ऐतिहासिक पेरणेफाटा...
पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मुळात दीड-दोन शतकांपूर्वी हा प्रदेश भीमा-कोरेगाव असा संबोधला जायचा आणि भीमा कोरेगाव हे इतिहासात लिहिले गेले ते शेवटच्या आंग्ल-मराठा लढाईमुळे...
सन १७७९ मध्ये पुण्याकडे कूच करतांना वडगाव येथे अंग्लांनी मराठ्यांना आव्हान देत लढाई छेडली खरी परंतु जवळपास पन्नास हजारांच्या संख्येने लढाईसाठी गर्जत येणाऱ्या मराठी सैन्यापुढे फक्त अडीच हजार अंग्लांचा पळभरही टिकाव लागला नाही. गनिमीकाव्याने ते हैराण झाले होते. त्यांची चाल पुण्याकडे होत असली तरी मुंबईकडून येणारी रसद तोडण्यात मराठे यशस्वी होत होते. अखेर त्यांना चारही बाजूंनी घेरून कोंडीत पकडल्यावर तहाची बोलणी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मराठ्यांविरुद्धच्या या लढाईत सपाटून मार खावा लागल्याने ईस्ट इंडिया कंपनीचे धाबे दणाणले. पुरंदरच्या तहात कमावलेलं सर्व काही मराठ्यांना परत करावं लागलं होतं. १७७३ पासून जिंकलेले प्रांत गमवावे लागले. शिवाय वीस वर्षे युद्धबंदीची अट पाळावी लागणार होती. वडगावच्या या तहानंतर काही काळ आंग्ल अधिकारी काहीएक हालचाल न करता गप्प होते. मनात धुमसत असलेला लाव्हा ते सहन करीत होते. पुणे प्रांतात कंपनीचा शिरकाव झालेला असला तरी पूर्णतः अंमल प्रस्थापित होऊ शकत नव्हता. हा आपला पराभव काही त्यांच्या पचनी पडेना झाला. ते संधीच्या शोधातच होते.
काळ पुढे जात राहिला. पेशवाई मध्ये फंदफितुरी माजली. भाटगिरी सुरु झाली. त्यावेळी दुसरा बाजीराव पेशवेपदावर विराजमान होता. त्याच्या भोवती वावरणाऱ्या भाटांनी अनेक नवे कायदे कानून लागू करण्यास पेशव्यांना भाग पाडले. दलित वर्गातील लोकांच्या गळ्यात मडके बांधून त्यात थुंकणे अनिवार्य केले गेले. महार, मांग, रामोशी इ. अस्पृश्य गटातील लोकांनी रस्त्याने जातांना आपल्या पार्श्वभागी एका खराटा बांधून रस्ता आपोआप झाडीत जावे अशी जाचक अट पाळावयास भाग पाडले गेले. हे चाणाक्ष ब्रिटिशांनी हेरले आणि पददलितांना आश्रय देऊन आपल्या सैन्यात सामावून घेतले. खरे तर हे लोक अतिशय शूरवीर होते. जीवाला जीव देणारे होते. त्यांच्यात कमालीची स्वामिनिष्ठ्ता असायची. शिवरायांनी आपल्या आरमारांत तसेच घोडदळ, पायदळात यांना मोलाचे स्थान दिले होते.
नोव्हेंबर १८१७ मध्ये पेशव्यांच्या फौजेने पुण्यातील ईस्ट इंडिया कंपनीची कचेरी उध्वस्त केली. जशास तसे उत्तर देण्यासाठी ब्रिटीशांच्या शिबंदीला कोणतीच संधी मिळाली नाही. तेव्हा पुण्यातील ब्रिटीश ऑफिसरने मुंबईच्या मुख्यालयाला साकडे घातले. मुंबईच्या दुसऱ्या बटालियनच्या पहिल्या रेजिमेंट मधील बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फन्ट्रीची तुकडी मदतीसाठी पाठवून देण्यात आली. या रेजिमेंटमध्ये जवळजवळ निम्मे-अधिक सैन्य जातीने महार होते, काही मुस्लीम होते तर काही रामोशी!
पूर्वोत्तर पुण्याच्या शिरूर परगण्यात या रेजिमेंटचा तळ पडला. कॅप्टन फ्रान्सिस स्टाऊँटनच्या नेतृत्वाखाली ५०० पायदळ, २५० घोडदळ अन् २४ तोफा इतकाच लवाजमा घेऊन पुर्वोत्तरेकडून हल्ला करण्याचे निश्चित झाले होते. त्यांना थोपविण्यासाठी दुसरा बाजीराव पेशवा तब्बल २०००० घोडदळ आणि ८००० पायदळानिशी निघाला. तिकडून शिरूरवरून चालत येणाऱ्या ब्रिटीश सैन्याची गाठ मराठी फौजेशी जेथे पडली तोच हा पेरणेफाटा. त्याकाळी त्याला कोरेगाव भीमा असे संबोधले जायचे.
भीमेच्या तीरावर दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. न थकता ब्रिटीश सैन्याने जोरदार प्रतिकार सुरूच ठेवला. महार रेजिमेंट जीव तोडून लढत होती. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या मराठी सैन्यापुढे आपल्या रेजिमेंटचा निभाव लागणार नाही हे ओळखून मुंबई मुख्यालयाने पुन्हा एकदा तह करावा लागेल या शंकेने जिंकण्याची आशाच सोडली होती. काहीच न खाता पिता सलग बारा तास हातघाईची लढाई चालली. ब्रिटिशांच्या योजनाबद्ध तोफमाऱ्यामुळे मराठा सैन्य जेरीस येऊ लागले. त्यांना धड खाता-पिता येईना की लढण्याची उमेद मिळेना. त्यांची पीछेहाट सुरु झाली. तसतसे ब्रिटीश सैन्य आणखी वेगाने मारा करू लागले. अखेरीस संध्याकाळी मराठी सैन्याने माघार घेतली. आपली कुवत अधिक असूनही ब्रिटिशांना हा विजय बहाल केला. या महत्वपूर्ण विजयामुळे पेशवे आपले साम्राज्य घालवून बसले. पेशवाई संपुष्टात आली. ब्रिटीशांचा झेंडा पुणे प्रांती फडकला.
या शेवटच्या आंग्ल-मराठा युद्धात ब्रिटिशांची सरशी झाली. महार रेजिमेंट मधील २२ सैनिक कामी आले. त्यांच्या स्मरणार्थ १८२१ मध्ये ब्रिटिशांनी एक रणस्तंभ येथे भिमेकाठी उभारला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी १ जानेवारी रोजी न चुकता येत असत व शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पित असत. कारण बाबासाहेबांचे वडील, चुलते इतर नातेवाईक देखील महार रेजिमेंटमध्ये ब्रिटिशांची चाकरी करीत होते. त्यांनीच या स्थळाला शौर्यभूमी असे नामाभिधान केले होते आणि आजतागायत पेरणेफाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरांतून कितीतरी दलित बांधव येथे एकत्र येत असतात. शूरवीरांना अभिवादन करीत असतात. लष्करातर्फे पुष्पचक्र अर्पण केले जाते. एक प्रकारचा सद्भावनेने ओथंबलेला माहोल येथे पहावयास, अनुभवास मिळतो. दलित पुरस्कृत विविध पक्षांची नेते मंडळी व पुढारी येथे हजेरी लावून आपले शक्तीप्रदर्शनही करू पाहतात. इतकी गर्दी व दाटीवाटी होत असते की चार-पाच तास हायवेची ट्राफिक जॅम होत असते. चोख पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे अनुचित प्रकार सहसा घडत नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा छोटे व्यावसायिक खेळणी, पुस्तके, गोंदणकाम, रसवंतीगृहे, खाद्यपदार्थ विकतांना आढळतात. दीड-दोन किमीपरिसरात येणारी वाहने पार्किंगसाठी लावलेली असतात. तेथूनच घोषणा देत विविध संघटनांचे कार्यकर्ते विजयस्तंभाकडे चालत येतात. एक प्रकारचा भीमपराक्रम करून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांप्रति भावांजली अर्पिण्यास भीमसैनिकांचा महासागर येथे लोटतो. यावेळी एक वेगळीच विरश्री अंगात भिनत चालल्याचा प्रत्यय येत जातो...
प्रतिक्रिया
शूरवीरांना श्रद्धांजली __/\__
धाग्यातील काही विद्वेषी वाक्यांना मात्र फाट्यावरती मारण्यात आलेले आहे.
श्री. दिवटेंसारख्या लोकांमुळेच समाज कधीही एक होऊ शकणार नाही हे कटू सत्य आहे.
संपादक काय भुमीका घेतात ह्याची वाट पहात आहे.
संपादक काय भुमीका घेतात ह्याची वाट पहात आहे.
संपादक मंडळाने यापूर्वी दोन-चार वेळा अशा लिखाणाबाबत धॄतराष्ट्राची भूमिका बजावल्याचे स्पष्टपणे आठवते आहे असे भीत भीत म्हणावेसे वाटते.
डॉ. दिवटेंचा नेहमीच्या विषयापेक्षा वेगळा आणि एक वास्तववादी लेख.
लेख आवडला.
श्रीराम साहेब,
त्याच ब्राह्मणसमाजातुन आगरकर,कर्वे,रानडे ह्यासारखे थोर समाजसुधारक आले.
त्याच लोकातुन वासुदेव बळवंत फडके जन्माला आले ज्यानि ह्याच महार रामोशी ह्यासारख्या शुर पराक्रमि लोकांन बरोबर मिळुन इंग्रज लोकांना सळो कि पळो करुन सोडले.
बाकि लेख खरच आवडला. अतिशय माहिती युक्त आहे. काहि वाक्य नाहि आवडली म्हणुन वरिल माहिति दिलि.
राग मानु नये.
जातायेता बर्याच वेळेला हा स्तंभ दिसायचा.
त्याबद्द्लची माहीती आजच कळली.
तुम्ही वादवाले डॉक्टर म्हणुन नाव कमावताय याचा तुम्हाला गर्व असेल नै!!
गर्व शब्दाचा अर्थ मराठीतला कि हिंदीतला?;)
>>>या महत्वपूर्ण विजयामुळे पेशवे आपले साम्राज्य घालवून बसले. पेशवाई संपुष्टात आली. ब्रिटीशांचा झेंडा पुणे प्रांती फडकला.
हो. हा ब्रिटीशांचा फायदा झाला. पण
>>>जातीयतेची बंधने तोडून काढण्यात हा विजय यशस्वी ठरला. एक प्रकारे अस्पृश्यांनीच ही लढाई जिंकलेली होती.
जे लढाई लढले त्यांना काय मिळाले? एव्हढे करून पदरात काय पडले?
या लढाईमुळे, तुमच्या शब्दात "अस्पृश्यांनीच जिंकलेल्या" लढाईमुळे काय फायदे झाले ते जरा सवीस्त लिहा.
पुरंदरच्या तहात कमावलेलं सर्व काही मराठ्यांना परत करावं लागलं होतं. १९७३ पासून जिंकलेले प्रांत गमवावे लागले.
अरे बापरे. मग आता १९७३ नंतर पूणे नक्की कोणाचं?
बाकी माहिती नविन. आवडली.
नविन माहिती, १ तारखेला तरी शक्य नाही पण क्धीतरी जाउन येईन इथं. धन्यवाद.
नवाबी शौकवाले लोक अजून इथे थुंकले नाहीत याचे आश्चर्य वाटले.
जातीयतेची बंधने तोडून काढण्यात हा विजय यशस्वी ठरला. एक प्रकारे अस्पृश्यांनीच ही लढाई जिंकलेली होती. सवर्णांचा तो पराभव ठरला होता.
या वाक्याच्या अनुरोधामुळे ब्रिटिश भारतातून निघून गेले हा सवर्णांचा विजय होता असे म्हणायचे की काय असा प्रश्न पडला आहे.
महार रेजिमेंट मधील २२ सैनिक कामी आले. त्यांच्या स्मरणार्थ १८२१ मध्ये ब्रिटिशांनी एक रणस्तंभ येथे भिमेकाठी उभारला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी १ जानेवारी रोजी न चुकता येत असत व शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पित असत. कारण बाबासाहेबांचे वडील, चुलते इतर नातेवाईक देखील महार रेजिमेंटमध्ये ब्रिटिशांची चाकरी करीत होते. त्यांनीच या स्थळाला शौर्यभूमी असे नामाभिधान केले होते आणि आजतागायत पेरणेफाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरांतून कितीतरी दलित बांधव येथे एकत्र येत असतात. शूरवीरांना अभिवादन करीत असतात. लष्करातर्फे पुष्पचक्र अर्पण केले जाते. एक प्रकारचा सद्भावनेने ओथंबलेला माहोल येथे पहावयास, अनुभवास मिळतो. दलित पुरस्कृत विविध पक्षांची नेते मंडळी व पुढारी येथे हजेरी लावून आपले शक्तीप्रदर्शनही करू पाहतात. तेथूनच घोषणा देत विविध संघटनांचे कार्यकर्ते विजयस्तंभाकडे चालत येतात. एक प्रकारचा भीमपराक्रम करून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांप्रति भावांजली अर्पिण्यास भीमसैनिकांचा महासागर येथे लोटतो. यावेळी एक वेगळीच विरश्री अंगात भिनत चालल्याचा प्रत्यय येत जातो...अतिशय निरुपयोगी आणि विलासी असला तरी शेवटचा पेशवा आणि त्याचे सरदार हा इंग्रजांशी लढणारा तेव्हा एकमेव 'फोर्स' होता.. पराशी सहमत आहे. महार रेजिमेंटच्या वीरांचे दुसर्या महायुद्धातही मोठे योगदान होते आणी त्यानंतरही. त्यांच्या शौर्याबद्दल दुमत कधीच नाही. पण ज्या लढाईमुळे ब्रिटिशांचे स्थान भारतात पक्के झाले त्याचा आज जातीय दृष्टिकोनातून विजयोत्सव कराव हा कमालिचा संकुचितपणा आहे. या रेजिमेंटच्या विरोधात महादजी लढले असावेत. मग ते काय या दृष्टिने लढत होते का साम्राज्य टिकावे यासाठी ? सर्व वंशात अतिशय नालायक असला तरी दुसरा बाजीराव हा सातारच्या छत्रपतींचा पेशवाच होता ना? राज्य हे सातारहून शिक्के कट्यार मिळाल्याशिवाय करता येत नव्हते किंवा कधी त्याशिवाय मानलेच नव्हते. मग हा महार रेजिमेंटचा विजय हा मराठेशाहीचा इंग्रजांविरुद्धचा पराभव म्हणून स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी पण साजरा करणं किती सयुक्तिक आहे. आदरणीय बाबासाहेब हे या दृष्टीने वागण्यासारखे अजिबात नसावेत. ते अतिशय विद्वान आणि इतिहास जाणणारे होते.. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा नीती इतकी उत्तम रीत्या वापरली की आज दोनशे वर्षांनंतरही आपल्याला जलियनवाला करणार्या ब्रिटिशांचा विजय हा जातीय दृष्टिने जास्त महत्त्वाचा वाटतो .. खरं तर अतिशय दु:खद गोष्ट आहे की हा विचार अजून रु़जून आहे आणि त्याला अजून खतपाणी घालण्याचा सुशिक्षित जनतेकडूनही प्रयत्न होतो आहे..
>>>मग हा महार रेजिमेंटचा विजय हा मराठेशाहीचा इंग्रजांविरुद्धचा पराभव म्हणून स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी पण साजरा करणं किती सयुक्तिक आहे.
सहमत.
>>>आदरणीय बाबासाहेब हे या दृष्टीने वागण्यासारखे अजिबात नसावेत. ते अतिशय विद्वान आणि इतिहास जाणणारे होते..
ही पुडी सोडण्यात आली आहे हे नक्की. गेल्या काही वर्षात काही पुढा-यांनी याला उत्सवी स्वरूप आणले आहे.
आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी. त्यात आदरणीय बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला गेला.
वेगळा विषयाला हात घातल्याबद्द्ल आभार.
कुणाला काय खटकले हे सस्मजले नाही.
या धाग्यात काही अत्यंत वादग्रस्त आणि जातीय स्वरूपाची विधाने केलेली होती. त्यातील काही इतिहासाला सोडून होती. त्यामुळे पूर्ण लेख संपादित करण्यात आलेला आहे. अशी जातीय उल्लेख असलेली विधाने करणे कृपया टाळावे अशी धागाकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे.
नवीन माहिती.
महार रेजिमेंट मधल्या वीरांबद्दल आदर आहेच ...
पण शत्रुला मदत करून , स्वकीयांच्या विरूद्ध शस्त्रे हाती घेणे --- याला काय म्हणावे?
आणि, काही कारणांनी, त्या काळात, त्या परिस्थीत लोकांनी ते केले असेल .. तर त्याचे उदात्तीकरण चालले आहे त्याचे वाईट वाटले.
ब्रिटिश परकीय, वगैरे भावना प्रबळ नसावी. एका राजाविरुद्ध दुसरा राजा एवढीच भावना सामान्य सैनिकांची असावी. त्यातूनही या रेजिमेंटच्या काही तुकड्या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांच्या विरोधात लढल्यामुळे ब्रिटिशानी महारांची सैन्यभरती बंद केली होती, ती पुढे फार वर्षानी म्हणजे डॉ. आंबेडकर १९४१ साली सुरक्षा सल्लागार झाल्यानंतर त्यानी प्रयत्न करून परत सुरू करायला लावली असं विकिपेडियावर नोंदलेलं आढळलं.
ब्रिटिश परकीय, वगैरे भावना प्रबळ नसावी. एका राजाविरुद्ध दुसरा राजा एवढीच भावना सामान्य सैनिकांची असावी.
मला नाही वाटत हे असे असेल... कारण शिवाजी महाराजांच्या काळात जे फ्रेच आणि इंग्रज आले, त्यांचा उल्लेख - परकीय लोकं असाच केला गेला आहे, आणि त्यांना राजकीय महत्वाकांक्षा असल्याने त्यांच्यापसून सावध रहाण्याची जरूरी आहे , असेही उल्लेख अढळतात. इंग्रज स्वकीय नाहीत हे न कळण्याइतके नक्कीच आपले लोक भोळे नसतील.
पण ते ब्रिटीश आर्मीत सामील झाले याला सामाजिक आणि आर्थिक कारणे नक्कीच असतील.
इंग्रज स्वकीय नाहीत हे न कळण्याइतके नक्कीच आपले लोक भोळे नसतील.
किंवा हे कळत असूनही त्यांच्याकडे जाण्याइतके स्वार्थी असतील. कारण महाराष्ट्रात ब्रिटीशांची वकीली करणारे व वेळोवेळी महाराजांना इंग्रज वकील म्हणून भेटलेले व इंग्रजांकडे दुभाषी म्हणून काम करणारे नारायण शेणवी(शेणई) हे काही परकीय नव्हेत आणि साधेभोळे तर त्याहून नव्हेत.
किंवा हे कळत असूनही त्यांच्याकडे जाण्याइतके स्वार्थी असतील.
सहमत. इथल्याच लोकांचा सैन्यात भरणा करून आख्खा भारतीय उपखंड जिंकला की त्यांनी.
इथल्या शासकांनीही नाही तेव्हा ह्यांच्याशी घरोबा केला, कधी स्वतःचेच आरमार बुडवायला, कधी गादी मिळवाय्ला, कधी असलेली गादी टिकवायला.
जातींची नावे नव्हती घ्यायची पण इलाज नाही. ब्रिटिशांना अनुकूल असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळी वागले आहेत.
त्यात ऐनवेळेस अवसानघात कराणारे महादजींचे वंशज शिंदेही आले(बहुतेक दौलतराव), ऐनवेळी धोरणी निर्णय घेण्यास चूक करणारे सातारचे १९ व्या शतकातील छत्रपतीही आले, बाजीरावाचे "नातूंसारखे" सरदारसुद्धा आले.(ह्यांच्यामुले इंग्रजांना मराठ्यांचे दरबारी राजकारण समाजावयास मदत झाली.) एकाच जमातीने असे काही केले असे नाही.
गंमत अशी की अलगद एकानंतर एक राज्ये इंग्रज गट्टम करत होते तेव्हाच इथले जागे का नाही झाले? झोपले होते का?
तर उत्तर आहे होय. ते झोपले होते. त्यांनी "तैनाती फौज" नावाची ब्रिटिश अफू सेवन करून ठेवली होती. वरवर दिसायला अगदि "सोयीस्कर" अशी कल्पना होती. ब्रिटिश शिस्तीत तयार झालेले आयते(readymade) सैन्य राजाच्या सेवेत तयार असेल , राजाला काही लागले सवरले, तर त्याने हे सैन्य (कंपनीच्या "परवानगीने")वापरायचे. बदल्यात इथल्या रजाने काहिच करायचे नाही, नुस्ता थोडासा मुलूख तोडून द्यायचा, किम्वा करवसूलीचे अधिकार ब्रिटिशांना द्यायचे.म्हणजे यंत्रणा सगळी ब्रिटिश हाती घेणार. आहे की नाही मज्जा? सत्ताधार्याने लोळत पडायचे आणि ब्रिटिश पूर्ण राज्यकारभाराची "डोकेदुखी" आपल्या शिरावर "राज्याच्या भल्यासाठी" घेणार. आणि अशी फौज घेतल्यावर अल्पावधीतच, फक्त दोनेक दशकातच काय व्हायचे? राजा, राज्चे संपूर्ण वर्तुळ निव्वळ एक सरंजामदार, जमीनदारासारखे सुस्त पडले राहणार, ब्रिटिश सगळा कर वगैरे लाटून त्यातला थोडासा हिस्सा राजाच्या तोंडावर "तनखा " म्हणून मारणार. कबूल असेल तर त्याने ती घ्यायची. नसेल तरी तो काहिच करू शकत नाही. सैन्य तर "कंपनीचे" आहे ना? आता राजा कितीही "मारो, काटो,यल्गार,हर हर महादेव" कोकलला तरी सैन्य ब्रिटिशांच्या आदेह्साशिवाय जागचे ढिम्म हलणारही नाही . एकटा माणूस काय करेल?!
त्यामुळेच आपण पूर्ण पणे ब्रिटिश साखळदंडानी जखडले जातोय हेच आख्ख्या भारतीय उपखंडाला* कळलेच नाही. ते सुस्त गर्दुल्ले झाल्यासारखे पडले होते.
मुळात ब्रिटिश शासन आल्यावरही "आपण लुटलो जातोय" हेच कुणाला समज्ले नव्हते. इतर मंडाळी सुरुवातीला मराठे,मुघल ह्यांच्यासारखेच एक नवीन सत्तास्पर्धक ("आपल्यासारखेच अजून एक "इतकेच) म्हणून ह्या पांढर्या पायाच्या लोकांकडे पहात होते. दादाभाई नौरोजी वगैरे मंडळींनी १८६०-७० नंतर जो कंठशोष सुरु केला तेव्हा कुठे "एतद्देशीयांचे शोषण होत आहे" हे शोषितांना समजले. तोवर सारेच कसे आलबेल होते, "aal izz well" असेच होते.
अस्पृश्यतेबद्दल जागर, सतीप्रथा निवारण ह्यासारखे ब्रिटिश सत्ता आल्याचे काही फायदेही झाले.
* काही सन्माननीय अपवादही होतेच, पण त्यांचा आवाज क्षीण पडत गेला.
>>>अस्पृश्यतेबद्दल जागर, सतीप्रथा निवारण ह्यासारखे ब्रिटिश सत्ता आल्याचे काही फायदेही झाले.
या प्रथांविरूध्द आवाज उठवणारे स्वकीयच होते.
थोडा ईतीहासाचा अभ्यास करायला पाहीजे.असेच म्हणतो.
या प्रथांविरूध्द आवाज उठवणारे स्वकीयच होते.पण मग तो आवाज त्यांनी इंग्रज आल्यानंतरच का उठवला? दुसरे म्हणजे असा आवाज उठवलेल्यांनी (राजा राममोहन राय आणि महात्मा फुले) इंग्रज राज्याचे गोडवेच गायले होते त्याचे काय? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
शेवटच्या परिच्छेदाशी सहमत.
चिंतामणराव,
कुठे गेलात हो? मी वर लिहिलेल्या मुद्द्यावर लिहा की काहीतरी. ज्या स्वकीयांनी अनिष्ट प्रथांविरूध्द आवाज उठविला तो पण इंग्रज आल्यानंतरच (त्यापूर्वी काही शे/हजार वर्षे कोणी आवाज उठविला होता का?). आणि तो आवाज उठविणारे लोकही इंग्रज राज्याचेच गोडवे गात होते त्याचे काय?
इंग्रज राज्याचा मी पण समर्थक नाही. पण त्यामुळे झालेल्या तोट्यांप्रमाणे भारताला झालेले फायदेसुध्दा लक्षात घ्यायला नकोत का?
पु.व
तुझ्या पोस्टच एकंदरीत रोख बघून असे लक्ष्यात आले की मी तुला प्रतीसाद द्यायला लायक नाही.
मी जमीनीवर उभा राहणारा माणूस. तू "झाडावर उलटे लटकणारा" निशाचर प्राणी.
भारताच्या मातितील गौतम बुद्ध, चार्वाक इत्यादी अथवा अगदी आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील संत आणि त्यांचे कार्य माहीत नसेल तर मी मी पामर काय बोलणार.
मी हरलो. तुझे चालू देत.
पण शत्रुला मदत करून , स्वकीयांच्या विरूद्ध शस्त्रे हाती घेणे --- याला काय म्हणावे?अमान्य. २०११-१२ मधले संदर्भ वापरून त्या काळातील परिस्थितीविषयी आपल्याला असेच वाटणार. ज्यांनी इंग्रजांना मदत केली त्यांना आपलेच लोक "स्वकीय" का वाटावेत? त्यांना इतरांनी अमुक एका जातीत जन्माला आल्यामुळे नीच दर्जाची वागणूक द्यायची आणि तरीही त्यांनी इतरांना "स्वकीय" मानावे ही अपेक्षा का?
काही कारणांनी, त्या काळात, त्या परिस्थीत लोकांनी ते केले असेल .. तर त्याचे उदात्तीकरण चालले आहे त्याचे वाईट वाटले.मान्य . पण यातून सगळ्यांनी एक धडाही घ्यायला हवा की आपल्याच समाजातील काही समाजघटकांना जन्म/जात किंवा अशा कोणत्याही कारणावरून दुय्यम वागणूक देणे म्हणजे शत्रूला घरात यायचे आमंत्रण देण्यासारखे आहे. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
तुमचे मुद्दे मान्य..
पण तत्कालिन दृष्ट्या कदाचित योग्य असलेल्या गोष्टिचे आज भांडवल करून अर्ध्या माहितीवर आज तिथे उत्सव करणं याचं समर्थन काय आहे? त्या काळी घडलं हा इतिहास.. आज चलो पेरणे फाटा म्हणून जातीय उत्सव करणं हे राजकारण.
चैत्यभूमी किंवा चवदार तळं ही योग्य जागा आहे उत्सवाची...साजरं करण्याची.
जरी ही लढाई काही महत्त्वाची असली तरी आज त्याचा उत्सव करणं कितपत योग्य आहे??
वरच माझ्या प्रतिक्रियेत म्हटले आहे:
काही कारणांनी, त्या काळात, त्या परिस्थीत लोकांनी ते केले असेल .. तर त्याचे उदात्तीकरण चालले आहे त्याचे वाईट वाटले.
मान्यसध्याच्या काळात जुन्या काळातील कारणांमुळे वैर वाढू नये म्हणून असे उदात्तीकरण करणे वाईट असेच माझेही मत आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनीच एक धडा घ्यायला हवा तो पण वरच्याच प्रतिसादात लिहिला आहे. धन्यवाद. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
डॉक्टरसाहेब, पेरणेफाट्याबद्दलची माहिती आवडली.
माणसांना माणूस म्हणून वागवण्यापेक्षा गळ्यात मडके बांधून त्यात थुंकणे अनिवार्य करणे, महार, मांग, रामोशी इ. अस्पृश्य गटातील लोकांनी रस्त्याने जातांना आपल्या पार्श्वभागी एका खराटा बांधून रस्ता आपोआप झाडीत जावे इ.इ. अशा जाचक अटी लादल्या नसत्या तर कदाचित महार रेजीमेंट पेशव्यांविरुद्ध लढले नसते असे मला वाटते. तुम्हाला काय वाटतं हो डॉक्टरसाहेब ?
-दिलीप बिरुटे
<तुम्हाला काय वाटतं हो डॉक्टरसाहेब? >
डॉक्टरसाहेब, तुम्हाला आणि सगळ्यांनाच माहीत आहे की हे दिवटेसाहेब एकदा लेख डकवला की नंतर इकडे फिरकही नाहीत, तेव्हा उत्तराची अपेक्षा कसली करता!
.....मन१ बरोबर १००% सहमत...
त्यावेळच्या बहुतेक सम्पूर्ण देशातील सर्व सन्थानिकाना असलेल्या भोग्विलासाच्या सवयी व ऐदी पणा सार्ख्या सवयीमुळे व त्यान्च्या गन्जलेल्या बुद्धीने त्याना काळाची पावले ओळखता आली नाहीत, याचा परिणाम म्हणजे मूठभर या देशावरचे ब्रिटीश राज्य.
बाकि ब्रिटिशांनी त्यावेळच्या व त्याआधिच्या परम्परेप्रमाणेच 'इथल्याच माणसाना इथल्या माणसाशी लढवून देश जिन्कला'.
या देशाचा इतिहास जर बघितला तर असे लक्शात येते कि 'काही मूठभर पर्किय आक्रमक येतात व आपल्यालाच वापरुन आप्ल्याला जिन्कतात' असे का ??? याचा जर आज्च्या युगातील (२१ वे शतक) आपण विचार केला तरच असे लेख येणार नाहित, मला वाटते कि जर तो झाला नाही तर येणारा काळ नक्किच कठीण असेल यात काय शन्का ??
विनोद१८
एखाद्या तीर्थक्षेत्राला जावे तसे बरेच नवबौद्ध एक जानेवारीला भीमा कोरेगावला जातात. त्यांचा असा समज करून देण्यात आला आहे की पेशाव्यांविरुद्ध लढाईत इंग्रज केवळ महार सैनिकांमुळे जिंकले. पण तेथे जाणा-या प्रत्येक नव बौद्धाने डोळे उघडे ठेवून तेथील विजयस्तंभावरील नावे वाचावीत. तुम्हाला तेथे अनेक मुस्लीम आणि इतर समाजातील शहीद सैनिकांची नावे दिसतील.
भारतीय सैनिकांची एक तुकडी तेथे दर एक जानेवारीस मानवंदना देते. ही मानवंदना या लढाईत इंग्रजांच्या घोडदलाने केलेल्या पराक्रमास असते. या घोडदलात प्रामुख्याने मुस्लीम व इंग्रज सैनिक होते. शिवाय हे युद्ध जिंकण्यामागे इंग्रजांच्या तोफखान्याचे मोठे योगदान आहे. अर्थातच, या तोफखान्याचा आणि महार सैनिकांचा कांहीच संबंध नाही. तेथे फक्त मुस्लीम आणि इंग्रज सैनिकच होते. भारतीय सैन्य या विजयाचे श्रेय पूना हॉर्स या घोड़दलाच्या तुकडीला देते, इंग्रजांनी लिहिलेल्या गझेटिअर्समध्ये महार सैनिकांचा महार असा उल्लेखही नाही. असं एका माझ्या सुजित नावाच्या बौद्ध मित्राने सांगितलं होत.
दुसरा बाजीराव
एक व्यक्तिचित्र
श्रीमंत बाजीराव रघुनाथराव पेशवे यांच्याबद्दल मराठी इतिहासात 'पळपुटा बाजीराव', 'देशबुडवा', 'रावबाजी' असे अनेक कुत्सित उदगार उपलब्ध आहेत. सामान्य मराठी माणूसच नव्हे, तर मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासावर हक्क सांगणारे पंडितही बाजीरावांची अशीच संभावना करतात. हे पाहिलं म्हणजे या शेवटच्या पेशव्याइतका दुर्दैवी माणूस इतिहासानं पाहिला नाही, असंच म्हणावं लागतं.
पण हा शेवटचा पेशवा_ दुसरा बाजीराव खरोखर इतका नादान होता का? त्याच्या व्यक्तिमत्वाचे जे जे पैलू मुद्दाम आमच्यासमोर भडकपणे मांडले जातात, त्याचा वास्तविक अर्थ काय आहे? त्याखेरीज बाजीरावाच्या व्यक्तिमत्वाला दुसरे काही पैलू आहेत का? आणि बाजीरावाविरुद्ध म्हणून जो पुरावा मांडला जातो, तो तरी बिनतोड आहे काय? अनेक प्रश्न आहेत, त्यांची सुसंगत आणि तर्काला पटणारी उत्तरं देण्याचं टाळता येणार नाही. या उत्तरातूनच खरा बाजीराव मराठी माणसासमोर उभा राहणारआहे.
बाजीरावाचा जन्म धारच्या किल्ल्यात झाला. त्याचे वडील दादासाहेब आणि आई आनंदीबाई हि त्यावेळी या किल्ल्यात जवळ जवळ बंदिवासातच होती. पुढे, मराठी राज्याचा मालक झालेला बाजीराव आपला जन्म बंदिवासात झाला, आणि बंदिवासाला कारण पुण्यातली जुनी समजली जाणारी मुत्सद्दी मंडळी, हि गोष्ट कधीही विसरू शकला नाही.
याच संदर्भात बाजीरावाचे बालपण आणि किशोरपण कसं गेलं ते पाहण्याजोगे आहे. बाजीरावाच्या जन्मापासून ते, तो गाडीवर येईपर्यंत तो कुणाच्या ना कुणाच्या आज्ञेवरून एकसारखा कैदेतच आपल्या आईच्या सानिध्यात होता. आयुष्यातली बहुतेक सारी संस्कारक्षम वर्षे कैदेतच गेली, आणि तीही आनंदीबाई सारख्या अत्यंत महत्वाकांक्षी स्त्रीच्या छायेत गेली; या घटनांचा फार खोल ठसा बाजीरावाच्या मनावर उमटला होता.
आनंदीबाई हि अपमान विसरणारी स्त्री नव्हती. दादासाहेबांच्या भोळ्या स्वभावानं तर जखमेवर मीठ चोळाव, अशा वेदना तिला होत होत्या. नारायणरावांच्या खुनाचं निमित्त करून बारभाईनी आपला मुत्सद्देगिरीत पराभव केला, हे शल्य तिला एकसारखं सलत होतं. तिची ती तडफड, जळजळ, मळमळ ती एकसारखी शब्दांतून व्यक्त करत होती; हे शब्द निखाऱ्यासारखे बाल बाजीरावांच्या मनावर चटके देत होते. एकसारखं वर्षानुवर्ष हे चालू होतं. हा कडवटपणा किती दाहक होतां त्याचा हा नमुना पहा:
बंदिवासात आनंदीबाईला पुत्र झाला. कसंही झालं तरी ती एके काळची पेशवीण होती. मराठी राज्याची नौबत उत्तरेत फडकवणाऱ्या थोरल्या बाजीरावांची सून होती, अटकेपार भीमथडी तट्टांच्या टापाची धूळ उडवणाऱ्या राघोभरारीची धर्मपत्नी होती. तिला पुत्र झाला होतां; तो समारंभ त्याच तोलामोलानं व्हावा, हि तिची अपेक्षा. हत्तीवरून साखर वाटली जावी, सुवासिनींनी दारासामोर जलकुंभ रिते करावेत आणि ओघळ नदीला मिळावा, हे तिचं स्वप्न. पण काय झाल? काही नाही! पुत्र जन्माची हि वार्ता ऐकून पुण्यात नाना फडणीसांनी आपली काटकुळी मान एकदा फक्त हलवली, आणि तो खलिता बाजूला ठेऊन दिला, तेंव्हा बाई काय म्हणाली हे पाहण्यासारखं आहे. ती म्हणाली, "पहिला एक वैरी होतां, त्याला बंद केला होतां. पुढे दुसरा वैरी निर्माण झाला अआहे, त्यास दु:ख झाले, त्यामुळे शर्करा विस्मरण झाले!" पुण्यातील मुत्सद्यांबद्दल आपल्या आईचे हे उदगार बाजीरावांच्या लहानपणी कानी पडत होते.
या बंदिवासात बाजीरावाचे शिक्षण नीट होऊ नये, याची दक्षता नाना फडणीसांनी घेतली होती. ठोसर नावाचा शिक्षक कोपरगावी बाजीरावाला शिकवण्यासाठी ठेवला होता. तोही फक्त अक्षर, पाढे, आणि जुजबी गणित शिकवण्यासाठी. पेशव्यांच्या घराण्यातल्या या मिळाला शस्त्रास्त्रांच काही शिक्षण मिळावं, लढाईतील डावपेचात तो तरबेज व्हावा याव्ही नानांनी बुद्धिपुरस्सर हेळसांड केली. ठोसराना या ना त्या सबबीवर पुण्याला बोलावून महिनोंमहिने पुण्यात थांबवून घेऊन, बाजीरावाच्या शिक्षणात खंड पडेल तेवढा पाडण्याचा नानांनी प्रयत्न केला.
कोपरगावच्या या कैदेत बाजीरावाजवळ अत्यंत हलक्या दर्जाचे लोकच फक्त राहतील, हि काळजी नानांनी घेतली होती. बाहेर कुणाशी बोलायचं झाला, पत्र पाठवायचं झालं, गाठीभेटी घ्यायच्या असल्या, तर त्या साऱ्या पुण्याहून नाना फडणीसांच्या दीर्घसूत्री कारभाराच्या घोळातून परवानगी आणूनच कराव्या लागत. कित्येकदा हि परवानगी मिळतच नसे. अशा वातावरणात बाजीरावाला आईबरोबर धर्मकृत्यांत व उपासतापासात आणि भट-भिक्षुकांच्या कर्मकांडात वेळ घालवावा लागत होता.
मराठी इतिहासातील अत्यंत आणीबाणीच्या काळात राज्याची धुरा वाहण्यासाठी नियतीनं ज्याला मुक्रर केलं होतं, त्या बाजीरावाच त्या पदासाठी शिक्षण हे असं झालं होतं; आणि तेही नाना फडनिसांसारख्या चौफेर दृष्टीच्या माणसाच्या देखरेखीखाली.
अशा बाजीरावाची नाना फडनिसाना आठवण झाली ती सवाई माधवरावांचा अपघाती मृत्यू झालं तेंव्हा; पण त्याही वेळी नानांची जिद्द अशी कि, दुसरा कुणीही फडतूस माणूस मी पेशव्यांच्या गाडीवर बसवीन; पण रघुनाथदादांच्या वंशजाला पेशवा म्हणून कदापीही मुजरा करणार नाही. पण शिंद्यांच्या जोरावर नानांना हा हट्ट सोडवा लागला, आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी बाजीराव पेशवेपदावर आरूढ झाला.
या वेळी मराठी राज्य फार कठीण अवस्थेतून जात होते. एकजात कर्ती माणसं एकापाठोपाठ एक मृत्यू पावली होती, त्यांच्या मागे वारसासाठी कलह सुरु झाले होते, आणि अशा संधीची वाट पहात बसलेला इंग्रज पुढं सरू पहात होता; त्या वेळी जरूर होती ती एकजुटीची, पेशव्यांच्या झेंड्याभोवती एकदिलान उभं राहण्याची; पण घडत होतं वेगळंच. त्या काळचा एकमेव मुत्सद्दी नाना फडणीस 'अंगठीतला हिरा बदलायचा आहे' अशा सांकेतिक शब्दांनी बाजीरावाला गादीवरून खाली ओढण्यात गर्क झाला होता. अननुभवी असला तरी बाजीरावांकडे आनंदीबाईकडून कारस्थानीपणाचा वारसा भरपूर आलेला होता. नानांचा तो डाव ओळखून होता. त्यांना शह देण्यासाठी त्यानं शिंद्यांच मोहोरं पुढं केलं, आणि नानांवर प्यादी केली. शहाला काटशह सुरु झाले. आणि मराठी राज्याचे मालक आणि मुत्सद्दी एकमेकांना खाली ओढू लागले.
परिणामत: दोघेही खाली आले, आणि वसईच्या तहाने इंग्रज घरात घुसला. त्या तहाची भयानकता शिंदे, भोसले, होळकर या जुन्या सरदारांना समजली; पण खुद्द बाजीरावाला मात्र वाटले कि, हि तात्पुरती सोय आहे; आपण यातून निभाऊन जाऊ, आणि तो तसा निभावून गेलाही असता. पण तो गादीवर आल्यापासून असं काही संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं कि, त्यातून मी मी म्हणणार्यांना बाहेर येत येईना, आणि हळूहळू खुद्द पेशव्यांचेच सरदार इंग्रजांच्या अमिषाला बळी पडून एकेक त्यांच्या कच्छपी लागले. यावेळी बाजीराव मोठ्या खोड्यात सापडला होता. राज्यकारभार सुसूत्र चालावा म्हणून त्यानं थोडं कडक धोरण स्वीकारलं कि, त्यांच्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी म्हणून त्यांचे सरदार इंग्रजांकडे जाऊ लागले;सौम्य वागावं म्हटलं, तर त्यांचा बंदोबस्त न राहून लहानमोठी बंड उभी राहू लागली,आणि त्याचा उपशम करण्यासाठी इंग्रजांचा तगादा लागू लागला. वसईच्या तहान मोठ्या कौशल्यानं हे दुष्टचक्र इंग्रजांनी पेशव्यांच्या गळ्यात अडकवलं होतं. बाजीरावांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर, अशी झाली होती.
हा इंग्रजी फासा उदाहरणाशिवाय समजण्याजोगा नाही. बापू गोखले हा पेशव्यांचा शूर सेनापती म्हणून उत्तर पेशवाईत गाजला.पेशव्यांचा सेनापती म्हणून मोठी खडी फौज जय्यत तयार ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. हि जबाबदारी पार पडता यावी, म्हणून त्याला मोठा सरंजाम लाऊन दिला होता. गोखले हा सरंजाम खात, पण त्याच्या पोटी घोडदळ ठेवण्यास मात्र टाळाटाळ करीत. सरंजामदारांनी ठेवायच्या घोडदळाचे बारीक सारीक तपशिलासह वर्णन पेशव्यांच्या दप्तरात असे. एकदा बाजीरावाने गोखल्यांच्या घोडदळाची पाहणी करण्याचा हुकुम दिला. तीस हजार घोडदळऐवजी जेमतेम सात-आठशे घोडदळ बापुंजवळ निघालं. पेशव्यांनी जाब विचारताच 'अन्याय! अन्याय!' असं ओरडत हा सेनापती इंग्रजांकडे गेला आणि त्यांनी मध्यस्थी करावी, म्हणून त्यांची मनधरणी करू लागला; त्यांना मेजवान्या, भेटी देऊ लागला. थोड्याफार फरकांत पेशव्यांच्या साऱ्याच जहागिरदारांचा आणि सरंजामदारांचा हाच प्रकार होता. पेशव्याकडून मिळालेली जहागीर खायची, पण त्याबरोबर येणारी जबाबदारी टाळायची, आणि पेशव्यांनी त्याबद्दल दरडावून विचारलं कि, इंग्रजांकडे जायचं, याच मनोवृत्तीतून इंग्रजांच्या मध्यस्थीने बाजीरावाचा जहागिरदारांशी पंढरपूरचा तह झाला, व मध्यस्थ म्हणून दोन्ही पक्षांकडून इंग्रजांना प्रतिष्ठा प्राप्त झाली; म्हणजे वसईच्या तहाने जे जोखड बाजीरावाच्या मानेवर बसलं ते त्याच्याच जहागिरदारांच्या नादानपणामुळे पक्कं झालं; ढिलं झालं नाही.
दिवसेंदिवस मराठी राज्यात इंग्रजांचा झालेला हा आक्रम वाढतच चालला. युद्धासारख्या धकाधकी पासून दूर राहणाऱ्या बाजीरावाने अखेरीस ओळखले कि, या जिण्यातून मुक्त होण्यापेक्षा सोक्षमोक्ष करण्यासाठी इंग्रजांशी उघड युद्ध पुकारण्यावाचून गत्यंतर नाही. सर्व उपाय थकल्यावर त्यानं युद्ध पुकारलं, आणि त्या युद्धात तो हरला. इंग्रजांचं राजकारण आणि युद्धकारण दोन्हीही वरचढ ठरलं, आणि खडकीच्या लढाईपासून सुरुवात झालेल्या युद्धाच्या धूळकोटाचा शेवट झालं, त्यात मराठी राज्य नष्ट झालं. इंग्रजांनी दिलेल्या अटीवर तह पत्करून बाजीराव ब्रम्हावर्ताला निघून गेला.
दिवसेंदिवस मराठी राज्यात इंग्रजांचा झालेला हा आक्रम वाढतच चालला. युद्धासारख्या धकाधकी पासून दूर राहणाऱ्या बाजीरावाने अखेरीस ओळखले कि, या जिण्यातून मुक्त होण्यापेक्षा सोक्षमोक्ष करण्यासाठी इंग्रजांशी उघड युद्ध पुकारण्यावाचून गत्यंतर नाही. सर्व उपाय थकल्यावर त्यानं युद्ध पुकारलं, आणि त्या युद्धात तो हरला. इंग्रजांचं राजकारण आणि युद्धकारण दोन्हीही वरचढ ठरलं, आणि खडकीच्या लढाईपासून सुरुवात झालेल्या युद्धाच्या धूळकोटाचा शेवट झालं, त्यात मराठी राज्य नष्ट झालं. इंग्रजांनी दिलेल्या अटीवर तह पत्करून बाजीराव ब्रम्हावर्ताला निघून गेला.
मराठी राज्य लयाला गेलं आणि दक्षिणेत इंग्रजी अंमल निर्वेध चालू झाला, त्याच वेळी जहांबाज इंग्रजी मुत्सद्दी एल्फिन्स्टन राज्याची स्थिरस्थावर करीत होता. त्यानं विजेत्याचा गर्व मिरवला नाही; तसं तो करता तर, असंतोष धुमसून त्यांच्या स्फोटात तो व त्याच राज्य नष्ट झालं असतं. तेवढं समजण्याची अक्कल त्याच्यापाशी होती. त्यानं मराठी माणसाची मने पोखरण्याचे काम प्रत्यक्ष मराठेशाही नष्ट होण्याअगोदर आठ वर्षापासून सुरु केलं होतं, ते काम आता जोमानं हाती घेतलं. या कामाचा प्रमुख भाग म्हणून त्यानं शर्करावगुंठीत शब्दात आपलं भ्रामक तत्वज्ञान त्या वेळच्या बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या मराठी माणसाच्या गळी उतरवलं. त्याचा सिद्धांत असं कि, 'तुम्ही मराठी माणसं तशी फार शहाणी, मोठी; तुमचा धर्मही फार थोर; पण तुमचा हा पेशवा फार नादान! राज्य कसं चालवावं, याची त्याला अक्कल नाही.त्याचे अधिकारी तुमच्यावर जोरजबरदस्ती करतात, तुमची वित्तविषय हरण करतात, असं जुलमी सत्तांपासून तुमची सुटका करून, तुम्हाला सुखासमाधानान आपापला व्यवसाय, शेतीभाती करता यावी, म्हणून आंम्ही हा प्रपंच केला.' हे भ्रामक तत्वज्ञान एल्फिन्स्टननं एवढ्या प्रभावी शब्दांत मांडले कि, आज दीडशे वर्षे झाली, एवढं पाणी वाहून गेलं, तरी ते आपली पकड सोडत नाही! एल्फिन्स्टन चा कावा, ढोंग मराठी माणसाला आकलला नाही; ज्या थोड्यांना तो आकालला आणि ज्यांनी त्याला विरोध केला, त्यांचा त्याने पद्धतशीरपणे काटा काढला. शब्दांचं अवडंबर दूर करून बोलायचं तर, त्यांचे त्याने खून केले, जन्मातून उठवलं. या दहशतीने बाकीचे गप्प बसले, याउलट ज्यांनी त्यांच्या होत हो मिळवला त्यांचं त्यानं कोटकल्याण केलं. या लोकांना हाताशी धरून एक नातू संप्रदाय तयार केला. त्यांच्या मदतीनं त्यानं इंग्रजांच्या दुष्कृत्यावर पांघरूण घातलं, मराठ्यांच्या राईएवढ्या दोषांचे पर्वत करण्याचा चमत्कार करून दाखवला, त्याला एत्तदेशीय तथाकथित तज्ञ मिळाले, त्यांनी देशभक्ताविरुद्ध साक्षी दिल्या, हव्या तशा जबान्या आणून दिल्या.नको ते कागद पद्धतशीरपणे नष्ट केले, इतिहास लिहिण्याच्या नावावर अत्यंत हिडीस, असत्य लिहून ठेवली. असत्य उघडकीला येऊ नये म्हणून, त्याल सत्याची झिलई दिली. खोटे कागद, खोटे दस्त ऐवज, खोट्या जबान्या, कशा कशाची तमा न बाळगता, अत्यंत धूर्तपणे मराठी माने पोखरून मराठी राज्यकर्त्यांविरुद्ध लोकमत तयार केलं, आणि इंग्रजी अंमल पक्का केला.
आज बाजीरावाबद्दल जो मतप्रवाह प्रचलित आहे, त्याचा हा उगम आहे. एल्फिन्स्टन हा बाजीरावाचा कट्टा दुश्मन, त्यानं बाजीरावाबद्दल लिहिताना वाईट लिहिण्याचं कांही बाकी ठेवलं नाही, त्यामुळे विलायतेतल्या डायरेक्टर यांनाही एल्फिन्स्टनची कृती समर्थनीय वाटू लागली. मराठी इतिहासातील शेवटच्या पेशव्यासंबंधी कुठलंही इंग्रजी साधन पाहिलं, तर त्याचा उगम एल्फिन्स्टन पाशी लागतो; त्याच्याच मताची री पुढं साऱ्यांनी ओढली आहे. शिक्षित मराठी माणसाच्या मनावर या मताचा एवढा बसला कि, अनेक कारणासाठी, सम्यक अभ्यास झाला नाही; त्यामुळे या शेवटच्या पेशव्यावर इंग्रजांनी केलेला अन्याय अद्याप चालू आहे.
इतिहासात त्रिकालाबाधित काही असत नाही. वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या साधनाद्वारे तपासून घ्यावे लागतात; जरूर तर बदलावे लागतात, किंवा नवीन स्वीकारावे लागतात.शेवटच्या पेशाव्याबद्दल नवीन साधनाद्वारे विचार केला,तर त्याचं व्यक्तिचित्र अगदी वेगळं दिसू लागतं.
बाजीरावाला मोठं दूषण लावलं जातं ते 'पळपुटा' म्हणून. शेवटच्या लढाईत बाजीराव पुढं पळत होता; मागे इंग्रजांची फौज होती, हे हे खरं; पण बाजीरावाचा पळ हा लढाईतून पराभव झालेल्या माणसाचा पळ नव्हता; या पळात हुलकावण्या होत्या, अनुकूल वाटल्यास एखाद्या ठिकाणी ठासून युद्धाला तोंड देण्याची तयारी होती, प्रचंड फौज बरोबर घेऊन वेगाने कूच करण्याचं कौशल्य होतं, त्यातही कांही अंदाज होते, पण दुर्दैवाने ते चुकीचे ठरले.भोसले व शिंदे यांच्या फौजांना जाऊन मिळण्याचा त्याचं विचार होता, आणि ते सध्या होईपर्यंत हुलकावण्या देत पळन्याशिवाय गत्यंतर नव्हते. या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धातील पळणाऱ्या जर्मन सेनापती, रोमेलची आठवण करावी, म्हणजे युद्धशास्त्रात शत्रूला हुलकावण्या देत पळत राहणे हा देखील एक युद्धप्रकार आहे, हे लक्षात येईल; पण बाजीरावाचा पराभव झाला आणि लगेच त्याच्या नादानंपणाच्या जाहिराती फडकवण्यात आल्या, त्यामुळे त्याच्या शेवटच्या पळाची शहानिशा करण्याची कुणी तसदी घेतली नाही; त्याचं नादानपणा, पळपुटेपणा गृहीतच धरला गेला; पण हा पळ पराभवाच्या पोटी निर्माण झाला नसून, पुढे काहीतरी राजकारण योजून पद्धतशीरपणे झाला होत होता, हे लक्षात घेतलं म्हणजे त्याचं महत्व लक्षात येत.
या आरोपाबरोबरच इंग्रजांनी बाजीरावाच्या भित्रेपणाबद्दल अनेक कंड्या उठवल्या. तो भित्रा होता, तोफांचे आवाज ऐकून त्याची घाबरगुंडी उडत असे, त्यामुळे आपल्या स्वागताच्या वेळी तोफांचे आवाज ऐकून त्याची घाबरगुंडी उडत असे , आपण दूर गेल्यावर ते काढावेत, असा हुकुम दिला होता, अशीही कंडी पिकवली होती.
बाजीरावाने स्वतः हातात तलवार घेऊन रणात उडी घेतली नव्हती हे खरं; त्याच कारण म्हणजे त्याला प्रत्यक्ष शस्त्रांच शिक्षणच दिलं गेलं नव्हतं. मर्दानी खेळांपासून त्याला मुद्दाम दूर ठेवलं होतं. पण हातात शास्त्र न धरणं वेगळं आणि स्वभाव भित्रा असणं वेगळं. कोपरगावी असताना भर पुरात नदीत पोहण्याचा नाद बाजीरावला होता, असे उल्लेख पेशवे दप्तरात आहेत. त्याचं शरीर बळकट होतं, चांगल्या मेहनतीचं होतं, असा पुरुष तोफांच्या आवाजाला घाबरेल, हि गोष्ट तर्काच्या पलीकडे आहे.
बाजीरावाच्या ज्या दुर्गुणांच इंग्रजांनी भांडवल केलं तो दुर्गुण म्हणजे त्याचा स्त्रैणपणा. या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे, आणि ती म्हणजे इंग्रज स्वतःच्या चालीरीतीवरून बाजीरावाच मोजमाप करीत होते. बाजीरावकालीन मराठी समाजात मोठ्या स्थानावरील माणसाकडे एकदोन लग्नाच्या बायका आणि एकदोन अंगवस्त्र असणं हि अगदी मामुली गोष्ट समजली जात होती. बाजीराव या बाबतीत थोडा सढळ होतं इतकंच पण त्याचं वर्तन त्या काळच्या रूढ व्यवहाराच्या दृष्टीने अनैतिक होते, असा कोणताही पुरावा इंग्रजांनी पुढे मांडलेला नाही. इंग्रजांचे आरोप पद्धतशीरपणे मोघम होते. बाजीराव शनिवारवाड्यात मोठ्या मोठ्या सरदारांच्या बायकांना बोलावीत असे, आणि तेथे अत्यंत निंद्य असा व्यभिचार चालत असे, अशी वावडी उठवून इंग्रजांनी बाजीरावाबरोबर गोखल्यांची आणि रास्त्यांची नालस्ती केली आहे. पण या कपोल कल्पित हकीकतीला तत्कालीन कागदातून कुठेही निर्विवाद दुजोरा नाही. जे तुटपुंजे उल्लेख आहेत ते, इंग्रजांच्या कच्छपी लागलेल्या लोकांनी लिहिलेल्या एखाद-दुसऱ्या बखरीतून, नाहीतर कैफियतीतून. पण इंग्रजांची मर्जी संपादन करण्याच्या हेतूतून या बखरी किंवा कैफियती निर्माण झाल्यामुळे, त्यातले उल्लेख सत्याच्या निकषावर टिकत नाहीत. याचा असाही अर्थ नाही की, बाजीराव त्या काळच्या फुटपट्टीने सोवळा होतं. तो विलासी जरूर होता; पण त्याच्या विलासीपणाला जे हिडीस रूप इंग्रजांनी दिलं आहे ती मात्र निव्वळ त्यांची हातचलाखी आहे. क्षणभर अशी कल्पना करूया कि, त्यावेळी बाजीरावाचा जय होऊन इंग्रजांचा पराभव झाला असता, तर खुद्द इंग्रजांचीच नैतिक दृष्टीने गर्हणीय अशी कितीतरी कृत्ये उजेडात आली असती; पण तसं व्हायचं नव्हतं, म्हणून बाजीराव स्त्रैण ठरला आणि ते साळसूद ठरले.
याउलट बाजीरावाच्या बाजूनं सांगण्याजोग्या कांही गोष्टी आहेत, त्यांचा इंग्रजांनी चुकुनही उल्लेख केला नाही. बाजीराव कपटी होता, त्याच्याजवळ सभ्यता नावालाही नव्हती, औषधालाही नव्हती, हे इंग्रजांचे मत. पण तुमच्याविरुद्ध युद्ध पुकारलं आहे, असं बाजीरावान स्पष्ट शब्दात इंग्रजांना अगोदर कळवले होते; हे कपटी स्वभावाचं लक्षण खचितच नव्हे. इतकंच काय पण त्याआधी एल्फिन्स्टनला बोलून नि:संधीग्ध शब्दात बाजीरावान आंपण इंग्रजी नीतीला कसे विटलो आहोत, हे साहेबाला ऐकवलं होतं. कडक सोवळंओवळं पाळणारा बाजीराव शानिवावाड्यात इंग्रजी डॉक्टरना खुशाल वाटेल तिथं फिरून औषधोपचार करायला परवानगी देतो, खुद्द आपल्या बायकोला देवीची लस टोचून पुण्यातल्या लोकांसमोर उदाहरण ठेवतो, या गोष्टी फार बोलक्या आहेत. लग्नात मुलीचा पैसा घेऊ नये, घेतल्यास दंड होईल असं फतवा त्याच पेशव्याने काढला आहे. प्रजेची काळजी असलेल्या सुसंस्कृत राज्यकर्त्याचे हे लक्षण म्हणायचं का नादान राज्यबुडव्याचे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. वन महोत्सवाचा गाजावाजा आज आपण ऐकतो; पण त्या धामधुमीच्या काळातही हजारो वृक्ष लाऊन ते चांगले जोपासतील याची तरतूद बाजीरावान केली होती, हि गोष्ट उपेक्षणीय खास नाही. खाटिक गोहत्या करतात असं समजताच, त्याचा तत्परतेने बंदोबस्त करणारा पेशवा अगदीच नादान असेल काय? बाटून ख्रिस्ती झालेल्यांना पुन्हा शुद्ध करून हिंदू धर्मात घेण्याइतका उदार असलेला हा मराठी राज्याचा धनी, पट्टीच्या ब्राह्मणाबरोबर वेदमंत्र म्हणू शकणारा हा ब्राह्मणगडी इंग्रज रंगवतात तेवढा वाईट असेल यावर विश्वास बसत नाही.
बाजीराव स्वतः हिशेब लिहित असे. कित्येक हिशेब त्याने सांकेतिक भाषेत लिहून ठेवले आहेत, ते वाचता आले तर चंद्राची दुसरी बाजू दिसावी अशी मौलिक माहिती उजेडात येणार आहे.
असं हे बाजीरावाच व्यक्तिचित्र खोट्या इतिहासानं डागाळलेलं आहे. मग बाजीराव पेशवा होता तरी कसा? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर सोपं आहे. नारायणराव पेशवा किंवा सवाई माधवराव पेशवा यापेक्षा बाजीराव खासच वाईट नव्हता. त्यांच्या वेळची परिस्थिती त्याला लाभती, तर इतिहास काही वेगळा घडला असता. पण तो गादीवर आल्यापासून पुण्यात जे जे मुत्सद्दी होते, त्यांनी त्यांनी त्याच्याविरुद्ध कटकारस्थान करायला सुरुवात करून स्थिर राज्यकारभार करण्याइतकी उसंतच त्याला मिळू दिली नाही. नियतीनं त्याच्याविरुद्ध कट करावा, अशीच परिस्थिती उत्पन्न झाली. साडेतीन शहाण्यांपैकी शहाणे नाना फडणीस यांनी आपल्या आयुष्यातील अखेरची वर्षे बाजीरावाविरुद्ध कारस्थानं करण्यात घालवली; महाडला बसून प्रचंड राजकारण उभं केलं. खर्ड्याच्या लढाईत मिळवलेला विजय होत्याचा नव्हता करून मराठयांच हसू या मुस्तद्यानी केलं. याउलट दौलतराव शिंद्यांसारख्या मातबर सरदारान होळकरांच्या द्वेषान अंध होऊन बाजीरावाला त्याच्याशी समझोता करू दिला नाही. शिंदे व होळकरांचे हे संबध तुटेपर्यंत ताणले गेले. खजिना रिता, जवळ स्वतःची फौज नाही, मुत्सद्यांचे पाठबळ नाही, सरदार एकमेकांच्या जीवावर उठलेले, इंग्रजांसारखे मातबर लोक टपलेले, अशा परिस्थितीत राज्यकारभाराच यत्किंचितही शिक्षण नसलेल्या बाजीरावाने एकवीस वर्षे राज्यकारभाराचा गाडा हाकला, हेच विशेष.त्याचा अखेर पराभव झाला हि साऱ्या मराठी माणसांची गफलत, नाना फडणीसासारख्यांची अदूरदृष्टी आणि पानसे, पुरंदरे, पटवर्धानासारख्या जुन्या सरदारांचा स्वार्थ, यापलीकडे याची उपपत्ती नाही.स्वतःच्या तुटपुंज्या ताकदीने बाजीरावाने अखेरपर्यंत शर्थ केली. मराठी राज्यासाठी त्याच्याजवळ असून त्यानं ते दिलं नाही, असं एकही उदाहरण दाखवता येणार नाही. जे त्याच्याजवळ नव्हतंच ते त्यानं दिलं नाही असं म्हणणं म्हणजे त्याच्यावर घोर अन्याय करण्यासारखे आहे. याउलट कितीतरी मराठी सरदारांनी त्यांच्या अंगी राज्य वाचवण्याला उपयोगी पडतील असे अनेक गुण असताना त्यांचा वापर न करत अंगचोरपणा केला आहे. प्रत्यक्ष लढाई पुकारल्यानंतर विंचूरकरांच्या पथकासमोरून एल्फिन्स्टन पालखीत बसून, बरोबर दहापाच लोक घेऊन जातो, विंचूरकर त्याला अडवीत नाहीत, हि घटना काय दर्शवते? युद्धात सामील होऊन, खाल्ल्या अन्नाला जागा, हि बाजीरावाने सरदाराना घातलेली साद अरण्यरुदन ठरते, यावरून काय निष्कर्ष निघतो? हजारो लोक नातू पंथात सामील होऊन देश बुडवण्याच काम राजरोस उजळ माथ्यान करतात, हा काय प्रकार म्हणावा?
बाजीरावाच्या व्यक्तीमत्वाच मूल्यमापन करताना खुद्द रियासतकार सरदेसायांनाही हाच पेच पडला होता. बाजीरावाच नवीन मूल्यमापन त्यांनी केलेले नाही; पण जुनेही बरोबर आहे असे त्यांना वाटेना. मधला मार्ग म्हणून त्यांनी बाजीरावाबद्दल कोण कोण काय म्हणते याचे उतारे देऊनच मूल्यमापनाचे काम भागवलेआहे. पेशवे दप्तरात आणि इतरत्र उपलब्ध झालेली अस्सल ऐतिहासिक साधनं अभ्यासल्यावर रियासती पुन्हा लिहिण्याचा योग त्यांना आला असता, तर माज्झी खात्री आहे, त्यांनी फार वेगळा बाजीराव उभा केला असता. पराभवाच्या गडद छायेमुळे अस्पष्ट झालेली दुर्दैवी बाजीरावाची व्यक्तिरेखा घासून पुसून खऱ्या स्वरुपात त्यांनी मांडली असती.
ना.सं.इनामदार
[इनामदारी]
संकलक:प्रवीण कुलकर्णी
चोप्य पेस्टक: रोहित भिडे
वि.सु. (लिंक द्यायची होतीत असा गळा काढू नये, तिथे पण जाऊन वाचणारच होतात ना ? मग इथे वाचलेत तर काय बिघडेल !धन्यवाद)
उत्तम माहिती.
माहीती प्रचंड आवडली. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजु असतेच. इंग्रज फारच गुणी होते असं म्हंटलं जातं कारण ते जेते होते.
बाकी मराठी माणसाची खेकड्याची वृत्ती हा वाक्प्रचार वरील उदा. वरुन तर तयार झाला नसेल ना?
जबरदस्त माहिती, इथं डकवलीत ते बरं केलंत, उगा त्या लिंक पाहण्याएवढा उद्योग नसता केला...
सगळीकडेच जेत्यानी लिहिलेल्या इतिहासात हेच प्रकार झाले आहेत. छत्रपती संभाजींच्या बाबतीत हेच झालं होतं आणि पोर्तुगीजानी लिहिलेल्या गोव्याच्या इतिहासात हेच प्रकार आहेत.
फार काय इतिहास लिहून न ठेवण्याच्या प्राचीन भारतीय पद्धतीमुळे सिकंदरच्या भारतावरील स्वारी आणि तथाकथित विजयाबद्दल वेगळ्याच कहाण्या आज वाचायला मिळतात.
इथे वाचली काय अन तीथे वाचली काय.
तु कष्ट घेउन इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
रोहित भिडे'जी...... झकास्स्स्स्स्स... सुन्दर.. अप्रतिम!!!!!!.... खूपच्च्च्च्च्च्च्च मौल्यवान माहिती उजेडात आणल्याबद्दल मनापासून आभार......... _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ :)
नेताजी पालकरसारख्या ३ वेळा मुसलमान धर्म स्वीकारून महाराजान्विरुद्ध बन्ड करणार्या धर्मबुडव्याला माणसाला शिवाजी राजेन्नी माफ केले आणि तिन्ही वेळेस तत्कालीन ब्राह्मणांकरवी त्याची शुद्धी करुन पुन्हा पुन्हा हिन्दु धर्मात समावून घेतले....
अर्थात बॅकग्राऊन्ड जाणून न घेता दुसर्या बाजीरांवांविरुद्ध वावड्या उठविणारे नेताजी पालकर'च्या बाबतीत मात्र मूग गिळून गप्प बसतात.... :|
हा प्रतिसाद अस्थानी वाटतो आहे. नेताजी पालकर प्रचंड पराक्रमी सेनापती होते आणि नात्याने शिवरायांशी बांधले गेलेले होते. त्यानी आदिलशाहीला जाऊन मिळणे हा शिवरायांनी एका जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा भाग होता. त्यानी आदिलशाही फौज वापरून मुघलांवर हल्ले केले, तर महाराजानी मिर्झाराजाना आदिलशहाविरुद्ध मदत दिली, अशा तर्हेने दोन्ही बादशाह्याना खिळखिळ्या करण्याचे एक योजनाबद्ध काम महाराजानी केले होते. (संदर्भ विकिपेडिया)
पुरंदरच्या तहानंतर स्वतः संभाजी राजाना औरंगजेबाचा मनसबदार करण्यात आले, तेव्हा नेताजी मिर्झाराजांसोबत मनसबदार म्हणून राहिले, महाराज आग्र्याहून निसटले तेव्हा नेताजीला कुटुंबकबिल्यासहित पकडून मुसलमान करण्यात आले. नंतर त्यानी अफगाणिस्तानात पठाणांविरुद्ध लढून औरंजजेबाचा विश्वास संपादन केला. यात आयुष्याची दहा वर्षे खर्च केली आणि परत महाराष्ट्रात पाठवताच सरळ हजेरी लावली ती रायगडावर! महाराजानी या प्रतिशिवाजीची कदर केली आणि त्याना परत शुद्धिकृत करून हिंदू धर्मात घेतले. अशा अत्यंत स्वामिभक्त लढवय्याविरुद्ध कृपया ३ वेळा धर्मांतर वगैरे अपशब्द वापरू नयेत.
नेताजी पालकर प्रचंड पराक्रमी सेनापती होते आणि नात्याने शिवरायांशी बांधले गेलेले होते. त्यानी आदिलशाहीला जाऊन मिळणे हा शिवरायांनी एका जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा भाग होता. त्यानी आदिलशाही फौज वापरून मुघलांवर हल्ले केले, तर महाराजानी मिर्झाराजाना आदिलशहाविरुद्ध मदत दिली, अशा तर्हेने दोन्ही बादशाह्याना खिळखिळ्या करण्याचे एक योजनाबद्ध काम महाराजानी केले होते.नेताजी पालकर पराक्रमी होते, याबद्दल दुमत नाही. तसेच ते जरी "प्रतिशिवाजी" म्हणून ओळखले जायचे आणि नात्याने शिवाजींचे व्याही होते, तरी ""त्यानी आदिलशाहीला जाऊन मिळणे हा शिवरायांनी एका जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा भाग होता. "" ही गोष्ट बिलकूल पटण्यासारखी नाही. कारण पन्हाळा गडावरील स्वारी करण्याबद्दल त्यान्नी शिवाजीराजेन्चा आदेश पाळला नाही. पन्हाळगडावर स्वारी करण्याचे ठरले होते १६ जानेवारी रोजी. आणि पाल्कर मुद्दाम १७ जनेवारी रोजी आले. त्यामुळे शिवरायान्ना लढाईत हार पत्करावी लागली होती. त्यावेळी महाराजांनी "समयांस कामास न आल्यामुळे" नेताजी पालकरान्ची मराठा सैन्यातून हकालपट्टी केली. व त्यामुळे चिडलेल्या नेताजी पालकरानी महाराजान्ची माफी मागण्याऐवजी आदिलशहास मिळणे पसन्त केले. त्यानन्तर तिथे काही वाद झाल्यामुळे मिर्झाराजेन्च्या सान्गण्यावरून , आदिलशाही सोडून नेताजी "मुघला"ना जाऊन मिळाले. मुघलान्शी ते जरी त्यावेळी एकनिष्ठ होते, तरी आग्र्याहून शिवाजी महाराज सुटल्यानन्तर प्रतिशिवाजी- नेताजी पालकर सुटू नये, म्हणून औरन्गजेबाने नेताजीच्या अटकेचे आदेश सोडले, तेव्हा नेताजी पालकर बीडनजीकच्या 'धारुर' या गावी होते. तेव्हा मिर्झाराजेन्च्याच्च सान्गण्यावरून ऑक्टोबर १६६६ मध्ये नेताजी धर्मान्तरास तयार झाले. व "महम्मद कुलीखान" असे नाव घेऊन अफगणिस्तानात औरन्गजेबाची चाकरी करत राहिले. इकडे शिवाजीराजेन्बरोबर सतत अपयशी ठरत असल्यामुळे औरन्गजेबाने नेताजी पालकर उर्फ महम्मद कुलीखान'ला पुन्हा दिल्लीला आणले. तब्बल १० वर्षे महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर औरन्गजेबाची चाकरी करत राहिले. पण पुन्हा भारतात्/दिल्लीला आल्यावर १६७६ साली त्यान्ना महाराष्ट्रात शिवाजीराजेन्शी लढाई करण्यास पाठविले गेले. कारण औरन्गजेबाचा पूर्ण विश्वास होता... की "महम्मद कुलीखान" हा आता पूर्णपणे मुघल झालेला आहे. पण यावेळी महाराजान्बरोबर गद्दारी केल्याबाबत पश्चाताप पावलेल्या नेताजी पालकरान्नी औरन्गजेबाचाही विश्वासघात केला. आणि मे १९७६ मध्ये मुघलछावणीतून पलायन करून रायगडावर महाराजांना भेटायला आले. व जून १६७६ मध्ये रायगडावरच महाराजांनी ब्राह्मणांकरवी महम्मद कुलीखान'ला पुन्हा "नेताजी पालकर" बनवले. अर्थात पुन्हा हिन्दु धर्मात सामावून घेतले. अर्थात नेताजी पहिल्यान्दा जेव्हा "बाटले" होते, आणि नन्तर पुन्हा महाराजान्ची माफी मागायला आले तेव्हा महाराजान्नी त्यान्ना तेव्हाही माफ करून स्वतःची मुलगी त्यान्च्या मुलाला- जानोजीरावास देऊन त्यान्ना स्वतःचे व्याही करवून घेतले...यामागे महाराजान्चा दुसरा उद्देश असाही होता.. की नेताजीसारखा मुत्सद्दी माणूस पुन्हा "बाटला" जाऊ नये.. पण शेवटी व्हायचे तेच्च झाले. नेताजी- महम्मद कुलीखान बनून औरन्गजेबाची चाकरी करत राहिला...त्यामुळे महाराजान्च्या उमेदीच्या- लढाईच्या काळात खूप कमी वेळा "नेताजी पालकर" महाराजान्च्या कामास आले. मग १६८० साली महाराजान्च्या निधनानन्तर नेताजी सम्भाजी महाराजान्ची चाकरी करत राहिले. :)
तेव्हा मिर्झाराजेन्च्याच्च सान्गण्यावरून ऑक्टोबर १६६६ मध्ये नेताजी धर्मान्तरास तयार झाले. व "महम्मद कुलीखान" असे नाव घेऊन अफगणिस्तानात औरन्गजेबाची चाकरी करत राहिले.याला काही ऐतिहासिक आधार नाही. उलट बायकामुलांच्या हालांच्या भीतीने नेताजींचं परिवारासकट धर्मांतर घडवून आणलं गेलं. ते जर स्वखुशीने असतं तर मिळालेल्या पहिल्या संधीबरोबर त्यानी महाराजाना परत येऊन शुद्धीसाठी विनवलं नसतं. महाराज गद्दाराना कधीही क्षमा करत नसत, मग तो नातेवाईक का असेना. मग नेताजीच्या बाबतीतच महराज इतके मऊ का राहिले, ही एकच गोष्ट नेताजी आणि महाराजांच्या संबंधातील शंकाना उत्तरे द्यायला पुरेशी आहे. (हे फारच अवांतर होतंय. आणखी काही चर्चा करायची असेल तर खव किंवा व्यनिमधे स्वागत आहे.)
पैसाताई, नेताजी पालकर'बाबत वर दिलेली माहिती ही "जेधे शकावली", "बाबासाहेब पुरन्दरे बखर" तसेच इतर काही इतिहासकारांच्या बखरीतून दिलेली आहे. अर्थात प्रस्तुत लेखाशी या विषयाचा काहीही संबन्ध नाही. पण तरीही "पाचामुखी परमेश्वर" या म्हणीनुसार नेताजींबाबतची ९० % जणांची वक्तव्ये ही त्यांना "गद्दार" समजण्याकडेच झुकलेली वाटतात. असो. नेताजीन्बाबतचे आपले विचार समजून घ्यावयास नक्कीच आवडतील.. अर्थात "सन्देश" फॅसिलिटी मधून. :) _/\_
बाबासाहेब पुरन्दरे बखर
हे प्रथमच ऐकले बुवा. कुठशिक गावल ही बखर? कधी लिवली म्हन्त्यात बाबासायबानं?
इतरत्र दिलेला प्रतिसाद इथे पुन्हा देतोय.
मी फार फार पूर्वी "मंत्रावेगळा" का कुठलीतरी pro-Bajirao कादंबरी वाचली होती. तसाच "झुंज" ही pro-Yashwantrao Holkar ग्रंथही वाचला होता.त्यातले ललित लेखन, उदात्तीकरण व रंजक भाग सोडला तरी काही गोष्टी पटल्या. नंतर थोडेफार इतर अस्सल इतिहासकारांनी केलेले स्फुट लेखनही वाचण्यात आले. त्यानुसार काही गोष्टी लिहित आहे.
यशवंतराव होळकर पराक्रमी होता ह्यात शंकाच नाही. एकट्याच्या जीवावार भिल्ल,पेंढार्यांचे सैन्य उभे करून पेशवे-शिंदे व इतर मांडालिक संस्थानंना एकहाती टक्कर त्याने दिली.(१७९७ ला फौजफाटा जय्यत तयार केला,१८०३ च्या आसपास पर्यंत होळकरांचे वतन परत मिळवले.पेशव्यांशी युद्धे केली.१८०३ ते १८११ दरम्यान फक्त ब्रिटिशांशी युद्धे केली, सर्व जिंकली.)
पुढे ब्रिटिशांशीही यशस्वी लढाया केल्या. ह्या जवळ्जवळ सर्व जिंकल्या.त्यांच्या कामाचा आवाका,झपाटा हा जबरदस्तच होता.त्या तोडीचा झपाटा मला फक्त पोर्तुगीज्,आदिलशहा,मुघल व फुटीर संस्थानिक्,घरभेदी नातलग ह्यांना पुरून उरणार्या संभाजी राजांचा वाटतो. थोडक्यात, होळकर म्हणजे एक कर्तबगार व्यक्ती.
आता बाजीरावः-
ह्याचा पेशवा बनण्यापूर्वीचा बहुतांश काळ हा कैदेत वा नजरकैदेत गेला.म्हणजे, बाहेरच्या जगाची विशेषतः दरब्वारी रितीरिवाजांची फारशी जाण नाही. माणसांची पारख करण्याचे, परिस्थितेला कौशल्याने हाताळायचे त्याचे कौशल्य वाढिला लागायला काही वावच मिळाला नाही. कारण?
कारण हेच की दुसरा बाजीराव म्हणजे राघोबाचे चिरंजीव. राघोबा हा बारभाईंचा वैरी.राघोबाला पेशवेपदापासून दूर ठेवण्यासाठीच बाराभाईंनी नारायणरावाच्या जन्मजात बाळाला सवाई माधवराव "पेशवे" घोषित करुन राज्यकारभार सुरु केला. काही काळाने वृद्धापकाळाने राघोबा गेला.अजून काही वर्शाने खुद्द सवाई माधरावानेच वीसेक वर्षाच्या वयात आत्महत्त्या केली. आता? आता पेशव्याम्ना वारसच कोण???
समोर एकच नाव होते.कैदेत असलेला राघोबाचा मुलगा दुसरा बाजीराव.नाइलाज म्हणूनच त्याला पेशवा केले.१७९६ च्या आसपास.वरवर बघता मराठा सत्त आता बलिष्ठ आहे की काय, कळसाला पोचली आहे की काय असे वाटेल; पण आतून ती आधीच पोखरली गेली होती. तिचे विश्वासाचे खांब कधीच खिळखिळे झाले होते. धोरणातील एकसलगता कधीच नष्ट झाली होती. भारतभरात कुठेही छोत्यामोठ्या कुरबुरी झाल्या की मराठे त्यात उतरत,....
दोन्ही बाजूने उतरत!!
कधी एका बाजूने शिंदे व दुसरीकडून होळकर असा वाद राजपूतांच्या गादीवर कुणी बसायचे ह्यावरून झालेला दिसतो.
तर कधी एका बाजूला नागपूरकर भोसले एका स्पर्धकाला मदत करत असताना बरोब्बर दुसर्या बाजूला पेशवे मदत करत. हे म्हणजे एका हाताने दुसर्याची बोटे तोडण्याचे धंदे होते. आपण सारे छत्रपतींचे चाकर आहोत, ही भावना स्पष्ट कुठे उमटेना. मराठी फौजा १७६१ला ज्या पानिपतासाठी सगळे सरदार घेउन उभ्या ठाकल्या, तो प्रसंग शेवटचाच. त्यतील सगळीच आघाडीची घराणी स्वतंत्रपणे, एकेकेटी मनमानी राहू लागली.
थोडक्यात, पेशव्यांचे नियंत्रण आधीच कमी होत चालले होते. त्याला जबाबदार कोण,पेशवे,छत्रपती,इतर सरदार, की सामूहिक अपयश हा मुद्दा नंतरचा. पण असे घडत होते हे सत्य आहे.
ह्या पोखरून गेलेल्या सोनेरी राजदंडाचा वारसा बाजीरावाला मिळाला.आपल्याला वाटतो तितका तो कुचकामी नव्हता.
वैभवाच्या शिखरावरची मराठी सत्ता त्याने एकट्याने खड्ड्यात नेली हे पटत नाही. अनंत भोके पडलेल्या जहाजाचा त्याला ऐनवेळी कॅप्टन करण्यात आले इतकेच. त्याने निदान भविष्यात इंग्रजांशी लढण्याचा प्रयत्न तरी केला. शिंद्यांनी व नागपूरकर भोसल्यांनी , खुद्द सातारच्या पवित्र गादीवर बसलेल्या छत्रपतींनी जी शस्त्रे टाकली त्याबद्द्ल कुणी काहिच कसे बोलत नाही ही एक गंमतच आहे.
होळकर्-बाजीराव
विठोजी होळकराने पुण्यापाशी विद्रोहाचा प्रयत्न केल्याचे मी ऐकले आहे. विद्रोही माणसाला पकडून बंदी बनवणे ह्यात अस्वाभाविक काहीही नाही. हत्तीला बांधून मारणे हे त्याकाळीही क्रूर मानले जाइ.हे करून त्याने होळकरांशी शत्रूत्वात अजूनच तेलच ओतले हे सत्य आहे.साध्या कैदेत ठेवूनही काम भागले असते.पण मुळात दंगा विठोजी होळकरांकडून सुरु झाला अशी माझी माहिती आहे.हे त्याला फक्त उत्तर होते. विठोजी गेल्याचे ऐकून यशव्ंतराव भडकला व थेट पुण्यावर चालून आला वगैरे नंतरचे. यशवंतरावाअविरुद्ध मदत घेण्यासाठी म्हणून दुसरा बाजीराव ब्रिटिशांना जाउन मिळाला. आपले बरेचसे अधिकार त्यांना देउन बसला. एकप्रकारे सत्तेचे सार्वभौमत्वच गहाण ठेवले गेले.
मुळात त्याला ब्रिटिशांशी भांडाय्चे होते, तर शौर्याशिवाय ब्रिटिशांकडे असणारे एक फार मोथे शस्त्र त्याच्याकदे असणे जरूरिचे होते-- धूर्तता,धोरण्--कावेबाजपणा. वैयक्तिक शौर्य असले, तरी पुरेसा कावेबाजपणा विशेषतः गुप्तहेर,हेरगिरी व इतर सत्ताधार्यांशी गुप्तपणे संधान बांधून त्यांना विश्वासात घेणे त्याने यशस्वीपणे केलेले दिसत नाही.
असो. हे आहे विस्कळित चित्र.दुसरा बाजीराव आपल्याला वाटतो तसा नाही.पहिल्या बाजीरावा इतका शूर नसेल्,शिवाजींसारखे असामान्य गुणांचे मिश्रण त्याच्याकडे नसेल, पण त्याने काहीके धोका पत्करत इंग्रजांशी उशीरा का असेना संघर्ष केला. ह्या प्रयत्नात त्याचे उरले सुरले संस्थानही नष्ट झाले.
खरच विचार करायला लावणारि माहिति
हं....!