मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेबेलप्लात्स : बर्लिनमधील पुस्तकांच्या होळीचे स्मारक

धनंजय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जर्मनीमध्ये खूप काही बघण्यासारखे आहे, तरी पहिल्या भेटीत विसाव्या शतकाच्या भयाण इतिहासाचे सावट चहूबाजूला जाणवल्यावाचून राहात नाही. माझ्या प्रथम जर्मनी-भेटीत "उंतर देन लिंदेन" या बर्लिनच्या राजपथावरून फिरताना मी बघितलेले पहिले स्मारक म्हणजे बेबेलप्लात्स. दगडांनी पक्के बांधलेले हे मैदान आहे. थेट समोर दिसतो, तो सेंट हेडविग चर्च, हा जर्मनीमधील सर्वात पुरातन कॅथोलिक इमारतींपैकी एक आहे. मी उभा आहे तिथून मैदानाच्या डावीकडे बर्लिन ऑपेराची इमारत आहे, तर उजवीकडे इतिहासप्रसिद्ध हंबोल्ड्ट विद्यापीठाची इमारत आहे. मैदानाच्या मध्ये काचेची फरशी दिसते. १० मे १९३३ रोजी या ठिकाणी "जर्मन विद्यार्थी संघटनेने" पुस्तकांची प्रचंड होळी येथे जाळली होती. या दिवशी जर्मनीतल्या अनेक शहरांमध्ये संघटनेने योजना करून अशा होळ्यांचा कार्यक्रम केला होता. सर्व ठिकाणी कोणा-कोणा मान्यवरांची भाषणे आयोजित केलेली होती. पैकी विद्यार्थ्यांना योसेफ गबेल्स याने दिलेल्या भाषणाचा काही भाग असा.
अतिरेकी ज्यू बुद्धिवादाच्या युगाचा आता शेवट झाला आहे. जर्मन क्रांतीने व्यूहभेद करून पुन्हा जर्मनीचा मार्ग मोकळा केला आहे... भविष्यातील जर्मन माणूस पुस्तकवीर नसेल तर चारित्र्यवीर असेल. हेच ध्येय ठेवून आम्हाला तुमचे शिक्षण करायचे आहे. तरुण व्यक्ती म्हणून दयाहीन झोतात साहसाने उभे राहायचे, मृत्यूच्या भयावर विजय मिळवायचा, आणि पुन्हा मृत्यूबद्दल आदर कमावायचा - हे नव्या पिढीचे कार्य आहे. या मध्यरात्रीच्या घटकेला भूतकाळाचे दुष्ट पिशाच्च आगीत टाकता, ते तुम्ही उत्तम करत आहात. हे एक बलशाली, महान आणि प्रतीकात्मक कृत्य आहे. हे कृत्य जगासाठी दस्तऐवज घडवून सांगते आहे - हल्लीच्या वाइमार प्रजासत्ताकाचा पाया भूमीत ढासळतो आहे, पण या भग्नावशेषांमधून नवचैतन्य फेनिक्स पक्ष्यासारखे विजयी होऊन उभारेल.
(गबेल्स हा नात्सी सरकारात माहितीप्रसारणमंत्री होता. १९३३ मध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह-कॉम्युनिस्ट-सोशालिस्टांची युती फुटल्यामुळे नात्सी पक्षाचे अल्पमतातले सरकार सत्तेवर आले. हे सरकार चैतन्यपूर्ण आणि कृतिशील होते, हे गबेल्सने लवकरत लवकर युवकांमध्ये अस्मितेची स्फूर्ती भरून दाखवून दिले. पुस्तकांची होळी हा गबेल्सचा पहिल्या काही महिन्यांतलाच मोठा कार्यक्रम.) अशी ही होळी. या होळीचे स्मारक म्हणून मैदानात एक भुयारी खोली आहे. त्या खोलीमध्ये काचेच्या फरशीमधून बघता येते. हे त्या काचेचे जवळून घेतलेले चित्र : भुयारी खोलीमध्ये पुस्तकांची रिकामीच रिकामी कपाटे आहेत. पुस्तके जाळली म्हणून जर्मनीच्या ग्रंथभांडारात ही पोकळी झाली, ती कधी भरून येणार नाही, हे पुढच्या पिढ्यांनी कधी विसरू नये. काचेत प्रतिबिंब दिसते आहे, ते माझ्याबरोबर फिरायला आलेल्या सहकार्‍याचे आहे. हे गृहस्थ ज्यू आहेत, आणि प्राध्यापक म्हणजे बहुधा गबेल्सच्या मते "ज्यू बुद्धिवादी" असावेत. गबेल्सचे भंपक (नव्हे क्रूर) "जर्मन नवचैतन्य" आता पुरते पराभूत झाले आहे, आणि त्याच्या लाजेचे स्मारक बघत एक ज्यू "बुद्धिवादी" आरामात भटकत बघतो आहे - हे न्यायाच्या पराकोटीचे प्रतिबिंब आहे, असे कोणाला वाटू शकेल. हे आशादायी रूपक मी नाकारत नाही. परंतु या न्यायाच्या पोटात कधीच न फिटणारा अन्यायही दडला आहे. माझा ज्यू सहकारी आरामात पर्यटन करायच्या आधी लाखो ज्यू लोक - बुद्धिवादीच नव्हे तर मजूर, व्यापारी, बायका, पोरे, म्हातारे, कोतारे - मेले. ते कोणी परत येणे नाही. त्यांची संतती जगातून नाहिशी झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी गबेल्सची छीथू झाली, पण पुस्तके जाळणार्‍या, "अतिरेकी" बुद्धिवादाचा भेद करून बलशाली कृत्ये करणार्‍या तरुणांचे काय झाले? त्यांच्यापैकी काही तरुण सैन्यात भरती होऊन मेले असतील. बहुतेक जिवंत राहिले त्यांना आपल्या "नवचैतन्या"ची राखरांगोळी बघायला मिळाली. "मी त्या होळीत आपल्या हाताने पुस्तके टाकली" असे आपल्या नातवांना कोण कसे सांगणार? पण जर्मन अस्मितेच्या दृष्टीने बघायला गेले, तर या होळीत शोचनीय आणि अपत्यशून्य दहन झाले ते वाइमार प्रजासत्ताकाचे. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जन्मलेली ही प्रजासत्ताक राज्यघटना पूर्णपणे जर्मन होती. १९३० नंतर त्याच्या निवडणुकांमध्ये कोणालाच बहुमत मिळत नव्हते - आघाडी राजकारण... बर्लिनमध्ये कलेसाठी कला म्हणून "आचरट" प्रकार... काही का असेना, हे जे काय चालू होते, ते पूर्णपणे जर्मन होते, आणि ते या आगीत जळून खाक झाले. ज्यू विचारवंत मेले. पुढे युद्धात नात्सी नवचैतन्याची लक्तरेही हास्यास्पद झाली. जर्मनी ही अमेरिकेची आणि रशियेची राज्यघटना-खेळाची प्रयोगशाळा झाली. जर्मनीची स्वतःची राज्यघटना बनवणारी स्वतंत्र अस्मिता दोन पिढ्यांसाठी नाहिशी झाली. त्या ज्यू "बुद्धिवाद्यांच्या" पुस्तकांबरोबर जळून गेलेल्या वाइमार राज्यघटनेबद्दलही थोडातरी शोक करणे योग्य आहे. अस्मितेच्या भरात चैतन्यपूर्ण तारुण्याकडून तोडफोड होत असताना "विचारवंत" ही शिवी म्हणून वापरली जाऊ लागली, तर या घटनेचे पडसाद मनात उमटल्यावाचून राहत नाहीत.

वाचने 10367 वाचनखूण प्रतिक्रिया 24

निमीत्त मात्र Fri, 11/13/2009 - 07:49
अस्मितेच्या भरात चैतन्यपूर्ण तारुण्याकडून तोडफोड होत असताना "विचारवंत" ही शिवी म्हणून वापरली जाऊ लागली, तर या घटनेचे पडसाद मनात उमटल्यावाचून राहत नाहीत.
वा! अतिशय समयोचित आणि उत्कृष्ट लेख धनंजय. तुमच्या टायमींगला सलाम!! बस फोडल्या तर काय झाले? माणसे थोडीच मारली असला युक्तिवाद करणार्‍यांसाठी हा लेख वाचनीय ठरो. गबेल्सचा उतारा तर अतिशय सुंदर. मिपावर आलेल्या काही विशीष्ठ प्रतिसादांचा परीपाक.

सहज Fri, 11/13/2009 - 08:25
मिपाच्या तमाम वाचकांना विशेषता चैतन्यपूर्ण तरुण वाचकांना म्हणजेच भावी विचारवंताना उत्तम मार्गदर्शक लेख!!

अभ्यासपूर्ण लेख आवडला. जर्मनीच्या चुकांमधून शिकण्यासारखं बरंच काही आहे. (आणि त्याची जाणीव करून देत असताना, उगाचच शब्द समान आहेत म्हणून नालंदा, तक्षशिलेतली पुस्तकं आणि विदेशी कापडांची होळी यांची आठवण करून देणं हे तेवढचं विचारदरिद्री वाटलं.) आजचा बहुसंख्य जर्मन समाज हिटलरचा वंशज म्हणून समोर येत नाही; हिटलर, नात्झी पक्ष हे दु:स्वप्न होतं असाच विचार करतो. आपल्या पूर्वजांच्या चुका मान्य करून पुढे जाणारा सामान्य जर्मन माणूस मलातरी भावला होता. अवांतरः धनंजय, पहिला फोटो काढताना लेन्सवर थेंब होते का? अतिअवांतरः दगडी मैदानातला कचर्‍याचा अभाव चटकन दिसला. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निमीत्त मात्र Fri, 11/13/2009 - 09:44
आणि त्याची जाणीव करून देत असताना, उगाचच शब्द समान आहेत म्हणून नालंदा, तक्षशिलेतली पुस्तकं आणि विदेशी कापडांची होळी यांची आठवण करून देणं हे तेवढचं विचारदरिद्री वाटलं.
जियो अदिती! अगदी मनातले विचार. इतका चांगला लेख वाचून झाल्यावर खाली पहिल्या प्रतिसादात अशी मळमळ पाहून हेच वाटले. आता ह्यावर एक नेहमीप्रमाणे अतीसुमार भोकरवाडीछाप प्रकटन सुद्धा येईल. अर्थात त्यामु़ळे धनंजयांच्या लेखनाचे मूल्य एका कणानेही कमी होणार नाही हेही तितकेच खरे.
आजचा बहुसंख्य जर्मन समाज हिटलरचा वंशज म्हणून समोर येत नाही; हिटलर, नात्झी पक्ष हे दु:स्वप्न होतं असाच विचार करतो. आपल्या पूर्वजांच्या चुका मान्य करून पुढे जाणारा सामान्य जर्मन माणूस मलातरी भावला होता.
कारण ह्या हिटलरचे वंशज आजकाल भारतात दिसतात. 'नथुराम आणि हिटलर' ह्या चर्चेत तेच दिसून आले.

In reply to by निमीत्त मात्र

कारण ह्या हिटलरचे वंशज आजकाल भारतात दिसतात. 'नथुराम आणि हिटलर' ह्या चर्चेत तेच दिसून आले.
हिटलरचे गुणधर्म ही काही विश्वातली ऊर्जा नाही की ते गुणधर्म एका समाजातून नष्ट झाले तर दुसरीकडे उगवतील. स्वतःची मळमळ काढण्यासाठी माझ्या प्रतिसादाला लटकलेला प्रति-प्रतिसाद पहाता, संपादकांना विनंती करून माझा प्रतिसाद काढून टाकण्याचा विचार करत आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Sun, 11/15/2009 - 18:34
तुमचे निरीक्षण सुयोग्य आहे. माझे जर्मन मित्रही इतिहासाचे परिशीलन करणारे आहेत असा अनुभव आहे. माझ्या लेखात "आपण असे केले हे नातवांना सांगू शकणार नाही" असा जो उल्लेख आहे, त्यातील "नातवंडे" म्हणजे आजचे जर्मन नागरिक. पण हे व्यायला एक-दीड पिढी जावी लागली नात्सी काळाशी आपले काही देणेघेणे नव्हते, ते सगळे दु:स्वप्न होते, असे जेव्हा त्या काळातली पिढी म्हणत असे, तो अप्रामाणिकपणा होता. भारावलेले नागरिक त्या काळात भरपूर होते. आणि पहिले नाही तरी पुढे नात्सी पक्षाला लोकशाही बहुमत होते.

Nile Fri, 11/13/2009 - 10:23
धनंजय यांची 'खासीयत' म्हणजे मुद्दा थोडक्यात पण संपुर्णपणे मांडणे! नविन माहीती मिळाली, धन्यवाद धनंजय. विचारवंत आणि त्याचा उहापोह: खरं सांगायचं तर दोन्ही बाजुने बोलण्यार्‍या (की भांडण्यार्‍या?) लोकांची चर्चा वाचुन हसुच फार येत होतं. एकमेकाला हिणवणे म्हणजे वाद जिंकणे असा बर्‍याच जणांचा समज झालेला दिसतो. विचारवंत इत्यादी लेख हा त्यातलाच एक भाग. दुसरा प्रकार म्हणजे शब्दांशी खेळणे, एकमेकांची विधानं फक्त त्या प्रतिसादापुरती खोडुन मुद्दा सिद्ध होत नाही हे ही कळणे फार महत्त्वाचे आहे. वाईट ह्याच वाटतं की बरेच जण चुकीच्या युक्तीवादाने चुकीच्या मार्गांना 'हाच मार्ग एकला' असे समजुन बसतात आणि मग (वैचारीक) दंगे आलेच! :)

भोचक Fri, 11/13/2009 - 13:02
धनंजय, संपूर्ण लेखच आवडल्याने त्यातले नेमके अमुक आवडले हे सांगता न येण्याइतका तो सुंदर आहे. आणि हो समयोचितही. छायाचित्रांनी त्याचे मुल्यही नक्कीच वाढवले आहे. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव

नंदन Fri, 11/13/2009 - 14:36
आवडला. नेहमीप्रमाणे मोजक्या शब्दांतला आणि संतुलित. शेवटच्या वाक्यात व्यक्त केलेली चिंता रास्त आहे. मात्र गेले दोन-तीन दिवस विचारवंत-शब्दाला-झोडपणे-प्रकार चालू आहे त्यामागची भावना निराळी असावी असं वाटतं. कारण त्यात उत्साहाच्या भरात अतिशयोक्ती झाली तरी सारासाराचे भान सुटलेले दिसत नाही. अर्थात तसे होऊ नये म्हणून तुम्ही लिहिलेल्या लेखासारखे संयमित बलही कार्यरत असणे आवश्यक आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

आनंदयात्री Fri, 11/13/2009 - 14:55
हेच म्हणतो .. प्रतिक्रियांमधुन उगाचच विषयाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न विचाराअंती केलेला वाटला ;) नाईलचे "एकमेकाला हिणवणे म्हणजे वाद जिंकणे असा बर्‍याच जणांचा समज झालेला दिसतो." हे वाक्य आवडले .. नाइलला जियो पुरस्कार !! धनंजयचा लेख आवडला. जर्मनी झाले .. फ्रान्स झाले .. तिथे झाला एवढा आततायीपणा किंवा क्रुरपणा होण्याची उदाहरणे आपल्याकडे विरळाच. @अदिती .. स्वच्छता आहे हे छानच .. हे बघ आमच्या औरंगाबादजवळ देवगिरीचा किल्ला आहे .. तेथे हे आणी अशी अनेक छोटी मोठी मैदाने आहेत .. तीही नियमीत पणे स्वच्छ ठेवली जातात हो !!

In reply to by नंदन

प्रसन्न केसकर Fri, 11/13/2009 - 15:50
लेख आवडला असंच म्हणतो. आता शेवटच्या वाक्यात व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल: विचारवंत या शब्दाला झोडपणं म्हणजे नक्की काय सुरु आहे? मुळात इथं विचारवंत कोण आहे हाच मला पडलेला प्रश्न आहे. माझ्या मते विचारवंत म्हणजे विचार करणारा कुणीही नाही तर एखाद्या विषयावर संपुर्ण, विश्वासार्ह अन खरी माहिती घेऊन, वेगवेगळे पैलु लक्षात घेऊन, त्या माहितीची परिस्थितीशी सांगड घालुन मत बनवतो अन मांडतो तो. अश्या विचारवंतांशी मतभेद असु शकतील, वाद होतील पण त्यांना झोडपण्याची इच्छा कुणालाच होणार नाही. मग इथं जे सुरु आहे ते काय आणि ते होतय का? मुळात इथं काही लोक धादांत खोटी, अपुरी आणि चुकीची माहिती प्रसारित करत आहेत. त्या साठी ते वृत्तपत्रातल्या बातम्या पिक चूज करुन वापरत आहेत अन काहीजण तर हिंसक जमाव, दंगल वगैरे अतिरंजित, कपोलकल्पित कहाण्या पसरवत आहेत. अन हे सगळं कश्यासाठी तर त्यांचा जतो(गैर)समज आहे, तो इतरांच्या गळी उतरावा म्हणुन. एका प्रकारे हे किळसवाणे राजकारणच वाटते पण त्याला वैचारिक मुलामा देउन लोकांची दिशाभुल केली जात आहे. जमाव जमणे, बस फोडणे वगैरे वाईट... एक मिनिट मान्य करु पण हे का होते? जर लोकांच्या घटनात्मक अधिकारांवर एखाद्या अतिरेकी निर्णयाने गदा येत असेल तर त्यानी काय करणे अपेक्षित आहे? याविषयावर इथं लिहिणार्‍या एका तरी भाष्यकारानं/ टीकाकाराभु/ स्वयंभु स्वयंघोषित कायदाप्रिय नागरीकानं कधी लिहिलं? जनआंदोलनांवर टीका करताना हे करायला नको? हे जे सो कॉल्ड जागरुक नागरीक, प्रामाणिक करदाते वगैरे आहेत त्यांनी हे का झालं, कधी झालं, कसं झालं याची माहिती घेतली? मग हे इथं असं लिहिणारे लोक तेव्हढे सज्जन आणि ते आंदोलक सगळे करबुडवे, दंगलखोर असं कसं म्हणता येईल? खरतर इथं गेल्या काही दिवसात काही सभासदांनी जेव्हढी धादांत खोटी माहिती दिली, केवळ सहानुभुती मिळवण्यासाठी ते स्वतः अफवा पसरवण्याचे गुन्हेगार आहेत. पण त्यांचा आव मात्र आम्हीच प्रामाणिक करदाते अन्न इतर सगळे चोर असा आहे. मग या तथाकथित विचारवंतांना झोडपलं तर त्यात गैर ते काय? इथं काही लोक पुर्वग्रह न बाळगता लिहितात आणि त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे.

In reply to by प्रसन्न केसकर

सूहास Fri, 11/13/2009 - 17:17
प्रसनदांशी सहमत.... नेमकी परिस्थिती समजुन न घेता खोटारडेपणा करुन विचारवंत म्हणवुन घेण्याची काय हौस असते काय माहीत ? तरी बर अजुन पुर्ण डेटा दिला नाही !!आणी मी काय ठेका घेतला काय विचारवंताना माहीती पुरवायचा... थोडेसे लेखाविषयी ...धनंजय, लेखनशैली आवडली ..लेख आवडला नाही...ईतिहासातील घडलेल्या गोष्टींचा ईत्यंभुतपणे आजच्या परिस्थितीशी संबध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेलाय !! एक उदाहरण सांगतो ... एक माणुस टपरीवर चहा पित असतो...चहाची चव काही बरोबर लागत नाही म्हणजे यथातथाच लागतो...पण मजबुरीत मात्र प्यायला लागतो...पण मनात मात्र आठवत असतो...तो चहा... जो त्याने कधीतरी कोठेतरी प्यालेला असतो.तो चवदार असतो..त्याची चव त्याला आठवते...बघा हां ...थोडेसे आपल्याबरोबर ही असे होते का कधी..पितोय ईथला चहा आणी मनात कुठला तर तिकडचा..आणी आपण तीच चव त्या चहात आणायचा प्रयत्न करतो...ईतिहासाच्या बाबतीत ही असेच होते...आपण जरी गीता वाचत असतो आणी त्यात मात्र आपण सौताचा सोयीस्कर अर्थ घालत असतो... ईथे आपणही तशाच प्रकारचा अर्थ घालण्याचा प्रयत्न घातला आहे आणी जर तसे नसते तर ते शेवटचे वाक्य घुसडायची गरज नव्हती.....म्हणतात ना माणुस जसजसा मोठा होत जातो ..त्याला सारखे असे वाटते की मी जे काही करतो तेच बरोबर आहे...पण जरा सारासारविवेकबुध्दीने विचार करा आणी मला सांगा अस्मितेच्या भरात चैतन्यपूर्ण तारुण्याने नेमक्या आपल्या भावना कश्या व्यक्त करायच्या ???भगतसिंगानी कश्या व्यक्त केल्या होत्या ? वांजळेनी मराठीचा मुद्दा लपवुन निवडणु़क लढवलेली नाही....त्यांच्या निलंबनाने तेथील एका अर्थाने प्रतिनिधीत्व नाकारले गेले ? ईथे मिपावर सर्वात वर जे लिहिले आहे तेच "जनमत" झाले. आणी त्या जनमताचा आदर करताना हे सर्व घडले असे तुम्हाला वाटत नाही का ? आता राहिली गोष्ट वरील निमीत्त-मात्रच्या प्रतिसांदाबद्दल..... केवळ टोमणे मारल्याचे दिसते...काही ही डिटेल्स हातात नसले की होते असे ..मुळात विचारवंतानी विचार माडांवेत...डिटेल्स नाही... निमीत्त -मात्र बस फोडल्या तर काय झाले? माणसे थोडीच मारली असला युक्तिवाद करणार्‍यांसाठी हा लेख वाचनीय ठरो.>>> कालच मी आपल्याला नीटपणे डिटेल्स दिल्या होता...त्यातला मुळ मुद्दा आपल्या लक्षात आलेला दिसत नाही..पुन्हा एकदा नीट वाचावा हि विनंती...मी मुळ प्रतिसादातच केवळ बस फोडण्याविषयीच लिहीले आहे असे आपल्याला वाटत असेल नाही ..केवळ सत्य परिस्थिती तुमच्या लक्षात आणुन दिली..माझा डेटा एकदम पक्का आहे....तसा तुमचा तिथे अपमान झाला असे तुम्हाला वाटते आणी त्या प्रक्षोभातुनच तुम्ही कालपासुन जिथे चान्स मिळेल तिथे टोमणा मारत आहात... असो ...कोणीही काहीही लिहायला ईथे बंदी नाही......मग ते विचारवंत का असेनात. जाता जाता : एक म्हण आठवली " आयत्या बिळावर नागोबा " सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

टारझन Fri, 11/13/2009 - 17:37
" आयत्या बिळावर नागोबा "
हॅहॅहॅहॅ चुकून "उठत्या केळावर पात्रोबा" असे वाचले ... असो !! पुणेरी नं उत्तम निरसन केलंय .. पण हे लिहून समजलं तर ठिक ना :) -- विर्जन पात्र

ऋषिकेश Fri, 11/13/2009 - 16:07
छानच लेख! (फक्त वाक्यरचना काहिश्या वेगळ्या धाटणीची ( इंग्रजीतून विचार केल्यासारखी?) आहे, ती मधे मधे खटकली) बाकी लेख नेमका आहे! ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

धनंजय, लेख आवडला. जर्मनीत जे घडले तितके भीषण वास्तव शक्यतेच्या क्षितिजापलिकडे कधीच असत नाही. त्यामुळे अशा स्मारकाची आठवण (मग ते जगाच्या कोणत्या कोपर्‍यात का असेना), त्याच्या अस्तित्त्वामागील इतिहास यांचा (पुनर्घोषाचा अपरिहार्य आरोप पत्करूनही) विसर न पडू देणे आवश्यक आहे. योग्य प्रसंगी तशी आठवण करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. दुसर्‍या छायाचित्रातील रिकामी खोली व काचेच्या तावदानावर ज्यू सहकार्‍याची सावली हे विशेष लक्षनीय आहे.

चित्रा Fri, 11/13/2009 - 23:43
चांगलाच आहे. पण नंदन यांच्या वरच्या प्रतिसादाशी सहमत आहे. एक भारताच्या इतिहासासंदर्भात आठवण वेगळी झाली - बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मॄतीच्या प्रतीचे दहन केले होते, अर्थातच काही जातींवर अतिशय अन्यायकारक असल्याने हे त्या पुस्तकाला जाळणे प्रतिकात्मक जाळणे होते, त्या अन्यायाविरूद्धचा आवाज होता. दुर्गाबाई भागवतांनी याचा उल्लेख करून ही घटना न आवडल्याचे लिहीले आहे. त्यांच्या मते कुठचेही पुस्तक जाळणे हे पापच होय. याचा अर्थ आंबेडकरांसारखी सूज्ञ, बुद्धीमान व्यक्ती कोणताही स्वार्थ नसतानाही यासारख्या गोष्टींना उद्युक्त होते, तेथे असंख्य सामान्य लोकांचे काय? त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी मूळ प्रश्न काय तो आधी सोडवला पाहिजे असे वाटते. अजून एक वेगळा विचार आला - विचारवंत जर समाजापासून तुटलेले असतील, आणि टीकास्त्र धारण करणे यातच परमकर्तव्य समजत असतील, तर ते बहुदा विचारवंत म्हणता येणार नाहीत.

माहितीपूर्ण लेख आवडला. >>अस्मितेच्या भरात चैतन्यपूर्ण तारुण्याकडून तोडफोड होत असताना "विचारवंत" ही शिवी म्हणून वापरली जाऊ लागली, तर या घटनेचे पडसाद मनात उमटल्यावाचून राहत नाहीत. हम्म, विचारवंताबद्दल इतरत्र चाललेल्या चर्चा,प्रतिसामुळे वरील वाक्य आले असेल तरी ते तितकेसे बरोबर वाटत नाही. विचारवंताबद्दल बोलणे आणि त्यांना शिव्या देणे अगदी सोपे असले तरी त्यांची प्रक्रिया इतकी सोपी नाही, हे मला तरी मान्य आहे. पण अशी वादविवादाची प्रतिक्रियाही तितकीच सापेक्षही असते असे वाटते. वेगवेगळे वाद हे वेगवेग़ळे दृष्टीकोनच असतात. त्यामुळे कधी-कधी टोकाचे विचारही वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, भाषेच्या निमित्ताने एखाद्या गटासंबंधी एखादा विचार कोणी कितीही सुसंगतपणे मांडला असेल आणि त्याला वाद म्हटले असले तरी तो वाद अंशविचार असतो असे वाटते. कारण तो विचार काही समग्र जीवनाचा विचार नसतो,असे वाटते. त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट विचारवंताच्या माथ्यावर मारणे योग्य नव्हे. सामाजिक,राजकीय,आर्थिक,धार्मिक, आणि जीवनसमस्या सोडवण्याच्या प्रयत्न विचारवंत करीत असतात. मानवाला मानवतेकडे घेऊन जाणारी आणि जीवनाला उपकारक ठरणारी एक विचारप्रणाली उभी करण्याचा प्रयत्न विचारवंत करत असतात आणि हे करीत असतांना हे विचारवंत कोणाचेही वाईट चिंतीत नाही, ते सर्वांच्याच दु:खाला कवटाळतात आणि अशा विचारवंताचे मानवसमाजावर खूप उपकार असतात असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

एकलव्य Sun, 11/15/2009 - 07:33
अनोख्या स्मारकाची माहिती मनावर ठसा उमटवून गेली. धन्यवाद धनंजय! - अंगठाबहाद्दर

चतुरंग Sun, 11/15/2009 - 08:59
आवडला. विचारवंत ह्या शब्दाचा जो छळ इतरत्र बर्‍याचशा लिखाणातून झालेला दिसला त्याच्या थोडे सट्ली प्रतिवादात असावे अशा प्रकारचे लिखाण वाटले. चतुरंग

धनंजय Sun, 11/15/2009 - 17:55
सर्वांनी विचार करून प्रतिसाद दिलेले आहेत. - - - अवलिया यांनी मित्रत्वाने मला विचारवंत म्हटले आहे. परंतु येथे "विचारवंत" नावाच्या जमातीचा बाकी "सामान्य लोकां"विरुद्ध कैवार होतो आहे, असे कोणाला वाटू नये. आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य विचारवंत आहे, आणि कृतिशील आहे. लेखातल्या उद्धरणात गबेल्सने उलट म्हटले आहे : की पूर्वी "विचारवंत" असे कोणी होते, त्यांनी जर्मन राष्ट्राला पुस्तकवीर केलेले आहे, आणि भाषण ऐकणारे तरुण कृतिशील आहेत. माझा या उद्धरणातील कल्पनेला विरोध आहे. आदल्या लोकांनीही कृती केल्या होत्या आणि समोरील तरुणही विचार करू शकतात. "पुस्तकांची नासधूस" असा संदर्भ ऐकला तर नालंदा (हल्लीच्या बिहारातील) आणि तक्षशिला (हल्लीच्या पाकिस्तानातील) येथील विद्यापीठांचे स्मरण होणे क्रमप्राप्त आहे. पण त्या विद्यापीठांच्या नाशाच्या काळच्या परिस्थितीचा राजकीय संदर्भ तपशीलवार जाणणे कठिण आहे. त्या मानाने बेबेलप्लात्स येथील होळीच्या वेळी पुढार्‍याने केलेले भाषण आपल्यापाशी उपलब्ध आहे. ते तरुण जर्मन राष्ट्राच्या प्रगतीच्या कुठल्या शब्दांनी भारावलेले होते ते आपल्याला कळते. त्यांच्या स्वतःच्या शब्दांतून - फक्त जेत्यांच्या शब्दांमधून नव्हे. शिवाय जर्मनीत त्या काळी लोकशाही होती, आणि युती-आघाडीच्या राजकारणाला ये तरुण विटलेले होते. अशा प्रकारचे राजकीय सामाजिक तपशील शेकडो वर्षांपूर्वी शक्य नव्हते. म्हणून बेबेलप्लात्सचा विचार नालंदा-तक्षशिलेपासून वेगळा करण्यात काही हशील आहे. वाटल्यास भारतातले, महाराष्ट्रातले उदाहरण घ्यावे, तर हल्लीच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील पुस्तकांच्या नासधुसीचे उदाहरण मनात येते. मिसळपावावरील कुठलाही प्रतिसादक त्या ठिकाणी असता तर त्यांनी नासधूस करणार्‍या भारावलेल्या तरुणांना थांबवलेच असते, अशी मला खात्री आहे. पण आपल्या समाजात "असे पाशवी कृत्य करणार नाही" असा निर्धार सार्वत्रिक नाही. (नाहीतर भांडारकर संस्थेतील घटना झाली नसती, आणि [मिसळपावाबाहेरील] काही लोकांकडून तिचे समर्थन झाले नसते.) तसा निर्धार सार्वत्रिक व्हावा म्हणून आपण सर्व प्रयत्न करत आहोत. - - - (अन्य उपप्रतिसाद तसे देत आहे. जागा राखून.)