✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिवरात्र-नरहर कुरुंदकर...

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Tue, 02/21/2012 - 02:14  ·  लेख
लेख
आज मनात आलं,मी तर तात्विक अर्थानं काही धार्मिक उरलेलो नाही.त्यामुळे आज मी काही कुठे स्वतःसाठी शिवरात्री निमित्तानं स्वतः शंकराची पूजा उपासना वगैरे करायला बसणार नाही.पण असं असलं तरी व्यावहारिक अर्थानं अश्या दिवशी काही चांगलं करावं,असं वाटण्या इथपर्यंत मी धार्मिक आहेच...मग काय करायचं..? झटकन लक्षात आलं,की आपण जर का शिवरात्र या दिवसाचा एक चांगला अनुषंग मनात ठेवत आहोत.तर नरहर कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकाची आपल्याला जमेल तशी ओळख का करवुन देऊ नये...? अलिकडेच सागर यांनी कुरुंदकरांचं एक पुस्तक वाचकां समोर ठेवलच आहे. तसाच माझाही हा एक अल्पमती प्रयत्न.... शिवरात्र-नरहर कुरुंदकर... तर ओळख करुन घेऊया शिवरात्र या पुस्तकाची...कुरुंदकरांनी प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे हे पुस्तक म्हणजे त्यांनी लिहिलेल्या राजकिय लेखांचा संग्रह आहे.एकंदर नऊ लेख या पुस्तकात आहेत... १)श्री.गोळवलकर गुरुजी आणी महात्मा गांधी... हा लेख, गोळवलकर गुरुजी आणी संघ परिवार यांनी गांधिजिंना ज्याकाळी प्रातःस्मरणीय राष्ट्रपिता म्हणण्यास सुरवात केली त्यावेळच्या परिस्थितीचे आकलन करवुन देणारा आहे.यात कुरुंदकर असे दाखवुन देतात की, गोळवलकर व संघ परिवाराला गांधीना प्रातःस्मरणीय.राष्ट्रपिता असे म्हणण्याचा अधिकार आहे..पण ते तसे का म्हणत आहेत? तर त्याकाळची एक राजकिय सोय म्हणुन...! जनता ज्या ज्या व्यक्तिंना/घटनांना आपलं मानते,त्या त्या व्यक्ति घटनांना-आपला आदर्श म्हणुन घोषित करणारे,तिच्यावर आपला हक्क सांगणारे-लोक/पक्ष/प्रवाह स्वतः तसे वागतात काय..? याचा परामर्श या लेखात घेण्यात आला आहे... एकेकाळचे गांधीविरोधक आज गांधिंचे भक्त का बनत आहेत..? हा त्यातला मुख्य मुद्दा आहे... २)गोळवलकर गुरुजी आणी चातुर्वण्य... हा लेख गोळवलकरांच्या चातुर्वण्य भक्तिचे चहुबाजुनी बिंग फोडणारा लेख आहे...एखाद्या राष्ट्रीय म्हणवल्या जाणार्‍या संघटनेचा नेता कोणकोणत्या पातळीवर आणी किती दांभिक असू शकतो....तसेच तो असे का वागतो,त्या मागची गरज काय आसते..? अश्या अनेक मुद्यांना कुरुंदकारांनी त्यांच्या साध्या सोप्या आणी संयमित शैलीने उत्तरे दिली आहेत...किंबहुना गोळवलकर गुरुजी संघ परिवार आणी चातुर्वण्य या तिनही गोष्टी म्हणजे परंपरानिष्ठ असलेल्या हिंदू समाजावार पसरलेला दंभाचा केवढा मोठ्ठा मुखवटा आहे...हे या लेखातुन अतिशय उत्तम व मार्मिकतेने समजते ३)गांधीहत्या आणी मी... हा लेख,गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या गांधीहत्या आणी मी... या पुस्तकाचा टिकात्मक परामर्श आहे...यात गोपाळ गोडसेंनी अनेक खोट्या आणी दिशाभूल करणार्‍या घटना,तसेच मुद्दाम संदेह निर्माण करुन ठेवणार्‍या गोष्टी/विधानं कशी घातली आहेत,हे कुरुंदकरांनी अत्यंत तपशिलवार पद्धतीने दाखवुन दिले आहे. ४)खान अब्दुल गफारखान... खान अब्दुल गफारखान म्हणजे ज्यांना इतिहास सरहद्द गांधी म्हणुन ओळखतो ते...खरोखरच सरहद्द गांधी हे नामाभिधान सार्थ केलेलं हे व्यक्तिमत्व होते.यांची एकुणात कारकिर्द,वाटचाल या लेखात आपणाला वाचायला मिळते... ५)मौलाना आझादःएक स्मरण... हा लेख म्हणजे मौलानांच्या भक्तिचा उत्कट पोवाडा नाही,तर मौलाना काय होते हे त्यात कळतेच.पण त्यांच्या अखंड भारताच्या एकंदर भुमिकेचा परामर्शही त्या अनुषंगानी कुरुंकरांनी यात घेतला आहे. मौलाना आझादांनी तफासिरुल कुराण नावाचे जे कुराण भाष्य लिहिले,त्याचा सगळ्याच इस्लामी/इस्लामेतर धर्मपंडितांवर कसा व कितिसा प्रभाव पडला हे या लेखात आपल्याला प्रामुख्यानी वाचायला मिळते. ६)अच्युत पटवर्धनांच्या सहवासात एक दिवस... हा लेख ''भारतीय समाजवादी पक्षा''च्या संस्थापकांपैकी एक असलेल्या अच्युत पटवर्धनांविषयीचा आहे...एकंदरितच भारतीय समाजवादाची सुरवात,त्यातील टप्पे/भ्रमनिरास/सत्य/आकलन हे सगळे या लेखात आले आहे. ७)आधुनिक भारतीय राजकारणात मुसलमान... भारतीय राजकारणात मुस्लिम प्रश्न हा खरा,म्हणजे पूर्णतः अल्पसंख्यांकांचा प्रश्न नाही,तर तो एक बहुसंख्यांकांच्या हिशोबात विचारात घेण्याचा प्रश्न आहे...हे सत्य अतिशय वस्तुनिष्ठपणानी या लेखात मांडण्यात आलेलं आहे.विशेषतः त्याकाळापासुन ते आजतागायतही मुस्लिम प्रश्न समजुन घेण्यात घडलेल्या चुका/मुद्दाम केली डोळेझाक इत्यादी मुद्द्यांवर स्वच्छ प्रकाश टाकण्याचं काम हा लेख करतो... ८)मुसलमानांच्या विचारासाठी काही प्रश्न... हा लेख म्हणजे,,,१९६८ साली डिसेंबर महिन्यात नांन्देडला जमाते इस्लामीचं जे अधिवेशन झालं होतं,त्यात- ''राष्ट्रीय ऐक्य'' या विषयावर झालेल्या परिसंवादात मुस्लिम जनसमुदाया समोर दिलेलं भाषण आहे...यात प्रामुख्यानी मुस्लिम जनतेचं प्रबोधन तर आलेलं आहेच,तसेच त्यांना त्यांच्याच नेत्रुत्वाविषयी/धर्माविषयी विचार करायला भाग पाडणारं असं हे भाषण आहे...यात कुरुंदकरांनी उपस्थित मुस्लिम समुदायाला एक अतिशय मार्मिक प्रश्न विचारला आहे...''तुंम्हाला जर तुमचा मुसलमान असण्याचा हक्क प्रामाणिकपणे मान्य असेल,तर तेवढ्याच प्रामाणिकपणे माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुंम्ही मान्य केला पाहिजे(तो तसा तुंम्ही कराल काय..?)...पुढे या आवाहन केलेल्या विषयाच्या अनुषंगानी सगळी साधक/बाधक चर्चा आलेली आहे... (हा लेख जरी दिसायला खासकरुन मुस्लिम जनतेसाठीचा दिसत असला,तरी मुस्लिमेतर जनतेनी,विशेषतः स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या प्रत्येकानी तो अवश्य वाचला पाहिजे असे मला वाटते..) ९)श्री.बनातवाला यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने... हा लेख म्हणजे बनातवालां सारखे मुस्लिम नेते राजकीय जिवनात स्वतःला आणी जनतेला कायम दुटप्पी वागुन कसे फसवतात,याचं उत्तम चित्रण आहे...स्वतःला राष्ट्रीय उदारमतवादी म्हणवणारे अनेक नेते राजकीय जिवनात कश्या दुटप्पीपणाच्या भुमिका घेऊन वावरतात हे तर या लेखातुन कळतेच पण त्यांच्या लबाडीचा आणी दांभिकतेचा खरा अर्थही या लेखात नीट आकलन होतो... आता या नऊ लेखांचा संग्रह असलेले शिवरात्र हे पुस्तक माझ्या आवडीचे का झाले..?तेही थोडक्यात नोंदवतो...कुरुंदकरांच्या सर्व पुस्तकांपैकी हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले...त्यापूर्वी धर्मकारण/समाजकारणातले अनेक विषय वाचुन मी बर्‍यापैकी तयार झालेलो होतो...आणी आधुनिक/विज्ञाननिष्ठते कडची वाटचालही हळुहळू सुरु झाली होती,पण कोणताही माणुस मुळात काय आहे..? यावरुनच तो पुढे कोणत्याही प्रांतात-गेला तरी काय होइल..? हे ठरत असते... आंम्ही पहिले कट्टर धार्मिक,त्यानंतर पुढे स्वतःची गरज म्हणुन जरी आधुनिक व्हायला गेलो,तरी मुळ पिंड कट्टरपणाचा होता तो तसाच ठाम होता...पण या पुस्तकाची जशी/जशी माझ्या हातुन पारायणं घडली आणी कुरुंदकरांची बाकीचीही पुस्तक वाचली गेली तसा मला पहिला साक्षात्कार झाला तो हा,की मी तात्विक दृष्ट्या कर्मठ/धार्मिक असलो काय...आणी नसलो काय..? व्यावहारिक दृष्ट्या मी कुठेच कर्मठ/धार्मिक असता कामा नये. याभुमिकेचा जसजसा प्रभाव माझ्यावर पडत गेला तसतशी माझी कुरुंदकरांच्या पुस्तकांशी आधिकाधिक दोस्ती जमायला लागली.आता तर कुरुंदकर नावाचा हा माझा दोस्त माझ्या छोट्याश्या आयुष्याचा अविभाज्य/उपकारक भाग होऊन राहिलाय... असो...आंम्ही कुरुंदकरांचे फ्यान आहोतच,तुंम्हीही व्हाल ही अपेक्षा... :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
माहिती
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
18884 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

समयोचीत लेख पण अजून विवेचन

पाषाणभेद
Tue, 02/21/2012 - 02:27 नवीन
समयोचीत लेख पण अजून विवेचन हवे होते.
  • Log in or register to post comments

अजून विवेचन हवे होते. १००%

अन्या दातार
Tue, 02/21/2012 - 03:27 नवीन
अजून विवेचन हवे होते.
१००% सहमत. तसेच या पुस्तकाला शिवरात्र हे नाव का दिले आहे? कारण यात देवा-धर्मावर थेट लिहिलेले दिसत नाही. मग असे नाव द्यायचे काय कारण असावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

सहमत

पैसा
Tue, 02/21/2012 - 07:49 नवीन
मला या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाचा विषय रसग्रहणाचाही एकेक स्वतंत्र लेख होईल अशा व्याप्तीचा दिसतो आहे. लिखाण असे थोडक्यात उरकू नका. मालिका झाली तरी चालेल. स्वतंत्रपणे लेख येऊ द्यात. पुस्तकाच्या नावाबद्दल अधिक विवेचन हवं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/21/2012 - 09:27 नवीन
अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या प्रमाणे प्रत्येक लेखावर व्यवस्थित विवेचन करणारी लेखमाला मी लवकरच लिहायला घेइन...याठिकाणी पुस्तकाची सामान्यतः फक्त ओळख व्हावी,त्यात आलेल्या विषयांचे दर्शन व्हावे...म्हणुन या लेखाचा भर ''फक्त पुस्तक ओळख'' राहिल इतकाच ठेवला आहे...पैसाताइ म्हणतात तसे यातला प्रत्येक लेख एकेका स्वतंत्र विवेचनाच्या व्याप्तीचा आहेच,त्यामुळे तसे लिहिणार आहे,हे नक्की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या

पक पक पक
Tue, 02/21/2012 - 11:07 नवीन
अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या प्रमाणे प्रत्येक लेखावर व्यवस्थित विवेचन करणारी लेखमाला मी लवकरच लिहायला घेइन.. अभिनंदन आणी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

यातला प्रत्येक लेख एकेका स्वतंत्र विवेचनाच्या व्याप्तीचा आहेच !

मालोजीराव
Tue, 02/21/2012 - 15:46 नवीन
+१ -मालोजीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

लवकर लिहा

सुनील
Tue, 02/21/2012 - 21:42 नवीन
अनेक प्रतिसादकांच्या म्हणण्या प्रमाणे प्रत्येक लेखावर व्यवस्थित विवेचन करणारी लेखमाला मी लवकरच लिहायला घेइन लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चालू केले आहे का

अप्रतिम
Tue, 02/21/2012 - 23:07 नवीन
चालू केले आहे का लिहायला....वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तसेच या पुस्तकाला शिवरात्र

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/21/2012 - 09:18 नवीन
@तसेच या पुस्तकाला शिवरात्र हे नाव का दिले आहे? कारण यात देवा-धर्मावर थेट लिहिलेले दिसत नाही. मग असे नाव द्यायचे काय कारण असावे?>>> हो...हे एक महत्वाचे राहुनच गेले खरे...तर प्रस्तुत ग्रंथाला शिवरात्र हे नाव का दिले..? कुरुंदकरांनी याचे प्रस्तावनेत केलेले विवेचन जोड्तो-''सदर संग्रहाचे नाव शिवरात्र असे दिले आहे.शिवरात्र ही रात्रच असते,पण ती झोपण्याची रात्र नाही.शिवाच्या आराधनेत ही रात्र जागुन काढायची असते.असले जागरण करताना जिवनातील शिवं या मूल्यावर पुरेशी श्रद्धा असणे आवश्यक होते.सेवा दलात वावरताना माणसाच्या चांगुलपणावरिल ही श्रद्धा मी पुष्कळ प्रमाणात शिकलो आहे,अशी माझी नम्र समजुत आहे.म्हणून मी निराशावादी नाही.या देशाच्या उज्वल भवितव्यावर माझी श्रद्धा आहे आणी अशा श्रद्धा कोणत्याही तर्कशास्त्रावर आधारलेल्या नसतात,याची मला जाणीव आहे.'' आता कुरुंदकरांनी स्वतः अधार्मिक असताना या ग्रंथाला हे नाव का दिले याबद्दल थोडे...आपण प्रत्येकजणच जीवनात प्रत्येक धार्मिक गोष्टींचा संदर्भ येत/देत असताना,त्या अनुषंगानी करावयाचे वर्तन धर्मात सांगितल्या प्रमाणेच ठेवतो असे नाही.उदा-गणपतीची बुद्धीसाठी करायची उपासना म्हणजे अथर्वशीर्ष म्हणणे, हे धर्मात सांगितले असले तरी...मी मन लाऊन अभ्यास करिन-हेच माझे अथर्वशीर्ष अशी श्रद्धा आपण बदलवुन घेऊन पाळत असतोच.शिवाय अशी बुद्धिनिष्ठ केलेली श्रद्धा हीच 'गणपती ही बुद्धिची देवता आहे' या श्रद्धेशी अधिक सुसंगत असते.त्याचप्रमाणे शिव ही कल्पनाही मनुष्याच्या मंगलाशी निगडीत आहे,हे मंगल होण्याचे जे जे ऐहिक मार्ग आहेत त्या वर निष्ठा ठेऊन केलेले सदर लेखन,म्हणजे शिवंरात्रीचा ऐहिक दृष्ट्या घेतलेला अर्थ होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

छान परिचय... बाकी शिव रात्र

गवि
Tue, 02/21/2012 - 03:38 नवीन
छान परिचय... बाकी शिव रात्र या नावाबद्दल अन्यासारखीच शंका.
  • Log in or register to post comments

उत्तम परिचय भटजी.

प्रचेतस
Tue, 02/21/2012 - 09:04 नवीन
उत्तम परिचय भटजी. पुस्तकाबद्दल विस्तृत विवेचन येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

वरील सगळ्यांशी सहमत. संघाचा

प्यारे१
Tue, 02/21/2012 - 09:15 नवीन
वरील सगळ्यांशी सहमत. संघाचा आधीचा चेहरामोहरा आणि आताचं 'भरीत' यात फारच फरक पडलाय. आधी किमान प्रामाणिक तरी होते. आताचं काहीच कळत नाही. भटजी आणखी लिहा.
  • Log in or register to post comments

वाचावेसे वाटते आहे...

मन१
Tue, 02/21/2012 - 09:47 नवीन
सुंदर परिचय.
  • Log in or register to post comments

मस्त ओळख करुन दिली आहे. मी

यकु
Tue, 02/21/2012 - 11:27 नवीन
मस्त ओळख करुन दिली आहे. मी मात्र कधीही कुरुंदकरांची पुस्तके वाचेन असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

@मी मात्र कधीही कुरुंदकरांची

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/21/2012 - 12:29 नवीन
@मी मात्र कधीही कुरुंदकरांची पुस्तके वाचेन असे वाटत नाही.>>> असो..पण यक्कूशेठ आपल्याला जे अप्रिय असेल ते प्रथम वाचले पाहिजे..हां अता तुंम्हाला समाजकारण/राजकारण यात रसच नसेल तर गोष्टच निराळी.पण अप्रिय विषयांच्या हताळणीचा एक फायदा असा की कित्येकदा जे आपल्याला प्रीय/अवडणारं आहे,त्यापेक्षा हे जे अप्रीय असतं ना, ते अधिक काही देऊन जातं...फक्त आपण त्याबाजुला एकदा डोकवुन बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

परागसर विषय अप्रिय आहे असं

यकु
Tue, 02/21/2012 - 15:09 नवीन
परागसर विषय अप्रिय आहे असं नाही. पण असे चौखूर विचार करणारे राणा भीमदेवी शक्तीचे विचारवंत वाचून पुन्हा आजूबाजूला पाहिले की तोच बुजबुजाट कायम दिसतो. म्हणजे हे फुकाच ओरडले.. कितीही सोन्यासारखे विचार असोत, त्यांचं फलित काय? म्हणजे आपण हे वाचणार, आपल्याला ते कदाचित पटणार आणि गरज पडेल त्या ठिकाणी आपण बोलणार की अमुक अमुकने या विषयाचा सांगोपांग अभ्यास केला आहे.. जबरा आहे.. मला पटलाय आणि मी तो मानतो.. तसं वागतो वगैरे.. यापेक्षा जास्त काय? प्रत्यक्षात जग जसं आहे तसंच ते रहात आलेलं आहे.. आणि रहाणार. ज्यात कुठलेही वाद, अज्ञान, दंगेधोपे, मारामार्‍या नसतील ते सत्ययुग ना कधी नव्हते ना नसेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

.

आत्मशून्य
Tue, 02/21/2012 - 16:10 नवीन
ज्यात कुठलेही वाद, अज्ञान, दंगेधोपे, मारामार्‍या नसतील ते सत्ययुग ना कधी नव्हते ना नसेल
अडात नै तर पौर्‍यात कुटनं यनार ? मनात नै तर आचरणात अशक्य. लैच आळणी लैफ व्हिल नै, कुणाला फसवायचं नाय. शिव्या घालायच्या नाय , त्रास होउ द्यायचा नाय (भलेही मग त्यासाठी स्वतः कश्ट सोसायला लागले जिव गेला तरी चालेल) आपल्याला तर कल्पनाही करता येणार नाही असल्या युगाची. कल्पनेतही साफ अ‍ॅलर्जी . The Invention of Lying धमाल कॉमेडी नाहीये पण बराच टाइमपास आहे, नक्कि बघ. सत्ययुग कीती आळणी असेल ते कळत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत

राजघराणं
Tue, 02/21/2012 - 16:53 नवीन
मनुश्य जातीचा इतिहास पाहिला तर, सहजच लक्षात यील की, आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत. अठरा अक्षौहणी सैन्य मारून टाकणार्या, लायकी असून सूतपुत्राना डावलणार्या,जिहाद आणी क्रुसेड करणार्या, युरोपातील टोळीयुद्धात बळी घेणार्या, काळ्या आफ्रीकी गुलामाना हीनतेची वागणूक देणार्या काळाला कलियुग म्हणेन मी. सामजिक न्याय, अहिंसा , सत्य, कायद्याचे राज्य अशा अभिनव कल्पनांची अत्ता तर कुठे मनुश्याला स्वप्ने पडू लागली आहेत. आपण सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत. आणी म्हणून यावेळीच कुरुंदकरांसारख्या विद्वानाचे मनन चिंतनीय ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

आशावाद वाईट नाही.

यकु
Tue, 02/21/2012 - 17:29 नवीन
आशावाद वाईट नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

रोचक प्रतिसाद. मनापासुन आवडला.

आत्मशून्य
Tue, 02/21/2012 - 17:30 नवीन
_/\_ लाइक करणेत आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

प्रतिसाद

साती
Mon, 09/15/2014 - 17:32 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

मी मात्र कधीही कुरुंदकरांची

मराठी_माणूस
गुरुवार, 02/23/2012 - 22:30 नवीन
मी मात्र कधीही कुरुंदकरांची पुस्तके वाचेन असे वाटत नाही.
अनावश्यक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कुरुंदकरांची पुस्तके वाचणं

यकु
Fri, 02/24/2012 - 00:04 नवीन
कुरुंदकरांची पुस्तके वाचणं अनावश्यक की मी त्याबद्दलचं वाक्य लिहीणं अनावश्यक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सुंदर परिचय

राजघराणं
Tue, 02/21/2012 - 12:43 नवीन
सविस्तर लिहा
  • Log in or register to post comments

भन्नाट..

अस्वस्थामा
Tue, 02/21/2012 - 17:02 नवीन
अतृप्त आत्म्या .. एक नंबर बोलला आहेस.. थोडक्या शब्दात बरच काही..
  • Log in or register to post comments

कुरुंदकरांच्या आणखी काही

रामदास
Wed, 02/22/2012 - 10:15 नवीन
विचारांबद्दल आणि पुस्तकांबद्दल लिखाण तुम्ही या पुढेही करणार आहात हे वाचून आनंद झाला. हा लेख उत्तम जमला आहेच.
  • Log in or register to post comments

"शिवरात्र" ची सुंदर ओळख

सागर
Mon, 06/18/2012 - 22:25 नवीन
पराग मित्रा, पुण्याच्या धावत्या भेटीत कुरुंदकरांचे तू परिचय करुन दिलेले हे 'शिवरात्र' आणि 'जागर' ही २ पुस्तके घेऊन आलोय. तू प्लॅन केलेली लेखमाला लवकर सुरु कर. मी लवकरच कुरुंदकरांची ही २ पुस्तके वाचून पूर्ण करेन. म्हणजे मला पण तुझ्या लेखमालेतील चर्चेत सहभागी होण्याचा बौद्धीक आनंद मिळेल. कारण शिवरात्र वाचून एक तप लोटले आहे, सर्व संदर्भ लागण्याकरिता पुन्हा वाचावेच लागेल . :) अवांतरः कुरुंदकरांचे विचार पटोत वा न पटोत, वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध दृष्टीकोन ठेवून मतांची मांडणी कशी करावी याचे कुरुंदकर एक आदर्शोत्तम होते. किमान कुरुंदकरांची पुस्तके वाचून तरी ठरवावे की या माणसाची विद्वत्ता कालातीत होती की नव्हती. वाचायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी कुरुंदकरांच्या एका व्याख्यानमालेच्या एमपीथ्री ची लिंक देतो आहे. रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे झालेली नरहर कुरुंदकर यांची ३ दिवसांची व्याख्यानमाला व शेवटी रणजित देसाई यांचे समारोपाचे अध्यक्षीय भाषण देखील यात आहे. माझ्यामते त्यांच्या काळी उपलब्ध असलेल्या सर्व साधनांच्या साहाय्याने त्यांनी अतिशय तर्कशुद्ध विचार मांडले होते. ते भरपूर स्फोटक होते यात शंकाच नाही, पण पुराव्यांसकट विचार मांडण्याकडे त्यांचा कल होता. याची प्रचिती पुढील भाषणावरुन येईलच या दुव्यावर क्लिक करा (मिपावरचेच माझे एक मित्र "सागर....." यांनी या एमपीथ्री मला उपलब्ध करुन दिल्या होत्या , तेव्हा या एमपीथ्री च्या उपलब्धतेचे सर्व श्रेय सर्वस्वी त्यांचेच आहे :) )
  • Log in or register to post comments

थँक्यू सागर, अता पहिल्या

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/19/2012 - 00:36 नवीन
थँक्यू सागर, अता पहिल्या प्रथम ही सगळी भाषणे ऐकतो... :-) मला मात्र आपली भेट न झाल्याचं खूप वाईट वाटुन ह्रायलय :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

भेटू रे लवकरच

सागर
Tue, 06/19/2012 - 00:42 नवीन
कुरुंदकरांची भाषणे ऐकून कसे वाटले ते नक्की सांग मित्रा :) आणि अज्याबात वाईट वाटून घेऊ नकोस मित्रा... फुडल्या महिन्यांत पुन्हा एखादी धावती भेट देणार आहे पुण्याला तवा भेटूं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पुस्तक परिचय आवडला

सुधीर
Sun, 09/14/2014 - 20:27 नवीन
शिवरात्र वर असलेल्या जालावरच्या टिपण्ण्या शोधता शोधता हा लेख सापडला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

एस
Mon, 09/15/2014 - 14:39 नवीन
एका सुंदर पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आत्मुबुवांचे आणि हा धागा वर काढल्याबद्दल तुमचे आभार! कुरुंदकरांसारखे सडेतोड विचारवंत हल्ली कुठल्या अडगळीत गेलेत हा प्रश्न मात्र सतावतोय. जे आहेत त्यांना गोळ्या घालून मारले जातेय. अंतर्मुख होण्याइतपत संवेदनशीलता आजच्या समाजमनात राहिली आहे की नाही हे विचार करण्याजोगे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

नुकतच शिवरात्र वाचलं

अर्धवटराव
Mon, 09/15/2014 - 21:29 नवीन
आणि निवडक कुरंदकर पण चाळलं. कुरंदकरांसारखे लोक देखील शेवटी बुद्धीवादाच्या मुळाशी आत्मीक अवधान ठेवतात हे बघुन गंमत वाटली. जीवशास्त्र शिकताना आपण सत्यशोधनासाठी प्राण्यांच्या शरीराची चिरफाड करतो पण हे डिसेक्शन एका मंगल उद्देशाने, विथ फुल्ल रिस्पेक्ट टु द स्पेसीमन; अशा आमच्या मॅडम सांगायच्या. ते भान फार कमि बुद्धिवाद्यांकडे असतं.
  • Log in or register to post comments

ह्या लेखमालेचे पुढे काय झाले?

यशोधरा
Mon, 09/15/2014 - 23:51 नवीन
ह्या लेखमालेचे पुढे काय झाले? जागरबद्दल पण लिहिणार का?
  • Log in or register to post comments

@जागरबद्दल पण लिहिणार का? >>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/17/2014 - 15:56 नवीन
@जागरबद्दल पण लिहिणार का? >>> लिहिन .. असं तरी कसं म्हणू ? :( याप्रकारचं लेखन माझ्यासाठी बरच कष्टदायक होतं. म्हणूनच लोकाग्रह होऊनही शिवरात्र'वर अजुनही काहि लिहु शकलेलो नाही.तरी स्वतःबाबत आशादायक राहातो,आणि सध्यातरी बघू कसं काय काय जमतं ते! असच म्हणतो. :०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पुस्तक वाचलं आणि आवडलं!

सुधीर
Mon, 09/22/2014 - 10:51 नवीन
कधी कधी प्रसिद्ध व्यक्तींची बदनामी करणारे वा समाजात तेढ पसरविणारे मजकूर, लेख, मतं वाचनी/कानी येतात. जोडीला दाखल्यासाठी एखादा फोटो वा त्या व्यक्तीचे उद्धृत दिलेले असतात. दिलेले दाखले बरोबर आहेत का संदर्भ सोडून आले आहेत या विषयी प्रश्न निर्माण होतो आणि त्या अनुशंघाने त्या व्यक्तिविषयी नेमकं काय मत ठरवायचं याचा स्वाभाविक गोंधळ निर्माण होतो. अशावेळी नि:पक्ष, व्यासंगी विचारवंताची तर्कशुद्ध मिमांसा आजूबाजूच्या गोंधळातून योग्य काय? अयोग्य काय? ते कसं ओळखायचं? यावर मार्गदर्शक ठरते. त्या दृष्टीने कुरुंदकरांचं शिवरात्र मला तरी नक्कीच मार्गदर्शक वाटलं. अर्थात या पुस्तकाच्या निमित्ताने कुरुंदकरांनी मांडलेले विचार खोडून काढणारं, तितक्याच तोडीच्या "नि:पक्ष" विचारवंताचं पुस्तकं (असेल तर) वाचायलाही आवडेलच! नऊ लेखांचा अगदी थोडक्यात उत्तम परिचय तुम्ही करून दिला आहात.
  • Log in or register to post comments

धुळे येथील ' राजवाडे संशोधन

जयन्त बा शिम्पि
Tue, 09/08/2020 - 15:42 नवीन
धुळे येथील ' राजवाडे संशोधन मंडळाच्या ' सभाग्रुहात कुरुंदकरांचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला लाभले आहे. लेख आवडला. पुलेशु.
  • Log in or register to post comments

संघाबद्दलचे कुरुन्दकरांचे

विटेकर
Tue, 09/08/2020 - 16:21 नवीन
संघाबद्दलचे कुरुन्दकरांचे आजचे मत कदाचित वेगळे असते ... भल्याभल्याना संघ समजतच नाही ( बर्‍याच वेळा आताल्याना देखील कळत नाही .. बाहेरच्यांची तर शक्यता फारच कमी ! ) जो तो आपाआपल्या कुवतीप्रमाणे आकलन करायचा प्रयत्न करतो आणि आपापले निश्कर्ष काढतो, गंमत म्हणजे संघ त्याचा प्रतिवाद करत नाही आणि समर्थनही करत नाही .. तो या सगळ्याकडे अगदी साक्षीभावाने पाहतो .. त्यामुळे मतमतांचा गलबला वाढतो .. " शिवरात्र" च्या निमित्ताने मी काही विधाने करतो ... हे माझे आकलन आहे , सर्वांचे असेच असले पाहिजे असा माझा आग्रह नाही आणि तुम्ही माझ्या मताच्या विरोधात विधाने केली म्हणून त्याचे खंडन करायला मी बांधीलही नाही .. तरिही तुमच्या मताचा मी आदर करतो हे वे सां न ल ! १. जगात संघाइतके गांधीवादी कोणीही नाही. गांधीजी अस्सल भारतीय होते आणि संघ ही अस्सल भारतीय आहे. संघाचा विरोध अतिरेकी मुस्लिम लांगूलचालनाला होता पण म्हणून गान्धीजी संघाचे शत्रू होते असे संघाला कधीच वाटत नाही ! ही भूमिका संघाने कधीच बदलली नाही . स्वयंसेवकानी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर गांधी विरोधी भूमिका घेतल्या आणि ते संघातील व्यक्ति स्वातंत्र्याचे द्योतक आहे. २. संघाने कधीही राजकारणाच्या सोयीची भूमिका घेतली नाही. अपवाद - १९७७ ची निवडणूक , जेव्हा संघ जनता पक्षाच्या मागे उभा राहीला. पण त्यानंतर मात्र स्वयंसेवक ( अटलजी / आडवाणी ) जनता पक्षातून बाहेर पडले ! महत्प्रयासाने मिळवलेली सत्ता अशी सोडणे याला राजकीय शहाणपण म्हणत नाहीत. अर्थात हा जुन्या जनसंघीयान्चा निर्णय होता ३. श्री गुरुजींची आणि पर्यायाने संघाची चातुर्वण्यासंदर्भातील भूमिका अगदी निर्विवाद आहे. ही टिपिकल समाजवादी हाकाटी आहे ! १९६६ साली जेव्हा कुरुंद्कर उगवले देखील नव्हते , तेव्हा विश्व हिन्दू परिषदेच्या व्यासपीठावरुन श्री गुरुजीनी न हिन्दू पतितो भवेत ! आणि हिन्दवा: सहोदरा सर्वे ! अश्या खण खणीत घोषणा शंकराचार्यान्च्या आणि धर्माचार्यान्च्या उपस्थितीत दिल्या ... आज ही संघाच्या विचार - व्यवहारात कुठेही चातुर्वण्याचा पुरुस्कार केलेला नाही .. संघात त्याची चर्चा देखील होत नाही .. समाजातील विषमतेवर चर्चा होते आनि कृती देखील ! फक्त एवढेच की संघ त्याची झैरात करत नाही. गांधीजी अधिक जगले असते तर त्याना लांगूलचालनातील फोलपणा कळला असता कदाचित ! तसे होते तर भारताचे भविष्य अधिक उज्ज्वल होते ! तसेच थोडेसे कुरुंदकरांच्याबाबतीतही आहे , थोडा अधिक काळ जगते तर त्यांच्या आकलानात नक्की फरक पडला असता ! अस्तु !
  • Log in or register to post comments

विटेकर दोनच बेसिक प्रश्न

कपिलमुनी
Tue, 09/08/2020 - 16:30 नवीन
१. शिवरात्र तुम्ही वाचले आहे का ? ( तुम्ही पुस्तक ओळखीचा प्रतिवाद करत आहात कि पुस्तकाचा हे स्पष्ट झाले नाही) २. १९६६ साली जेव्हा कुरुंद्कर उगवले देखील नव्हते -- नरहर कुरुंदकर यांचा जन्म १९३२ साली झाला होता , १९६६ पर्यंत त्यांचे लेखन सुरु झाले होते , सदर शिवरात्र १९७० सालचे आहे . त्यामुळे उगवण्याचा संदर्भ कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा