Skip to main content

महात्मा गांधी.. एक विचार

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 06/01/2012 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : सदर लेखन हे माझे नसुन माझा नेट फ्रेंड 'दिपक साळुंखे' याचे आहेत. हे लेखन येथे देण्याचे कारण फक्त येव्हडेच आहे कीहे लेखन वाचुन कोणा एकाच्या जरी विचारात बदल झाला तर या धाग्याचे उद्दीष्ट्य साध्य होयील. तसेच मागे एकदा सांगितल्या प्रमाणे गांधीजींच्या बद्दल असणारा विचार माण्डणार असे बोलण्याने हा धागा देत आहे. पार्श्वभुमी : मी अगोदर गांधीजींचा उल्लेख आजचे कित्येक तरुण मंडळी करतात तसाच "टकल्या" म्हणुन करायचो. तेव्हा "मी नथुराम गोडसे बोलतोय.." नाटक पाहिलं होतं आणि त्याच्या प्रचंड प्रभावाखाली होतो. गांधींच कसे फाळणीला जबाबदार, ५५ कोटी पाकिस्तानला द्यायला लावले वगैरे ब-याच गोष्टी होणा-या प्रचारातुन ऐकत होतो. एकुणच गांधी विरोधी होतो. पण अशीच चर्चा चालु असताना, हे खालील मुद्दे वाचनात आले आणि माझ्या मतात तरी बदल झाला, हे लेखन वाचुन कोणा एकाच्या जरी विचारात बदल झाला तर या धाग्याचे उद्दीष्ट्य साध्य होयील. आणि क्रुपया हा धागा म्हणजे टी.आर.पी वाढवणे किंवा नथुराम गोडसें विरोधी मत मांडणे या साठी नाही. त्यामुळे क्रुपया वाद करु नये ही विनंती.. जर कोणाला काही आक्षेपार्ह्य वाटले तर त्याने व्यनी करावा , ज्यांना हा धागा आवडणार नाहि त्यांनी कृपया वाचु नये
गांधी फाळणीचे गुन्हेगार ? अखंड भारताचे स्वराज्य ही मागणी होती. परंतु दुर्दैवाने फाळणी झाली. महात्मा गांधीच फाळणीला जबाबदार आहेत, असा आरोप गांधींवर करण्यात आला. पण नेमकं काय घडलं हे जाणुन घ्यायचं असेल तर स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतर घडलेल्या घटना अधिक तपशीलाने पाहणं आवश्यक आहे. इंग्रजांनी भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर हिंदू-मुसलमान समन्वयाला खिंडार पाडलं. १८५७ च्या उठावात हिंदू-मुसलमान सैनिक, हिंदू राजे-मुसलमान बादशहा, त्यांचे सैन्य आणि सेनापती एका झेंड्याखाली एकत्र झाले होते. धर्मभेद व जातपात विसरुन सर्वजण खांद्याला खांदा लावुन ब्रिटीशांविरुद्ध लढले होते. हिंदू-मुसलमान एकीने ब्रिटीशांच्या छातीत धडकी भरली असणे स्वाभाविक आहे. "फोडा आणि राज्य करा" या नीतीचा अवलंब सुरु झाला. "एक बंदर दो बिल्ली" या गोष्टीसारखा खेळ त्यांनी चालु ठेवला. त्यानंतर झालेल्या घटना साधारण अश्या - १. १८८५ साली राष्ट्रीय सभेची स्थापना, १९०५ साली मुस्लिम लीगची स्थापना. २. लीगच्या नेत्यांमध्ये स्वतंत्र मतदारसंघांचे बीज इंग्रजांनी पेरले. याच बीजाचं पुढे फाळणीच्या विषवृक्षात रुपांतर झालं. ३. टिळक(कॉंग्रेसच्या बाजुने)-जीना(मुस्लिम लीगच्या बाजुने) यांनी १९१६ मध्ये "लखनौ करार" केला. त्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मान्य केले गेले. तोपर्यंत लीग इंग्रजांच्या बाजुने होती. करारानुसार लीगने स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजविरोधी भुमिका घेण्याचे मान्य केले. जीना टिळकांचे अनुयायी होते. ते गांधींना सीनीयर सुद्धा होते. गांधींच्या कॉंग्रेसमध्ये उदयामुळे(१९१५) त्यांचे नेतृत्व मागे पडले. ४. १९२० साली गांधींनी असहकार आंदोलन सुरु केले. मुस्लिमांनी लढ्यात सहभागी व्हावे म्हणुन खिलाफत चळवळीला असहकार चळवळीचा भाग बनवले. जीनांचे नेतृत्व मागे पडले. पुढे त्यांनी लंडनला वकिली करणे सुरु केले. लंडनच्या गोलमेज परिषदेत जीनांची उपस्थिती होती, मात्र त्यांची कुणी विशेष दखल घेतली नाही. ५. १९३७ साली प्रांतीय निवडणुका होणार होत्या. जीनांनी या निवडणुकांना आपल्या राजकीय पुनरुज्जीवनाची संधी म्हणून पाहिले. जीना भारतात परतले. त्यांनी पुन्हा लीगचे नेतृत्व स्वीकारले. स्वतंत्र मतदारसंघांच्या आधारे लीगने चांगल्याच जागा जिंकल्या. ६. १९४० साली लाहोरला झालेल्या मुस्लिम लीगच्या परिषदेत वेगळ्या मुस्लिम राष्ट्र मागणीचा ठराव संमत करण्यात आला. मात्र त्यात "पाकिस्तान" हा शब्द नव्हता. "हिंदुस्थानात २ राष्ट्र आहेत. द्वीराष्ट्रवादाचा आमचा सिद्धांत आहे. सिवील वार(यादवी) झाली तरी आम्हाला पर्वा नाही." ही कट्टर भुमिका तोवर जीनांनी आपलीशी केली होती. ७. दुसरीकडे १९२३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "हिंदुत्व" या आपल्या पुस्तकात द्वीराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख केला होता. १९३७ साली अहमदाबाद येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात द्वीराष्ट्राचा मुद्दा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडला होता. एका माणसाने मात्र अगदी अखेरपर्यंत द्वीराष्ट्र सिद्धांताचा अगदी स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. तो माणूस होता महात्मा गांधी ! "धर्माबरोबर राष्ट्र बदलत नाही." असा विचार मांडत गांधींनी जीनांच्या वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. जीनांना फाळणीपासून परावृत्त करण्यात गांधींना यश आलं नाही. पुढे ते त्यांनी बोलुनही दाखवलं. ते म्हणाले होते- मी माझ्या आयुष्य़ात दोन व्यक्तींना माझी बाजु पटवुन देवु शकलो नाही. एक मुलगा हरिलाल आणि दसरे जीना. फाळणीसाठी गांधींचा पाठिंबा मिळवण्यात जीनाही अपयशी ठरले. गांधींनी माउंटबॅटन यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. त्यानुसार जीनांना पंतप्रधान करण्याची तयारी त्यांनी दाखवली. अखंड हिंदुस्थानातल्या एखाद्या प्रांताला पाकिस्तान नाव देण्यात यावे, अशीही तयारी दाखवली. मौलाना आझादांना ही भुमिका अजब मात्र "प्रॅक्टीकल" वाटली. जीना तयार होतील असेही त्यांना वाटले. "आणखीही योजना असु शकतात" असे सांगुन माउंटबॅटन यांनी ही योजना फेटाळली. शिवाय या योजनेवर कॉंग्रेस कमिटीतही चर्चा न होवु देण्याची दक्षता त्यांनी घेतली. माउंटबॅटन यांनी चलाखीने गांधींना टाळुन लीग व कॉंग्रेसनेत्यांशी चर्चा केली. जीनांनी डायरेक्ट ऍक्शनची घोषणा दिली. परिस्थितीच अशी उद्भवली की, कॉंग्रेसला फाळणी स्वीकारण्याशिवाय पर्यायच उरला नाही. पंडित नेहरु- सरदार पटेल आदींनी फाळणीला मान्यता दिली. माउंटबॅटन योजनेवर कॉग्रेसने सह्या केल्या. रेडीओ, वृत्तपत्रांमधुन छापुन आल्यावर गांधींना याविषयी कळलं. गांधी त्यावेळी नौखालीत होते. त्यांनी नेहरु-पटेल यांना पत्र लिहून "आपण असा निर्णय घेतला हे मला समजण्यासारखं नाही" एवढंच लिहून कळवलं. त्यांच्या पत्राला नेहरुंनी उत्तर पाठवलं नाही. पटेलांचं उत्तर आलं - "आपण खुप दूर होतात, त्यामुळे आपल्याशी सल्लामसलत करता आली नाही. खुप विचार करुन फाळणीचा निर्णय संमत करण्यात आला." फाळणीबद्दल गांधींना राजकुमारी अमृत कौर यांनी सांगितले तेव्हा ते म्हणाले - "इंग्रज देशाचे विभाजन करणार, याचा अंदाज मला होता. ही फाळणी आम्ही रोखू शकलो नाही. मी फाळणी मानत नाही. लोक म्हणले, फाळणी झाली तर झाली असं समजा. आता एवढंच करावं की भुप्रदेशाचं विभाजन इंग्रज निघुन गेल्यावर आपण एकमेकांत चर्चा करुन ठरवावं. इंग्रजांना त्यात आणू नये." गांधींनी तसं कॉंग्रेस कमिटीला कळवलं होतं, परंतु त्यांचा विचार स्वीकारण्यात आला नाही. विभाजन कसं करायचं हे इंग्रजांनी ठरवलं. बॉर्डर आखायला इंग्लंडवरुन सर सिरील रॅडक्लीफ ला इंग्लंडवरुन बोलावलं गेलं. त्याने पहिल्यांदाच भारतात पाऊल ठेवलं होतं. अश्या अनभिज्ञ माणसाला जाणकार मानलं गेलं. हिंदू बहुसंख्यिक गावे पाकिस्तानात, तर मुस्लिम बहुसंख्यिक गावे भारतात अशी अजब विभागणी या माणसाने केली. रॅडक्लीफ लाईननुसार विभाजन झालं तर प्रचंड हिंसा होईल, रक्ताचे पाट वाहतील, असं गांधीजींनी अगोदरच बजावलं होतं. जागतिक इतिहासातले हे एक मोठे स्थलांतर होते. स्थलांतर करायला वेळही दिला गेला नाही. परिणामी प्रचंड गोंधळ, कत्तली, दंगली उसळल्या. सीमारेषेजवळ जी गावे होती त्यातल्या बहुसंख्य मुसलमानांना आपलं गाव पाकिस्तानात जावं असं वाटत होतं. त्यांनी हिंदूंना मारलं. ज्या गावात हिंदूंची संख्या अधिक त्यांनी आपण भारतात राहावं यासाठी मुस्लिमांना मारलं. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांनाही त्यांचा मुसलमानी पोशाख पाहुन अमृतसरला मारहाण करण्यात आली होती. १५ ऑगस्ट ला देश स्वतंत्र झाला तेव्हा बापू कलकत्त्याला दंगली मिटवत होते. १३ ऑगस्ट ला पंडित नेहरुंचा संदेश घेवुन सुधीर घोष आले. स्वातंत्र्याचा पहिला उत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत येण्याचा संदेश त्यांनी गांधींना सांगितला; पण इच्छा नसल्याने गांधींनी दिल्लीला जाणे टाळले. पानगळीत पडलेलं एक पिंपळाचं पान बापूंनी उचललं आणि "या पानासारखी माझी स्थिती आहे" असं म्हणाले. माउंटबॅटन यांनी गांधींना बाजुला ठेवुन आम्ही फाळणी करण्यात कसे यशस्वी झालो हे त्यांच्या लंडनमधील एका भाषणात सांगितले आहे. पंडीत नेहरुंनी न्युयॉर्कमधल्या एका भाषणात "फाळणीमुळॆ लोकांच्या अदलाबदलीचे इतके भयानक परिणाम होतील असं माहिती असतं तर आम्ही फाळणी मान्य केली नसती" असं म्हटलं आहे. जीनांनी आपल्या शेवटच्या आजारपणात आपल्या डॉक्टरांकडे एक उल्लेख केलाय. त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्य़ातील सर्वात मोठी चुक कोणती ? त्यांनी उत्तर दिलं - "डीव्हीजन ऑफ इंडीया" ! त्या डॉक्टरांचं नाव आता आठवत नाही, पण त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. आता यावरुन तुम्हीच ठरवा, खरंच गांधींनी फाळणी केली का ?
गांधी आणि भगतसिंग आरोप - "भगतसिंगांसाठी गांधीजींनी काहीच केलं नाही. मनात आणलं असतं तर ते भगतसिंगांची फाशी वाचवु शकले असते, परंतु जाणुनबुजुन त्यांनी तसं केलं नाही. " ---- भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फ़ेकला म्हणुन नाही तर सॅंडर्स च्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस फ़ाशीची शिक्षा देण्यात आली - २३ मार्च, १९३१ रोजी . महात्मा गांधींना या संदर्भात लक्ष्य करण्यात आलं. ४ मार्च रोजी गांधी-आयर्विन करार झाला. हा करार होता सविनय कायदेभंगाबाबतचा. हिंसा, तोडफोड, जाळपोळीचे आरोप असलेल्यांना जी शिक्षा झाली आहे त्याबाबत गांधींनी चर्चा करु नये अशी ताठर भुमिका व्हाईसरॉय आयर्विन ने घेतली होती. मात्र अहिंसक सविनय कायदेभंग करणा-या ६० हजार सत्याग्रहींना तुरुंगात डांबले गेले होते त्यांच्या सुटकेबाबत गांधींशी व्हाईसरॉयने चर्चा केली. भगतसिंग व त्यांच्या सहका-यांची फ़ाशीच्या शिक्षेतुन सुटका व्हावी म्हणुन १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हाइसरोय लोर्ड आयर्विन यांची भेट घेतली. यातरुणांना माफी दिली तर करारातल्या अटी पाळणं सुलभ होईल, ते सरकारच्या हिताचं होईल, देशात अनुकुल वातावरण बनेल अशी विनंती गांधींनी पुन्हा पुन्हा आयर्विनला केली. एक-दोनदा नाही, तर सहा वेळा फाशीच्या शिक्षेत सुट मिळवण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले. "त्या तिघांना फाशीच्या शिक्षेऐवजी कमीत कमी शिक्षा द्यावी" अशी पत्रे लिहिली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होइल असे त्यांना वाटले. त्यामुळे फ़ाशीचा दिवस ठरला असुनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा अघोरी कार्यक्रम उरकुन घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहुन भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंग संबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."
नेहरु पंतप्रधान का ? समजुत अशी आहे की, भारत स्वतंत्र होताना गांधीजींनी नेहरुंच्या बाजूने आपले वजन टाकले म्हणुन नेहरु पंतप्रधान झाले. एरव्ही पंतप्रधान होण्याचा मान सरदारांचा होता. आपण हे समजुन घेण्याची गरज आहे की, स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरु होणार याची कल्पना अंधुकपणे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना इ.स.१९२९ साली आली होती. तिला अंधुक अशासाठी म्हणायचे की, ही कल्पना "नवभारताचा नेता" अशी होती, पंतप्रधान अशी नव्हती. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव नेहरुंच्या अध्यक्षतेखाली मांडला गेला. सर्व देशाने पूर्ण स्वातंत्र्याची शपथ २६ जाने १९३० रोजी नेहरुंच्या नेतृत्वाखाली घेतली. हा योगायोग नव्हता. १९३५ च्या कायद्यानुसार होणा-या निवडणुका सुद्धा पंडित नेहरुंच्या अध्यक्षतेखाली लढल्या गेल्या. कॉंग्रेस पक्षाचा सर्वांत लाडका, सर्वांत लोकप्रिय आणि निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने सर्वांत उपयोगी नेता हे नेहरुंचे स्थान होते. यावेळीच हे निश्चित झाले की, आघाडीवर नेहरु राहणार आणि सरदार पिछाडीवर ! म्हणुन तर सरदारांकडे पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्षपद देवुन संघटनेची सर्व सुत्रे त्यांच्या हातात देण्यात आली. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान कुणी व्हावे हा निर्णय फार क्रमाने बनत आला आहे सुभाषचंद्रांनी नियोजन मंडळ नेमले तेव्हा त्याचे नेतृत्व नेहरुंच्याकडे दिले होते; आणि ३७ च्या निवडणुका नेहरुंच्याच नेतृत्वाखाली लढवाव्यात यासाठी नेहरुंच्या बाजुने आपले वजन टाकले होते ! सार्वत्रिक मान्यता हे नेहरुंचे वैशिष्ट्य कुणातच नव्हते !
गांधी आणि आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींची अस्पृश्योद्धाराची भुमिका नेहमीच दांभिक वाटत होती. स्वत: गांधीजींची अस्प्रूश्योद्धाराची तळमळ प्रामाणिक होती, असे मी मानतो. गांधीजी स्वत: वैयक्तिक अस्पृश्यता पाळत नसत, अस्पृश्यता न पाळणारे व अस्पृश्योद्धाराचे काम करणारे शेकडो स्पृश्य कार्यकर्ते गांधीजींच्या चळवळीमुळे निर्माण झाले, हे उघड सत्य आहे. गांधीजींची खरी अडचण वेगळी होती. गांधीजी हे नुसते हिंदू धर्माचे अभिमानी नव्हते तर वर्णाश्रमाचे पुरस्कर्तेही होते! पण त्यांच्या धर्मकल्पनेत रुढी आणि चालीरितींना जागा नव्हती. ते परंपरागत जीवनाचे अभिमानी होते, पण त्यांना स्त्रीशिक्षण आवश्यक वाटे. प्रौढविवाह, प्रेमविवाह, हिंदू धर्मातल्या धर्मात आंतरजातीय विवाह या सा-यांनाच गांधीजींचा सक्रीय पाठींबा होता. अस्पृश्यांविषयीची त्यांची तळमळ प्रामाणिक होती, तो त्यांचा नित्य कार्यक्रम होता. अस्पृश्यांचा प्रश्न गांधीजी हिंदू समाजांतर्गत प्रश्न म्हणून सोडवु इच्छित होते. ज्यामुळे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी अस्पृश्य समाजाच्या मनात तिरस्कार व तिटकारा निर्माण होईल असे काही करण्यास गांधीजी तयार नव्हते. परंपरावादी हिंदूंचे परंपरावादी मन न दुखावता परंपरेच्या भाषेत बोलुन गांधीजी परंपरेच्या चालीरिती बदलु इच्छित होते. ह्यातील तथ्य इतकेच की, गांधी प्रामुख्याने सुधारणावादी होते. गांधीजींचा कार्यक्रम अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा, अस्पृश्यांमध्ये काही सुधारणा घडवुन आणणारा सुद्धा असेल .. मात्र हा कार्यक्रम दलितांमध्ये नवा आत्मविश्वास, जिद्द आणि जागृती निर्माण करणारा, त्यांची अस्मिता पेटवणारा कार्यक्रम असु शकत नव्हता. गांधीजी अस्पृश्यतेवर बोलत तरी होते, नेहरु-पटेल यांच्यासारख्या कॉंग्रेसी सवर्ण नेत्यांना अस्प्रुश्यांचा प्रश्न नित्य चर्चेचा कधी वाटलाच नाही. सगळीकडेच मुलभुत सामाजिक परिवर्तन घडवायचे आहे, न्याय व समतेवर आधारलेले नवे जीवन उभारायचे आहे.. त्यात अस्पृश्यतेसारखे प्रश्न आपोआपच संपून जातील असंच या नेत्यांना वाटत आलं. गांधीजींच्या प्रामाणिक अनुयायांची अशी संख्या किती होती ? फार थोडी ! उरलेली सगळी कॉंग्रेस ही वरिष्ठवर्णीय, सामाजिक दृष्ट्या सनातनी आणि आर्थिक दृष्ट्या स्थितीवादी अशीच होती. गांधीजींचा आर्थिक कार्यक्रम(ग्रामस्वावलंबनावर आधारित) आंबेडकरांना मान्य नव्हता. ग्रामीण जीवनाला प्राधान्य देणारी ग्रामप्रधान अर्थरचना परंपरागत जीवन आणि परंपरागत अस्पृश्यता टिकवुन धरील असे आंबेडकरांना वाटे. वरिष्ठ वर्णीयांच्या नेतृत्वाखाली असणा-या संघटना अस्पृश्यांना प्रतिष्ठा आणि न्याय मिळवुन देतील असं आंबेडकरांना वाटण्याचा संभवच नव्हता. म्हणुन त्यांचे गांधीजींशी फारसे जुळले नाही. माझ्या मित्राने मागे याबाबत अगदी थोडक्यात लिहिले होते. ते इथे देतो. आंबेडकर आणि गांधी या दोघांचे टारगेट ऑडियन्स वेगवेगळे होते हे लक्षात घ्यायला हवे. गांधी सवर्णांना सुधरवायचा प्रयत्न करत होते, तर आंबेडकर दलितांना. दोघांच्या भुमिका एकमेकांना पुरक होत्या. गांधी नसते तर तर आंबेडकरांना सवर्णांकडुन खुप स्ट्रॉंग रिऍक्शन मिळाली असती. आणि त्याने जातीय तेढ आणखी वाढली असती. गांधींमुळे सवर्णांमधे ते करत असणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण होत होती आणि त्यामुळेच आंबेडकरांना समजुन घेण्याची भुमिका आपल्या एकुणच राजकीय कार्यकर्त्यांमधे निर्माण होत होती. १९१५ साली आपल्या आश्रमात हरिजन परिवाराला प्रवेश देण्यापासुन गांधींचं अस्पृश्यता निवारणाचं काम सुरु झालं होतं. वधूवरांपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य असणा-या विवाह समारंभास उपस्थित राहण्याची केलेली प्रतिज्ञाही त्यांनी शेवटपर्यंत पाळली. अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत "हरिजन", हिंदीत "हरिजन सेवक", व गुजरातीत "हरिजन बंधु" ही साप्ताहिकं त्यांनी सुरु केली. या सर्व पत्रांचं काम गांधी bस्वत: करत होते. एकादशव्रतातही त्यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या व्रताचा समावेश केला होता. येरवडा जेलमधुन सुटल्यावर गांधींनी हरिजनयात्रा काढली होती. हरिजन सेवक संघ स्थापन करुन फंड गोळा केला होता. कधी काळी वर्णाश्रम मानणारे गांधी "हरिजन सेवक" बनले होते. विभक्त मतदारसंघाच्या मुद्द्यावरुन गांधी-आंबेडकरांचे तीव्र मतभेद झाले. विभक्त मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यांतील फरक समजुन घ्या. विभक्त मतदारसंघ म्हणजे असा मतदारसंघ जो विशिष्ट जमातीसाठी आरक्षित असेल आणि त्या मतदारसंघात फक्त त्या जमातीचे लोकच मतदान करु शकतील. म्हणजे समजा पुणे हा दलितांसाठी विभक्त मतदारसंघ आहे, तर इथे फक्त दलित मतदारच मतदान करु शकतील; इतर लोक नाही ! राखीव मतदारसंघात सर्व मतदान करु शकतात, फक्त उमेदवार हे ठराविक जमातीचेच असावे लागतात. १९१६ च्या टिळक-जीना यांच्यातील लखनौ येथे झालेल्या कराराने असे विभक्त मतदारसंघ मुस्लिमांना दिले होते आणि तेही लोकसंख्येच्या प्रमाणात नाही तर एकुण जागांच्या एक तृतीयांश!!! विभक्त मतदारसंघाच्या बाबतीत आंबेडकर आपले नक्की मत कधीच बनवु शकले नाहीत. आंबेडकरांनी १९१९ साली आंबेडकरांनी साउथबरो समितीसमोर विभक्त मतदारसंघ मागितला. १९२८ साली सायमन कमिशनसमोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ तर नको हे तर त्यांनी सांगितलेच; पण मुसलमान, ख्रिश्चन इ. कुणालाच विभक्त मतदारसंघ नको असे प्रतिपादन केले. १९३१ साली दुस-या गोलमेज परिषदेच्या वेळी विभक्त मतदारसंघ मागितला, पुढे येरवडा करारानंतर त्यांनी ही मागणी सोडुन दिली. भारतीय संविधान बनविताना विभक्त मतदारसंघाला विरोध केला. तोपर्यंत चालत आलेले मुस्लिमांचे विभक्त मतदारसंघांना संविधानात जागा दिली नाही. दुस-या गोलमेज परिषदेत वेगवेगळे पक्ष जमले होते. कुणी मुस्लिमांचे प्रतिनिधी होते, कुणी ख्रिश्चनांचे होते. गांधींजींनी संपूर्ण भारताचे, त्यातील सर्व जातीधर्माचे आपण प्रतिनीधी आहोत अशी भूमिका घेतली. गांधीजींच्या या भूमिकेमुळे जे अनेकजण दुखावले गेले त्यांत आंबेडकर एक होते. गांधींना प्रतिशह म्हणुन आगाखान यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांकांनी एक वेगळा करार केला. ह्या करारात बाबासाहेब सहभागी होते. ह्या करारानुसार अस्पृश्यांना सर्व भारतभर विभक्त मतदारसंघ आणि १८० जागा ठरविलेल्या होत्या! त्यात अल्पसंख्यांकांसाठी सुद्धा काही तरतुदी होत्या पण त्याच्या डीटेल्स मध्ये जात नाही. हा एक शहकाटशहचा प्रकार होता इतकाच त्याचा अर्थ आहे ! परिषदेत काही निर्णय झाला नाही. परिषद अयशस्वी ठरली. पण या ठरावावर पंतप्रधानाने निर्णय घ्यावा असे ठरले. हा करार इंग्रजांनी जशाच्या तसा मान्य केला नाही. काही बदल करुन पंतप्रधानाने Communal Accord (जातीय निवाडा) जाहीर केला. इंग्रजांनी अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिला पण जागा मात्र ७१ च दिल्या (ठरल्या होत्या १८०) ! . "वेगळ्या मतदारसंघाने स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यात आणखी दुफळी निर्माण होइल. माझ्या हरिजन बांधवांच्या प्रगतीत अडसर निर्माण होईल. इंग्रजांच्या जातीय निवाड्याने अस्पृश्यतेचा कलंक अधिक गडद होईल." अशी भूमिका मांडुन या कराराच्या विरुद्ध गांधीजींनी येरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषण सुरु केले. आंबेडकरांनी सर्वांनाच लक्षात राहिल इतका ताण दिला आणि शेवटी गांधीजींच्या बरोबर प्रसिद्ध येरवडा करार करुन टाकला. आंबेडकर त्यावेळी गांधींना म्हणाले, "आम्हाला वेगळा मतदारसंघ मिळत असताना आपण विरोध का करत आहात? तुम्ही आम्हाला काय देणार आहात सांगा". त्यावर गांधी म्हणाले, "तुम्ही जन्माने दलित आहात, मी स्वेच्छेने दलित झालो आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावुन दलितांसाठी लढायला मी तयार आहे. अस्पृश्यांनी कायम अस्पृश्य राहणं मला पसंत नाही. म्हणून विभक्त मतदारसंघाला माझा विरोध आहे. प्रांतिक निवडणुकांत मात्र तुम्हाला कमी जागा मिळाव्यात, हे स्वीकारायला मी तयार नाही."
गांधीजींना जो वारसा मिळालेला आहे तोच पुरेसा गुंतागुंतीचा आहे. या देशाची विविधता, समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरीपणा जितका संकीर्ण होता, तितकेच गांधीजींचे व्यक्तीमत्व संकीर्ण आहे, कमालीचे गुंतागुंतीचे व संदिग्ध असे आहे. प्रत्येकाला गांधीजींचा थोडाफार आधार सापडतोच. गांधीजी वर्णाश्रम मानत होते ही १९१५ पुर्वीची बाब आहे. का मानत होते याची कारणे तुम्हाला त्याच्या बालपणीच्या संस्कारात मिळतील. गांधीजींची वर्णाश्रमाबद्दलची मते कालांतराने बदलत गेली. गांधीजींनी सुरु केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या मोहिमेमुळे काही कर्मठ सनातनी हिंदू दुखावले गेले होते हे नक्की. काहींनी १९३४ साली पुण्यात मोटारीवर बॉम्ब टाकुन गांधीजींना ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता. गोडसे व आपटे हे गांधीजींचे मारेकरी कडवे हिंदुत्ववादी असले तरी अस्पृश्यता निवारणाला त्यांचा पाठींबा होता. तेव्हा त्यांनी या भुमिकेमुळे गांधीजींचा खून केला असेल असे मला वाटत नाही. गांधींजींना जो वारसा मिळाला त्यामध्ये - १. त्यांच्यामागे राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, महर्षी दयानंद अश्या आधुनिक संतांची परंपरा आहे. या संताचं एक वैशिष्ट्य असं की, त्यांचा हिंदू धर्माभिमान जितका उत्कट आहे तितकाच त्यांचा राष्ट्राभिमानही उत्कट आहे. या आधुनिक संतांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ते परंपरागत रुढींचे समर्थक नाहीत. किंबहुना रुढी हा धर्म नसुन अज्ञानाने चढलेला कलंक आहे असे त्यांना वाटते. यामुळे प्रमुख समाजसुधारणांना या संतांचा पाठींबा असतो. २. दुसरा धागा उदारमतवादी राजकारणाचा आहे. न्या.रानडे आणि गोखले यांचा गांधीजींवर सर्वात जास्त प्रभाव आहे. त्यांनीही सर्व प्रकारच्या रुढी व विषमतेचा विरोध केला. स्त्रियांना शिक्षण, प्रौढ वयात विवाह, विधवा-विवाह, प्रेमविवाह, स्त्रियांना समान हक्क यांचा तर गांधीजींनी पुरस्कार केलाच, ते आंतरजातीय विवाह चे समर्थक व अस्पृश्यतेचे विरोधकही राहिले.
मग gaandhini मुसलंमनाना का विभक्त मतदारसंग का मिळू दिले ? व ते संविधान बनवे पर्यंत का चालू दिले ? त्यांना हिदू- मुसलीम दुफळी निर्माण करायची होती का ? कि मुसलीम लोकांना खुष करायला त्यांनी होणाऱ्या दुफालीकडे दुर्लक्ष केले ? . लखनौ करार १९१६ साली झाला, टिळक-जीना यांच्या मध्ये ! त्याला बेस होता - १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा. मुस्लिमांना १/३ प्रतिनिधीत्व मिळेल, असे इंग्रजांनी या कायद्यात म्हटले होते. मुस्लिम लीगने या कायद्याला समर्थन दिले होते. १९१६ पुर्वी लीगने कधीही इंग्रजविरोधी भुमिका घेतली नव्हती. टिळकांनी हा करार करुन मुस्लिमांचे १/३ प्रतिनिधीत्व मान्य केले पण लीगने स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या बरोबरीने इंग्रजांविरोधात लढायला तयार व्हावे असे ठरले. लीगने ते मान्य केले. कायदा तर इंग्रजांनी पूर्वी केलेला होताच, मुस्लिमांचे वेगळे मतदारसंघ त्यांनी मान्य केले होतेच. इथे कॉंग्रेसने त्याला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसच्या हातात एक तर विरोध करणे, अथवा विरोध न करणे एवढेच होते. कायदा करणारे, वेगळे मतदारसंघ देणारे इंग्रज होते. जेव्हा गांधींचा राजपटलावर उदय झाला, तेव्हा लीगचे अस्तित्व ब-यापैकी वाढलं होतं. अश्या वेळी विभक्त मतदारसंघांना विरोध केला असता, तर लीगने कॉंग्रेसविरोधी भुमिका घेतली असती आणि इंग्रजांना मदत केली असती. इंग्रजांना ते हवेच होते. त्यांना मुस्लिमांना लालुच दाखवुन वेगळे करायचेच होते. गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात लीगचे समर्थन राहावे म्हणुन विभक्त मतदारसंघांना तात्काळ विरोध केला नाही. १९०९ च्या कायद्याविषयी बोलताना गांधीजींनी म्हटले आहे - "This act has finished us!" विभक्त मतदारसंघ रद्द व्हावेत यासाठी गांधींनी प्रयत्न केले नाहीत असे नाही. १९२८ मध्ये भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी जेव्हा पहिली समिती स्थापन करण्यात आली, तेव्हा त्या समितीत एकुण २८ मेंबर होते. समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरु होते. इतर सदस्यांमध्ये सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरु सुद्धा होते. या समितीने एक रिपोर्ट सादर केला - "नेहरु रिपोर्ट" ! या रिपोर्टनुसार धर्माच्या आधारावर असलेले विभक्त मतदारसंघ अमान्य केले. गांधीजींशी चर्चेशिवाय ही तरतुद त्यात असणे शक्य नाही. मुस्लिम लीगने अर्थातच रिपोर्ट फेटाळला. ब्रिटीशांनी देखील हा रिपोर्ट फेटाळला.
गांधी राष्ट्रापेक्षा मोठे होऊ पहात होते (पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी प्राणांतिक ऊपोषण) म्हणुन त्यांचा "वध" होणे अत्यंत आवश्यक होते. -> अगोदर ५५ कोटींचा मुद्दा काय आहे ते प्लीज समजुन घ्या. हे पैसे भारताने किंवा गांधींनी सप्रेम भेट किंवा बक्षीस म्हणून दिलेले नाहीत. त्या पैशावर पाकिस्तानचा हक्कच होता. फाळणीपूर्वी भारतीय रिझर्व बॅंकेत ३७५ कोटी रुपयांची गंगाजळी उपलब्ध होती.त्यात पाकिस्तानचा वाटा ७५ कोटी आणि भारताचा ३०० कोटींचा होता. पाकिस्तान निर्मितीच्या सुरुवातीच्या दिवसांत पाकिस्तानची तातडीची निकड भागवण्यासाठी २० कोटी देण्यात आले होते. उरलेले पैसे भारताने नंतर देण्याचे मान्य केले होते. तशी कायदेशीर तरतूद करण्यात आली होती. पाकिस्तानच्या रिझर्व बँकेने ६ जानेवारी १९४८ ला हे पैसे देण्याची अधिकृत मागणी भारताकडे - तत्कालीन गवर्नर चिंतामणराव देशमुखांकडे केली. सीडी देशमुख यांनी ही मागणी मिळाल्याची माहिती पाकिस्तानला दिली. तेव्हा भारत सरकारने पाकिस्तानला कर्ज म्हणून १० कोटी रुपये उपलब्ध करण्याची तयारी केली व चिंतामणरावांना रिझर्व बँकेची स्थिती पाहून निर्णय घेण्यास सांगितले. मात्र हा कर्जाचा मुद्दा समोर आल्याने तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली यांनी, पाकिस्तानच्या हक्काचे पैसे परत करावेत हा धोशा लावून धरला. पाकिस्तानचे पैसे त्यांना देणे हे नैतिकदृष्ट्या तर योग्य होतेच परंतु व्यावहारिक राजकारणाच्या दृष्टीने देखील ते योग्य होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात एका नवस्वतंत्र राष्ट्राने अशी संकुचित भुमिका घेणे शहाणपणाचे नसते. गांधींनी हे पैसे पाकिस्तानला दिले जावे असे मत मांडले. मात्र त्यांनी ते द्यायलाच हवे यासाठी प्राणांतिक उपोषण केले हा मुद्दा गैरलागु आहे. गांधीजींनी उपोषण १३ जानेवारीस सुरु केले. पाकिस्तानचे पैसे पाकिस्तानला परत देण्याचा निर्णय १५ जानेवारीस झाला. गांधींचे उपोषण जर या कारणासाठी असते तर त्यांनी १५ जानेवारीसच उपोषण सोडले असते. १८ जानेवारीपर्यंत गांधीजींचे उपोषण सुरु राहिले हे विसरुन चालणार नाही. १८ जानेवारी, १९४८ ला ऑल पार्टी पीस कमिटी, हिंदु महासभा, आरएसएस यांनी ज्या कारणासाठी सह्या केल्या ते कारण कुणीच का देत नाही? या उपोषणाचा मुख्य हेतु दिल्लीतील दंगली थांबवणे हा होता, हे लक्षात घ्यायला हवे. याचे विस्तृत विश्लेषण य.दि. फडके यांच्या नथुरामायण या पुस्तकात पाहा.

वाचने 49751
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

गांधीजीनी सामान्य व्यक्ती म्हणून सुरुवात करून महात्म्यापर्यंत प्रवास केला म्हणून कदाचित ते लोकाना एवढे आपलेसे वाटले असावेत. इतिहासाच्या वेगवेगळ्या प्रकारे लावलेल्या अन्वयामुळे अनेकांवर अन्याय होत असतो. गांधीजींच्या बाजूने आणि विरोधात जितकं लिहिलं गेलंय तितकं फार कमी लोकांच्या नशीबात आलं असेल. गांधीजींची थोरवी वादातीत आहे, हे एकच सत्य आहे. या लेखाच्या निमित्ताने एक चांगली चर्चा वाचायला मिळाली याबद्दल गणेशाला आणि त्याच्या मित्राला धन्यवाद.

म्हणजे शोषकांच्या विरोधात स्वत:चे हक्क मिळवण्यासाठी ठामपणे उभे राहण्याची मानसिक हिम्मत त्यांनी वर्षानुवर्षे पिचलेल्या भारतीय समाजात निर्माण केली. आम्ही दुर्बल आहोत, निश:स्त्र आहोत; तुम्ही सश:स्त्र आहात , बलवान आहात तरी आम्ही आमच्या हक्कांसाठी निर्भयपणे आवाज उठवू शकतो हा आत्मविश्वास मिळवून दिला. ब्रिटीशांचे भारतावरील राज्य शस्त्रांच्या बळावर टिकले नाही. जनतेसमोर ब्रिटीश राजवटीपेक्षा अधिक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकला नाही हे त्यामागील खरे कारण आहे. सर्वसामान्य जनतेचा पाठींबा ब्रिटीश राजवटीऐवजी क्रमाक्रमाने काँग्रेसच्या पाठी उभा करणे हे स्वातंत्र्याचे सूत्र असल्याचे गांधीनी ओळखले. "एका वर्षात स्वराज्य" ही पोकळ घोषणा असल्याची जाणीव काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना असणार. पण त्या घोषणेतून जे चैतन्य समाजात पसरले ते मात्र त्याआधी निर्माण झाले नव्हते. स्वातंत्र्याच्या प्रश्नाची भाकरीच्या प्रश्नाशी त्यांनी घातलेली सांगड ह्यामुळे एकूणच स्वातंत्र्य हा सामान्य जनतेसाठी अग्रक्रमाचा विषय बनला. हे सारे करताना त्यांनी शोषितांचे रुपांतर शोषकांमध्ये होऊ नये यासाठी प्रयत्न केले ह्यातच त्यांचे महात्म्य आहे. मुस्लीम अनुनयाचा आरोप गांधी आणि नेहरूंवर करणे हा एक राजकारणाचा भाग आहे. सुरेंद्रनाथ बानर्जी यांनी त्यांच्या १९०२ च्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या भाषणात मुस्लिमांना काँग्रेसमध्ये आणण्याचे महत्व सांगितले होते. टिळकांनाही लखनौ करार करावाच लागला. मोतीलाल नेहरू यांच्यावरही मुस्लिमधार्जिणेपणाचा आरोप होत असे. राजकारणात गरज असल्याशिवाय कोणी कोणाचा अनुनय करत नाही. जोपर्यंत जिना हे काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत त्यांना मुस्लिम समाजात फारसे वजन कधीच नव्हते. ज्यावेळी जिना हे मुस्लिम लीगच्या बाजूने बोलू लागले त्यावेळी त्यांच्याशी वाटाघाटी करणे काँग्रेसला भाग पडले. काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांना मुस्लिम समाजात फारसे वजन नव्हते हे प्रत्येक निवडणुकीत परत परत सिद्ध झाल्यावर फाळणीशिवाय दुसरा कोणताही व्यवहार्य पर्याय शिल्लक नव्हता. इथे गांधी किंवा जिना काय म्हणाले ते महत्वाचे नाही तर त्यांच्यामागे उभे असलेले सामाजिक प्रवाह काय म्हणत होते ते महत्वाचे आहे.

In reply to by अवतार

म्हणजे शोषकांच्या विरोधात स्वत:चे हक्क मिळवण्यासाठी ठामपणे उभे राहण्याची मानसिक हिम्मत त्यांनी वर्षानुवर्षे पिचलेल्या भारतीय समाजात निर्माण केली. आम्ही दुर्बल आहोत, निश:स्त्र आहोत; तुम्ही सश:स्त्र आहात , बलवान आहात तरी आम्ही आमच्या हक्कांसाठी निर्भयपणे आवाज उठवू शकतो हा आत्मविश्वास मिळवून दिला.
असहमत. स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी लागणारा ठामपणा मुळात टिळकांनी फुलवला. उगाच त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" असे म्हणले गेले नाही. याच असंतोषाचा फायदा घेत गांधीजींनी आपली वाटचाल पुढे चालू केली. बाकी चालुद्यात.

In reply to by daredevils99

मी कुठे बोललो की यात माझा प्रॉब्लेम आहे म्हणून? मी फक्त एक बाजू मांडली, ज्याचा गोषवारा तुम्ही तुमच्या पहिल्या वाक्यात दिलाय. :)

In reply to by अन्या दातार

१. नॅशनल कॉंग्रेसचा इतिहास म्हणजे या बाण्डगुळ्या वर्गतील विशेष शिष्टांच्या शहरी धडपडींचा इतिहासच होय. सुरूवातीला कॉंग्रेस ही रावसाहेब रावबहादुरादि ब्रिटिश-निर्मित हिन्दी लॉर्डांची एक वार्षिक मजलस असे. या मजसलीत जहालृमवाळ-भेदांच्या भेदिक लावण्यात रंगली. तरी सुद्धा तींत देशभक्तीत तू मोठा की मी मोठा ? हाच कॉग्रेसी चळवळीचा भररंग असे. एकाहि देशभक्ताला दारिद्यग्रस्त शेतक-याचा आणि पोटासाठी खेडी उध्वस्त टाकून शहरांच्या गिरण्या कारखान्यात घुसलेल्या मजूरांचा चुकून सुद्धा घाम फुटला नाहीं, कीं कोणाला त्यांची आठवण आली नाहीं. एवढे मोठे लोकमान्य बनविलेले टिळक ! पण त्यांचहि तीच गति. त्यांच्या चळवळीहि शहरी आणि भगतहि शहरीच. चिरोल केसचा फास गळ्याला बसला, तेव्हा गोरगरीब शेतक-यांच्या घासातला घास काढायला, शुद्ध भिक्षुकी थाटाने टिळकांचा जो मोटारदौडी नाटकी स्वराज्यदौरा खेड्यापाड्यांतून झाला, तेवढाच काय तो त्यांच्या आणि खेडवळ जनतेचा, जन्मातला पहिला आणि शेवटला प्रसंग । तत्पूर्वी या लोकमान्य प्राण्याने ना कधी शेतक-यांची विचारपूस केली, ना कधी मुंबईच्या गिरणबाबूंच्या क्लेशाची चौकशी केली, किंवा ना कधी पददलित अस्पृश्यांवरील सामाजिक जुलुमावर डोके खाजविले. टिळकांच्या हिंमतीचा सारा मारा ब्रिटिश नोकरशाहीच्या चक्रव्यूहावरच विशेष. त्याना ब्रिटिशांचे भांडवलशाही कुदळ खोरे स्पष्ट दिसे, पण बाण्डगुळ्या वर्गाची सर्वभक्षी जळूशाही मुळीच कधी दिसली नाही. सामाजिक क्रान्तीचे वावडे असणा-या टिळकांच्या हातून केवळ एकजोडी राजकारणी जी धडपड झाली, तीच आणि तितकीच पुण्याई त्यांच्या खाती जमा घरूनच, या थोर पुरूषाची स्मृति टिकणारी आहे. यानंतर कॉंग्रेसमध्ये महात्मा गांधीचे युग सुरू झाले. या युगाचा महिमा डॉक्टर रविंद्रनाथ टागोर सत्याची हाक (call of truth) नामक निबंधात मार्मिकपणे वर्णन करितात :- “स्वदेशी चळवळी नंतर अस्तित्वात आलेल्या प्रस्तुतच्या खळबळीचा व्याप दांडगा असून, तिचा प्रभाव सर्व हिन्दुस्थानभऱ पसरलेला आहे. पूर्वी आमच्या राजकारणी पुढा-यांची दृष्टी आंग्रेजी जाननेवाल्या लोकांपलिक़डे गेलीच नव्हती. कारण, इंग्लिश लोकांनी लिहिलेल्या इतिहास ग्रंथातील पुस्तकी चित्रांपलिकडे त्यांची स्वदेशाची कल्पनाच कधी गेली नाही. स्वदेशाची ही कल्पनाच म्हणजे बर्फ आणि ग्लॅडस्टन, माझिनी आणि ग्यारीवाल्डी, यांच्या पुसकट वाफ-यांनी निर्माण झालेली मृगजळाची सृष्टी होय. स्वार्थत्याग म्हणजे काय आणि आपल्या देशबांधवांबद्दलची खरीखरी कळकळ म्हणजे काय, याची त्या काळच्या राजकारणी पुढा-याना अटकळच झाली नाही म्हणावयास काही हरकत नाही. अशा प्रसंगी, महात्मा गांधी एकदम पुढे सरसावले. त्यानी आपल्या कोट्यावधि झोपड्यात प्रत्यक्ष प्रवेश केला आणि त्यांच्या विचारविनीमयाचा नवीनच उपक्रम सुरू केला. पुस्तकी चर्पटपंजरीचा अवतार गांधीना प्राप्त झालेल्या महात्मा पदवीने त्यांचा गौरव केला असे म्हणण्यापेक्षा, महात्मा गांधी असे त्यांचे खरेखुरे नावच व्यक्त झाले, असे म्हटले पाहिजे. हिन्दुस्थानातील एवढी मोठी अफाट जनता माझ्याच हाडरक्तामासाची आहे असे समजणारा कोणचा मायेचा पूत दुसरा होऊन गेला बरें ? सत्याचा स्पर्श होताच कोंदाटलेल्या आत्म्याच्या शक्ती खाडकन् आपल्या बंधनातून (*तोण्डाळ टिळक भगतानो, ऐका ऐका, रविंद्रनाथाची ही कटु स्पष्टोक्ति, ही नम्र सत्याची हाक ऐका.) मुक्त झाल्या. हिन्दुस्थानच्या दरवाजावर शुद्ध प्रेमाने टिचकी मारताच तो प्रचण्ड दरवाजा उघडला, विकल्प नाहीसा झाला आणि नामर्दाईने तोंड काळे केले. सत्याचे प्रबोधन सत्यानेच केले” २. राष्टांची निशाणे व्यक्तीच्या लहरींतून निर्माण होत मसतात. त्यांच्या रंग रूप आणि चिन्हांच्या मागे अद्भुतरम्य क्रांतीच्या झटापटींचा जाज्वल्य आणि चित्तवेधी इतिहास उभा असतो. राष्ट्रीय निशाणाप्रमाणेच राष्ट्रगीताची गोष्ट. ‘गॉड सेव अवर ग्रेशस किंग’ या इंग्रेजी राष्ट्रगीताचा नुसता सूर कानी पडताच, इंग्रेज आदमी आपोआप गंभीरपणाने चटकन् टोपी काढतो; आणि आमचे ‘वन्दे मातरम्’ गीत मुलामुलींचा तांडा मोठमोठ्याने ओरडून गाऊ लागला तरी, “अहो, राष्ट्र गीत हे—उभे रहा” असे आम्हाला टपली मारून कोणीतरी सांगितले म्हणजे मग आम्ही “काय शिंपी पिडा ही !” या उद्गारांसह उभे राहतो. या दोन गीतांतल्या भावनेच्या भेदाचा कोणीतरी कधी विचार केला आहे काय ? भगवा झेंडा या उद्गारात जी जादू भरली आहे, ती गांधीप्रणित चरखांकित ‘राष्ट्रीय’ ब्रुव निशाणात काय आहे ? ‘चरखा’ म्हटला कीं महात्मा गांधीना ब्रम्हानंद होत असेल. पण व्यक्तिचा ब्रम्हानंद समष्टीत मुरण्यासारखा असा काय मोठा क्रान्तिकारक इतिहास चरख्याच्या मागे उभा आहे ? भगवा झेंडा महाराष्ट्रातल्या म-हाट्यांचा असला, तरी त्याच्या पराक्रमाचा धौशा पूर्वेस बंगाल्.पर्यंत, उत्तरेस थेट अटकेपर्यंत, आणि दक्षिणेस सेतुबंध रामेश्र्वरापर्यंत दणाणलेला आहे. म-हाठशाहीत भगव्या झेंड्याखाली मुसलमान आरब आणि रोहिल्यांच्या फलटणी सुध्दा इमाने इतबारे लढत असत. म-हाठ्यांच्या त्या भगव्या झेंड्यात हिन्दु—मुसलमान, ब्राम्हण—ब्राम्हणेतर किंवा स्पृश्यास्पृश्य असला कसलाहि भेद नव्हता. हिन्दवी स्वराज्य या व्यापक भावनेचे ते भेदशून्य खरेखुरे राष्ट्रीय प्रतिक होते. सध्याच्या गांधीच्या चरख्या निशाणात भेदांचे रंग स्पष्ट दाखविले असून, त्यांवर ऐक्याचा लटका आरोप करण्यात आलेला आहे. तांबडा आणि हिरवा रंग जरी गळ्यात गळा घालून शेजारी बसलेले दिसतात, तरी प्रत्यक्ष व्यवहारात हिन्दु आणि मुसलमानांचे प्रेम व आदर केवढा पाघळत आहे, ते पहाणाराना खास दिसत आहे. विशेषत: प्रस्तुत निशाणावर काढलेले चरख्याचे चित्र अनाकर्षक आणि आक्षेपार्ह आहे. चरखा हे गांधी भगवंताचे सुदर्शन चक्र असले, तरी हिन्दुस्थानाच्या गुलामगिरीवर तेच एक रामबाण औषध आहे, या शामाळू तत्वावर खुद्द मोठमोठ्या पुढारीब्रुवातच जेथे मतभेद व अविश्र्वास, तेथे चरख्याचे माहात्म्य अखिल हिंदी जनतेला पूर्ण मान्य आहे, असे म्हणणे शुध्द दांभिकपणाचे होईल. चरख्याची घरघर गांधी-भक्तांच्या चर्पटपंजरीत जरी मनमुराद बोकाळली होती, तरी चरख्याच्या वेदान्ताला कोणीहि मान्यता दिलेली नाही. प्रतिकचिन्हांची प्राणप्रतिष्ठा जनतेच्या आत्मयज्ञाने सिध्द व्हावी लागते. ते चिन्ह पाहताच, किंवा त्याचे नुसते स्मरण होताच, जनतेच्या आत्म्याला कळवळ्याचा पिळवट तरी पडला पाहिजे एक, अथवा चित्तवृत्ति एकदम खळबळून सोडणारा एकादा चिरस्मरणीय ऐतिहासिक क्रान्तीचा प्रसंग त्याच्या मागे उभा पाहिजे. असले कसले चैतन्य चरख्यात आहे की त्याची योजना ‘राष्ट्रीय’ झेंड्यावर होताच, जनतेच्या वृत्ति एकदम खळबळाव्या ? चरख्याच्या योजनेत फार झाले तर व्यक्तिमाहात्म्य असेल, पण ते मानसिक दास्यसूचक असल्यामुळे, राष्ट्रीय झेंड्यावरची त्याची योजना सर्वमान्य होणे शक्य नाही. निदान, शिवाजीमहाराजांच्या भगव्या झेंड्याच्या अभिमानी—कट्टा शेतकरी—महाराष्ट्र - या शामळूं चरख्याचे महात्म्य केव्हाहि कबूल करणार नाही. त्याला कसलीहि मानयता देणार नाही व आज देतहि नाही. वरील दोन्ही उतारे हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या ' शेतकऱ्यांचे स्वराज्य ' या ग्रंथातून घेतले आहेत. या देशात कोणत्याही महान व्यक्तीबद्दल सर्वांगीण विचार करण्याची परंपराच संपत चालली आहे. व्यक्तिपूजा हा भारतीय समाजमनाचा हळवा कोपरा आहे. व्यक्तिपूजेच्या जाळ्यात अडकल्यावर गांधींचा नथुराम होऊ शकतो आणि नथुरामचा गांधी. [ हे केवळ माझे निरीक्षण आहे. आपल्यावर व्यक्तीपूजेचा आरोप करण्याचा हेतू नाही ] अशा वेळी प्रबोधनकारांचे विचार उपयुक्त ठरतात.

In reply to by अवतार

. व्यक्तिपूजा हा भारतीय समाजमनाचा हळवा कोपरा आहे. व्यक्तिपूजेच्या जाळ्यात अडकल्यावर गांधींचा नथुराम होऊ शकतो आणि नथुरामचा गांधी
हेच मला सांगायचे होते ते तुम्ही मराठीत सुस्पष्ट पणे सांगीतले माझी भाषेच्या शब्दांची कमी पूर्ण केली धन्यवाद ! माझ्या वरिल प्रतिसादात मी तेच सांगण्याच प्रयत्न केला मुख्य म्हणजे गांधीं अन त्यांच्या काही निवडक अनुयानांनी जे ग्रामसुधार केले ते आत्ता पर्यंत कोणालाच जमले नाही. लोकं गांधीवादी विनोबाजींची भू-दान च़ळवळ ही विसरले अन फक्त गांधी या नावाचा कधी उपयोग करुन घेतला गेला किंवा त्यांच्या नावाने शंख करण्यात आला. गांधीजींचे ग्राम-सुधार अन ग्राम-स्वराज हे कार्य स्वातंत्र्यानंतर पुढे का आणले गेले नाही ? :-( It was because of this philosophical gulf between Gandhi and virtually all of India's top political leadership at the time of independence that Gram swaraj was not incorporated into India's constitution. India's political, social and industrial organisation was to be generally "top down" rather than "bottom up". हे आमचे दुर्दैव :-(

In reply to by अवतार

ज्यावेळी जिना हे मुस्लिम लीगच्या बाजूने बोलू लागले त्यावेळी त्यांच्याशी वाटाघाटी करणे काँग्रेसला भाग पडले. काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांना मुस्लिम समाजात फारसे वजन नव्हते हे प्रत्येक निवडणुकीत परत परत सिद्ध झाल्यावर फाळणीशिवाय दुसरा कोणताही व्यवहार्य पर्याय शिल्लक नव्हता. १९३५ का १९३७ मध्ये ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या त्यात आजच्या पाकिस्तानातील सर्व प्रांतांत्/सुभ्यात, अगदि मुस्लिम बहुल असणार्‍या north west frontier मध्ये सुद्धा काँग्रेसला बहुमत होते,मुस्लिम लीगला नाही. हे आपणास ठाउक असेलच.

In reply to by मन१

ज्या निवडणुका झाल्या त्यात north west frontier मध्ये काँग्रेसला बहुमत होते. याचे मुख्य कारण म्हणजे खान अब्दुल गफार खान (लाल डगलेवाले) यांनी स्वत:ची सगळी शक्ती काँग्रेसच्या बाजूने उभी केली होती. मुस्लिम लीगला ज्या प्रांतांतून प्रचंड बहुमत मिळाले ते सगळे प्रांत (मुंबई, मद्रास, बिहार वगैरे) आज भारतातच आहेत. पाकिस्तानला मान्यता देताना गांधीनी पख्तुनिस्तानला मान्यता दिली आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकत्र येऊ नयेत याची सोय केली. गांधींचे महात्म्य क्षणभर बाजूला ठेवले तर त्यांच्यातील राजकारणी अशी ओझरती झलक दाखवतो.

नुकत्याच संघाच्या १०० वर्षे पूर्ण धाग्यावर उल्लेख निघाला म्हणून पुन्हा हा धागा वाचला.. आणि खरेच द्वेष नाही प्रेमाने जग जवळ होऊ शकेल असे वाटले.. इतक्या वर्षात खूप वाचन झाले आहे.. यातील आणि यापुढील हि अनेक मुद्दे स्वतः लिहू शकेल असे वाटते आहे.. बघुयात पुढे.. तूर्तास धागा वर काढतो आहे.. जरी मला हे आवडत नाही परंतु तरीही :) त्यामुळे क्षमस्व

छान धागा आहे. मी अजूनही गांधी, नेहरू वाचनापर्यंत पोहचले नाही.म.फुले,न्या.रानडे,लो.टिळक इथपर्यंतच पोहचले आहे. हे खुप आवडले.
या आधुनिक संतांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ते परंपरागत रुढींचे समर्थक नाहीत. किंबहुना रुढी हा धर्म नसुन अज्ञानाने चढलेला कलंक आहे असे त्यांना वाटते. यामुळे प्रमुख समाजसुधारणांना या संतांचा पाठींबा असतो.

वा! छान माहितीपूर्ण लेख! गांधींबद्दलचा आदर आणखी वाढला! “महात्मा” उगाच नाही म्हटले जात त्यांना! हा देश जोमपर्यंत गांधींचा आहे तो पर्यंत महानच राहिल! तसेच ७८ वर्षांच्या गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामला जनाची नाहीतर मनाची तरी वाटायला हवी होती.