✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पराभवाचे श्राद्ध !

ज
जयंत कुलकर्णी यांनी
गुरुवार, 10/06/2011 - 13:17  ·  लेख
लेख
हे याच महिन्यात लिहीले पाहिजे. हे युद्ध संपल्यानंतर मी आमच्या शाळेत आलेल्या एका सैन्याधिकार्‍याला विचारले होते की हा पराभव पं नेहरूंमुळे झाला का आपल्या सैन्यामुळे(ज. कौल.) झाला ? त्यांनी विचारले की तुला यातील काय माहीती आहे. मी सांगितले की मी हिमालयन ब्लंडर वाचलेले आहे. अर्थातच मला तेव्हा गप्प बसवण्यात आले. ते योग्यच होते. पण मित्रांनो जेव्हा असा प्रसंग तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हीमात्र गप्प बसू नका. पराभवाचे श्राद्ध ! भारताच्या सैनिकी इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि अपमानास्पद पराभवाला या महिन्यात ५० वर्षे पूर्ण होतील. हा पराभव कसा साजरा करायचा हे मला समजत नव्हते. आज अखेरीस ठरवले की आजच्या पिढीला हा पराभव सांगणे हे माझ्या पिढीचे काम आहे. भविष्यात असे होऊ नये यासाठी आता आपली तयारी झाली आहे पण तरूणांच्या हातात जेव्हा या देशाची सूत्रे जातील तेव्हा या घटनेपासून शिकून त्यांनी योग्य माणसांना निवडुन द्यावे हीच विनंती आहे. एवढेच नव्हे तर ही राज्यपद्धती जर योग्य वाटत नसेल तर त्यांनी तीही बदलायला हरकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे. पण असे परत होता कामा नये..... या घटनेची आठवण म्हणून ब्रिगेडियर जॉन दळवी यांच्या “हिमालयन ब्लंडर” या पुस्तकातील काही पानांचे स्वैर भाषांतर आपल्यासमोर ठेवत आहे... ते “कडू” मानून घ्यावे. ( लेखाचीभाषा माझी आहे ) पहाटे ५ वाजता नेफामधील शांत नामका चू खोर्‍याला तोफांच्या आवाजाने जाग आली. काय होत आहे हे कोणालाच कळेना. चिनी तोफखाना धडाडला आणि मागोमाग चिनी पायदळाने आक्रमण केले. तीन तासातच त्या खोर्‍यातील लढाई संपली. संपणारच होती ती, कारण ती लढाई होती दोन अतुल्यबळ सैन्यामधली. आसामला जाणारे सर्व रस्ते आता त्यांना मोकळेच होते. या पहिल्या दणक्याचा फायदा चिन्यांनी उठवला नसता तर नवलच. त्यांनी सरळ १६० मैल भारताच्या भूमीवर मुसंडी मारली आणि २० नोव्हेंबरला ब्रह्म्पूत्रेच्या खोर्‍यांत आक्रमण केले. सेला आणि बोमडिलाच्या संरक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या उडवत त्यांनी काहीही विरोध न होता तवांगवर कब्जा केला. भारताचे याला उत्तर फारच केविलवाणे होते. त्या उंचीवर युद्धाचे प्रशिक्षण नसलेले, त्या उंचीवर लागणारी युद्धसामग्री नसलेले, त्या हवामानाची सवय नसलेले आणि दूर १६०० मैलावर असलेले पंजाबमधील सैन्य घाइघाईने जमा करण्यात आले आणि त्यांना राजकारण्यांनी मोठ्या आवेशाने चिन्यांना सिमेबाहेर फेकून द्या असे आदेश दिले. खरे तर आपल्या राजकारण्यांनी हे सगळे सैन्य चिनी सैन्याच्या नरड्यात अलगद सोडून दिले असे म्हणायला हरकत नाही. कारण या सर्व हालचालीत ना ठाम योजना होती ना खोलवर संरक्षणाची तयारी होती. या चिन्यांच्या विजयाचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो आपल्या राजकारण्यांना नाही तर चिन्यांना. त्यांनी मारे मोठ्या युद्धाची तयारी ठवली होती. ३०,००० ते ५०,००० सैनिक या युद्धासाठी त्यांनी सिमेलगत तयार ठेवले होते. पूर्वचाचणी म्हणून चिन्यांनी ८ स्प्टेंबरला थागला भागात घुसखोरी करून आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा घेतली होती. अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या राजकारण्यांनी सिमेवरच्या नेहमीच्या किरकोळ चकमकी म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केले होते. या नेफामधील पराभवाने भारतातील जनता खडबडून जागी झाली. सत्ताधार्‍याना आणि संरक्षणदलाला हादरे बसले पण सगळ्यात नुकसान झाले ते भारतीय जनतेचे. जनता पराभूत मनोवृत्तीच्या गर्गेत कोसळली. त्यांचा त्यांच्या पुढार्‍यांवरचा विश्वास उडाला. यातून बाहेर पडायला पूढे दोन युद्धे जावी लागली. या चिनी आक्रमणाच्या अगोदर आपल्या सत्ताधार्‍यांची ठाम कल्पना होती की चीनबरोबर युद्ध होणारच नाही. ( अपवाद फक्त सरदार पटेलांचा. त्यांनी पं. नेहरूंना १९५० मधे पत्र लिहून याची स्पष्ट कल्पना दिली होती व चीनला युनोमधे सिक्युरीटी कौन्सीलमधे प्रवेश देण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते योग्य आहेत का याचा फेरविचार करायला सुचवले होते. हे पत्र आपल्याला आजही उपलब्ध आहे आणि ब्रि. दळवींच्या पुस्तकातही दिले आहे.) हिंदी-चीनी भाई भाई चा नारा जगप्रसिद्ध होता आणि जे काही किरकोळ मतभेद होते ते टिबेटच्या निर्जन भागाच्या ताब्याबद्दल होते. (ज्या ठिकाणी गवताचे पातेही उगवत नाही त्याबद्दल फार विचार करायची आपली तयारी नव्हती) या किरकोळ मतभेदांमुळे सिमेवर काही चकमकी उडतील पण सर्वंकश युद्ध ? छे ! ते शक्यच नव्हते. या आक्रमणाने भारताला धक्का बसला आणि त्यातून ते कधीच बाहेर आले नाहीत. हा धक्का राजकीय पातळीवर, युद्धनितीच्या पातळीवर, आंतरराष्टीय राजकारणाच्या पतळीवरही तेवढाच जबरी होता. हिमालयाच्या या दुर्गम भागात, त्या थंडीत, आणि उंचिवर युद्धाची ना आमची मानसीक तयारी होती ना शारिरीक. गाफीलपणाची ही हद्द होती. आमची हिमालयात युद्ध लढण्याची तयारीच नव्हती. या आक्रमणाला आमचे उत्तर गोंधळाचे व भावनीक होते. तेव्हाचे आपले राष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले “ आम्ही (आपले पंतप्रधान, राजदूत, मंत्री इ.) दुधखूळे आहोत आणि निष्काळजी राहीलो हेच खरे”........ भारताच्या सर्वोच्चस्थानावर बसलेल्या या माणसाची ही कबूली सगळे काही सांगून जाते. आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान पं नेहरू यांनी या आक्रमणाचे विश्लेषण “चीनने आमच्या पाठीत सुरा खूपसला” असे केले. पण शत्रूच्या समोर आपली पाठ करायची नसते हे ते सोयीस्कररित्या विसरले होते. आपल्या आकाशवाणीवरच्या भाषणात ते म्हणाले “ मला सांगायला दु:ख होते आहे की आमच्या सैन्याला सिमेवर माघार घ्यावी लागली आहे. चीनी सैन्याची प्रचंड संख्या, तोफखाना, आणि चिनी सैन्याने बरोबर आणलेली अवजड युद्ध सामग्री याच्यापुढे त्यांनी टिकाव धरला नाही.” ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय....... त्या वेळचे संरक्षणमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले “ चीनी सैन्य हे आपल्या सैन्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ होते. संख्याबल आणि दारूगोळा यात आपल्यापेक्षा ते फारच सरस होते. आमच्या जुनाट शस्त्रे व कमी संख्या असलेल्या सैन्यदलाला त्यांनी सहज हरवले”. आपल्या देशाचे संरक्षण व संरक्षणदल ही या माणसाची जबाबदारी होती. या पराभवाचे खरे कारण हे होते की सत्ताधार्‍यांना चीनशी युद्ध करावे लागेल असे स्वप्नातही आले नव्हते. या स्वप्नरंजनातच या पराभवाची कारणे दडलेली आहेत....................... क्रमश:..... जयंत कुलकर्णी.
  • पराभवाचे श्राद्ध ! ..भाग-२
  • पराभवाचे श्राद्ध........भाग-३
  • पराभवाचे श्राद्ध... भाग -४
  • पराभवाचे श्राद्ध............भाग-५
  • पराभवाचे श्राद्ध..... भाग-६

Book traversal links for पराभवाचे श्राद्ध !

  • पराभवाचे श्राद्ध ! ..भाग-२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
माहिती
संदर्भ
वाद
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
22415 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

वाचतोय. वाचावेच लागेल.

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/06/2011 - 13:25 नवीन
वाचतोय. वाचावेच लागेल.
  • Log in or register to post comments

+१

sagarparadkar
Fri, 10/07/2011 - 00:05 नवीन
जनरल थोरात ह्यांचं आत्मचरित्रदेखील वाचावं अशी विनंति सर्वांनाच करतोय. मी त्यातील काही भाग बहुतेक 'लोकसत्ता'मधे वाचला होता, जेव्हा ते आत्मचरित्र प्रसिद्ध झालं .... अर्थातच तेव्हा श्री. माधव गडकरी हे लोकसत्ताचे संपादक असावेत नाहीतर बहुतेक ते लेख लोकसत्तामधे आलेच नसते अशी माझी खात्री आहे .... त्या 'कौल्'चे होस्पिटलमधून जनरल थिमय्यांना आदेश देणे वगैरे चीड आणणारा भाग होता .... (इथे नावांमधे काही चूक झाली असल्यास क्षमस्व)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वाचतोय ... बरीचशी माहिती

गणेशा
गुरुवार, 10/06/2011 - 13:33 नवीन
वाचतोय ... बरीचशी माहिती माझ्यासाठी नविनच असेन
  • Log in or register to post comments

चीन

समीरसूर
गुरुवार, 10/06/2011 - 13:39 नवीन
छान लेख! पं. नेहरू हा एक भंपक माणूस होता यात काहीच शंका नाही. पं. नेहरूंना भारताने अकारण डोक्यावर चढवलेले आहे. लेडी माऊंटबॅटनच्या आगे-मागे घुटमळण्याखेरीज आणि स्वत:च्या पत्नीला सतत हीन आणि अपमानास्पद वागणूक देण्याखेरीज या भ्रमराने काहीच केले नाही. आताही जर चीनने हल्ला केला तर फार काही वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही. चीन अतिमहाकाय आणि अतिताकदवान असा देश आहे. आपला फार काळ टिकाव लागेल असे वाटत नाही. अजूनही त्यांची सीमेलगतची जमवाजमव, नेपाळ, पाकिस्तानमधले सीमेलगतचे रस्ताउभारणीचे काम, शेजारच्या देशांना आपल्या बाजूला करून घेण्याचे उपद्व्याप, अरुणाचल प्रदेशावर अधून-मधून हक्क सांगणे, व्हीसाचे सुटे कागद देणे...या गोष्टी वाटतात तितक्या सरळ वाटत नाहीत. आपण बसलोय कॉमनवेल्थ गेम्ससारखे आणि आयपीएलसारखे निरर्थक आणि बिनबूडाचे तमाशे भरवत!!! भारतीय लोकं दूरदृष्टीच्या बाबतीत खूपच कच्चे आहेत. 'चलता हैं' नावाचा व्हायरस जेव्हा आपल्या लोकांना सोडेल तेव्हाच काहीतरी चांगले घडेल... --समीर
  • Log in or register to post comments

पं. नेहरू हा एक भंपक माणूस

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/06/2011 - 17:24 नवीन
पं. नेहरू हा एक भंपक माणूस होता यात काहीच शंका नाही. पं. नेहरूंना भारताने अकारण डोक्यावर चढवलेले आहे. हे अत्यंत उथळ विधान आहे. हा माणूस थोर लेखक तर होताच याशिवाय अत्यंत बिलंदर राजकारणी होता. सरदार पटेलांसारख्या माणसाला गवत चारुन जो माणूस पंतप्रधान झाला तो माणूस बिलंदरच असणार. चीनने शांततेचे आश्वासन दिले आणि त्यावर पंडितजींनी विश्वास ठेवला इतके साधे हे गणित नसावे. भारत हे एक समॄद्ध आणि बलिष्ठ राष्ट्र व्हावे हे स्वप्न त्यांनी पाहिले. पहिली पंचवार्षिक योजना शेती आणि दुसरी अवजड उद्योग-धंद्यांना वाहिलेली आहे. कदाचित तिसर्‍या किंवा चौथ्या योजनेमध्ये संरक्षण व्यवस्था बलिष्ठ करण्याचा त्यांचा विचार असेल सुद्धा. भुकेकंगाल माणूस आधी जेवण मिळवण्याचा विचार करेल आणि मग सुरक्षिततेचा. अन्यथा त्या माणसाचे किंवा देशाचे पाकिस्तान होणार नाही का ? लेडी माऊंटबॅटनच्या आगे-मागे घुटमळण्याखेरीज आणि स्वत:च्या पत्नीला सतत हीन आणि अपमानास्पद वागणूक देण्याखेरीज या भ्रमराने काहीच केले नाही. या तपशीलांविषयी फारशी माहिती नाही. तरीदेखील या खाजगी गोष्टींशी आपल्याला काय करायचे आहे ? शिवाय असे आरोप करणार्‍यांकडे तसे काही पुरावे आहेत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

" अत्यंत बिलंदर राजकारणी"

रामपुरी
गुरुवार, 10/06/2011 - 21:51 नवीन
" अत्यंत बिलंदर राजकारणी" वगैरे ठिक आहे पण "थोर लेखक" नक्कीच म्हणू शकत नाही. "भुकेकंगाल माणूस आधी जेवण मिळवण्याचा विचार करेल आणि मग सुरक्षिततेचा." जवळ विषारी साप बसलेला असताना कितीही भुकेकंगाल माणूस जेवण करू शकेल असे वाटत नाही. तो प्रथम आपल्या सुरक्षिततेचाच विचार करेल असे नाही वाटत??? आता तो माणूस मूर्ख असेल किंवा अतिशय भोळा असेल किंवा तो साप आहे यावर त्याला (काही कारणाने) विश्वासच ठेवायचा नसेल तर गोष्ट वेगळी.... तसे काही पुरावे आहेत काय ? पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

" अत्यंत बिलंदर राजकारणी"

अप्पा जोगळेकर
Fri, 10/07/2011 - 11:58 नवीन
" अत्यंत बिलंदर राजकारणी" वगैरे ठिक आहे पण "थोर लेखक" नक्कीच म्हणू शकत नाही. डिस्कव्हरी ऑफ ईंडिया किंवा ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी वाचले आहे काय ? ही पुस्तके आपणास सुमार दर्जाची वाटतात काय ? पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? हो. असेच म्हणायचे आहे. तो प्रथम आपल्या सुरक्षिततेचाच विचार करेल असे नाही वाटत??? असेच वाटते. शांततेचा लांबरुंद मंडप पसरुन तयारी करण्यासाठी, मजबूत बनण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर बरे असा विचार पंडितजींनी केला असावा. अर्थात ते असाच विचार करत असतील याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. पण समजा त्यांचा तसा इरादा नसेल तरीसुद्धा भंपक माणूस इतक्या शेलक्या विशेषणांनी त्यांचा पाणउतारा करणे हा भंपकपणा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

>>पुरावे म्हणजे नक्की काय

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 10/07/2011 - 16:04 नवीन
>>पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? >>हो. असेच म्हणायचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे, हि एक उघड गोष्ट होती. खुद्द लेडी माउंटबॅटनने या विषयी लिहिले आहे असे वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

माझ्या माहितीप्रमाणे, हि एक

अप्पा जोगळेकर
Sat, 10/08/2011 - 16:07 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे, हि एक उघड गोष्ट होती. खुद्द लेडी माउंटबॅटनने या विषयी लिहिले आहे असे वाचल्याचे स्मरते. ठीक आहे. मग तर प्रश्नच मिटला. या उघड गोष्टीच्या आधारे त्या माणसाचे मूल्यमापन असे आपणांस वाटते काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

संबंध नसताना मधे बोलतो.

llपुण्याचे पेशवेll
Sat, 10/08/2011 - 08:57 नवीन
संबंध नसताना मधे बोलतो. डिस्कव्हरी ऑफ ईंडिया किंवा ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी वाचले आहे काय ? ही पुस्तके आपणास सुमार दर्जाची वाटतात काय ? हो विषेशतः डीस्कवरी ऑफ इंडिया मधली मते. असेच वाटते. शांततेचा लांबरुंद मंडप पसरुन तयारी करण्यासाठी, मजबूत बनण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर बरे असा विचार पंडितजींनी केला असावा. अर्थात ते असाच विचार करत असतील याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. तसा शांततेचा विचार कोणी करत असेल तर काही चूक नाही. परंतु एकूण जगाच्या इतिहासाचा विचार करता कमरेला तलवार बांधूनच राम राम करत मनुष्य शांतपणे बसू शकतो. त्यामुळे पंडीतजींना तसे वाटले असेल तर ते बालिश वाटले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

हो विषेशतः डिस्कवरी ऑफ इंडिया

अप्पा जोगळेकर
Sat, 10/08/2011 - 16:29 नवीन
हो विषेशतः डिस्कवरी ऑफ इंडिया मधली मते. हे पुस्तक म्हणजे माहिती, अ‍ॅनालिसिस, मते आणि कन्क्ल्युजन्स यांचा महासागर आहे. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक वाचकाचा अनेक ठिकाणी लेखकाशी मतभेद होणार हे उघड आहे. या मतभेदांमुळे त्या पुस्तकाला सुमार म्हणण्याचा अधिकार वाचकाला आहे असे वाटत नाही. हां. आता लिहिलेले वाक्य न वाक्य चुकीचे, भंपक वगैरे वाटत असेल तर माझे काहीच म्हणणे नाही. या पुस्तकात शिवाजी राजांवर काहीच्या बाही टीका केली गेली आहे असे मी ऐकले होते. पण जेंव्हा प्रत विकत घेउन वाचली त्यामधे असे काही मला तरी सापडले नाही. 'राईज ऑफ हिंदू नॅशनॅलिझम ' असा उल्लेख करुन शिवाजीचा गौरव केला आहे हेच मला आढळले. 'कदाचित काँग्रेसच्या नेहमीच्या धोरणानुसार तो भाग नंतर एडिट केला गेला असेल' हे शक्य आहे. पण, झापडे लावून 'सहा सोनेरी पाने' वाचावे आणि जागतिक दर्जाचे पुस्तक म्हणून त्याचा गौरव करावा. तशीच झापडे लावून 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' वाचावे आणि त्याच्यावर'सुमार' पुस्तक म्हणून टीका करावी ही मला स्वतःशीच केलेली प्रतारणा वाटते. तुम्ही तसे आहात असे माझे म्हणणे नाही पण अशी काही मंडळी भेटलेली आहेत इतकेच सांगू इच्छितो. त्यामुळे पंडीतजींना तसे वाटले असेल तर ते बालिश वाटले इतकेच. याबद्दल अधि़आराने काहीच बोलू शकत नाही. भाग-२ वर चालू असलेली यासंदर्भातली चर्चा वाचून मी तरी गोंधळून गेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

सकाळ सप्तरंग पुरवणी

समीरसूर
Mon, 10/10/2011 - 10:34 नवीन
कालच्या, म्हणजे ०९-ऑक्टोबर-२०११ (रविवार) च्या दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीच्या सप्तरंग पुरवणीमध्ये १९६२ च्या भारत-चीन युद्धावर काही जाणकारांचे आणि प्रत्यक्ष त्या युद्धात भाग घेतलेल्या योद्ध्यांचे लेख आलेले आहेत. पहिला लेख या युद्धात कैदी झालेल्या लेफ्टनंट कर्नल श्रीकांत हसबनीस यांचा आहे. चीनच्या आक्रमणाला भारताचे प्रत्युत्तर किती भिकार होते याचे त्यांनी वर्णन केले आहे. निव्वळ थंड केबिन्समध्ये आरामात बसून आपल्या राज्यकर्त्यांनी नकाशावर बोट ठेवून इथे पोस्ट उभारा, तिथे पोस्ट उभारा असे सांगीतले होते असे हसबनिस सांगतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवरची परिस्थिती किती अवघड होती आणि भारताची तयारी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे किती तोकडी होती याचे यथार्थ आणि वैषम्यपूर्ण वर्णन हसबनिस या लेखात करतात. याच सुराचे लेख कॅप्टन भूषण गोखले आणि अनंत बागाईतकर यांचे आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर १५ वर्षे उलटून गेल्यावरही भारतावर राज्य करणारे पं. नेहरूंसारखे भंपक नेते किती स्वप्नाळू, भित्रे, पुचाट आणि निर्बुद्ध होते हे या लेखांमधून स्पष्टपणे समोर येते. हे लेख प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्या किंवा त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या आणि तज्ञ मंडळींनी लिहिले असल्याने त्या लेखांच्या सत्यतेविषयी शंका घेण्याचा प्रश्नच उरत नाही. शांततेचा पुरस्कर्ता असणं म्हणजे निर्बुद्धसारखं युद्धाची तयारी न ठेवणं नव्हे! पाकिस्तानसारखा विषारी आणि कृतघ्न साप शेजारी असतांना आणि त्याच्या विषाचा प्रत्यय आलेला असतांना आपण शांत राहण्याच्या नादात सुसज्ज संरक्षणव्यवस्था न ठेवणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे. पं. नेहरूंनी चीनची लाचारी पत्करून आपल्या भित्र्या आणि कमअसल मनोवृत्तीचे दर्शन घडवले. शांतता, सलोखा, भाईचारा, अहिंसा, शेजार्‍यांशी सौहार्दाचे संबंध इत्यादी गुण तुम्ही तेव्हाच सर्व ताकदीनिशी दाखवू शकता जेव्हा तुमची संरक्षणव्यवस्था अत्यंत मजबूत आणि कुठल्याही आगळीकीला सडेतोड उत्तर देण्याच्या क्षमतेची असते; अन्यथा त्या निव्वळ वल्गना ठरतात. इतकी सोपी गोष्ट पं. नेहरूंसारख्या तथाकथित महान नेत्याला कळली नाही यातच त्यांचे बुळेपण दिसून येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५ वर्षे आपली संरक्षणव्यवस्था इतकी ढिसाळ होती की त्याकाळी भारतात पं. नेहरूंसारखा तथाकथित दूरदृष्टी असलेला, कणखर, प्रखर देशप्रेमी वगैरे वगैरे नेता आपला पंतप्रधान होता हे खरेच वाटत नाही. तिथे पाहिजे होते सरदार वल्लभभाई पटेल! पं. नेहरूंचे नशीब जोरदार म्हणून त्यांना पंतप्रधानपद मिळाले. जसे आज कुठल्याही कर्तुत्वाविना प्रतिभा पाटलांना राष्ट्रपतिपद मिळते, आवाज नसणार्‍या मनमोहन सिंगांना चक्क दोन-दोन टर्म्स पंतप्रधानपद मिळते, देवेगौडासारख्या झोपाळू माणसाला पंतप्रधानपद मिळते, अगदी तसेच पं. नेहरूंना पंतप्रधानपद मिळाले. भारतातले हे घाणेरडे आणि स्वार्थी राजकारण पं. नेहरूंच्या काळापासून सुरु आहे. त्याच बळावर नेहरूंनी पंतप्रधानपद आपल्या पदरात पाडून घेतले; बाकी त्यांना भारताने (मुख्यत्वेकरून काँग्रेसच्या ब्रँड बनवण्याच्या राजकारणाने) अकारण डोक्यावर चढवले आहे (होते) हे नक्की. असाच सूर (त्यांचे नाव न घेता) सप्तरंगच्या लेखांमधून व्यक्त होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

हा प्रतिसाद इथे चुकुन पडला

अप्पा जोगळेकर
Tue, 10/11/2011 - 21:13 नवीन
हा प्रतिसाद इथे चुकुन पडला आहे का ? तो माझ्या इथल्या प्रतिसादाच्या संदर्भात असंबद्ध वाटला आणि तो भाग २ मधे देखील वाचला. याकरता विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

मटाची बातमी

बद्दु
गुरुवार, 10/06/2011 - 13:46 नवीन
मटाची बातमी ( कोण म्हणतो मटा सजग नाही ?) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10247245.cms
  • Log in or register to post comments

बापरे!!

यकु
गुरुवार, 10/06/2011 - 14:41 नवीन
ते ४००० सैनिक पाकव्याप्त काश्मिरमध्ये पर्यटनासाठी नक्कीच आले नसतील. आणि लष्करप्रमुख एखाद्या वार्ताहरासारखी नुसतीच बातमी देत आहेत. बाकी जयंतरावांचा लेख नेहमीप्रमाणेच औचित्यपूर्ण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बद्दु

जयंतराव,

प्रास
गुरुवार, 10/06/2011 - 14:57 नवीन
आमच्या जन्माच्याही आधीची आणि फुटकळ उल्लेखच होऊ शकलेली अशी ही हकिगत असल्यामुळे या विषयी फार माहिती नव्हती आणि नाही हे सांगायला खूपच वाईट वाटतेय. तुमच्यासारखेच कधी या आणि अशा विषयांवरती प्रश्न विचारण्याचा प्रसंग आला असताना लहान, अननुभवी आणि विषय आमच्या (त्यावेळच्या बुद्धीच्या) आवाक्याबाहेरचा, अशा कारणांनी आम्हालाही चूप बसवण्यात आले होते आणि त्याच वेळी भारत-चीन युद्ध या विषयालाच अनुल्लेखाने मारण्याचा सातत्याने प्रयत्न होत राहिला होता हे आठवते. हे (काहीशा) खेदाने नमूद करून सांगावे लागतेय की आमच्या घरातील वडीलधारे आणि शाळेतील वडीलधारे (शिक्षक) तेव्हाही नेहरुबाबांच्या विरोधी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायच्या मनोभूमिकेमध्येच नव्हते. "नेहरु कधीच चुकणार नाहीत" अशी पालुपदं तेव्हाही खूपदा ऐकलेली आहेत. त्यातही "पाठीत खंजिर खुपसला" वगैरे होतेच. आज बर्‍याच वर्षांनी या विषयाबद्दल तुमच्याद्वारे काही योग्य माहिती मिळण्याची शक्यता आलेली आहे तेव्हा तिचा योग्य तो फायदा करून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा, जयंतराव, या युद्धानंतर पंधरा वर्षांनी जन्माला आलेल्या आमच्यासारख्या जनांना ही माहिती योग्य प्रकारे मिळतेय हेच काहीसं भाग्य म्हणावं लागेल. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. तुमचा फ्याण :-)
  • Log in or register to post comments

हम्म...

पैसा
गुरुवार, 10/06/2011 - 14:58 नवीन
वाचावंच लागेल. "आम्ही निष्काळजी राहिलो" अशी कबुली सर्वोच्च स्थानावरच्या व्यक्ति देत होत्या ही एका राष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. अर्थात पंतप्रधान, राष्ट्रपती अशी कबुली देत होते हीच मोठी गोष्ट म्हटली पाहिजे. आताच्या काळातल्या एकाही राजकारण्याने अशी कबुली दिली नसती.
  • Log in or register to post comments

+१

मेघवेडा
गुरुवार, 10/06/2011 - 16:02 नवीन
शोकांतिकाच खरी. वाचतो आहे, वाचावेच लागेल - असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कारगिल.....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/06/2011 - 14:58 नवीन
कारगिल मध्येही ह्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे वाचले होते. ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून झोपायचे, ज्यांच्या आठवणींनी आदर वाटून मान ताठ होते त्या आपल्या सैन्याचा हा गाफिलपणा म्हणायचा की राजकारण्यांचा मुर्खपणा? हे सर्व वाचून मेंदू बधिर होतो आहे. पण तुम्ही लिहीत राहा. आपले राजकारणी स्वार्थ आणि मुर्खपणाच्या आधीन होऊन नैतिकतेच्या किती निम्न पातळीवर आहेत हे सर्वांना समजलेच पाहिजे. नेहरू-गांधींवर काही न बोललेलेच बरे. लगेच वादाला तोंड फुटते आणि मूळ विषय बाजूलाच राहतो.
  • Log in or register to post comments

चांगल्या विषयाला हात

गणपा
गुरुवार, 10/06/2011 - 15:06 नवीन
चांगल्या विषयाला हात घातलाय. अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. :)
  • Log in or register to post comments

अन्य प्रतिसादातुनही चांगली

मृत्युन्जय
गुरुवार, 10/06/2011 - 22:29 नवीन
अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. आत्ता प्रत्येक शब्दाला नविन अर्थ प्राप्त झाल्यासारखे वाटते आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

चांगला धागा !

शाहिर
गुरुवार, 10/06/2011 - 15:11 नवीन
पुढील भाग वाचण्यास अतिशय उत्सुक ! लहान पणी फास्टर फेणे च्या पुस्ताका मधे नेफा आघाडी ची वाताहत वाचली होती ( अर्थात कथा रूपाने) आता तिचे स्वरूप समोर येइल .. जयंत सर , तुमचे मनपूर्वक आभार !!
  • Log in or register to post comments

लहान पणी फास्टर फेणे च्या

आत्मशून्य
गुरुवार, 10/06/2011 - 15:52 नवीन
लहान पणी फास्टर फेणे च्या पुस्ताका मधे नेफा आघाडी ची वाताहत वाचली होती
+१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

खूपच चांगला संकल्प सोडलात

इष्टुर फाकडा
गुरुवार, 10/06/2011 - 15:25 नवीन
खूपच चांगला संकल्प सोडलात जयवंत राव तुम्ही....पुढचा भाग लवकर येऊदे... (समुद्री) चाचा नेहरू बद्दल काय बोलणार...आधीच मर्कट त्यात आयत्या सत्तेचे मद्य प्याला...
  • Log in or register to post comments

अगदी समयोचित...

उपास
गुरुवार, 10/06/2011 - 15:34 नवीन
बेजबाबदार राजकारणी ही कायमस्वरुपी गोष्ट आहे आपल्याकडे.. अगदी अशाच प्रकारचा गाफीलपणा आपण २६ नोव्हेंबरच्या मुंबईचरच्या हल्ल्यांवेळी अनुभवलाच..
  • Log in or register to post comments

विषय आवडण्यासारखा नाही पण

रेवती
गुरुवार, 10/06/2011 - 17:08 नवीन
विषय आवडण्यासारखा नाही पण लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लिखाण

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/06/2011 - 17:09 नवीन
लिहित राहा कुलकर्णी साहेब. वाचत आहे.
  • Log in or register to post comments

स्वागत

तिमा
गुरुवार, 10/06/2011 - 17:18 नवीन
जयंतराव, तुमच्या स्पष्टवक्त्या लेखाचे स्वागत. ह्या प्रकरणी तेंव्हाचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन हे व्हीलन ठरले होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता हे आठवते. त्यानंतर यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून बोलावल्यावर 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री' असली आचरट शीर्षके वाचल्याचेही आठवतंय. ' यशस्वी माघार' हा शब्दप्रयोग तेंव्हाच जन्माला घातला, आपल्या या पुळचट नेत्यांनी !
  • Log in or register to post comments

>>' यशस्वी माघार' हा

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 10/06/2011 - 19:12 नवीन
>>' यशस्वी माघार' हा शब्दप्रयोग तेंव्हाच जन्माला घातला नक्की का? मी दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात ऐकला आहे हा शब्द. आठवा, डंकर्कची यशस्वी माघार. तो युद्धशास्त्रातील सर्वमान्य प्रकार असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+१, सहमत

sagarparadkar
Fri, 10/07/2011 - 00:40 नवीन
बहुतेक ८ वी ९ वी च्या इतिहासाच्या पुस्तकातला तो भाग आठवतोय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

जयंत कका, तुम्ही केलेले स्वैर

मदनबाण
गुरुवार, 10/06/2011 - 21:38 नवीन
जयंत कका, तुम्ही केलेले स्वैर भाषांतर आवडले. :) पुढील भागाची वाट पाहतो आहे. सध्याची परिस्थीती देखील काही चांगली दिसत नाहीये. :( सध्या पाक व्याप्त काश्मिर मधे नक्की किती चीनी सैन्य तैनात आहे या बद्धल काही समजेनासे झाले आहे मला ! कोणत्या बातमीत ते ४ हजार म्हंटले आहे, तर कुठे हीच संख्या १२ ते १५ हजार इतकी सांगितली जात आहे. चीन ने पाकिस्तानात एक मजबुत सैन्यतळ बनवण्याची तयारी चालवलेली दिसते ! ग्वादार बंदर ते शिनजँग व्ह्याया गिलगिट-बल्टिस्तान (पाक व्याप्त काश्मिरचा भाग) असा मार्ग चीन ने निवडलेला दिसतोय ! त्यामुळे रेड आर्मी चे पाकव्याप्त काश्मिर मधले अस्तित्व हे सामरिक दॄष्ट्या हिंदुस्थानला घातक आहे असे मला वाटते. उद्या समजा ग्वादार बंदरात चीन ने त्यांचे युद्ध पोत आणुन ठेवले तर देशाची आर्थीक राजधानी मुंबईला टारगेट करणे कठीण जाणार नाही.(इथे मोठ्या बोटी बिनदिक्कत किनार्‍या लागतात तिथे मुंबईच्या सुरक्षा किती पोकळ होती ते दिसलेच म्हणा) शिवाय पाकव्याप्त काश्मिर + तिबेटच्या बाजुने + अरुणाचल /आसामच्या बाजुने चीन आक्रमण करेल काय ? असा एक विचार मनात तरळतो आहे. ता.क :--- काही दुवे http://www.youtube.com/watch?v=89HbQwWolyg http://www.youtube.com/watch?v=kCtgvj2qh7g http://www.youtube.com/watch?v=mVOmsLWI1EA&feature=related
  • Log in or register to post comments

श्रीलंकेतही प्रथम आर्थिक आणी

मराठे
गुरुवार, 10/06/2011 - 19:03 नवीन
श्रीलंकेतही प्रथम आर्थिक आणी नंतर नागरी मदत देण्याच्या नावाखाली चीनने हातपाय पसरायला सुरुवात केलीच आहे. त्यामुळे भारताला चहूबाजूंनी घेरण्याचा आणि आशियामधे दबदबा निर्माण करण्याचा चीनचा हेतु सरळ आहे.
  • Log in or register to post comments

"चीनने पाठीत खंजिर खुपसला"

वसईचे किल्लेदार
गुरुवार, 10/06/2011 - 19:46 नवीन
"चीनने पाठीत खंजिर खुपसला" शाळेत असेच शीकवीत असत! नंतर एकेक कथा कळाल्या ... असो! आज मात्र परीस्थीती फारच बदललीय असे वाटतेय. जागतीक राजकारणाचा प्रभाव तसेच भारताची वाढ्लेली ताकद (जरि पुरेशी नसली तरी) ह्यास कारणीभुत असावी असे वाटतेय. चीनने दिलेल्या शांततेच्या आश्वासनावर पंडितजींनी विश्वास ठेवला असेलही (वा नसेलही). आम्ही एव्हढाच बोध घ्यावयास हवा "विश्वास जरुर ठेवावा, पण सजगता हरवुन नव्हे". बा़की जयंतरावांचे आभार ...
  • Log in or register to post comments

वाचनखूण साठवली गेली आहे.

मृत्युन्जय
गुरुवार, 10/06/2011 - 22:30 नवीन
वाचनखूण साठवली गेली आहे.
  • Log in or register to post comments

'हकीकत' चित्रपट आठवला

बहुगुणी
गुरुवार, 10/06/2011 - 22:46 नवीन
जयंतरावः लिहा आणखी विस्ताराने, आपल्या राजकीय तसंच लष्करी नेतृत्वाची लक्तरं काढणारा हा कालखंड तरूणांना कळायलाच हवा म्हणजे भाविष्यात पुन्हा असं होऊ नये याची काळजी घेण्याचा रेटा ते आताच्या नेतृत्वावर आणू शकतील (अशी भाबडी आशा तरी व्यक्त करतो!) मला वाटतं 'हकीकत' हा चित्रपट याच युद्धावर आधारित होता. 'हकीकत' हा सर्वोत्तम भारतीय युद्ध-चित्रपट होता असा त्याचा उल्लेख झालेला आढळतो, तरीही माझ्या आठवणीप्रमाणे ही प्रामुख्याने एक प्रेमकथा होती आणि त्यात दिल्लीच्या राजकारणाचा फारसा उल्लेख नव्हता, असं आठवतं. (पुन्हा पाहून खात्री करायला हवी. पण तसा तो नसण्याची शक्यता आहेच, कारण या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्याला भारतीय सैन्यदलाने आर्थिक सहाय्य केल्याचा उल्लेख मला पाहिल्याचं आठवतं.) त्यातली लता, रफी आणि सहकार्‍यांची गाणी अजूनही अंगावर काटा आणतात. 'कर चले हम फिदा जानो तन साथियों' हे रफी ने जीव तोडून गायलेलं गाणं याच चित्रपटातलं.
  • Log in or register to post comments

लेख थोडा एककल्ली वाटतोय !!

अर्धवटराव
Fri, 10/07/2011 - 00:00 नवीन
भारताचा दारुण पराभव झाला... मान्य. त्याचं खापर अर्थात राजकीय-लश्करी नेतृत्वावर फुटायचं.. हे ही मान्य. पण नेहरुंना शिव्या घलण्यात काहि पोईंट नाहि. नुकताच स्वतंत्र झालेल्या, गरीब-मागासलेल्या-सरंजामशाहीची सवय असलेल्या राष्ट्राला सर्वांग-शक्तीशाली बनवायला ५० वर्षाचा काळ देखील अपुरा आहे. नेहरुंनी नुकतीच कुठे जमिनीची मशागत केली होती आणि बियाणे पेरले होते. त्याचं फळ यायला वेळ लागणारच होता. काहि ठोकताळे-अंदाज बांधुन, काहि रिस्क घेउन त्यातल्यात्यात चांगलं काय करता येईल ते नेहरुंनी करायचा प्रयत्न केला. काहि अंदाज चुकले... पण म्हणुन त्यांना केवळ स्वप्नाळू वगैरे म्हणता येणार नाहि. सरदार पटेल, सुभाषबाबु वगैरे प्रभृती देशाची कमान हाती घेते तर चित्रं फार चांगलं असतं असं म्हणायला जागा आहे (मलाही असं वाटतं) पण हा अंदाज आहे, निष्कर्श नाहि. नेहरुं नेंतर काँग्रेसने जी देशाची वाट लावली ति मात्र अक्षम्य आहे. खास करुन सद्ध्या तर लाजीरवाणेपणाचा कळस केलाय त्या पार्टीने. बाकी भविष्याचं प्लॅनींग करायला इतीहासाचा रेफरन्स घ्यावाच लागतो, तेंव्हा अशे लेख निश्चितच स्वागतार्ह आहेत. येउ देत. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

विश्वास ठेवावा पण आधी खात्री

शिल्पा ब
Fri, 10/07/2011 - 00:24 नवीन
विश्वास ठेवावा पण आधी खात्री करुनच!! या गोष्टी न विसरता त्यांच्यापासुन धडा घ्यायला हवा. चीन सगळ्याच बाबतीत भारताच्या पुढे आहे. अमेरीका , नाटो चिटो कोणालाही दाद न देण्याची त्यांची प्रवृत्ती सगळ्यांना माहीतीच आहे आणि त्यांच्या बाजारपेठेमुळे आणि स्वस्त लेबरमुळे कोणी फारसा विरोध करणारही नाही. देशाचा एक भाग त्यांनी गिळला अजुन अरुणाचल प्रदेश वगैरेवर हक्क सांगतच आहेत. अजुनही भारत सरकार उत्तर पुर्व भागातल्या राज्यांकडे हवे तेवढे लक्ष पुरवत नाही. त्यांना जाणीव व्हायला हवी की ते भारतीय आहेत. लोकसत्ता वगैरेत खुपदा लेख वाचलेत की त्यांना भारत हा त्यांचा देश वाटतच नाही म्हणुन. :( दुर्दैव!! इतके पोटेंशियल असलेल्या देशाची नासाडी चालु आहे दुसरे काही नाही. लोकं सुद्धा सत्ताधार्‍यांना काही धडा (निवडणुका) शिकवु इच्छित नाहीत. :(
  • Log in or register to post comments

लेखमालेस शुभेछा!

मयुरा गुप्ते
Fri, 10/07/2011 - 00:47 नवीन
+१ वाचावेच लागेल. भारत-चीन युद्ध नेहमीच उपेक्षित विषय वाटत आलेला आहे. खुप खुलेपणानी त्यावरच्या चर्चा वाचल्याचे आठवत नाही. पानिपताच्या पराभवाच्या कटु आठ्वणींसारखेच मनाच्या कोपर्यात दडवुन ठेवलेला विषयावर अधिक वाचायला आवडेल. --मयुरा.
  • Log in or register to post comments

कहॉ गये वो चाचा?

sagarparadkar
Fri, 10/07/2011 - 00:52 नवीन
नेमके अशावेळीच कुठे दडी मरून बसतात कोण जाणे .... बाकी नेहरूंना या प्रकरणी लोक शिव्या का घालतात ते वर म्हटल्याप्रमाणे जनरल थोरात ह्यांचं आत्मचरित्र वाचल्यावरच कळेल. कृष्ण मेनन ह्यांच्याबद्दल ते जितके आग्रही का होते तितकेच सैनिकांच्या जीवाबद्दल ते बेफिकीर वाटले, निदान मला तरी. मला नेहेमी आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की विज्ञान्-तंत्रज्ञान ह्या गोष्टींबद्दल जिव्हाळा असलेले नेहरू, व्यावहारीक बाबतींत एवढे गाफील कसे राहिले असतील?
  • Log in or register to post comments

कहॉ गये वो चाचा? Submitted by

नितिन थत्ते
Fri, 10/07/2011 - 16:06 नवीन
कहॉ गये वो चाचा? Submitted by sagarparadkar on Fri, 07/10/2011 - 00:52. नेमके अशावेळीच कुठे दडी मरून बसतात कोण जाणे .... हा व्यक्तिगत शेरा आहे असे वाटते. भारताच्या सैन्याची तयारी नव्हती + इक्विपमेंट नव्हती हे मान्य परंतु नेहरू चीनकडून असलेल्या धोक्याबाबत (चीनने हल्ला करेपर्यंत) गाफील होते हे मान्य नाही. नुकत्याच मिपावरील मनोबांच्या धाग्यात या बाबतची वस्तुस्थिती मांडली होती. वर अप्पा जोगळेकर यांनी कुरुंदकारांच्या 'जागर' मधील उल्लेख दिले आहेत. चीनशी केव्हा ना केव्हा संघर्ष होणार हे नेहरूंना नक्कीच ज्ञात होते. तयारीला उसंत म्हणून शांततेचा आणि मैत्रीचा मंडप उभारून शक्य तितका वेळ मिळवणे हेच त्या हिंदी-चीनी भाई भाई धोरणाचे सार होते. हा दुवा अभ्यासावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

उलट तयारी

मैत्र
गुरुवार, 10/13/2011 - 11:13 नवीन
चीनशी केव्हा ना केव्हा संघर्ष होणार हे नेहरूंना नक्कीच ज्ञात होते. तयारीला उसंत म्हणून शांततेचा आणि मैत्रीचा मंडप उभारून शक्य तितका वेळ मिळवणे हेच त्या हिंदी-चीनी भाई भाई धोरणाचे सार होते. हा दुवा अभ्यासावा. दुव्यावरचं एक महत्त्वाचं वाक्य -- So, the only conclusion one can come to is that all the signals from New Delhi were interpreted in Beijing as a determined preparation for war against China. Once that conclusion was reached, the Chinese decided to take pre-emptive action. And when one dose of such action in October 1962 did not produce results, they administered a second one in November. मिपावरच पूर्वी एकदा झालेल्या तपशीलवार चर्चेत असा साधारण संदर्भ / निष्कर्ष निघाला होता की "फॉरवर्ड पॉलिसी" मुळे भारताचे पुढे सरकणे आणि सीमेवरच्या (मॅकमोहन) सैनिकरहीत जागा आणि चौक्या ताब्यात घेणे हे चीनने हल्ला किंवा आगळीक / provocation असे धरले. जेव्हा ते त्यांच्या कल्पनेच्या / संयमाच्या पलिकडे गेले तेव्हा चीनने सर्व शक्तीनिशी जोरदार हल्ला करुन उलट नेफा प्रांतातला बराचसा भाग काबीज केला. हिंदी चीनी भाई भाई म्हणून गाफील राहिले यापेक्षा स्वतः पुढे सरकून आंतरराष्ट्रीय धोरणात घोडचुक ठरेल अशी गोष्ट वारंवार करुन चीन फक्त आपल्या संबंधांवर विश्वास ठेवून हल्ला करणार नाही किंवा सीमा ओलांडून आपला भूप्रदेश ताब्यात घेणार नाही असं शेवटपर्यंत विचार करणं हे दिवास्वप्नच म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट गाफील राहण्याची -- जर फॉरवर्ड पॉलिसी होती तर सैन्याची त्या वातावरणात आणि उंचीवर लढण्याची तयारी हवी होती. ज्या तुकड्या - रेजिमेंट्स किंवा बटालियन्स हलवल्या गेल्या त्यात याचा बराच घोळ घातला गेला. श्री. हसबनीस यांनी सकाळच्या लेखात सांगितलं आहे की त्यांना आधी थोडे दिवस लेह मध्ये नेऊन प्रशिक्षण / वातावरणाची आणि चढाईची तयारी केली गेली.. ही चांगलीच गोष्ट होती. पण लगेचच उलट पवित्रा घेऊन वेगळ्या रेजिमेंट्स तिथे पाठवल्या गेल्या. या चूका खूप मोठ्या प्रमाणात भोवल्या. एक अतिशय नवीन तरूण राष्ट्र केवळ १५ वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेलं... या सर्व भवति न भवति मध्ये जरा तरी मागे गेलं. नेहरुंना स्वतःलाही धक्का बसला असावा. नव्या देशाच्या सैन्याचा मनोबलावर किती परिणाम झाला असेल हे तेव्हा लढलेले लोकच सांगू शकतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वाचनखुंण साठवली आहे,

५० फक्त
Fri, 10/07/2011 - 09:37 नवीन
वाचनखुंण साठवली आहे,
  • Log in or register to post comments

ही धाडसी पण खेदजनक कबूली

मराठी_माणूस
Fri, 10/07/2011 - 10:50 नवीन
ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय....... मग नैतीक जबाबदारी स्विकारुन राजीनामा का नाही दिला? स्वतः तर खुर्चीला चीकटुन राहीलेच , मुलीलाही आणले . आजता गायत ती लीगसि चालु आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत क्लेशदायक घटना...

आत्मशून्य
Fri, 10/07/2011 - 12:06 नवीन
.
  • Log in or register to post comments

बरीचशी माहिती नवीन.लेख

इरसाल
Fri, 10/07/2011 - 12:18 नवीन
बरीचशी माहिती नवीन.लेख नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक आणि माहितीपूर्ण. अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. अवांतर : गणपाच्या या वाक्यावरून तो संपादकपणाच्या भूमिकेत शिरला देखील.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख ...

मनीषा
Fri, 10/07/2011 - 15:21 नवीन
माहितीपूर्ण लेख ... उच्चपद्स्थ व्यक्तीच्या स्वप्नरंजनाची खूप मोठी किंमत संपूर्ण देशाने चुकविली आहे ... आणि अजून देणे फिटलेले नाही . तरीही मला वाटते,व्यक्तीगत आयुष्यात जे चांगले गुण ठरले असते ते राजकीय जीवनात मात्र घातक ठरले . उदा. दुसर्‍याच्या चांगुलपणावर असलेला विश्वास .
  • Log in or register to post comments

वाचतोय

सुनील
Fri, 10/07/2011 - 15:04 नवीन
वाचतोय. मॅक मोहन रेषा आणि भारताची फॉरवर्ड पॉलिसी याबद्दल विस्ताराने लिहावे.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म... पुढे वाचायला

सुहास झेले
Fri, 10/07/2011 - 15:39 नवीन
ह्म्म्म... पुढे वाचायला उत्सुक आहे !! :) :)
  • Log in or register to post comments

छान अजुन लिहा.

जागु
Fri, 10/07/2011 - 16:03 नवीन
छान अजुन लिहा.
  • Log in or register to post comments

वाचतोय...

मन१
Sat, 10/08/2011 - 17:37 नवीन
मी सुरु केलेल्या १९६५ च्या संदर्भातल्या धाग्यात भारत्-चीन सीमप्रश्नाबद्दलही बरीच माहिती प्रतिसादातून समजली होती. त्याचीही माहिती कामाची ठरावी.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा