भिन्न वर्गाबद्दल आहेत. उदाहरण देतो. समजा एका सधन घरातली पत्नी फारशी शिकलेली नाही आणि नोकरी करत नाहीय. तिचा नवरा आणि एकूणच सासरचे मुलग्याचा हट्ट करतात कारण घरातल्या संपत्तीला वारस हवा (इथे हुंड्याचेही कारण लागू आहेच पण ते तूर्तास बाजूला ठेवू). ही झाली विवाहसंस्थेतील पारंपारिक स्थिती. वंशाला दिवा आणि संपत्तीला वारस हवा ही कल्पना जोपासणारी आणि त्यासाठीच लग्न करायचे असते अशी धारणा असलेली मानसिकता. त्या स्त्रिला नशिबाने मुलगा झाला किंवा नाही झाला तरी ती तिथेच राहणार कारण "मला मी कपडे कोणते घालायचे ते सांगू नका" वगैरे क्षुल्लक कारणांनी ती बाहेर पडली तर तिच्या अपत्याचा त्या संपत्तीवरचा हक्क संपणार शिवाय ती कमवत नसल्याने सांपत्तिक स्थितीत कमालीचा फरक पडणार. आता समजा ती शिकलेली, नोकरी करणारी आणि नवर्‍याइतकेच कमावणारी असेल तर तिला वेगळे होणे सहज परवडते कारण तिला आणि तिच्या अपत्याला संपत्तीच्या बाबतीत काही फरक पडणार नसतो. उलट स्वतःच्या संपत्तीच्या वापराचा हिशेब दुसर्‍याला द्यायला ती बांधील नसते.
माझ्या माहितीतली २-३ स्त्री-पुरूषांची उदाहरणं आहेत ज्यांना लग्न करायचं नाहिये.
लग्न न करणारे लोक पुर्वीही होतेच. पण लग्न करायचे नाहीय पण स्वतःला एक छानसे मूल असावे असे वाटते म्हणून मूल जन्माला घालणारे फार नाहीत आणि ते सहज मान्यही केले जाणार नाही.
विवाहसंस्थेत फक्त स्त्रियांना फायदे आहेत (??) नवीनच कळलं.
माझ्या पूर्ण प्रतिसादात "फक्त स्त्रिया" असा शब्दप्रयोग तुम्हाला कुठे दिसला? उलट ही व्यवस्था पुरुषांना सोयीस्कर आहे असेच मी म्हटले आणि ती पुरुषांना सोयीस्कर आहे म्हणूनच स्त्रियांना मिळणारे जे काही थोडेफार फायदे आहेत ते टिकवून बाकीच्या गोष्टी बदलण्यासाठी पुरुषांना काहीतरी सबळ कारण हवे, तरच ते बदल घडवण्यास पुरुष प्रवृत्त होतील.
फक्त खर्चच होणार असेल, 'इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह' किंवा 'रिटर्न्स' मिळणार नसतील तर मुलींना जन्माला घालून तोटा का सहन करावा. खरं की नाही.
तुम्ही स्त्रीभ्रूणहत्येचा (मला स्त्रीलिंगीगर्भपात हा शब्द बरोबर वाटतो) मुद्दा काढला म्हणून त्याचे कारण मी द्यायचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ सगळेच तसे वागतात असे नाही. काही समाजांमध्ये हुंड्याची पद्धत बंद झाली आहे पण काही समाजांमध्ये कितीही कायदे केले तरी छुप्यापद्धतीने ती चालूच राहणार हे त्या लोकांना माहित आहे म्हणूनच हे प्रकार सगळीकडे नसून काही विशिष्ट प्रदेशांमध्ये चालू आहेत. शिवाय संपत्तीचे रक्षण हे कारण नसते तर हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम महाराष्ट्रातला साखरपट्टा अशा सधन भागांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसले नसते. ज्या सहजतेने एखादे सुशिक्षित, संवेदनशील वगैरे जोडपे अजून आर्थिक स्थिती पुरेशी चांगली नाही म्हणून गर्भपात करून घेते तसेच ते लोकही त्यांच्या संपत्तीसाठी गर्भपात करतात. हे कितीही कटू असले तरी वास्तव आहे. याव्यतिरिक्त म्हातारपणीचा सांभाळ हेही मुलग्यांना जन्म देण्यामागचे एक कारण आहे, पण त्याच्या मुळाशीही शेवटी अर्थकारणच आहे. आज घटस्फोट घेणार्‍या मुलींना त्यांचे आई-वडील आधार देत असतील तर त्याचे कारण मुलगी कमावती आहे आणि आई-बापावर ओझं बनून राहणार नाही हेच आहे. अन्यथा "अ‍ॅडजस्ट" करण्याचे सल्ले दिले जातात. बाकी वृद्ध आई-वडीलांना सांभाळायचा प्रश्न, ज्यांना परवडते आणि सहज शक्य आहे तेच सांभाळतात. अन्यथा पेपरमध्ये थोडेसे चाळल्यास संपत्तीसाठी किंवा संपत्तीअभावी वृद्धांचे किती हाल होतात हे सहज लक्षात येईल. सुस्थितीतलेही किती लोक आज वृद्ध आई-वडिलांबरोबर राहतात? नोकरीधंद्यानिमित्त परगावी/परदेशी गेलेले लोक आई-बाप म्हातारे झाले म्हणून सगळं अर्थकारण सोडून आपल्या खेडेगावी जाऊन राहात नाहीत. आई-वडिलांची म्हातारपणी पाळेमुळे उखडून अन्यत्र जाऊन राहायची तयारी असेल तरच त्यांचा व्यवस्थित सांभाळ होतो हे वास्तव आहे.
हे होऊ नये म्हणून तुम्हालाही (सोयीस्कर ठिकाणी) नितिमत्ता हवीच आहे ना.
नीतिमत्ता सगळ्यांनाच हवी असते म्हणून ती पाळली जातेच असे नाही. अन्यथा संरक्षण आणि कल्याण करण्यासाठी निर्माण केलेल्या या सरकार नामक यंत्रणेत इतका भ्रष्टाचार नसता. शिवाय ही यंत्रणा लोकांच्या हितासाठी काम करते असा तुमचा समज असेल तर तो भ्रम आहे. ही (आणि कोणतीही) यंत्रणा फक्त स्वहितासाठी काम करते. त्या यंत्रणेचे हित जपण्यासाठी काही लोकोपयोगी कामे आवश्यक आहेत म्हणूनच फक्त ती केली जातात. शिवाय राजरोसपणे विकासाच्या नावाखाली लोकांच्या घरात घुसून त्या लोकांना ही यंत्रणा बेघर करते तेव्हा आपणही सोयीस्करपणे डोळ्यावर कातडे ओढतोच ना? नीतिमत्ता पाळण्यासाठी अंधारात राहायची तयारी आहे का आपली? नीतिमत्ता पाळायला पोट भरलेले असणे आवश्यक आहे किंवा भूक लागलेली असताना नीतिमत्ता पाळल्यासच ती भागेल असे बंधन असणे आवश्यक आहे. अन्यथा दुसर्‍याचे शोषण करण्यात कोणालाही काहीही वाटत नाही. आपली संपूर्ण समाजव्यवस्था आणि विवाहसंस्था या शोषणावरच आधारित असताना आणि एका बाजूला झुकलेली असताना ज्यांचा फायदा आहे ते तो सोडण्यासाठी खळखळ करणारच. शोषितांना लढून आणि प्रसंगी ती व्यवस्था सोडून किंवा मोडूनच स्वातंत्र्य मिळवावे लागते. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करायला उगाच नाही सांगितले.
सविस्तर लिहा. थोडी उदाहरणं देऊन स्पष्ट करा ना.
हे पुरेसं सविस्तर आणि स्पष्ट आहे अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

(१) >>पुरुषांना सोयीस्कर आहे

Pearl
Sat, 03/17/2012 - 01:40 नवीन
(१) >>पुरुषांना सोयीस्कर आहे म्हणूनच स्त्रियांना मिळणारे जे काही थोडेफार फायदे आहेत ते टिकवून बाकीच्या गोष्टी बदलण्यासाठी पुरुषांना काहीतरी सबळ कारण हवे, तरच ते बदल घडवण्यास पुरुष प्रवृत्त होतील.>> १) हेच रिझनिंग तुम्ही स्त्रीभ्रूणहत्येबाबत का वापरत नाही. स्त्री अपत्याला जन्म देण्यासाठी जन्मदात्यांना काहीतरी सबळ कारण (इकॉनॉमिक इन्सेन्टीव्ह) हवे ना. तरच ते स्त्री अपत्याला जन्म देण्यास प्रवृत्त होतील. (हो की नाही) २) दुसरं म्हणजे सबळ कारण (हुंडा) मिळाले तरी, ते बदल घडवण्यास पुरुष प्रवृत्त होतीलच कशावरून. असे असते तर सर्वांनीच (पैसे/हुंडा) देऊन लग्नानंतरचे सुखी जिवन अनुभवले असते. पैशाचा ज्यांना हव्यास असतो, त्यांना पैसा कितीही मिळाला तरी कमी असतो. बदल घडविण्यासाठी लागतो तो अ‍ॅटिट्यूड. आणि हा ज्यांच्याकडे असतो ते (स्वतःमध्ये) बदल करण्यासाठी / बदल घडवून आणण्यासाठी पैशाची किंवा इतर फायद्यांची अपेक्षा करत नसावे. (२) >>तुम्ही स्त्रीभ्रूणहत्येचा (मला स्त्रीलिंगीगर्भपात हा शब्द बरोबर वाटतो) मुद्दा काढला म्हणून त्याचे कारण मी द्यायचा प्रयत्न केला आहे.>> कारणं सगळ्यांनाच (मनातल्या मनात) माहिती आहेत हो. पण हा प्रश्न मी त्यांच्यासाठी विचारला होता की जे स्त्री-पुरूष समानता आहे असं म्हणताहेत आणि काही चूकीचे चालू आहे समाजात हे मान्यचं करायला तयार नाहीत. >>याचा अर्थ सगळेच तसे वागतात असे नाही. >> हेच मला इथं सांगायचं आहे की निदान ज्यांच्यामध्ये सारासार विचार करण्याची क्षमता आहे, ज्यांना हे मनोमन पटतं आहे, जाणवतं आहे की नक्की काय चुकतं आहे, कुठे चुकतं आहे, कुठे बदल(करेक्शन) केले पाहिजेत, काय बदल केले पाहिजेत त्यांनी तरी (स्वत:पासून) बदल घडवून आणले पाहिजेत. नक्कीच. म्हणूनच मला हेच सांगायचं आहे की आपण स्वत:पासून, आपल्या घरापासून हे बदल सुरू केले पाहिजेत. हळूहळू समाजातही फरक पडेल. नक्की पडेल. जागृती वाढेल. पण सुरूवात तर करूया. म्हणूनच हे केलं पाहिजे, (जे मी आधीच्या प्रतिसादात लिहिले आहे.) उदा. १) साखरपुडयाचा,लग्नाचा खर्च वधू-वर दोन्ही बाजूंनी ५०-५०% केला पाहिजे. २) हुंडा पद्धत पूर्ण बंद झाली पाहिजे. लग्नातले मानपान पूर्ण बंद केले पाहिजेत. ३) लग्नानंतर मुलीच्या माहेरकडून एका पैशाचीही मागणी होता कामा नये. ४) लग्नानंतर सण-वार आपापले किंवा मिळून साजरे करा. पण सण-वाराच्या नावाखाली मुलीच्या माहेराकडून भेटवस्तू, कपडे, सोन्या-चांदीचे दागिने उकळणे बंद झालेच पाहिजे. ५)लग्नानंतर मुलीचं नावं(आणि आडनाव) बदलण्याची सक्ती नाही केली पाहिजे. ६)मुलींचा जन्म घेण्याचा अधिकार डावलला नाही पाहिजे. ७)घरामध्ये मुलगी आणि मुलगा दोघांना सारखेच प्रेम दिले पाहिजे. शिक्षण दिले पाहिजे. दोघांनाही घरगुती कामे शिकवली पाहिजेत आणि आर्थिक व्यवहारही. ८).... अजून N नंबर ऑफ थिंग्ज. (जे नंतर कधीतरी डिस्कस करू) >>काही समाजांमध्ये हुंड्याची पद्धत बंद झाली आहे पण काही समाजांमध्ये कितीही कायदे केले तरी छुप्यापद्धतीने ती चालूच राहणार हे त्या लोकांना माहित आहे >> लोकांचे जाऊ द्या ना, आपल्याला तर ज्ञान आहे, समज आहे, जाणीवा आहेत, जे आपल्या हातात आहे निदान ते तरी करूया. >>नीतिमत्ता सगळ्यांनाच हवी असते म्हणून ती पाळली जातेच असे नाही.>> आपण आपल्या पातळीवर तर पाळूया ना. >>आपली संपूर्ण समाजव्यवस्था आणि विवाहसंस्था या शोषणावरच आधारित असताना आणि एका बाजूला झुकलेली असताना ज्यांचा फायदा आहे ते तो सोडण्यासाठी खळखळ करणारच.>> अहो म्हणूनच बदल घडवून आणणे आवश्यक आहे. समाज सुधारणा आवश्यक आहे. त्यासाठी ज्यांना कळतं आहे बदल आवश्यक आहेत त्यांनी स्वतः बदल केले पाहिजेत आणि इतरांना पटवून दिले पाहिजे, ते बदल करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आपल्या समाजसुधारकांच्या चळवळी का यशस्वी झाल्या तर त्यांनी लोकांच प्रबोधन केलं, लोकांना पटवून दिलं की चूक काय आहे आणि काय केलं पाहिजे आणि या सगळ्याला समविचारी लोकांनी साथ दिली. हे खूप आवश्यक आहे ना. म्हणून आपण (निदान मी तरी.) काही मोठे समाजसुधारक नसलो तरी आपल्या पातळीवर चांगले बदल सुरू तर करू. जेवढ्या लोकांना समजावून सांगता येणे शक्य आहे त्यांना सांगून तर बघू. >>शोषितांना लढून आणि प्रसंगी ती व्यवस्था सोडून किंवा मोडूनच स्वातंत्र्य मिळवावे लागते. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करायला उगाच नाही सांगितले>> मला वाटतं (अन्याय सहन न करणे, त्याविरूद्ध जागृती करणे, पिळवणूक बंद करणे, शोषण होऊ न देणे) हे महत्वाचे उद्देश कोणत्याही चळवळीमध्ये कॉमन असतात. पण बाकीच्या गोष्टी त्या चळवळीपरत्वे बदलत असतात. म्हणूनच स्पृश्य-अस्पृश्य चळवळ, स्वातंत्र्य लढा, समाजसुधारकांची चळवळ या सर्व चळवळींचे उद्देश सारखेच असले तरी प्रत्येक चळवळ करण्याची पद्धत आणि ज्यांच्याविरूद्ध चळवळ केली गेली तो गट (मे बी टार्गेट ऑडियन्स म्हणता येईल) वेगळी होती. त्यामुळे या चळवळींची सरसकट तुलना करून त्यावरून असे ढोबळ निष्कर्ष काढणे मला चुकीचे वाटते. म्हणूनच मला लग्नव्यवस्था मुद्दामहून आपण बंद पाडावी असं वाटतं नाही तर त्यात सुधारणा करावी असं वाटतं. समाजामधील चुकीच्या रूढी/संकल्पना बंद करून चांगले बदल घडवले गेले पाहिजेत असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

१) साखरपुडयाचा,लग्नाचा खर्च

नगरीनिरंजन
Sat, 03/17/2012 - 17:11 नवीन
१) साखरपुडयाचा,लग्नाचा खर्च वधू-वर दोन्ही बाजूंनी ५०-५०% केला पाहिजे. २) हुंडा पद्धत पूर्ण बंद झाली पाहिजे. लग्नातले मानपान पूर्ण बंद केले पाहिजेत. ३) लग्नानंतर मुलीच्या माहेरकडून एका पैशाचीही मागणी होता कामा नये. ४) लग्नानंतर सण-वार आपापले किंवा मिळून साजरे करा. पण सण-वाराच्या नावाखाली मुलीच्या माहेराकडून भेटवस्तू, कपडे, सोन्या-चांदीचे दागिने उकळणे बंद झालेच पाहिजे. ५)लग्नानंतर मुलीचं नावं(आणि आडनाव) बदलण्याची सक्ती नाही केली पाहिजे. ६)मुलींचा जन्म घेण्याचा अधिकार डावलला नाही पाहिजे. ७)घरामध्ये मुलगी आणि मुलगा दोघांना सारखेच प्रेम दिले पाहिजे. शिक्षण दिले पाहिजे. दोघांनाही घरगुती कामे शिकवली पाहिजेत आणि आर्थिक व्यवहारही. ८).... अजून N नंबर ऑफ थिंग्ज. (जे नंतर कधीतरी डिस्कस करू)
लोकांचे जाऊ द्या ना, आपल्याला तर ज्ञान आहे, समज आहे, जाणीवा आहेत, जे आपल्या हातात आहे निदान ते तरी करूया.
आपण आपल्या पातळीवर तर पाळूया ना.
हे सगळं आणि यापेक्षा जास्त माझ्या पातळीवर मी पाळतो. वाद संपला. इतर कोणी पाळत नसतील तर ते त्यांचा अ‍ॅटिट्यूड बदलतील अशी मी आशा व्यक्त करतो. हे सगळं न पाळणार्‍या लोकांमुळे ज्यांना त्रास होतो त्यांचा बॅक अप प्लॅन काय आहे यात मला रस आहे. लोकांनी बदलावं अशी आशा आपण करू शकतो. ते नाही बदलले तर काय करणार याची तयारी हवी की नको?
म्हणूनच मला लग्नव्यवस्था मुद्दामहून आपण बंद पाडावी असं वाटतं नाही तर त्यात सुधारणा करावी असं वाटतं.
सुधारणा चालूच आहेत. व्यवस्था बंद पाडावी असे वाटत नसले तरी विवाहविच्छेदांचे प्रमाण वाढलेच आहे. त्यामुळे ज्यांना व्यवस्था पटत नाही आणि ती लवकर सुधारेल असे वाटत नाही ते ती थोड्या प्रमाणात का होईना मोडतच आहेत. ज्यांना सद्यस्थितीत झळ बसत नाही आहे ते निवांतपणे व्यवस्था सुधारण्याची वाट पाहू शकतात. तशी आपण पाहू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

१) साखरपुडयाचा,लग्नाचा खर्च

Pearl
Mon, 03/19/2012 - 08:54 नवीन
१) साखरपुडयाचा,लग्नाचा खर्च वधू-वर दोन्ही बाजूंनी ५०-५०% केला पाहिजे. २) हुंडा पद्धत पूर्ण बंद झाली पाहिजे. लग्नातले मानपान पूर्ण बंद केले पाहिजेत. ३) लग्नानंतर मुलीच्या माहेरकडून एका पैशाचीही मागणी होता कामा नये. ४) लग्नानंतर सण-वार आपापले किंवा मिळून साजरे करा. पण सण-वाराच्या नावाखाली मुलीच्या माहेराकडून भेटवस्तू, कपडे, सोन्या-चांदीचे दागिने उकळणे बंद झालेच पाहिजे. ५)लग्नानंतर मुलीचं नावं(आणि आडनाव) बदलण्याची सक्ती नाही केली पाहिजे. ६)मुलींचा जन्म घेण्याचा अधिकार डावलला नाही पाहिजे. ७)घरामध्ये मुलगी आणि मुलगा दोघांना सारखेच प्रेम दिले पाहिजे. शिक्षण दिले पाहिजे. दोघांनाही घरगुती कामे शिकवली पाहिजेत आणि आर्थिक व्यवहारही. ८).... अजून N नंबर ऑफ थिंग्ज. (जे नंतर कधीतरी डिस्कस करू) लोकांचे जाऊ द्या ना, आपल्याला तर ज्ञान आहे, समज आहे, जाणीवा आहेत, जे आपल्या हातात आहे निदान ते तरी करूया. आपण आपल्या पातळीवर तर पाळूया ना. >>हे सगळं आणि यापेक्षा जास्त माझ्या पातळीवर मी पाळतो. >> तुम्ही पाळता त्याबद्दल शतशः धन्यवाद, अभिनंदन आणि आभार. म्हणूनच मला लग्नव्यवस्था मुद्दामहून आपण बंद पाडावी असं वाटतं नाही तर त्यात सुधारणा करावी असं वाटतं. >>सुधारणा चालूच आहेत. व्यवस्था बंद पाडावी असे वाटत नसले तरी विवाहविच्छेदांचे प्रमाण वाढलेच आहे. त्यामुळे ज्यांना व्यवस्था पटत नाही आणि ती लवकर सुधारेल असे वाटत नाही ते ती थोड्या प्रमाणात का होईना मोडतच आहेत. ज्यांना सद्यस्थितीत झळ बसत नाही आहे ते निवांतपणे व्यवस्था सुधारण्याची वाट पाहू शकतात. तशी आपण पाहू या.>> आपण आपल्याकडून जे करता येईल ते करत रहात आहोत. आणि ते करत रहावे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

उत्तम प्रतिसाद.. लग्न

पिलीयन रायडर
Mon, 03/19/2012 - 12:52 नवीन
उत्तम प्रतिसाद.. लग्न व्यवस्था सुधारली तर खुप काही बदलेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

शंभरी

पिवळा डांबिस
Wed, 03/14/2012 - 23:01 नवीन
केवळ धाग्याने शंभरी गाठावी म्हणून हा प्रतिसाद... :)
  • Log in or register to post comments

तरी सत्त्याण्णवच झाले. हा

यकु
Wed, 03/14/2012 - 23:04 नवीन
तरी सत्त्याण्णवच झाले. हा अठ्‍ठ्याण्‍णव. अजून दोन द्या कुणीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अजून चालूच आहे का हे?

पैसा
Wed, 03/14/2012 - 23:11 नवीन
अजून चालूच आहे का हे? नक्की चर्चा कुठे सुरू झाली होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हा घ्या

श्रावण मोडक
Wed, 03/14/2012 - 23:16 नवीन
हा घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

समानता नाही येऊ शकत मात्र

गोंधळी
Wed, 03/14/2012 - 23:46 नवीन
समानता नाही येऊ शकत मात्र स्त्री- पुरुष एकमेकां ना पुरक असावेत.
  • Log in or register to post comments

बरेच प्रतिसाद वाचावेसेहि

जेनी...
गुरुवार, 03/15/2012 - 09:57 नवीन
बरेच प्रतिसाद वाचावेसेहि वाटले नहित , काहि प्रतिसाद सगळ काहि एका वाक्यात सखोल सान्गुन जातायत . स्त्री पूरुष समानता वैचारिक पातळिवर असावि बाकि कुठल्याहि पातळिवर त्यान्च्यात कुठलीच समानता असु नये ते एक्मेकाना पूरक असावेत .
  • Log in or register to post comments

फार जड जात कधी कधी ..समजतच

मनीषा
गुरुवार, 03/15/2012 - 10:32 नवीन
फार जड जात कधी कधी ..समजतच नाही, वाहताना सुद्धा कुठे कसलाच, अडथळा मिळत नाही, वाटत कुठेतरी थांबावं हे सगळ ..पण, कदाचित काय थांबवायचं नक्की, हेच कळत नाही..!!
देवा !!! पुजाताईंना मदत कर .. वादळी चर्चा चालू आहे. यात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाची जी वर्णने आहेत ती वाचून वाईट वाटते ... मनापासून. आणि या पैकी कुठलाही त्रास मला माझा नवरा देत नसताना मी त्याच्याबद्दल तक्रारी करते या बद्दल मला थोडं गिल्टी फीलींग आलं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आणि या पैकी कुठलाही त्रास मला

जेनी...
गुरुवार, 03/15/2012 - 10:53 नवीन
आणि या पैकी कुठलाही त्रास मला माझा नवरा देत नसताना मी त्याच्याबद्दल तक्रारी करते या बद्दल मला थोडं गिल्टी फीलींग आलं आहे. ___________________________________________ देवा मनिषा ताईना शिक्षा कर ... बिच्चारा नवरा :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

शिक्षा कधीच झालीय

मनीषा
गुरुवार, 03/15/2012 - 12:55 नवीन
शिक्षा कधीच झालीय आम्हाला...:) तुम्ही मधुचंद्रात होता त्या मुळे तुम्हाला कळले नसेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

शिक्षेच नाव काय ठेवलय मंग

जेनी...
Fri, 03/16/2012 - 09:31 नवीन
शिक्षेच नाव काय ठेवलय मंग तुम्हि...;) आमच्या मधुचन्द्रात आम्हि तुमच्या शिक्षेचा विचार कशाला करत बसु ?:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

तात्पर्य?

कवितानागेश
गुरुवार, 03/15/2012 - 11:08 नवीन
मला वाटते, ( ही साली माजलेली)विवाहसंस्थाच बंद झाली तर फक्त स्त्री-पुरुषच काय, लहान-थोर, गरीब-श्रीमंत, मागास-ओपन ;), अशा सगळ्या प्रकारच्या समानता येउ शकतात. अशा वेळेस सगळे हितसंबंध फक्त अर्थकारणावरच आधारीत रहातील. सगळे लोक फुकटचा भावनिक वगरै मुलामा सोडून देउन शुद्ध व्यावहारिक पातळीवर जगायला लागतील. एवढे लिहून मी मान टाकतेय.... :( जय हिंद. जय महाराष्ट्र.
  • Log in or register to post comments

एवढे लिहून मी मान

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/15/2012 - 12:05 नवीन
एवढे लिहून मी मान टाकतेय....
चला चर्चेतून काहीतरी साध्य झालं म्हणायचं. ;-) (ह.घ्याहो) भावनिक जवळीकीसाठी विवाहसंस्थेसारख्या कृत्रिम गोष्टींची गरज पडते हे कळल्याने मी ही मान टाकतो. :) एका डेरेदार झाडासारख्या परिपूर्ण संस्थेला सहज उखडणार्‍या मनुष्यप्राण्याला परिपूर्णतेपासून मैलोन्मैल दूर असणारी आपली कृत्रिम संस्था तोडायच्या नुसत्या कल्पनेनेही वेदना व्हाव्यात हे रोचक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ठ्ठो...

सोत्रि
गुरुवार, 03/15/2012 - 15:52 नवीन
चला चर्चेतून काहीतरी साध्य झालं म्हणायचं. Wink
फुटलो! - (समानतावादी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

दृष्टीच परिपूर्ण असेल तर

कवितानागेश
गुरुवार, 03/15/2012 - 12:40 नवीन
दृष्टीच परिपूर्ण असेल तर कुठल्या संस्थेची गरजच नाही. पण तसे सहज होत नाही. सगळेच येशू नसतात, सगळ्या प्राणीमात्रांशी प्रेमानी वागायला... समाजजीवनात कुठल्यातरी नियमांचा चाबूक वापरावा लागतो. फक्त काळाप्रमाणे रिंगमास्टर आणि चाबूक बदलत जातात ... ज्यांना चाबूक नको असेल, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जंगलात भटकण्याचे बळ बाळगावे. स्वगतः च्यायला, चांगले मुटकुळं करुन कोपर्‍यात पडले होते तर... :(
  • Log in or register to post comments

फक्त काळाप्रमाणे रिंगमास्टर

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/15/2012 - 13:33 नवीन
फक्त काळाप्रमाणे रिंगमास्टर आणि चाबूक बदलत जातात ... ज्यांना चाबूक नको असेल, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जंगलात भटकण्याचे बळ बाळगावे.
सहमत आहे. हेच माझेही म्हणणे आहे. :) (आणि तेच मी वरती वेगळ्या शब्दात मांडले आहे.) पण बळ नसताना लोक उगाच स्वातंत्र्य आणि समतेच्या नावाने फक्त आरडाओरडा करतात त्याला आपण काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ज्यांना चाबूक नको असेल,

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/15/2012 - 14:39 नवीन
ज्यांना चाबूक नको असेल, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जंगलात भटकण्याचे बळ बाळगावे.
काय पण बोलालतात. लाख रु की बात है. पण माऊ ताई, इथल्या रणरागिणी त्यांना हवे तेच आणि हवे तितकेच वाचतात बरे. त्यामुळे हे वाक्य अनुल्लेखाने मारले जाईल याची खात्री बाळगा. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बहुतांश सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/15/2012 - 23:32 नवीन
समाजजीवनात कुठल्यातरी नियमांचा चाबूक वापरावा लागतो. फक्त काळाप्रमाणे रिंगमास्टर आणि चाबूक बदलत जातात ...
यात थोडी भर टाकावीशी वाटते. नियमांचे चाबूक आणि रिंगमास्टर आपले आपणच असावे की बाहेरचा समाज याचेही निर्णयस्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळावे. (अगदी आज अमक्या रंगाचे कपडे का घातले, लग्न कधी करणार, पाळणा कधी हलणार वगैरे भोचकपणा समाजात अनेक ठिकाणी दिसत असताना समाजाला रिंगमास्टर अजिबातच समजू नये.)
ज्यांना चाबूक नको असेल, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जंगलात भटकण्याचे बळ बाळगावे.
याच संदर्भात, मेघना भुस्कुटे म्हणते "स्वतंत्र व्यक्तीने परतंत्र व्यक्तीला पारतंत्र्याची जाणीव करून देणे (मग पुढे काय व्हायचे असेल ते त्या त्या व्यक्तीच्या इच्छेने होवो) हेही सामाजिक सुधारणांचा अविभाज्य भाग आहे, असले पाहिजे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आपले आपण नियम आखण्याचे

कवितानागेश
Fri, 03/16/2012 - 00:25 नवीन
आपले आपण नियम आखण्याचे स्वातंत्र्य आता तरी प्रत्येकाला आहेच. पूर्वी काय होते, किंवा पूर्वीच्या काळाचा पगडा असलेले लोक काय करतात यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. निदान 'कुठेतरी काहीतरी चुकतंय' याची जाणीव समाजाला येतेय, आणि वैयक्तिक पातळीवर सुद्ध 'स्वातंत्र्य हवे' हे गोष्ट पुढची पिढी मागच्या पिढीला सांगू शकतेय, ही समाधानाचीच बाब आहे. इथे मी स्त्री हा शब्द न वापरता पिढी चा विचार करतेय, कारण आता स्वातंत्र्य दोघांनाही हवे आहे. बाकी भोचकपणा पुरुषांच्या बाबतीतसुद्धा होतोच. तो मनावर न घेणे हे आपल्या हातात आहेच. अरे हो. यकुचा निषेध करायचं राहूनच गेलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आपले आपण नियम आखण्याचे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/16/2012 - 02:10 नवीन
आपले आपण नियम आखण्याचे स्वातंत्र्य आता तरी प्रत्येकाला आहेच.
खरंच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पूर्वी काय होते, किंवा

मस्त कलंदर
Fri, 03/16/2012 - 11:12 नवीन
पूर्वी काय होते, किंवा पूर्वीच्या काळाचा पगडा असलेले लोक काय करतात यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
हे लोक आपल्या समाजाचा आणि/ किंवा घरातला भाग नाहीयेत का? आणि वेशभूषा स्वातंत्र्य म्हणजेच समानता किंवा स्वातंत्र्य जरी नसलं तरी अजूनदेखील टिकलीचा आकार आणि रंग, केसांची लांबी , कधी कुठले कपडे घालावे यामध्ये सासवा-आयांचा हस्तक्षेप नाही असं वाटतं का तुला?
आपले आपण नियम आखण्याचे स्वातंत्र्य आता तरी प्रत्येकाला आहेच.
हे जरी असलं, तरी आपलं स्वातंत्र्य जपण्यासाठी सतत तलवार घेऊन उभं राहायचं (निदान वरच्या वाक्यांच्या संदर्भात तरी) की दोन दिवस डोकं बाजूला ठेऊन त्या लोकांच्या मनासारखं वागायचं यात दुसरा पर्याय जास्त वेळा स्वीकारला गेल्याचं आढळून येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तिसरा पर्याय.

कवितानागेश
Fri, 03/16/2012 - 12:46 नवीन
हे लोक आपल्या समाजाचा आणि/ किंवा घरातला भाग नाहीयेत का? > हे लोक आपल्या भावविश्वाचा देखिल भाग असतात. आणि 'हे लोक' आपल्याच 'नैसर्गिक जाती'तले देखिल असतात! म्हणूनच मला नेहमी असे वाटते, की भांडून/ वाद घालून उपयोग होत नाही. आपले म्हणणे त्यावर ठामपणे कृती करुन पटवून देता येते. थोडा वेळ लागतो. पण परिणाम पक्के होतात. मागच्या पानावर शिल्पा ब नी सुद्धा लिहिले आहे, कि आधी घरात स्त्रीला मान मिळायला हवा. या सगळ्यावर मला असे वाटतय, की मुळात माझ्या मनात माझ्या नैसर्गिकरीत्या स्त्री असण्याबद्दल पॉजिटिव्ह आनंद आणि अभिमान असेल, तर तो मी नक्कीच माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवू शकेन. मुळात मलाच जर स्त्रीत्वाबद्दल नकोसेपणा, कमीपणा असेल, तर बाकी कुणी कशाला मानबिन देत बसतील? त्यात तलवारही नको, आणि शरण जाणेही नको. अजून पुष्कळ गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हे लोक आपल्या भावविश्वाचा

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/17/2012 - 02:36 नवीन
हे लोक आपल्या भावविश्वाचा देखिल भाग असतात.
खरंच असतात का लाईलाज को क्या इलाज असाही काही भाग असतो? (बरेच नातेवाईक, जुने मित्र-मैत्रिणी या लोकांना भेटल्यावर काय बोलायचं हे समजतच नाही. कारण लोकं वेगवेगळ्या पद्धतीने, प्रकारांनी मनुष्य म्हणून विकसित होतात. आणि मग बोलण्यासारखं कॉमन काही रहातच नाही. आपण नुकतंच कुरूंदकरांचं पुस्तक जिरवत असतो आणि समोरचा कॉर्बेटच्या शिकारकथा!)
स्त्रीत्वाबद्दल नकोसेपणा, कमीपणा असेल
हे कुठे मधूनच आलं? अवांतरः नैसर्गिकतः मिळालेल्या (किंवा न मिळालेल्या) गोष्टींबद्दल (उदा: वर्ण, उंची, केसांची लांबी, चष्म्याचा नंबर, लिंग इ. असंख्य) आनंद (किंवा दु:ख) मला फार दखल घेण्यालायक वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लाईलाज असेल तर अशा माणसांना

कवितानागेश
Sat, 03/17/2012 - 09:38 नवीन
लाईलाज असेल तर अशा माणसांना फारसे मनावर घ्यायचे कारण नाही. 'देखल्या देवा दंडवत' घालून मोकळे व्हायचे. आणि खरोखर 'आपलेपणा' असेल तर समजून घेता येतंच, आणि समजावून देखिल सांगता येते. वाद घालण्यापेक्षा ते जास्त परिणामकारक होते, असा माझा अनुभव आहे. स्त्रीत्वाबद्दल नकोसेपणा, कमीपणा असेल हे कुठे मधूनच आलं?> 'इतरांनी मान द्यावा' अश्या अपेक्षेतून! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याला आपण काय करणार?> वायफळ

कवितानागेश
गुरुवार, 03/15/2012 - 13:16 नवीन
त्याला आपण काय करणार?> वायफळ चर्चा करता येतील! ;)
  • Log in or register to post comments

मग इतकावेळ काय करत होतो?

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/15/2012 - 13:59 नवीन
मग इतकावेळ काय करत होतो? :-D
  • Log in or register to post comments

उठा बरं इथून सगळे! चला, पळा..

यकु
गुरुवार, 03/15/2012 - 14:04 नवीन
उठा बरं इथून सगळे! चला, पळा.. भागो यहां से ती इंटरनेटची कनेक्शन्स कापून टाका आणि पडून र्‍हा गप. मिपासह सगळी मराठी संकेतस्थळं विसर्जीत होणारेत.. बॅकप मारुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आता का बरे?

धन्या
गुरुवार, 03/15/2012 - 18:13 नवीन
आता कुठे स्त्रीया मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत, जालावर वावरु लागल्या आहेत. आणि जरा कुठे स्त्रीयांचा जालावरचा वावर वाढायला हवा, तो पुरुषांइतकाच व्हायला हवा असा विषय निघाला तर तुम्ही इंटरनेट कनेक्शन तोडण्याच्या आणि संकेतस्थळं विसर्जित करण्याच्या गोष्टी करता? यकुंच्या या संकुचित वृत्तीच्या प्रतिसादाचा अखिल समतानगर लोकसुधारक मंडळातर्फे त्रिवार निषेध !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

निषेध! निषेध!! निषेध!!!

सोत्रि
गुरुवार, 03/15/2012 - 18:21 नवीन
खरंय, यकुचा त्रिवार निषेध !!! - ('समतानगर'च्या ग्रीनकार्डसाठी अप्लाय केलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

माझ्या लेखाला दिले असते का

रेवती
गुरुवार, 03/15/2012 - 19:55 नवीन
माझ्या लेखाला दिले असते का कुणी इतके प्रतिसाद?;) छ्या ! जळजळ्......पुन्हा इनो.
  • Log in or register to post comments

रेवती आज्जी, तुम्ही बसा ना

यकु
गुरुवार, 03/15/2012 - 19:57 नवीन
रेवती आज्जी, तुम्ही बसा ना देवधर्म करीत ;-) काही आठवतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हो हो आठवतय ना. पण इतके

रेवती
गुरुवार, 03/15/2012 - 20:33 नवीन
हो हो आठवतय ना. पण इतके नव्हते हो यकु. जाऊ दे! हरी हरी करत बसावं झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा