✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

योगिराणा

स
स्पा यांनी
Sun, 07/24/2011 - 10:53  ·  लेख
लेख
"हनुमंत अमुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली ,श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोलिया नामे" पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो " अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तयावीण अमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे" समर्थ उठून बसतात , क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताच स्मरण करतात. सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो,. बाहेर राममंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते. दातखिळी बसेल अशी थंडी पण कल्याण तशा थंडीतही पहाटे ३ ला उठून , गार पाण्याने आंघोळ करून रामाच्या पूजेत रमलेला असतो. समर्थ कुटीबाहेर येतात , कल्याणाकडे कौतुकाने पाहतात. कल्याण सोडला तर बाकी गडाला अजून जाग यायची असते. रातकिडे अजूनही ओरडत असतात , गार वारं सुसाट वेगाने गडाभोवती प्रदक्षिणा घालत असत. "श्रीराम जयराम जय जय राम" समर्थ बाहेरूनच रामरायाला हात जोडतात. कल्याणाच लक्ष जात, तो लगबगीने धावत येतो, नमस्कार करतो. महाराज कशाला या थंडीत बाहेर पडलात, काल प्रचंड ज्वर चढलेला होता तुम्हाला. तुम्ही आतच विश्रांती घ्या मी पाणी गरम करायला ठेवून आंघोळीची व्यवस्था करतो . समर्थ हसतात अरे या देहाची काळजी मी कशाला करू ? तो रामराया आहे ना. ते काही नाही, आज तुम्ही विश्राम केलाच पाहिजे , कल्याणही मागे हटणारा नसतो. समर्थ परत मनमोकळेपणाने हसतात, पण त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येते, थांबता थांबत नाही.. कल्याण घाबरतो.. त्यांना पाणी प्यायला देतो आणि आत मध्ये परत झोपवतो, अंगावर भगवी शाल पांघरतो, आणि बाहेर येतो हळू हळू गडावरचे इतर शिष्यही जागे व्हायला लागतात . दसर्याचा मोठा उत्सव गडावर होणार असतो , शिवाय राजेही नव्या मोहिमेवर निघण्याआधी दसर्याच्या मुहूर्तावर गडावर यणार अशी माहिती मिळालेली असते . आपोआप एक वेगळाच उत्साह गडावर संचारलेला असतो. गडाची डागडुजी, साफ सफाई, धर्मशाळेची व्यवस्था, मंडपाची उभारणी, धान्य कोठाराची देखभाल, येणाऱ्या जाणार्या भक्तांची व्यवस्था, एक ना अनंत कामे. सर्व शिष्य मनापासून कामाला लागलेले असतात, तरी बाहेर गावावरून उत्सवा पुरत्या येणाऱ्या काही हंगामी शिष्यामध्ये "कल्याण" मात्र समर्थांचा फारच लाडका हि भावना मात्र कुठेतरी बोचायचीच. शिष्यांच्या तर नाना तऱ्हा, कोणी किती साधना केली यावरून पैजा! एक म्हणे मी दासबोधाची शत पारायणे केली आहेत, दुसरा त्यावर कुरघोडी करे , 'हा हा म्हणता माझी ५०० पारायणे या दास नवमीला पूर्ण होतील' , तिसरा पण सामील व्हायचा, गंभीर चेहरा करून, आकाशाकडे लांब नजर लावून म्हणायचा , "रामरायाने या देहाकडून ५ कोटी रामनाम पूर्ण करून घेतलं आहे , मग इतर साधक यांच्याकडे आदराने वेग्रे बघायला लागायचे. हळूच विषय मग कल्याणाकडे घसरायचा, एक म्हणायचा , महाराज दयाळू आहेत, विद्याभ्यासात अजिबात गती नसल्याने त्याला आश्रय दिला आहे , "श्रीराम श्रीराम"!!! दुसरे वयस्कर गृहस्थ म्हणायचे, शिसवी खांबासारखा सणसणीत वाढला आहे, नुसता पुक्खे झोडतो चार वेळेला, कधी जप करणे म्हणून नाही, कधी दासबोधाचे वाचन म्हणून नाही, कधी ध्यान म्हणून नाही , कधी आपल्याबरोबर चर्चेत भाग घेणे नाही , अहो आपलं तर सोडा ,समर्थनच प्रवचन सुरु असताना, हा खुशाल गडावरची इतर कामे करत बसतो हो, किती अपमान तो गुरूंचा .. अशा आणि अनेक चर्चा तिथे चालायच्या. पण कल्याण समोर आला रे आला कि सर्वांची बोलती बंद. त्याला सर्व काही कळायचे, आणि समर्थांना सुद्धा .. दोघांनाही फक्त मौज वाटायची . कल्याणाच्या अंतरंगात वाहणारा रामनामाचा धबाबा समर्थांना जाणवायचा , त्याच्या हृदयात फुललेल्या हनुमंत नामाचा सुगंधाचा दरवळ समर्थांपर्यंत पोहोचायचा. ज्याने समर्थांसमोर बसून, त्यांच्या मुखातून निघणारा दासबोधरुपी खजिना आपल्या अप्रतिम हस्ताक्षराने कायमचा बंदिस्त केला , ज्याने तो लिहिता लिहिताच पाठ आणि आत्मसात सुद्धा करून टाकला , जो त्यातली एकूण एक ओळ जगतोय , अश्याला अजून पारायण करायची गरजच काय ? ज्याच्या श्वास श्वासातून रामनाम बाहेर पडतंय, तो किती जप मोजून ठेवणार ? असो पण सामान्य माणसांना या गुरु शिष्याचं नात कधी कळलच नाही समर्थांना कालपासून कल्याणाची वेगळीच काळजी लागून राहिली होती , काल प्रत्यक्ष मारुती रायाने समर्थांना दर्शन देऊन सांगितल , कि कल्याणाची भक्ती पूर्ण पावली आहे , त्याची परीक्षा घ्यायला हवी आता शिष्यापेक्षा गुरूलाच शिष्याची जास्त काळजी. लहान मुलाला माहित नसत , तो आपला आईने काय शिकवलंय तेच जाऊन परीक्षेत , लिहून येतो, पण आई ला केवढी चिंता, निकाल मिळे पर्यंत तिला काही चैन पडत नाही , तसंच होत इकडे , पण समर्थांना कल्याणावर पूर्ण विश्वास होता . आणि कल्याण ? तो या सगळ्यापासून अलिप्त होता, समर्थ हनुमत आणि राम, बास विषय संपला, त्याला वेगळं जगच नव्हत.दररोज सूर्यनमस्कार घालून कमावलेली प्रचंड शक्ती, आणि सद्गुरूंच पाठबळ यामुळे कामाचा झपाटा एवढा कि चार जणांची काम पट्ट्या एकटा उरकायचा , समर्थांना कफाचा विकार जडल्याने त्यांना गडावरच्या विहिरेच साठवलेलं पाणी चालायचं नाही, म्हणून कल्याण दर दिवशी पहाटे २ मोठे पितळी हंडे घेऊन, खाली "उरमोडी नदी वर जायचा . नदी काय जवळ नव्हती , जवळपास जाऊन येऊन दोन अडीच तासांच अंतर होत , पण कल्याण ते काम आनंदाने करायचा. तर सांगायची गोष्ट अशी कि आजचा दिवस कल्याणासाठी महत्वाचा होता सकाळी ७ च्या सुमारास सूर्योदयाच्या वेळी एक वृद्ध गडावर येतो, सहा फुटाच्याही वर उंची, धारदार नाक, भेदक डोळे , संपूर्ण पांढरे केस, आणि अति तेजस्वी चेहरा, आल्या आल्या सरळ हा राममंदिरात जाऊन ठाण मांडतो . समर्थ कुटी तूनच नमस्कार करतात. इतर भक्तही क्षणभर त्या वृद्धाकडे बघतात , आणि आपापल्या कामाला लागतात. नऊच्या सुमारास न्याहारीसाठी सगळ्यांना बोलावण जात. समर्थ कल्याणाला सांगतात, "अरे कल्याणा, देवळात ते पाहुणे आलेले दिसतायेत त्यांनाही बोलाव बरं का. कल्याण देवळात येतो, वृद्धाला नमस्कार करतो , आणि म्हणतो "महाराज न्याहारी तयार आहे, आपण खाऊन घेता का ?" वृद्ध डोळे न उघडता उत्तर देतो , मी फक्त पाणी घेतो, मला २ मोठे हंडे भरून पाणी आण, आणि हो मला हे विहीरीच पाणी चालत नाही, मी फक्त नदीचच पाणी घेतो . कल्याण विचारात पडतो , ते बघून वृद्ध खेकसतो , पाणी नसेल तर नको, मी राहीन उपाशी , झटकन कल्याण उत्तरतो, नाही महाराज मी आलोच , सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले २ ,३ तांबे पाणी तो समर्थांच्या कुटीत ठेवतो , समर्थ ध्यानस्थ झालेले असतात, उरलेलं पाणी त्या वृद्धाला देतो, वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो, आणि म्हणतो मला थोड्यावेळाने अजून लागेल . कल्याण म्हणतो, काळजी नसावी मी आणतो भरून , समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हा तसंच तडक न्याहारी न करता , गड उतरायला लागतो, मुखात रामनाम सुरूच असतं,नदीवर हंडे भरतो , आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळ जवळ धावतच हा परत गडावर येतो , जवळपास ११ वाजलेले असतात, वृद्ध ते पाणी तत्काळ संपवतो, आता गडावरचे सगळेच चाट पडतात , हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, हे सर्वांना जाणवत. अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक, तहान लागली आहे पाणी आहे का ? आता कल्याण यायचा आत गडावरचे २ ३ सेवेकरी धावतात, महाराज आम्ही व्यवस्था करतो पाण्याची . तर वृद्ध त्याच्याच अंगावर खेकसतो तुला सांगितलाय का ? हा आहे ना (कल्याणाकडे बघून) एवढा खाऊन माजलाय, काय झाल याला? आणि तुला जमत नसेल, तर सांग मी चालला जातो. हे ऐकून कल्याण गडबड्तोच , वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल, शिवाय आलेल भक्त हा परमेश्वराचाच अंश , परमेश्वर रागावून गेला तर कसं होईल ? तो हात जोडतो महाराज तुम्ही शांत व्हा , मी लगेचच निघतो, तुम्ही चिंता करू नका बिचारा परत दोन हंडे घेऊन , गड उतरायला लागतो , ते दोन प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागले , अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात , सर्वांग घामाने भिजून जातं, पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच, हि भावना मनात समर्थांमुळे मनात एवढी रुजलेली असते कि जे करतोय ते रामरायासाठी बास, मनात दुसरा विचारच नाही , विकल्पच नाही . हा गडावर कसाबसा येतो, जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते . कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात , कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो . वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून आणि डोळे मिटून बसलेला असतो. गडावरील बायका मात्र त्यांच्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात, आल्या आल्या त्या ह्याला हाक मारून जेवायलाच बसवतात , ३ वाजून गेलेले असतात. हा अन्नाला नमस्कार करतो , रामाच नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर ऐकू येते , " पाणी !!!!!!! " कल्याण हसतो , भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो, समर्थांसाठी आलेल पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो महाराज मी येईपर्यंत हे सेवन कराव, मी आलोच आता दोनच्या जागी ३ हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिसेनाशी होते. भक्त चुळबुळायला लागतात, समर्थांना सांगायला जाव तर ते सकाळ पासून ध्यानात, कुटीच दार बंद , करायचं काय कल्याण परत घाली येतो. आता वेग फारच मंदावलेला असतो, पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असत कारण, समर्थांसाठीच पाणी पण त्याने त्या वृद्धाला दिलेलं असत, आता आपल्या गुरूंना तहान लागली तर , डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझं मोठ असत , काहीही करून समर्थांच ध्यान संपायच्या आत गड गाठायला हवा , माझी गुरु माउली तहानलेली राहता कामा नये , किती ते गुरुप्रेम. .. धन्य ते समर्थ , धन्य तो कल्याण !!! डोक्यावर एक आणि दोन हातात दोन असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो, दिवसभराचा उपाशी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थिती शक्य तेवढ्या वेगाने वर येतो.. पण वेळ तर लागतोच.. उन्ह कललेली असतात. बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते , हृदय प्रचंड वेगाने धड धडत असत, पावल लटपटत असतात. वृद्ध आल्या आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो . संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते . सर्व मंदिरात जमतात पण कोणी कोणाशी बोलत नसतं सर्वांच लक्ष मात्र त्या वृद्धावर खिळलेल असत. तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलावून सांगतो माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा , तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणेज झाले, कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो , दोघ तिघ पुढे सरसावतात, पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो. गड उतरायला सुरुवात होते, आणि काय आश्चर्य , शरीर पिसागत हलक होऊन प्रचंड वेग पकडत,कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीच पात्र दिसायला लागत , हा घाबरतो. मागे वळून बघतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो कल्याण विचारतो आपण खाली कधी उतरलात , माझ्या हातून काही चूक घडली का? वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो, क्षणार्धात समोर साक्षात हनुमंत प्रकट होतात "अणुपासोनी ब्रह्मांडा, एवढा होत जातसे" त्याच प्रचंड रूप बघून , कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात, तो मारुतीरायाच्या पायावर लोटांगण घालतो. हनुमंत म्हणतात , 'बाळा तुझ्या भक्तीने आणि सद्गुरू प्रेमाने मी प्रसन्न झालो, अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा ,आज तू पूर्ण झालास' . काही कळायच्या आत तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो, कल्याण डोळे उघडतो बघतो तर काय समोर गडाचे दरवाजे दिसत असतात , आरती सुरु झालेली असते, हा धावत आत शिरतो, कुटीत डोकावतो तर समर्थ तिथे नसतात , देवळातही नसतात . हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो , लांबवर 'धाब्याच्या मारुती' शेजारी, एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात , समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो, सार आकाश लालेलाल झालेलं असत , उरमोडीच खोर, केशरी रंगाने चमचमत असत. समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असत. कल्याण त्यांना लोटांगण घालतो, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेले असते. समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात , मनाच्या श्लोकांमध्ये अजून एका पुष्पाची भर पडते " नसे गर्व आंगी सदा वीतरागी* क्षमा शांती भोगी दयादक्ष* योगी नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा इंही लक्षणी जाणिजे योगिराणा" ----जय जय रघुवीर समर्थ --- वीतरागी : वैराग्यशील दयादक्ष: दया धारण करणारा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
धर्म
इतिहास

प्रतिक्रिया द्या
13744 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

स्पा कडून अनएक्स्पेक्टेड !!!

सूड
Sun, 07/24/2011 - 11:53 नवीन
स्पा कडून अनएक्स्पेक्टेड !!! बर्‍यापैकी लिहीलंय !!
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
Sun, 07/24/2011 - 12:18 नवीन
छान वर्णन.
  • Log in or register to post comments

खूप

तिमा
Sun, 07/24/2011 - 12:22 नवीन
भावनेच्या आहारी जाणार्‍यांना खूप आवडेल. 'थर्टीसिक्स चेंबर ऑफ शॅओलिन' या सिनेमाची आठवण करुन देणारी गोष्ट.
  • Log in or register to post comments

+१ लिहीण्याची शैली आवडली. पण

स्वानन्द
Sun, 07/24/2011 - 12:58 नवीन
+१ लिहीण्याची शैली आवडली. पण खरं तर ह्या असल्या बाबा महाराजांबद्दल अगदी कळवळ्याने लिहीलं जातं आणि नवीन मिथकं रचली जातात हे पाहून आश्चर्य वाटले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

छान

प्रचेतस
Sun, 07/24/2011 - 13:26 नवीन
समर्थांसारख्या योगी पुरुषालाही तुम्ही असल्या बाबामहारांजाच्या पंगतीत बसवल्याबद्दल खेद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

कोण योगी पुरुष आहे आणि कुणाचे

स्वानन्द
Mon, 07/25/2011 - 07:48 नवीन
कोण योगी पुरुष आहे आणि कुणाचे बुरखे टराटरा फाडले पाहिजे हे तुम्ही कसे ठरवता ते कळले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

स्पा
Mon, 07/25/2011 - 09:11 नवीन
कोण योगी पुरुष आहे आणि कुणाचे बुरखे टराटरा फाडले पाहिजे हे तुम्ही कसे ठरवता ते कळले तर बरे होईल. हाच प्रश्न तुमच्या बाबतीतही विचारला जाऊ शकतो.. कोण ढोंगी महाराज , बाबा, बुवा आहेत , हे तुम्ही कसे ठरवता? असो हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे या धाग्यावर अजून चर्चा "जमल्यास" नको लिखाणातील ज्या त्रूटी आहेत त्यावरील चर्चांचा जरूर आदर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

.....

अँग्री बर्ड
Mon, 07/25/2011 - 11:24 नवीन
स्पा,एक अतिशय उत्तम लेख . आणि हो,शिवछत्रपती गुरु श्री श्री श्री समर्थ रामदास स्वामी यांना काय्येक बोलायचे काम नाय. जे सध्या डोहात तरंगत आहेत त्यांनी बाहेर या . जय जय रघुवीर समर्थ . एक समर्थ भक्त .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ही मिथके नाहीत रे बाबा. तुला

कवितानागेश
Sun, 07/24/2011 - 14:24 नवीन
ही मिथके नाहीत रे बाबा. तुला माहित नाही का? १८९३पूर्वी सग्गळ्ळे काही खर्रे खर्रे असायचे. गेल्या शतकातच सगळे ढोंगी बाबा-महाराज जन्माला आलेत! ते खोटे, त्यांच्याबद्दलचा कळवळा खोटा, त्यांच्या गोष्टी खोट्या...... पूर्वीच्या काळी मात्र असे नव्हते बर्र क्का! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

एकंदर मताशी असहमत पण

आत्मशून्य
Sun, 07/24/2011 - 15:46 नवीन
थर्टीसिक्स चेंबर ऑफ शॅओलिन
या बाबतीत आपल्याशी सहमत. तूम्हीपण टाइम्स नाउ वर पडीक असता काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

वेगळ्याच विषयाला हात घातलास

गणपा
Sun, 07/24/2011 - 13:11 नवीन
वेगळ्याच विषयाला हात घातलास की लेका. चक्क छान लिहिलयस. ;)
  • Log in or register to post comments

असले तसले बुवा ???????????

स्पा
Sun, 07/24/2011 - 13:11 नवीन
पण खरं तर ह्या असल्या बाबा महाराजांबद्दल अगदी कळवळ्याने लिहीलं जातं आणि नवीन मिथकं रचली जातात हे पाहून आश्चर्य वाटले!! समर्थ रामदास स्वामी = असले तसले बुवा ??????????? असो चालायचंच धन्यवाद
  • Log in or register to post comments

सोडून दे स्पा!

चतुरंग
Sun, 07/24/2011 - 19:12 नवीन
श्रीराम त्यांना सद्बुद्धी देवो! :) -रामरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

इंटरनेटस्नेही
Sun, 07/24/2011 - 20:45 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

समर्थ रामदास स्वामींना

श्रीरंग
Sun, 07/24/2011 - 22:19 नवीन
समर्थ रामदास स्वामींना "औरंगजेबाचे हेर" म्हणण्यापर्यंत देखील मजल गेली अहे काही महाभागांची. क्रुपया दुर्लक्ष करावे. असो. कथा छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सुरेख

प्रचेतस
Sun, 07/24/2011 - 16:10 नवीन
सुरेख लिहिले आहे रे स्पावड्या. लेखनशैली मस्तच. पण गुरुभक्तीला चमत्कार चिटकायला नको होता असे वाटतेय. अवांतरः बाकी मिपावर तुला आज बरोब्बर एक वर्ष पूर्ण झालेबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

...........

आत्मशून्य
Sun, 07/24/2011 - 13:32 नवीन
कथेसोबत लेखकाचेही नाव वाचून स्पिचलेस बनलो. छान लिहलयं.
  • Log in or register to post comments

स्पाकडुन अशा लेखनाची अपेक्षा

५० फक्त
Sun, 07/24/2011 - 14:54 नवीन
स्पाकडुन अशा लेखनाची अपेक्षा नव्हती, अतिशय सुखद अपेक्षाभंग आहे. अजुन येउ दे. स्पावड्या, कधी प्रत्यक्ष गेला आहेस का रे सज्जनगडावर, मी फक्त प्रसादाच्या जेवणासाठी जातो तिथे, तसाच गोंदवल्यालाही. जाम भारी जेवण असतं दोन्हि कडं. पण त्याचवेळी तसेच गुरुभक्ती लोकांच्या मनात उतरवण्यासाठी या चमत्कारांची पण मौज वाटते. दुध गरम झाल्यावर उतु जातं तेंव्हा सगळी साय निघुन जाते अन नंतर नुसताच फेस फसफसत राहतो तशातली ही गत आहे.
  • Log in or register to post comments

+१

इंटरनेटस्नेही
Sun, 07/24/2011 - 20:47 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मस्त वाटलं गोष्ट वाचून.

रेवती
Sun, 07/24/2011 - 15:27 नवीन
मस्त वाटलं गोष्ट वाचून.
  • Log in or register to post comments

मस्त

अर्धवट
Sun, 07/24/2011 - 15:46 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान कथा...

धन्या
Sun, 07/24/2011 - 16:12 नवीन
भाषा खुपच ओघवती आहे. पण गुरुभक्तीचा, सदाचरणाचा, दुसर्‍यांच्या उपयोगी पडण्याच्या गुणांचं महत्व वाढवण्यासाठी अशा चमत्कार कथांचा आधार घेण्यापेक्षा दासबोधातला एखाद्या समासातील, दशकातील काही ओव्या किंवा अगदी तुम्ही शेवटी दिलेला मनाचा श्लोक घेऊन स्पष्ट केलं असतं तर उत्तम झाले असते. अशा चमत्कार कथांमुळे संतांची शिकवण बा़जूला राहते आणि लोक या चमत्कार कथांमध्येच रममाण होतात. वर ५० फक्त म्हणतोय ते अगदी खरं आहे. अशाने दुध गरम झाल्यावर उतु जातं तेंव्हा सगळी साय निघुन जाते अन नंतर नुसताच फेस फसफसत राहतो तशी गत होते... - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments

मस्तच कथा आहे. खुप इच्छा आहे

किसन शिंदे
Sun, 07/24/2011 - 17:21 नवीन
मस्तच कथा आहे. खुप इच्छा आहे सज्जनगढावर जायची.
  • Log in or register to post comments

कधी येताय बोला, मी तर तिथं

५० फक्त
Mon, 07/25/2011 - 07:45 नवीन
कधी येताय बोला, मी तर तिथं फक्त जेवायला जातो, अन्न हे पुर्णब्रम्ह आहे माझ्यासाठी. येताना खाली उरमोडी मध्ये पाण्यात डुंबायचं जाम मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

चला कि पुढच्या महिन्यात..

किसन शिंदे
Mon, 07/25/2011 - 09:35 नवीन
चला कि पुढच्या महिन्यात..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मी पण

प्रचेतस
Mon, 07/25/2011 - 09:44 नवीन
मी पण येतोय रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अजुन एक एन्ट्री घ्या..

शैलेन्द्र
Mon, 07/25/2011 - 22:31 नवीन
अजुन एक एन्ट्री घ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चुकुन "कंट्री घ्या" असे

वपाडाव
Tue, 07/26/2011 - 10:20 नवीन
चुकुन "कंट्री घ्या" असे वाचले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मस्त लिहीलं आहेस रे

यकु
Sun, 07/24/2011 - 19:14 नवीन
मस्त लिहीलं आहेस रे स्पा.. आमच्याकडे "सज्जनगड" नावाचे मासिक यायचे.. गावाकडे अजूनही येते.. त्यातली चित्रे भारी असायची गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे | धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे | | त्याची आठवण झाली बघ..
  • Log in or register to post comments

अरे वा, कथा छान आहे!

चतुरंग
Sun, 07/24/2011 - 19:15 नवीन
वर्णन ओघवतं आणि परिणामकारक झालंय. शेवटचा श्लोक अतिशय आवडला. -रंगा
  • Log in or register to post comments

सुरेख शैली

शुचि
Sun, 07/24/2011 - 20:17 नवीन
सुरेख शैली
  • Log in or register to post comments

वा!

रामदास
Sun, 07/24/2011 - 20:27 नवीन
छान लेख आहे. स्पाकडून अनपेक्षीत. आणखी लिही रे बाबा !!!
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Sun, 07/24/2011 - 22:12 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

प्रत्यक्ष 'रामदासां'नी चांगलं

प्यारे१
Mon, 07/25/2011 - 15:59 नवीन
प्रत्यक्ष 'रामदासां'नी चांगलं म्हटल्यावर आणि खंद्या 'कार्यकर्त्यां'नी अनुमोदन दिल्यावर आम्ही बापुडे आणखी काय म्हणणार? बाकी, स्पावड्या मोठा झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.... खरंच छान लिहिलंय. (कुणाचा लेख रे? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अतिशय उत्तम रे स्पा! मनापासुन

इंटरनेटस्नेही
Sun, 07/24/2011 - 20:52 नवीन
अतिशय उत्तम रे स्पा! मनापासुन आवडली ही कथा.. आणि महत्तवाचं म्हणजे आजकाल मिपावर वाढत चाललेल्या बोअरिंग लेखना मुळे आलेल्या बोअरडमवर तुझी ही कथा म्हणजे वाळवंटातुन ओठ सुकेपर्यंत तहान लागलेल्या अवस्थेत चालणार्‍या वाटसरु समोर शीतल जलाचा झराच जणु!
  • Log in or register to post comments

श्री. ईंटरनेटस्नेही यांना

५० फक्त
Mon, 07/25/2011 - 07:44 नवीन
श्री. ईंटरनेटस्नेही यांना सखाराम गटणे ओफ द मंथ हा पुरस्कार द्यावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

(No subject)

इंटरनेटस्नेही
Tue, 07/26/2011 - 02:58 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

छान.

पल्लवी
Sun, 07/24/2011 - 22:02 नवीन
मस्तं लिंक लागली वाचताना. :) आवडले.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंस!

पैसा
Sun, 07/24/2011 - 22:50 नवीन
स्पायल्या, गोष्ट माहित असलेली होती, पण छान फुलवलीस. मात्र "तुझ्याकडून अनपेक्षित" असं मी अजिबात म्हणणार नाही कारण पूर्वीही तू ओघवते आणि हळूवार लेख लिहिले आहेस!
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Mon, 07/25/2011 - 03:36 नवीन
छान लिहलं आहेस स्पा. गोष्ट अत्यंत आवडली.
  • Log in or register to post comments

छान लिहलं आहेस स्पा. गोष्ट अत्यंत आवडली.

सुमो
Mon, 07/25/2011 - 11:37 नवीन
असंच म्हणतो. लिहीत रहा. अजून वाचायला आवडेल. ______ वाचनमात्र सुमो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

छान लिवले आहेस रे स्पावड्या.

मृत्युन्जय
Mon, 07/25/2011 - 09:55 नवीन
छान लिवले आहेस रे स्पावड्या. असले तसले भोंदु बाबा आणि समर्थ रामदास यांच्यातला फरक तुला कळतो ही एक अजुन जमेची बाजू.
  • Log in or register to post comments

मी यापैकी कशाचाच अभ्यासक

गवि
Mon, 07/25/2011 - 12:09 नवीन
मी यापैकी कशाचाच अभ्यासक नाही.. त्यामुळे मी असे समजू शकतो की भोंदू बाबा आणि समर्थ रामदास यांच्यात खचितच फरक आहे. त्यांना एका मापाने तोलणे गैर आहे.. हे सर्व खरे असेलच.. मात्र भोंदू बाबा आणि समर्थ रामदास यांच्यातला हा फरक पुढील पिढीला नीट कळावा आणि प्रतिमा बदलून तशी (पक्षी: भोंदू बाबांसारखी) होऊ नये म्हणून चमत्कारांची फोडणी टाळून निव्वळ तत्वसत्त्व द्यावे. ही जबाबदारी आपलीच. मुख्य कारण म्हणजे पूर्वी लोकांना मूळ चांगल्या विचाराशी पकडून ठेवणे/आकर्षित करणे यासाठी चमत्काराचे आकर्षक वेष्टन द्यावे लागत असावे कदाचित. आत्ताची आणि पुढची पिढी मात्र अशा वेष्टनाने कदाचित विथड्रॉ होऊ शकेल. कारण ते हार्डकोअर विज्ञानयुगात जगताहेत आणि चमत्कारांचे त्यांना खास आकर्षण नसावे. लिखाण अ‍ॅज सच खूपच ओघवते आणि शांत सुंदर आहे रे स्पावड्या.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Mon, 07/25/2011 - 12:46 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हम्म

मूकवाचक
Mon, 07/25/2011 - 16:01 नवीन
सहमत. विज्ञानयुगातल्या लोकान्चा मिथक फोबिया आणि धर्मातल्या प्रतिकात्मकतेबद्दलचा तिरस्कार लक्षात घ्यायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फरक कळायला हवा आहे ना..

चिंतामणी
Mon, 07/25/2011 - 17:19 नवीन
कारण ते हार्डकोअर विज्ञानयुगात जगताहेत आणि चमत्कारांचे त्यांना खास आकर्षण नसावे. विज्ञानयुवात जगणा-या या पिढीला फरक कळायला हवा आहे ना? मनाचे श्लोक आणि दासबोधाचा अभ्यास करा म्हणाव. आपोआप फरक कळेल. त्यात कोठेही चमत्कार आढळणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी हेच म्हणतो. मूळ दासबोध /

गवि
Mon, 07/25/2011 - 17:25 नवीन
अगदी हेच म्हणतो. मूळ दासबोध / मनाचे श्लोक वगैरेमधे असे काहीही नाही. त्यामुळे मूळ सत्व पुढे पोचवताना कानगोष्ट होऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

खालील प्रतिसाद देण्या आधी हे

स्पा
Mon, 07/25/2011 - 19:02 नवीन
खालील प्रतिसाद देण्या आधी हे नमूद करू इच्छितो कि, माझा हि भोंदू बुवा, बाबा, यांवर काडीचा विश्वास नाही , आणि अश्यांकडे मी कधीही गेलेलो नाही अध्यात्म आणि भोंदू गिरी यांची मी कधीही गल्लत करत नाही.. आणि जे लोक यांना एकच समजतात , ते महामूर्ख होत श्रद्धा असावी , अंधश्रद्धा नाही परत हा प्रत्येकाचा वयक्तिक विषय आहे , पण जे सरसकट सर्वालाच भोंदुगिरी म्हणत गळे काढत येतात असे विचार्जंत डोक्यात जातात असो आता गविंच्या मुद्द्याकडे मात्र भोंदू बाबा आणि समर्थ रामदास यांच्यातला हा फरक पुढील पिढीला नीट कळावा आणि प्रतिमा बदलून तशी (पक्षी: भोंदू बाबांसारखी) होऊ नये म्हणून चमत्कारांची फोडणी टाळून निव्वळ तत्वसत्त्व द्यावे. ही जबाबदारी आपलीच. यात भोंदू गिरी काय होती हे मला तरी समजले नाही.. प्रत्येक गोष्ट जी देवाशी निगडीत असली, कि झाले गळे काढायला सुरु सारखं सारखं शुद्ध, मूळ तत्व असे शब्द वाचून बोर झालो राव तत्व सत्व वरून आठवल, तुम्ही फक्त दिवस रात्र , शुद्ध , प्रोटीन, कर्बोदक वेग्रेंच्या गोळ्या खाता का? कि, चमचमीत पंचपक्वान्न, तुम्हाला आवडतात? मला वाटत याहून अधिक चांगल उदाहरण नसेल जड जड तत्वज्ञान , किंवा संस्कार एखाद्या गोष्टीरूपात मांडले तर काय बिघडल ? आपल्या मुलांना सुद्धा आईवडील, पालक खायला आवडत नाही, म्हणून, अगदी, त्याचा रोल करून, पराठा वेग्रे नाव देऊन , सुंदर पाक्रु बनवून घशाखाली उतरवतातच ना यात तुम्हाला तुम्ही भोंदुगिरी करत आहात असे वाटते का? नाही ना आत्ताची आणि पुढची पिढी मात्र अशा वेष्टनाने कदाचित विथड्रॉ होऊ शकेल. कारण ते हार्डकोअर विज्ञानयुगात जगताहेत आणि चमत्कारांचे त्यांना खास आकर्षण नसावे. हे कशावरून म्हणता आहात तुम्ही? चमत्कारच आकर्षण आजच्या पिढीला सर्वाधिक आहे , superman , harry portar असे " झ" दर्जाचे पाश्यात चित्रपट इकडे करोडोंचा धंदा वसूल करून गेलेच नसते . त्यातही मानवजातीला एखादा हिरो चमत्कार करून वाचवतो असेच दाखवतात ना... तेंव्हा तुम्ही मुलांना ओरडता का? भोंदू गिरी चाललीये म्हणून . इतकेच काय , मध्ये आलेला बाल हनुमान हा चित्रपट सुद्धा नवीन पिढीला खूप आवडला, त्यांना त्याच्या मातीतला, सुपर हिरो मिळाला म्हणून त्यामुळे वरील विधान हे काडीचाही विचार न करता उगाचच केलेलं वाटते सोयी साठी देवाचा वापर करू नका... जगात भोंदू गिरी सुरु आहे. नाही असे नाही.. पण सरसकट.. सगळ्यांना एका मापात तोलू नका इतकेच म्हणेन.. जय श्रीराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आरं येड्या कश्यापाइ

गणपा
Mon, 07/25/2011 - 19:45 नवीन
आरं येड्या कश्यापाइ स्पष्टिकरणं देत बसला हाइस. माणसं वळखाया शीक गड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तेच्तरम्हन्तोमी!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/25/2011 - 23:01 नवीन
तेच्तरम्हन्तोमी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा