✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

योगिराणा

स
स्पा यांनी
Sun, 07/24/2011 - 10:53  ·  लेख
लेख
"हनुमंत अमुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली ,श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोलिया नामे" पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो " अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तयावीण अमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे" समर्थ उठून बसतात , क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताच स्मरण करतात. सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो,. बाहेर राममंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते. दातखिळी बसेल अशी थंडी पण कल्याण तशा थंडीतही पहाटे ३ ला उठून , गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो. समर्थ कुटीबाहेर येतात , कल्याणाकडे कौतुकाने पाहतात. कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते. रातकिडे अजूनही ओरडत असतात , गार वारं सुसाट वेगाने गडाभोवती प्रदक्षिणा घालत असत. "श्रीराम जयराम जय जय राम" समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात. कल्याणाच लक्ष जात, तो लगबगीने धावत येतो, नमस्कार करतो. महाराज कशाला या थंडीत बाहेर पडलात, काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला. तुम्ही आतच विश्रांती घ्या मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो . समर्थ हसतात अरे या देहाची काळजी मी कशाला करू ? तो रामराया आहे ना. ते काही नाही, आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे , कल्याणही मागे हटणारा नसतो. समर्थ परत मनमोकळेपणाने हसतात, पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते, थांबता थांबत नाही.. कल्याण घाबरतो.. त्यांना पाणी प्यायला देतो आणि आत मध्ये परत झोपवतो, अंगावर भगवी शाल पांघरतो, आणि बाहेर येतो हळू हळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात . दसर्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो , शिवाय राजेही नव्या मोहिमेवर निघण्याआधी दसर्याच्या मुहूर्तावर गडावर यणार अशी माहिती मिळालेली असते . आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो. गडाची डागडुजी, साफ सफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणार्या भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत कामे. सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात, तरी बाहेर गावावरून उत्सवा पुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यामध्ये "कल्याण" मात्र समर्थांचा फारच लाडका हि भावना मात्र कुठेतरी बोचायचीच. शिष्यांच्या तर नाना तऱ्हा, कोणी किती साधना केली यावरून पैजा! एक म्हणे मी दासबोधाची शत पारायणे केली आहेत, दुसरा त्यावर कुरघोडी करे , 'हा हा म्हणता माझी ५०० पारायणे या दास नवमीला पूर्ण होतील' , तिसरा पण सामील व्हायचा, गंभीर चेहरा करून, आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा , "रामरायाने या देहाकडून ५ कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे , मग इतर साधक यांच्याकडे आदराने वेग्रे बघायला लागायचे. हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा, एक म्हणायचा , महाराज दयाळू आहेत, विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्याला आश्रय दिला आहे , "श्रीराम श्रीराम"!!! दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे, शिसवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे, नुसता पुक्खे झोडतो चार वेळेला, कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही , कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही , अहो आपलं तर सोडा ,समर्थनच प्रवचन सुरु असताना, हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो हो, किती अपमान तो गुरूंचा .. अशा आणि अनेक चर्चा तिथे चालायच्या. पण कल्याण समोर आला रे आला कि सर्वांची बोलती बंद. त्याला सर्व काही कळायचे, आणि समर्थांना सुद्धा .. दोघांनाही फक्त मौज वाटायची . कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबाबा समर्थांना जाणवायचा , त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत पोहोचायचा. ज्याने समर्थांसमोर बसून, त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरुपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला , ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला , जो त्यातली एकूण एक ओळ जगतोय , अश्याला अजून पारायण करायची गरजच काय ? ज्याच्या श्वास श्वासातून रामनाम बाहेर पडतंय, तो किती जप मोजून ठेवणार ? असो पण सामान्य माणसांना या गुरु शिष्याचं नात कधी कळलच नाही समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती , काल प्रत्यक्ष मारुती रायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितल , कि कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे , त्याची परीक्षा घ्यायला हवी आता शिष्यापेक्षा गुरूलाच शिष्याची जास्त काळजी. लहान मुलाला माहित नसत , तो आपला आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत , लिहून येतो, पण आई ला केवढी चिंता, निकाल मिळे पर्यंत तिला काही चैन पडत नाही , तसंच होत इकडे , पण समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता . आणि कल्याण ? तो या सगळ्यापासून अलिप्त होता, समर्थ हनुमत आणि राम, बास विषय संपला, त्याला वेगळं जगच नव्हत.दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती, आणि सद्गुरूंच पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा कि चार जणांची काम पट्ट्या एकटा उरकायचा , समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरेच साठवलेलं पाणी चालायचं नाही, म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे २ मोठे पितळी हंडे घेऊन, खाली "उरमोडी नदी वर जायचा . नदी काय जवळ नव्हती , जवळपास जाऊन येऊन दोन अडीच तासांच अंतर होत , पण कल्याण ते काम आनंदाने करायचा. तर सांगायची गोष्ट अशी कि आजचा दिवस कल्याणासाठी महत्वाचा होता सकाळी ७ च्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो, सहा फुटाच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे , संपूर्ण पांढरे केस, आणि अति तेजस्वी चेहरा, आल्या आल्या सरळ हा राममंदिरात जाऊन ठाण मांडतो . समर्थ कुटी तूनच नमस्कार करतात. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात , आणि आपापल्या कामाला लागतात. नऊच्या सुमारास न्याहारीसाठी सगळ्यांना बोलावण जात. समर्थ कल्याणाला सांगतात, "अरे कल्याणा, देवळात ते पाहुणे आलेले दिसतायेत त्यांनाही बोलाव बरं का. कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो , आणि म्हणतो "महाराज न्याहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का ?" वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो , मी फक्त पाणी घेतो, मला २ मोठे हंडे भरून पाणी आण, आणि हो मला हे विहीरीच पाणी चालत नाही, मी फक्त नदीचच पाणी घेतो . कल्याण विचारात पडतो , ते बघून वृद्ध खेकसतो , पाणी नसेल तर नको, मी राहीन उपाशी , झटकन कल्याण उत्तरतो, नाही महाराज मी आलोच , सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले २ ,३ तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो , समर्थ ध्यानस्थ झालेले असतात, उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो, वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो, आणि म्हणतो मला थोड्यावेळाने अजून लागेल . कल्याण म्हणतो, काळजी नसावी मी आणतो भरून , समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हा तसंच तडक न्याहारी न करता , गड उतरायला लागतो, मुखात रामनाम सुरूच असतं,नदीवर हंडे भरतो , आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळ जवळ धावतच हा परत गडावर येतो , जवळपास ११ वाजलेले असतात, वृद्ध ते पाणी तत्काळ संपवतो, आता गडावरचे सगळेच चाट पडतात , हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, हे सर्वांना जाणवत. अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक, तहान लागली आहे पाणी आहे का ? आता कल्याण यायचा आत गडावरचे २ ३ सेवेकरी धावतात, महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची . तर वृद्ध त्याच्याच अंगावर खेकसतो तुला सांगितलाय का ? हा आहे ना (कल्याणाकडे बघून) एवढा खाऊन माजलाय, काय झाल याला? आणि तुला जमत नसेल, तर सांग मी चालला जातो. हे ऐकून कल्याण गडबड्तोच , वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल, शिवाय आलेल भक्त हा परमेश्वराचाच अंश , परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल ? तो हात जोडतो महाराज तुम्ही शांत व्हा , मी लगेचच निघतो, तुम्ही चिंता करू नका बिचारा परत दोन हंडे घेऊन , गड उतरायला लागतो , ते दोन प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागले , अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात , सर्वांग घामाने भिजून जातं, पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच, हि भावना मनात समर्थांमुळे मनात एवढी रुजलेली असते कि जे करतोय ते रामरायासाठी बास, मनात दुसरा विचारच नाही , विकल्पच नाही . हा गडावर कसाबसा येतो, जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते . कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात , कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो . वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो. गडावरील बायका मात्र त्यांच्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात, आल्या आल्या त्या ह्याला हाक मारून जेवायलाच बसवतात , ३ वाजून गेलेले असतात. हा अन्नाला नमस्कार करतो , रामाच नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर ऐकू येते , " पाणी !!!!!!! " कल्याण हसतो , भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो, समर्थांसाठी आलेल पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी येईपर्यंत हे सेवन कराव, मी आलोच आता दोनच्या जागी ३ हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते. भक्त चुळबुळायला लागतात, समर्थांना सांगायला जाव तर ते सकाळ पासून ध्यानात, कुटीच दार बंद , करायचं काय कल्याण परत घाली येतो. आता वेग फारच मंदावलेला असतो, पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असत कारण, समर्थांसाठीच पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असत, आता आपल्या गुरूंना तहान लागली तर , डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं मोठ असत , काहीही करून समर्थांच ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवा , माझी गुरु माउली तहानलेली राहता कामा नये , किती ते गुरुप्रेम. .. धन्य ते समर्थ , धन्य तो कल्याण !!! डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो, दिवसभराचा उपाशी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थिती शक्य तेवढ्या वेगाने वर येतो.. पण वेळ तर लागतोच.. उन्ह कललेली असतात. बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते , हृदय प्रचंड वेगाने धड धडत असत, पावल लटपटत असतात. वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो . संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते . सर्व मंदिरात जमतात पण कोणी कोणाशी बोलत नसतं सर्वांच लक्ष मात्र त्या वृद्धावर खिळलेल असत. तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलावून सांगतो माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा , तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणेज झाले, कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो , दोघ तिघ पुढे सरसावतात, पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो. गड उतरायला सुरुवात होते, आणि काय आश्चर्य , शरीर पिसागत हलक होऊन प्रचंड वेग पकडत,कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीच पात्र दिसायला लागत , हा घाबरतो. मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो कल्याण विचारतो आपण खाली कधी उतरलात , माझ्या हातून काही चूक घडली का? वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो, क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात "अणुपासोनी ब्रह्मांडा, एवढा होत जातसे" त्याच प्रचंड रूप बघून , कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात, तो मारुतीरायाच्या पायावर लोटांगण घालतो. हनुमंत म्हणतात , 'बाळा तुझ्या भक्तीने आणि सद्गुरू प्रेमाने मी प्रसन्न झालो, अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा ,आज तू पूर्ण झालास' . काही कळायच्या आत तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो, कल्याण डोळे उघडतो बघतो तर काय समोर गडाचे दरवाजे दिसत असतात , आरती सुरु झालेली असते, हा धावत आत शिरतो, कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात , देवळातही नसतात . हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो , लांबवर 'धाब्याच्या मारुती' शेजारी, एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात , समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो, सार आकाश लालेलाल झालेलं असत , उरमोडीच खोर, केशरी रंगाने चमचमत असत. समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असत. कल्याण त्यांना लोटांगण घालतो, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेले असते. समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात , मनाच्या श्लोकांमध्ये अजून एका पुष्पाची भर पडते " नसे गर्व आंगी सदा वीतरागी* क्षमा शांती भोगी दयादक्ष* योगी नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा इंही लक्षणी जाणिजे योगिराणा" ----जय जय रघुवीर समर्थ --- वीतरागी : वैराग्यशील दयादक्ष: दया धारण करणारा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
धर्म
इतिहास

प्रतिक्रिया द्या
13744 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

समर्थ चरित्राविषयी बोलावे

गवि
Mon, 07/25/2011 - 22:55 नवीन
:) समर्थ चरित्राविषयी बोलावे तेवढे थोडेच. लहानपणी रोज मनाचे श्लोक न चुकता म्हणणारा मी, पुढे केवळ समर्थचरित्रातील कफदाणी,उष्टा विडा,गळू चोखणे आणि अशा अनंत गोष्टींमुळे त्यापासून कदाचित दूरच गेलो. पुढे जास्त समज आल्यावर पुन्हा रामदासांचे स्थान मनात निर्माण झाले. मला मिळालेली समर्थचरित्राची प्रत कदाचित जगात एकमेव असेल.. अशा कथांचे आकर्षण वाटण्याऐवजी रिपल्शन जास्त झाले. अजूनही समर्थ रामदासांविषयी माझ्या मनात अतीव आदर आहे पण क्षमस्व.. असल्या (चरित्रातल्या.. तुमची नव्हे) कथांविषयी नाही. बाकी आमच्या खाण्यापिण्याविषयी आपल्या टिप्पण्या वाचून हसून घेतो आणि बाकीचे टाळतो. तुमच्या कथेच्या शैलीविषयी ते मत नव्हते असे आता म्हणून काही उपयोग नाही कारण तुम्ही ते पटवून घेण्यापलीकडे गेला आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

शिवाय...चमत्कारच आकर्षण

गवि
Tue, 07/26/2011 - 10:38 नवीन
शिवाय... चमत्कारच आकर्षण आजच्या पिढीला सर्वाधिक आहे , superman , harry portar असे " झ" दर्जाचे पाश्यात चित्रपट इकडे करोडोंचा धंदा वसूल करून गेलेच नसते . त्यातही मानवजातीला एखादा हिरो चमत्कार करून वाचवतो असेच दाखवतात ना... तेंव्हा तुम्ही मुलांना ओरडता का? भोंदू गिरी चाललीये म्हणून . ही तुमचीच उदाहरणे जी तुम्हाला चपखल वाटत आहेत, तीच तशीच घेऊन हे विधान करु इच्छितो की हॅरी पॉटर, सुपरमॅन, डोरेमॉन आणि असे अनेक जादुई हिरोज हे सत्यात नसतात (फिक्शियस आहेत) याची मनातून या पिढीला जाणीव असतेच. समजा ते सत्य आहेत अशी फँटसी करुनही कोणी एन्जॉय करत असले तरी शेवटी सुपरमॅन, स्पायडरमॅन, हॅरी पॉटर वगैरे हे "निव्वळ मनोरंजन" आहेत. असाच मनोरंजनाचा जादुई नमुना म्हणून आपल्या थोर संतांना पेश करायचे असेल आणि तशा मार्गाने त्यांना पुढील पिढीच्या मनात (तशा करमणूकप्रधान स्वरुपात) रुजवून ठेवायचे असेल तर होईलही असा मार्ग यशस्वी.. आणि ज्याचा पराठा रोल करावा लागेल असे बेचव किंवा साखरेत घोळून चाटवावे लागेल असे कडू यापैकी काहीही समर्थांच्या मूळ लेखनात नाही. ते मधुर/योग्य/रसपूर्णच आहे आणि म्हणून चमत्कारांच्या सुपर झंकार बीट्स रिमिक्स शिवायही चालेल अशी सुमधुर चीज आहे ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

पंगा
Tue, 07/26/2011 - 11:20 नवीन
(समर्थांचे लेखन वाचलेले नाही, ह्यारी प्वाटरही वाचलेले नाही, पण...)
हॅरी पॉटर, सुपरमॅन, डोरेमॉन आणि असे अनेक जादुई हिरोज हे सत्यात नसतात (फिक्शियस आहेत) याची मनातून या पिढीला जाणीव असतेच. समजा ते सत्य आहेत अशी फँटसी करुनही कोणी एन्जॉय करत असले तरी शेवटी सुपरमॅन, स्पायडरमॅन, हॅरी पॉटर वगैरे हे "निव्वळ मनोरंजन" आहेत. असाच मनोरंजनाचा जादुई नमुना म्हणून आपल्या थोर संतांना पेश करायचे असेल आणि तशा मार्गाने त्यांना पुढील पिढीच्या मनात (तशा करमणूकप्रधान स्वरुपात) रुजवून ठेवायचे असेल तर होईलही असा मार्ग यशस्वी..
हा हा... "प्रेझेंटिंग 'द लाइफ अँड वर्क्स ऑफ द सेंट रामदास'... द ग्रेटेस्ट वर्क ऑफ फिक्शन सिन्स द इंडियन रेल्वेज़ टाइम टेबल"... कल्पना गमतीदार आहे. :) तशीही अगोदर 'ह्यारी प्वाटर'ची गणना 'झ' दर्जाच्या चित्रपटांत केलेली पाहून गंमत वाटली होतीच. (मला रस नसला तरी पोराच्या नादाने एखाददुसरा अधूनमधून बघितलाय... 'झ' दर्जाचा म्हणण्यासारखा प्रकार काही वाटला नाही. करमणूक म्हणून बराच आहे. मग मला माझ्या पोरासारखा रिमोट ताब्यात घेऊन खुर्चीत खिळवून न का ठेवेना. ज्याचीत्याची आवड. पण कितीही झाले, तरी ही करमणूक आहे, काल्पनिक आहे. संत रामदासांकडे आणि त्यांच्या लिखाणाकडे 'एक काल्पनिक करमणूक' म्हणून पाहणे अपेक्षित आहे काय*, हा प्रश्न अतिशय रास्त आहे.) * अर्थात, अपेक्षित असो वा नसो, ज्यातत्यात करमणूक पाहण्याच्या आमच्या जित्याच्या खोडीने आम्ही रामदासांच्या लिखाणातही - मुळात वाचले तर - करमणूक शोधूच, त्याला आमचा नाइलाज आहे. परंतु निदान रामदासांना काल्पनिक तरी मानणार नाही. पण मुद्दा आम्ही कसे पहावे हा नसून, मुळात सादरकर्त्याने त्याला 'काल्पनिक करमणूक' अशा स्वरूपात पेश करावे का, हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्पा, सुरेख लिहिलेस. आवडले.

यशोधरा
Mon, 07/25/2011 - 12:06 नवीन
स्पा, सुरेख लिहिलेस. आवडले.
  • Log in or register to post comments

ज ब र्‍या द स्त रे स्पावड्या

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/25/2011 - 13:06 नवीन
ज ब र्‍या द स्त रे स्पावड्या :) अतिशय सुरेख आणि ओघवते लिखाण. कल्याण स्वामींचे ते हंडे आजही बघायला मिळतात. जमल्यास समर्थांच्या गडावरुन खाली पडलेल्या छाटीला कल्याण बुरुजावरुन उडी मारून परत आणतो ती कथा पण लिही. खरेतर इतक्या सुंदर लिखाणावरती असे लिहू नये, पण ह्या लिखाणावरदेखील आपल्या सडक्या मेंदूमधून बाहेर आलेल्या सडक्या आणि भिकारचोट प्रतिक्रिया देणार्‍यांना रामराया सुबुद्धी देवो. !! जय जय रघुवीर समर्थ !!
  • Log in or register to post comments

हेच बोल्तो

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 07/25/2011 - 13:19 नवीन
मायला आमच्या स्पावड्यानं एक्दम भारी कथा लिवलीय, ते वाचाचे सोडून, हे काय भलतचं? बाकी समर्थांवर काही बोलण्याचा मला आधिकार नाही. तिथे फक्त हात जोडायचे इतकचं हातात असतं माझ्या!! तेवढं करतो. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

मूकवाचक
Mon, 07/25/2011 - 14:59 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

स्पा चांगली कथा लिहीली

ईश आपटे
Mon, 07/25/2011 - 15:29 नवीन
स्पा चांगली कथा लिहीली आहे.... पु.ले.शु. बाकी नेहमीप्रमाणे चमत्कार दिसला की हागात्कार सुरु करणारे विज्ञाननिष्ठ समाजसुधारक इथे ही प्रतिक्रिया द्यायला धावले आहेत त्यांचा निषेध !!
  • Log in or register to post comments

हा सगळा पोरकट पणा बघून गम्मत

कवितानागेश
Mon, 07/25/2011 - 16:01 नवीन
हा सगळा पोरकट पणा बघून गम्मत वाटतेय... ४-५ वर्षाची पोरे भांडतात ना, "मेरा डेडी सबसे स्ट्राँग! तेरा नाय.... " तसे काहीसे वाटतंय.... यात मूळ मुद्दा बाजूला रहातोय असो. चालू द्या. स्पा च्या धाग्याचा खरडफळा करणार नाही. :) ( त्यापेक्षा मूळ धाग्यापेक्षा मोठा प्रतिसाद, म्हणून एक वेगळा धागा काढावा का, हा विचार करतेय! ;) )
  • Log in or register to post comments

तुमचा मूळ मुद्दा काय आहे हे

ईश आपटे
Mon, 07/25/2011 - 16:05 नवीन
तुमचा मूळ मुद्दा काय आहे हे ही जरा कळू दे की ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आधीच्या प्रतिसादाची

कवितानागेश
Mon, 07/25/2011 - 16:11 नवीन
आधीच्या प्रतिसादाची 'रिव्हिजन' करा. कळेल हळूहळू......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

त्यापेक्षा मूळ धाग्यापेक्षा

ईश आपटे
Mon, 07/25/2011 - 16:21 नवीन
त्यापेक्षा मूळ धाग्यापेक्षा मोठा प्रतिसाद, म्हणून एक वेगळा धागा काढावा का, हा विचार करतेय! ह्या साठी आपले धनाजीराव तुम्हाला खंदी मदत करु शकतील बरका :) त्यांचा अनुभव दांडगा हाय ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

वेगळा धागा?

मूकवाचक
Mon, 07/25/2011 - 19:53 नवीन
त्या आधी 'बाबाजी' लेख येऊ द्या (चुकीच्या टैमाला चुकीची घाई करु ने मान्सानं!).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तेच्तरम्हन्तोमी!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/25/2011 - 23:01 नवीन
तेच्तरम्हन्तोमी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

http://www.misalpav.com/user/

कवितानागेश
Mon, 07/25/2011 - 23:06 नवीन
:) http://www.misalpav.com/user/322/guestbook
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

समर्थ चरीत्रात अशाच काही घटना

विजुभाऊ
Mon, 07/25/2011 - 16:46 नवीन
समर्थ चरीत्रात अशाच काही घटना आहेत .मेलेल्या चिमण्याना जिवन्त केले, मस्तकाचे उखळ केरून आणले वगैरे वगैरे...... त्या समर्थानी स्वतःरचल्या असतील याची शक्यता शून्य. रामदासानी लिहीलेले दासबोध घोकंपट्टी पारायणे करण्यापेक्षा अभ्यासण्याजोगे आहे
  • Log in or register to post comments

स्पा- मस्त रे.

चिंतामणी
Mon, 07/25/2011 - 17:15 नवीन
एव्हढे छान लिहीले आहेस म्हणजे मनाचे श्लोक आणि दासबोध नक्कीच वाचला/अभ्यासला असशील. (त्यामुळे वायफळ प्रतिक्रीयांचा तुझ्यावर परीणाम होणार नाही अशी खात्री). पुलेशु.
  • Log in or register to post comments

जियो मेरे दोस्त

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/25/2011 - 17:29 नवीन
स्पावड्या, एकदम भारी दोस्ता, ओघवती भाषा आणि साधी सहज मांडणी यामुळे ही कथा फारच सुंदर झाली आहे. रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी हे दोघे उच्चकोटीतले गुरु आणि शिष्य. रामदासस्वामींची ओळख कल्याणस्वामींशीवाय पुर्ण होउच शकत नाही. मनाचा एक कोपरा रामदासस्वामींसाठी राखुन ठेवला आहे. त्यांच्या बद्द्ल इतके सुंदर वाचताना मन भरुन आले होते. रामराया तुझे कल्याण करो. पुलेशु
  • Log in or register to post comments

=))

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/25/2011 - 17:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
Mon, 07/25/2011 - 23:11 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खुप छान कथा आनि तु पन छान

मुलूखावेगळी
Mon, 07/25/2011 - 17:56 नवीन
खुप छान कथा आनि तु पन छान मांडली आहेस. तसेही मला गुरुशिष्य कथा मनापासुन आवडतात.
  • Log in or register to post comments

क्या केहेना !!!! अव्वल...

वपाडाव
Mon, 07/25/2011 - 19:03 नवीन
क्या केहेना !!!! अव्वल...
  • Log in or register to post comments

एकदम मस्त!!

सूर्यपुत्र
Mon, 07/25/2011 - 19:07 नवीन
अजून लिहावे. -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

मस्त रे स्पावड्या!!

प्रभो
Mon, 07/25/2011 - 19:23 नवीन
मस्त रे स्पावड्या!!
  • Log in or register to post comments

जय जय रघुवीर समर्थ ..

Rahul D
Mon, 12/26/2016 - 00:45 नवीन
जय जय रघुवीर समर्थ ..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा