Skip to main content

'लोक'मत

लेखक निखिल देशपांडे यांनी मंगळवार, 07/06/2011 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले. जालावरही बेरक्या आणि बातमीदार या आणि अशाच ब्लॉग्जनी वातावरण पेटवायला सुरवात केली होती. या ब्लॉग्ज वरुन अजून एका सद्या अद्ययावत न होणार्‍या ब्लॉगची आठवण नेहमीच होते. ;-) अर्रर्र... इतकं काही लिहिलं आणि जो किस्सा सांगायचा होता तो तर राहूनच गेला.. शनिवारी दुपारी मस्त आमरस चेपुन तंगड्या वर करुन पडलेलो असताना घरातला फोन खणखणला. मनातून खूप शिव्या द्यायची इच्छा असतानाही कशी तरी दाबून मोठ्या कष्टाने फोन उचलला आणि आवाजात शक्य तितके मार्दव आणून बोलायला सुरवात केली. मी : हॅलो (समोरुन एक लाडिक आवाज) सः हॅलो सर, मी लोकमत मधुन बोलतेय. (आईला, ओssss म्हणजे आमच्या मातोश्रींना लोकमत सखी मंच चे बक्षीस वैगेरे लागले का काय??? मागे काकूला अशीच चटई मिळाली होती.........) सः हॅलोs मी: (भानावर येत) हां बोला.. सः सर तुमच्या घरचा लोकमत अशात बंद केला आहे??? मी: (आनंदून) हो हो. आम्ही बंद करुन टाकला तुमचा पेपर, एक महिना झाला. सः सर एक मिनिट होल्ड करा, मी आमच्या साहेबांकडे फोन देते. साधारण एखादा मिनिट मला ताटकळत ठेवल्या नंतर समोरुन बराच वेळ रिसीव्हरशी कोणीतरी खेळत बसले आहे असे मला वाटायला लागले. काय शिंची कटकट आहे. यांचे पेपराचे गठ्ठे परत जायला लागले तर आमची झोप का घालवताय??? तेवढ्यात समोरुन, वि: नमस्कार साहेब मी वितरण व्यवस्थापक बोलतोय, आपण आपल्या घरी येणारा लोकमत का बंद केला??? मी: तुम्हाला खरच या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे??? वि: हो साहेब. आम्हाला समजाऊन घ्यायचे आहे की आमच्या काय चुका झाल्या??? तुम्ही पेपर कधी बंद केला आणि तुमच्या कडे किती वर्ष लोकमत येत होता? मी: आमच्या कडे गेली किमान १५ वर्ष लोकमत यायचा. साधारण एक महिना आधी आम्ही लोकमत बंद केला. वि: सर कारण सांगु शकता??? (आता हा माणुस एवढ्या प्रेमाने विचारतोच आहे तर म्हणुन आम्ही आमची गाडी चालु केली) मी: सर्व प्रथम बातम्यांचा खालावलेला दर्जा. आजकाल तुम्ही काय छापताय याचे भान तुम्हाला राहिलेले नाही. जास्तीत जास्त पेड न्युज देण्याकडे तुमचा कल आहे. दुसरे म्हणजे बाबुजींनी आज एका सलूनचे उद्घाटन केले या आणि अशा सारख्या बातम्यांनीच तुमचे ते हॅलो भरलेले असते. जागा मिळालीच तर साथीला कोणत्या तरी जैन साधुंचे प्रवचन वगैरे कुठे झाले याच्या बातम्या छापता. संपादकीय पानाबद्दल म्हणाल तर तुमच्या कडून कॉंग्रेसचा धोरणांचाच प्रसार होणार अशी मानसिक तयारी आम्ही केलेली आहेच. तुमच्या पेपराची 'मंथन' नावाची एक पुरवणी आहे. सध्या तुम्हालाच अर्थात मंथन करायची गरज आहे. पण एकदा रविवारची पुरवणी कशी असावी म्हणुन लोकसत्ता कडे पहा. तुमच्या सातही दिवसांच्या अंकांमधे साहित्य, कला, संगीत क्षेत्राला किती महत्व दिले जाते याचा अभ्यास करा. (एवढे बोलुन मलाच दम लागला) वि: सर तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच सुचनांवर आम्ही विचार करत आहोत. पण काय आहे सर काही बातम्या आम्हाला द्याव्याच लागतात. बाबुजीचा पेपर असल्यामुळे त्या बातम्या आम्ही देणारच. मी: त्याचे योग्य प्रमाण तुम्ही राखु शकता. आणि माझ्या सुचना अजुन संपलेल्या नाहीत. पण जाऊ द्या तुम्ही वितरण विभागाचे, आणि माझ्या सुचना ह्या संपादकिय विभागा बद्दल जास्त आहेत. वि: तुम्ही संपादकिय विभागातील आमच्या प्रतिनिधीस तुमच्या सुचना द्यायला इच्छुक आहात का?? तुमचे नाव काय?? यानंतर मी माझे नाव, पत्ता वगैरे त्यांना दिला, संपादकीय विभागाचे प्रतिनीधी आता घरी प्रत्यक्ष भेटायला येणार आहेत म्हणे. या सगळ्यांतून एवढेच लक्षात येते की लोकमतचे गठ्ठे खरोखरच परत जात आहेत. दिव्य मराठी मला तितकासा आवडला नाहीच. त्याचे स्वरुप हे लोकमत आणि संध्यानंदचे मिश्रण असल्या सारखेच आहे. चाळीस पानांचा पेपर काढायचा म्हणल्यावर तशाही टेबल न्युज द्याव्याच लागणार. पण एकूणच लोकमतची औरंगाबाद विभागातली एकाधिकारशाही मोडीत निघाली हेच म्हणावे लागणार. स्वागतमुल्य एक रुपया करुन इतरांना जेरीस आणणार्‍या लोकमतालाही कुणीतरी सव्वाशेर मिळाला यातच समाधान.

वाचने 10290
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

बरं झालं. असेच अजून काही पेपर आहेत त्यांचेही काही व्हायला हवे. सकाळमधेही काहीच्याकाही बातम्या असतात. पानंच्यापानं भरून जाहिराती पाहून वीट येतो. ज्यांचा पेपर आहे त्यांच्याच बातम्या दिल्यानंतर अपेक्षा काय ठेवणार?

In reply to by रेवती

आम्हाला ई सकाळ फार्फार आवडतो...त्यातल्या बात्म्यान्पेक्षाही मुक्तपीठ, पैलतीर यातल्या लेखान्पेक्षाही त्याखालील प्रतिक्रिया जास्त मोहिनी घालतात. त्यामुळे तुमच्या आक्षेपालाच आमचा आक्षेप आहे. बाकी हे लोकमत काय प्रकर्ण आहे?

In reply to by रेवती

सकाळमधेही काहीच्याकाही बातम्या असतात. पानंच्यापानं भरून जाहिराती पाहून वीट येतो. ज्यांचा पेपर आहे त्यांच्याच बातम्या दिल्यानंतर अपेक्षा काय ठेवणार? बरे झाले हे तुम्ही बोललात. मी बोललो असतो तर इकडे गहजब माजवला असता. सकाळ हा नेहमीच सौम्य बातम्या देतो. जनमानस ढवळून काढण्याचा प्रयत्न फारच क्वचित केला जातो. सकाळ हा मुळात पुण्यातील स्थानीक दयनीक आहे त्याच्या रद्दीला बरा भाव मिळतो. रद्दी सुद्धा जास्त पडते. आयबीएन लोकमत नावाचा एक चॅनल आहे त्यावर बरेचदा अजीतपवारांविरुद्ध चर्चा चालू असतात. महाराष्ट्रात पुणे सोडून इतर शहरे आहेत हे सकाळ च्या लक्षात असते की नाही कोण जाणे. राजकीय कोलांट्याउड्या मनपातील चर्चा यावरच बरेचदा बहुतेक बातम्या असतात म टा ,लोकसत्ता हे त्यामानाने उत्तर व पश्चीम महाराष्ट्र बर्‍यापैकी कव्हर करतात.

औबादेतुन प्रकाशित होणारा देवगिरी तरुण भारत बंद झाला अन या लोकमत, एकमत ईत्यादी ईत्यादीचं पेव वाढलं. पुण्यात तरी काय तो भिक्कार सकाळ सगळीकडे. त्यामानाने डिएनए बरा वाटला थोडा काळ.

In reply to by आनंदयात्री

औबादेतुन प्रकाशित होणारा देवगिरी तरुण भारत बंद झाला अन या लोकमत, एकमत ईत्यादी ईत्यादीचं पेव वाढलं. पुण्यात तरी काय तो भिक्कार सकाळ सगळीकडे. त्यामानाने डिएनए बरा वाटला थोडा काळ. >>. +१ माझ्या इथे (म्हणजे पुलापलिकडे ;) ) सकाळ हा दुपारी येणारे वर्तमानपत्र म्हणुन सुप्रसिध्द होते, आहे ! आजही सकाळ कधी सकाळी आलेला पहिला नाही . अवांतर : या प्रतिसादामुळे देवगिरी तरुण भारत चे सुरडकर आठवले

In reply to by आनंदयात्री

पुण्यात तरी काय तो भिक्कार सकाळ सगळीकडे. जय आनन्दयात्री.......... आंद्या उसात गेलास म्हणून पुण्याचा जाज्वल्य ( लै दिवसानी हा शब्द लिहीलाय) अभिमान सोडलास होय रे. तुझे वाक्य जर मी लिहीले असते तर सगळ्यानी मिळून मला पुणे द्वेष्टा ठरवला असता

In reply to by विजुभाऊ

फरक आहे. इथे पुण्याला भिक्कार नाही म्हणलेले तर सकाळ ला भिक्कार म्हणले आहे. ;). उद्या पुण्यातले आहेत म्हणुन कलमाडींबद्दल चांगले बोलायला लावाल ;)

दिव्य मराठी वाचलेला नाहि.. परंतू त्याचा विंग्रजी बंधु 'डी एन ए' हा सध्याचा माझा (त्यातल्यात्यात) आवडता इंग्रजी पेपर असल्याने दिव्य मराठी बघाय-वाचायची उत्सूकता आहे.

लोकमतच्या बाबतीतल्या भावना अगदी मनातल्या आहेत. :) ''एका सलूनचे उद्घाटन केले या आणि अशा सारख्या बातम्यांनीच तुमचे ते हॅलो भरलेले असते. जागा मिळालीच तर साथीला कोणत्या तरी जैन साधुंचे प्रवचन वगैरे कुठे झाले याच्या बातम्या छापता'' लै भारी. :) दै. लोकमत आमच्याकडेही खूप वर्षापासून येतो. अनेकदा लोकमत बंद करावा वाटतो. बातम्या नसतात. बाबुजींचा प्रचार पत्रकाचे त्याचे स्वरुप झाले आहे. पण, लोकमत पाहिला नाही तर चुकल्यासारखं वाटतं आणि लोकमत च्या जोडीला अजून काही दैनिकं असल्यामुळे बातम्या कव्हर होतात त्यामुळे अजून तरी बाबुजींचा पेपर बंद केला नाही. -दिलीप बिरुटे

केतकर तिकडे गेले आहेत असं कळतंय त्यामुळे मंथन ऐवजी आता थेट सोनिया गीतं वाचायला मिळतील -- दिव्य कुमारांची.

In reply to by मैत्र

केतकर तिकडे गेले आहेत असं कळतंय
ओह्ह.. तरीच कालच्या अग्रलेखात चक्क सोनियावर टिका होती. केतकरांच्या हातून ती वाक्ये लिहिली गेली आहेत असे समजून मी तीन ताड नसलो तरी (मनातल्यामनात) तीन इंच तरी उडालो होतोच ;)

In reply to by ऋषिकेश

हे काय नवे नाटक अजुन ? बायदवे, त्या 'दिव्य मराठी'ची ऑनलाईन आवॄत्ती आहे का ? आम्हीही जरा निरपेक्ष आणि नि:पक्ष दैनिक वाचू म्हणतो ;) निख्याचा लेख छान, खुप दिवसांनी लिहीता झाल्याचा आनंद आहेच :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डाण्रावांशी सहमत आहे. (च्यायला काय वेळ आलीये ! ह्यालाच दुर्दैवाचे दशावतार चालु झाले असे समजावे काय?) असो... 'जन्मठेपेच्या' काळात फार थोडया विभुतींकडून अत्युच्च लेखन लिहिले गेल्याची किमया घडली आहे. त्याच दिशेने आता निख्याचा प्रवास सुरु आहे हे बघुन उर भरुन आले. २.५०/- आणि ४.००/- च्या किंमतीत पैसे देउन बिल्डर / सोनार / शिक्षणसंस्था ह्यांच्या पान-पान जाहिराती विकत घेण्याचे नाकारुन आम्ही देखील आता सामनाच्या जोडीला मटा सुरु केला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

'जन्मठेपेच्या' काळात फार थोडया विभुतींकडून अत्युच्च लेखन लिहिले गेल्याची किमया घडली आहे. त्याच दिशेने आता निख्याचा प्रवास सुरु आहे हे बघुन उर भरुन आले.
म्हणजे देश्पन्दे आता गीतारहस्य सारखं काहीतरी भव्य दिव्य लिहिणार म्हणायचं. >>आम्ही देखील आता सामनाच्या जोडीला मटा सुरु केला आहे. हॅ हॅ हॅ!!!! आलं...लक्षात आलं बरं का. ;)

In reply to by निल्या१

दुव्यासाठी धन्यवाद मालक. नाही म्हटले तरी 'केतकरांचे अग्रलेख' वाचायची सवय लागली होती, बरे झाले ही लिंक मिळाली ते. :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

या लोकप्रभामध्ये "दिव्य" वर एक खुमासदार झक्कास लेख आहे ... आता केतकरांच्या माहेरी त्यांची यथेच्छ कौतुकं होत आहेत -- "मागील वर्तमानपत्राची लोकमान्यता यथाशक्ती कमी करोन शिताफीने सदाकुमारांनी दिव्य मराठीचा गड गाठला असल्याने या दैनिकाचे यश आता निश्चितच जाहले आहे. " http://www.loksatta.com/lokprabha/20110610/fulya.htm

In reply to by मैत्र

तसं नाही मालक, 'साहेब' ( लोकप्रभावाले ;) ) आणि केतकरांचा 'याराना' बहुत पुराना आहे. आता दोस्ताचे कौतुक नको का करायला ? - छोटा डॉन

लोकमत तर अगदी टुक्कार पेपर आहे. सकाळचे तर कुठलेही पान उघडले तरी पवारांच्या काही ना काही बातम्या असतातच. आता पुण्यात मटाने सकाळला चांगलेच आव्हान निर्माण केलेय. विशेषतः राजकीय लेख मटाचे सकाळच्या मानाने खूपच चांगले, जरी काहीसे एकांगी वाटले तरीही, पेज थ्री वर मात्र जास्त भरणा असतो. बाकी लोकसत्ता घ्यावा तो फक्त शनिवार्/रविवारच्या पुरवण्यांसाठीच.

In reply to by प्रचेतस

सकाळ खरंच भंगारलाय... सकाळचा बालरंग बालकांनीही वाचू नये, इतका बालिश असतो. शिवाय दर दिवशी "सकाळचे आहे लक्ष" या मथळ्याखाली असून असून काय तर एक खड्डा बुजवला, वगैरे.... मला एक कळत नाही : असं जर फक्त लक्ष देऊन काम होत असेल, तर हे सकाळवाले हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार करणार्‍यांवर का नाही लक्ष देत???? -सूर्यपुत्र.

आम्ही शाळेत असताना लोकमतला फेकमत म्हणत असू. ते अतिशय फालतू, टुकार वर्तमानपत्र आहे यावर काहिही दुमत नाही. बाबुजींनी आज एका सलूनचे उद्घाटन केले या आणि अशा सारख्या बातम्यांनीच तुमचे ते हॅलो भरलेले असते. जागा मिळालीच तर साथीला कोणत्या तरी जैन साधुंचे प्रवचन वगैरे कुठे झाले याच्या बातम्या छापता. संपादकीय पानाबद्दल म्हणाल तर तुमच्या कडून कॉंग्रेसचा धोरणांचाच प्रसार होणार अशी मानसिक तयारी आम्ही केलेली आहेच. तुमच्या पेपराची 'मंथन' नावाची एक पुरवणी आहे. सध्या तुम्हालाच अर्थात मंथन करायची गरज आहे. १००% सहमत. तुम्हाला दम लागल्याने तुम्ही उल्लेख न करू शकलेले काही सदर म्हणजे फेरफटका ज्यात काहीतरी वॉटर कूलर टाईप काल्पनीक संवाद असतात. आणि सखी... काही बोलायलाच नको. काही मारवाडी-जैन माहिलांच्या या सखी मंचाच्या मेहंदी-रांगोळी शिबीर, ब्युटी पार्लर शिबीर बातम्यांनी उरलेली जागा भरवलेली असते. आमच्या घरी तर लोकमतचा उपयोग केवळ 'निधन वार्तां'साठी होतो. दुरच्या ओळखीत घडलेल्या आणि आपल्यापर्यंत न पोहोचलेल्या दुर्दैवी घटनांची माहिती त्यामुळे कळते.

आम्ही फक्त ऑनलाईन लोकमत मधले 'साप्ताहिक व मासिक भविष्य ' वाचतो कारण त्या आशेवर आमच्या आठवड्याची व महिन्याची सुरवात चांगली जाते.

साक्षात आमच्या देशपांडेआण्णांनी म्यान केलेली लेखणी पुन्हा उपसलेली पाहून अत्यानंदानं डोळे डबडबले आहेत. ;) बाकी, अनुभव भारीच्च आहे की. मराठी वर्तमानपत्राकडून एव्हढी 'ग्राहकाभिमुख' होण्याची अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती.

शनिवारी दुपारी मस्त आमरस चेपुन ...
आंबा हापूस नसेल तर तो आमरस नव्हे! असो. पर्यावरणप्रेमी असल्यामुळे कागदावर छापलेले वर्तमानपत्र वाचीत नाही. शिवाय घरात पसारा कमी होतो, रद्दी विकण्याचं काम करावं लागत नाही असे इतरही अनेक फायदे आहेतच. मटाने ई-पेपर सुरू करावा (निदान न-पॉर्नतरी बघावं लागणार नाही). उत्तमोत्तम मराठी मासिकं, नियतकालिकांनीही आंतरजालीय आवृत्त्या काढाव्यात. आनंदाने पैसे भरूनही मी ते वाचेन. 'लोकमत'मधे म्हणे, आमचे स्वयंघोषित मित्र आणि मिपाचे संपादक कार्यकर्ते यांच्या ब्लॉगावरचा लेख छापून येणार होता. त्याचं काय झालं? लिंक आहे का कोणाकडे? नसेल तर र्‍हायलं, तो लेख परत मिपा किंवा त्यांच्या ब्लॉगावरच परत वाचू! 'दिव्य मराठी' हे पेप्राचं नाव अगदीच लेम आहे. कल्पनेचा दुष्काळ असणारं वर्तमानपत्रं काय वाचायचं?

त्यांना एखाद्या चांगल्या संपादकाची गरज असावी असे माझे मत आहे. आमचे एक मोठे व्यासंगी मित्र आहेत औ बाद्ला. त्यांच्याशी बोलुन बघतो.

मी ओन्लाईन सगळे पेपर्स वाचतो. विकत घेत नाही, पन पीसी वरुन वाचायला मस्त वाटते. (अमलीमिटेड ब्रॉन्ड्बॅण्ड आहे. त्यामुळे काय फरक पडत नाही.) मोठ्ठा मॉनिटर आहे. त्यामुळे पेपर मस्त दिसतो. खुप वाचतो. मीपा वाचतो. प्रतिक्रिया पन देतो. पेपर आनि मिपावर. काम करता करता सगळं करायचं मग वेळ चांगला जातो.

दिव्य मराठी हे पुढारी + संध्यानंद + लोकमत यांचे मिश्रण आहे ..त्यात तो पेपर अग्रलेखाशिवाय वाचायचा हा अलिखित संकेत आहे (गांधी प्रेमी सोडुन इतराना ) मात्र ,तरीही मक्तेदारी मोडली याचा आनंद आहे ... दोघेही तितकेच पाण्यात आहेत .. बघु ,भविष्यात काय होते ते ..आता अंदाज वर्तवणे कठीण ..

ओन लैन आवृत्तीत कुठे क्लिकवले की ती "सिटी बँके" ची जाहिरात चा पॉप अप येतो. मी म्हणतो , आमच्या राज्य सहकारी बँकेने काय घोडं मारलय ?